Friday, 18 April 2025

भगवान महावीर अध्यासनाला शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य: मंत्री प्रकाश आबिटकर

 शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व परिसरात अध्यासन इमारतीचे भूमीपूजन

शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर. मंचावर (डावीकडून) कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे.

शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन इमारतीचे भूमीपूजन करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी कोनशिलेचे अनावरण करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि उपस्थित मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी संबंधित कामाची माहिती घेताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.

(महावीर अध्यासन भूमीपूजन समारंभाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्वेकडील परिसरात भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन मंत्री आबिटकर यांच्या हस्ते आज सकाळी झाले. भूमीपूजनानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

मंत्री आबिटकर यांच्या हस्ते कुदळ मारुन तसेच कोनशिलेचे अनावरण करून भूमीपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी त्यांना यावेळी इमारतीच्या कामाविषयी तसेच अध्यासनाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, एरव्ही शासन म्हणून आम्ही नेहमी देण्याच्या भूमिकेमध्ये असतो. तथापि, विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनासाठी आज प्रथमच अनेक दात्यांच्या हातून देणगीनिधी स्वीकारण्याची दुर्मिळ संधीही लाभली. आपल्या कष्टाची मिळकत आपण अध्यानासाठी देत आहात, ही उल्लेखनीय बाब आहे. दातृत्वातून मिळणारा आनंद मोठा असतो. शिवाजी विद्यापीठाने समाजाशी नाते जोडल्याने या अध्यासनाच्या कामाची उंची वाढली आहे. हे कोल्हापुरातच होऊ शकते. विद्यापीठाने आपल्या विविध अध्यासनांच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे भरीव कार्य केले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्राचे एक भूषणच ठरले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मूल्यशिक्षणावर भर आहे. भगवान महावीर यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान हे मानवी मूल्यशिक्षणच आहे. अपरिग्रह, अहिंसा आणि ब्रह्मचर्य या जैन तत्त्वज्ञानावर आधारित असणारे भगवान महावीर अध्यासन हीच भूमिका घेऊन वाटचाल करीत आहे. अध्यासनाची इमारत आणि परिसर हा जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असेल, याची दक्षता वास्तुरचनेपासूनच घेण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. विलास संगवे, अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी या अध्यासनाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे यांनी केले. संजय शेटे यांनी अध्यासनासाठी शासनाने जाहीर केलेला तीन कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी मंत्री आबिटकर यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. डी.ए. पाटील यांनी अध्यासनाची भूमिका स्पष्ट केली. शुभम पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी अध्यासनाला उत्स्फूर्तपणे देणगी जाहीर केल्या. त्यामध्ये रावसाहेब देशपांडे- आणेगिरीकर, सुरेश रोटे, प्रफुल्ल भालचंद्र चमकले, अॅड. महावीर बिंदगे, जयसिंगपूरचे प्रा. आण्णासो इसराणा, उद्योजक नेमचंद संगवी यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. जैन सेवा संघाचे डॉ. मिठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ लाख ११ हजार रुपयांची तर कुंतीनाथ हानगंडे आणि अनिल ढेकणे यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पूर्वीचे देणगीदार डॉ. बी.डी. खणे, डॉ. एन. एम. पाटील, जीवंधर चौगुले, वसंत नाडे, अरुण माणगावे, अरुणाताई पाटील आदी उपस्थित होते. प्रकल्पपूर्तीसाठी मदत करणारे राजोबा आणि त्यांचे सहकारी, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव रणजीत यादव, विजय पोवार आणि त्यांचे सर्व सहकारी, डॉ. गिरीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीमती जोशी व श्रीमती कुंभार यांच्यासह जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक कोटी ११ लाखांचा निधी जमा

भगवान महावीर अध्यासन हे लोकवर्गणीतून उभे करण्याचे शिवाजी विद्यापीठाने ठरवले आणि त्यानुसार लोकवर्गणीसाठी आवाहन करण्यात आले. त्यामधून सुमारे १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यामधूनच पहिल्या टप्प्यामध्ये तळमजल्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी ८४ लाख ५ हजार ४०१ रुपये इतका खर्च प्रस्तावित असून १२ महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. सांगलीचे प्रमोद चौगले हे या कामाचे वास्तुविशारद आहेत.

Wednesday, 16 April 2025

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

 शिवाजी विद्यापीठ समितीचा निपाणी, बेळगाव, खानापूर परिसरात दौरा

शिवाजी विद्यापीठाच्या योजनांची सीमाभागातील विद्यार्थ्यांना माहिती देताना डॉ. जगन कराडे. मंचावर डॉ. नवनाथ वळेकर, डॉ. श्रीपाल गायकवाड आदी.

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांच्या पत्रकाचे निपाणी येथे ज्येष्ठ विचारवंत प्रा. अच्युत माने यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. जगन कराडे, डॉ. नवनाथ वळेकर, डॉ. श्रीपाल गायकवाड, डॉ. संतोष सुतार, जयराम मिरजकर, बाबासाहेब मगदूम, उदय शिंदे आणि राजू मिस्त्री.




कोल्हापूर, दि. १६ एप्रिल: बेळगावसह सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत तसेच सवलतीच्या दरात शिक्षण घेता यावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांत राखीव जागांसह अनेक सवलती देण्यास गेल्या तीन वर्षांपासून सुरवात केली आहे. यंदाही या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक शिष्टमंडळाने सीमाभागातील विविध ठिकाणांना भेटी देऊन विद्यार्थी, पालकांशी सुसंवाद साधला. त्यांना ३० एप्रिलपर्यंत शिवाजी विद्यापीठात प्रवेश अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. या मोहिमेला पालक-विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावांतील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाने प्रत्येक अभ्यासक्रमात १० टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. विज्ञान, वाणिज्य, कला व ललित कला यांसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकणार आहेत. यामध्ये अनुदानित अभ्यासक्रमांसाठी ट्यूशन फी पूर्ण माफ असून विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५ टक्के सवलत देण्यात येते. त्याखेरीज वसतिगृहात राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शुल्कात सवलत आहे. इतरही अनेक सुविधा सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ कॅम्पसवर उपलब्ध आहेत. या योजनेची प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी विद्यापीठाने विशेष समिती गठित केली आहे. या समितीचे सदस्य डॉ. जगन कराडे, डॉ. नवनाथ वळेकर, डॉ. श्रीपाल गायकवाड, डॉ. कविता वड्राळे आणि डॉ. संतोष सुतार यांनी गेल्या आठवडाभरात निपाणी, खानापूर, बेळगाव, उदगीर आणि भालकी या ठिकाणांना भेटी दिल्या. स्थानिक महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून इच्छुक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधण्यात आला. सध्या या योजनेतून १०० हून अधिक विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत असल्याची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.

निपाणी येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जयराम मिरजकर, बाबासाहेब मगदूम, उदय शिंदे, राजू मिस्त्री उपस्थित होते. खानापूर येथील बैठकीला गोपाळ मुरारी पाटील, आबासाहेब दळवी, संजीव पाटील, हेब्बाळकर गुरूजी, अमृत शेलार, राजाराम देसाई, पुंडलिक पाटील, अजित पाटील, केशव कळेकर उपस्थित होते. तर, बेळगाव येथील कार्यक्रमास प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, शिवराज पाटील, दत्ता उघाडे, महेश जुवेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 




 

Tuesday, 15 April 2025

छत्रपती राजाराम (दुसरे) हे आधुनिक युगाचे अग्रदूत: डॉ. जयसिंगराव पवार

 शिवाजी विद्यापीठातर्फे महाराजांच्या रोजनिशीच्या अनुवादासह चरित्रग्रंथाचे प्रकाशन


शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती राजाराम महाराज (करवीर : दुसरे) १८६६ ते १८७०आणि 'यात्रा युरोपची : छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांची रोजनिशी', या दोन ग्रंथांचे प्रकाशन मंगळवारी मेन राजाराम हायस्कूलमध्ये झाले. यावेळी (डावीकडून) विक्रमसिंह पाटणकररघुनाथ कडाकणेडॉ. यशवंतराव थोरातडॉ. जयसिंगराव पवारखासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजकुलगुरू डॉ. दिगंबर शिर्केडॉ. इस्माईल पठाणबाळ पाटणकर.


(प्रकाशन सोहळ्याची लघुचित्रफीत.)



कोल्हापूर, दि. १५ एप्रिल: वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीच्या लोककल्याणकारी विचार-उद्देशाने युरोप अभ्यास दौऱ्यावर गेलेले छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) हे आधुनिक युगाचे अग्रदूत आणि प्रबोधनाचा शुक्रतारा होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे काढले.

छत्रपती राजाराम महाराज यांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठ आणि बी. एन. पाटणकर ट्रस्टतर्फे डॉ. रघुनाथ कडाकणे अनुवादित 'यात्रा युरोपची रोजनिशी (१८७०)' आणि प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण लिखित 'छत्रपती राजाराम महाराज (करवीर दुसरे)' या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा मेन राजाराम हायस्कूलच्या सभागृहात आज सायंकाळी झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.

डॉ. पवार म्हणाले, तलवारीचे युग संपून यंत्रयुग सुरू झाले होते. अशा काळात केवळ वीस वर्षांचा हा कोल्हापूरचा राजा धार्मिक मान्यता झुगारून युरोप दौऱ्यावर जातो. तेथील सर्व प्रकारच्या आधुनिक संस्था, उद्योगांना भेटी देतो. मान्यवरांशी चर्चा करतो आणि कोल्हापूरचे सर्वांगीण विकासाचे एक चित्र मनोमनी ठरवतो. परंतु दुर्दैवाने भारताकडे परत येताना त्यांचा मृत्यू होतो. जर या छत्रपतींना आणखी आयुष्य मिळाले असते, तर आज आपल्याला आधुनिक कोल्हापूर पाहायला मिळाले असते. संभाजी महाराजांच्यानंतर स्वराज्य पूर्णपणे अडचणीत आलेले असताना पाटणकर घराणे छत्रपतींशी एकनिष्ठेने राहिले. त्यांच्याच घराण्यातील दत्तक आलेले राजाराम महाराज दुसरे यांचे अल्पायुषी असताना झालेले निधन कोल्हापूरसाठी दुर्दैवाचे ठरले.

डॉ. यशवंतराव थोरात यांनी जगाच्या इतिहासातील घडामोडींचे संदर्भ देत कोल्हापूरला १९ व्या शतकाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने छत्रपती राजाराम महाराजांनी युरोप अभ्यास दौरा केला होता, असे सांगितले. ते म्हणाले, जे इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत. त्यांच्या देशातील परिस्थिती पाहून त्यानुसार आपल्या संस्थानामध्ये काही करता येईल का याची चाचपणी ते करत होते. तिथल्या दौऱ्यानंतर कोल्हापूरच्या विकासाच्या आकांक्षांची ब्ल्यू प्रिंट त्यांच्या मनामध्ये तयार झाली असावी.

डॉ. थोरात म्हणाले, वास्तव आणि कल्पनाशक्ती यातील मोकळ्या जागेत इतिहासकार तर्काच्या आधारे सर्जनशील विश्लेषण करतो. डॉ. पठाण यांनी राजाराम महाराज (दुसरे) यांच्याविषयी सूक्ष्म, चिकित्सक दृष्टीचे लेखन केले. राजाराम महाराजांच्या रोजनिशीचा डॉ. कडाकणे यांनी अनुवाद केला, तो भविष्यात इतिहास संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. राजाराम महाराज युरोपला गेल्याचा काळ, युरोप व इंग्लंडमधील स्थिती, अन्य राष्ट्रातील तत्कालीन युद्ध स्थिती, कष्टकऱ्यांचे शोषण, असे अनेक पदर समजून घेणे यामुळे शक्य होईल.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज यांच्या रोजनिशीमधून स्टडी टूर ही संकल्पना नेमकेपणाने स्पष्ट होते. ही संकल्पना राबविणारे ते पहिले छत्रपती होते.

चरित्रग्रंथाचे लेखक डॉ. पठाण म्हणाले, पाटणकर घराण्यात जन्मलेले राजाराम महाराज (दुसरे) वयाच्या १६ वर्षी येथील संस्थानात दत्तक आले. ते प्रखर बुद्धिमत्तेचे होते. अवघ्या दीड वर्षात अस्सलखित इंग्रजी बोलू लागले. त्यांनी युरोपच्या दौऱ्यात तेथील राजकारभार अनुभवला, विद्यापीठात गेले, विविध व्याख्याने ऐकली, नव्या गोष्टी शिकण्यावर भर दिला. मात्र, ते परत येताना आजारपणात त्यांचे निधन झाले. इटलीतील मंत्रिमंडळाने बैठक घेऊन त्यांच्या दहनसंस्काराला मान्यता दिली. त्यांचे स्मारक इटलीमध्ये उभारले, असे अनेक संदर्भ या ग्रंथात आहेत.

डॉ. कडाकणे म्हणाले, राजाराम महाराज (दुसरे) यांनी युरोप दौऱ्यात रोजनिशीत अत्यंत पारदर्शक, खऱ्या घटना व संदर्भासह इंग्रजीत लिहिल्या. एक राजा विविध संदर्भासह रोजनिशी लिहितो, तत्कालीन सामाजिक परिस्थितीसोबत राजकारभाराचे अनेक पदर त्यात दाखवतो. त्या रोजनिशीचे अनुवादवाचन सर्वांनाच दिशादर्शक ठरेल.

अध्यक्षीय मनोगतात खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, अल्पायुष्यात राजाराम महाराजांनी शिक्षणासाठी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. तत्कालीन परिस्थितीत परदेशात जायला कोणी तयार नसताना राजाराम महाराज (दुसरे) 'स्पिरीट ऑफ इन्क्वायरी'च्या बळावर इंग्लंडला गेले. ब्रिटिश कसे राज्य करतात, याची उत्सुकतेने माहिती घेतली. यापुढच्या काळातही कोल्हापूरचा इतिहास आणि व्यक्ती यांवर लिखाण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विक्रमसिंह पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळ पाटणकर यांनी प्रास्ताविकात छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांचे स्मारक कोल्हापुरात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. कार्यक्रमाला माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. बी. पी. साबळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनिश पाटील, डॉ. श्रीराम पवार, डॉ. वसंत भोसले, आनंद माने, व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपूरकर, सुनीलकुमार लवटे, ऋतुराज इंगळे, नकुल पाटणकर, सिद्धार्थ पाटणकर उपस्थित होते.


Monday, 14 April 2025

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत: डॉ. गौतम गवळी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. गौतम गवळी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. गौतम गवळी. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रमुख पाहुणे डॉ. गौतम गवळी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी.





 


कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: समताधिष्ठित लोकशाहीकडे घेऊन जाणारे शिक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते, असे प्रतिपादन अॅमिटी विद्यापीठाचे डेप्युटी प्र-कुलगुरू डॉ. गौतम गवळी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार व कार्य या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गवळी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे ध्येय हे व्यक्तीमत्त्व पुनर्स्थापनेचे होते. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा ध्यास घेतला. सातत्याने शिकत राहणे, कालांतराने निरुपयोगी सोडून देणे आणि नव्याने नवीन ज्ञान संपादन करणे, हे त्यांच्या शिक्षणाचे सूत्र होते. विषमतेचे मूळ शोधणे आणि ती समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजना करणे, हे उद्दिष्ट घेऊन ते काम करीत होते. ते मूळ त्यांना येथील सामाजिक संरचनेमध्ये सापडले. त्यांचे गुरू प्रा. जॉन ड्युई यांनी या संरचनेत राहून ती बदलणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले होते. तर, बाबासाहेबांनी त्या संरचनेत गुरफटून न जाता त्यातून बाहेर पडूनच ती बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि त्या दिशेने प्रयत्नही केले.

बाबासाहेबांच्या दृष्टीने समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जीवनकौशल्ये असल्याचे सांगून डॉ. गवळी म्हणाले, या कौशल्यांचा मानवी व्यक्तीमत्त्वात विकास होणे आवश्यक असल्याचे बाबासाहेबांचे मत होते. त्यासाठी त्यांनी चिकित्सक विचार, सृजनात्मक विचार, सौहार्दपूर्ण परस्परावलंबन, सर्वसमावेशी बहुसांस्कृतिक क्षमता, सकारात्मक सामाजीकरण आणि स्वाभिमान ही मूल्ये शिक्षणातून प्रत्येक भारतीयाच्या व्यक्तीमत्त्वात विकसित होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शिक्षणाचे उपयोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, महामानवांची प्रतीके, प्रतिरुपे ही प्रेरणादायी असतात. मात्र, त्याच बरोबरीने त्यांच्या विचारांचा अंश आपल्या व्यक्तीमत्त्वात उतरवणे अधिक आवश्यक आहे. त्यासाठी चांगले व सकस वाचन, चांगली ग्रंथसंपदा असेल, तर उत्तम ज्ञानसंचय शक्य असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि नागरिकाने प्रदूषणविरहित विचार आणि ज्ञान यांचा संचय आणि प्रसार करण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांची उत्साही संविधान रॅली आणि महामानवास अभिवादन

या कार्यक्रमापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विद्यापीठ परिसरातून संविधान रॅली काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहात होता. डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा नारळाच्या झावळ्या आणि फुलांनी सुशोभित केलेल्या बैलगाडीमध्ये ठेवण्यात आली होती. डॉ. आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले आणि माता रमाई आंबेडकर यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी रॅलीचे नेतृत्व करीत होते. ढोल, ताशा आणि झांजपथकाच्या तालावर विद्यार्थ्यांनी लेझीमची प्रात्यक्षिकेही सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या हातात संविधानाच्या प्रतिकृतीसह विविध संवैधानिक मूल्ये आणि कलमांचे फलक घेतले होते. संविधानाशी निगडित विविध घोषणाही यावेळी देण्यात आल्या. रॅलीमध्ये कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह सर्वच अधिकारी, शिक्षक सहभागी झाले.

संविधान रॅली मुख्य प्रशासकीय भवन येथे विसर्जित करण्यात आली. तेथे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. गौतम गवळी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन विकास केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. ए.बी. कोळेकर, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. किशोर खिलारे, डॉ. तेजपाल मोहरेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 9 April 2025

डॉ. तारा भवाळकर यांच्याकडून लोकसाहित्य संशोधनाला व्यापक आयाम: डॉ. सदानंद मोरे

शिवाजी विद्यापीठात प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान सोहळा


शिवाजी विद्यापीठात प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना डॉ. सदानंद मोरे

शिवाजी विद्यापीठात प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना डॉ. तारा भवाळकर

लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान करताना डॉ. सदानंद मोरे आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. बाबासाहेब खोत, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. अरुण कणबरकर

(प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान सोहळ्याची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ९ एप्रिल: डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार डॉ. मोरे यांच्या हस्ते लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तथा ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. भवाळकर यांना शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात डॉ. मोरे यांच्यासह कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, रक्कम रु. १,५१,०००/- चा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, लोकसाहित्याच्या अभ्यासाचे उद्दिष्ट हे केवळ इतिहासाचा अभ्यास करणे नव्हे, तर आधुनिक परिप्रेक्ष्यातून परंपरा समजून घेण्याचा अभ्यास आहे. ही बाब तारा भवाळकर यांनी त्यांच्या अवघ्या लोकसाहित्याच्या अभ्यासातून आणि संशोधनातून सिद्ध केली आहे. लोकसाहित्याने आणि लोकसंस्कृतीने लोकांनाही सामावून घेण्याचा दबाव तत्कालीन व्यवस्थेवर निर्माण केला, म्हणून लोकांशी निगडित माहितीचे संकलन असणारा अथर्व चौथा वेद म्हणून सामावून घेतला गेला, याचे अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण ताराबाईंनी केले आहे. त्यांनी स्वतः मुक्त होऊन केलेले चिंतन म्हणूनच महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण त्यांचे ऋणी असायला हवे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या वाटचालीचा, तिच्या प्रवाहीपणाचा आणि लोकसाहित्यातील तिच्या अस्तित्वखुणांचा तपशीलवार वेध घेतला. मातृभाषेवर उत्तम पकड असल्यास कोणत्याही क्षेत्रात तिचा प्रभावी वापर करणे सहजशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, विद्यापीठांनी शिक्षण हे पदव्यांसाठी नव्हे, तर शहाणपणा विकसित करण्यासाठी द्यावे आणि विद्यार्थ्यांनीही ते त्याच भावनेने घ्यावे. ज्ञानाच्या क्षेत्रातले अवरुद्ध होत चाललेले प्रवाह अनिरुद्ध होण्यासाठी काम करण्याची गरज शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली आहे. व्यक्तीगत पातळीवर आदिमापासून ते अद्यतनापर्यंत जे सापडले, ते सांगितले अशा पद्धतीने लोकसंचितातील अनुभवाचे साठे ज्ञानामध्ये वर्धित करण्यासाठी प्रयत्न केले. ते करीत असताना परंपरानिष्ठ वातावरणात घडत असतानाही का आणि कशासाठी, हे प्रश्न विचारण्याची सवय जोपासल्याने आजची मी घडले, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने या संशोधकीय परंपरेची द्रष्टेपणाने जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूरविषयीचा जिव्हाळा व्यक्त करताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, कोल्हापूर ही कलानगरी आहे. चित्र, शिल्प, संगीत, चित्रपट आणि नाट्य अशा सर्वच कला इथे फुलल्या. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नाटकाचे सादरीकरण करताना नेहमीच अभिमान आणि आनंद वाटला. ही करवीरनगरीच्या समृद्ध आणि संपन्नतेचा कळस राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतीने चढविला आहे, याचे कृतज्ञ स्मरण बाळगणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठाशी कुलगुरू डॉ. कणबरकर यांच्या कारकीर्दीपासून विविध भूमिकांतून स्नेह वृद्धिंगत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

माझा ग्रंथसंग्रह आता शिवाजी विद्यापीठाचा

आपल्याकडील सर्व ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठाला प्रदान करीत असल्याची घोषणा या प्रसंगी डॉ. तारा भवाळकर यांनी यावेळी केली. माझा ग्रंथसंग्रह हा आता आपला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यामध्ये कळीची भूमिका बजावल्याचेही त्यांनी नमूद केले.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, भारतीय लोकसंचिताचा डॉ. तारा भवाळकर यांनी अत्यंत सूक्ष्मपणे आणि संवेदनशीलतेने वेध घेतलेला आहे. त्याच्या पाऊलखुणा त्यांच्या साहित्याबरोबरच मायवाटेचा मागोवासारख्या उपक्रमांतूनही उमटलेल्या आहेत. त्याचा लाभ घ्यायला हवा. विद्यापीठाला त्यांनी ग्रंथसंपदा देण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत करतानाच विद्यापीठाच्या राजर्षी शाहू लोकविद्या केंद्राला त्यांनी पुढील दहा वर्षांच्या वाटचालीचा आराखडा आखून दिला, याबद्दलही त्यांचा कृतज्ञ आहे.

यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि परिचय करून दिला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुण कणबरकर यांनी डॉ. तारा भवाळकर यांचा कणबरकर कुटुंबियांतर्फे सत्कार केला. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. बी.पी. साबळे, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, सुरेश शिपूरकर, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. भालबा विभूते, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रभंजन माने यांच्यासह कणबरकर कुटुंबिय, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केली - ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे

 

 

कोल्हापूर, दि.09 एप्रिल - जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांनी आज येथे केले.


शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित 2024 साठीचा पहिला पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार आणि सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.





डॉ.मोरे पुढे म्हणाले, मारूतीराव जाधव (तळाशीकर) गुरूजींच्या गाथेचे प्रकाशन होणे ही फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. या गाथेचे प्रचार आणि प्रसार हळूहळू संपूर्ण राज्यभर होणार आहे, ही सुखावणारी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आय.आय.टी.सारख्या आधुनिक वैज्ञानिक संस्थेमध्ये कार्य करीत असताना तुकोबांच्या अभंगाचा सखोल विचार करून डॉ.समीर चव्हाण यांनी खंड प्रकाशित करून पुरस्कार प्राप्त केलेला आहे. संत नामदेव, संत तुकोबा, संत एकनाथ महाराज यांनी संत परंपरा कायम ठेवली.महाराष्ट्र राज्यामध्ये वैचारीक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अध्यात्मीक जडण-घडणीमध्ये सांप्रदायिक समाजाचा विस्तार करण्यामध्ये संत ज्ञानोबांचा-तुकोबांचा मोठा वाटा आहे. श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यामध्ये अर्जुनाला जसे गीतचे सार सांगितले तसेच सार उध्दवाला भगवत गीतेमधील अकराव्या खंडात सांगितले.अर्जुनाला सांगितलेले उपदेश आपल्यासमोर आले. परंतु, उध्दवाला सांगितलेले उपदेश जगा समोर आणण्याचे मोठे कार्य एकनाथ महाराज यांनी केले.अशा पध्दतीने ज्ञानोबा आणि तुकोबांचा महासमन्वय या ठिकाणी झालेला आहे. विज्ञान, कला, भाषा साहित्य अशा सर्व प्रकारच्या लोकांना तुकोबा महाराज आकृष्ट करू शकतात. एवढे सामर्ऱ्थ्य त्यांच्या गाथेमध्ये आहे. संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रेसर करावयाचे असेल तर सर्व संतांना एकत्र ठेवणे आवश्यक आहे.सर्व संतांनी आपणांस फार मोठी दिशा दाखविलेली आहे. आजही संत साहित्य अभ्यासणे आणि त्याचा योग्य तो अर्थ लावणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज हयात असतानाच त्यांच्या अभंगाचा महाराष्ट्रावर फार मोठा प्रभाव पडला होता. पुढे बहिणाबार्‌इंनी वारसा सुरू केला. गेली साडेतीन ते चारशे वर्षे तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू आहे. अभंग गद्य स्वरूपात असते त्याचे पद्य स्वरूपात रूपांतर केले जाते.सर्व प्रथम ब्रिटशांनी तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.तद्नंतर, प्रार्थना समाजाच्या लोकांनी आठराशे अभंगाचा अर्थ लावलेला खंड प्रकाशित केला. त्या परंपरेमध्ये समाविष्ट होणारे तळाशीकर गुरूजी आणि सद्गुरू डॉ. मुंगळे यांच्या कार्याची दखल शिवाजी विद्यापीठाने घेतली हे अधिक कौतुकास्पद आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, संत साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्व.तळाशीकर गुरूजी यांना पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आले.तर, सद्गुरू डॉ. मुंगळे हे पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे अध्यात्मिक गुरू असा हा गुरू-शिष्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जात आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. गुरूजींनी गेल्या तीस वर्षांमध्ये सेवानिवृत्ती नंतरच्या कालखंडामध्ये समाजाला तुकोबा महाराज समजावे म्हणून अभ्यास केला आणि तो अभ्यास विद्यापीठाने प्रसिध्द केला.तळाशीकर गुरूजी आणि डॉ.गुरूनाथ मुंगळे पुरस्कार प्राप्त डॉ.चव्हाण या दोघांचा केंेद्रबिंदू एकच आहे ते म्हणजे संत तुकाराम महाराज.या दोघांनीही तुकाराम महाराज समजावून सांगण्यामध्ये भर घालण्याचे काम केले आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार स्व.तळाशीकर गुरूजी यांच्यावतीने श्रीमती आनंदी मारूतीराव जाधव यांनी स्विकारला. तर, सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार आय.आय.टी.कानपूर उत्तर प्रदेश येथील प्रा.समीर चव्हाण यांना ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी गौरी कहाते (सोलापूर), डॉ.अरूण जाधव (तळाशी), डॉ.समीर चव्हाण (कानपूर) आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अरूण जाधव आणि श्रीमती आनंदी मारूतीराव जाधव, तळाशीकर गुरूजींच्या आठवणीने भाऊक झाले होते.

कार्यक्रमास माजी खासदार प्रा.संजय मंडलीक, डॉ.प्रतापराव माने, अरूण डोंगळे यांचेसह अधिकार मंडळाचे सदस्य, तळाशीकर गुरूजी यांचेवर प्रेम करणारे तळाशीकरवासी, सद्गुरू डॉ.गुरूनाथ मंुगळे आणि पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे कुटुंबीय मोठया प्रमाणात सभागृहात उपस्थित होते. संपूर्ण सभागृह उपस्थितांमुळे भरले होते.

संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले तर मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले.

-----