Friday, 6 March 2026

पोर्ट्रेट, लँडस्केप चित्रकलेविषयी शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रा. अभिजीत कांबळे


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व्यक्तीचित्रणाचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रा. अभिजीत कांबळे

शिवाजी विद्यापीठातील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेअंतर्गत अधिविभागात असे भव्य भित्तीचित्र रेखाटले.

शिवाजी विद्यापीठात चित्रकला कार्यशाळेप्रसंगी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई, प्रा. अभिजीत कांबळे, बबन माने आणि विजय उपाध्ये यांच्यासमवेत  सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी.

(चित्रकला कार्यशाळेची लघुचित्रफीत)




कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे दोनदिवसीय चित्रकला कार्यशाळा आज उत्साहात पार पडली. कार्यशाळेचा विषय “पोर्ट्रेट, लँडस्केप अँड कॉम्पोझिशन” असा होता. दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध चित्रकार प्रा. अभिजीत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतील बारकावे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगत मार्गदर्शन केले.

संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे सभागृह आणि परिसरात कार्यशाळा झाली. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पोर्ट्रेट, लँडस्केप तसेच चित्ररचनेतील संतुलन, रंगसंगती आणि मांडणी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारची चित्रे साकारली. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या भिंतीवर चित्रकला पदविकेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले भित्तीचित्र पाहून उपस्थित रसिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यासोबत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात पोर्ट्रेट, निसर्गचित्रे आणि विविध संकल्पनांवर आधारित चित्रांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना उपस्थित कला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करण्यात आले.

अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बबन माने, विजय उपाध्ये यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. कार्यशाळेसाठी प्राचार्य अजेय दळवी, डॉ. मानसिंग टाकळे, चित्रकार विजय टिपुगडे, संग्राम भालकर, सुदर्शन वंडकर, गजानन वाघमारे यांच्यासह अधिविभागातील शिक्षक, चित्रकला शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. 

समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची

कर्नाटक, तमिळनाडूतील सेवाभावी संस्थांना भेट

कर्नाटक राज्य आदिवासी संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

बंगळुरू येथील ओअॅसिस इंडिया या संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.


कोल्हापूर, दि. ६ मार्च: समाजकार्याच्या अभ्यासामध्ये सैद्धांतिकतेबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभवालाही मोठे महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक आणि तमिळनाडूतील काही महत्त्वाच्या सामाजिक, सेवाभावी संस्थांना भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली.

शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच कर्नाटकातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, बंगळुरू, अॅसिस इंडिया, कॅडबॅम्स हॉस्पिटल, अक्षयपात्रा फाऊंडेशन, स्टंप शूल अँड सोमप्पा स्प्रिंग्ज प्रा. लि., बंगळुरू, राणे ग्रुप, मैसुरू, आदिवासी संशोधन केंद्र, मैसुरू इत्यादी रुग्णालये, उद्योग समूह आणि स्थानिक सेवाभावी संस्थांना भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची माहिती घेतली. या अभ्यास सहलीत एकूण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समाजकार्य अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर, डॉ. उर्मिला दशवंत आणि सौरभ धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल पार पडली.

या अभ्यास सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना वर्गात शिकविल्या जाणाऱ्या सैद्धांतिक संकल्पनांचा प्रत्यक्ष क्षेत्रात अनुभव देणे, विविध सामाजिक संस्थांची कार्यपद्धती समजून घेणे आणि समाजकार्याच्या विविध क्षेत्रांतील संधींबाबत व्यापक दृष्टीकोन निर्माण करणे हा होता. मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, पुनर्वसन, पोषण, आदिवासी विकास, समुदाय संघटन आणि शाश्वत विकास या विविध क्षेत्रांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.

बंगळुरूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस येथे विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सेवा, आधुनिक निदान पद्धती आणि बहुविद्याशाखीय उपचार प्रणालीचा अभ्यास केला. समाजकार्य विभागातील अधिकाऱ्यांनी मानसोपचार प्रक्रियेत समाजकार्यकर्त्यांची भूमिका, कुटुंब समुपदेशन, पुनर्वसन आणि समुदाय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रमांची माहिती दिली. अॅसिस इंडिया संस्थेला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांनी बेघर, व्यसनाधीन व्यक्ती आणि रस्त्यावरच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन कार्यक्रमांची माहिती घेतली. तर, कॅडबॅम्स हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती उपचार, समुपदेशन आणि दीर्घकालीन पुनर्वसन प्रक्रियेबाबत जाणून घेतले. बंगळुरूमधील अक्षयपात्रा फाउंडेशन येथे विद्यार्थ्यांनी शालेय मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीतील अत्याधुनिक स्वयंपाकगृह, गुणवत्ता नियंत्रण आणि वितरण व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास केला. म्हैसूर येथील आदिवासी संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती, परंपरा आणि विकास धोरणांविषयी माहिती मिळाली. याशिवाय, मनुष्यबळ विकास शिकणाऱ्या स्टंप शूल अँड सोमप्पा स्प्रिंग्ज प्रा. लि., बंगळुरू आणि राणे ग्रुप, मैसुरू येथे औद्योगिक व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया आणि मानव संसाधन विकासाच्या पद्धतींचा अभ्यास केला. उटी येथे विद्यार्थ्यांनी स्थानिक समुदाय व स्वयंसहायता गटांशी संवाद साधून शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांविषयी माहिती घेतली.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

शिवाजी विद्यापीठात ग्रंथपालनविषयक दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथपालनविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. धनंजय सुतार, डॉ. मोहन खेरडे, डॉ. विनय पाटील, डॉ. एस.ए.एन. इनामदार.

शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथपालनविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

 एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. विलास जाधव यांना 'मुकला' संघटनेचा सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार प्रदान करताना शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. धनंजय सुतार, डॉ. मोहन खेरडे, डॉ. विनय पाटील, डॉ. प्रकाश बिलावर आणि डॉ. एस.ए.एन. इनामदार

(परिषदेच्या उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ६ मार्च: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्येही वाचनाचे, ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित राहणार असून कोणतेही तंत्रज्ञान पुस्तकांना पर्याय ठरणार नाही, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

महाराष्ट्र विद्यापीठे आणि महाविद्यालयीन ग्रंथपाल (मुकला) संघटना, शिवाजी विद्यापीठ शाखा, विद्यापीठाचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचे भवितव्य’ या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मुकला संघटनेचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे अध्यक्षस्थानी होते.

प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी व्यक्तीगत आयुष्यातील काही उदाहरणे देत ग्रंथालयांचे महत्त्व आपल्या भाषणात विषद केले. त्या म्हणाल्या, एक शिक्षक आणि संशोधक म्हणून आयुष्याला ग्रंथांनी खरा आकार दिला. ३६ वर्षांच्या संशोधकीय वाटचालीमध्ये ग्रंथालये आणि त्यांच्या ग्रंथपालांचे योगदान खूप मोलाचे ठरले आहे. ग्रंथालये ही ज्ञानाचे वाहक आणि प्रज्ञेचे निर्माते आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही या मूळ स्रोतांचे महत्त्व अबाधित राहणार आहे. कारण वस्तुनिष्ठ माहितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेलाही अंतिमतः ग्रंथांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. या युगात वाढलेल्या नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना ग्रंथालयांकडे आकर्षित करण्याचे आव्हान निश्चितपणे ग्रंथपालांसमोर उभे असून त्यामध्ये ते नक्की यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिषदेचे संचालक डॉ. एस.ए.एन. इनामदार म्हणाले, जग आज एका ऐतिहासिक वळणावर उभे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या परिवर्तनाचे आपण साक्षीदार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या वर्तमानावर मोठा प्रभाव टाकत आहे आणि भविष्याला आकार देण्यास सज्ज झाली आहे. ग्रंथालयांसाठी ती एक सक्षम संधी म्हणून सामोरी आली आहे. ग्रंथालयांनी नेहमीच तंत्रज्ञानातील बदल स्वीकारले आहेत. संगणकाच्या आगमनानंतर ग्रंथालयांचे ऑटोमेशन झाले. इंटरनेटमुळे ग्रंथालये डिजिटल प्रवेशद्वारे बनली. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे स्वयंचलित कॅटलॉगिंग, मेटाडेटा निर्मिती आणि वर्गीकरण ही ग्रंथालयातील नियमित तांत्रिक कामे अधिक जलद आणि अचूक होतील. एआय-आधारित चॅटबॉट विद्यार्थ्यांना, संशोधकांना २४ तास संदर्भ आणि रेफरल सेवा देऊ शकते. मशीन लर्निंग अल्गोरिदम वर्तन आणि शैक्षणिक ट्रेंडच्या वापराचे विश्लेषण करून ग्रंथपालाला संग्रह विकासात मदत करू शकते. तथापि, तंत्रज्ञान डेटा प्रक्रिया करू शकते, परंतु मानवी बुद्धिमत्तेची, ज्ञानाची जागा घेऊ शकत नाही. भविष्यातील ग्रंथपाल केवळ पुस्तके आणि डेटाबेस व्यवस्थापित करणार नाही तर डेटा ग्रंथपाल आणि माहिती साक्षरता शिक्षक, संशोधन डेटा व्यवस्थापक, डिजिटल ज्ञान निर्माता आणि माहितीमध्ये नैतिक मार्गदर्शन करेल. आणि हे परिवर्तन साध्य करण्यासाठी, ग्रंथपालांना नवीन क्षमता आत्मसात करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोहन खेरडे म्हणाले, ग्रंथालयांचा विकास हेच उद्दिष्ट घेऊन मुकला कार्यरत आहे. ग्रंथपाल हे केवळ प्रशासक नाहीत, तर सेवा पुरवठादार असण्याबरोबर ते शिक्षक आणि संशोधकही आहेत. त्यामुळे ग्रंथालयांना नव्या युगातील संधी आणि आव्हाने यांसाठी सक्षम करण्याची जबाबदारी ते निश्चितपणे पेलतील. ग्रंथालये आणि प्रभावी आणि उपयुक्त बनविण्याच्या कामी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने ग्रंथपालांनी विचारविमर्श करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या महर्षी धोंडो केशव कर्वे ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. विलास जाधव यांना यंदाचा मुकला सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कारप्रदान करून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरुप होते.

सुरवातीला ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि रोपास पाणी वाहून मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सचिनकुमार पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुकलाचे महासचिव डॉ. विनय पाटील यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सौ. एस.डी. हजारे आणि अमृता देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर यांनी आभार मानले.

Thursday, 5 March 2026

आण्णासाहेब लठ्ठे महत्त्वाचे लोकशिक्षक: आनंद मेणसे

शिवाजी विद्यापीठात आयोजित आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना प्राचार्य आनंद मेणसे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना प्राचार्य आनंद मेणसे. मंचावर (डावीकडून) सुहास पाटील, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे.

(व्याख्यानमालेची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ५ मार्च: शाहूकार्याशी बांधिलकी आणि गांधीविचारांशी निष्ठा अशा मुशीतून घडलेले दिवाणबहादूर आण्णासाहेब लठ्ठे हे एक महत्त्वाचे लोकशिक्षक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र, मराठी अधिविभाग आणि इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेमध्ये आण्णासाहेब लठ्ठे: जीवन आणि कार्य या विषयावर ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते, तर सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुहास पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्राचार्य मेणसे यांनी आपल्या भाषणात प्रोफेसर लठ्ठे यांनी कोल्हापूरसह बेळगाव परिसरात केलेल्या विविधांगी कार्याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, लठ्ठे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक भूमिका पटलेली होती. विशेषतः कोल्हापूरमध्ये त्यांनी जैन विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वसतिगृहाच्या कृतीमुळे ते प्रभावित झाले होते. या माध्यमातून ते महाराजांच्या अधिक जवळ आले. त्यांच्या विचारकार्याशी त्यांनी अखेरपर्यंत बांधिलकी सांभाळली. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनात अस्पृश्यता निवारण, दलित आणि महिलांचे प्रश्न विषयपत्रिकेवर घेतल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतील अन्य मंडळींसह लठ्ठेही त्यांच्यासमवेत उभे राहिले. गांधींच्या श्रमप्रतिष्ठेच्या विचाराचे ते पाईक होते.

मेणसे पुढे म्हणाले, जयंती नदीवरील पूल, नगरविकास नियोजन, राजाराम महाविद्यालयांत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांच्यासारख्या गुणवंत शिक्षकांना आणून येथील शिक्षणव्यवस्था दर्जेदार करणाऱ्या लठ्ठे यांचा कोल्हापूर घडविण्यात जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो बेळगावच्या राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासामध्येही आहे. १९३७ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बेळगाव उत्तरमधून लठ्ठे विजयी झाले आणि मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्रीही झाले. त्यावेळी त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आदर्शवत स्वरुपाचा होता. त्यात त्यांनी दारूबंदीचे सूतोवाच केले. आणि त्यापोटी बुडणारा महसूल घोड्यांच्या शर्यती आणि श्रीमंतांच्या घरभाड्यावरील कर इत्यादी मार्गांनी वसूल करण्याची योजना केली. दक्षिण कोकण शिक्षण संस्थेची स्थापना आणि वृद्धी याकामीही त्यांनी फार मोलाचे योगदान दिले. आजही संस्थेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त चालतो, याला लठ्ठे यांनी घालून दिलेला आदर्श कारणीभूत आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, आण्णासाहेब लठ्ठे यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्रासह त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहीली. त्यांचे वाचन करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या कृती केल्या, त्यामागील कार्यकारणभाव आजच्या पिढीने जाणीवपूर्वक समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या विविध पैलूंविषयी संशोधन व अभ्यास करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुहास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर सुखदेव एकल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला डॉ. अशोक चौसाळकर, सुरेश शिपूरकर, डॉ. अनिल गवळी, डॉ. शरद गायकवाड, डॉ. रफिक सूरज, डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. सुभाष पाटील यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Wednesday, 4 March 2026

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला

शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा संघ.

शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा क्रीडा अधिविभागाचा संघ

शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत तृतीय स्थान मिळविणारा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा संघ


कोल्हापूर, दि. ४ मार्च: शिवाजी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने सलग चौथ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. क्रीडा अधिविभाग दुसऱ्या तर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.

शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धा २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल येथे झाल्या. यामध्ये कॅम्पसवरील सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा: क्रिकेट (पुरुष): स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट.

क्रिकेट (महिला): क्रीडा आधिविभाग, रसायनशास्त्र, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, गणित.

थ्रो बॉल (महिला): फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वाणिज्य व व्यवस्थापन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल अँड डेव्हलपमेंट, प्राणीशास्त्र.

व्हॉलीबॉल (पुरुष): स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वनस्पतीशास्त्र, क्रीडा,

बुद्धिबळ (पुरुष): आदित्य सावळकर (क्रीडा), अनिकेत धोतुरे (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), अपूर्व कदम (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग).

बुद्धिबळ (महिला): प्रतीक्षा गोसावी (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), सुरभी सिंग (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), नेहा कटके (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग).

बॅडमिंटन (पुरुष): स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अर्थशास्त्र, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी.

बॅडमिंटन (महिला): डिपार्टमेंट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, संगणकशास्त्र.

रस्सीखेच (महिला): क्रीडा, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गणित, शिक्षणशास्त्र.

रस्सीखेच (पुरुष): शिक्षणशास्त्र, पर्यावरणशास्त्र, क्रीडा.

अॅथलेटिक्स पुरुष आणि महिला गटात सर्वसाधारण विजेते अनुक्रमे: क्रीडा, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मराठी.

स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभाला विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, अमित कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले.

समाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी शाश्वत विकासाचे बीज: सिद्धार्थ शिंदे

चंदगड तालुक्यात सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबीराचा समारोप

शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबिराच्या समारोप प्रसंगी सिद्धार्थ शिंदे यांच्यासमवेत अमोल मिणचेकर, मंजुषा मोहिते आदी.


कोल्हापूर, दि. ४ मार्च: समाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी हा शाश्वत विकासाचे बीज असून आपल्या परिसराच्या विकासामध्ये भरीव योगदान देण्यासाठी सक्षम असावा, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी केले.

मौजे जाम्बरे व मजरे शिरगाव (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या समाजकार्य विभागामार्फत २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात २८ विद्यार्थ्यांनी शिबिर समन्वयक डॉ. अमोल मिणचेकर व मंजुषा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय परिस्थितीचा सखोल व वस्तुनिष्ठ अभ्यास केला. शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून विकासाच्या गरजा ओळखणे हा होता. या शिबिराच्या समारोप समारंभात श्री. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सिद्धार्थ शिंदे यांनी आपल्या मनोगतात समाजकार्य अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, समाजकार्य अभ्यासक्रम केवळ शासकीय नोकऱ्यांसाठीच नव्हे; तर, राजकारणेच्छु उमेदवारांसाठीही उपयुक्त आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसराच्या शाश्वत विकासासाठी योदान देणे अभिप्रेत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे. लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा करू इच्छिणाऱ्या युवकांनी किंवा शासकीय नोकरीत येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी या अभ्यासक्रमाचा लाभ योग्य प्रकारे घेतल्यास ग्रामीण जीवन अधिक उत्तम आणि शाश्वत बनण्यास मदत होईल.

या शिबिरादरम्यान मोबिलिटी मॅपिंग, सामाजिक नकाशा, संसाधन नकाशा, समस्या वृक्ष, कालबदल तक्ता आणि लक्षकेंद्री गट चर्चा या विविध साधनांचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेतून गावातील पाणीटंचाई, बेरोजगारी, शेतीतील घटते उत्पन्न, युवकांचे स्थलांतर, महिलांच्या मर्यादित हालचाली आणि पर्यावरणीय समस्या यांचे मूळ कारणांसह विश्लेषण करण्यात आले. महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिक यांच्या स्वतंत्र चर्चांमधून स्थानिक अडचणी आणि विकासाच्या संधी स्पष्ट झाल्या. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे समस्यांचे परस्परसंबंध समजून घेता आले आणि स्थानिक स्तरावर अमलात आणता येतील अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या. पाणी व्यवस्थापन सुधारणा, कौशल्य विकास प्रशिक्षण, महिला उद्योजकतेला चालना, पर्यावरण संवर्धन उपक्रम आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे  व स्कूलचे संचालक डॉ. नितीन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागावर आधारित गावाच्या शाश्वत विकासासाठीचा हा दिशादर्शक उपक्रम यशस्वी ठरला.