Wednesday, 6 May 2026

स्वयंचलित 'गॅस ॲडसॉर्प्शन' उपकरणाला भारत सरकारचे डिझाइन पेटंट

 शिवाजी विद्यापीठातील संशोधकांचे यश

 

डॉ. संदीप साबळे

डॉ. कल्याण गरडकर

डॉ. वनिता पाटील

डॉ. अमृता कोळी


                                                                       डॉ. रोहंत ढब्बे


ऑटोमेटेड गॅस अॅडसॉर्प्शन मेजरमेंट डिव्हाईस

कोल्हापूर, दि. ६ मे: शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केलेल्या 'ऑटोमेटेड गॅस ॲडसॉर्प्शन मेरमेंट डिव्हाइस' (Automated Gas Adsorption Measurement Device) या नाविन्यपूर्ण उपकरणाच्या डिझाइनला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृतरीत्या मंजुरी मिळाली असून नुकतेच त्याचे पेटंट नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. विद्यापीठासह कोल्हापूरच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. कल्याण गरडकर आणि जयसिंगपूर महाविद्यालयातील डॉ. संदीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर येथील वनिता पाटील, डॉ. रोहंत ढब्बे, किशोर जाधव, कबीर कुंभार, डॉ. अमृता कोळी यांनी हे महत्वपूर्ण संशोधन केले आहे. यामध्ये कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील डॉ विक्रम देसाई यांचेही सहकार्य लाभले.

या संदर्भात डॉ. गरडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील उष्णता शोषून “ग्लोबल वॉर्मिंग”ला कारणीभूत असलेल्या कार्बन डायऑक्साईड (CO­२­­) वायूचे उत्सर्जन औद्योगिकरणामुळे प्रचंड वाढल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ध्रुवावरील बर्फ वितळून महासागरांचे आम्लीकरण होत आहे. आरोग्यास घातक अमोनिया वायू वातावरणातील आद्रतेशी अभिक्रिया पावून अल्कधर्मी द्रावण तयार करतो, ज्याच्या संपर्कामुळे मानव ऊतींना गंभीर इजा होते. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि अमोनियासारख्या वायूंचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी त्यांचे मापन केल्यास त्यावर उपाय योजना करता येवून वातावरणातील घातक बदल रोखता येणे शक्य आहे. वातावरणातील घातक वायू शोषून घेण्याच्या प्रक्रियेचे मानवी संपर्कविरहित मापन करण्यासाठी सदरचे उपकरण डिझाइन केलेले आहे. हे उपकरण विशिष्ट दाब आणि तापमानाला एखादा पदार्थ किती प्रमाणात वायू शोषू शकतो, याचे विश्लेषण करते. ते पूर्णपणे स्वयंचलित असल्याने मानवी चुकांची शक्यता कमी होते आणि वायूच्या शोषणाच्या नोंदी डिजिटल पद्धतीने घेता येतात. या उपकरणात भिन्न मेटल ऑक्साइडचे गॅस सेमीकंडक्टर सेन्सर्स वापरले असून हे उपकरण अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, मिथेन यांसारख्या विविध वायूंचे अस्तित्व मोजू शकते. हे उपकरण वायू प्रदूषण नियंत्रण आणि विविध औद्योगिक वायूंच्या तपासणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्याच्या अतिशय महागड्या यंत्रणेस पर्याय ठरणाऱ्या स्वस्त, पोर्टेबल आणि स्वयंचलित अशा 'मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर' आधारित उपकरणाची निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी या चमूचे अभिनंदन केले आहे.

Tuesday, 5 May 2026

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य

शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

शिवाजी विद्यापीठात पर्यावरण गोलमेज परिषदेचे उद्घाटन करताना दै. सकाळचे संपादक निखिल पंडितराव. शेजारी डॉ. आसावरी जाधव.


शिवाजी विद्यापीठात आयोजित गोलमेज परिषदेत सहभागी झालेले पर्यावरणीय संस्था, संघटनांचे प्रतिनिधी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित गोलमेज परिषदेत सहभागी झालेल्या पर्यावरणीय संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. आसावरी जाधव आदी.


कोल्हापूर, दि. ५ मे: पर्यावरणाशी संबंधित कार्यरत संस्था, संघटनांनी समन्वय आणि सहकार्यातून एकत्रित काम केल्यास प्रभावी पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या गोलमेज परिषदेत उमटला.

शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ विकास मंच आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात ही परिषद झाली.

या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणूनदै. सकाळचे संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनामध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे साधन म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका अनन्यसाधारण असल्याचे सांगून ते म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही आपल्या अस्तित्वाशी निगडित महत्त्वाची बाब आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांची झपाट्याने होणारी घट ही गंभीर संकटे आपल्यासमोर उभी आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे या प्रश्नाकडे समाजाचे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. वृक्षारोपण, पाणीसंवर्धन आणि प्लास्टिकविरहित उपक्रम यांसारख्या कृतींमध्ये सहभागी होणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण टिकले, तरच भावी पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध जीवनाची हमी आपण देऊ शकू, अन्यथा नाही.

अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या बाबींना विद्यापीठाने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यामुळेच जलसंवर्धनाच्या माध्यमातून आज शिवाजी विद्यापीठ पूर्णपणे जलस्वयंपूर्ण झाले आहे. येथून पुढेही पर्यावरणीय संरक्षणासाठी  विद्यापीठ नेहमीच सकारात्मक प्रयत्न करत राहील, असेही त्यांनी सांगितले.

गोलमेज परिषदेत विविध पर्यावरणीय मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः पाण्याचे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षतोड, प्लास्टिक संकलन, बांधकामातील खर मातीच्या व्यवस्थापनाबाबतचे प्रश्न यांसारख्या विषयांवर सहभागी संस्था प्रतिनिधींनी विचार मांडले. पर्यावरणाचे प्रश्न सोडवताना पर्यावरणविषयक कायदेशीर बाबींचा योग्य अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: तसेच घनकचरा व्यवस्थापन कायदा, २०२६ समजून घेऊन सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. पर्यावरणीय प्रश्नांबाबत प्रशासनाकडून माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार वापरण्यासही हरकत नसल्याचे सांगण्यात आले. पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित झाली. विद्यापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.  या परिषदेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीला नवी दिशा मिळेल आणि विविध संस्थांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

परिषदेत जिल्ह्यातील वृक्षप्रेमी वेल्फेअर, निरोगी व पर्यावरणपूरक प्रतिष्ठान, निसर्ग अंकुर, गार्डन्स क्लब,  वसुंधरा निसर्ग संरक्षण संस्था, सजग नागरिक मंच, कल्पवृक्ष अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, सायकल वेडे  कोल्हापूर आदी १६ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.  

पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी  जाधव यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली. कार्यक्रमास पर्यावरण शास्त्र विभागातील डॉ. सोनल चोंडे, डॉ. पल्लवी भोसले  यांच्यासह संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या तृप्ती देशपांडे यांनी आभार मानले. 

शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ.आप्पासाहेब पवार यांची जयंती उत्साहात

 


कोल्हापूर, दि.05 मे - शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांची जयंती आज विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.


            विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंंदे यांच्या हस्ते प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.तत्पूर्वी, विद्यापीठ अतिथीगृहासमोरील आणि विद्यार्थी भवन येथील डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, डॉ.सी.टी.पवार, डॉ.एस.जे.नाईक, डॉ.टी.के.सरगर, डॉ.किसन कुराडे, डॉ.अशोकराव जगताप, डॉ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार, विद्यार्थी भवनचे रेक्टर डॉ.दिपक भादले, डॉ.माधुरी वाळवेकर, सुरेखा अडके, डॉ.प्रियांका जाधवर, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, गजानन पळसे, विद्यार्थी भवनचे आजी माजी विद्यार्थी आणि प्रशासकीय सेवक, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

------