Tuesday, 28 July 2026

निवृत्त हवाई योद्ध्याने मिळविली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.

निवृत्त ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत (डावीकडून) डॉ. तृप्ती करेकट्टी, सौ. वालवडकर आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


कोल्हापूर, दि. २८ जुलै: भारतीय हवाई दलातील माजी हवाई योद्धा, प्रख्यात ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर (निवृत्त) यांनी १ जून २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठातून मानवविज्ञान विद्याशाखेतून इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन केली. शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त करणारे ते पहिले हवाई योद्धा ठरले आहेत.

शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय हवाई दलासोबत (Indian Air Force) सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारांतर्गत सेवेत असलेल्या इच्छुक हवाई योद्ध्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा शिवाजी विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे देशसेवेबरोबरच शिक्षण घेण्याचीही संधी हवाई दलातील जवानांना मिळत आहे.

जवानांच्या शैक्षणिक उत्थानासाठी महत्त्वाचा असलेल्या या उपक्रमाचा लाभ भारतीय हवाई दलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर यांनी घेण्याचे ठरवून इंग्रजी या विषयामध्ये पीएच.डी. संपादन केली. १ जून २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठातून ह्युमॅनिटीज या क्षेत्रातील इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन करून या उपक्रमाचा लाभ घेतला आणि शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त करणारा पहिला माजी हवाई योद्धा होण्याचा मान मिळविला आहे. 'इंडियन मिलीटरी ऑपरेशन्स - परसेप्शन अँड प्रेझेंटेशन इन सिलेक्टेड वॉर नॉन फिक्शन्स अँड वॉर मूव्हीज' या विषयावर त्यांनी विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला. त्यांना डॉ. तृप्ती करेकट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीकांत वालवडकर यांनी हवाई दलात २७ वर्षे लढाऊ सैनिक अधिकारी (Combatant) म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली असून ३१ डिसेंबर २००९ रोजी स्वेच्छानिवृत्ती (Voluntary Retirement) स्वीकारली आहे.

देशसेवेनंतर शिक्षण क्षेत्रातही कॅप्टन वालवडकर यांनी मिळविलेले उल्लेखनीय यश सेवारत तसेच निवृत्त सैनिकांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत.  कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारतीय वायू दल आणि शिवाजी विद्यापीठाच्या या उपक्रमाचा वायु सेना अधिकारी आणि सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. कामत यांनी आज ग्रुप कॅप्टन वालवडकर यांचे अभिनंदन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह डॉ. तृप्ती करेकट्टी, सौ. वालवडकर उपस्थित होत्या.

Monday, 27 July 2026

वसंतराव दत्तवाडे यांच्याकडून मर्यादित साधनांतून अमर्याद पत्रकारितेचा आदर्श: प्रसाद कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसाद कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसाद कुलकर्णी. सोबत (डावीकडून) सखाराम माने, डॉ. शिवाजी जाधव आणि किसनराव कुराडे.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


 

कोल्हापूर, दि. २७ जुलै: मर्यादित भांडवल, मर्यादित साधनसामग्री आणि मर्यादित कार्यक्षेत्र असूनही दै. महासत्ताचे दिवंगत संपादक वसंतराव दत्तवाडे यांनी चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत अमर्याद काम उभे केले. नेहरूंच्या राष्ट्रनिर्मितीच्या आदर्शाला अनुसरून माणूस घडविणे, पत्रकारितेची नैतिकता जपणे आणि नव्या पिढीला घडविणे, हे त्यांच्या कार्याचे मोठे वैशिष्ट्य राहिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांनी आज येथे केले. दत्तवाडे यांच्या पत्रकारितेवर सखोल संशोधन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांचे नुकतेच निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात आज दत्तवाडे यांच्याविषयी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. कुलकर्णी बोलत होते.

वसंतराव दत्तवाडे यांच्या पत्रकारितेचा कुलकर्णी यांनी व्यापक आढावा घेतला. ते म्हणाले, इचलकरंजीसारख्या औद्योगिक नगरीत दैनिक सुरू करणे ही मोठी जोखीम होती; मात्र दत्तवाडे यांनी ती जाणीवपूर्वक स्वीकारली. केवळ वृत्तपत्र चालवणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर त्यातून परिसरातील सामाजिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक जीवनाला दिशा देणे, हे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्यानंतर घडत गेलेल्या नव्या भारताच्या उभारणीच्या प्रक्रियेत दत्तवाडे यांची पत्रकारिता नेहरूंच्या राष्ट्रनिर्मितीच्या विचारांशी नाते सांगणारी होती. नवा भारत घडविण्याचा नेहरूंचा आदर्श त्यांनी आपल्या पत्रकारितेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पुढे नेला. बातम्यांपुरते मर्यादित न राहता समाजातील नव्या मूल्यांची जडणघडण करणे, हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा होता.

दत्तवाडे यांच्या पत्रकारितेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पत्रकारितेची नैतिकता असल्याचे सांगून कुलकर्णी म्हणाले, मोठ्या भांडवली वृत्तपत्रांच्या स्पर्धेत न पडता, त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले. संपादकीय व्यापकता, प्रामाणिक भूमिका आणि वाचकांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे आपला विश्वासार्ह वाचकवर्ग निर्माण केला. स्थानिक प्रश्नांसह राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींवरही त्यांनी समतोल मांडणी केली. दत्तवाडे यांचे वैशिष्ट्य म्हणजे माणसे ओळखणे, घडवणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी पाठबळ देणे. अनेक पत्रकार त्यांच्या हाताखाली घडले, तिथून मोठ्या माध्यमांत गेले आणि संपादक म्हणून नावारूपाला आले. नवोदितांना जबाबदाऱ्या देणे, त्यांच्या लिखाणातील चमक ओळखणे आणि त्यांच्यात संपादकीय संस्कार रुजवणे, ही दत्तवाडे यांची खासियत असल्याचेही त्यांनी सांगितले. लेखकांना लिहिते ठेवणे, विविध विषयांवरील पुरवण्या चालवणे आणि स्थानिक तसेच व्यापक विषयांना जागा देणे, यात त्यांची दृष्टी ठळकपणे दिसते, असेही त्यांनी नमूद केले.

इचलकरंजी आणि परिसरातील सामाजिक शांतता, औद्योगिक समन्वय आणि सांस्कृतिक समृद्धी टिकविण्यात दत्तवाडे यांनी दिलेले योगदानही कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. जात, धर्म, पक्षीय विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन समाजात व्यापक समन्वय टिकविण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची होती, असे कुलकर्णी म्हणाले. त्यामुळे त्यांचे वृत्तपत्र परिसरातील सामाजिक जाणीवेचे महत्त्वाचे माध्यम बनले. वसंतराव दत्तवाडे यांच्या संपूर्ण पत्रकारितेवर सखोल संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला वसंतराव दत्तवाडे यांना दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी किसनराव कुराडे, डॉ. आलोक जत्राटकर, दयानंद लिपारे, प्रमोद व्हनगुत्ते, प्रा. सुनील देसाई यांनी श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. सखाराम माने यांनी आभार मानले. डॉ. रत्नाकर पंडित, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, डॉ. जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, अनुप जत्राटकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Friday, 24 July 2026

गोविंदराव टेंबे महाराष्‍ट्राचे उपेक्षित साहित्यिक: सुधीर पोटे

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ गायक सुधीर पोटे


कोल्हापूर, दि. २४ जुलै: गोविंदराव टेंबे हे महाराष्‍ट्राचे उपेक्षित साहित्यिकआहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक व संगीततज्ज्ञ सुधीर पोटे यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्‍या मराठी अधिविभागात गोविंदराव टेंबे कार्यकर्तृत्‍व या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे होते.

सुधीर पोटे म्‍हणाले की, गोविंदराव टेंबे यांनी मराठीत पहिल्‍यांदा लक्षण गीतांची निर्मिती केली. तसेच त्‍यांनी स्‍वतंत्र स्‍वररागदारी निर्माण केल्‍या. भारतीय सांगितिक परंपरेत टेंबे यांचे मोलाचे योगदान आहे. ही गीते आणि रागदारीच्या माध्यमातून त्यांनी संगीताबरोबरच साहित्यसेवाही केली आहे. त्याची अपेक्षित दखल घेण्यात आली नाही. टेंबे यांच्या या योगदानाचा नव्याने अभ्यास करण्याची आवश्यकता असल्‍याचे पोटे यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. रणधीर शिंदे म्‍हणाले, कोल्‍हापूरचा सांगितिक-सांस्‍कृतिक दस्‍तऐवज म्‍हणून गोविंदराव टेंबे यांच्‍या कार्याकडे, योगदानाकडे पाहायला हवे. कोल्‍हापूरच्‍या कलाक्षेत्राची ओळख गोविंदराव टेंबे यांनी सर्वदूर पसरवली. त्याविषयीही आपण कृतज्ञ असायला हवे. त्यांच्या योगदानाची दखल नव्या पिढीने घ्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. सुखदेव एकल यांनी प्रा‍स्‍ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मराठी अधिविभागातील संशोधक विद्यार्थी आणि एम. ए. चे विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, 23 July 2026

शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी

हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठ, एसयूके-आरडीएफ आणि हुबळी येथील देशपांडे एज्युकेशनल ट्रस्ट यांच्यात कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि एम.एन. नायक. सोबत उपस्थित अधिकारी व शिक्षक.

(सामंजस्य करार कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २३ जुलै: विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला, रोजगार क्षमतेला आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठ, विद्यापीठाची सेक्शन-८ कंपनी एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि देशपांडे एज्युकेशनल ट्रस्ट, हुबळी (कर्नाटक) यांच्यात नुकताच त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास, पुनर्कौशल्य (Reskilling) आणि कौशल्यवर्धन (Upskilling) यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देऊन त्यांची रोजगार क्षमता, व्यावसायिक क्षमता आणि करिअरसाठीची तयारी अधिक सक्षम करणे, हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

यावेळी देशपांडे एज्युकेशनल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एन. नायक म्हणाले, देशपांडे एज्युकेशनल ट्रस्टचा ‘देशपांडे स्किलिंग’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, त्याचे मुख्यालय हुबळी (कर्नाटक) येथे आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या संस्थेमार्फत उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. प्रामुख्याने आवश्यक व्यक्तिमत्त्व विकास व औद्योगिक कौशल्ये या अनुषंगाने विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या करारानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार असून, विद्यापीठाच्या ‘कुशल, सक्षम आणि उद्योगसज्ज मनुष्यबळ निर्मिती’ या उद्दिष्टाला निश्चितच बळकटी मिळेल. विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कामी हा करार महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

या सामंजस्य करारावर श्री. नायक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी  प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, संचालक डॉ. सागर डेळेकर, रवी चव्हाण, एम. बी. शेख, रवी डोळी, डॉ. हेमराज यादव, सुभाष माने यांच्यासह तिन्ही संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

Tuesday, 21 July 2026

आधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या डिझाईनला पेटंट

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

 



डॉ. हर्षवर्धन पंडित

डॉ. ओमप्रकाश पवार

डॉ. सूरज सोनवणे

अनिल मराळे


कोल्हापूर, दि. २१ जुलै: येथील संशोधकांनी विकसित केलेल्या "मॅग्नेटिक स्टिरर विथ पार्टिशन्ड ऑइल बाथ" या आधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या संरचनेला भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे. विविध शास्त्रीय अभिक्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या यंत्राचे डिझाईन तयार करण्यात राजाराम महाविद्यालयासह शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी योगदान दिले आहे.

राजाराम महाविद्यालयातील डॉ. सूरज अशोक सोनवणे, अनिल पांडुरंग मराळे, डॉ. ओमप्रकाश बन्सीधर पवार आणि शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील मेकॅनिकल इंजिनियरिंगचे डॉ. हर्षवर्धन चंद्रकांत पंडित या अभिनव डिझाईनचे संशोधक आहेत.

हे उपकरण रसायनशास्त्र, औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया तसेच विविध संशोधन प्रयोगशाळांमध्ये द्रव नमुन्यांचे एकाच वेळी सुरक्षित, अचूक आणि कार्यक्षम मिश्रण (Stirring) तसेच तापमान नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विभागीय तैलस्नान (Partitioned Oil Bath) या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेमुळे एकाच उपकरणा स्वतंत्र विभागांमध्ये एकाच वेळी विविध नमुन्यांवर प्रयोग करता येतात. त्यामुळे नमुन्यांमधील परस्पर परिणाम टाळले जातात, प्रयोगांची अचूकता वाढते आणि संशोधन अधिक सुरक्षित परिणामकारक बनते.

या उपकरणाच्या आकर्षक, कार्यक्षम आणि आधुनिक औद्योगिक रचनेला डिझाईन पेटंट मंजूर झाल्यामुळे संशोधकांच्या या नाविन्यपूर्ण कार्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या डिझाईन पेटंटमुळे भविष्यात संशोधन प्रयोगशाळांसाठी अधिक कार्यक्षम उपकरणांच्या निर्मितीस चालना मिळणार असून, उद्योग-शैक्षणिक सहकार्य, तंत्रज्ञान विकास आणि "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेलाही बळ मिळणार आहे.

या संशोधनाबद्दल कुलगुरू डॉ. राजनी कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर तसेच राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता बोडके यांचे मार्गदर्शन प्रोत्साहन लाभले