Monday, 17 August 2026

शिवाजी विद्यापीठात एसबीआय ई-पे सेवेला प्रारंभ

डिजिटल आर्थिक व्यवस्थापनाच्या दिशेने विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण पाऊल

 

स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक निशांतकुमार जयस्वाल यांचे ग्रंथभेट देऊन शिवाजी विद्यापीठात स्वागत करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील.

(एसबीआय ई-पे सेवा प्रारंभ लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १७ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांना अधिक गतिमान, सुरक्षित, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने एसबीआय ई-पे (SBIePay) – एफएएस (FAS) एकात्मिक व्हाउचर पेमेंट प्रणालीचे आज कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॉम्पसर्व्ह कन्सल्टंट्स यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या ऑनलाइन पेमेंट प्रणालीमुळे विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये धनादेशाधारित पारंपरिक पद्धतीऐवजी थेट डिजिटल देयक प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. सध्या ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Basis) सुरू करण्यात आली असून, तिचे यश आणि तांत्रिक बाजू तपासून लवकरच ती टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.

कुलगुरू डॉ. कामत यांनी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार आर्थिक व्यवहार अधिक वेगवान, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आधुनिक डिजिटल प्रणालींचा स्वीकार आवश्यक असून, एसबीआय ई-पेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांना अधिक कार्यक्षम दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही प्रणाली केवळ देयकाची पद्धत बदलणारी नसून विद्यापीठाच्या एकूण डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

धनादेशापासून थेट डिजिटल हस्तांतरणापर्यंत

सध्या व्हाउचर तयार करणे, त्याची तपासणी व मंजुरी, धनादेश तयार करणे, अधिकृत स्वाक्षरी, बँकेत सादरीकरण, क्लिअरिंग, रक्कम जमा होणे आणि त्यानंतर मॅन्युअल ताळमेळ अशा अनेक टप्प्यांतून देयक प्रक्रिया पूर्ण होते. या प्रक्रियेत वेळखाऊ कामकाज, कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर, मॅन्युअल कामाचा भार, क्लिअरिंगला लागणारा वेळ आणि ताळमेळाचे अतिरिक्त काम अशा अडचणी येतात.

नव्या एसबीआय ई-पे –एफएएस एकात्मिक प्रणालीमध्ये एफएएसमध्ये व्हाउचर तयार झाल्यानंतर त्याची मेकर आणि चेकर पातळीवर तपासणी व मंजुरी केली जाते. त्यानंतर एसबीआय ई-पेकडे देयक सूचना पाठविली जाते. एसबीआय ई-पे मार्फत देयक प्रक्रिया पूर्ण होऊन लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण केले जाते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर युटीआर क्रमांकाद्वारे त्याची पुष्टी होते आणि एफएएसमध्ये व्यवहाराची स्थिती अद्ययावत केली जाते. त्यानंतर लेखांकन, ताळमेळ, डिजिटल नोंद आणि एमआयएस अहवालाची प्रक्रिया सुलभ होते.

जलद, सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार

एसबीआय ई-पे प्रणालीमुळे देयक प्रक्रिया अधिक जलद होण्याबरोबरच धनादेशमुक्त आर्थिक व्यवहार शक्य होणार आहेत. लाभार्थ्याला थेट रक्कम हस्तांतरित होत असल्याने प्रक्रियेत सुलभता येईल. प्रत्येक व्यवहाराचा युटीआर क्रमांक उपलब्ध असल्याने व्यवहाराचा मागोवा घेणे सोपे होणार असून आर्थिक व्यवहारांच्या नोंदी अधिक सक्षमपणे जतन करता येतील. तसेच बँक ताळमेळाची प्रक्रिया सुलभ होऊन मॅन्युअल कामाचा भार कमी होईल.

या प्रणालीमुळे आर्थिक व्यवहारांवर अधिक मजबूत नियंत्रण, डिजिटल ऑडिट ट्रेल, एमआयएस व स्थिती अहवालाची सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

ताळमेळ आणि लेखापरीक्षण अधिक सुलभ

जुन्या धनादेश पद्धतीच्या तुलनेत नव्या प्रणालीमध्ये डिजिटल देयक सूचना, थेट इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण, कागदपत्रांचा कमी वापर, सुलभ किंवा स्वयंचलित ताळमेळ आणि युटीआर आधारित डिजिटल ऑडिट ट्रेल ही वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे व्यवहारांचा मागोवा अधिक प्रभावीपणे घेता येणार असून लेखापरीक्षणासाठी आवश्यक डिजिटल नोंदीही उपलब्ध राहतील.

डिजिटल आर्थिक व्यवस्थापनाची नवी सुरुवात

व्हाउचर तयार करणे, तपासणी व मंजुरी, एसबीआय ई-पेकडे देयक सूचना, थेट बँक हस्तांतरण आणि त्यानंतर एफएएसमध्ये स्थिती अद्ययावत करणे अशी एकात्मिक प्रक्रिया या प्रणालीद्वारे कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनात जलद, सुरक्षित, पारदर्शक, एकात्मिक आणि कार्यक्षम अशा डिजिटल प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते. वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लेखा परीक्षक दुर्गाली गायकवाड आणि अंतर्गत हिशेब तपासनीस अजित चौगुले यांनी एसबीआय ई-पे प्रणालीचे सादरीकरण केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक निशांतकुमार जयस्वाल, मुख्य व्यवस्थापक संदीप कुमार, पंकज पाटील, व्यवस्थापक ओवी सहस्त्रबुद्धे, उपव्यवस्थापक संदीप बुचडे, कॉम्पसर्व्ह कन्सल्टंट प्रा.लि., कोल्हापूरचे विनय गुप्ते, शशिकांत खोत यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि अधिविभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 15 August 2026

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण; तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसाद



शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष तिरंगा रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी मान्यवर.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष तिरंगा रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष तिरंगा रॅलीत सहभागी झालेले राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांचा मोठा उत्साही प्रतिसाद लाभला.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांचा मोठा उत्साही प्रतिसाद लाभला.

(शिवाजी विद्यापीठाच्या स्वातंत्र्यदिन समारंभाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात आज ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रचंड उत्साही प्रतिसाद लाभला.

सकाळी ठीक आठ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यानंतर कुलगुरू डॉ. कामत यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून सायबर महाविद्यालयामार्गे तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक, अधिविभागांचे प्रमुख, प्रशासकीय कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान-जय किसान, जय शिवराय इत्यादी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावळीराम घाणे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. अभिजीत गाताडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, अधिसभा सदस्य विष्णू खाडे, सुरक्षा अधिकारी वसंत एकले आदी उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Friday, 14 August 2026

शिवाजी विद्यापीठात उद्या

कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठात देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.


कोल्हापूर, दि. १४ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात उद्या कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल. दरम्यान, आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

ध्वजारोहण समारंभानंतर विद्यापीठ परिसरातून सायबर चौक मार्गावरुन तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण

दरम्यान, हर घर तिरंगा अभियान व वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज विद्यापीठात देशभक्तीपर गीतगायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरवात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात सारे जहाँ से अच्छा, दे दी हमें आजादी, सैनिक हो तुमच्यासाठी, अब तुम्हारे हवाले, हर घर तिरंगा, जहाँ डाल डाल पर इत्यादी सुमधूर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात दोन तासांहून अधिक काळ हा कार्यक्रम चालला.

Thursday, 13 August 2026

प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर. मंचावर (डावीकडून) आमदार अरूण लाड, डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. भारती पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर.

(चर्चासत्राची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १३ ऑगस्ट: स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या दृष्टिकोनातून प्रतिसरकार हे केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचे आंदोलन नव्हते, तर स्त्रीमुक्ती, जातिव्यवस्थेविरोध, जमीनदारशाहीचा अंत आणि सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त समाजनिर्मितीचे सुंदर स्वप्न होते. हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही; ते साकार करण्याची जबाबदारी आता ‘जेन-झी’ने स्वीकारावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे श्रीमती कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिसरकारची चळवळ: रणरागिणी रणि ठाकल्या या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात बीजभाषक म्हणून डॉ. पाटणकर आज बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते, तर, आमदार अरूण लाड, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. पाटणकर म्हणाले, प्रतिसरकारची संकल्पना केवळ इंग्रजांना हाकलून देण्यापुरती मर्यादित नव्हती. ब्रिटिशांच्या सत्ताकाळातच स्वातंत्र्यानंतरचा समाज उभा करण्याचा प्रयत्न त्यातून झाला. जनतेने ठरविलेलेच त्या भागात चालावे, या भूमिकेतून समांतर सत्तेची निर्मिती करण्यात आली. स्त्रियांच्या मुक्तीचा कार्यक्रम, जमीनदारांच्या दडपशाहीविरोधातील संघर्ष आणि पिढ्यान्‌पिढ्या कसणाऱ्या कुळांना जमिनीचा हक्क मिळावा, यांसाठी प्रतिसरकारने भूमिका घेतली. न्यायदान मंडळे, सेवा दल, ग्रामस्वच्छता, वाचनालये, सहभोजन, ‘एक गाव एक पाणवठा’ यांसारख्या उपक्रमांतून सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी करण्यात आली. जातीय विषमता, अस्पृश्यता, सावकारशाही आणि स्त्रियांवरील अन्यायाविरोधात प्रतिसरकारने संघर्ष केला. हा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर शोषित समाजाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी होता, असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिसरकारमध्ये शेतकरी, बलुतेदार आणि विविध शोषित घटकांतील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या त्यागातून निर्माण झालेले स्वातंत्र्य केवळ सत्तांतरापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि आर्थिक समतेत रूपांतरित व्हावे, ही त्यामागची भूमिका होती. मात्र सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत करण्याचे प्रतिसरकारचे स्वप्न अद्याप साकार झालेले नाही. त्यामुळे बदलत्या काळात त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आजच्या युवा पिढीने पुढाकार घेण्याची आवश्यकता डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली.

'आदर्श ग्रामस्वराज्य निर्मितीची चळवळ'

कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, प्रतिसरकार चळवळ ही केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धची लढाई नव्हती, तर आदर्श ग्रामस्वराज्याची निर्मिती करणारी आणि समाजातील विषमतेवर घाव घालणारी अभिनव चळवळ होती. सातारा-सांगली परिसरात जनमत संघटित करून अन्याय-अत्याचाराविरोधात लढताना प्रतिसरकारने न्यायदान समित्यांच्या माध्यमातून ग्रामराज्याचा प्रयोग केला; गरीब व नाडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासोबतच दारूबंदी, जुगारबंदी, हुंडाबंदी, गांधी पद्धतीने विवाह आणि अस्पृश्यता निवारण यांसारखे विधायक उपक्रम राबवून सामाजिक स्वराज्याची पायाभरणी केली. या चळवळीच्या इतिहासात पुरुष क्रांतिकारकांच्या योगदानाची नोंद झाली असली, तरी भूमिगत क्रांतिकारकांना आश्रय देणे, संदेश पोहोचविणे, शस्त्रे लपविणे आणि प्रसंगी स्वतः शस्त्र हाती घेणाऱ्या लीलाताई पाटील, इंदुताई पाटणकर, राजमती पाटील यांच्यासह असंख्य रणरागिणींच्या योगदानाला अपेक्षित न्याय मिळालेला नाही. त्यामुळे विस्मृतीत गेलेल्या या स्त्रीशक्तीचा इतिहास संशोधनातून पुढे आणणे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. प्रतिसरकार चळवळ आणि तिच्यातील स्त्रीशक्तीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम सुरू करण्याचाही विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपल्याच सरकारने बापूंना का पकडले?’

यावेळी आमदार अरूण लाड यांनी जी.डी. बापू लाड यांचे प्रतिसरकारमधील कार्य आणि अन्य आठवणींना उजाळा दिला. अत्यंत प्रसिद्धीपराङ्मुख राहून स्वातंत्र्योत्तर कालखंडातही स्वातंत्र्याचे खरे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी बापू अखेरपर्यंत संघर्षशील राहिले. विधिमंडळ सदस्य म्हणून मिळणारे निवृत्तीवेतन स्वतःसाठी अगर कुटुंबासाठी न वापरता ती संपूर्ण रक्कम समाजकार्यासाठीच वापरणारे बापू हे अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. ब्रिटीश सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या जी.डी. बापूंना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्याच सरकारने का पकडले आणि तुरुंगात का टाकले, यावरही संशोधकांनी प्रकाश टाकायला हवा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नेहा वाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. दशरथ पारेकर, डॉ. कपिल राजहंस, वसंतराव मुळीक, डॉ. दीपा श्रावस्ती यांच्यासह संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिसरकारमधील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव

चर्चासत्रात दिवसभरात प्रतिसरकार चळवळीतील कर्तृत्ववान स्त्रियांच्या सहभागाविषयी विविध सत्रांमध्ये संशोधनपूर्ण चर्चा झाली. स्त्रियांच्या योगदानाचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख उपस्थित संशोधक व मान्यवरांनी केला. यामध्ये डॉ. पद्मजा पाटील, डॉ. कल्पना गुरव, प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. प्रकाश कुंभार, दमयंती पाटील, डॉ. दशरथ पारेकर, संपत मोरे, डॉ. दिनकर पाटील, विष्णू पावले, डॉ. अवनीश पाटील यांनी सहभाग घेतला. डॉ. भारती पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप झाला.

Wednesday, 12 August 2026

भारत-चीन संबंधांमध्ये आर्थिक हितसंबंधांसोबत

सुरक्षाविषयक सावधगिरी आवश्यक: डॉ. अशोक चौसाळकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. मंचावर डॉ. श्रीराम पवार, बाळ पाटणकर, नायब सुभेदारडी.एम. सूर्यवंशी, सुभेदार एन.एम. पाटील आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. 

(चर्चासत्राची लघुचित्रफीत)


 

कोल्हापूर, दि. १२ ऑगस्ट: भारत आणि चीन हे आशियातील दोन प्राचीन संस्कृती असलेले आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे देश आहेत. मात्र, सीमावाद, चीन-पाकिस्तानची वाढती जवळीक, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे वर्चस्व आणि भारत-अमेरिका संबंध यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध गुंतागुंतीचे झाले आहेत. त्यामुळे चीनसोबत आर्थिक संबंध वाढवत असतानाच भारताने सुरक्षेच्या दृष्टीने सातत्याने सावध राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभाग आणि एक्स सर्व्हिसेस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भारताचे सुरक्षा धोरण आणि भारत-चीन संबंध’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार-संपादक डॉ. श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते. बाळ पाटणकर प्रमुख उपस्थित होते.

डॉ. चौसाळकर यांनी भारत-चीन संबंधांचा ऐतिहासिक आढावा घेताना या संबंधांचे चार प्रमुख टप्पे स्पष्ट केले. १९४९ ते १९६२ या काळातील ‘हिंदी-चीनी भाई भाई’पासून १९६२च्या युद्धापर्यंतच्या घडामोडी, त्यानंतरचा दीर्घकाळातील तणाव, १९९०च्या दशकानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली तुलनेने अनुकूल परिस्थिती आणि त्यानंतर चीनच्या बदललेल्या आक्रमक धोरणापर्यंतच्या प्रवासाचे त्यांनी विश्लेषण केले. ते म्हणाले, १९६२च्या युद्धाच्या संदर्भात भारताकडे लष्करी सामर्थ्याची कमतरता होती, हा समज पूर्णपणे योग्य नाही. त्या वेळी भारताकडे मोठ्या प्रमाणात सैन्य, रणगाडे आणि सक्षम हवाई साधने होती; मात्र नेतृत्वातील मतभेद आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे उपलब्ध सामर्थ्याचा प्रभावी वापर होऊ शकला नाही, असे त्यांनी नमूद केले. या युद्धानंतर चीनने अक्साई चीनचा मोठा भूभाग आपल्या ताब्यात ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

चीनच्या बदलत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याकडे लक्ष वेधताना डॉ. चौसाळकर म्हणाले, आर्थिक सुधारणांनंतर चीनने विज्ञान-तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच लष्करी आधुनिकीकरणामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आजचा चीन हा केवळ आर्थिक महासत्ता नसून तंत्रज्ञान आणि लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीनेही प्रभावशाली शक्ती बनला आहे.

गलवाननंतर अविश्वासाचे वातावरण

भारत-चीन संबंधांतील सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना डॉ. चौसाळकर यांनी, २०२०च्या गलवान संघर्षाचा विशेष उल्लेख केला. या घटनेनंतर दोन्ही देशांनी सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले असून परस्परांमधील विश्वासाचे संकट कायम असल्याचे त्यांनी सांगितले. चीनचे धोरण अनेकदा अनपेक्षित स्वरूपाचे राहिले आहे. त्यामुळे भारताने चीनच्या धोरणाचा अभ्यास करताना त्याच्या आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी क्षमतेचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत-चीन संघर्षातील प्रमुख मुद्द्यांवर भाष्य करताना चौसाळकर यांनी लडाखमधील सीमावाद आणि अरुणाचल प्रदेशावरील चीनचा दावा हे दोन महत्त्वाचे प्रश्न असून मॅकमोहन रेषा, अक्साई चीन आणि तवांग या संदर्भातील चीनची भूमिका दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सातत्याने तणाव निर्माण करणारी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

चीन-पाकिस्तान संबंध भारतासाठी महत्त्वाचा सुरक्षाविषयक घटक

चीन-पाकिस्तान संबंध हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे आव्हान असल्याचे सांगून डॉ. चौसाळकर म्हणाले, पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्यामध्ये चीनची भूमिका मोठी असून चीन-पाकिस्तान आर्थिक आणि सामरिक सहकार्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होतो. त्याचबरोबर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधील पाकिस्तानमार्गे जाणारा प्रकल्प आणि त्यातील भारताच्या सार्वभौमत्वाशी संबंधित प्रश्नही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारताने क्वाडसारख्या बहुपक्षीय व्यासपीठांमध्ये सहभाग घेतल्याने चीनच्या दृष्टीने भारताची सामरिक भूमिका अधिक महत्त्वाची ठरली आहे. दुसरीकडे, ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटनेसारख्या व्यासपीठांवर भारत आणि चीन एकत्र कार्य करीत आहेत. त्यामुळे भारत-चीन संबंध हे केवळ संघर्षाचे नसून स्पर्धा, सहकार्य आणि परस्पर आर्थिक हितसंबंध यांचे मिश्रण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘दबाव ठेवत संवादही आवश्यक’

चीनसोबत पूर्णतः मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे भविष्यातही अवघड असले तरी संवादाचे मार्ग खुले ठेवणे आवश्यक आहे. भारत आणि चीन यांच्यातील आर्थिक संबंध मोठे आहेत. त्यामुळे एकीकडे चीनवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा, तंत्रज्ञान आणि सामरिक हितसंबंध यांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे डॉ. चौसाळकर यांनी स्पष्ट केले.

मैत्री ठेवा, पण सावध राहा

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीराम पवार म्हणाले, भारत आणि चीन हे आशियातील दोन मोठे देश असून, दोघांनाही जागतिक राजकारणात प्रभावी भूमिका बजावायची आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील स्पर्धा आणि तणाव दीर्घकाळ कायम राहण्याची शक्यता आहे. १९६२च्या युद्धाच्या अनुभवातून भारताने चीनच्या सामरिक उद्दिष्टांचा आणि भू-राजकीय, भू-आर्थिक हालचालींचा गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज स्पष्ट होते. जनरल थोरात यांनी त्यावेळी केलेल्या लष्करी अभ्यासातून चीनच्या संभाव्य हालचालींचा अचूक अंदाज घेण्याची आणि युद्धाच्या परिस्थितीत प्रभावी प्रतिकाराची आवश्यकता अधोरेखित केली होती. आजच्या परिस्थितीत चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि आर्थिक सहकार्य आवश्यक असले, तरी त्याचवेळी भारताने ‘मैत्री ठेवा, पण सतत सावध राहा’ ही भूमिका स्वीकारणे गरजेचे आहे. फार्मास्युटिकल्सपासून उद्योग आणि तंत्रज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रांत चीनशी असलेले आर्थिक संबंध लक्षात घेता चीनला पूर्णपणे दूर ठेवणे व्यवहार्य नाही; मात्र राष्ट्रीय सुरक्षा, सामरिक स्वायत्तता आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हित यांचा विचार करून प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे टाकावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

कार्यक्रमात बाळ पाटणकर यांनी लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या सान्निध्यातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. जनरल थोरात यांनी आपल्याला पितृतुल्य प्रेम आणि मार्गदर्शन केले. ते अत्यंत मितभाषी, तत्त्वनिष्ठ, काटेकोर आणि आदर्श व्यक्तीमत्त्वाचे होते. महाराष्ट्राला एनडीए अकादमी तसेच कोल्हापूरला गोल्फ कोर्स आणि नवीन राजवाड्यातील संग्रहालय निर्माण करण्यात त्यांनी अमूल्य योगदान दिले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रल्हाद माने यांनी डॉ. यशवंतराव थोरात यांच्या संदेशाचे वाचन केले. कर्नल सी.जे. रानडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी परिचय करून दिला. मोसीम पठाण यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय सावंत यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश पवार, कर्नल विक्रम नलावडे, नायब सुभेदार टी.एम. सूर्यवंशी, सुभेदार एन.एम. पाटील, डॉ. अरूण भोसले, डॉ. अवनीश पाटील, सुरेश शिपूरकर, डॉ. सुरेश शिखरे यांच्यासह शिक्षक, अनेक आजी-माजी सैनिक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.