Friday, 5 June 2026

लोकनेते देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही: मंत्री शंभूराज देसाई

शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री शंभूराज देसाई. सोबत कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री शंभूराज देसाई.

शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री शंभूराज देसाई. सोबत कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह उपस्थित अधिकारी

शिवाजी विद्यापीठात मंत्री शंभूराज देसाई यांचे पर्यावरण दिनानिमित्त रोप देऊन स्वागत करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

(लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या उपक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री श्री. देसाई यांनी आज शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात झाले. त्यांचे व्यक्तीमत्त्व आणि जीवनकार्य याविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, या दृष्टीने विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान वीस महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा, व्याख्याने इत्यादींचे व्यापक पातळीवर आयोजन करावे. ग्रामीण, शहरी अशा सर्वच स्तरांतील युवकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचाही सुयोग्य वापर करावा. त्याखेरीज विद्यापीठाने लोकनेते देसाई दालनाचा प्रस्ताव तयार करून सत्वर शासनाकडे पाठवावा. त्याचप्रमाणे आवश्यक पदांचा प्रस्तावही द्यावा. या अध्यासनाच्या रचनात्मक कार्यासाठी शासन निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही.

यावेळी कुलगुरू डॉ. कामत यांनी, लोकनेते देसाई यांच्याविषयीच्या माहिती संकलन प्रकल्पाच्या दुसऱ्या भागाचे काम गतीने सुरू असून त्यांच्याविषयी मान्यवरांच्या मुलाखतींचे डिजीटल अर्काइव्ह सुद्धा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत करून अध्यासनाच्या कामगिरीचा आढावा सादर केला. बैठकीला डॉ. व्ही.जी. पानस्कर, डॉ. वैभव ढेरे, गजानन पळसे, डॉ. दत्तात्रय मचाले, अवधूत चव्हाण, डॉ. माया देसाई, डॉ. सोनल मंगल, संदीप केसरकर, डॉ. उमाकांत हत्तीकट आदी उपस्थित होते.

Sunday, 31 May 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात



कोल्हापूर, दि. ३० मे :  लोककल्याणकारी राज्यकारभार, सामाजिक न्याय आणि लोकहितवादी प्रशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. मच्छिंद्र गोफणे, अविनाश भाले, डॉ. किशोर खिलारे, सुरेश बंडगर, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. चांगदेव बंडगर, जयकुमार भोसले, शरद पाटील, दत्तात्रय घुटूकडे, यश आंबोळे, डॉ. प्रियांका जाधवर, शिवाजी शेळके यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Saturday, 30 May 2026

जैवविविधता टिकविण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब आवश्यक : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुधीर कुंभार

 

कोल्हापूर, दि. ३० मे : निसर्गाचे अस्तित्व मानवावर अवलंबून नाही; मात्र मानवाचे अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजगतेने आणि जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. जमीन, पाणी, हवा, ऊर्जा आणि वनसंपत्ती यांचे संवर्धन केल्याशिवाय जैवविविधतेचे रक्षण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुधीर कुंभार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मिशन लाईफ (LiFE) अभियानअंतर्गत आयोजित समाज आणि शाश्वत विकासया विषयावरील ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर भानारकर होते.

आपल्या व्याख्यानात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ कुंभार यांनी पर्यावरण आणि जैवविविधतेविषयी समाजात रूढ झालेल्या अंधश्रद्धा व गैरसमजांवर भाष्य केले. पर्यावरण व  निसर्गसंवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज निर्माण झालेली आहे.  शुभ-अशुभाच्या कल्पनांमुळे अनेक पशू-पक्ष्यांबाबत चुकीच्या समजुती निर्माण झाल्या असून त्यातून साप, वटवाघूळ, मोर, अस्वल, साळिंदर, घोरपड, टिटवी यांसारख्या महत्त्वाच्या वन्यजीवांची हत्या केली जाते. अशा घटना पर्यावरणीय साखळी खंडित करून जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करतात, असे त्यांनी स्पष्ट केले. वन्यजीवांचे संरक्षण हे जंगलांच्या संवर्धनाशी थेट जोडलेले असल्याचे सांगताना त्यांनी वाघांच्या अधिवासाचे महत्त्व अधोरेखित केले. जंगलात वाघांचे अस्तित्व असल्यामुळे मानवी हस्तक्षेपावर काही प्रमाणात नियंत्रण राहते आणि त्यामुळे वनपरिसंस्थेचे नैसर्गिक संतुलन टिकून राहण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.


पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करताना त्यांनी फळे, कंदमुळे आणि फुलांपासून नैसर्गिक रंगनिर्मितीची शक्यता अधोरेखित केली. यामुळे रासायनिक पदार्थांच्या वापरातून निर्माण होणारे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोके टाळता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. यासोबतच प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणणे आणि जैवकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. मुरलीधर भानारकर यांनी पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आता केवळ चर्चा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे निर्माण होणारा ई-कचरा ही भविष्यातील गंभीर पर्यावरणीय समस्या बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यालाही गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. एस. ए. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश भाले यांनी केले, तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. या ऑनलाइन व्याख्यानास मिलिंद चिटणीस, भिमराव खाडे, दिनेश उथळे, डॉ. प्रदीप नंदावर, प्रियांका स्वामी, पलक भानारकर, गौतमी भाले, नरेंद्र देशमुख, शरद पाटील, चारू भानारकर, डॉ. विलास सोयम, राजेश मेश्राम, अंजली नामे, विश्वजित गुरव यांच्यासह विविध अधिविभागांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, कर्मचारी, पर्यावरणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

--------

Friday, 29 May 2026

जगाच्या कल्याणासाठी मनुष्याने शाश्वत जीवनशैली पुढे घेवून जाणे आवश्यक - सिध्दार्थ शिंदे

 

कोल्हापूर, दि.29 मे - जगाच्या कल्याणासाठी मनुष्याने शाश्वत जीवनशैली पुढे घेवून जाणे आवश्यक आहे. आर्थिक चक्रास चालना देण्याच्या प्रयत्नांत आपले शाश्वत विकासाकडे दूर्लक्ष होऊ नये, असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे यांनी आज येथे केले.

         शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गणित अधिविभागातील सभागृहामध्ये 'ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

         सिध्दार्थ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, संगणक, लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन, चार्जर यामधील बॅटरी यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे हे जगासमोर मोठे आवाहन ठरत आहे. त्याचबरोबर, काळानुरूप मोठयाप्रमाणात वापरात येत असलेल्या इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरीचे योग्य पध्दतीने विल्हेवाट करण्यासाठी आवश्यक ते संशोधन करण्याची मोठी संधी विद्यापीठास प्राप्त झालेली आहे.या संशोधनामधून नवीन उद्योगाची निर्मिती होवू शकते. वापरा आणि फेका वस्तूंबरोबरच कमी किंमतीत मिळणारे साधने पुढे आपणांस खूप घातक ठरू शकतात. यामध्ये असलेले रसायने भूजल पातळीमध्ये मिसळल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. आपणच आपल्या विनाशाचे कारण बनत आहोत.ई-कचरा निर्माण होवू नये यासाठी समाजामध्ये मोठयाप्रमाणात जागृकता निर्माण झाली पाहिजे.आपणाकडून होत असलेल्या प्लास्टिकचा वापर आणि ई-कचरा निर्मिती याकडे संवेदनशीलपणे पाहणे आवश्यक आहे.प्लास्टिकचे सूक्ष्मकण मानवाच्या शरीरामध्ये आढळून येत आहेत, हे खूप गंभीर आहे.कमी कमी गॅजेटस्चा वापर आणि पूर्नवापर करण्याकडे विद्यार्थ्यानी कटाक्षाने पाहिले पाहिजे. भविष्यात मोठयाप्रमाणात आवश्यक असलेले हायड्रोजन इंधन प्रकल्प पुढे कसे घेवून जाता येईल हे विद्यापीठाने पहावे. त्याची निर्मिती आणि साठा याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करून आवश्यक ते संशोधन करावे. नवीन सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी विद्यापीठातील संशोधक आणि प्राध्यापकांनी मोठे योगदान देणे आवश्यक आहे.


         अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले - एका महत्वपूर्ण अहवालानुसार 66 दशलक्ष टन गोळा झालेल्या ई-कचऱ्यामध्ये पाच दशलक्ष टन कचरा हा केवळ मोबाईलचा होता. यापैकी फक्त 22.3 टक्के ई-कचरा हा पुर्नप्रक्रीयेमध्ये जातो.इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये वापरात येत असलेल्या 22 मूलद्रव्यांपैकी अत्यंत दूर्मिळ मूल्यद्रव्य म्हणजे लिथीयम.आपल्याच देशाकडे मूबलक प्रमाणात लिथीयमचा साठा असावा याकरिता सगळेच राष्ट्र प्रयत्नशील आहेत.भविष्यात यामुळे जगाचा भूगोलही कदाचित बदलू शकतो. आरोग्यास हानिकार असलेल्या ई-कचऱ्यामधील मूल्यद्रव्ये पाण्यात मिसळल्याने त्याचा मानवी शरीरावर मोठयाप्रमाणात आघात परिणाम होवू शकतो. शंभर वर्षे होत आले तरी आपण याकडे गांभीर्याने पहात नाही.2010 साली ई-कचरा चौतीस दशलक्ष टन होता.2030 साली एेंशी दशलक्ष टन इतका ई-कचरा तयार होण्याची शक्यता संशोधकांनी बोलावून दाखविली आहे.जुन्या गॅझेटस्कडून नवीनकडे जाताना आपण जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे.एखादे उपकरण तयार करण्यासाठी विविध खनीज इंधनाबरोबरच 22 किलो वेगवेगळया प्रकारचे रसायने आणि दिडटन पाण्याचा वापर एक संगणक तयार करण्यासाठी होत असतो. किती संसाधनांचा यामध्ये वापर होतो, याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे.समाजामध्ये याबाबत जागृती निर्माण झाली पाहिजे.चांगले अन्न, शुध्द पाणी आणि शुध्द हवा मिळण्याची शाश्वतता राखावयाची असेल तर ई-कचरा वातावरणात मिसळू नये, याची जाणीव प्रत्येकांमध्ये येणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सामाजिक समावेश अभ्यास केंद्राचे संचालक डॉ.मुरलीधर भानारकर यांनी केले. डॉ.किशोर खिल्लारे यांनी आभार मानेल.डॉ.अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास इलेक्ट्रॉनिक्स् अधिविभागाचे डॉ.पी.ए.कदम, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ.अजित कोळेकर, आनंद खामकर, दिनेश उथळे, शरद पाटील, उदय पोवार, विनोद लोखंडे यांचेसह शिक्षक, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

-----