Monday, 13 April 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय विकासनीतीचे धोरणकर्ते

शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर

 

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. प्रकाश कांबळे.

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे.

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे.

(परिसंवादाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारतीय विकासनितीचे धोरणकर्ते होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात उमटला. सप्ताहांतर्गत आज डॉ. प्रकाश कांबळे यांच्या “वर्तमान उपयुक्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या पुस्तकावर विशेष परिसंवाद रंगला.

यामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीष मोरे आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे सहायक संचालक अविनाश भाले यांनी सहभाग घेतला. परिसंवादात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय विकासनीतीचे खरे शिल्पकार म्हणून अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते, तर लेखक डॉ. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान केवळ सामाजिक किंवा राज्यघटनात्मक क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्यांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी ठोस आणि दूरदर्शी धोरणांचा आराखडा तयार केला. या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्या पुस्तकाने आंबेडकरांच्या आर्थिक विचारांना समकालीन संदर्भ दिला आहे. आंबेडकरांच्या विकासनीतीत शेती आणि उद्योग यांच्यातील समतोलाला विशेष महत्त्व देण्यात आले होते. शेतीतील अतिरिक्त मनुष्यबळ औद्योगिक क्षेत्रात वळवून उत्पादनक्षमतेत वाढ साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. यामुळे ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होऊन व्यापक आर्थिक प्रगती साधता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आत्मनिर्भरतेवर आधारित अर्थनीती ही आंबेडकरांच्या विचारांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे सांगताना, देशाच्या संसाधनांचा योग्य वापर करून स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था उभी करणे हे त्यांचे ध्येय होते, असे डॉ. मोरे यांनी नमूद केले. आर्थिक लोकशाहीच्या संकल्पनेवर विशेष भर देताना डॉ. मोरे यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाला समान आर्थिक संधी मिळणे, उत्पन्नातील विषमता कमी करणे आणि संसाधनांवर सर्वांचा समान हक्क सुनिश्चित करणे हीच खरी लोकशाही आहे. यासाठी आंबेडकरांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्य समाजवादाच्या माध्यमातून महत्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण आणि सार्वजनिक नियंत्रण यावर त्यांनी भर दिला. मोठ्या उद्योगांमधून निर्माण होणारा नफा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी सरकारची भूमिका निर्णायक असावी. याचबरोबर संपत्ती व संसाधनांचे संतुलित वितरण, सामाजिक न्याय आणि आर्थिक समता यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समतोल साधणारी मिश्र अर्थव्यवस्था हीच आंबेडकरांची विकासाची दिशा असल्याचेही त्यांनी सांगितले. आज बेरोजगारी, वाढती विषमता, ग्रामीण-शहरी दरी इत्यादी आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची विकासनीती अधिकच महत्त्वाची ठरते. सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवणारे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे डॉ. मोरे यांनी नमूद केले.

सहायक संचालक अविनाश भाले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांचे इतक्या सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत केलेले सादरीकरण हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. अर्थशास्त्रासारखा गुंतागुंतीचा विषयही सामान्य वाचकाला सहज समजेल, अशा पद्धतीने मांडताना लेखकाने बाबासाहेबांच्या विचारांची मूळ गाभा जपला आहे. विशेषतः शेती व औद्योगिक विकासाचा परस्परसंबंध, संशोधनातील बाबासाहेबांची प्रागतिक दृष्टी, ‘लोकल टू ग्लोबल’ असा व्यापक दृष्टिकोन आणि आजच्या धोरणांशी साधलेली सांगड हे या पुस्तकाचे महत्त्वपूर्ण पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, समावेशकता (Inclusivity) आणि शाश्वतता (Sustainability) हे बाबासाहेबांच्या विकासनीतीचे केंद्रस्थान असून, त्यांची अंमलबजावणी आजच्या परिस्थितीतही शक्य आहे, असा स्पष्ट दृष्टिकोन या पुस्तकातून सामोरा येतो.

लेखक डॉ. प्रकाश कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील अर्थशास्त्रज्ञ हा महत्त्वाचा पैलू समाज आणि अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिला असून, तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले. बाबासाहेबांचे अर्थशास्त्रीय संशोधन, भारताच्या नियोजन प्रक्रियेतले योगदान, वित्तीय समतोल, चलनव्यवस्था, रिझर्व्ह बँकेची संकल्पना, तसेच शेती व औद्योगिक विकासाचा समन्वय या सर्व बाबी आजच्या समस्यांवरही प्रभावी उपाय सुचवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक विषमता, बेरोजगारी, गरिबी यांसारख्या प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांत दडलेली आहेत, या विश्वासातूनच उपलब्ध विस्तृत साहित्याचा अभ्यास करून ते सोप्या आणि सुबोध पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे आपण केल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. महादेव देशमुख म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांची सुस्पष्ट, संक्षिप्त आणि संदर्भाधारित मांडणी हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहेअवघ्या १५२ पृष्ठांच्या या पुस्तकात २५ प्रकरणांद्वारे आंबेडकरांचे व्यापक आर्थिक तत्त्वज्ञान प्रभावीपणे उलगडले असून, संशोधनासाठी केवळ समस्या मांडण्यापेक्षा तिचे उपाय सुचवण्याची बाबासाहेबांची दृष्टी विशेष अधोरेखित होते. चलननीती, वित्तीय स्थैर्य, स्वायत्त संस्थांची गरज, तसेच, “रुपयाची समस्याआणि “लहान जमिनींचा प्रश्न आणि त्यावरील उपाययांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. समावेशक व मानवी चेहऱ्याचा विकास, शिक्षण-आरोग्य-उपजीविका यांवर आधारित मानवी विकास निर्देशांकाचे महत्त्व आणि बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतीपासून सेवा क्षेत्राकडे झालेला प्रवास या सर्व बाबींचा संदर्भ देत, आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त ठरते, असा निष्कर्ष त्यांनी मांडला.

यावेळी डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सिद्धांत माने यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, डॉ. एल.एन. घाटगे, ए.बी. कांबळे, आनंद खामकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, 12 April 2026

शिवाजी विद्यापीठाची स्वप्नाली मगदूम ‘यंग स्कॉलर’ स्पर्धेत देशात प्रथम

अमेरिकेतील परिषदेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

स्वप्नाली मगदूम



स्वप्नाली मगदूम हिचे भूगोल अधिविभागात अभिनंदन करताना डॉ. सचिन पन्हाळकर. सोबत शिक्षक, संशोधक आदी.


कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील एम.एस्सी. जिओइन्फॉर्मेटिक्स प्रथम वर्षात (M.Sc. I) शिकणाऱ्या स्वप्नाली मगदूम या विद्यार्थिनीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन आधारित आणि जीआयएस (GIS) क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी संस्था असलेल्या 'एसरी' (ESRI) च्या भारतीय शाखेतर्फे आयोजित 'यंग स्कॉलर' स्पर्धेत स्वप्नालीने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.

'एसरी' या जागतिक संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील विविध देशांमधून प्रत्येकी एका गुणवंत विद्यार्थ्याची 'यंग स्कॉलर' म्हणून निवड केली जाते. २०२६ वर्षासाठी जगभरातून निवडल्या गेलेल्या अशा ७० तरुण संशोधकांमध्ये स्वप्नाली मगदूम हिने आपले स्थान निश्चित केले आहे. या निवडीमुळे तिला जुलै महिन्यात सॅन डिएगो, कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे आयोजित होणाऱ्या 'ग्लोबल एसरी युझर कॉन्फरन्स' मध्ये सहभागी होण्याचे अधिकृत आमंत्रण मिळाले आहे. या जागतिक व्यासपीठावर ती भारताचे प्रतिनिधित्व करेल.

स्वप्नालीने या स्पर्धेसाठी 'Smart FloodGuard: A Mobile and IoT Based Real Time Flash Flood Monitoring, Early Warning, and Evacuation System’ या विषयावर आपले संशोधन सादर केले होते. अचानक येणाऱ्या महापुराचे रिअल टाइम मॉनिटरिंग करणे, त्याबद्दल पूर्वसूचना देणे आणि आपत्ती काळात सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचवणे, अशी अत्याधुनिक यंत्रणा तिने विकसित केली आहे. मोबाईल ॲप आणि आयओटी (IoT) तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ही प्रणाली आपत्ती व्यवस्थापनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

स्वप्नालीच्या या यशामागे तिची जिद्द आणि भूगोल विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी तिला भूगोल अधिविभागप्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. अभिजित पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विद्या चौगुले, डॉ. सुधीर पवार आणि शुभम गिरीगोसावी यांचे तांत्रिक व शैक्षणिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आधुनिक जिओस्पॅशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला.

विद्यापीठासाठी अभिमानास्पद

विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी स्वप्नालीचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

"जगातील निवडक ७० स्कॉलर्समध्ये स्थान मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने थेट अमेरिकेतील परिषदेमध्ये स्थान प्राप्त करणे, ही बाब शिवाजी विद्यापीठासह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे," अशा शब्दांत प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.


Friday, 10 April 2026

शिवाजी विद्यापीठात ‘सुरण’ फुलले

बॉटेनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ फूल पाहण्याची निसर्गप्रेमींना संधी

 

शिवाजी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये फुललेल्या सुरणाची पाहणी करताना ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस.आर. यादव. सोबत डॉ. सावलीराम घाणे व डॉ. संतोष जयागौडर

शिवाजी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये फुललेल्या सुरणाची माहिती देताना ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस.आर. यादव.

दुर्मिळ व आकर्षक सुरणाचे फूल

दुर्मिळ व आकर्षक सुरणाचे फूल


(विद्यापीठात उमललेल्या सुरण फुलाची माहिती देताना डॉ. एस.आर. यादव (व्हिडिओ))


कोल्हापूर, दि. १० एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये सुरण (Amorphophallus paeoniifolius) या वनस्पतीला फुलोरा आला असून निसर्गप्रेमी आणि वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष संधी आहे. “एलीफंट फूट याम” किंवा मृतदेहासारखा वास येणारे फूल म्हणून “कॉर्प्स फ्लॉवर” नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा फुलोरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस.आर. यादव यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, सामान्यपणे मान्सूनपूर्व काळात फुलणाऱ्या या वनस्पतीचे फूल आकाराने मोठे असते. त्यातून येणारा तीव्र दुर्गंध हा सडलेल्या मांसासारखा वाटतो. ही वनस्पती प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशिया आणि भारतातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते. स्थानिक पातळीवर “सुरण” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचे कंद खाद्य म्हणून वापरले जाते; मात्र तिचा फुलोरा हा काही वर्षांतून एकदाच घडणारे अतिशय देखणे नैसर्गिक दृश्य असते.

ही वनस्पती उत्क्रांतीतील एक अत्यंत रोचक उदाहरण आहे. ती सडलेल्या सेंद्रिय पदार्थासारखा वास निर्माण करून विशिष्ट परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करते, ज्यामुळे गर्दीच्या परिसंस्थेतही तिचे परागीभवन सुनिश्चित होते. विशेषतः माश्या आणि भुंगे (beetles) हे या वनस्पतीचे मुख्य परागीभवन करणारे घटक आहेत.

या फुलरचनेत मोठ्या, लहरी, जांभळट-तपकिरी रंगाच्या “स्पेथ” (spathe) नावाच्या आवरणात मध्यभागी मांसल “स्पॅडिक्स” (spadix) असतो. पूर्ण फुलोऱ्यात हे फूल साधारणपणे २ ते ३ फूट उंच वाढते, त्यामुळे ते अत्यंत आकर्षक दिसते. या फुलोऱ्याचा कालावधी अत्यंत मर्यादित असून ते साधारणतः २४ ते ४८ तासांपर्यंतच टिकते. त्यानंतर स्पॅडिक्स हळूहळू कोमेजू लागतो.

शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र विभाग पश्चिम घाटातील दुर्मिळ व संकटग्रस्त वनस्पतींच्या संवर्धनासाठी ओळखला जातो. संशोधकांसाठी हा फुलोरा अरासी (Araceae) कुलातील वनस्पतींच्या प्रजननशास्त्र आणि परागीभवन प्रक्रियेचा अभ्यास करण्याची एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देतो.

सध्या हे फूल पूर्ण बहरात असून इच्छुक विद्यार्थी व नागरिकांना विद्यापीठाच्या लीड बॉटॅनिकल गार्डनमध्ये ते पाहता येईल. आठवड्याच्या अखेरपर्यंत हा फुलोरा ओसरण्याची शक्यता आहे.

यावेळी डॉ. यादव यांच्यासमवेत डॉ. सावलीराम घाणे आणि कर्नाटक विद्यापीठाचे डॉ. संतोष जयागौडर होते.

माणूस म्हणून मान्यतेसाठीच बाबासाहेबांकडून धम्मस्वीकार: प्रा. सुकुमार कांबळे

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे. 

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे. 


(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



 

कोल्हापूर, दि. १० एप्रिल: माणूस म्हणून जगायचे असेल, तर बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही या जाणीवेतून आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन आज प्रा. कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मचिंतन या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

प्रा. सुकुमार कांबळे यांनी आपल्या व्याख्यानात धम्माचे मानवी मूल्य आणि सामाजिक परिवर्तनातील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, प्राचीन काळातील वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था आणि विषमताधिष्ठित रचनेने समाजात माणसाला माणूस म्हणून मान्यता दिली नाही. हीच अन्यायकारक व्यवस्था पालटून टाकण्यासाठी बुद्धांनी “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हा मानवकल्याणाचा मार्ग दिला. सिद्धार्थ गौतम राजघराण्यात जन्माला आले असले तरी त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत सत्य आणि मानवकल्याणाचा शोध घेतला. रोहिणी नदीच्या पाण्यावरून उद्भवलेल्या संघर्षाच्या वेळी त्यांनी युद्धाला विरोध करत शांततामय मार्गाचा आग्रह धरला. “निसर्गाच्या संसाधनासाठी माणसाने माणसाचा जीव घेऊ नये,” हा त्यांचा विचार पुढे बुद्धधम्माच्या तत्त्वज्ञानात दिसून येतो. सिद्धार्थांनी उपवास, तपश्चर्या आणि विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास व चिंतन करून शेवटी माणसाच्या दुःखाचे मूळ ‘तृष्णा’ असल्याचे सांगितले. “अत्त दीप भव” या संदेशातून त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या विवेकबुद्धीने विचार करून जीवन जगण्याचा मार्ग दिला.

ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता, अन्याय आणि विषमता अनुभवली होती. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिरप्रवेश या चळवळींच्या माध्यमातून त्यांनी मूलभूत मानवी हक्कांसाठी लढा दिला. यावेळी आलेल्या विदारक अनुभवातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी नव्या मार्गाची गरज असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले. याच चिंतनातून १९५६ मध्ये त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. हे केवळ धर्मांतर नव्हते, तर सामाजिक क्रांतीचा निर्णायक टप्पा होता. बुद्धधर्म हा विज्ञाननिष्ठ, तर्कसंगत आणि प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणारा आहे. अंधश्रद्धेला स्थान न देता विचारस्वातंत्र्य देतो. त्यामुळे आजच्या काळातही बुद्धधम्म मानवकल्याणासाठीचा अत्यंत उपयुक्त मार्ग आहे.

फुले-शाहू-आंबेडकर या त्रयीच्या विचारांचा एकात्म दृष्टिकोन मांडण्याची आज गरज असल्याचे अधोरेखित करताना अध्यक्षीय मनोगतात डॉ. विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष कार्यातूनच महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांच्या परंपरा विकसनाला बळ लाभले असावे, असे अभ्यासांती माझे मत बनले आहे. शेतकरी हित, स्त्री सन्मान आणि शिक्षण या तीन प्रमुख आधारस्तंभांवर या सर्व महापुरुषांचे कार्य उभे असून, समाजपरिवर्तनाचा हा व्यापक वारसा समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारकार्याचा तुकड्या-तुकड्यांत नव्हे, तर एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या आंबेडकरी संदेशाचा पाया ‘शिक्षण’ असून विद्यार्थ्यांनी विवेकनिष्ठ, चिकित्सक आणि स्वविचारक्षम बनण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Wednesday, 8 April 2026

विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू करावे: वासुदेव कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सत्कार कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक वासुदेव कुलकर्णी. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, भाग्यश्री कासोटे-पाटील, कृष्णात दिवटे आणि डॉ. आलोक जत्राटकर


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सत्कार कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक वासुदेव कुलकर्णी. 

शिवाजी विद्यापीठात प्रकाशन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल भाग्यश्री कासोटे-पाटील यांचा सत्कार करताना वासुदेव कुलकर्णी. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आलोक जत्राटकर, कृष्णा दिवटे


शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करताना वासुदेव कुलकर्णी. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, भाग्यश्री कासोटे-पाटील व कृष्णा दिवटे.


(सत्कार समारंभाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ८ एप्रिल: जीवनात वाचनासारखा अन्य मोठा आनंद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचते व्हावे, ग्रंथांना गुरू करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व संपादक वासुदेव कुलकर्णी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात आयोजित व्याख्यान आणि विशेष सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पुस्तकप्रेमी समूहाचे प्रवर्तक कृष्णा दिवटे प्रमुख उपस्थित होते.

श्री. कुलकर्णी म्हणाले की, आजच्या काळामध्ये माणुसकी शिकविणारे शिक्षण घ्यायला हवे. त्याची नितांत गरज आहे. त्यासाठी माणसाने सतत शिकत रहावे. शिकण्याची जिद्द मनात ठेवून विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या मातीशी जोडून राहिले पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगून वाचनसंस्कृती टिकविण्याचे काम आपणच केले पाहिजे.

या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या 'ब्लकॅ व्हाईट अन् ग्रे' आणि 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकांना अनुक्रमे महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा ईश्वरपूर) आणि मारोतराव नारायणे प्रतिष्ठान, वर्धा या महाराष्ट्रातील नामांकित साहित्य संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्याबद्दल त्यांचा श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, भाग्यश्री प्रकाशनाच्या संचालिका भाग्यश्री कासोटे-पाटील यांचा प्रकाशन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. आलोक जत्राटकर म्हणाले, आजच्या काळातील प्रश्नांना विद्यार्थ्यांनी स्वच्छ हेतूने आणि निर्भयतेने भिडले पाहिजे. सभोवतालच्या विविध गोष्टींचे सूक्ष्म आकलन करून त्याविषयी आपण लिहीते राहिले पाहिजे. सतत वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे.

भाग्यश्री कासोटे-पाटील यांनी आपल्या प्रकाशन वाटचालीमधील अनुभव कथन केले आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या नव्या वाटा शोधून वाटचाल केली पाहिजे, असे सूचित केले. कृष्णा दिवटे यांनी आपल्या मनोगतामधून वाचन संस्कृती चळवळीविषयी अनुभवकथन करताना आजच्या काळात वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी मराठी अधिविभागातील एम..भाग एकमधील मृण्मयी पांचाल, विमल मोरे, संशोधक विद्यार्थिनी गौरी कुंभार यांचा विशेष प्राविण्याबद्दल सत्कार करण्यात आला.

अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्योती वराळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.