Thursday 21 July 2016

चीन समजण्यासाठी आधी भारत समजून घेणे आवश्यक: डॉ. जबीन जेकब




कोल्हापूर, दि. २१ जुलै: चीन समजून घेण्यासाठी भारताला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज, दिल्लीचे सहाय्यक संचालक डॉ. जबीन जेकब यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागामार्फत आयोजित 'भारत चीन संबंध' या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. जेकब पुढे म्हणाले, चीनी अभ्यासासाठी अन्य वैचारिक सामग्री आवश्यक आहे, केवळ कटूता असणे महत्वाचे नाही. भारत चीन संबंधाचे भविष्य हे फक्त दिल्ली किंवा बिजिंग केंद्रिनव्हे, तर ते राज्य, प्रदेश आणि शहर केंद्री असले पाहिजे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला चीनशी आर्थिक, औद्योगिक तसेच व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्याची मोठी संधी आहे. मुंबई हे आशियाचे एक मोठे बिझनेस केंद्र आहे. त्यामुळे चीनमध्ये मुंबईविषयी मोठे आकर्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होणे ही त्यामुळे स्वाभाविक बाब होती. या पार्श्वभूमीवर, चीन एकीकडे भारताचा प्रतिस्पर्धी मानला जात असला तरी, त्याच्या क्षमतांचा अभ्यास करून त्यांच्याशी तदअनुषंगिक सहकार्य वृद्धी करणे गरजेचे आहे. चीन महाराष्ट्राचा महत्त्वाचा आर्थिक सहकारी होऊ शकतो. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास चीनी कंपन्याही उत्सुक आहेत. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.
चीनने अत्यंत धोरणीपणाने चीनी उत्पादनांचा 'ब्रँड चायना' ज्या पद्धतीने जगभरात विकसित केला आहे, तशा प्रकारे भारतीय उत्पादनांचा 'ब्रँड' जगभरात कसा निर्माण करता येईल, याची शिकवण चीनी अर्थतज्ज्ञांकडून आपण घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने चीनी तंत्रज्ञान, चीनी अर्थकारण समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही जेकब यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोल्हापूरच्या कृषी व कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांमध्येही चीनी तंत्रज्ञानाच्या सहकार्याने वृद्धी करण्यासाठी त्याचा अभ्यास केला पाहिजे. मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातीलच कुरुंदवाड येथील गिरी देशिंगकर यांनी चीनविषयक अभ्यासक म्हणून भारत व चीन या दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वृदधीसाठी १९८०-९०च्या दशकांत मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे चीनशी संबंधांचा कोल्हापूरचा हा वारसा देशिंगकर यांनी आधीच निर्माण करून ठेवला आहे. तो कोल्हापूरकरांनी पुनरुज्जिवित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, चीनी भाषा शिकणे भारतीय अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. चीनसमवेत शैक्षणिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी विदयापीठ प्रयत्नशील राहील.
यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र विभागाचे डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, 'न्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज्' या संस्थेत विदयार्थ्यांना संशोधनाची मोठी संधी आहे. शेजारी राष्ट्र म्हणून चीनसंदर्भातील अध्ययनाची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणे आवश्यक आहे.


डॉ. वासंती रासम यांनी प्रास्ताविक केले; तर, डॉ. रविंद्र भणगे यांनी आभार मानले. राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ.भगवान माने यांच्यासह शिक्षक, संशोधक, विदयार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment