Monday, 3 June 2019

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे

औरंगाबाद विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार



Dr. Devanand Shinde
कोल्हापूर, दि. ३ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार सोपविण्यात येत असल्याचा आदेश कुलपती कार्यालयाकडून आज प्राप्त झाला आहे. कुलगुरू डॉ. शिंदे उद्या (दि. ४ जून) कार्यभार स्वीकारतील.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे तिसरे विद्यापीठ आहे. यापूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या दोन विद्यापीठांच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभारही सांभाळला आहे. औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने पुढील आदेश होईपर्यंत डॉ. शिंदे यांच्याकडे तेथील प्रभारी कार्यभार असणार आहे.
या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ज्या मातृसंस्थेत मी शिकलो, जिथे वाढलो, जिच्या बळावर कुलगुरू पदापर्यंत मजल मारू शकलो, त्या मातृसंस्थेच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी मा. कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांनी दिली, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. त्यासाठी कुलपती महोदयांचा मी मनापासून ऋणी आहे. ही संधी मिळण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मोलाचा वाटा आहे, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यामुळेच मला अन्यत्रही कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, याविषयी मी कृतज्ञ आहे. विशेष म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर या त्रयींच्या कर्मभूमीमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी दिलेली समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची पालखी घेऊन ज्ञानमार्गावरुन वाटचाल करता येते आहे, याचे मोठे समाधान वाटते, अशी भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.

Monday, 6 May 2019

शिवाजी विद्यापीठाचा लवकरच तंजावरच्या विद्यापीठाशी सामंजस्य करार


तंजावर येथील शिलालेखांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. अवनीश पाटील.

तंजावर येथे आयोजित बैठकीत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम् यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत तंजावरचे शिवाजीराजे भोसले, कुलसचिव मुथ्थुकुमार, डॉ. अवनीश पाटील व डॉ. विवेकानंद गोपाळ.

कुलगुरूंच्या तंजावर भेटीत यशस्वी चर्चा; सरस्वती महाल ग्रंथालयाशीही होणार करार

कोल्हापूर, दि. ६ मे: तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम् यांच्याशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची यशस्वीपणे चर्चा झाली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या संदर्भात नुकतीच विद्यापीठाच्या अभ्यासकांसमवेत तंजावरला भेट दिली.
तंजावर येथील तमिळ विद्यापीठाने मराठा इतिहास आणि मराठी भाषेसंदर्भातील चाळीस हजारहून अधिक कागदपत्रे जतन करून ठेवलेली आहेत. हे विद्यापीठ भाषेला केंद्रस्थानी ठेऊन स्थापन करण्यात आले असून या विद्यापीठाकडून मोडी कागदपत्रांचे भाषांतर कार्यही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे या विद्यापीठाशी तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार शिवाजी विद्यापीठाच्या विचाराधिन होता. त्याचबरोबर सरस्वती महल ग्रंथालयात मोडी कागदपत्रांसह हजारो मराठी ग्रंथांचे जतन केलेले असल्याने संशोधकांना अभ्यासासाठी ते सहज उपलब्ध व्हावे, यासाठी या ग्रंथालयाबरोबरही सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये बैठक झाली. सदर बैठकीमध्ये वरील सर्व मुद्यांसह तंजावरला मराठी अध्यासन आणि शिवाजी विद्यापीठात तमिळ अध्यासन स्थापन करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. शिवाय, शिवाजी विद्यापीठ नवे म्युझिअम साकारत असून या म्युझिअममध्ये तंजावर येथील मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित दालन उभारण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा यावेळी झाली. शिवाय, सरस्वती महल ग्रंथालयातील उपलब्ध अभ्यास साधनासंदर्भात तंजावरचे जिल्हाधिकारी ए. अण्णादुराई यांच्यासमवेतही स्वतंत्र बैठक झाली. दोन्ही बैठका तंजावरचे राजे शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. या बैठकांना तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम्, कुलसचिव मुथ्थूकुमार यांच्यासह तमिळ विद्यापीठातील डॉ. विवेकानंद गोपाळ, डॉ. जयकुमार, डॉ. कविता, डॉ. शीला, डॉ. नीलकंठ हे भारतीय भाषा आणि सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक उपस्थित होते; तर, शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, समिती सदस्य डॉ. अवनीश पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. निलांबरी जगताप आणि गणेश नेर्लेकर-देसाई उपस्थित होते.

मराठ्यांच्या इतिहासात तंजावर महत्त्वाचे!
तमिळनाडूतील तंजावर येथे साडेतीनशे वर्षांपूर्वी इ.स. १६७६ ला मराठ्यांनी आपले राज्य स्थापन केले. शहाजीराजेंचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी यांनी हे राज्य स्थापन केले. तेव्हापासून ब्रिटीशांनी १८५५ ला संस्थान खालसा करेपर्यंत तेथे मराठा अंमल होता. या जवळजवळ दोनशे वर्षांमध्ये अकरा राजांनी राज्यकारभार केला. त्यांच्या कारकिर्दीत तेथे मराठी संस्कृती रुजली. मराठ्यांच्या इतिहासात तंजावरचे राज्य हा एक महत्त्वाचा भाग असून तंजावरच्या अभ्यासाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यामुळे तंजावर राजघराण्याचे हजारो पेपर्स, इतर ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, शिल्पे, चित्र, शिलालेख, ग्रंथ अभ्यासने हे मराठा इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाचे आहे. तंजावरच्या राजांनी साहित्य, नाट्यकला, चित्रकला, मराठी संस्कृतीतील भजन, कीर्तन आणि लावणी परंपरा तंजावरला रुजवली आहे. त्याचबरोबर सर्फोजी (दुसरा) यांनी स्थापन केलेले सरस्वती महल ग्रंथालय जागतिक ठेवा ठरले आहे. हे हस्तलिखित ग्रंथांचे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय असून माणसाच्या लेखन आणि पुस्तक निर्मितीच्या इतिहासाचा दस्तऐवज म्हणून जगभर नावाजलेले आहे. येथे रामायण, महाभारतापासून, विवेकसिंधू, भगवद्गीता या ग्रंथाची शेकडो हस्तलिखिते उपलब्ध आहेत.


Thursday, 2 May 2019

डॉ. शालिनी लिहितकर यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत गौरव





कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. शालिनी लिहितकर यांचा नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत इंडियन लायब्ररी लीडर्स अॅवॉर्ड फॉर प्रोफेशनल एक्सलन्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Dr. Shalini Lihitkar
नवी दिल्ली येथे १९-२० एप्रिल रोजी दिल्ली ग्रंथालय संघ आणि सतीजा रिसर्च फौंडेशन फॉर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी ग्रंथालय व माहितीशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत देशभरातून ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाशी निगडित ५००हून अधिक व्यावसायिक, संशोधक, प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले. या परिषदेत ग्रंथालय व ग्रंथपालन व्यवसायाच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला. परिषदेत ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल डॉ. शालिनी लिहितकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ अशोक बेरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ झाला. यावेळी एन.आय.सी.चे माजी संचालक डॉ. एम. मणी, डॉ. पी.बी. मंगला, डॉ. एम.पी. सतीजा, डॉ. सी.पी. वसिष्ठ, दिल्ली ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. आर.के. शर्मा, सतीजा रिसर्च फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. के.पी. सिंग आदी उपस्थित होते.
डॉ. लिहितकर यांना या पूर्वीही विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहे. साधन व्यक्ती म्हणून त्यांनी देशभरात व्याख्याने दिली आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Sunday, 14 April 2019

बाबासाहेबांविषयीचे आकलन सातत्याने वृद्धिंगत करण्याची गरज: संजय आवटे





शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा एक व्यापक विचार आहे. त्यांच्याविषयीचे आपले आकलन जिथे संपते, तिथे खरे बाबासाहेब सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याविषयीचे आकलन सातत्याने वृद्धिंगत करीत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार-संपादक संजय आवटे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर- आजच्या संदर्भात या विषयावर श्री. आवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

Sunjay Awate
श्री. आवटे म्हणाले, आजच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना त्यांनी भारताला भारत म्हणून, एक एकसंघ देश म्हणून ज्या पद्धतीने उभे केले, तो वारसा समजून घेतला पाहिजे. हे बाबासाहेब ज्याला समजतात, तोच पुढे खरा भारतीय होतो, सच्चा माणूस होतो, हे लक्षात घ्यायला हवे. जगभरातले राजकीय विचारवंत भारत हा एक राष्ट्र म्हणून उभाच राहू शकत नाही, अशा स्वरुपाची मांडणी करीत असताना बाबासाहेबांनी मात्र त्याला उभेही केले आणि त्याचे खणखणीत अस्तित्व निर्माणही केले. त्यांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मताधिकार प्रदान केला. मात्र, हा अधिकार अगदी सहजतेने मिळाल्यामुळे त्याचे मोल आपल्याला कळले नाही, कळत नाही. त्यामागची बाबासाहेबांची भूमिका समजून घ्यायला हवी. या देशातल्या निरक्षर माणसांमधील अंगभूत शहाणपणावरचा त्यांचा विश्वास अनाठायी नव्हता, हे पुढे दिसून आले असले तरी आताच्या परिस्थितीत हे शहाणपण पुनःपुन्हा तपासून पाहण्याचीही गरज आहे.
श्री. आवटे पुढे म्हणाले, लोकशाही टिकण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी संविधान सभेतील ऐतिहासिक भाषणात बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वाची चतुःसूत्री दिलेली आहे. यामध्ये समतेचा पुरस्कार, विरोधी पक्षांचे महत्त्व, सारासारविवेकबुद्धी आणि संवैधानिक नैतिकता यांचा समावेश होतो. या चतुःसूत्रीचे सध्याच्या भोवतालात किती आणि कसे स्थान आहे, याचे आकलन करून घेणे आवश्यक आहे. एक वारसा म्हणून आपल्या नेतृत्वाचे आकलन करवून घेत असताना त्यांना सुटे सुटे करणे चुकीचे आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर या त्रयींना एकत्रित समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. राजकीय प्रक्रियेपासून केवळ अस्मिता म्हणून बाबासाहेब वेगळे काढण्याचा प्रयत्न केल्यास बाबासाहेबांचे अपहरण सातत्याने होतच राहणार, असा इशाराही आवटे यांनी यावेळी दिला.
बाबासाहेब म्हणजे एकाच हयातीत एक राज्यघटना जाळून दुसरी निर्माण करणारे पराक्रमी महापुरूष होते. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते फुले, शाहू, आंबेडकरांचा सच्च्या राष्ट्रवादाचा आणि लोकशाहीचा वारसा आपण अभिमानाने मिरविला पाहिजे, असे आवाहनही आवटे यांनी यावेळी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हा ग्रंथप्रेमाचा अद्भुत नमुना आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात वावरणाऱ्या सुजाण नागरिकांनी तरी आपली ग्रंथालये समृद्ध करण्यावर तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यावर भर देण्याची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शोषित, वंचित समाजात आत्मोन्नतीचे स्फुल्लिंग चेतविणारे बाबासाहेब यांच्या विचार व कार्यातून माणूस होण्याचेच धडे आपल्याला मिळतात. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय ही ओळख मिळवून देण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांचा हा वारसा अखंडित प्रवाहित ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पेलली पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर ही वेगवेगळी व्यक्तीमत्त्वे नसून समतेच्या विचारांचा तो अखंड प्रवाह आहे. ज्या चिरंतन मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी हयात वेचली, त्यांची प्रस्थापना करण्यासाठी प्रतिबद्ध होणे, हीच आजची खरी गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी, आंबेडकर सेंटरचे संचालक डॉ. एस.एस. महाजन, शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शहरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले.


Friday, 12 April 2019

जागतिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी

खारफुटीचे संरक्षण अत्यावश्यक: डॉ. उंटावळे

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना डॉ. ए.जी. उंटावळे यांच्यासह कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. श्रीमती व्ही. डी. जाधव, डॉ. एस.एस. कांबळे, डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण. 

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना डॉ. ए.जी. उंटावळे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. श्रीमती व्ही. डी. जाधव, डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण, डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. एस.एस. कांबळे.


वनस्पतीशास्त्र विभागात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Dr. A.G. Untawale
कोल्हापूर, दि. १२ एप्रिल: जागतिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खारफुटीचे संरक्षण व संवर्धन अत्यावश्यक बाब आहे. तसे न झाल्यास मानवी अस्तित्वासाठी ते मारक ठरणार आहे, असे प्रतिपादन मॅनग्रोह्व्ज सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. ए.जी. उंटावळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातर्फे मॅनग्रोह्व्ज अॅन्ड कोस्टल रिसोर्सेस या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. उंटावळे यांनी आपल्या व्याख्यानात खारफुटीच्या संदर्भातील अनेक तथ्यांचा वेध घेतला आणि तिचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने खारफुटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ सागरी जल पर्यावरणाबरोबरच इतर पर्यावरणाच्या दृष्टीनेही त्याचे मोठे महत्त्व आहे. निसर्गातील अतिरिक्त कार्बन शोषून घेण्याची अन्य वनस्पतींच्या तुलनेत खारफुटीची क्षमता अधिक असते. त्याचप्रमाणे सागराला जमिनीवर अतिक्रमणापासून रोखणारी ती नैसर्गिक भिंत आहे. पायाभूत सुविधा निर्माणाच्या नावाखाली खारफुटीचा होत असलेला ऱ्हास अंतिमतः मानवी अस्तित्वाच्याच मुळावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण व संवर्धन यासाठी शासकीय, शैक्षणिक, संशोधकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या स्तरांवरही प्रयत्न व जनजागृतीची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, खारफुटीच्या प्रश्नासंदर्भात शिवाजी विद्यापीठाने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही मोठे योगदान दिले आहे. विद्यापीठाच्या संशोधकांनी संशोधन व जनजागृती यासाठी काम केले आहे. भारताला सुमारे ७२०० किलोमीटरचा लाभलेल्या सागरी किनाऱ्याच्या नैसर्गिक संरक्षणासाठी खारफुटीचे महत्त्व खूप आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी मॅनग्रोह्व्ज सोसायटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठ सक्रिय योगदान देण्यासाठी सदैव तत्पर आहे. या खारफुटीच्या संदर्भात संस्थेने चालविलेल्या कार्याबद्दल कुलगुरूंनी डॉ. उंटावळे आणि संस्थेमधील सर्वच घटकांचेही अभिनंदन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेची स्मरणिका व मंगलवन या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण यांना खारफुटीसंदर्भातील संशोधनाबद्दल ‘फेलोशीप ऑफ मॅनग्रोव्ह्ज सोसायटी ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अधिविभाग प्रमुख डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत, डॉ. (श्रीमती) एन.एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. एस.एस. कांबळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एस.आर. यादव, डॉ. जी.बी. दीक्षित, डॉ. एन.बी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 1 April 2019

विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रासाठी

‘सोक्टास’कडून दोन लाख रुपयांचा निधी



कोल्हापूर, दि. १ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाने कौशल्य विकासाच्या अनुषंगाने चालविलेले कार्य महत्त्वाचे असून त्याला अधिक चालना देण्यासाठी सोक्टासकंपनीच्या व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत दोन लाख रुपयांचा निधी विद्यापीठास प्रदान करताना अत्यानंद होतो आहे, अशी भावना कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सोक्टास इंडिया प्रा. लि. या कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सदानंद गुप्ता यांनी येथे व्यक्त केली.
सोक्टास कंपनीतर्फे व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत विद्यापीठाच्या कौशल्य व औद्योगिक विकास केंद्रासाठी दोन लाख रुपयांच्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
श्री. गुप्ता म्हणाले, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून उद्योगाकडून देण्यात येणारा निधी योग्य हातांत पडून त्याचा योग्य विनियोग व्हावा, अशी कंपनीची भावना आहे. त्यातूनच विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत युवकांसाठी राबविण्यात येणारे अनेक उपक्रम पाहण्यात आले. केंद्र सरकारच्या स्कील इंडिया या उपक्रमांतर्गत अनेक उपक्रम विद्यापीठाकडून राबविण्यात येतात. त्याला मदत म्हणून आम्ही ही मदत विद्यापीठाला देण्याचे ठरविले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सोक्टास कंपनीने अत्यंत विश्वासाने विद्यापीठाला हे अर्थसाह्य केले आहे. त्याचा विनियोग कौशल्य विकास केंद्रातर्फे योग्य कारणांसाठी केला जाईल. अशा प्रकारे व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या सहाय्याने स्कील ऑन व्हील्ससारख्या विविध उपक्रमांची व्याप्ती वाढविणे शक्य आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अधिष्ठाता व कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे समन्वयक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Friday, 29 March 2019

शिवाजी विद्यापीठात ‘कलर्स-२०१७’ समारंभ उत्साहात

विद्यापीठाच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सिद्ध व्हावे: गिरीजा पाटील-देसाई






कोल्हापूर, दि. २९ मार्च: विद्यापीठाच्याकलर्सविजेत्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात यश मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे कौशल्य दर्शविण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय नेमबाज व ठाण्याच्या वनाधिकारी गिरीजा संदीप पाटील-देसाई यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे सन २०१७-१८ मध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गुणगौरव समारंभ (कलर्स-२०१७) आज मानव्यशास्त्र सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
यावेळी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवून सर्वाधिक गुण संपादन केल्याबद्दल दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांना सन २०१७-१८चे खेळांमधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. न्यू कॉलेजने सलग तिसऱ्यांदा हा बहुमान पटकाविला आहे. कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्यासह खेळाडूंनी हा गौरव स्वीकारला.
श्रीमती गिरीजा पाटील-देसाई म्हणाल्या, आंतरविद्यापीठ स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकण्याची जिद्द खेळाडूंच्या मनात जागली पाहिजे. त्यासाठी जागतिक स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील प्रवाह काय आहेत, याची माहिती खेळाडूंनी करून घ्यायला हवी. त्यासाठी तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घ्यावा. आपल्या स्थानिक मार्गदर्शकांबरोबरच जागतिक स्तरावर उपलब्ध कोचिंगचीही मदत घेणे आवश्यक आहे. त्यासठी येणाऱ्या कालखंडात आपल्या कारकीर्दीचे योग्य नियोजन करा आणि किती उंच भरारी घ्यायची, हे ठरवून त्या दिशेने झेप घ्या, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
क्रीडापटूंसाठी राज्य तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पाच टक्के राखीव जागा असतात, त्याचाही लाभ घ्यायला हवा. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचा सराव करणे आवश्यक असल्याचे सांगून पाटील यांनी तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे, राही सरनोबत असे आम्ही सारेच शासकीय सेवेत आपापल्या कामाचा ठसा उमटविण्यात यशस्वी झालो आहोत, असे अभिमानपूर्वक नमूद केले.

कुलगुरू डॉ. शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा लौकिक देशभरात उंचावण्यात क्रीडापटूंचे योगदान मोलाचे आहे. केवळ पारंपरिक खेळांतच नव्हे, तर रग्बी, ग्रीको-रोमन कुस्ती, फेन्सिंग अशा या विभागाला अपारंपरिक असणाऱ्या क्रीडा प्रकारांतही त्यांनी यश मिळविले आहे, ही बाब अभिनंदनीय आहे. या खेळाडूंना सराव व स्पर्धेदरम्यान विमा संरक्षण योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना दोन लाख रुपयांचा मदतनिधी अशा अनेक योजना विद्यापीठ राबविते आहे. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शारीरिक शिक्षण संचालकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्व संचालकांसाठीही वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक प्रकारांत पाच सुवर्ण, पाच रौप्य व तेरा कांस्य अशी एकूण २३ पदके मिळविणाऱ्या आणि २१व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव-२०१७मध्ये  सहा सुवर्ण, आठ रौप्य व सात कांस्य अशी एकूण २१ पदके प्राप्त करणाऱ्या क्रीडापटूंचा गिरीजा पाटील-देसाई यांच्या हस्ते ब्लेझर, स्मृतिचिन्ह, पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेता अक्षय मधुकर देशमुख (तलवारबाजी), खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक विजेती अश्विनी राजेंद्र मळगे (वेटलिफ्टिंग), सुवर्ण विजेता ओंकार मारुती हंचनाळे (खो-खो), कांस्य विजेती मयुरी रामचंद्र देवरे (वेटलिफ्टिंग) यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आयर्नमन स्पर्धेत (२ किमी जलतरण+ १० किमी सायकलिंग+ २१ किमी धावणे) महाराष्ट्राकडून सर्वाधिक जलद वेळ (६ तास १० मि.) नोंदवून फ्रान्स येथील स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विवेकानंद महाविद्यालयाच्या सुप्रिया विराज निंबाळकर हिचाही गौरव करण्यात आला.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षक जे.एच. इंगळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पी.टी. गायकवाड यांनी केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. बाबासाहेब उलपे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, छत्रपती पुरस्कार विजेते संभाजी पाटील यांच्यासह शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडापटू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.