Thursday 23 February 2017

शिवाजी विद्यापीठ ५३वा दीक्षान्त समारंभ:

तीन दिवसीय ग्रंथ महोत्सवास उत्साहात प्रारंभ












कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या ५३व्या दीक्षान्त समारंभानिमित्त तीन दिवसीय ग्रंथ महोत्सवास आज सकाळपासून उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते डॉ. एम.एस. रंगनाथन व बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन झाले.
अनेक नामवंत प्रकाशकांचा सहभाग असलेला हा ग्रंथ महोत्सव शिक्षक, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून त्याचा दीक्षान्त समारंभास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या प्रसंगी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातर्फे दरवर्षी दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठ प्रांगणात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी विविध दर्जेदार प्रकाशकांबरोबरच वाचकांचाही याला प्रतिसाद लाभत असतो. यंदाही सुमारे ५० प्रकाशक ग्रंथ महोत्सवात सहभागी झाले असून दहा उपाहारगृहांचे स्टॉल लावण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी या प्रसंगी दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे व ग्रंथपाल डॉ. खोत यांच्यासह बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. ए.बी. गुरव यांनी सर्व स्टॉलना भेटी दिल्या व सहभागी प्रकाशक, उपाहारगृह चालक यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. यावेळी उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, सहायक ग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर यांच्यासह ग्रंथालयातील सर्व प्रशासकीय सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा ग्रंथ महोत्सव दि. २५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

शाहीरांनी मांडला प्रबोधनाचा जागर
या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने शाहीर आझाद नायकवडी यांचा लेणं महाराष्ट्राचं!’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शाहीर नायकवडी यांनी आपल्या खड्या आवाजात महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमास प्रारंभ केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर करून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतविले. पोवाडा सादर करीत असतानाच विद्यार्थ्यांना देशाप्रती, समाजाप्रती त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत होते. या त्यांच्या प्रबोधनाच्या जागराचे सर्वच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय करून देणारा हा कार्यक्रम सुमारे दीड तास रंगला. संग्राम भालकर यांच्या टीमने या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीची दर्शन घडविणारी नृत्ये सादर केली.

No comments:

Post a Comment