Tuesday 1 March 2016

जागतिकीकरणात शेतकऱ्याची हरवलेली ओळख परत मिळवून देण्याची जबाबदारी माध्यमांवर: डॉ. सुधीर भोंगळे



कोल्हापूर दि. मार्च: जागतिकीकरणाच्या रेट्यात आजचा शेतकरी स्वत:ची सामाजिक, सांस्कृतिक ओळख गमावून बसला आहे आणि उत्पादक असणारा तोच स्वतः एक मोठा ग्राहक बनून बसलेला आहे. त्याची ओळख परत मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आज प्रसारमाध्यमांवर आहे, से प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुधीर भोंगळे (पुणे) यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाचे एम.ए.मास कम्युनिकेशन आणि वृत्तपत्र विद्या संवादशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शेतकऱ्यांची आत्महत्या आणि माध्यमांची भूमिका' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे बीजभाषक म्हणून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ.पाटील अध्यक्षस्थानी होते. वारणा महाविद्यालयाचे प्रताप पाटील, कोल्हापूर प्रेस क्लबचे सतीश घाडगे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. भोंगळे पुढे म्हणाले, शेतीमालाचे भाव पडणे, शेतीमालास सामाजिक सुरक्षितता नसणे आणि परदेशी धोरणे ही सुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील कारणे आहेत, तसेच व्यसनाधीनताही काही प्रमाणात कारणीभूत आहे. आत्महत्येच्या कारणांचा शोध व वेध घेणे माध्यमांचे कर्तव्य आहे. परंतु, माध्यमे विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमे त्या कारणांच्या मुळाशी जात नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अभ्यासपूर्वक या घटनांकडे पाहिले पाहिजे, त्यांची दखल घेतली पाहिजे. पत्रकारांमधील अभ्यासू वृत्ती, संशोधन वृत्ती जागृत राहणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याने माध्यमांनी काढलेल्या निष्कर्षांवर विश्वास ठेवणे कठीण होते.
ते म्हणाले, जागतिक बाजाराच्या दडपणामुळे व्यक्तिगत पातळीवर शेतकऱ्याचे शोषण चालू आहे. त्यामुळे लहान शेतकऱ्यांचा या ठिकाणी निभाव लागत नाही. शेतकऱ्यास शेतीचे आधुनिकीकरण करण्यास मर्यादा पडत आहेत. आत्महत्या केलेले शेतकरी छोटे आणि मध्यम वर्गातील आहेत. आज, खाजगी सावकार तीस टक्यांपासून एकशे वीस टक्यांपर्यंत व्याज आकारतात. आज, बँकांची अवस्था शेतकऱ्यांना कर्ज देण्यासारखी राहिलेली नाही. आजही, राष्ट्रीयीकृत बँका पिक कर्ज देण्यास पटकन राजी होत नाहीत, तर दुसरीकडे कराराची शेती सुरु झालेली आहे, ही विदारकता आहे.
डॉ. भोंगळे पुढे म्हणाले, भारतीय शेतीमधील गुंतवणूक गेल्या ५३ वर्षात पन्नास टक्यांनी घटली आहे. याउलट ची, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आपल्या पुढे आहेत. शेतातील गुंतवणूकच कमी झाली तर रोजगार वाढणार नाही, पर्यायाने शेतकऱ्याची प्रगती होणार नाही. शेतीविषयक सरकारी धोरणे, त्यांची अंमलबजावणी, लोकप्रतिनिधींचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, शेतकरी, शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे पूरक व्यवसाय, उद्योग, उपक्रम या गोष्टी प्रसार माध्यमांनी जाणीवपूर्वक उचलून धरल्या पाहिजेत. शासनाच्या विविध पॅकेजचा हवा तसा परिणाम झालेला नाही. त्याचे वास्तव पत्रकारांनी मांडले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जे.एफ.पाटील म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंर्गमुळे हवामानावर विपरित परिणाम होत आहेत. साहजिकच मान्सूनही त्याला अपवाद नाही. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त प्रतिकू परिणाम करणारी अनिश्चितता या देशातील शेतीमध्ये निर्माण झालेली आहे.  तथ्यसंकलन करणे ही माध्यमांची जबाबदारी असते. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करीत आहे, ते आजही चालू आहे. आजचा शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो. १९ व्या शतकातील आणि आजच्या शेतकऱ्याचे वास्तव सारखेच आहे. शेतीची प्रगती झाली, हरीत क्रांती झाली, पत व्यवस्था चांगली झाली, असे होनही शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढतेच आहे, हे चिंताजनक आहे.
डॉ.निशा पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वारणा महाविद्यालयाचे डॉ.प्रताप पाटील यांनी आभार मानले. शीतल माने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment