Thursday, 13 August 2026

प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर. मंचावर (डावीकडून) आमदार अरूण लाड, डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. भारती पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर.

(चर्चासत्राची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १३ ऑगस्ट: स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या दृष्टिकोनातून प्रतिसरकार हे केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचे आंदोलन नव्हते, तर स्त्रीमुक्ती, जातिव्यवस्थेविरोध, जमीनदारशाहीचा अंत आणि सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त समाजनिर्मितीचे सुंदर स्वप्न होते. हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही; ते साकार करण्याची जबाबदारी आता ‘जेन-झी’ने स्वीकारावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे श्रीमती कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिसरकारची चळवळ: रणरागिणी रणि ठाकल्या या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात बीजभाषक म्हणून डॉ. पाटणकर आज बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते, तर, आमदार अरूण लाड, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. पाटणकर म्हणाले, प्रतिसरकारची संकल्पना केवळ इंग्रजांना हाकलून देण्यापुरती मर्यादित नव्हती. ब्रिटिशांच्या सत्ताकाळातच स्वातंत्र्यानंतरचा समाज उभा करण्याचा प्रयत्न त्यातून झाला. जनतेने ठरविलेलेच त्या भागात चालावे, या भूमिकेतून समांतर सत्तेची निर्मिती करण्यात आली. स्त्रियांच्या मुक्तीचा कार्यक्रम, जमीनदारांच्या दडपशाहीविरोधातील संघर्ष आणि पिढ्यान्‌पिढ्या कसणाऱ्या कुळांना जमिनीचा हक्क मिळावा, यांसाठी प्रतिसरकारने भूमिका घेतली. न्यायदान मंडळे, सेवा दल, ग्रामस्वच्छता, वाचनालये, सहभोजन, ‘एक गाव एक पाणवठा’ यांसारख्या उपक्रमांतून सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी करण्यात आली. जातीय विषमता, अस्पृश्यता, सावकारशाही आणि स्त्रियांवरील अन्यायाविरोधात प्रतिसरकारने संघर्ष केला. हा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर शोषित समाजाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी होता, असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिसरकारमध्ये शेतकरी, बलुतेदार आणि विविध शोषित घटकांतील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या त्यागातून निर्माण झालेले स्वातंत्र्य केवळ सत्तांतरापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि आर्थिक समतेत रूपांतरित व्हावे, ही त्यामागची भूमिका होती. मात्र सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत करण्याचे प्रतिसरकारचे स्वप्न अद्याप साकार झालेले नाही. त्यामुळे बदलत्या काळात त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आजच्या युवा पिढीने पुढाकार घेण्याची आवश्यकता डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली.

'आदर्श ग्रामस्वराज्य निर्मितीची चळवळ'

कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, प्रतिसरकार चळवळ ही केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धची लढाई नव्हती, तर आदर्श ग्रामस्वराज्याची निर्मिती करणारी आणि समाजातील विषमतेवर घाव घालणारी अभिनव चळवळ होती. सातारा-सांगली परिसरात जनमत संघटित करून अन्याय-अत्याचाराविरोधात लढताना प्रतिसरकारने न्यायदान समित्यांच्या माध्यमातून ग्रामराज्याचा प्रयोग केला; गरीब व नाडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासोबतच दारूबंदी, जुगारबंदी, हुंडाबंदी, गांधी पद्धतीने विवाह आणि अस्पृश्यता निवारण यांसारखे विधायक उपक्रम राबवून सामाजिक स्वराज्याची पायाभरणी केली. या चळवळीच्या इतिहासात पुरुष क्रांतिकारकांच्या योगदानाची नोंद झाली असली, तरी भूमिगत क्रांतिकारकांना आश्रय देणे, संदेश पोहोचविणे, शस्त्रे लपविणे आणि प्रसंगी स्वतः शस्त्र हाती घेणाऱ्या लीलाताई पाटील, इंदुताई पाटणकर, राजमती पाटील यांच्यासह असंख्य रणरागिणींच्या योगदानाला अपेक्षित न्याय मिळालेला नाही. त्यामुळे विस्मृतीत गेलेल्या या स्त्रीशक्तीचा इतिहास संशोधनातून पुढे आणणे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. प्रतिसरकार चळवळ आणि तिच्यातील स्त्रीशक्तीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम सुरू करण्याचाही विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपल्याच सरकारने बापूंना का पकडले?’

यावेळी आमदार अरूण लाड यांनी जी.डी. बापू लाड यांचे प्रतिसरकारमधील कार्य आणि अन्य आठवणींना उजाळा दिला. अत्यंत प्रसिद्धीपराङ्मुख राहून स्वातंत्र्योत्तर कालखंडातही स्वातंत्र्याचे खरे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी बापू अखेरपर्यंत संघर्षशील राहिले. विधिमंडळ सदस्य म्हणून मिळणारे निवृत्तीवेतन स्वतःसाठी अगर कुटुंबासाठी न वापरता ती संपूर्ण रक्कम समाजकार्यासाठीच वापरणारे बापू हे अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. ब्रिटीश सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या जी.डी. बापूंना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्याच सरकारने का पकडले आणि तुरुंगात का टाकले, यावरही संशोधकांनी प्रकाश टाकायला हवा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नेहा वाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. दशरथ पारेकर, डॉ. कपिल राजहंस, वसंतराव मुळीक, डॉ. दीपा श्रावस्ती यांच्यासह संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिसरकारमधील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव

चर्चासत्रात दिवसभरात प्रतिसरकार चळवळीतील कर्तृत्ववान स्त्रियांच्या सहभागाविषयी विविध सत्रांमध्ये संशोधनपूर्ण चर्चा झाली. स्त्रियांच्या योगदानाचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख उपस्थित संशोधक व मान्यवरांनी केला. यामध्ये डॉ. पद्मजा पाटील, डॉ. कल्पना गुरव, प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. प्रकाश कुंभार, दमयंती पाटील, डॉ. दशरथ पारेकर, संपत मोरे, डॉ. दिनकर पाटील, विष्णू पावले, डॉ. अवनीश पाटील यांनी सहभाग घेतला. डॉ. भारती पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप झाला.

Wednesday, 12 August 2026

भारत-चीन संबंधांमध्ये आर्थिक हितसंबंधांसोबत

सुरक्षाविषयक सावधगिरी आवश्यक: डॉ. अशोक चौसाळकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. मंचावर डॉ. श्रीराम पवार, बाळ पाटणकर, नायब सुभेदारडी.एम. सूर्यवंशी, सुभेदार एन.एम. पाटील आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. 

(चर्चासत्राची लघुचित्रफीत)


 

कोल्हापूर, दि. १२ ऑगस्ट: भारत आणि चीन हे आशियातील दोन प्राचीन संस्कृती असलेले आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे देश आहेत. मात्र, सीमावाद, चीन-पाकिस्तानची वाढती जवळीक, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे वर्चस्व आणि भारत-अमेरिका संबंध यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध गुंतागुंतीचे झाले आहेत. त्यामुळे चीनसोबत आर्थिक संबंध वाढवत असतानाच भारताने सुरक्षेच्या दृष्टीने सातत्याने सावध राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभाग आणि एक्स सर्व्हिसेस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भारताचे सुरक्षा धोरण आणि भारत-चीन संबंध’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार-संपादक डॉ. श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते. बाळ पाटणकर प्रमुख उपस्थित होते.

डॉ. चौसाळकर यांनी भारत-चीन संबंधांचा ऐतिहासिक आढावा घेताना या संबंधांचे चार प्रमुख टप्पे स्पष्ट केले. १९४९ ते १९६२ या काळातील ‘हिंदी-चीनी भाई भाई’पासून १९६२च्या युद्धापर्यंतच्या घडामोडी, त्यानंतरचा दीर्घकाळातील तणाव, १९९०च्या दशकानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली तुलनेने अनुकूल परिस्थिती आणि त्यानंतर चीनच्या बदललेल्या आक्रमक धोरणापर्यंतच्या प्रवासाचे त्यांनी विश्लेषण केले. ते म्हणाले, १९६२च्या युद्धाच्या संदर्भात भारताकडे लष्करी सामर्थ्याची कमतरता होती, हा समज पूर्णपणे योग्य नाही. त्या वेळी भारताकडे मोठ्या प्रमाणात सैन्य, रणगाडे आणि सक्षम हवाई साधने होती; मात्र नेतृत्वातील मतभेद आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे उपलब्ध सामर्थ्याचा प्रभावी वापर होऊ शकला नाही, असे त्यांनी नमूद केले. या युद्धानंतर चीनने अक्साई चीनचा मोठा भूभाग आपल्या ताब्यात ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

चीनच्या बदलत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याकडे लक्ष वेधताना डॉ. चौसाळकर म्हणाले, आर्थिक सुधारणांनंतर चीनने विज्ञान-तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच लष्करी आधुनिकीकरणामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आजचा चीन हा केवळ आर्थिक महासत्ता नसून तंत्रज्ञान आणि लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीनेही प्रभावशाली शक्ती बनला आहे.

गलवाननंतर अविश्वासाचे वातावरण

भारत-चीन संबंधांतील सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना डॉ. चौसाळकर यांनी, २०२०च्या गलवान संघर्षाचा विशेष उल्लेख केला. या घटनेनंतर दोन्ही देशांनी सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले असून परस्परांमधील विश्वासाचे संकट कायम असल्याचे त्यांनी सांगितले. चीनचे धोरण अनेकदा अनपेक्षित स्वरूपाचे राहिले आहे. त्यामुळे भारताने चीनच्या धोरणाचा अभ्यास करताना त्याच्या आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी क्षमतेचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत-चीन संघर्षातील प्रमुख मुद्द्यांवर भाष्य करताना चौसाळकर यांनी लडाखमधील सीमावाद आणि अरुणाचल प्रदेशावरील चीनचा दावा हे दोन महत्त्वाचे प्रश्न असून मॅकमोहन रेषा, अक्साई चीन आणि तवांग या संदर्भातील चीनची भूमिका दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सातत्याने तणाव निर्माण करणारी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

चीन-पाकिस्तान संबंध भारतासाठी महत्त्वाचा सुरक्षाविषयक घटक

चीन-पाकिस्तान संबंध हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे आव्हान असल्याचे सांगून डॉ. चौसाळकर म्हणाले, पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्यामध्ये चीनची भूमिका मोठी असून चीन-पाकिस्तान आर्थिक आणि सामरिक सहकार्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होतो. त्याचबरोबर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधील पाकिस्तानमार्गे जाणारा प्रकल्प आणि त्यातील भारताच्या सार्वभौमत्वाशी संबंधित प्रश्नही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारताने क्वाडसारख्या बहुपक्षीय व्यासपीठांमध्ये सहभाग घेतल्याने चीनच्या दृष्टीने भारताची सामरिक भूमिका अधिक महत्त्वाची ठरली आहे. दुसरीकडे, ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटनेसारख्या व्यासपीठांवर भारत आणि चीन एकत्र कार्य करीत आहेत. त्यामुळे भारत-चीन संबंध हे केवळ संघर्षाचे नसून स्पर्धा, सहकार्य आणि परस्पर आर्थिक हितसंबंध यांचे मिश्रण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘दबाव ठेवत संवादही आवश्यक’

चीनसोबत पूर्णतः मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे भविष्यातही अवघड असले तरी संवादाचे मार्ग खुले ठेवणे आवश्यक आहे. भारत आणि चीन यांच्यातील आर्थिक संबंध मोठे आहेत. त्यामुळे एकीकडे चीनवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा, तंत्रज्ञान आणि सामरिक हितसंबंध यांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे डॉ. चौसाळकर यांनी स्पष्ट केले.

मैत्री ठेवा, पण सावध राहा

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीराम पवार म्हणाले, भारत आणि चीन हे आशियातील दोन मोठे देश असून, दोघांनाही जागतिक राजकारणात प्रभावी भूमिका बजावायची आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील स्पर्धा आणि तणाव दीर्घकाळ कायम राहण्याची शक्यता आहे. १९६२च्या युद्धाच्या अनुभवातून भारताने चीनच्या सामरिक उद्दिष्टांचा आणि भू-राजकीय, भू-आर्थिक हालचालींचा गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज स्पष्ट होते. जनरल थोरात यांनी त्यावेळी केलेल्या लष्करी अभ्यासातून चीनच्या संभाव्य हालचालींचा अचूक अंदाज घेण्याची आणि युद्धाच्या परिस्थितीत प्रभावी प्रतिकाराची आवश्यकता अधोरेखित केली होती. आजच्या परिस्थितीत चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि आर्थिक सहकार्य आवश्यक असले, तरी त्याचवेळी भारताने ‘मैत्री ठेवा, पण सतत सावध राहा’ ही भूमिका स्वीकारणे गरजेचे आहे. फार्मास्युटिकल्सपासून उद्योग आणि तंत्रज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रांत चीनशी असलेले आर्थिक संबंध लक्षात घेता चीनला पूर्णपणे दूर ठेवणे व्यवहार्य नाही; मात्र राष्ट्रीय सुरक्षा, सामरिक स्वायत्तता आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हित यांचा विचार करून प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे टाकावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

कार्यक्रमात बाळ पाटणकर यांनी लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या सान्निध्यातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. जनरल थोरात यांनी आपल्याला पितृतुल्य प्रेम आणि मार्गदर्शन केले. ते अत्यंत मितभाषी, तत्त्वनिष्ठ, काटेकोर आणि आदर्श व्यक्तीमत्त्वाचे होते. महाराष्ट्राला एनडीए अकादमी तसेच कोल्हापूरला गोल्फ कोर्स आणि नवीन राजवाड्यातील संग्रहालय निर्माण करण्यात त्यांनी अमूल्य योगदान दिले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रल्हाद माने यांनी डॉ. यशवंतराव थोरात यांच्या संदेशाचे वाचन केले. कर्नल सी.जे. रानडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी परिचय करून दिला. मोसीम पठाण यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय सावंत यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश पवार, कर्नल विक्रम नलावडे, नायब सुभेदार टी.एम. सूर्यवंशी, सुभेदार एन.एम. पाटील, डॉ. अरूण भोसले, डॉ. अवनीश पाटील, सुरेश शिपूरकर, डॉ. सुरेश शिखरे यांच्यासह शिक्षक, अनेक आजी-माजी सैनिक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारसा लष्करी इतिहासाचा; प्रेरक अन् अभिमानाचा!

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय दुर्मिळ लष्करी छायाचित्र प्रदर्शनास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय दुर्मिळ लष्करी छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत (डावीकडून) लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सुरेखा अडके, डॉ. सावळीराम घाणे, डॉ. कबीर खराडे आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय दुर्मिळ लष्करी छायाचित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि अन्य अधिकारी.


(उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १२ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचा इतिहास, जवानांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात आज दुर्मिळ लष्करी छायाचित्रांच्या दोनदिवसीय प्रदर्शनास प्रारंभ झाला. विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे येथील ऑलिव्ह ग्रीन व्हेंचर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचे प्रृकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात सुरू असलेल्या या प्रदर्शनात सन १९४७, १९६२, १९६५, १९७१ आणि कारगील इत्यादी युद्धांमधील अत्यंत दुर्मिळ अशा ३५० छायाचित्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलांचा गौरवशाली इतिहास, विविध युद्धांतील पराक्रम तसेच देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांनी दिलेल्या योगदानाची माहिती करून देण्यात आली.

या निमित्ताने विद्यापीठ परिसरात भारतीय लष्करी इतिहासाशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे, नकाशे, ऐतिहासिक दस्तऐवज यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनातून भारतीय जवानांचे शौर्य, युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी आणि लष्करी रणनीती यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आली. लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे यांच्यासह नितीन शास्त्री आणि जे.आर. भट यांनी उपस्थितांना त्यांची माहिती दिली.

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता देशाचा इतिहास, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रसेवेची मूल्ये समजून घेणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी अभिमान, कर्तव्यभावना आणि राष्ट्रनिष्ठा दृढ होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे यांनी भारतीय लष्करी इतिहासातील विविध घटनांमधून सैनिकांचे शौर्य, नेतृत्व, शिस्त आणि त्याग यांची माहिती दिली. युद्धातील विजयामागे केवळ शस्त्रसामर्थ्य नसून नियोजन, नेतृत्व, धैर्य, शिस्त आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना महत्त्वाची असते, याकडे त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावळीराम घाणे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, सुरेखा अडके यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरचे प्रदर्शन उद्या, गुरूवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त संख्येने ही दुर्मिळ छायाचित्रे पाहण्याचा लाभ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी लष्करी अधिकाऱ्यांनी जागविल्या युद्धाच्या आठवणी

प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आणखी एक महत्त्वपूर्ण परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात माजी लष्करी अधिकारी आणि अभ्यासकांनी विविध भारतीय युद्धांच्या स्मृतींना उजाळा दिला. लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे यांनी १९६५ च्या युद्धातील असल उत्तरची लढाई आणि १९७१च्या युद्धातील बसांतर याविषयी विद्यार्थ्यांनी अतिशय रोमहर्षक शब्दांत सादरीकरणासह माहिती दिली. तसेच, नितीन शास्त्री यांनी १९६२ चे युद्ध आणि १९६५ च्या युद्धाची पार्श्वभूमी या विषयावर तर, जे.आर. भट यांनी १९६५ मधील सर्जिकल स्ट्राईक (पेशावरवरील बॉम्बहल्ला) याविषयी सविस्तर माहिती दिली. 

Sunday, 9 August 2026

विद्यापीठात क्रांती दिनानिमित्त

स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

 

शिवाजी विद्यापीठात क्रांती दिनानिमित्त क्रांतीवनातील स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सावलीराम घाणे आदी.

शिवाजी विद्यापीठात क्रांती दिनानिमित्त क्रांतीवनातील स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. भारती पाटील, डॉ. सावलीराम घाणे आदी.


(क्रांतीदिन अभिवादन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक क्रांती दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील 'क्रांतीवन' येथे हा कार्यक्रम झाला.

आज सकाळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी क्रांतीवनातील स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सर्व उपस्थितांनी कवी कुसुमाग्रज यांच्या 'अनाम वीरा...' या अजरामर देशभक्तीपर गीताचे सामूहिक वाचन केले. डॉ. भारती पाटील यांनी याचे संयोजन केले. कुलगुरू डॉ. कामत यांनी देशसेवेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनीही क्रांतीदिनाचे महत्त्व सांगत देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.

या वेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. सोमनाथ पवार, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. संजय चोपडे, सुरक्षा अधिकारी वसंत एकले, सुरेखा अडके यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.


ए.आय. ज्ञाननिर्मितीचे नव्हे; माहितीचे साधन: डॉ. ज्ञानेश्वर गटकर

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागात 'संशोधनात ए.आय.' वर विशेष कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. ज्ञानेश्वर गटकर


कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट: कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) हे ज्ञान मिळवण्याचे किंवा ज्ञानाच्या निर्मितीचे साधन नसून ते केवळ माहिती देऊन आपल्याला मदत करणारे एक साधन आहे. संशोधक म्हणून ज्ञानाची नवनिर्मिती ही मानवी बुद्धीलाच करावी लागणार आहे, असे प्रतिपादन यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर गटकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित ‘संशोधनामध्ये ए.आय.चा वापर’ या विषयावरील विशेष कार्यशाळेत काल प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार होते.

डॉ. गटकर म्हणाले की, ए.आय.कडे कितीही सृजनशीलता असली तरी ती विवेकी असेलच, असे नाही. ए.आय. स्वयंचलित वाटत असले तरी माणसाची बुद्धी त्याला जशी आज्ञा (प्रॉम्प्ट) देईल, त्यानुसारच ते कृती करते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करण्यापूर्वी आपण मानवी चुका आणि अज्ञानावर मात केली पाहिजे.

आपल्या सादरीकरणात डॉ. गटकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उगमापासून ते आजच्या आधुनिक युगातील संशोधनातील व कार्यालयीन वापरापर्यंतचा प्रवास उलगडला. 'ट्युरिंग टेस्ट' आणि अलान ट्युरिंग यांच्या संकल्पनेपासून सुरू झालेला ए.आय.चा प्रवास आज 'चॅट-जीपीटी', 'जेमिनी', 'क्लॉड' आणि विविध ए.आय. एजंट्सपर्यंत कसा पोहोचला, याची सविस्तर माहिती दिली. शोधनिबंधांचे विश्लेषण, डेटा क्लीनिंग, संदर्भ शोधणे यासाठी आधुनिक टूल्सचा वापर कसा करावा, याविषयीही मार्गदर्शन केले.

डॉ. प्रकाश पवार अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. सध्याची पिढी टेक्नोसेव्ही आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी ए.आय. सारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. संशोधन योग्य दिशेला घेवून जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा विवेकी वापर होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात हे तंत्रज्ञान साह्य घेत असताना संशोधन पद्धतीची चौकट मोडता कामा नये.

डॉ. सुखदेव उंदरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय सावंत यांनी परिचय करून दिला. कार्यशाळेला राज्यशास्त्र, समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 7 August 2026

शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची

सांख्यिकी अधिकारी पदावर निवड

विद्या बाळासाहेब वालकोळी

सोनम श्रीकांत पाटील

तेजश्री मनमोहन राजे

स्वप्नील सतीश माने

निकेत गणेश जाधव

रविंद्र एकनाथ देवरे

आदिनाथ तुकाराम पाटील

पृथ्वीराज विठ्ठल झांबरे



कोल्हापूर, दि. ७ ऑगस्ट: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या सांख्यिकी अधिकारी/ संशोधन अधिकारी (गट-ब, राजपत्रित) पदाच्या भरती प्रक्रियेत शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातील सांख्यिकी अधिकारी (DSO)/संशोधन अधिकारी (RO) या पदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीराज विठ्ठल झांबरे, आदिनाथ तुकाराम पाटील, रविंद्र एकनाथ देवरे, सोनम श्रीकांत पाटील, निकेत गणेश जाधव, स्वनिल सतीश माने, तेजश्री मनमोहन राजे आणि विद्या बाळासाहेब वालकोळी यांचा समावेश आहे. अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांच्यासह सर्व शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

या भरती प्रक्रियेत राज्यभरातून निवड झालेल्या २५ उमेदवारांपैकी शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, हे प्रमाण ३२ टक्के इतके आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची प्रभावी परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

संख्याशास्त्र अधिविभागाची गुणवत्ता अधोरेखित

संख्याशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आज केंद्र व राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रांतही विविध पदांवर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. आज आठ विद्यार्थ्यांच्या यशामुळे अधिविभागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता नव्याने अधोरेखित झाली आहे. विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांसाठीही त्यांचे यश प्रेरणादायी आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक अभिनंदनास पात्र आहेत, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केले आहेत.