Wednesday 28 December 2016

सामाजिक चळवळींतूनच वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती: डॉ. अरुणा ढेरे





कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: सामाजिक चळवळींतूनच वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाच्या सदस्य डॉ. अरुणा ढेरे यांनी आज येथे व्यक्त केले.
Dr. Aruna Dhere
शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग व साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन चळवळी आणि स्त्रियांचे प्रश्न या विषयावरील चर्चासत्रात बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात हे एकदिवसीय चर्चासत्र पार पडले.
डॉ. ढेरे म्हणाल्या, निषेधाच्या आणि परिवर्तनवादी, मानवतावादी चळवळींतून मराठी साहित्यपरंपरा आविष्कृत होत आली आहे. भक्तीचळवळीपासून ते स्त्री असमिता चळवळीपर्यंत लेखिकांनी नवे समाजभान प्रकट केले आहे. धर्म सुधारणा, महिलांचे प्रश्न ते स्त्री शोषणाच्या अस्मितेचे कंगोरे मराठीतील लेखिकांनी वेळोवेळी प्रकट केले आहेत.
डॉ. पी.ए. अत्तार यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव डॉ. कृष्णा किंबहुने यांनी स्वागत केले, तर मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले. दुपारच्या विविध सत्रांत डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. शरयू असोलकर, सोनाली नवांगुळ, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. मेघा पानसरे व डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्त्री साहित्यासंबंधीच्या विविध विषयांवर निबंधवाचन केले. डॉ. रोहिणी तुकदेव व डॉ. शोभा नाईक यांनी या सत्रांचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. नीला जोशी व सुश्मिता खुटाळे यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment