Friday, 15 March 2024

डॉ. उत्तम सकट यांच्या सामाजिक कार्याचा विद्यापीठाला अभिमान: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशासनातर्फे त्यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह अधिकारी


 

कोल्हापूर, दि. १५ मार्च: प्रामाणिक आणि जबाबदारीने काम करणारे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांच्या सामाजिक कार्याचा विद्यापीठाला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काढले.

डॉ.सकट यांना महाराष्ट्र शासनाचा २०२२-२३ साठीचा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापन सभागृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. सकट यांनी विद्यापीठाचे लोकविकास केंद्र, वाहन विभाग तसेच लेखा विभागामध्ये प्रामाणिकपणे काम केलेले आहे. कार्यालयीन कामाबरोबरच सामाजिक जाणीव ठेवून पीएच.डी. संशोधन प्रबंधाचा पुढे समाजासाठी उपयोग होणे आणि त्याची दखल शासन पातळीवर घेतली जाणे, हे विद्यापीठासाठी निश्चितच भूषणावह आहे.      

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, उपकुलसचिव डॉ. संजय कुबल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, कायदा अधिकारी अनुष्का कदम, उपकुलसचिव डॉ.वैभव ढेरे आदी उपस्थित होते.

Thursday, 14 March 2024

कीटकविश्वाची विद्यार्थ्यांना भुरळ; प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यापीठात मोठी गर्दी

 






शिवाजी विद्यापीठात आयोजित कीटक प्रदर्शन पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची मोठी झुंबड उडाली.

कोल्हापूर, दि.१४: शिवाजी विद्यापीठात भरवण्यात आलेल्या भव्य कीटक प्रदर्शनाच्या माध्यमातून किटकांचे विश्व जाणून घेण्यासाठी परिसरातील विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. 

आपल्या पर्यावरणात सभोवताली असणाऱ्या सर्व प्रकारच्या कीटकांचे अनोखे विश्व समजून घेण्यासाठी विविध शाळांच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह उपस्थिती दर्शविली.

काल दिवसभरात विद्यापीठातील विविध अधिविभागांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिले. आज सकाळपासूनच विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.  येथील शिक्षक, संशोधक विद्यार्थ्यांकडून या कीटकांच्या अद्भुत विश्वाची माहिती जाणून घेतली. आपल्या अस्तित्वासाठी कीटकांचे अस्तित्व महत्त्वाचे असल्याचे या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.  येथून पुढील काळात आपण किटकांना समजून घेऊन 'जगा आणि जगू द्या' या न्यायाने त्यांची काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने कीटकविश्वाविषयी फार मोठे जागृतीचे काम केले आहे, अशी भावना शालेय शिक्षकांनी व्यक्त केल्या. उद्याही हे प्रदर्शन चालू राहणार असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन समन्वयक डॉ. सुनील गायकवाड यांनी केले आहे.


Wednesday, 13 March 2024

अन्नसाखळीमध्ये कीटकांचे महत्त्व अनन्यसाधारण: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

भव्य कीटक प्रदर्शनाचे विद्यापीठात उद्घाटन; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित भव्य कीटक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (उजवीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. आशिष देशमुख

शिवाजी विद्यापीठात आयोजित भव्य कीटक प्रदर्शनाची कुतुहलाने पाहणी करणाऱ्या विद्यार्थिनी 

शिवाजी विद्यापीठात आयोजित भव्य कीटक प्रदर्शनाची डॉ. सुनील गायकवाड यांच्याकडून माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित भव्य कीटक प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

(कीटक प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाची चित्रफीत)



कोल्हापूर, दि. १३ मार्च: जैविक अन्नसाखळीमध्ये कीटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कीटकांच्या प्रदर्शनाच्या आयोजनामुळे विद्यापीठाच्या नॉलेज टुरिझममध्ये प्राणीशास्त्र अधिविभागाने महत्त्वाची भर घातली आहे, असे मत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय भव्य कीटक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आज या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला.

प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे विविध संशोधनांतर्गत वेळोवेळी वेगवेगळ्या कीटकांच्या प्रजातींचे नमुने वन विभाग आणि महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या सौजन्याने संकलित करण्यात आले आहेत. हे नमुने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम रितीने जतन करून ठेवण्यात आले आहेत. यातीलच निवडक २२०० कीटकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये रंगीबेरंगी फुलपाखरांसह काटीकीडे, टोळ, नाकतोडे, भुंगे, मक्षिका, चतुर, किरकिरे, प्रार्थना कीटक, झुरळ आदी कीटकांच्या विविध प्रजाती व प्रकार पाहता येणार आहेत. त्याखेरीज सर्वात मोठा पतंग, भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान फुलपाखरू तसेच ब्लू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू पाहण्याची संधीही मिळणार आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आपल्या सभोवताली कीटकांच्या अनेक प्रजाती वावरत असतात. त्या प्रत्येक प्रजातीचे अन्नसाखळीमध्ये फार महत्त्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये कीटक मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे जगा आणि जगू द्या हे तत्त्व कीटकांच्या बाबतीत मानवाने अवलंबले पाहिजे. कीटकांचे अस्तित्व राहिले, तरच मानवाचे अस्तित्व अबाधित राहणार आहे, याची जाणीव करून देणारे हे प्रदर्शन आहे. संशोधक, विद्यार्थी यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत हा मोलाचा संदेश घेऊन जाण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल. प्राणीशास्त्र अधिविभागाने हे प्रदर्शन कायमस्वरुपी उपलब्ध करण्याच्या दृष्टीनेही आवर्जून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. सुनील गायकवाड यांनी कुलगुरूंसह मान्यवरांना प्रदर्शनात मांडलेल्या कीटकांच्या प्रजातींची तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले, पृथ्वीवरील एकूण प्राणीमात्रांमध्ये कीटकांचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. कीटकांच्या अंदाजे एक कोटी प्रजाती असून त्यातील अवघ्या दहा लाखच मानवाला माहिती आहेत. एका माणसामागे २०० दशलक्ष कीटक असे त्यांच्या संख्येचे प्रमाण आहे. डायनासॉरच्या आधीपासून पृथ्वीवर कीटकांचे अस्तित्व आहे. एटलास मॉथ हा सर्वात मोठा कीटक असून तो या प्रदर्शनात मांडला आहे. या कीटकांची म्हणून काही वैशिष्ट्ये आहेत. एक मधमाशी एका दिवसात किमान १००० फुलांना भेट देते. प्रवासी टोळ हा एका खंडापासून दुसऱ्या खंडापर्यंतचा पल्ला पार करू शकतो. सिकॅडा हा कीटक १७ वर्षांपर्यंत जगू शकतो. कुंभार माशीकडे अन्न जतन करून ठेवण्याची आणि दुसऱ्या कीटकास बेशुद्ध करण्याची कला असते. प्रार्थना कीटक मीलनोपरांत नरास खाऊन टाकून आपल्या अंड्यांसाठीच्या प्रथिनांची गरज भागविते.

मधमाशी संपल्यास माणूस केवळ चार वर्षे जगेल

यावेळी डॉ. गायकवाड यांनी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या एका विधानात मधमाशीचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. आईनस्टाईन यांनी म्हटले आहे की, ज्यावेळी या पृथ्वीवरील अखेरची मधमाशी नाहीशी होईल, तेथून पुढे माणूस केवळ चार वर्षे जगू शकेल. परागीभवनाच्या प्रक्रियेमुळे अन्ननिर्मितीमध्ये मधमाशा अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी मधमाशीचे अस्तित्व उपयुक्त आहे. अशाच प्रकारे प्रत्येक कीटक आपल्या अन्नसाखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, हे लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.बी. खरबडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. नितीन कांबळे, डॉ. शिवानंद यन्कंची, डॉ. माधव भिलावे उपस्थित होते. सुरवातीला डॉ. माधुरी वाळवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख यांनी आभार मानले.

कीटकांना पाहून आश्चर्य आणि नवलाई

प्रदर्शन पाहताना विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आश्चर्य आणि नवलाई ओसंडून वाहात होती. प्राणीशास्त्र अधिविभागाने आपल्या संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनींची माहिती देण्यासाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे कीटकांच्या प्रत्येक पॅनलभोवती जिज्ञासूंची गर्दी दिसत होती. आपल्याला माहिती असणाऱ्या मोजक्या कीटकांकडे कौतुकाने पाहताना माहिती नसणाऱ्या कीटकांकडेही चिकित्सक नवलाईच्या दृष्टीने पाहणारे प्रेक्षक दिसून येत होते.


Tuesday, 12 March 2024

यशवंतराव चव्हाण यांच्याकडून पुरोगामी, सुसंस्कृत महाराष्ट्राची पायाभरणी: डॉ. अंबादास मोहिते

 

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. अंबादास मोहिते.

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. अंबादास मोहिते. मंचावर (डावीकडून) डॉ. नितीन माळी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व डॉ. उमेश गडेकर

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. उमेश डेकर, डॉ. अंबादास मोहिते व डॉ. नितीन माळी आदी

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त प्रतिमापूजन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आदी.


कोल्हापूर, दि. १२ मार्च: महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान आहे. पुरोगामी, सुसंस्कृत आणि विकसित महाराष्ट्राची पायाभरणी यशवंतरावांनी केली, असे प्रतिपादन अमरावती येथील डॉ. अंबादास मोहिते यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने 'महाराष्ट्राची जडणघडण आणि यशवंतराव चव्हाण' या विषयावर अमरावती येथील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.

डॉ.अंबादास मोहिते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा आणि पुढाकार होता.  राजकीय, सामाजिक, आर्थिक, सहकार, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र असेल अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याची छाप उमटवणारे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाचे गुण धारण करणारे, संयमी, धीरोदात्त, गुणग्राहकता, उत्तम प्रशासक आणि भविष्याचा वेध घेणारे असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करताना राज्याची भविष्यकालीन वाटचाल कशी सुखकर होईल, हे त्यांनी जाणीवपूर्वक पाहिले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते या देशाचे संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, देशाचे उपपंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी कार्य केले. या माध्यमातून त्यांनी राज्य पातळीवर आणि देश पातळीवर आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखविली. प्रचंड वाचन, चिंतन, मनन यांतून त्यांची वैचारिक जडणघडण झाली. त्यांच्यावर महात्मा गांधी, शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. या प्रगल्भ वैचारिक बैठकीतूनच त्यांनी महाराष्ट्राला नवीन दिशा दिली.  यशवंतरावांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये माणसे तयार केली, नेतृत्व फुलवले. त्यातून सर्व क्षेत्रातील माणसे पुढे आली आणि महाराष्ट्र साकार झाला. 

महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाकरिता सहकार क्षेत्रामध्ये भरीव कार्य होणे आवश्यक आहे, या भावनेतून यशवंतरावांनी काम केल्याचे सांगून डॉ. मोहिते म्हणाले, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या मदतीने सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया महाराष्ट्रात रूजविला. सहकार क्षेत्राला कायद्याचे आणि संस्थात्मक स्वरूप देण्याचे काम त्यांनी केले.  त्यांच्या कार्यकाळामध्ये १८ सहकारी साखर कारखाने सुरू झाले. सहकारी कामगार संस्था, सहकारी ग्राहक भांडार, सहकारी खरेदी विक्री संघ सुरू झाले. सहकारातून विकास साधण्यासाठी वेळप्रसंगी सहकाऱ्यांची मदत घेतली. योग्य व्यक्तींची, योग्य वेळी, योग्य ठिकाणी निवड करणे हे यशवंतराव चव्हाणांच्या उत्तम प्रशासनाचे सूत्र होते.  उत्तम प्रशासक म्हणूनही त्यांचे नांव लौकिक होते.  महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्य व्यवस्था अधिक मजबूतपणे रूजली त्याचे संपूर्ण श्रेय यशवंतराव चव्हाणांना जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून यशवंतरावांनी कार्य केले. त्यांनी देशामधील कोयना धरणासारख्या मोठया प्रकल्पांची उभारणी पूर्ण केली. उद्योगांचा विकास साधण्यासाठी औद्योगिक वसाहती स्थापण्याचा प्रारंभ केला. ऑटोमोबाईल हबसाठी पुणे येथील भोसरीची जागा त्यांनी निश्चित केली.  लोकांना सामाजिक न्याय देण्याचा मूळ उद्देश होता. सामाजिक न्यायाचे ते मोठे पुरस्कर्ते होते.  १९६१ मध्ये वतनदारी पध्दती रद्द करण्याचे काम यशवंतरावांनी केले. विरोधकांनी टीका केली तरी त्यांच्या मतांचा आदर व सन्मान करीत होते. त्यामुळे राज्यात आणि देशात लोकशाही रूजली आणि समृध्द झाली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. व्यवस्थापनाची जोड फक्त पुस्तकी नसून माणसाच्या कार्य कर्तृत्वामध्येही असते, हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिलेले आहे. त्यांचे विचार समजावून घेवून आचरणात आणले पाहिजे आणि आत्मसातही केले पाहिजेत. 

सुरूवातीला यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले. यशवंतराव चव्हाण अध्यासनाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. प्रल्हाद माने, डॉ.कविता वड्राळे यांच्यासह विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी केले. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, डॉ.अंबादास मोहिते, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, श्रीमती शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ.भारती पाटील, डॉ.नितीन माळी, डॉ.उमेश गडेकर, डॉ.अमोल मिणचेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.


Monday, 11 March 2024

महाराष्ट्र घडविणारी माणसं समजावून घ्या: मधुकर भावे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानामध्ये बोलताना ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे. मंचावर (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, रविराजे देसाई आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानामध्ये बोलताना ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे. 

कोल्हापूर, दि. ११ मार्च: महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला घडविणारी माणसं समजावून घेण्यास विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनामार्फत लोकनेते बाळासाहेब देसाई आणि त्यावेळचा महाराष्ट्र या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर पाटणच्या मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराजे देसाई प्रमुख उपस्थित होते.

मधुकर भावे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्राच्या वाटचालीचा वेध घेऊन त्या वाटचालीतील बाळासाहेब देसाई यांचे योगदान आपल्या व्याख्यानात विषद केले. ते म्हणाले, साध्या माणसांच्या प्रामाणिकपणावर हे जग चालले आहे. त्या माणसांच्या कष्टाचे मोल जाणणारी माणसे म्हणजे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील ही सारी नेतेमंडळी होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या उत्थानासाठीच त्यांनी अवघी हयात वेचली. त्यांच्या या कष्टातूनच आजचा महाराष्ट्र साकारला आहे.

राजकारणात आदरयुक्त दरारा कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब देसाई असल्याचे सांगून भावे म्हणाले, महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशालाच दिशा देणाऱ्या अनेक योजना बाळासाहेबांच्या कारकीर्दीत साकार झाल्या. गृहमंत्री पदाच्या कारकीर्दीत मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क या दोन्ही ठिकाणचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी उभारले. वैशिष्ट्य म्हणजे एकही शासकीय रुपया खर्च न करता लोकवर्गणीतून ते उभारले. शिक्षण मंत्री पदाच्या कारकीर्दीत अल्प-मिळकत गटातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात सवलतीची योजना त्यांनीच सुरू केली. महसूलचा कारभार पाहताना शेतकऱ्याला खातेपुस्तिका देण्याचा निर्णय घेतला. कृषी मंत्री म्हणून शेतामधील झाडे ही शेतकऱ्याच्या मालकीची करून देण्याचा निर्णय घेतला. कसेल त्याची जमीन, द्वि भार्या प्रतिबंधक कायदा, विरोधी पक्षनेत्याला मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय, एसटी महामंडळाच्या सेवेचा राज्यभरात विस्तार, बालगंधर्वाच्या एका विनंतीवरुन मराठी नाटकांवरील कर रद्द करण्याचा निर्णय असे एक ना अनेक लोकहिताचे निर्णय बाळासाहेब देसाई यांनी घेतले.

शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमध्येही बाळासाहेब देसाई यांनी अतिशय कळीची भूमिका बजावल्याचे सांगून भावे म्हणाले, बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापूर येथे एका दवाखान्यात दहा रुपये मजुरीवर झाडलोटीचे काम करून आपले शिक्षण घेतले. राजर्षी शाहू महाराजांनी वंचितांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या मनात अतीव आदर होता. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांना बी.ए.ची पदवी घेण्यासाठी साठ रुपये खर्च करून मुंबईला जावे लागले होते. तेव्हा कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ व्हायलाच हवे, याविषयी त्यांचा मनोदय पक्का झाला. यशवंतरावांना विद्यापीठ कराडला व्हावे, असे वाटे, तर वसंतदादांना ते सांगलीला व्हावे, असे वाटे. तथापि, सातारचे असूनही बाळासाहेब मात्र विद्यापीठ कोल्हापूरलाच व्हावे, यासाठी आग्रही होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा विद्यापीठाचा विषय चर्चेसाठी येणार असल्याचे समजले, तेव्हा बाळासाहेबांच्या अंगात प्रचंड ताप होता. तरीही ते बैठकीला उपस्थित राहिले. यशवंतरावांनी त्यांना कोल्हापूरबद्दल आश्वस्त केले आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला स्थापन करण्याचा निर्णय झाला. अशी ही मोठी माणसे आपण समजून घ्यायला हवीत, त्यांचे जगणे समजून घ्यायला हवे आणि त्यांच्या आदर्शाबरहुकूम वाटचाल करण्याचा प्रयत्न करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ व्हावे, असे स्वप्न राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण बाळगून होते. बाळासाहेब देसाई हे त्यांचे विद्यार्थी. म्हणजे गुरूने पाहिलेले स्वप्न विद्यार्थ्याने तडीस नेल्याचे हे एक दुर्मिळ पण महत्त्वाचे उदाहरण आहे. आजच्या पिढीपर्यंत त्यांचे कष्ट आणि द्रष्टेपण पोहोचणे आवश्यक आहे. सत्ता व पदाचा सदुपयोग जनतेच्या हितासाठीच करण्याचा आणि आपल्या कर्मभूमीप्रती कृतज्ञभाव बाळगण्याचा गुणधर्म बाळासाहेबांकडून शिकता येतो. एका साध्या विचाराचे धोरणात रुपांतर करण्याचे कर्तृत्व आणि धडाडी हा त्यांचा गुण आजच्या काळातही अनुकरणीय आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनिश पाटील यांनी केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्ता मचाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. अरुण भोसले, व्ही.एस. पानस्कर, डॉ. ईस्माईल पठाण, डॉ. रणधीर शिंदे, दशरथ पारेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. प्रकाश गायकवाड यांच्यासह देसाई कुटुंबातील सदस्य, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Friday, 8 March 2024

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात तंत्रज्ञान अधिविभागाचे वर्चस्व

 

शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या अंतिम दिवसाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी विजेत्या खेळाडूंसह वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. शरद बनसोडे, डॉ. दत्तात्रय गायकवाड यांच्यासह मान्यवर अधिकारी व संयोजन समितीचे सदस्य.


कोल्हापूर, दि. ८ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवात अखेरच्या दिवशी तंत्रज्ञान अधिविभागाने विविध क्रीडा प्रकारांतील आपले वर्चस्व सिद्ध केले. कबड्डीसह क्रिकेट आणि रस्सीखेच या स्पर्धांमध्ये तंत्रज्ञान अधिविभागाच्या संघांनी विजेतेपद मिळविले.

कबड्डी स्पर्धेत तंत्रज्ञान अधिविभागाच्या पुरूष व महिला संघांनी विजेतेपद मिळविले. पुरूष गटात क्रीडा आणि एमबीए अधिविभागांनी अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांक मिळविले. महिला गटात गणित आणि पर्यावरणशास्त्र अधिविभागांनी अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांक मिळविले.

क्रिकेटमध्ये पुरूष गटात तंत्रज्ञान, क्रीडा आणि गणित अधिविभागांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले. महिला गटात गणित, इतिहास आणि नॅनोसायन्स व तंत्रज्ञान या अधिविभागांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. रस्सीखेच स्पर्धेत पुरूष गटात तंत्रज्ञान, एमबीए आणि रसायनशास्त्र यांनी तर महिला गटात नॅनोसायन्स व तंत्रज्ञान, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स या अधिविभागांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या वतीने ४ ते ७ मार्च या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम दिवसाचा पारितोषिक वितरण समारंभ वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ दत्तात्रय गायकवाड, डॉ. शिवलिंगप्पा सपली आणि क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी डॉ. एन.डी. पाटील, डॉ. प्रशांत पाटील, एन.आर. कांबळे, डॉ आय.एच. मुल्ला, सुभाष पोवार, डॉ. सचिन पाटील, सुचय खोपडे, डॉ. नवनाथ वळेकर, डॉ. आण्णा गोफणे, डॉ. क्रांतीकुमार मोरे, धीरज पाटील यांच्यासह आनंदा तळेकर, सुनील देसाई व क्रीडा अधिविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून विशांत भोसले, विक्रम कोंढावळे, राजेश कोळी, संतोष खाडे, विशाल हिलगे, योगेश दळवी, युवराज साबळे, अमर पाटणकर, प्रमोद सामुद्रे, उदय करवडे यांच्यासह विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

Thursday, 7 March 2024

शिवस्पंदन क्रीडा महोत्सव:

मिनी-मॅरेथॉनमध्ये डॉ. डेळेकर, डॉ. जगताप यांच्यासह तुषार शेळके, मनिषा पाटील विजेते

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवांतर्गत मिनी-मॅरेथॉनला फ्लॅगऑफने प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत अन्य अधिकारी

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवांतर्गत रस्सीखेच स्पर्धेतील एक रोमहर्षक क्षण

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवांतर्गत रस्सीखेच स्पर्धेतील एक रोमहर्षक क्षण

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवांतर्गत रस्सीखेच स्पर्धेतील एक रोमहर्षक क्षण

(शिवस्पंदन क्रीडा महोत्सव: मिनी मॅरेथॉनची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ७ मार्च: शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाअंतर्गत आज सकाळी झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत तुषार शेळके, मनिषा पाटील, डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. नीलांबरी जगताप यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक मिळविला. बास्केटबॉल स्पर्धेत क्रीडा व तंत्रज्ञान अधिविभागांनी तर रस्सीखेच स्पर्धेत रसायनशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागांनी विजेतेपद मिळविले.

शिवाजी विद्यापीठातील आजची सकाळ स्पर्धकांच्या उत्स्फूर्त आणि जल्लोषी प्रतिसादात रंगलेल्या मिनी-मॅरेथॉन स्पर्धेने प्रफुल्लित झाली. विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग दर्शविला आणि स्पर्धा अविस्मरणीय बनविली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.

या मिनी-मॅरेथॉन स्पर्धा विद्यार्थी, विद्यार्थिनी, विद्यापीठ कर्मचारी (पुरूष) आणि विद्यापीठ कर्मचारी (महिला) अशा चार गटांत पार पडल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रांगणातील पुतळ्यासमोरून या स्पर्धेचा प्रारंभ होऊन महिला वसतिगृह, पाच बंगला, दूरशिक्षण केंद्र, क्रीडा अधिविभाग, गेट क्र. ८, परीक्षा भवन, मुख्य प्रशासकीय इमारत, शिवपुतळा प्रदक्षिणा या मार्गे राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह असा मॅरेथॉनचा मार्ग होता. कुलगुरू डॉ. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. रामचंद्र पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे (कंसात अधिविभाग) असा- विद्यार्थी गट: तुषार शेळके (इलेक्ट्रॉनिक्स), तुकाराम मोरे (क्रीडा), सोपान घेरडे (भूगोल), जालिंदर बजबळकर (ग्रंथालय व माहितीशास्त्र), ओंकार येवले (वायसीएसआरडी) आणि आशितोष माने (तंत्रज्ञान).

विद्यार्थिनी गट: मनिषा पाटील (क्रीडा), प्रेरणा घोडके (तंत्रज्ञान), तृप्ती इंगळे (इंग्रजी), स्नेहल खामकर (सामाजिक वंचितता व समावेशन धोरण), ऋतुजा पाटील (भौतिकशास्त्र) आणि तेजश्री पाटील (भौतिकशास्त्र).

विद्यापीठ कर्मचारी (पुरूष): डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), डॉ. सत्यजीत पाटील (भौतिकशास्त्र), डॉ. एस.एन. सपली (तंत्रज्ञान), डॉ. एन.जे. वलेकर (रसायनशास्त्र), डॉ. ए.डी. गोफणे (प्राणीशास्त्र) व डॉ. एन.एल. तरवाळ (भौतिकशास्त्र).

विद्यापीठ कर्मचारी (महिला): डॉ. नीलांबरी जगताप (इतिहास), अनुप्रिया तरवाळ (स्टाफ नातेवाईक), अहोरी कुलकर्णी (स्टाफ नातेवाईक) आणि डॉ. भक्ती कुलकर्णी (तंत्रज्ञान).

दरम्यान, काल झालेल्या बास्केटबॉल स्पर्धेत पुरूष गटात क्रीडा अधिविभागाने प्रथम तर तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र अधिविभागाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. महिलांमध्ये तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम, तर अर्थशास्त्र अधिविभागाने द्वितीय क्रमांक पटकावला.

रस्सीखेच स्पर्धेत पुरूषांमध्ये रसायनशास्त्र अधिविभागाने अर्थशास्त्र विभागाला पराभूत करीत तृतीय क्रमांक मिळविला, तर महिलांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाने पर्यावरणशास्त्र विभागाला पराभूत करीत तृतीय क्रमांक मिळविला.