Sunday, 21 June 2026

योगसाधना ही भारतीयांची प्रमुख जीवन पध्दती - खासदार धनंजय महाडिक

 


कोल्हापूर, दि.21 जून - योगसाधना ही भारतीयांची प्रमुख जीवन पध्दती झालेली आहे.शरीर आजारमुक्त करण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगसाधना. भारताच्या प्राचीन परंपरेत हजारो वर्षांपासून योग अभ्यास केला जातो. हे आपणा सर्वांबरोबरच आपल्या पुढच्या पिढीसाठीही उपयुक्त आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये बारावर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहाने आणि उपस्थितांच्या मोठया संख्येने साजरा केला जातो.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या प्राचीन परंपरेला 2014 सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करून देण्याचे मोठे कार्य केलेले आहे.जगभरातील जवळपास 130 देशांमध्ये योगदिन साजरा केला जातो.भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत साठ हजार ठिकाणी योगदिन साजरा होतो, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले.

शिवाजी विद्यापीठात आज 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 'निरोगी वृध्दत्वासाठी योग' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार महाडिक बोलत होते.यामुळे कुलगुरू डॉ.राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होते.



भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 'निरोगी वृध्दत्वासाठी योग' हा उपक्रम देशभरात साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमात शिवाजी विद्यापीठ सहभागी झाले.यासाठी सुमारे 575 योगसाधकांनी नोंदणी केली आणि आजच्या उपक्रमात सहभागही दर्शविला.विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार अधिविभाग, क्रीडा शारीरिक शिक्षण अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग, रगेडीयन फिटनेस, आदित्य बिर्ला ग्रुप 'इंदिरा'यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.





यावेळी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, विद्यापीठात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे दि.21 जून, 2015 पासून गेली 12 वर्षे सलग दैनंदिन स्वरूपात विद्यापीठात मोफत योग शिबीर घेतले जाते.या उपक्रमाचा दैनंदिन जवळपास 250 साधक लाभ घेतात.योगसाधना आणि योगसाधकांच्या माध्यमातून विद्यापीठ हे जगी गरजू दे. आपला भारत देश जगामध्ये अनेक बाबतीत अग्रेसर होत आहे.त्यातीलच एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे योगसाधना.योगसाधना अबाल, वृध्द सर्वांसाठीच लाभदायक आहे. त्याचबरोबर, निरोगी वृध्दत्वासाठीही फार महत्वाची ठरलेली आहे. योग ही एक व्यापक प्रणाली आहे जी संपूर्ण व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणास फायदेशीर आहे. योगाचा आपल्या जीवनात दररोज समावेश केल्यास आपण असंख्य फायदे अनुभवू शकतो.


शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये आज सकाळी 6.15 ते 8.15 या कालावधीत योगसाधना शिबीर पार पडले.कुलगुरू डॉ.कामत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.कबीर खराडे, विद्यार्थी विकास विभागाचेसंचालक डॉ.एस.जी.घाणे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ.रामचंद्र पवार, रगेडीयनचे आकाश कोरगावकर, राज कोरगावकर, अझरूद्दीन मुल्ला, आदित्य बिर्ला ग्रुप 'इंदिरा'चे परशराम पाटील यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक यांच्यासह नागरिक, एम.ए.(योगशास्त्र), बी.ए. (स्पोर्टस्) विभागांसह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी या योगसाधना शिबिरात सहभागी झाले.योगशिक्षक सूरज पाटील यांनी उपस्थितांना योगसाधनेचे प्रशिक्षण दिले.सूत्रसंचालन निलम जाधव यांनी केले.विद्यार्थी विकास विभागाचेसंचालक डॉ.एस.जी.घाणे यांनी आभार मानले.नाश्ता चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाने प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथून संपूर्ण देशाला संबोधित केले.निरोगी वृध्दावस्थेसाठी योगसाधना अत्यंत महत्वाची आहे.योग केवळ वृध्दांसाठी नाही, तर सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे.योग फक्त शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नसून तो मानसिक आरोग्याचाही मार्ग आहे.यावेळी त्यांनी योगाचे महत्व, मानवी जीवनातील त्याचे स्थान आणि संतुलित जीवनशैली यावर प्रकाश टाकला.नागरिकांना योग दररोजच्या दिनचर्याचा भाग बनवण्याचेही आवाहन केले.पंतप्रधान मोदी यांच्या या संबोधनाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले.त्यांचे संबोधन संपल्यानंतर योग प्रात्यशिक्षकांना सुरूवात झाली.

-----


Saturday, 20 June 2026

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक - आनंदराव पाटील, उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय

 

कोल्हापूर, दि.20 जून - विकसित भारत घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आनंदराव पाटील, आयएएस, अतिरिक्त सचिव, उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी आज येथे केले.


       उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राला थेट उद्योगांशी जोडण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, विद्यापीठ उद्योग कक्ष आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना 'नॅटस् उद्योग-शिक्षण परिषदेचे' आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव पाटील, उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत होते.


भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे आनंदराव पाटील पुढे बोलताना म्हणाले, नॅटस्च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेली पोकळी कमी करण्याचे काम नॅटस्च्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन दिले जाते, याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. एनएसडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक तो प्रस्ताव द्यावा.विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे कौशल्य अवगत करून घेतले पाहिजे. उद्योग व्यवसायाकडे आकृष्ट होण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे.सध्या, 25 कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. विविध तांत्रिक कौशल्यांच्या मध्यमातून त्यांना त़ंत्रज्ञानामध्ये आणणे आवश्यक आहे. याकरिता शिक्षणक्षेत्राने पुढाकार घ्यावा. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आयसीटीचे क्लासरूम उपलब्ध व्हावेत.शालेय विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साधन सामग्रीचा परिचय करून देणे गरजेचे आहे. हे जागतिक पातळीवर आवर्जुन केले जाते.आजचे विद्यार्थी देशाचे भविष्य घडविणारे आहेत, त्यांना अर्थपूर्ण कौशल्ये प्राप्त करून दिले पाहिजेत.आत्मनिर्भर पिढी निर्माण करण्यासाठी हे घडवणे आवश्यक आहे. शिक्षकांबरोबर समाज म्हणून आपण सर्वांनी हे केले पाहिजे.उद्योग, कौशल्य विकास आणि रोजगाराला चालना देणारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या उपक्रमांची माहिती देणाऱ्या समर्थ पोर्टलवर विविध महाविद्यालये आणि विद्यापीठे येणे फार महत्वाचे आहे.स्वयंम् प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पुढे जाणे गरजेचे आहे.

डॉ.प्रमोद जुमले, संचालक, बोट पश्चिम विभाग, मुंबई यांनी नॅटस् अंतर्गत अभियांत्रिकी, फार्मसी, एचएमसीटी, आर्किटेक्चर, बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी पदवीधर आणि डिप्लोमाधारकांना औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये सुनियोजित ऑन-द-जॉब ट्रेनिंगद्वारे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याच्या संधींची माहिती दिली.

निवृत्ती वडोदे, उपसंचालक, बोट, मुंबई यांनी नॅटस्चे व्हिजन, फ्रेमवर्क आणि इम्पॅक्ट या विषयावर माहिती विषद केली.


अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयांमध्ये नॅटस्ची प्रभावी अंमलबजावणी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करीत आहे.कालच प्रधानमंत्री रोजगार योजनेचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आपणांस ऑन जॉब ट्रेनिंग मोठया प्रमाणात सुरू करावयाचे आहे. एआय डाटाविषयक नैपुण्य आणि सायबर सुरक्षा महत्वाची आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान जोपासण्याविषयी शिकविणे गरजेचे आहे.तंत्रज्ञान अधिविभागामध्ये रोबोटिक्सचा समावेश करावयाचा आहे.या परिषदेच्या माध्यमातून नोकरीसाठी सज्ज असे पदवीधर विद्यार्थी निर्माण करणे शक्य होणार आहे.


            याप्रसंगी, विरेंद्र पाटील, अध्यक्ष, सीआयआय, दक्षिण महाराष्ट्र प्रादेशिक परिषद,ब्रिजेश तळेवाडीकर, एचआर, भारतीय डिजीटल सर्व्हिसेस, गडहिंग्लज, सुदर्शन सुतार, डीवायपाटील कॉलेज, टेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, राजेंद्र कांबळे, एचआर,इंद्रायणी इंडस्टीज् चाकण, पुणे, डॉ.प्रतापसिंह देसाई आयएसटीईचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांनी केले, तर विद्यापीठ उद्योग कक्षाचे संचालक डॉ.सागर डेळेकर यांनी आभार मानले.

यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव यांचेसह उद्योग व्यवसायाशी संबंधीत मान्यवर, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, उद्योग व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधीत साडेपाचेशहून अधिक सदस्य सहभागी झाले होते.

-----