Friday, 12 July 2024

बहुविद्याशाखीय संशोधनाचा अंगिकार आवश्यक : डॉ. नानासाहेब थोरात

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना जागतिक ख्यातीचे संशोधक डॉ. नानासाहेब थोरात

कोल्हापूर, ता. १२ जुलै: विविध विद्याशाखांमधील संशोधकांनी सद्यस्थितीत बहुविद्याशाखीय संशोधनाचा अंगिकार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, मेरी क्युरी फेलो आणि आयर्लंड येथील लिमरिक विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नानासाहेब थोरात यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागात बहुविद्याशाखीय संशोधन कारकीर्दीच्या दिशाया विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभागप्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे होते.

डॉ. नानासाहेब थोरात यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाने बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. कर्करोगाच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संशोधनाविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहायला हवे. विज्ञान विषयांइतकेच तत्त्वज्ञान आणि सामाजिक शास्त्रांतील ज्ञान व संशोधनही महत्त्वाचे आहे. एका विषयामध्ये तज्ज्ञ होणे गरजेचे आहेच; पण, अन्य विषयांमधील प्रवाह समजावून घेण्यास आणि बहुविध अवांतर वाचनासही प्राधान्य द्यावे. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास बाळगून विविध विद्याशाखांमध्ये संयुक्त संशोधन सहकार्य वृद्धिंगत होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आतापासूनच बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाचे धोरण स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. सोनकवडे यांनी अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधन क्षेत्रात जागतिक भरारी शकतो, याचे डॉ. थोरात उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आता बहुविद्याशाखीय शिक्षण व संशोधनाला मोठे महत्त्व दिले आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा धाडसी निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. जागतिक स्तरावर उपलब्ध संशोधन संधी मिळविण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यायला हवे.

यावेळी डॉ. थोरात यांनी विद्यार्थ्यांचे शंकासमाधान केले. कार्यक्रमास डॉ. केशव राजपुरे, डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. एच.एम. यादव, डॉ. एस.पी. दास, डॉ. ए.आर. पाटील यांच्यासह अधिविभागातील विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. व्ही. एस. कुंभार प्रास्ताविक व परिचय करून दिला. साधना परीट व साक्षी काळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. एस. पाटील यांनी आभार मानले.

Tuesday, 9 July 2024

नॅनो संमिश्रापासून सौर ऊर्जा उपकरण निर्मितीच्या

अभिनव संशोधनाला यू. के. सरकारचे पेटंट

 शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

डॉ. क्रांतीवीर मोरे


डॉ. सागर डेळेकर

कोल्हापूर, दि. ९ जुलै: अतिसूक्ष्म अशा नॅनो-संमिश्रांपासून सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या अभिनव स्वरुपाच्या बाईंडरविरहित उपकरण तयार करण्याच्या पद्धतीला यू.के. सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. क्रांतीवीर मोरे आणि डॉ. सागर डेळेकर यांनी ही पद्धती विकसित केली आहे.

या संशोधनाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. मोरे म्हणाले, सौरऊर्जेचे उत्पादन हे त्या उपरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांवर अवलंबू असते. ते उपकरण बनवण्यासाठी वापरली जाणारी पद्धतीही तितकीच महत्त्वाची असते. त्या दृष्टीने वेगवेगळ्या अतिसूक्ष्म नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारे नाविन्यपूर्ण उपकरण कमीत कमी वेळेमध्ये आणि अल्पखर्चामध्ये तयार करण्यात यश आले आहे.  कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईड या नॅनो मूलद्रव्यांचा वापर हे उपकरण बनवण्यासाठी करण्यात आला. या उपकरण निर्मितीच्या नव्या पद्धतीमुळे सौर ऊर्जाक्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळेल. सदर उपकरण हे कमीत कमी तापमानामध्ये अत्यल्प वेळे बनवता येते. तसेच ते सुलभ रितीने हाताळता येते. सौरऊर्जा  निर्माण करण्याकरिता हे उपकरण आणि ते तयार करण्याची पद्धत सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल, अशी खात्री डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. डॉ. मोरे यांचे संशोधन क्षेत्रातील हे चौथे पेटंट आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. सागर डेळेकर म्हणाले, ऊर्जेचे  संकट ही जागतिक स्तरावर भेडसावणारी प्रमुख समस्या आहे. ऊर्जेचे विविध पर्याय शोधणे हा त्यावरील महत्त्वाचा उपाय आहे. त्यासाठी सौरऊर्जा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. शेतीसोबतच दैनंदिन जीवनात सौरउपकरणांचा अधिकाधिक वापर केला, तर बरीचशी कामे कमी खर्चा होऊ शकतात. जगावरील ऊर्जेचा ताणही कमी हो शकतो. बदलत्या काळानुरूप आपण सौर ऊर्जेचा वापर वाढविला पाहिजे. सद्यस्थितीत सौरऊर्जा उत्पादनाचा खर्च हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. म्हणूनच कमीत कमी खर्चामध्ये सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या नाविन्यपूर्ण उपकरण निर्मितीचे द्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संशोधन केले. त्यातून अतिसूक्ष्म नॅनो संमिश्रांपासून सौरऊर्जा निर्माण करणारी नाविन्यपूर्ण बाईंडरविरहित उपकरणाची पद्धती विकसित केली. या पद्धतीला भारत सरकारबरोबरच आता यू. के. सरकारचेही पेटंट मिळाले आहे, ही आनंदाची बाब आहे.

या संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या संशोधकांची अभिमानास्पद कामगिरी: कुलगुरू डॉ. शिर्के

ऊर्जेची समस्या ही आज जागतिक स्तरावर भेडसावत आहे. त्यावर विविध उपाययोजना करण्यासाठी जगभरातील संशोधकांनी प्रयत्न चालविले आहेत. यामध्ये सुरवातीपासूनच शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी आघाडी घेतलेली आहे. त्यामध्ये आता या नॅनो संमिश्रापासून बाईंडरविरहित सौरऊर्जा उपकरण निर्माण करण्याची नवी पद्धती शोधून डॉ. क्रांतीवीर मोरे आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. सागर डेळेकर यांनी मोलाची भर घातलेली आहे. या संशोधनास यू.के. पेटंट जाहीर झाल्याने संशोधनाच्या दर्जावरही जागतिक मोहोर उमटली आहे. संशोधकांची ही कामगिरी अभिमानास्पद असून उदयोन्मुख संशोधकांसाठी आदर्शवत स्वरुपाची आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.