Saturday, 1 August 2026

गणित आणि संख्याशास्त्रामध्ये ‘एआय’चा पाया: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय एआय व मशीन लर्निंगविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. सोमनाथ पवार, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. राजगुरू आणि डॉ. एस.आर. कुलकर्णी.

समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिक्षक आणि विद्यार्थी.

कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट : कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया हा गणित आणि संख्याशास्त्रामध्ये असून विद्यार्थी आणि शिक्षकांनी या संदर्भातील मूलभूत संकल्पना भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र अधिविभाग आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (CoEAISD) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री उच्चतर शिक्षण अभियान या योजनेअंतर्गत "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग" (Artificial Intelligence and Machine Learning) या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. संख्याशास्त्र अधिविभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एस. आर. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडे कृत्रिम बुद्धिमत्तेमागील गणितीय व सांख्यिकीय तत्त्वे समजून घेण्याची क्षमता असते. त्याद्वारे त्यांनी मूलभूत संकल्पनांवर प्रभुत्व मिळवून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करावे. संख्याशास्त्र अधिविभाग आणि सेंटर फॉर एक्सलन्सने कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे, अभ्यासक्रम विकासाचे आणि शिक्षक प्रशिक्षण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. एस. आर. कुलकर्णी म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अत्यंत गतीने बदल होत आहेत. ते समजून घेणे आवश्यक आहे. या झपाट्याने घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेत शिक्षकांनी सतत अद्ययावत ज्ञान आत्मसात करावे. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत संकल्पनांची भक्कम पायाभरणी करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सोमनाथ पवार यांनी प्रास्ताविक केले. अंजली मंगोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एस. व्ही. राजगुरू यांनी आभार मानले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील संख्याशास्त्र विषयाचे शिक्षक तसेच संख्याशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी सहभागी झाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या विविध पैलूंवर डॉ. एस. आर. कुलकर्णी, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू तथा शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्री. एस. ई. परिट, डॉ. एस. एस. सुतार, डॉ. एस. व्ही. राजगुरू आणि डॉ. एस. डी. पवार यांनी मार्गदर्शन केले. आर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मशीन लर्निंग तंत्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. संजय गंजावे, डॉ. सचिन पाटील, डॉ. कुंदन कोंडके, प्रसेनजित कांबळे, शुभम पाटील, संजय पाटील, अमोल चव्हाण आणि डॉ. उल्का दिंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या लेखनाचा परीघ मानवतावादी: संजय कृष्णाजी पाटील

शिवाजी विद्यापीठात लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना संजय कृष्णाजी पाटील. मंचावर डॉ. नंदकुमार मोरे व डॉ. रणधीर शिंदे.


कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या लेखनाचा समग्र परीघ मानवतावादी आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी, नाट्यकर्मी व सिने-दिग्‍दर्शक संजय कृष्‍णाजी पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्‍या मराठी अधिविभागात लोकशाहीर अण्‍णा भाऊ साठे जयंती व लेखन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी होते.

पाटील म्‍हणाले, अण्णाभाऊंना शाळेने अक्षर दिले नाही, पण त्यांनी मात्र मराठी साहित्याला प्रचंड शब्‍दभांडार दिले. या प्रतिभावंत साहित्यिकाने आपल्‍या एकूण कथासाहित्‍यात समाजातील दलित, उप‍ेक्षित, भटके, शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टी अशा सर्व घटकांच्या समस्‍यांचा वेध घेतला. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ दिले. मराठी साहित्‍याला अपरिचित असलेल्या विश्‍वाचे दर्शन त्‍यांनी घडविले. संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीला अण्‍णा भाऊंच्‍या लेखणीने प्रेरणा दिली.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोरे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी विपुल साहित्य निर्मिती करून पुढील पिढ्यांना लेखन प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्याची दिग्गज निर्माता दिग्दर्शकांना भुरळ पडली. त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपटही निघाले, तथापि, मराठी माणसांना अण्णा भाऊ खूप उशीरा समजले. लोकजीवनाला बांधून ठेवणाऱ्या अनेक साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी आपली लेखणी चालवली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी अतुलनीय योगदान दिले. त्यांचे माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन म्हणजे अभ्यासपूर्ण प्रवासाची दृष्टी कशी असायला हवी, याचा वस्तुपाठ आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा लेखन आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अनिता मिस्‍कूळ, अमोल देशमुख आणि विष्‍णू पावले यांनी मनोगते व्यक्त केली. अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्‍योती वराळे यांनी सूत्रसंचालन केले, तर रूपाली पाटील यांनी आभार मानले.

 

सामाजिक शास्त्रांमध्येही उपयुक्त संशोधन होणे आवश्यक: डॉ. जॅस्मिन

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन. शेजारी डॉ. प्रकाश पवार आणि डॉ. शार्दुल सेलुकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन.


कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: विज्ञान क्षेत्रांमधील संशोधनाइतकेच सामाजिक शास्त्रांमधील संशोधनही उपयुक्त असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी व्यक्त केले. ग्रामीण विकासामध्ये जिल्हा परिषद अत्यंत मूलभूत व महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाद्वारे काल 'जिल्हा परिषदेच्या अभ्यासाची चौकट' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

डॉ. जॅस्मिन म्हणाल्या, बदलत्या काळात सामाजिक शास्त्रे मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते संशोधन न करता आपल्या संशोधनाचा समाजाला प्रत्यक्ष कसा उपयोग होईल, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. संशोधनासाठी विषयाची निवड करताना सध्याची सामाजिक गरज काय आहे, हे ओळखूनच विषयांची निवड करावी, जेणेकरून या संशोधनातून समाजाला योग्य दिशा मिळेल.

यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेची प्रशासकीय रचना, तिचे प्रत्यक्ष कामकाज आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने तळागाळातील घटकांसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम व विकास योजना यावर सविस्तर मांडणी केली.

संशोधनक्षम विद्यार्थ्यांकडून आत्मनिर्भर भारताकडे

तत्पूर्वी, कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करून त्यांची रोजगारक्षमता वाढवणे हे आहे. या धोरणात संशोधनालाही रोजगाराचे महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संशोधन क्षमता वाढवणे आणि त्यांच्यात संशोधन कौशल्ये विकसित करणे ही आजची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांनी संयुक्त संशोधन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

'गाथा ग्रामविकासाची'मधून उलगडला अभ्यासपूर्ण प्रवास

कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी 'गाथा ग्रामविकासाची- कोल्हापूर जिल्हा परिषद: अनुभव आणि आठवणी' या विषयावर उपस्थितांशी सविस्तर संवाद साधला. ग्रामविकासाच्या अनेक चांगल्या आणि नाविन्यपूर्ण संकल्पना कागदावर अतिशय उत्तमरित्या उतरतात, परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र तितक्याच ताकदीने आणि प्रभावीपणे होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी गेल्या काही दशकांत बदलत गेलेल्या राजकारणाच्या आणि निवडणुकांच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागाचा कणा असलेल्या या मराठी शाळांच्या अडचणी सोडवून त्या टिकवणे आणि मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते.

कार्यशाळेला मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. शार्दुल सेलुकर, डॉ. संजय सपकाळ, डॉ. नेहा वाडेकर, डॉ. दत्तात्रय सावंत यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा समन्वयक डॉ. सुखदेव उंदरे यांनी स्वागत केले. राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. आयेशा अत्तार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय सावंत यांनी परिचय करून दिला, तर डॉ. नेहा वाडेकर यांनी आभार मानले.