Thursday, 9 July 2026

'क्लायमेट सत्याग्रह' जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक - प्रा.चेतन सिंह सोलंकी

कोल्हापूर, दि.09 जुलै - 'क्लायमेट सत्याग्रह' जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक आहे. सध्या मनुष्य वापरत असलेले पृथ्वीवरील संसाधनांचे प्रमाण निम्मे करणे गरजेचे आहे. याकरिताच 'क्लायमेट सत्याग्रह' करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोलर मॅन ऑफ इंडिया, एनर्जी स्वराजचे फाऊंडर प्रा.चेतन सिंह सोलंकी यांनी आज येथे केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इश्रे) आणि युआन यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रा' अंतर्गत राजर्षी शाहू सभागृहामध्ये हवामान जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.सोलंकी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होतेे.अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत उपस्थित होते.प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

            प्रा.सोलंकी पुढे बोलताना म्हणाले, जागतिक तापमान सातत्याने वाढत असून उन्हाळयात उष्णतेच्या तीव्र लाटा निर्माण होत आहेत.हवामानाचे चक्र बिघडल्यामुळे अनपेक्षित ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूर येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी होऊन तीव्र दुष्काळ पडत आहे. तसेच, जंगलांना अचानक आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असून जगभरात अन्नटंचाई आणि कुपोषणाचा धोका निर्माण झाला आहे. तापमानवाढीमुळे दोन्ही ध्रुवांवरील हिमनदया वेगाने वितळत आहेत ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत असून किनारपट्टीची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.अतिउष्णता आणि पुरामुळे अनेक साथीचे आजार, श्वसनाचे विकार आणि मानसिक समस्या वाढत आहेत.पृथ्वीवरील सर्वात महत्वाचे घटक पाणी, हवा आणि माती यालाच आपण दुषित करीत आहोत.यामुळे वातावरणामध्ये मोठे बदल घडत आहेत ते आता वेगाने बदलत आहेत.हिमनग वितळून साडेचार मिमीने समुद्राची पातळी वाढत आहे.आपण बदललो नाही तर मनुष्याचे जीवन धोक्यातच नाही तर नष्ट होईल.आधुनिक जीवनशैलीमधील प्रत्येक गोष्ट वातावरणावर परिणामकारक ठरत आहे.वातावरणामध्ये बदल घडविण्याचे काम हे फक्त सरकार आणि इंडस्ट्रीचे नाही तर आपणा प्रत्येकाचे हे काम आहे. छोटया मोठया कामातून दिवसागणीक मनुष्य निर्मित कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन मोठया प्रमाणात होत आहे.हे उत्सर्जित कार्बनडायऑक्साईड जागाच्या वातावरणामध्ये तीनशे वर्षांपर्यत राहणार आहे.आज, जगामध्ये 53 टक्के जादा कार्बनडायऑक्साईड निर्मित झालेले आहे.यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.सध्या, पृथ्वीचे 2.5 डीग्री फेरेनाईट इतके तापमान वाढलेले आहे.वस्तुंच्या अतिरेकी वापरामुळे निर्माण होणाऱ्या तपामानवाढीला 'लक्ष्मणरेखा' तयार केली पाहिजे.पृथ्वी सिमित आहे, सारे संसाधने सिमित आहेत तर तापमानवाढ रोखण्यासाठी आपल्या गरजाही सिमित करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी, श्रीम इलेक्ट्रीक लिमिटेड इंडस्ट्रीचे एस.आर.जगदाळे यांनी इनर्जी स्वराज फाऊडेशनला एक्कावन्न हजार रूपयांची देणगी दिली.

यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ.गिरीष कुलकर्णी, किर्लोस्कर ऑईल इंजिनचे शरद आजगेकर, आर्किटेक्चर शिरिष बेरी, इश्रेचे प्रमोद पुणगावकर यांची आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले,हवामान बदलामुळे जगभरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, शेतीचे अतोनात नुकसान, अन्नसुरक्षेचा प्रश्न आणि मानवी आरोग्यास धोके निर्माण झाले आहेत.यासाठी आपण आपल्या घराची ज्यापध्दीने काळजी घेतो तशीच काळजी पृथ्वीची आपल्या सभोवतालच्या परिसराची घेतली पाहिजे.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.प्रदीप भास्कर यांनी स्वागत प्रस्ताविक केले.तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ.अजित कोळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.डॉ.हर्षवर्धन पंडीत यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाला उपेंद्र देऊसकर, आर्किटेक्ट अंजली जाधव, अजय कोरणे, डॉ.एन.एन.शिंदे तसेच इंडस्ट्रीचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, पर्यावरणप्रेमी जनता मोठया संख्येने उपस्थित होते.

-----

“राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञान क्षेत्रात मोठ्या रोजगारसंधी निर्माण होणार”

आपण सारेच क्वांटम विश्वाचे रहिवासी: पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा.


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा. समोर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत डॉ. वर्मा यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. मानसिंग टाकळे आदी.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. एच.सी. वर्मा, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

(पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा यांच्या व्याख्यानाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ९ जुलै: संपूर्ण विश्व हे प्रचलित शास्त्रीय (क्लासिकल) नियमांपेक्षा पुंज भौतिकीय (क्वांटम) नियमांवर चालते. प्रकाशाचे वर्तन, अणूंची रचना, चुंबकत्व, विद्युतवाहकता, अर्धसंवाहक, अणुऊर्जा, सूर्याची ऊर्जा आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञान यामागे क्वांटम भौतिकशास्त्र कार्यरत आहे. त्यामुळे क्वांटम भौतिकशास्त्र केवळ प्रयोगशाळेतील विषय नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारसंधींची निर्मिती होणार आहे. आपण सारेच क्वांटम विश्वात जगत आहोत, असे प्रतिपादन पदार्थविज्ञानाचे ज्येष्ठ संशोधक, शिक्षक आणि आयआयटी कानपूरचे प्राध्यापक पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग आणि दि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आज डॉ. वर्मा यांचे "क्वांटम भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील रोजगार संधी" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांनी विद्यार्थ्यांना क्वांटम भौतिकशास्त्राची संकल्पना अत्यंत सोप्या उदाहरणांतून समजावून सांगितली. त्यांनी आपल्या विद्यार्थीजीवनातील आयआयटी कानपूरमधील अनुभव, संशोधनातील संघर्ष, संगणक प्रोग्रामिंगची सुरुवात आणि विज्ञानातील जिज्ञासेचे महत्त्व यांचीही प्रेरणादायी मांडणी केली.

डॉ. वर्मा म्हणाले, न्यूटनचे नियम, गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकत्व किंवा ऊष्मागतिकीचे नियम अनेक घटना स्पष्ट करतात; मात्र तांबे वीज का वाहून नेतो, प्लास्टिक विद्युतरोधक का असते, लोखंडच चुंबकीय का असते किंवा काच पारदर्शक आणि पारा अपारदर्शक का असतो, याचे उत्तर केवळ पारंपरिक शास्त्रीय (क्लासिक) भौतिकशास्त्र देऊ शकत नाही. या सर्व घटनांचे स्पष्टीकरण क्वांटम भौतिकशास्त्रामध्ये मिळते. क्वांटम भौतिकशास्त्रातील ऊर्जा क्वांटीकरण, वेव्ह-पार्टिकल द्वैधस्वरूप, अनिश्चितता, क्वांटम टनेलिंग, सुपरपोझिशन यांसारख्या संकल्पना त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. अणुभट्टीतील अणुभंजन, सूर्याच्या केंद्रातील अणुसंम्मीलन, स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप आणि आधुनिक सेमीकंडक्टर तंत्रज्ञान ही क्वांटम सिद्धांताची यशस्वी उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणानंतर केवळ अध्यापन किंवा संशोधन हेच पर्याय उपलब्ध नसतात. भारत सरकारच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनअंतर्गत देशात क्वांटम संगणन, क्वांटम माहितीशास्त्र, क्वांटम संप्रेषण आणि क्वांटम सुरक्षा या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असून आगामी काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. या मिशनसाठी केंद्र सरकारने सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून विविध आयआयटी, संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, इस्रो, सीएसआयआर, भाभा अणुसंधान केंद्र, भौतिकी संशोधन प्रयोगशाळा, प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट, यांसह विविध राष्ट्रीय प्रयोगशाळा, वैज्ञानिक संस्था, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान व्यवस्थापन, संशोधन प्रशासन तसेच उद्योग क्षेत्रात भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित होत असल्यामुळे उद्योगक्षेत्र त्यांना प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेतनापेक्षा योगदानाचा विचार महत्त्वाचा

मोठ्या वेतनाच्या तुलनेत स्वतःच्या क्षमतेचा आणि समाजासाठीच्या योगदानाचा विचार करा. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी सक्षम शिक्षक, संशोधक आणि वैज्ञानिक तयार होणे ही काळाची गरज आहे, असे सांगतानाच त्यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानातील करिअरकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवर्जून सांगितले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी क्वांटम भौतिकशास्त्रातील विविध संकल्पना, संशोधन आणि करिअरच्या संधींबाबत प्रश्न विचारले. डॉ. वर्मा यांनी त्यांची सविस्तर आणि सोप्या भाषेत उत्तरे देत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी भौतिकशास्त्र हे सर्व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा पाया असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, एज कॉम्प्युटिंग आणि उच्च कार्यक्षम संगणन (High Performance Computing) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी क्वांटम भौतिकशास्त्र असून, भविष्यातील वैज्ञानिक क्रांतीचे नेतृत्व हे याच क्षेत्रातून होणार आहे. मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान यांतील दरी भरून काढल्याशिवाय देशाचा वैज्ञानिक विकास अशक्य असून विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले. पद्मश्री डॉ. वर्मा यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवीन दिशा आणि करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मानसिंग टाकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नीलेश तरवाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अधिविभाग प्रमुख, महाविद्यालयीन प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठातील विज्ञानाचे विद्यार्थी, विविध महाविद्यालयांसह शहरातील शालेय विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय होती.

Monday, 6 July 2026

संवाद कौशल्य हीच प्रभावी प्रशासनाची गुरुकिल्ली : डॉ. आलोक जत्राटकर

शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर.

शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. कृष्णा पाटील, विनय शिंदे आणि दिलीप मोहाडीकर.

शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात डॉ. आलोक जत्राटकर यांचे स्वागत करताना विनय शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. कृष्णा पाटील व दिलीप मोहाडीकर.


(शिवाजी विद्यापीठात आयोजित उद्बोधन वर्गाची ध्वनीचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ६ जुलै: प्रशासकीय कामकाजात प्रभावी संवाद कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण ज्या संस्थेमध्ये कार्यरत आहोत, त्या संस्थेची उद्दिष्टे, कार्यपद्धती, नियम आणि विविध उपक्रमांची अचूक माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे आवश्यक आहे. विद्यार्थी,पालक आणि अभ्यागतांशी सकारात्मक व परिणामकारक संवाद साधण्याची क्षमता ही प्रभावी प्रशासनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने समूह जनजागृती कार्यक्रम (Community Awareness Programme) या अंतर्गत विद्यापीठातील हंगामी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी 'प्रशासकीय साक्षरता आणि जीवन कौशल्ये' या विषयावरील उद्बोधन वर्गाचे आयोजन मानव्यविद्या सभागृहात शनिवारी (दि. ४) करण्यात आले होते. यावेळी 'शिवाजी विद्यापीठ आणि संवाद कौशल्य' या विषयावर डॉ. जत्राटकर मार्गदर्शन करीत होते. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. जत्राटकर म्हणाले की, कोणत्याही कार्यालयाची सकारात्मक प्रतिमा घडविण्यात तेथील कर्मचाऱ्यांचा संवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रशासकीय प्रक्रियेची माहिती, कायद्याचे प्राथमिक ज्ञान आणि प्रभावी संवाद कौशल्य यांच्या साहाय्याने विद्यार्थी व नागरिकांना दर्जेदार सेवा देता येते. बदलत्या काळात संवाद कौशल्य ही प्रत्येक कर्मचाऱ्याची मूलभूत गरज बनली असून, प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वात व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि संवादातील स्पष्टता विकसित केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी 'प्रशासकीय साक्षरता आणि जीवन कौशल्ये' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी सांगितले की, प्रशासकीय कार्यात वेळेचे नियोजन, शिस्त, जबाबदारीची जाणीव, सकारात्मक वृत्ती, आवश्यक कौशल्ये आणि अद्ययावत ज्ञान यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या डिजिटल युगात प्रशासकीय साक्षरतेसोबतच डिजिटल साक्षरता, संगणक साक्षरता आणि कायद्याचे प्राथमिक ज्ञान प्रत्येक कर्मचाऱ्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. प्रशासनात होत असलेल्या तांत्रिक बदलांचा स्वीकार करून सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कोर्स को-ऑर्डिनेटर नाझिया मुल्लाणी यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत सुरू असलेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. तसेच ऑनलाईन एम.कॉम., ऑनलाईन एम.एस्सी. (गणित) आणि ऑनलाईन एम.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली.

डॉ. संजय चोपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दयानंद गावडे यांनी परिचय करून दिला. डॉ. नगीना माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर सुमन लोहार यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, सहाय्यक कुलसचिव दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. नितीन रणदिवे, विश्वनाथ वरुटे, रुपाली बन्ने, तेजस्विनी शिंदे यांच्यासह शंभरहून अधिक हंगामी रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.