Wednesday, 2 September 2026

बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर

विद्यापीठात वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, सुचेता कोरगांवकर, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. माणिकराव साळुंखे आणि डॉ. अतुल कापडी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर. समोर मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर व श्रोते.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात विविध ग्रंथ व विशेषांकांचे  कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. सुनीलकुमार लवटे, सुचेता कोरगांवकर, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. विजय चोरमारे, चंद्रकांत पोतदार, नीलम माणगावे, डॉ. सागर देशपांडे, अखिल मेहता आणि डॉ. रणधीर शिंदे.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)





कोल्हापूर, दि. २ सप्टेंबर: मानवी जीवनातील नैतिक द्वंद्व, स्त्री-पुरुष संबंध, सामाजिक विषमता, शिक्षणाचे उद्दिष्ट आणि शोषणमुक्त समाजाची आकांक्षा यांचा वेध घेणारे, वि. स. खांडेकरांचे साहित्य आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतही तितकेच प्रस्तुत आहे. त्यांच्या साहित्याचा गाभा मानवी जीवनाच्या सार्वकालिक प्रश्नांशी जोडलेला असल्याने नव्या पिढीने खांडेकरांना केवळ अभ्यासक्रमापुरते न पाहता त्यांच्या साहित्याचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्षाच्या सांगता समारंभात ‘वि. स. खांडेकर : सुवर्ण स्मरण’ या विषयावर विशेष स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सुनीलकुमार लवटे, खांडेकरांचे नातू डॉ. अतुल कापडी प्रमुख उपस्थित होते.

खांडेकरांच्या ‘ययाती’ची आजची प्रस्तुतता १९६०च्या दशकापेक्षाही अधिक असल्याचे सांगताना डॉ. मुणगेकर यांनी ‘क्रौंचवध’मधील दिनकर-सुलोचना यांच्या नात्यातून शारीरिक वासनेपलीकडील आंतरिक प्रेम, तर ‘ययाती’मधून पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्रीच्या शोषणाचे टोकदार चित्रण खांडेकरांनी केले असल्याचे नमूद केले. मानवी जीवनातील विविध टोकांमधील संघर्ष आणि त्याचा आलेख मांडणारा साहित्यिक म्हणून खांडेकरांचे महत्त्व अधोरेखित होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. मुणगेकर यांनी खांडेकरांच्या विविध साहित्यकृतींच्या आधारे त्यांच्या लेखनातील मानवी जीवनाचा व्यापक पट उलगडला. ते म्हणाले, खांडेकरांच्या साहित्यातून उपभोगवाद, पुरुषप्रधान मानसिकता आणि मानवी वासनेचा संघर्ष, प्रेम, त्याग, नैतिकता आणि हिंसेविषयीची भूमिका आजच्या समाजातील अनेक प्रश्नांशी थेट संवाद साधते. खांडेकर केवळ अलंकारिक भाषेचे साहित्यिक नव्हते, तर मानवी जीवनाचे भाष्यकार होते. जीवनात निर्मळता, सुसंस्कृतपणा, ध्येयनिष्ठा आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, हे त्यांच्या साहित्यामागील मूलभूत स्वप्न होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढेही टिकून राहते.

‘क्रौंचवध’चा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव

क्रौंचवध’मधील दिनकरच्या व्यक्तिरेखेने मला इतके प्रभावित केले की, माझ्या आयुष्याची वाटचालही त्याच मार्गाने व्हावी, अशी इच्छा निर्माण झाली. विद्यार्थीदशेतील त्या साहित्यिक अनुभवाने मला जीवन जगण्याची प्रेरणा दिली. गेल्या पन्नास वर्षांच्या माझ्या जीवनप्रवासात खांडेकरांचे ऋण अग्रस्थानी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते माझ्यावर राहील, अशी कृतज्ञ भावना डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी खांडेकरांचे साहित्य हे केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, तंत्रज्ञानामुळे माणूस अधिक सामर्थ्यवान झाला असला, तरी तो अधिक ‘माणूस’ झाला आहे का, हा प्रश्न आज विचारण्याची गरज असून खांडेकरांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असलेली माणुसकी, नैतिकता, संवेदना, सामाजिक बांधिलकी आणि जीवनदृष्टी आजच्या पिढीला दिशादर्शक ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पदवी नव्हे, तर विचार; केवळ कौशल्य नव्हे, तर विवेक आणि रोजगारासाठीच नव्हे, तर जीवनासाठी शिक्षण देणे, हीच खऱ्या अर्थाने खांडेकरांना आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे शिवाजी विद्यापीठाशी स्थापनेपासूनच अतूट नाते राहिले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून खांडेकरांनी प्रारंभीच्या काळात विद्यापीठाला मार्गदर्शन केले, तर ज्ञानपीठ पुरस्कारानंतर त्यांना मानद डी.लिट. पदवी देणारे महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले. शिवाजी विद्यापीठाने साकारलेले खांडेकरांचे स्मृती संग्रहालय म्हणजे विद्यापीठाने खांडेकरांविषयी जपलेल्या आदरभावाचेच प्रतीक आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही साहित्यिकांच्या प्रत्यक्ष विचारांतून आणि अनुभवांतून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, आज माहिती आणि भाषणे काही क्षणांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होत असली, तरी प्रत्यक्ष दिग्गज साहित्यिकांचे विचार ऐकताना मिळणारा भावनिक आणि मानवी स्पर्श कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकत नाही. खांडेकरांच्या साहित्यात केवळ एका पिढीला नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही घडविण्याची क्षमता असल्याने अशा साहित्यिकांच्या विचारांशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद घडविणारे कार्यक्रम सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.

यावेळी सुचेता कोरगावकर आणि डॉ. अतुल कापडी यांनीही खांडेकरांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला डॉ. शरद नावरे, बी.एस. पाटील, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. अनिल गवळी, चंद्रकांत पोतदार, तनुजा शिपूरकर, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. सागर देशपांडे यांच्यासह शिक्षक, आंतरभारती संस्थेतील शिक्षक व सेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खांडेकरांविषयी ग्रंथचर्चा व विशेषांकांचे प्रकाशन

दिवसभरात झालेल्या सत्रांमध्ये पुणे येथील प्रा. मिलींद जोशी व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वि.स.खांडेकर यांचे असंग्रहित लेखन व त्यांच्याविषयीचे ग्रंथ या विषयीचे सत्र पार पडले. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. या सत्रात वि.स. खांडेकर लिखित वृंदावन (कादंबरी), आगरकर चरित्र, स्मृतींची चाळता पाने (संकीर्ण), अर्ध्यदान (काव्यसंग्रह प्रस्तावना) या ग्रंथांसह आंतरभारती: उगम आणि विकास (लेखक- डॉ. सुनीलकुमार लवटे), कुमारांसाठी वि.स. खांडेकर (ले. नीलम माणगावे), वि.स. खांडेकर: साहित्यिक आणि माणूस (ले. राम देशपांडे), वि.स. खांडेकर चरित्र (ले. डॉ. लवटे), वि.स. खांडेकर: एक ध्येयवादी शिक्षक (ले. जया दडकर) या पुस्तकांचेही प्रकाशन झाले. त्याचबरोबर साप्ताहिक साधना, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जडण-घडण, मेहता ग्रंथजगत या नियतकालिकांच्या खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले.

Monday, 31 August 2026

विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, आकांक्षांचे अभ्यासक्रमात रूपांतर होणे गरजेचे: प्राचार्य अनिल राव

शिवाजी विद्यापीठात एनईपी-२०२०विषयक कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्राचार्य अनिल राव. सोबत (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. अजय साळी, विवेक सिनारे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि डॉ. चेतना सोनकांबळे.


शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राचार्य अनिल राव.

कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित असणारे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी.

(कार्यशाळेची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात उमटून त्यांचे रूपांतर प्रत्यक्ष शिक्षणात झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य, बहुविषयांचे शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, इंटर्नशिप तसेच विविध माध्यमांतून क्रेडिट मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी-२०२०) अंमलबजावणी सर्व स्तरांवर प्रभावीपणे होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या एनईपी-२०२० टास्क फोर्सचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि शिक्षणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिविभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी ‘एनईपी-२०२०ची अंमलबजावणी आणि त्यामधील आव्हाने’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. अजय साळी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनिल राव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना एनईपीच्या विविध पैलूंविषयी त्यांची मते जाणून घेतली. विषय निवडीतील लवचिकता, मल्टिपल एंट्री-एक्झिट, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, सर्वांगीण विकास, कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षण, इंटर्नशिप आणि इंडियन नॉलेज सिस्टिम या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अपेक्षा प्रत्यक्षात आणणे हीच धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीची खरी कसोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एनईपीची अंमलबजावणी करताना विद्यापीठांनी पारंपरिक व कठोर चौकटींपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक लवचिक पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगताना राव म्हणाले, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, ‘कॅफेटेरिया ॲप्रोच’द्वारे विषय निवडीचे स्वातंत्र्य, विविध संस्थांमधून क्रेडिट मिळविण्याची सुविधा, कौशल्य व ऑन-जॉब ट्रेनिंग, अप्रेंटिसशिप, मातृभाषेतून शिक्षण आणि पूर्वज्ञानाला मान्यता अशा संधी विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी अभ्यास मंडळांनी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि बदलत्या जगाच्या गरजा समजून घेऊन अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करावे, तसेच शिक्षक व प्रशासकीय यंत्रणेने मानसिकतेतील पारंपरिक बंधने दूर करून प्रयोगशीलता स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पुणे येथील रेझोनन्स आंत्रप्रिन्युअर अँड एम्प्लॉएबिलिटी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सिनारे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, उच्चशिक्षणाचे लोकशाहीकरण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असून, ते साध्य करण्यासाठी एनईपी-२०२०ची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. उच्चशिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण २०३५ पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांची गळती रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘स्कूल कनेक्ट’सारखे उपक्रम, बहुविषयांचे शिक्षण, मल्टिपल एंट्री-मल्टिपल एक्झिट, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित परीक्षा पद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. एनईपीच्या अंमलबजावणीतील मोठे आव्हान हे केवळ प्रशासकीय नसून मानसिकता, धोरणाची समज आणि विविध संस्थांमध्ये आवश्यक असलेली सुसूत्रता हे आहे. त्यामुळे धोरणकर्ते, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यशाळेपुरते मर्यादित न राहता त्यातील विचार प्रत्यक्ष शैक्षणिक व्यवहारात आणण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही डॉ. कामत यांनी केले.

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी परिचय करून दिला. डॉ. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 29 August 2026

‘वॉक फॉर हेल्थ, वॉक फॉर युनिटी’

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वॉकेथॉन

 

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनला फ्लॅग ऑफने प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.


शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनमध्ये कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी सहभागी झाले.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनमधील विजेत्यांसमवेत कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि अधिकारी, कर्मचारी.


(वॉकेथॉनची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचा क्रीडा अधिविभाग आणि स्पोर्ट्स क्लबतर्फे आज सकाळी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून वॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. ‘फिट इंडिया, ॲक्टिव्ह इंडिया, हेल्दी इंडिया’चा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध वयोगटांतील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दोनशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, मेजर ध्यानचंद जिथे शिकले, ते एल्फिन्स्टन महाविद्यालय समाविष्ट असलेल्या डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचा कुलगुरू होण्याची संधी मला लाभली, याचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाचे स्मरण करत त्यांनी निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि क्रीडाभावना अंगिकारण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वतः कुलगुरूंनी वॉकेथॉनमध्ये सहभागी होत उपस्थितांना प्रोत्साहन दिले. विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले. ‘वॉक फॉर फिटनेस, वॉक फॉर हेल्थ, वॉक फॉर युनिटी’ या संदेशातून आरोग्य, एकता आणि क्रीडाभावनेचा जागर करण्यात आला. ‘एकत्र चालूया, निरोगी राहूया, फिट भारत घडवूया’ हा संदेशही देण्यात आला.

वॉकेथॉनमध्ये प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा विविध गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आली. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले. ४० वर्षांपर्यंत, ४० ते ५० वर्षे आणि ५० ते ६० वर्षे अशा वयोगटांमध्ये स्पर्धा झाली. विविध गट व वयोगटांतील विजेत्यांना कुलगुरू डॉ. कामत, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान करून गौरविण्यात आले.

सुरवातीला कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अजय मराठे यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले. वॉकेथॉनमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. कबीर खराडे, संगणक केंद्र संचालक डॉ. अभिजीत रेडेकर, डॉ. सुभाष कोंबडे, कास्ट्राईबचे आनंद खामकर, डॉ. राजेंद्र रायकर, राष्ट्रीय खेळाडू प्रतीक पाटील, प्रणव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अतुल टोणे, डॉ. सविता भोसले, सुजित नाईक, अजय मराठे, कृष्णात पाटील, संग्रामसिंग मोरे, प्रसाद देसाई, सुनील शिंदे, आकाश पाटील, तौहीद मुल्ला आणि नंदेश यांनी केले.

वॉकेथॉन स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा- लहान गट (मुले): भावेश बिष्ट, राजवीर चौगुले, सर्वज्ञ खोत. लहान गट (मुली): येसू पाटील, पूर्वा गुरव, संस्कृती खंडागळे. मोठा गट (मुले): विक्रम भोसले, ज्योतिबा पाटील, श्रीधर खोत. मोठा गट (मुली): अवंती अवधूत सूर्यवंशी, प्रज्ञा प्रशांत जाधव, स्वरा शैलेश कुलकर्णी. शिक्षकेतर कर्मचारी (४० वर्षांखालील): रोशन पाटील, अभिजीत जाधव, अभिजीत कोठावळे. शिक्षकेतर कर्मचारी (४१ ते ५० वर्षे): प्रशांत जाधव, सतीश हुक्केरी. शिक्षक गट: डॉ. नवनाथ वळेकर, जयप्रकाश पाटील, रवींद्र खैरे. महिला शिक्षक: प्रा. आसावरी कागवाडे, प्रा. दिपाली गवस. शिक्षकेतर कर्मचारी (महिला): सुरेखा अडके. प्रशासकीय अधिकारी: अजित इंगळे. यावेळी वॉकेथॉनमध्ये प्रेरणादायी सहभाग नोंदविल्याबद्दल माजी सैनिक प्रकाश गुरव आणि श्रीमती आसमा बडेखान यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.

शिवाजी विद्यापीठात आयोजित बँकिंगविषयक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक सर्वानन एम.

शिवाजी विद्यापीठात आयोजित बँकिंगविषयक कार्यशाळेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर डॉ. सुभाष कोंबडे, आदित्य व्यास, संध्या शशी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक सर्वानन एम., निलेश गावडे, गुरूदत्त कुलकर्णी, सुरेश शिंदे.

(कार्यशाळेची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: सहकारी बँकिंग क्षेत्र भारताच्या तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. ठेवीदांराचा विश्वास टिकवून ठेवणे आणि बँकेचे भविष्य सुरक्षित करणे हे मजबूत ट्रेझरी मॅनेजमेंट आणि पारदर्शक प्रशासन यांच्यावरच अवलंबून आहे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पर्यवेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक सर्वानन एम. यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट अर्बन बँक्स को-ऑपरेटीव्ह असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर आणि एसटीसीआय प्रायमरी डिलर्स लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवस्थापन विकास कार्यक्रमांतर्गत 'फिक्स्ड इन्कम मार्केट्स इन इंडिया: करंट ट्रेंड्स, थीम्स अँड परस्पेक्टीव्हज् फॉर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वानन एम. बोलत होते.  कुलगुरू डॉ.राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते.

महाव्यवस्थापक सर्वानन म्हणाले, गुंतवणूक धोरणाचे तंतोतंत पालन करणे, अंतर्गत लेखापरीक्षण मजबूत ठेवणे आणि आरबीआयच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हे उच्च प्रशासनाचे मुख्य लक्षण आहे. देशामधील एकूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकांपैकी जास्तीत जास्त बँका महाराष्ट्रात आणि त्यातही कोल्हापूर परिक्षेत्रात विस्तारलेल्या आहेत. भारत सरकारच्या वित्तीय धोरणांमधील सकारात्मक बदल आणि रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे आज भारतीय फिक्स्ड इन्कम मार्केट एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय रोखे बाजार अधिक पारदर्शक आणि त़ंत्रज्ञानस्नेही झाला आहे. जागतिक घडामोडींमुळे बाँड यील्डमध्ये गतिमान बदल होत आहेत. यामध्ये आरबीआय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी केवळ वैधानिक तरलता प्रमाण पूर्ण करणे पुरेसे नाही, तर पोर्टफोलिओचे यिल्ड कसे वाढवता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. पारंपरिकरित्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी केवळ पैशांची बचत करणे पुरेसे नसून ॲक्टिव्ह पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. ठेवीदारांचा विश्वास आणि बँकेची नफाक्षमता वाढवण्यासाठी ट्रेझरी मॅनेजमेंटमधील 'सुरक्षा, तरलता आणि परतावा' या तिन्ही तत्त्वांचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. हा कार्यक्रम फिक्स्ड इन्कम मार्केटमधील जोखीम ओळखण्यासाठी आणि नवीन संधीचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या, लहान व्यापाऱ्यांच्या आणि तळागाळातील घटकांच्या आर्थिक गरजा भागवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. परंतु, आजचे बँकिंग केवळ ठेवी स्वीकारणे आणि कर्जे वाटणे यापुरते मर्यादित राहिलेले नाही. तंत्रज्ञान आणि बाजारातील साधने दिवसेंदिवस बदलत आहेत. या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. बँकेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे ही केवळ कायदेशीर गरज नसून आपल्या बँकेच्या सुरक्षिततेचे कवच आहे.

केंद्राचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एसटीसीआय संशोधन विभागाचे प्रमुख आदित्य व्यास यांनी आभार मानले. यावेळी आरबीआय (मुंबई)चे सहाय्यक महाव्यवस्थापक निलेश गावडे, उपाध्यक्ष आणि एसटीसीआयच्या प्रमुख संध्या शशी, एसटीसीआयचे सहाय्यक उपाध्यक्ष गुरूदत्त कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी बँकांमधील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 27 August 2026

संविधानातील बंधुता मूल्य सर्वोच्च महत्त्वाचे: भन्ते डॉ. यश काश्यपायन

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या कार्यक्रमात बोलताना भन्ते डॉ. यश काश्यपायन.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या कार्यक्रमात बोलताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. कुलवीर कांबळे, डॉ. पवन गायकवाड, भन्ते डॉ. यश काश्यपायन, डॉ. दीपा श्रावस्ती.


कोल्हापूर, दि. २७ ऑगस्ट: भारतीय संविधान मानवतावादाची शिकवण देणारे असून, त्यातील बंधुता मूल्य सर्वोच्च महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भन्ते डॉ. यश काश्यपायन यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते काल (दि. २६) बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.

केंद्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय संविधान, पाली भाषा आणि संवैधानिक आरक्षण धोरण या विविध पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यास सुमारे दीडशेहून अधिक जणांची उपस्थिती लाभली. त्यांना संबोधित करताना भन्ते डॉ. काश्यपायन म्हणाले, माणसाने दुसऱ्या माणसाचा शत्रू होऊ नये, परस्परांमध्ये ऐक्य आणि मानवतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी संविधानाची गरज आहे. मानवाचे संरक्षण आणि त्याच्या प्रतिष्ठेचे जतन करण्यासाठी भारतीय संविधानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टीने संविधान आणि बुद्धाच्या धम्मातील मानवतावादी विचारांमध्ये खूप साम्य आहे. बुद्धाची शिकवण माणसाला अहंकार, क्रोध आणि द्वेषापासून दूर नेत असून, मैत्री, करुणा आणि सर्व जीवांप्रती असीम दया बाळगण्याचा मार्ग दाखवते. बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू मानव आणि मानवतेशी संबंधित असून, मनुष्य हा जगाचे रक्षणही करू शकतो आणि विनाशही करू शकतो, त्यामुळे मानवतेचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पाली भाषा संवर्धनाची चळवळ ही केवळ भाषेपुरती मर्यादित न राहता विचारांची चळवळ बनली पाहिजे, अशी अपेक्षा कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे विचार आणि कार्य वेगवेगळे न पाहता त्यातील सकारात्मक विचारांची सांगड घालण्याची गरज आहे. समाजातील विविध घटकांना समान महत्त्व देण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत आणि भारतीय संविधानातही दिसून येते. भारतीयत्व हा आपला धर्म आणि संविधान हा आपला धर्मग्रंथ बनला, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत साकार होईल, असे प्रतिपादन केले.

धम्माचे गाढे अभ्यासक अमित मेधावी यांनी पाली भाषा ही केवळ एक प्राचीन भाषा नसून भारतीय मानवतावादी परंपरेचे मूळ तत्त्वज्ञान समजून घेण्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पाली, मागधी आणि संस्कृतसारख्या प्राचीन भाषांचा अभ्यास केल्याशिवाय प्राचीन भारताचे ज्ञान आणि धम्मातील मूळ अर्थ समजणे अशक्य आहे. धम्मपदातील शिकवण पाहता मैत्री आणि करुणा हाच खरा सनातन धर्म आहे, असे स्पष्ट केले. अधिकाधिक युवकांनी या अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होऊन धम्माचा चिकित्सक अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शशिकांत कांबळे, सुरेखा नरदे, विजय कुशाण, नेहा विटेकरी, सुप्रभा चोपडे, सिद्धार्थ दीक्षित, समर्थ भारतीय, डॉ. बालाजी लातुरे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुलवीर कांबळे, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. अमोल मिणचेकर उपस्थित होते. तसेच, डॉ. कपिल राजहंस, अॅड. करूणा मिणचेकर, अनिल वेटम, डॉ. चंद्रकांत कुरणे, डॉ. तेजपाल मोहरेकर उपस्थित होते. केंद्राचे संचालक डॉ. पवन गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सागर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.