Monday, 3 August 2026

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विश्वात्मक दृष्टीचे प्रगल्भ विचारवंत: डॉ. श्रीपाल सबनीस

शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. श्रीपाल सबनीस.

शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. श्रीपाल सबनीस. मंचावर (डावीकडून) डॉ. अक्षय सरवदे, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. प्रभंजन माने.

(चर्चासत्राची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट: बहुसांस्कृतिक जाणीवा असणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे विश्वात्मक दृष्टीचे साहित्यिक होते, तसेच प्रगल्भ आणि परिपक्व विचारवंत म्हणूनही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने जयंतीनिमित्त आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची सांस्कृतिक भूमिका या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ते आज बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि विचारांचा व्यापक पट उलगडताना सबनीस यांनी त्यांना केवळ शाहिर किंवा लोककलावंत म्हणून मर्यादित न पाहता, समतेचा, स्वातंत्र्याचा आणि मानवतावादाचा साक्षेपी विचार मांडणारा विश्वात्मक दृष्टीचा साहित्यिक म्हणून अधोरेखित केले. ते म्हणाले, अण्णा भाऊंच्या लेखणीमध्ये शोषण, जातिव्यवस्था, भांडवलशाही, ब्राह्मण्य आणि विषमतावादी व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष दिसून येतो; मात्र त्याचबरोबर त्यांच्यात संवादशीलता, समन्वयशीलता आणि सर्वसमावेशकताही होती. मार्क्स, आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज अशा विविध वैचारिक-सांस्कृतिक प्रवाहांचे संचित त्यांनी आत्मसात केले होते. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या, शाहिरी, वगनाट्य आणि लोकनाट्यांमधून महाराष्ट्र, भारत आणि विश्वमानवतेचा व्यापक विचार व्यक्त होतो. त्यांचे साहित्य हे केवळ दलित किंवा एका जातीपुरते मर्यादित नसून सर्वसमावेशक, बहुसांस्कृतिक आणि जागतिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहे, असे सबनीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यविश्वाचा अभ्यास करताना त्यांच्या लेखनातील लोकजीवनाची खोल जाण, सामान्य माणसाविषयीची आस्था आणि सामाजिक वास्तवाचे तटस्थ चित्रण प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या कथांमधून केवळ दुःख, दारिद्र्य किंवा संघर्षच नव्हे, तर माणूसपणावरचा अढळ विश्वास आणि परिवर्तनाची उमेदही व्यक्त होते. आजच्या काळात अण्णा भाऊंच्या विचारांची अधिकाधिक गरज असून त्यांच्या साहित्याचा अभ्यास समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. अण्णा भाऊंनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि न्यायाची भूमिका ही नव्या पिढीला दिशा देणारी असून, त्यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते न राहता आचार-विचारांना प्रेरणा देणारे जीवनमूल्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, महामानवांची जातीजातींत वाटणी होणे गैर असून केवळ अस्मिता म्हणून त्यांना मिरविण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा गांभीर्यपूर्वक स्वीकार केला जाणे आवश्यक आहे. अण्णा भाऊ साठे यांनी लौकिकार्थाने शिक्षण नसतानाही निसर्गवाचन, परिसर वाचन, माणसांचं वाचन, वास्तव जीवनातील चटके आणि अनुभव यांच्यावर चिंतन केले. जागतिक साहित्याचे वाचन केले. त्यातून त्यांच्यात लेखन प्रेरणा जागल्या आणि वास्तव, आदर्श व त्यांच्या स्वप्नातील समाज यांचा मेळ घालत त्यांनी साहित्य निर्मिती केली. हा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अण्णा भाऊंचा सांस्कृतिक हस्तक्षेप मौलिक

उद्घाटन सत्रानंतर झालेल्या परिसंवादात अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन अभिजन सांस्कृतिक जाणीवांमध्ये जो हस्तक्षेप केला, तो अत्यंत मौलिक स्वरुपाचा होता. त्यामुळे साहित्याच्या मुख्य प्रवाहामध्ये दलित, शोषितांचा आवाज बुलंद झाला, असा सूर निघाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीष मोरे होते. परिसंवादात डॉ. मेघा पानसरे यांनी अण्णा भाऊंचे आंतरराष्ट्रीयत्व, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी अण्णा भाऊंच्या साहित्यातील फुले-आंबेडकरी जाणीवा आणि डॉ. अंबादास सकट यांनी महाराष्ट्राचे शेक्सपिअर अण्णा भाऊ साठे या विषयांवर मांडणी केली.

यावेळी अनिकेत कांबळे या विद्यार्थ्याने अण्णा भाऊ साठे यांना रॅप साँगद्वारे आभिवादन केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. अक्षय सरवदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शुभदा पाटील यांनी परिचय करून दिला. मनीषा कदम-देसाई, सरिता बनके यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. ललिता सबनीस, डॉ. किसनराव कुराडे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. मच्छिंद्र गोेफणे, डॉ. कबीर दास, डॉ. उत्तम सकट, डॉ. नीलेश बनसोडे, विलास सोयम, अनिल म्हमाणे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 1 August 2026

गणित आणि संख्याशास्त्रामध्ये ‘एआय’चा पाया: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय एआय व मशीन लर्निंगविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. सोमनाथ पवार, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. राजगुरू आणि डॉ. एस.आर. कुलकर्णी.

समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिक्षक आणि विद्यार्थी.

कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट : कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया हा गणित आणि संख्याशास्त्रामध्ये असून विद्यार्थी आणि शिक्षकांनी या संदर्भातील मूलभूत संकल्पना भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र अधिविभाग आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (CoEAISD) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री उच्चतर शिक्षण अभियान या योजनेअंतर्गत "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग" (Artificial Intelligence and Machine Learning) या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. संख्याशास्त्र अधिविभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एस. आर. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडे कृत्रिम बुद्धिमत्तेमागील गणितीय व सांख्यिकीय तत्त्वे समजून घेण्याची क्षमता असते. त्याद्वारे त्यांनी मूलभूत संकल्पनांवर प्रभुत्व मिळवून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करावे. संख्याशास्त्र अधिविभाग आणि सेंटर फॉर एक्सलन्सने कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे, अभ्यासक्रम विकासाचे आणि शिक्षक प्रशिक्षण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. एस. आर. कुलकर्णी म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अत्यंत गतीने बदल होत आहेत. ते समजून घेणे आवश्यक आहे. या झपाट्याने घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेत शिक्षकांनी सतत अद्ययावत ज्ञान आत्मसात करावे. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत संकल्पनांची भक्कम पायाभरणी करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सोमनाथ पवार यांनी प्रास्ताविक केले. अंजली मंगोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एस. व्ही. राजगुरू यांनी आभार मानले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील संख्याशास्त्र विषयाचे शिक्षक तसेच संख्याशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी सहभागी झाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या विविध पैलूंवर डॉ. एस. आर. कुलकर्णी, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू तथा शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्री. एस. ई. परिट, डॉ. एस. एस. सुतार, डॉ. एस. व्ही. राजगुरू आणि डॉ. एस. डी. पवार यांनी मार्गदर्शन केले. आर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मशीन लर्निंग तंत्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. संजय गंजावे, डॉ. सचिन पाटील, डॉ. कुंदन कोंडके, प्रसेनजित कांबळे, शुभम पाटील, संजय पाटील, अमोल चव्हाण आणि डॉ. उल्का दिंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या लेखनाचा परीघ मानवतावादी: संजय कृष्णाजी पाटील

शिवाजी विद्यापीठात लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना संजय कृष्णाजी पाटील. मंचावर डॉ. नंदकुमार मोरे व डॉ. रणधीर शिंदे.


कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या लेखनाचा समग्र परीघ मानवतावादी आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी, नाट्यकर्मी व सिने-दिग्‍दर्शक संजय कृष्‍णाजी पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्‍या मराठी अधिविभागात लोकशाहीर अण्‍णा भाऊ साठे जयंती व लेखन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी होते.

पाटील म्‍हणाले, अण्णाभाऊंना शाळेने अक्षर दिले नाही, पण त्यांनी मात्र मराठी साहित्याला प्रचंड शब्‍दभांडार दिले. या प्रतिभावंत साहित्यिकाने आपल्‍या एकूण कथासाहित्‍यात समाजातील दलित, उप‍ेक्षित, भटके, शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टी अशा सर्व घटकांच्या समस्‍यांचा वेध घेतला. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ दिले. मराठी साहित्‍याला अपरिचित असलेल्या विश्‍वाचे दर्शन त्‍यांनी घडविले. संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीला अण्‍णा भाऊंच्‍या लेखणीने प्रेरणा दिली.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोरे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी विपुल साहित्य निर्मिती करून पुढील पिढ्यांना लेखन प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्याची दिग्गज निर्माता दिग्दर्शकांना भुरळ पडली. त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपटही निघाले, तथापि, मराठी माणसांना अण्णा भाऊ खूप उशीरा समजले. लोकजीवनाला बांधून ठेवणाऱ्या अनेक साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी आपली लेखणी चालवली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी अतुलनीय योगदान दिले. त्यांचे माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन म्हणजे अभ्यासपूर्ण प्रवासाची दृष्टी कशी असायला हवी, याचा वस्तुपाठ आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा लेखन आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अनिता मिस्‍कूळ, अमोल देशमुख आणि विष्‍णू पावले यांनी मनोगते व्यक्त केली. अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्‍योती वराळे यांनी सूत्रसंचालन केले, तर रूपाली पाटील यांनी आभार मानले.

 

सामाजिक शास्त्रांमध्येही उपयुक्त संशोधन होणे आवश्यक: डॉ. जॅस्मिन

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन. शेजारी डॉ. प्रकाश पवार आणि डॉ. शार्दुल सेलुकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन.


कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: विज्ञान क्षेत्रांमधील संशोधनाइतकेच सामाजिक शास्त्रांमधील संशोधनही उपयुक्त असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी व्यक्त केले. ग्रामीण विकासामध्ये जिल्हा परिषद अत्यंत मूलभूत व महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाद्वारे काल 'जिल्हा परिषदेच्या अभ्यासाची चौकट' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

डॉ. जॅस्मिन म्हणाल्या, बदलत्या काळात सामाजिक शास्त्रे मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते संशोधन न करता आपल्या संशोधनाचा समाजाला प्रत्यक्ष कसा उपयोग होईल, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. संशोधनासाठी विषयाची निवड करताना सध्याची सामाजिक गरज काय आहे, हे ओळखूनच विषयांची निवड करावी, जेणेकरून या संशोधनातून समाजाला योग्य दिशा मिळेल.

यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेची प्रशासकीय रचना, तिचे प्रत्यक्ष कामकाज आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने तळागाळातील घटकांसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम व विकास योजना यावर सविस्तर मांडणी केली.

संशोधनक्षम विद्यार्थ्यांकडून आत्मनिर्भर भारताकडे

तत्पूर्वी, कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करून त्यांची रोजगारक्षमता वाढवणे हे आहे. या धोरणात संशोधनालाही रोजगाराचे महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संशोधन क्षमता वाढवणे आणि त्यांच्यात संशोधन कौशल्ये विकसित करणे ही आजची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांनी संयुक्त संशोधन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

'गाथा ग्रामविकासाची'मधून उलगडला अभ्यासपूर्ण प्रवास

कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी 'गाथा ग्रामविकासाची- कोल्हापूर जिल्हा परिषद: अनुभव आणि आठवणी' या विषयावर उपस्थितांशी सविस्तर संवाद साधला. ग्रामविकासाच्या अनेक चांगल्या आणि नाविन्यपूर्ण संकल्पना कागदावर अतिशय उत्तमरित्या उतरतात, परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र तितक्याच ताकदीने आणि प्रभावीपणे होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी गेल्या काही दशकांत बदलत गेलेल्या राजकारणाच्या आणि निवडणुकांच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागाचा कणा असलेल्या या मराठी शाळांच्या अडचणी सोडवून त्या टिकवणे आणि मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते.

कार्यशाळेला मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. शार्दुल सेलुकर, डॉ. संजय सपकाळ, डॉ. नेहा वाडेकर, डॉ. दत्तात्रय सावंत यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा समन्वयक डॉ. सुखदेव उंदरे यांनी स्वागत केले. राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. आयेशा अत्तार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय सावंत यांनी परिचय करून दिला, तर डॉ. नेहा वाडेकर यांनी आभार मानले.

Thursday, 30 July 2026

शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक आविष्कारांतून गुरूंप्रती कृतज्ञता



शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात गायन, वादन, चित्रकला आदी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 


 

कोल्हापूर, दि. ३० जुलै: शिवाजी विद्यापीठात गुरूपौर्णिमेनिमित्त विविध सांगितिक व सांस्कृतिक कलाविष्कारांतून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठ कल्चरल क्लब अंतर्गत संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून काल (दि. २९) विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.

या सोहळ्यात भरतनाट्यम नृत्यातून विद्यार्थ्यांनी 'श्लोकांजली' सादर केली आणि आई-वडील, शिक्षक गुरुजनांवर आधारित कथ्थक नृत्यही प्रस्तुत केले. 'गणेश वंदना', 'हरी म्हणा गोविंद म्हणा' हे भक्तिगीत, जिवलगा कधी रे येशील तू, धुंदी कळ्यांना, निगाहें मिलाने को जी चाहता है, चन्दन सा बदन, इत्यादी हिंदी- मराठी गाणी तसेच राग यमनमधील बंदिशींचे सुरेल सादरीकरण केले. देवांग मराठे आणि प्रसाद सोनटक्के यांची बहारदार तबला जुगलबंदी रंगली. त्रिगुण पुजारी यांनी हार्मोनियम सोलो वादनाद्वारे राग मधुवंती सादर केला. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सामुहिक हार्मोनिअम वादनाद्वारे राग मालकंस सादर केला. नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्याच्या नात्यावर आधारित हृदयस्पर्शी नाटिका तसेच व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेवर आधारित झेल्या ही लघुनाटिका सादर केली. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांगीतिक वाद्यांच्या साथीसह सामूहिक पेंटिंगचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात 'गुरु कृतज्ञता सोहळा' पार पडला. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिरीष कुलकर्णी व श्रुती खोचीकर यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम परीट, संदेश गावंदे व ओंकार सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले. मल्हार जोशी, विकास कांबळे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाला अधिविभागाचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 28 July 2026

निवृत्त हवाई योद्ध्याने मिळविली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.

निवृत्त ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत (डावीकडून) डॉ. तृप्ती करेकट्टी, सौ. वालवडकर आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


कोल्हापूर, दि. २८ जुलै: भारतीय हवाई दलातील माजी हवाई योद्धा, प्रख्यात ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर (निवृत्त) यांनी १ जून २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठातून मानवविज्ञान विद्याशाखेतून इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन केली. शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त करणारे ते पहिले हवाई योद्धा ठरले आहेत.

शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय हवाई दलासोबत (Indian Air Force) सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारांतर्गत सेवेत असलेल्या इच्छुक हवाई योद्ध्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा शिवाजी विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे देशसेवेबरोबरच शिक्षण घेण्याचीही संधी हवाई दलातील जवानांना मिळत आहे.

जवानांच्या शैक्षणिक उत्थानासाठी महत्त्वाचा असलेल्या या उपक्रमाचा लाभ भारतीय हवाई दलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर यांनी घेण्याचे ठरवून इंग्रजी या विषयामध्ये पीएच.डी. संपादन केली. १ जून २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठातून ह्युमॅनिटीज या क्षेत्रातील इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन करून या उपक्रमाचा लाभ घेतला आणि शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त करणारा पहिला माजी हवाई योद्धा होण्याचा मान मिळविला आहे. 'इंडियन मिलीटरी ऑपरेशन्स - परसेप्शन अँड प्रेझेंटेशन इन सिलेक्टेड वॉर नॉन फिक्शन्स अँड वॉर मूव्हीज' या विषयावर त्यांनी विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला. त्यांना डॉ. तृप्ती करेकट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीकांत वालवडकर यांनी हवाई दलात २७ वर्षे लढाऊ सैनिक अधिकारी (Combatant) म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली असून ३१ डिसेंबर २००९ रोजी स्वेच्छानिवृत्ती (Voluntary Retirement) स्वीकारली आहे.

देशसेवेनंतर शिक्षण क्षेत्रातही कॅप्टन वालवडकर यांनी मिळविलेले उल्लेखनीय यश सेवारत तसेच निवृत्त सैनिकांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत.  कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारतीय वायू दल आणि शिवाजी विद्यापीठाच्या या उपक्रमाचा वायु सेना अधिकारी आणि सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. कामत यांनी आज ग्रुप कॅप्टन वालवडकर यांचे अभिनंदन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह डॉ. तृप्ती करेकट्टी, सौ. वालवडकर उपस्थित होत्या.

Monday, 27 July 2026

वसंतराव दत्तवाडे यांच्याकडून मर्यादित साधनांतून अमर्याद पत्रकारितेचा आदर्श: प्रसाद कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसाद कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसाद कुलकर्णी. सोबत (डावीकडून) सखाराम माने, डॉ. शिवाजी जाधव आणि किसनराव कुराडे.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


 

कोल्हापूर, दि. २७ जुलै: मर्यादित भांडवल, मर्यादित साधनसामग्री आणि मर्यादित कार्यक्षेत्र असूनही दै. महासत्ताचे दिवंगत संपादक वसंतराव दत्तवाडे यांनी चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत अमर्याद काम उभे केले. नेहरूंच्या राष्ट्रनिर्मितीच्या आदर्शाला अनुसरून माणूस घडविणे, पत्रकारितेची नैतिकता जपणे आणि नव्या पिढीला घडविणे, हे त्यांच्या कार्याचे मोठे वैशिष्ट्य राहिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांनी आज येथे केले. दत्तवाडे यांच्या पत्रकारितेवर सखोल संशोधन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांचे नुकतेच निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात आज दत्तवाडे यांच्याविषयी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. कुलकर्णी बोलत होते.

वसंतराव दत्तवाडे यांच्या पत्रकारितेचा कुलकर्णी यांनी व्यापक आढावा घेतला. ते म्हणाले, इचलकरंजीसारख्या औद्योगिक नगरीत दैनिक सुरू करणे ही मोठी जोखीम होती; मात्र दत्तवाडे यांनी ती जाणीवपूर्वक स्वीकारली. केवळ वृत्तपत्र चालवणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर त्यातून परिसरातील सामाजिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक जीवनाला दिशा देणे, हे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्यानंतर घडत गेलेल्या नव्या भारताच्या उभारणीच्या प्रक्रियेत दत्तवाडे यांची पत्रकारिता नेहरूंच्या राष्ट्रनिर्मितीच्या विचारांशी नाते सांगणारी होती. नवा भारत घडविण्याचा नेहरूंचा आदर्श त्यांनी आपल्या पत्रकारितेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पुढे नेला. बातम्यांपुरते मर्यादित न राहता समाजातील नव्या मूल्यांची जडणघडण करणे, हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा होता.

दत्तवाडे यांच्या पत्रकारितेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पत्रकारितेची नैतिकता असल्याचे सांगून कुलकर्णी म्हणाले, मोठ्या भांडवली वृत्तपत्रांच्या स्पर्धेत न पडता, त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले. संपादकीय व्यापकता, प्रामाणिक भूमिका आणि वाचकांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे आपला विश्वासार्ह वाचकवर्ग निर्माण केला. स्थानिक प्रश्नांसह राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींवरही त्यांनी समतोल मांडणी केली. दत्तवाडे यांचे वैशिष्ट्य म्हणजे माणसे ओळखणे, घडवणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी पाठबळ देणे. अनेक पत्रकार त्यांच्या हाताखाली घडले, तिथून मोठ्या माध्यमांत गेले आणि संपादक म्हणून नावारूपाला आले. नवोदितांना जबाबदाऱ्या देणे, त्यांच्या लिखाणातील चमक ओळखणे आणि त्यांच्यात संपादकीय संस्कार रुजवणे, ही दत्तवाडे यांची खासियत असल्याचेही त्यांनी सांगितले. लेखकांना लिहिते ठेवणे, विविध विषयांवरील पुरवण्या चालवणे आणि स्थानिक तसेच व्यापक विषयांना जागा देणे, यात त्यांची दृष्टी ठळकपणे दिसते, असेही त्यांनी नमूद केले.

इचलकरंजी आणि परिसरातील सामाजिक शांतता, औद्योगिक समन्वय आणि सांस्कृतिक समृद्धी टिकविण्यात दत्तवाडे यांनी दिलेले योगदानही कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. जात, धर्म, पक्षीय विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन समाजात व्यापक समन्वय टिकविण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची होती, असे कुलकर्णी म्हणाले. त्यामुळे त्यांचे वृत्तपत्र परिसरातील सामाजिक जाणीवेचे महत्त्वाचे माध्यम बनले. वसंतराव दत्तवाडे यांच्या संपूर्ण पत्रकारितेवर सखोल संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला वसंतराव दत्तवाडे यांना दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी किसनराव कुराडे, डॉ. आलोक जत्राटकर, दयानंद लिपारे, प्रमोद व्हनगुत्ते, प्रा. सुनील देसाई यांनी श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. सखाराम माने यांनी आभार मानले. डॉ. रत्नाकर पंडित, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, डॉ. जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, अनुप जत्राटकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.