Friday, 24 April 2026

विद्यापीठामध्ये ''द मिऱ्याकल ऑफ मिलेटस् : लोकल ग्रेन्स्, मॉडर्न वंडर्स'' पुस्तकाचे प्रकाशन

 

कोल्हापूर, दि.24 एप्रिल - शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृध्दीसाठी या विषयावर विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहामध्ये आज एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी सुरूवातीला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, कृषी उपसंचालक तथा जिल्हा नोडल अधिकारी नामदेव परीट, राजेंद्र माने, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रादेशिक ऊस गूळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ.विद्यासागर गेडाम, यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेचे प्रभारी संचालक डॉ.नितिन माळी यांच्या हस्ते व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेले '' मिऱ्याकल ऑफ मिलेटस् : लोकल ग्रेन्स्, मॉडर्न वंडर्स'' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपण आरोग्य, पोषण आणि पर्यावरण या तिन्ही बाबींशी झगडत आहोत.  अशा परिस्थितीत मिलेटस् अर्थात पारंपरिक भरड धान्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.  ही भरड धान्य केवळ अन्नधान्य नव्हे तर आपल्या संस्कृतीचा, शाश्वत शेतीचा आरोग्यदायी जीवनशैलीचा आधार आहेत.  या पुस्तकांमध्ये मिलिटस् अर्थात भरडधान्यांचे वैज्ञानिक, पोषणात्मक, तांत्रिक परिचय तसेच त्यांचे मूल्यवर्धित अन्न प्रक्रिया यांची सखोल पणे मांडणी केली आहे.

या पुस्तकामध्ये विविध भरड धान्यांची वर्गीकरण, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच देशस्थरीय उत्पादन स्थिती, पोषणमूल्य त्यावर आधारित मूल्यवर्धित उत्पादने आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे यांचा सविस्तर आढावा या पुस्तकात दिलेला आहे.  हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा संशोधकांसाठी नव्हे तर शेतकरी उद्योग क्षेत्र आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

शिवाजी विद्यापीठ नेहमीच समाज उपयोगी विविध उपक्रमाचे आयोजन करत असते.  अशाच इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेटस्च्या पार्श्वभूमीवर ''फुड सेफ्टी स्टैंडर्ड ऑफ इंडिया'' अर्थात एफएसएसएआय, मुंबई द्वारे प्रायोजित ''ईट राईट मिलेट मेला'' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम पूर्णपणे मिलेटवर आधारीत होता.यामध्ये राज्यभरातील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले होते.

यातूनच, व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्त शिंदे यांना या पुस्तक निर्मितीची मूळ कल्पना सुचली.तसेच, विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांनी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले.  विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाने या पुस्तक निर्मितीचे लक्ष पूर्ण केले.

या पुस्तक निर्मितीमध्ये श्री शितल पाटील, डॉ.स्नेहल खांडेकर, डॉ.प्रविणकुमार पाटील, डॉ.इराण्णा पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.

------


शेतकऱ्यांनी शेतीवर आधारीत पूरक उद्योगांवर भर देणे आवश्यक - अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी


कोल्हापूर, दि.24 एप्रिल - शेतकऱ्यांच्या अडचणी हया शेतकऱ्यांपर्यंत मर्यादीत राहता आता तो समाजाचा प्रश्न बनलेला आहे. पशूपालन आणि शेती याची सांगड घातली पाहिजे. प्रगती साधण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीवर आधारीत पूरक उद्योगांवर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री, दिनेश कुलकर्णी यांनी आज येथे केले.          

 

            शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ''शाश्वत शेती कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृध्दीसाठी'' या विषयावर विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहामध्ये एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी भारतीय संघटन मंत्री, दिनेश कुलकर्णी बोलत होते.प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिनेश कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले, शेती विषयक जागृतीपर कार्यक्रम शिवाजी विद्यापीठामध्ये होत आहे, हे आनंददायी आहे.विकसित भारताचे स्वप्न घेवून पुढे जाताना, शेती समृद्ध करीत असताना ते शाश्वत पध्दतीने होईल याकडे कटाकक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.या ठिकाणच्या लोकांमध्ये कृषी विषयाची प्रेरणा जागृत आहे.त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यास सहाय्यभूत ठरेल.विकसित भारताचा विचार करीत असताना देशामधील प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असले पाहिजे, हे देखील आधोरेखीत होणे गरजेचे आहेे.शेतीच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भरता, स्वालंबन असत नाही तो पर्यंत आपला देश शास्वत विकासाच्या दिशेने चालला आहे, असे म्हणता येणार नाही.शेतीमुळेच आपण कोव्हीड सारखे मोठे संकट निवारण करू शकलेलो आहोत. पन्नास, साठ वर्षांपासून हरितक्रांतीच्या दिशेन जात असताना आपण आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करीत आहोत.जगामध्ये सर्वाधीक अन्नधान्य उत्पादन करणारा देश म्हणून आपण पुढे येत आहोत.जमिनीची सुपिकता हा महत्वाचा विषय पुढे येत आहे.शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेती करणे हे खूप खर्चिक झालेेले आहे.अन्नधान्याच्याबाबतीत आपण स्वावलंबी झालेलो आहेत. परंतु, शेतकरी पूर्णपणे परावलंबी झालेले आहे. तो बाजारावर अवलंबून राहिलेला आहे.आधारभूत किंमतीचा विचार केला तर त्यामध्ये आता वाढ झालेली आहे, तरी शेतकरी समाधानी नाही.म्हणून, शेतकऱ्यांनी याचे निश्चित अध्ययन केले पाहिजे.पूर्वीची अत्यंत चांगली मिश्रपिक पध्दती सोडून दिली त्याएेवजी एकपिक पध्दती अवलंबली.त्यामुळे, मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.या सगळयातून शेतकरी परावलंबी झालेला आहे.जो बाजारावर अवलंबून राहतो त्याचे शोषण होते.आपल्या शेतीला प्राचिन परंपरा लाभलेली आहे.शेतकरी हा सर्वांचा भरणपोषण करणारा अर्थ व्यवस्थेचा केंद्रबिंदू होता. शेती, पशूपालन, प्रक्रीया उद्योग आणि बाजारपेठेपर्यंत पोहचणे हे महत्वाचे आहे.आपली प्राचीन शाश्वत अर्थव्यवस्था आजच्या पध्दतीमध्ये अद्ययावत  कशी करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे.हरित क्रातीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या उत्पादनावर भर दिला आणि यशस्वी झालो.परंतू, त्यांचा परिणाम असा झाला जमिनीची सुपिकता, पोषण मूल्य कमी झाले.शेतीच्या प्रश्नाचा विचार करीत असताना या सगळया पध्दतीचा विचार केला पाहिजे.शेतकरी स्वावलंबी, स्वयंपूर्ण होईल त्याचवेळेस खऱ्या अर्थाने तो शाश्वत शेतीकडे जावू शकेल.एक पिक पध्दतीमुळे शेतकऱ्यांचे शोषण होवू शकते.त्यामुळे आता, शेतकऱ्यांनी स्वत: किंवा समुहातून प्रक्रीया केलेले साहित्य बाजारात घेवून जाणे महत्वाचे आहे.जीआयची कास धरून पुढे जाणे उचित ठरणार आहे.समाजाला अशा प्रकारच्या उद्योगांची व्यवस्था करावी लागेल ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व मुलांना कामे मिळतील.                                                            

याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे मनोगतामध्ये म्हणाले, देशाची मौल्यवान संपत्ती म्हणजे शेतकरी होय. ग्रामीण भागातील जनता मोठया प्रमाणात रोजगार प्राप्तीसाठी शहरांकडे आकर्षित होत आहे.त्यामुळे राष्ट्राच्या शास्वत विकासावर फार मोठा परिणाम झालेला आहे.शेतीमधील ज्ञान कमी होत आहे.शेती किंवा कृषी व्यवसायाला अपेक्षित सन्मान मिळत नाही.उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत होत आहेत.शासनाकडून मिळणाऱ्या योजना आणि सहाय्य याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था वाढेल.दक्षिण महाराष्ट्रामध्ये कृषी अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी प्रचंड संधी आहे.ग्रामीण रोजगाराच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न व्हावेत.गावात चांगले उत्पन्न मिळाले तर शेतकरी प्रगतीशील होईल.आपणांस एकत्र येवून बदल घडवावा लागेल.                                                                  

कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी मनोगतामध्ये म्हणाले, सातत्यपूर्ण आणि सुरक्षित अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत शेती पध्दती अत्यंत महत्वाची आहे.पीक फेरबदल, सेंद्रिय शेती आणि इतर शश्वत पध्दतीद्वारे शेतकरी कालांतराने पिकांचे उत्पन्न वाढवू शकतात. यामुळे केवळ अन्नाची तात्काळ गरजच भागत नाही, तर हवामान बदलाच्या अनिश्चिततेविरूध्द शेतीमध्ये लवचिकता निर्माण करण्यासही मदत होते. केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.रोपवाटीकांच्या माध्यमातून गटांना आणि रोपवाटीका धारकांना व्यवसाय निर्माण करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.राज्य शासन आणि पाणी फौंडेशनच्यावतीने महत्वपूर्ण अशा शेतकऱ्यांच्या गट स्पर्धा घेतल्या जातात.                                                                 

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव म्हणाल्या, शेतकऱ्यांनी मूल्यवर्धीत उत्पादन घेवून त्याचे योग्य पध्दतीने मार्केटींग करून प्रगती साध्य केले पाहिजे.गुणवत्तापूर्ण उत्पादनास फार मोठी मागणी असल्याने स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होवू शकतात.शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासाठी विद्यापीठामध्ये आयोजित केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे.                                                            

सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यशाळेचे उद्धाटन करण्यात आले.यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालयाच्या सहा.प्राध्यापिका डॉ.उर्मिला दशवंत यांनी स्वागत प्रास्ताविक केले. यावेळी कृषी उपसंचालक तथा जिल्हा नोडल अधिकारी नामदेव परीट, राजेंद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रादेशिक ऊस गूळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ.विद्यासागर गेडाम, यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेचे प्रभारी संचालक डॉ.नितिन माळी, तंत्रज्ञान अधिविभागातील डॉ. प्रविणकुमार पाटील, डॉ. इराण्णा उडचान, डॉ. स्नेहल खांडेकर, श्री.शितल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी अधिकारी, अनुभवी प्रगतशील शेतकरी, शेतकरी बंधू-भगिनी मोठयाप्रमाणात उपस्थित होते.

-----