Showing posts with label Kamala College. Show all posts
Showing posts with label Kamala College. Show all posts

Monday, 5 May 2014

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात बी.व्होक. अभ्यासक्रमास मान्यता



कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दोन महाविद्यालयांमध्ये बी.व्होक. हा ३ वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम राबविण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) मान्यता मिळाल्याची माहिती विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. ए.बी. राजगे यांनी आज दिली.
यासंदर्भात माहिती देताना डॉ. राजगे म्हणाले की, केंद्र सरकारच्या नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) या नूतन उपक्रमांतर्गत युजीसीने देशातल्या विविध विद्यापीठांकडून बॅचलर ऑफ व्होकेशन (बी.व्होक.) हा ३ वर्षांचा पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत १५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने दहा महाविद्यालयांचे प्रस्ताव सादर केले होते. महाराष्ट्रातील एकूण २८ महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू करण्यास युजीसीकडून नुकतीच मान्यता प्राप्त झाली असून त्यांमध्ये कोल्हापूर येथील कमला महाविद्यालय आणि विवेकानंद महाविद्यालय या दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. कमला महाविद्यालयात रिटेल मॅनेजमेंट ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फूड प्रोसेसिंग ॲन्ड मॅनेजमेंट हे दोन अभ्यासक्रम, तर विवेकानंद महाविद्यालयात ग्राफिक डिझाईन आणि फौंड्री टेक्नॉलॉजी हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी युजीसीकडून या महाविद्यालयांना प्रत्येकी १ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
बी.व्होक अभ्यासक्रमाची उपयुक्तता सांगताना डॉ. राजगे म्हणाले, आजघडीला विद्यापीठीय शिक्षणातून देशातील व्यवसाय-उद्योगांना आवश्यक असणारे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्याचे प्रमाण अल्प आहे. योग्य प्रशिक्षण व कौशल्याअभावी विद्यार्थ्यांना रोजगार संधीही मिळत नाहीत. यावर उपाय म्हणून सर्वसाधारण शिक्षणामधूनच व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम राबवून उद्योग-व्यवसायांची गरज भागवून, बेरोजगारी दूर करण्यासाठी युजीसीने बी.व्होक. अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढचे पदवी शिक्षण पुरविण्याच्या दृष्टीनेही बी.व्होक अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. यातून उद्योगांची मागणी आणि कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ यातील दरी कमी होऊन रोजगारक्षम युवक निर्माण होतील. यातून उद्योगांची गरज भागून बेरोजगारीची समस्याही कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.