शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र, भारत) येथील दैनंदिन ठळक घडामोडींचा वृत्तांत देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी निर्मिलेला ब्लॉग.
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि अधिष्ठाता.
पद्मश्री
डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विद्यापीठाचा प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान
पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. यावेळी (डावीकडून) डॉ. बाबासाहेब खोत, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. अरुण कणबरकर.
शिवाजी विद्यापीठात प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर. मंचावर (डावीकडून) डॉ. बाबासाहेब खोत, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. अरूण कणबरकर
शिवाजी विद्यापीठात प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर.
शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर समारंभात बोलताना दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव
(प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभाची लघुचित्रफीत)
कोल्हापूर, दि. १३
एप्रिल:पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांची पत्रकारिता म्हणजे
व्रत आणि प्रामाणिक व्यवहार यांच्या संतुलनाचे मूर्तीमंत उदाहरण तथा प्रतीक आहे, असे
गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार-२०२४ दैनिक पुढारीचे मुख्य
संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना डॉ. काकोडकर यांच्या हस्ते आज राजर्षी
शाहू सभागृहात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
प्रमुख उपस्थित होते.
डॉ. काकोडकर यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्राचार्य कणबरकर
पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ
आणि एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते.
यावेळी पद्मश्री डॉ. जाधव यांच्या ‘सिंहायन’ या गौरव ग्रंथातील प्राचार्य
कणबरकर यांच्या लेखाचा दाखला देऊन डॉ. काकोडकर म्हणाले, डॉ. जाधव यांनी व्रत आणि
प्रामाणिक व्यवहार यांची सांगड घालून पत्रकारिता केल्याचे प्रतिपादन प्राचार्य
कणबरकर यांनी केले आहे. यावरुन शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या नावे असलेल्या
पुरस्कारासाठी डॉ. जाधव यांची केलेली निवड अत्यंत सार्थ आहे, याची प्रचिती येते.
पत्रकारितेमध्ये प्रबोधनाचे कार्य उच्च मानून अन्यायग्रस्तांसाठी आधारस्तंभ म्हणून
तिचा वापर त्यांनी केला. लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यासाठी त्यांनी
केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. डॉ. जाधव यांच्या वक्तव्यातूनच त्यांच्या
वैचारिक, तात्त्विक आणि मानसिक उंचीची झलक पाहावयास मिळाली, असेही ते म्हणाले.
डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, प्रगल्भ समाजव्यवस्थेमध्ये दर्जेदार संस्था, उत्तम
पायाभूत सोयीसुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि चांगले कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन या
चार बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञानच असते. त्यामध्ये
भलेबुरेपणाची चर्चा गैरलागू असते. वापरणारे त्याचा वापर कोणत्या दिशेने करतात,
यावर ते अवलंबून असते. म्हणूनच प्रगल्भ समाजामधील जीवनमूल्यांशी प्रामाणिकता,
पाशवी वृत्तीवरील नियंत्रण, त्याच्यामधील मूल्यसंवर्धनाची क्षमता आणि सामाजिक
जडणघडणीचा साकल्याने विचार या बाबी तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराला प्रेरणा
देतात. शोषणविरहित आणि सर्वांचे सक्षमीकरण अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर होणे
चांगल्या समाजनिर्मितीसाठी आवश्यक आहे. त्यात शिक्षण आणि समाज प्रबोधनाचे महत्त्व
मोठे आहे.
हा पुरस्कार कोल्हापूरच्या जनतेचा;‘पुढारी’च्या वाचकाचा: डॉ. प्रतापसिंह जाधव
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शिवाजी
विद्यापीठाने प्रदान केलेला हा पुरस्कार कोल्हापूरच्या जनतेचा तसेच ‘पुढारी’च्या वाचकाचा असल्याचे सुरवातीलाच सांगितले आणि
त्यांच्या वतीने आपण अत्यंत विनम्रतेने पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगितले.
प्राचार्य कणबरकर यांच्याशी आपला अतिशय जवळचा स्नेह होता, त्यांचे संपूर्ण आयुष्य
शिक्षणाला समर्पित होते. समाजाला शिक्षण देण्यासाठीच त्यांनी आपली लेखणी आणि वाणी
वापरल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या भाषणामध्ये त्यांनी ज्ञानाचे कालातीत महत्त्व विषद केले. ते म्हणाले,
आजच्या कालखंडात बौद्धिक संपदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भौतिक संपत्ती लुटली
जाऊ शकते, मात्र बौद्धिक संपत्ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सातत्याने
नवनवीन गोष्टी शिकत राहण्यास प्राधान्य दिले पाहिजे. यामुळेच ज्ञानदानाचे कार्य
करणाऱ्या प्रत्येकाविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. शिक्षक हे वर्गाला शिकवितात,
मात्र संपादक-पत्रकार समाजाला शिकवितात. या शिक्षण परंपरेचा आपण आदर करायला हवा.
भारताला नालंदा, तक्षशीला विद्यापीठांची प्राचीन शैक्षणिक-सांस्कृतिक परंपरा लाभली
आहे. तिचा मला नितांत अभिमान आहे. आपला साक्षरतेचा दर ७४ टक्क्यांपर्यंत गेला असला
तरी अद्याप ४३ कोटी जनता अशिक्षित आहे. त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे,
कारण शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. कोठारी आयोगाने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा
टक्के इतका खर्च शिक्षणावर करण्याची शिफारस केली होती, मात्र अद्याप तिची
अंमलबजावणी केली गेलेली नाही. ती व्हायला हवी, असे त्यांनी आग्रही प्रतिपादन केले.
डॉ. प्रतापसिंह जाधव पुढे म्हणाले, राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे
मूलभूत स्वातंत्र्य दिले आहे. कोणतेही स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही.
सर्वसामान्य नागरिकापेक्षा कोणतेही अतिरिक्त अधिकार पत्रकारांना नाहीत. तथापि,
निकोप पत्रकारितेची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या विधिमंडळ,
कार्यपालिका आणि न्यायपालिका या तीन स्तंभांमध्ये सुसंवादाचा मोठा अभाव निर्माण
झाल्यामुळे पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी वाढली आहे. साहित्य आणि
पत्रकारितेमध्ये समाजाचे प्रतिबिंब आढळते. साहित्यिकाकडे अभिव्यक्तीसाठी वेळ असतो,
पत्रकाराकडे मात्र नसतो. त्यामुळे साहित्यिकाच्याही पुढे दोन पावले तो असतो.
त्यामुळे समाजबदलाचा कानोसा त्याला लगोलग घेता येतो. उद्योगपती आणि राजकारणी या
दोन शक्ती प्रसारमाध्यमांचा ताबा घेऊ लागल्या आहेत. हे एक मोठे आव्हान आज
पत्रकारितेसमोर उभे ठाकले आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या
तंत्रज्ञानाचेही आव्हान आहे. मात्र, तंत्रज्ञान कितीही बदलले तरी पत्रकारितेचा
सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा जो आत्मा आहे, तो मात्र कदापि बदलणार नाही, असा
विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कणबरकर यांच्या नावे शिष्यवृत्तीसाठी देणगी
यावेळी डॉ. जाधव यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेमध्ये स्वतःकडील
तितक्याच रकमेची भर घालून त्यामधून प्राचार्य डॉ. कणबरकर यांच्या नावे
विद्यापीठाने शिष्यवृत्ती सुरू करावी, असा प्रस्ताव ठेवला. त्याचा स्वीकार करून
सदर प्रस्ताव अधिकार मंडलांसमोर घेऊन जाण्याची ग्वाही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
यांनी यावेळी दिली.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कणबरकर यांच्यासारख्या
ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्त्वाच्या नावचा पुरस्कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासारख्या
ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्त्वास प्रदान करताना विद्यापीठास मोठा आनंद होतो आहे. विद्यापीठात
ललितकला विभागाच्या स्थापनेबाबत कुलगुरू कणबरकर यांच्या कारकीर्दीत त्यांच्याच
अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात डॉ. जाधव यांनी पुढाकार घेतला. पुढे त्यासाठी
स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच आले आणि विद्यापीठात ललितकला
विभागाची स्थापना झाली. आज विद्यापीठात पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव अध्यासनाची अत्यंत
देखणी वास्तू उभी राहिली आहे. त्यासाठीचा पाठपुरावा आणि शासनाकडून निधी प्राप्त
करण्यासाठीचे प्रयत्न डॉ. जाधव यांनी केले आहेत. सात कोटी रुपयांहून अधिक निधी
त्यामधून मिळाला. देशातील पत्रकारितेच्या या पहिल्या अध्यासनात डिजीटल
पत्रकारितेसह बी.ए. इन फिल्म मेकिंग, कम्युनिटी रेडिओ असे आधुनिक अभ्यासक्रम आणि
उपक्रम सुरू होत आहेत, याचे संपूर्ण श्रेय डॉ. जाधव यांनाच जाते. गेल्या चाळीस
वर्षांत शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांची
प्रचिती देणारे हे प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.
भालबा विभूते यांनी मानपत्राचे वाचन केले. कणबरकर कुटुंबियांतर्फे डॉ. अरुण कणबरकर
यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉ. जाधव यांचा सत्कार केला. नंदिनी पाटील व धैर्यशील
यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास दै. पुढारीचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्यासह परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी
पाटील, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, डॉ.
वसंत भोसले, डॉ. नमिता खोत, डॉ. अंजली साबळे यांच्यासह कणबरकर कुटुंबिय, विविध
विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, दै. पुढारीचे अधिकारी-कर्मचारी,
उद्योग-व्यवसाय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
स्टोरीमॅप स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या डॉ. अभिजीत पाटील यांचे ग्रंथ भेट देऊन अभिनंदन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत डॉ. सचिन पन्हाळकर.
कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: राष्ट्रीय स्तरावरील स्टोरीमॅप स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील अध्यापक डॉ. अभिजीत पाटील यांनी विजेतेपद प्राप्त केले आहे. 'हिडन जेम्स ऑफ बांदिवडे: द जिऑलॉजिकल ट्रेजर' या विषयावरील प्रकल्प त्यांनी सादर केला.
जीआई एस (भौगोलिक माहिती प्रणाली) या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी संस्था असलेल्या एस्री- इंडिया (Environmental Systems Research Institute) या संस्थेमार्फत गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर स्टोरी-मॅप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी सन २०२१ व २०२२ या वर्षीच्या स्पर्धेमध्ये अनुक्रमे आयआयटी गुवाहाटी येथील स्पर्धकाच्या 'ब्रह्मपुत्रेचा पूर' आणि आयआयटी खरगपूर येथील स्पर्धकाच्या 'पर्वतांचे भूत' या स्पर्धकांनी पटकावले आहे. या स्पर्धेसाठी गतवर्षी (२०२३) डॉ. पाटील यांनी "हिडन जेम्स ऑफ बांदिवडे: द जिऑलॉजिकल ट्रेजर" या विषयावरील प्रकल्प सादरीकरण केले. या सादरीकरणाने केवळ प्रेक्षकांनाच भुरळ घातली नाही तर बांदिवडेच्या निर्मनुष्य, निसर्गरम्य भूगर्भीय चमत्कारांच्या अंतर्दृष्टीपूर्ण शोधासाठी व्यापक प्रशंसाही मिळवली. आणि स्पर्धेमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट ठरविण्यात येऊन विजेता घोषित करण्यात आले.
सदर यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . दिगंबर शिर्के यांनी डॉ. अभिजित पाटील यांचे ग्रंथ भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी डॉ. सचिन पन्हाळकर उपस्थित होते.
बांदिवडे गावासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प
या स्पर्धेसाठी डॉ. पाटील यांनी निवडलेला विषय हा कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठरालगत असणाऱ्या बांदिवडे (ता. पन्हाळा) या गावातील अग्नि स्तंभांवर आधारित आहे. भारतातील सर्वात दुर्मिळ बहुभुज स्तंभ, बेसाल्ट संरचना या ठिकाणी पहावयास मिळते. याची निर्मिती 65.6 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असावी. येथील काही स्तंभाची उंची ४० मीटरपेक्षा जास्त आहे. जगामध्ये अशा संरचना खूपच कमी पाहायला मिळतात. असे असूनदेखील या संरचनेची शास्त्रीय व पर्यटन दृष्टीकोनातून महत्त्व व माहिती खूप कमी लोकांना आहे. म्हणूनच डॉ. अभिजित पाटील यांनी स्टोरी-मॅप स्पर्धेसाठी या ठिकाणाची निवड केली. यासाठी त्यांनी या संपूर्ण परिसराचे ड्रोनद्वारे त्रिमितीय सर्वेक्षण केले. तसेच या परिसराचे भूगर्भीय, पर्यटन व शैक्षणिक महत्त्व या स्पर्धेसाठीच्या मांडणीतून अधोरेखित केले. सदर स्टोरी-मॅप https://storymaps.arcgis.com/stories/8026938431344319bd5eeb791584e1eb या संकेतस्थळावर पाहावयास मिळेल.
शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' वाहिनीवरुन महात्मा फुले जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान देताना ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. रवींद्र ठाकूर
कोल्हापूर, दि. ११
एप्रिल: महात्मा जोतीराव फुले हे प्रखर बुद्धीवादी लेखक, साहित्यिक होते; मात्र, त्यांचा कोणीही
साहित्यिक म्हणून उल्लेख केला नाही, हे वेदनादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ
साहित्यिक, विचारवंत डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे फुले, शाहू, आंबेडकर सप्ताह
साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज सकाळी महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने
विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ (@ShivVarta) या युट्यूब वाहिनीवरून डॉ. ठाकूर यांचे ‘महात्मा फुले: व्यक्ती आणि वाङमय’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात
आले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. ठाकूर म्हणाले,
महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यात विपुल लेखन केले. अखंड काव्यरचना, ‘तृतीय रत्न’सारखे नाटक, शेतकऱ्याचा
असूड, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी यांसारखे ग्रंथ, पोवाडे अशी महत्त्वपूर्ण
साहित्यनिर्मिती केली. सत्सारसारखे नियतकालिक काढून पत्रकारिताही केली. मात्र
त्यांना या समाजाने साहित्यिक म्हणून मान्यता दिली नाही. ते प्रखर बुद्धीवादी
होते. त्यांच्या विचारधारेत अंधश्रद्धेला थारा नाही. त्यांनी वर्णवर्चस्ववाद,
जातिश्रेष्ठत्वाची मानसिकता यांविरुद्ध या बुद्धीवादाच्या बळावर रान उठविले.
विद्येपासून वंचित समाजाला विद्यार्जनाचा मार्ग दाखविला. त्यांनी जसा सामाजिक विषमतेला
विरोध केला, तसाच आत्माही नाकारला. त्यांनी धार्मिक कर्मकांडांपेक्षा विचारांना
महत्त्व दिले.
डॉ. ठाकूर म्हणाले, इंग्रजांनी
बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली म्हणून त्यांनी इंग्रजांचे कौतुक केले, तर
त्यांना इंग्रजधार्जिणे ठरविण्यात आले. हिंदू धर्मातील विषमतावादी, अंधश्रद्धा
पसरविणाऱ्या चालीरितींना विरोध केला, म्हणून ब्राह्मणद्वेष्टेही ठरविण्यात आले.
प्रत्यक्षात फुले ना इंग्रजधार्जिणे होते, ना ब्राह्मणद्वेष्टे. ‘ख्रिस्त, महंमद, मांग
ब्राह्मणांसी। धरावे पोटाशी। बंधुपरी।।’ असे सांगणारे फुले हे ब्राह्मणद्वेष्टे कसे असू शकतील, असा प्रश्न ठाकूर यांनी
उपस्थित केला.
महात्मा फुले यांच्या
विचार व कार्याकडे अभ्यासकांचे, साहित्यिकांचे लक्ष जाऊ लागले आहे. त्यांच्या
साहित्याविषयी संशोधन, लेखन होऊ लागले आहे, ही महत्त्वाची बाब असल्याचेही डॉ.
ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन करून
आभार मानले.
शिवाजी विद्यापीठात 'घरंदाज सावली' या पुस्तकावर आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) गजानन साळुंखे, किसनराव कुराडे, डॉ. राजन गवस, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, सी.टी. पवार, डॉ. भारती पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे
कोल्हापूर, दि. १० एप्रिल:शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलसचिव डॉ. उषा इथापे या केवळ इथे शिकलेल्या
विद्यार्थ्यांच्या माताच नव्हत्या, तर एक थोर विदुषी सुद्धा होत्या. त्यांचे
मोठेपण विस्मृतीच्या पडद्याआडून सामोरे आणण्याचे काम डॉ. रणधीर शिंदे यांच्या ‘घरंदाज सावली’ या पुस्तकाने केले आहे,
असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे कै.
श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका
प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रणधीर शिंदे संपादित ‘घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी’ या ग्रंथावर चर्चासत्र
आयोजित करण्यात आले. त्या चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के होते.
डॉ. गवस म्हणाले,
कोणतीही संस्था ही इमारतींनी मोठी होत नसते. तिच्या उभारणीत योगदान देणाऱ्या
प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून ती मोठी होते. डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. उषा इथापे
यांचे शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीत तशा प्रकारचे भरीव योगदान आहे. अशा
व्यक्तींना जाणीवपूर्वक विस्मृतीत ढकलणे परवडणारे नसते. डॉ. इथापे यांचे कार्य अत्यंत
परिश्रमपूर्वक डॉ. रणधीर शिंदे यांनी सामोरे आणले आहे. या व्यक्तीबद्दल लिहीले जात
असताना त्याच्या बरोबरीने संस्थेचा इतिहासही संग्रहित झालेला आहे. डॉ. इथापे यांनी
मार्गदर्शकाविना अत्यंत भरीव अशा प्रकारचे पीएच.डी. संशोधन केले. ते संशोधनही या
निमित्ताने उजेडात आले. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यासंदर्भात अत्यंत मौलिक
स्वरुपाचे लिहीले आहे. भविष्यातील उजेडाची अर्थात संशोधनाची एक रेघ या निमित्ताने ओढली
गेलेली आहे.
माजी कुलगुरू डॉ.
माणिकराव साळुंखे म्हणाले, डॉ. उषा इथापे यांनी शिवाजी विद्यापीठासाठी घेतलेली
अविश्रांत मेहनत न विसरता येणारी आहे. त्यांचे वात्सल्य आणि योगदान यामुळे
विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पहिली फळी घडली, जिने विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर
केला. रणधीर शिंदे यांनी केवळ संपादकाची भूमिका न बजावता त्यापुढे जाऊन
संशोधकाच्या नजरेतून पुस्तकाची मांडणी करताना अनेक बाबी सप्रमाण पुढे आणल्या आहेत,
तर काही गोष्टी नव्याने प्रकाशात आणल्या आहेत.
नागपूरच्या राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांनी आपल्या गतायुष्यातील
आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. उषा इथापे आणि शिवाजी
विद्यापीठ या तीन गोष्टींमुळे माझ्यासारखा एक गवंड्याचा पोर राज्याचा शिक्षण
संचालक, मध्य भारतातील एका मोठ्या विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकला. येथूनच
सर्वधर्मसमभावाची शिकवण घेऊन जगभर जाता येऊ शकले. माझ्यासारखे हजारो विद्यार्थी
इथापे बाईसाहेबांमुळे आयुष्यात काही तरी होऊ शकले, हे त्यांचे थोर उपकार आहेत.
यावेळी गडहिंग्लजच्या
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनीही
डॉ. इथापे यांच्या अनेक आठवणी जागविल्या. त्या आम्हा गोरगरीब मुलांच्या माताजी
होत्या, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. विद्यापीठाचे माजी कर्मचारी गजानन साळुंखे
यांनीही डॉ. आप्पासाहेब पवार आणि डॉ. इथापे यांनी विद्यापीठ उभारण्यासाठी
घेतलेल्या कष्टांची आठवण काढताना त्यांच्यामुळेच आपले कुटुंब उभे राहू शकले, अशी
कृतज्ञ भावना व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि कुलसचिव डॉ.
उषा इथापे यांचा कार्यकाळ हा विद्यापीठाच्या पायाभरणीचा जसा होता, तसाच तो
सुवर्णकाळही होता. कुलसचिव म्हणून त्यांच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती. त्या
जबाबदारीच्या सोबतच इथल्या विद्यार्थ्यांना घडविण्याची, उभे करण्याची जबाबदारीही
त्यांनी शिरावर घेतली होती. त्याचे दर्शन सदर पुस्तकाद्वारे होते. त्यांनी
लावलेल्या ‘कमवा व शिका’च्या रोपट्याला पाणी शेंदण्याचे काम काही काळ करता आले, याचे समाधान वाटते.
प्रबोधिनीचे काम पुढे घेऊन जात असताना या योजनेतील पुढील फळ्यांतील
विद्यार्थ्यांनाही सामावून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी अध्यासनाच्या
समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी
पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष प्रा. सी.टी. पवार यांनी
वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी शब्दशिवार प्रकाशनाचे इंद्रजीत घुले आणि
मुद्रितशोधक विष्णू पावले यांचा सत्कार करण्यात आला. सुस्मिता खुटाळे यांनी
सूत्रसंचालन केले, तर राजेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध
अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक यांच्यासह डॉ. इथापे यांचे कुटुंबीय आणि डॉ. इथापे यांच्या कार्यकाळात ‘कमवा व शिका’ योजनेतून शिकून बाहेर
पडलेले अनेक ज्येष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी
विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे सुधाकर गायकवाड लिखित 'दलित सौंदर्यशास्त्र' ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून) प्रा. श्यामसुंदर मिरजकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन, श्री. गायकवाड, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. देवानंद सोनटक्के व डॉ. सचिन गरूड
शिवाजी विद्यापीठात फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुधाकर गायकवाड.
शिवाजी विद्यापीठात फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुधाकर गायकवाड. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे.
कोल्हापूर, दि. १०
एप्रिल: महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्रयीने
विषमतावादी मूल्यांना नाकारून समाजबदलासाठीचा कृतीशील कार्यक्रम देऊन समता
प्रस्थापनेच्या दिशेने समाजाला नेण्याचे काम केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत
सुधाकर गायकवाड यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित फुले, शाहू,
आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन आज राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी श्री. गायकवाड लिखित ‘दलित सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. गायकवाड म्हणाले, तत्कालीन
प्रचलित समाजव्यवस्था ही विषमतेला धर्मसत्तेचा आधार देऊन तिचे समर्थन करीत होती.
या मानवी वर्तन नियंत्रित करणाऱ्या विषमताधारित समाजव्यवस्थेला आव्हान देऊन
नाकारण्याचे काम बुद्धानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी केले. भौतिक बदलांपेक्षा
माणसाच्या माणसाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात, वर्तनात आणि निकषांत बदल करण्यासाठी
त्यांनी कृतीशील कार्य केले. सामाजिक न्यायाची संकल्पना समाजाच्या मानसिक व
बौद्धिक रचनेत बदल घडविण्याचा प्रयत्न करते. या न्यायाचा पुरस्कार त्यांनी केला.
या चिकित्सेतूनच फुले सार्वजनिक सत्यधर्माकडे तर बाबासाहेब बुद्धाकडे वळले. शाहू
महाराजांनी आपल्या राज्यसत्तेचा वापर समाजरचनेतील अधिसत्तेला आव्हान देण्यासाठी
केला आणि त्याद्वारे त्यांनी लोकांना त्यांच्या सामाजिक अधिकारांचे वाटप केले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील म्हणाले, आजच्या समाजाच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन युवकांनी काम करणे
अपेक्षित आहे. ते करीत असताना फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याचा आदर्श
समोर ठेवून त्यांनी वाटचाल केल्यास प्रगती होईल.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे
म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्यामध्ये
स्त्री सन्मान, शेतकऱ्यांप्रती आस्था आणि शिक्षण हे समान धागे आहेत. महाराजांनी
छत्रपती संभाजी महाराजांना इतके ज्ञानवंत केले की त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.
संस्कृतमध्ये ‘बुधभूषण’सारखा महाग्रंथ लिहीण्याइतके पांडित्य त्यांनी प्राप्त केले.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांनी महाराष्ट्रात खूप
मोठी वैचारिक क्रांती डवून आणली. त्या क्रांतीला कृतीशीलतेची मोठी जोड होती.
बुद्धीवादाचा वापर मानवी जीवन सुकर व सुखकर होण्यासाठी त्यांनी केला, हे त्यांच्या
कार्याचे मोठे वेगळेपण ठरते. बुद्धीच्या वापराने मानवी वर्तन नियंत्रित वा
अनियंत्रित होत असते. या बुद्धीचा नियंत्रित वापर सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून
करणे आवश्यक आहे, ही प्रेरणा या त्रयीकडून आपणास मिळत राहते.
यावेळी मान्यवरांच्या
हस्ते सुधाकर गायकवाड लिखित ‘दलित सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथावर झालेल्या चर्चेत डॉ.
देवानंद सोनटक्के, डॉ. सचिन गरूड आणि प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे स्वागत व
प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले
यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीपा श्रावस्ती यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ.
मुरलीधर भानारकर, डॉ. कैलास सोनवणे, उपकुलसचिव विलास सोयम यांच्यासह शिक्षक,
प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.