Tuesday, 15 September 2026

विद्यापीठात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेला प्रतिसाद

संशोधन पोस्टर व टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू निर्मिती स्पर्धाही उत्साहात



शिवाजी विद्यापीठात आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती.


कोल्हापूर, दि. १५ सप्टेंबर: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याबरोबरच पर्यावरणविषयक संशोधन, सर्जनशीलता आणि शाश्वत विचारांना चालना देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेसह जागतिक ओझोन दिनानिमित्त संशोधन पोस्टर स्पर्धा आणि टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू निर्मिती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या वतीने भारतीय वातानुकूलन, उष्मा व शीतकरण अभियंता संस्था (ISHRAE) व आरएएसएसएस (RASSS) यांच्या सहकार्याने आणि शाश्वतता मंडळाच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. ११) आयोजित गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत कागदाचा लगदा व माती यांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. कलाकार श्रद्धा शशिकांत पोंबुर्लेकर आणि स्वतंत्र व्यावसायिक कलाकार योगेश अरुण साटम यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ५५ पेक्षा अधिक विद्यापीठाबाहेरील सहभागींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जागतिक ओझोन दिनानिमित्त ‘पर्यावरणीय आव्हाने आणि शाश्वत उपाययोजना’ या विषयावर संशोधन पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय आव्हाने, संशोधन व नाविन्यपूर्ण उपाययोजना पोस्टरच्या माध्यमातून मांडल्या. तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून उपयुक्त व सर्जनशील वस्तू तयार करण्याची स्पर्धाही घेण्यात आली. संशोधन पोस्टर स्पर्धेसाठी डॉ. सुषमा पाटील व डॉ. चैताली बगाडे, तर टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू निर्मिती स्पर्धेसाठी डॉ. दीप्ती एन. कुर्‍हे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कराड येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पुष्पलता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कार्यशाळा व स्पर्धास्थळी भेट देऊन विद्यार्थी व सहभागींचे कौतुक केले. बदलत्या हवामानासह पर्यावरणीय समस्यांचा सामना करण्यासाठी पर्यावरणपूरक व शाश्वत उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांच्या आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव, डॉ. सोनल चोंदे, डॉ. पल्लवी भोसले आणि डॉ. स्मिता पोरे यांनी नियोजन केले. संशोधन विद्यार्थी हसन म्हणा, गौरी पवार, अमृता सूर्यवंशी तसेच पदव्युत्तर भाग-१ व भाग-२च्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment