Wednesday, 15 January 2025

डॉ. जयसिंगराव पवार यांचा कोल्हापूरचा इतिहास प्रकल्प महाराष्ट्रासाठी पथदर्शक: प्रा. रंगनाथ पठारे

 कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक इतिहास खंडाचे विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात डॉ. जयसिंगराव पवार संपादित 'कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक' या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) डॉ. पवार, प्रा. रंगनाथ पठारे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


शिवाजी विद्यापीठात डॉ. जयसिंगराव पवार संपादित 'कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक' या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलताना प्रा. रंगनाथ पठारे. मंचावर (डावीकडून) डॉ. पवार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात डॉ. जयसिंगराव पवार संपादित 'कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक' या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलताना प्रा. रंगनाथ पठारे.




(ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १५ जानेवारी: डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रुपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरुपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक तथा ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू साहित्यमालेअंतर्गत संपादित केलेल्या कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक या कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन प्रा. पठारे यांच्या हस्ते आज करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्रा. पठारे म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी या ग्रंथाच्या रुपाने कोल्हापूरचा अनेक दृष्टींनी वेध घेता येईल, असा ऐवज निर्माण केला आहे. कोणत्याही ठिकाणाचा इतिहास जतन करण्याचे काम हे खूप महत्त्वाचे असते. शासनाकडून गॅझेटियरच्या स्वरुपात अशा स्वरुपाचे दस्तावेजीकरण होत असते. मात्र, डॉ. पवार यांनी गॅझेटियरच्या मर्यादेपलिकडे जाऊन इतिहासाचा साकल्याने वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या अशा नेटक्या नोंदी कोणत्याही सृजनशील लेखकासाठी, अभ्यासकासाठी किंवा कोणत्याही विचारी माणसासाठी उपलब्ध असणे ही मोलाची बाब असते. त्या दृष्टीने हे काम अमूल्य स्वरुपाचे आहे.

प्रा. पठारे पुढे म्हणाले, इतिहासापासून धडा घेऊन पुढे जाण्याची भूमिका सजग समाजाने घ्यायला हवी. जातीपातीच्या अथवा कोणत्याही भेदांच्या पलिकडला विचार त्यामध्ये केला जायला हवा. इतिहास जतन करण्याची आपली परंपरा नाही. मुस्लीम चढायांनंतर आपण खबरींच्या आधारावर बखरी लिहिल्या. वस्तुनिष्ठ नोंदी त्यानंतरच्या कालखंडात करण्यात येऊ लागल्या. खरे तर इतिहास नोंद करीत असताना त्यात पक्षपात असता कामा नये. प्रत्यक्षात मात्र इतिहास एक तर जेत्यांच्या नोंदींचा असतो किंवा कोणत्या तरी एका बाजूला झुकलेला असतो. डॉ. पवार यांनी मात्र आपल्या इतिहास लेखनामध्ये निष्पक्षपाती नोंदींना, वस्तुनिष्ठतेला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. हे त्यांचे इतिहास लेखनाला फार मोठे योगदान आहे.

प्रास्ताविकामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहास लेखनामागील इतिहास थोडक्यात विषद केला. तसेच या प्रकल्पाचे महत्त्वही स्पष्ट केले. ते म्हणाले, वीस वर्षांपूर्वी अरुण टिकेकर यांनी पुणे शहराचा साद्यंत इतिहास दोन खंडांत लिहीला. तो पाहिल्यानंतर अशा स्वरुपाचे काम कोल्हापूरच्या इतिहासाच्या संदर्भातही करता येणे शक्य असल्याची जाणीव झाली. सन २००५मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी अशा स्वरुपाचे काम आपण हाती घ्यावे, अशी सूचना केली. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी त्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यामधून हा प्रकल्प साकार होतो आहे, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. पवार पुढे म्हणाले, कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक या खंडामध्ये कोल्हापूरच्या सुमारे २५०० वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विविध विषयतज्ज्ञांनी १७ लेखांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासासह प्राकृतिक इतिहासाचाही वेध घेतला आहे. यामध्ये ब्रह्मपुरी, करवीर नावाची व्युत्पत्ती, कोल्हापूरचे कोट, जिल्ह्यातील किल्ले, शिवकाळ, महाराणी ताराबाई, करवीरकर महाराणी जिजाबाई, १८५७ चा स्वातंत्र्यलढा आणि चिमासाहेब महाराज, करवीर रियासत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती घराण्यातील कुलाचार, संस्थानातील स्वातंत्र्यलढा, कोल्हापूर भूगोल, वनस्पतीसंपदा, प्राणिसंपदा आणि पक्षीसंपदा या विषयांवरील लेखांचा समावेश सदर खंडात आहे. यापुढील खंडांमध्ये साहित्य, सामाजिक आणि कृषी, उद्योग व सहकार या विषयांच्या इतिहासाचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी डॉ. पवार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. आप्पासाहेब पवार यांचे डॉ. जयसिंगराव पवार हे विद्यार्थी असून आप्पासाहेबांच्या विचार व कार्याचा वसा आणि वारसा अत्यंत जबाबदारीने त्यांनी आपल्या खांद्यावर वाहिला आहे. सन २००७ पासून आजतागायत विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणून सेवाभावी पद्धतीने ते कार्यरत आहेत. कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासाचे काम अधिक गतीने मार्गी लागण्यासाठी डॉ. पवार यांनी त्यांचा आराखडा तयार करून विषयतज्ज्ञांची निवड करावी आणि त्यांच्या लेखन जबाबदाऱ्यांचेही वाटप करावे, अशी सूचना त्यांनी केली. डॉ. पवार यांनी पहिल्या खंडासाठी लिहीलेल्या अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रस्तावनेचे विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानाचे आणि त्या अभियानाअंतर्गत इतिहास वाचनसंस्कृती विकासामधील डॉ. पवार यांच्या साहित्याचे महत्त्व विषद केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कोल्हापूर शहरातील अनेक मान्यवर, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 14 January 2025

विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविणे ही ‘ग्लोबल’ काळाची गरज: डॉ. अरूण पाटील

 

शिवाजी विद्यापीठात विद्या परिषद सदस्यांसाठी आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अरूण पाटील. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात विद्या परिषद सदस्यांसाठी आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी  ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अरूण पाटील यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: विद्यार्थ्यांना पदवीच्या पलिकडे भावनिकदृष्ट्या सजग आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनविणे ही आजच्या ग्लोबल काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारतातील तीन खाजगी विद्यापीठांचे माजी कुलगुरू तथा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अरूण पाटील यांनी काल (दि. १३) येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषद सदस्यांसाठी डॉ. पाटील यांचे करिक्युलम एनरिचमेंट या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. अरूण पाटील म्हणाले, भारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सर्वदूर चर्चा आहे. कालसुसंगत अभ्यासक्रमांची निर्मिती, विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य प्रदान, त्यामधून रोजगाराभिमुख पिढीची निर्मिती आणि अशा पिढीचा राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सकारात्मक सहभाग ही उद्दिष्ट्ये त्यामागे आहेत. जगभरातील विद्यापीठांनी अशा प्रकारचे शैक्षणिक धोरण खूप आधीपासूनच स्वीकारले आहे. शिक्षकांना काय शिकवायचे आहे, यापेक्षा विद्यार्थ्यांना काय शिकायचे आहे, त्यांच्या शैक्षणिक, संशोधकीय गरजा काय आहेत आणि त्या कशा भागविता येतील, या दिशेने या समग्र शिक्षणाची दिशा केंद्रित झालेली आहे. भारतीय शिक्षण व्यवस्था जितक्या लवकर अशा प्रकारचा दृष्टीकोण अंगिकृत करेल, तितके ते हिताचे आहे.

डॉ. पाटील पुढे म्हणाले, भारत आज सर्वाधिक तरुणांचा देश आहे. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र, या लोकसंख्येकडे आधुनिक अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा मात्र अभाव आहे. त्यामुळे देशातील एकूण पदवीधारकांपैकी अवघे ५१ टक्के पदवीधारक रोजगारपात्र आहेत. या पार्श्वभूमीवर, रोजगाराभिमुखता, उद्योगाभिमुखता या तर सार्वत्रिक गरजा आहेत. त्यांची प्रतिपूर्ती शैक्षणिक क्षेत्राला करावीच लागेल. पण ती करीत असताना शैक्षणिक संस्था, विद्यापीठे केवळ पदवी प्रदान करणाऱ्या व्यवस्था असता कामा नयेत, तर त्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धात्मकता विकसित करण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी भावी पिढी ही भावनिकदृष्ट्या सजग, नैतिकदृष्ट्या जबाबदार आणि प्रभावी संवादकौशल्यांनी युक्त बनण्यासाठी त्यांना पोषक असे वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्राचीच आहे. ती या क्षेत्रातील धुरिणांनी उचलण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सुमारे दोन तासांहून अधिक चाललेल्या व्याख्यानामध्ये डॉ. पाटील यांनी केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक परिप्रेक्ष्यातून शिक्षण क्षेत्राच्या सद्यस्थितीचा वेध घेतला आहे. भारतीय विद्यापीठांनी आपल्या वाटचालीची दिशा काय ठेवली पाहिजे, या दृष्टीने त्यांनी केलेले मार्गदर्शन मौलिक स्वरुपाचे ठरणारे आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्वच घटकांना आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलेले आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सर्व घटकांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळे विभागाने उपकुलसचिव डॉ. संजय कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

 

गायिका साधना शिलेदार यांच्याकडून

संत तुकारामांच्या निवडक अभंगांना स्वरसाज

शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाची कामगिरी; १६ जानेवारीला गायनासह होणार प्रकाशन


डॉ. साधना शिलेदार


कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: महाराष्ट्राची वारकरी परंपरा आपल्या बहुप्रसवी वाणीने समृद्ध करणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आजवर संगीतबद्ध न केलेल्या काही निवडक अभंगांना संगीतबद्ध करून रसिकांना सादर करण्याची कामगिरी शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाने बजावली आहे. विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षान्त समारंभानिमित्त १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात या विशेष चित्रफीत-ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन आणि सुप्रसिद्ध गायिका डॉ. साधना शिलेदार यांचे गायनही आयोजित केले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम यांच्या अनेक अभंगरचनांवर अनेक नामवंत गायक-गायिकांनी स्वरसाज चढविला आहे. त्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियही आहेत. मात्र, त्याचवेळी तुकाराम महाराजांच्या अनेक रचनांवर अद्याप सांगितिक स्वरसाज चढविण्यात आलेला नाही. अशा दहा निवडक अभंग रचना  स्वरबद्ध करण्याचे काम अध्यासनामार्फत करण्यात आले. सुप्रसिद्ध गायिका डॉ. साधना शिलेदार यांनी त्यांचे गायन केले आहे. त्याचप्रमाणे या रचना त्यांच्यासह श्रीकांत पिसे, राहुल एकबोटे, संकेत नागपूरकर, दीपश्री पाटील या संगीतकारांनी संगीतबद्ध केल्या आहेत. तुकोबांची अभंगवाणीया नावाने असलेल्या या चित्रफीत व ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन येत्या १६ जानेवारी रोजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षान्त समारंभाचे औचित्य साधून १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संत तुकाराम अध्यासन आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये डॉ. साधना शिलेदार यांचा विशेष गायन कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी या अभंगवाणीमधील रचना सर्वप्रथम त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची संधी रसिकांना या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमास निवेदक म्हणून सांगोल्याचे ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत तुकाराम यांच्या अभंगांच्या नवरचनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन डॉ. मोरे यांच्यासह डॉ. रणधीर शिंदे आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे.

 

शिवाजी विद्यापीठाचा ग्रंथ महोत्सव यंदा विस्तार इमारत परिसरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव यंदा विस्तार इमारत परिसरात भरविण्यात येणार आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेली स्वागत कमान.



शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव यंदा विस्तार इमारत परिसरात भरविण्यात येणार आहे. या ठिकाणी ग्रंथ विक्रेत्यांसाठी स्टॉल उभारणीचे काम सुरू आहे.



कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारा ग्रंथ महोत्सव या वर्षापासून मुख्य प्रशासकीय इमारत आणि विस्तार (अनेक्स) इमारत यांमधील मोकळ्या प्रांगणात १६ व १७ जानेवारी २०२५ असा दोन दिवस भरविण्यात येणार आहे, अशी माहिती बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक तथा ग्रंथ महोत्सव समन्वयक डॉ. धनंजय सुतार यांनी दिली आहे.

डॉ. सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर वर्षी दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित करण्यात येणारा ग्रंथ महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहासमोरील आंबा बागेमध्ये भरविण्यात येत असे. तथापि, ग्रंथ महोत्सवासाठी होणाऱ्या गर्दीमुळे बागेमधील झाडांना इजा पोहोचू नये, यासाठी या वर्षीपासून तो विस्तार (अनेक्स) इमारतीच्या प्रांगणात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार, शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षांत समारंभानिमित्त सलग १८ व्या वर्षी 'ग्रंथमहोत्सव २०२५'चे आयोजन दिनांक १६ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. महोत्सवात नामवंत भारतीय तसेच विदेशी कंपन्यांचे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजीटल ग्रंथ वितरक सहभागी होणार आहे. तात्पुरती उपाहारगृहेही तेथे असतील. महोत्सवात साधारण ४० स्टॉल असतील.

ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने १६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. राजारामपुरीतील कमला महाविद्यालयापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ होईल. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथपालखीच्या पूजनाने दिंडीचे उद्घाटन होईल. कमला महाविद्यालयापासून राजारामपुरीमार्गे आईचा पुतळा, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठाचे गेट क्र. ८ आणि  तेथून राजमाता जिजाऊ साहेब सभागृहातील दीक्षान्त सभा मंडपामध्ये आगमन आणि  विसर्जन असा दिंडीचा मार्ग असेल. दिंडीनंतर सकाळी १०.०० वाजता ग्रंथ महोत्सवाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. ग्रंथ महोत्सव १६ व १७ जानेवारी असा दोन्ही दिवस सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर ११ वाजता संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तुकोबांची अभंगवाणी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर ग्रंथ महोत्सव आणि त्या निमित्त आयोजित ग्रंथ दिंडी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. धनंजय सुतार यांनी केले आहे.

Monday, 13 January 2025

विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये ‘एक तास वाचनाचा’ उपक्रम

 

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात 'एक तास वाचनाचा' उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर, कविता वड्राळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात 'एक तास वाचनाचा' उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

 

कोल्हापूर, दि. १३ जानेवारी: महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात एक तास वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद लाभला.

साहित्यातील अतिशय महत्त्वाचे अंग म्हणजे वाचनसंस्कृती. अधिकाधिक लोकापर्यंत वाचनसंस्कृती पोहोचावी, या भावनेतून महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचावीत व वाचनसंस्कृती दृढ व्हावी, या एका उद्देशाने शुक्रुवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये एक तास वाचनाचाउपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या आवडीची पुस्तके वाचली. या पुस्तकांचे रसग्रहण लिहून दिल्यानंतर त्यातून तीन क्रमांक काढले जाऊन हॉस्टेल डे कार्यक्रमात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले. अधीक्षक प्रा. कविता वड्राळे, नाईट वार्डन सुनिता पावर, शिला सोनवणे, विद्या माने, वंदना पाटील व वसतिगृहातील विद्यार्थिनी उपक्रमास उपस्थित होत्या.

शिवाजी विद्यापीठात ‘रंग-संगीत’ कार्यशाळा उत्साहात

 


(उपरोक्त दोन छायाचित्रांसाठी ओळ) शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आयोजित 'रंग-संगीत' कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. साईश देशपांडे.

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आयोजित 'रंग-संगीत' कार्यशाळेत विद्यार्थ्यांकडून नाट्य प्रात्यक्षिके करवून घेताना डॉ. साईश देशपांडे.



कोल्हापूर, दि. १३ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये "रंग-संगीत: प्रस्तावना व परिचय" ही नाट्य व संगीतविषयक दोन दिवसीय कार्यशाळा डॉ. साईश देशपांडे (गोवा) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात पार पडली.

संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात दि. ९ व १० जानेवारी असे दोन दिवस संगीत व नाटकांचे गाढे अभ्यासक तथा तज्ज्ञ मार्गदर्शक असलेल्या श्री. देशपांडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना  प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. अभिनय करत असताना नाटकामध्ये संगीताचा वापर कसा करावा, संगीताचे महत्त्व, शारीरिक हालचालीतून, संवादातून संगीत कसे निर्माण होते, पार्श्वसंगीताचा आधार कसा घ्यावा, स्वर, आवाजाची पट्टी, लय, ताल या मूलभूत सांगितिक घटकांनुसार संवादाचे सादरीकरण, उच्चारण कसे असावे, इत्यादी अनेक घटकांच्या अनुषंगाने डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवस चार सत्रांत झालेल्या चाललेल्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन सत्रात अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूर-देसाई यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. रविदर्शन कुलकर्णी यांनी परिचय करुन दिला. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील डॉ.संजय तोडकर दिग्दर्शित "भाऊबंदकी" नाटकातील यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यशाळेच्या अखेरीस डॉ. राजश्री खटावकर यांनी आभार मानले.

 

Monday, 6 January 2025

विद्यापीठातील कट्ट्यांनी पुन्हा अनुभवले ‘वाचणारे’ विद्यार्थी!

 सामूहिक वाचन उपक्रमाला वाचकांचा मोठा प्रतिसाद; कुलगुरूंचाही सहभाग


'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात 'एक तास सामूहिक वाचनासाठी' हा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी आपापल्या आवडीची पुस्तके वाचत बसलेले वाचक विद्यार्थी-विद्यार्थिनी.

'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात 'एक तास सामूहिक वाचनासाठी' हा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी आपापल्या आवडीची पुस्तके वाचत बसलेले वाचक विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात 'एक तास सामूहिक वाचनासाठी' या उपक्रमांतर्गत पुस्तक वाचन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

शिवाजी विद्यापीठात 'एक तास सामूहिक वाचनासाठी' या उपक्रमांतर्गत पुस्तक वाचन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह (डावीकडून) डॉ. धनंजय सुतार, डॉ. महादेव देशमुख, डॉ. विलास शिंदे, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि डॉ. शरद बनसोडे.

शिवाजी विद्यापीठात 'एक तास सामूहिक वाचनासाठी' या उपक्रमांतर्गत पुस्तक वाचन करताना एक शिक्षक

'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात 'एक तास सामूहिक वाचनासाठी' हा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी आपापल्या आवडीची पुस्तके वाचत बसलेले वाचक विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात 'एक तास सामूहिक वाचनासाठी' या उपक्रमांतर्गत पुस्तक वाचन करताना एक शिक्षक

(सामूहिक वाचन उपक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ६ जानेवारी: एक रम्य सायंकाळ... मावळतीकडे झुकणारी सूर्यकिरणे... निसर्गरम्य उद्यान... त्या उद्यानातील कट्ट्यांवर बसून आपल्या आवडीची पुस्तके वाचणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी... ऑनलाईन लर्निंग आणि ई-बुक्सच्या जमान्यामध्ये दुर्मिळ होऊ घातलेले हे दृश्य आज पाहायला मिळाले ते शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानामध्ये! निमित्त होते महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवड्यानिमित्त विद्यापीठाने आयोजित केलेल्या एक तास सामूहिक वाचनासाठी या उपक्रमाचे!

महाराष्ट्र शासनाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा वाचनविषयक विशेष पंधरवडा राज्यभरात साजरा करण्याविषयी कळविले आहे. त्याअंतर्गत अनेकविध उपक्रम शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालये आणि अधिविभागांतही आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी विद्यापीठातील सर्व घटकांसाठी एक तास सामूहिक वाचनाचा असा एक उपक्रम आयोजित करण्याबाबत ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांना सूचित केले होते. त्यानुसार आज सायंकाळी विद्यापीठातील अधिकारी, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी सामूहिक वाचन उपक्रम बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानामध्ये आयोजित करण्यात आला.

कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी सायंकाळी चार वाजता आपापल्या आवडीची पुस्तके घेऊन उद्यानात जमले. उद्यानातील सर्व कट्टे त्यांनी भरून गेले. अपेक्षेपेक्षा अधिक वाचक आल्याने परिसरात खुर्च्या मांडूनही बसण्याची व्यवस्था ज्ञानस्रोत केंद्राकडून करण्यात आली. ऐनवेळी उपस्थित झालेल्या वाचकांसाठी ग्रंथालयातील पुस्तके मोफत उपलब्ध करण्याची सुविधाही देण्यात आली.

यावेळी वाचकांनी बहुविध विषयांच्या पुस्तकांची निवड वाचनासाठी केल्याचे दिसून आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शांता शेळके यांचे वडीलधारी माणसे, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचे विकासाचे यशवंतयुग तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी सूर्यकांत मांढरे यांचे कोल्हापुरी साज हे पुस्तक वाचले. साहित्यिक कथा, कादंबऱ्या, कविता यांखेरीज चरित्रात्मक आणि प्रेरणादायी पुस्तके वाचण्याकडे युवा वाचकांचा कल असल्याचे दिसून आले.

या उपक्रमानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक चर्चा करताना आपण वाचलेल्या पुस्तकाविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुस्तकवाचनाला प्राधान्य द्यावे, वाचनाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहावी, यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत वाचलेल्या पुस्तकांविषयी अधिविभाग स्तरावर रसग्रहण लेखन आणि कथन स्पर्धा घेण्यात येणार असून २६ जानेवारी रोजी विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात येणार असल्याचे समारोप प्रसंगी डॉ. धनंजय सुतार यांनी सांगितले. चहापानाने उपक्रमाची सांगता झाली.