Saturday, 29 August 2026

‘वॉक फॉर हेल्थ, वॉक फॉर युनिटी’

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वॉकेथॉन

 

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनला फ्लॅग ऑफने प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.


शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनमध्ये कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी सहभागी झाले.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनमधील विजेत्यांसमवेत कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि अधिकारी, कर्मचारी.


(वॉकेथॉनची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचा क्रीडा अधिविभाग आणि स्पोर्ट्स क्लबतर्फे आज सकाळी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून वॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. ‘फिट इंडिया, ॲक्टिव्ह इंडिया, हेल्दी इंडिया’चा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध वयोगटांतील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दोनशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, मेजर ध्यानचंद जिथे शिकले, ते एल्फिन्स्टन महाविद्यालय समाविष्ट असलेल्या डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचा कुलगुरू होण्याची संधी मला लाभली, याचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाचे स्मरण करत त्यांनी निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि क्रीडाभावना अंगिकारण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वतः कुलगुरूंनी वॉकेथॉनमध्ये सहभागी होत उपस्थितांना प्रोत्साहन दिले. विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले. ‘वॉक फॉर फिटनेस, वॉक फॉर हेल्थ, वॉक फॉर युनिटी’ या संदेशातून आरोग्य, एकता आणि क्रीडाभावनेचा जागर करण्यात आला. ‘एकत्र चालूया, निरोगी राहूया, फिट भारत घडवूया’ हा संदेशही देण्यात आला.

वॉकेथॉनमध्ये प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा विविध गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आली. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले. ४० वर्षांपर्यंत, ४० ते ५० वर्षे आणि ५० ते ६० वर्षे अशा वयोगटांमध्ये स्पर्धा झाली. विविध गट व वयोगटांतील विजेत्यांना कुलगुरू डॉ. कामत, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान करून गौरविण्यात आले.

सुरवातीला कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अजय मराठे यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले. वॉकेथॉनमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. कबीर खराडे, संगणक केंद्र संचालक डॉ. अभिजीत रेडेकर, डॉ. सुभाष कोंबडे, कास्ट्राईबचे आनंद खामकर, डॉ. राजेंद्र रायकर, राष्ट्रीय खेळाडू प्रतीक पाटील, प्रणव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अतुल टोणे, डॉ. सविता भोसले, सुजित नाईक, अजय मराठे, कृष्णात पाटील, संग्रामसिंग मोरे, प्रसाद देसाई, सुनील शिंदे, आकाश पाटील, तौहीद मुल्ला आणि नंदेश यांनी केले.

वॉकेथॉन स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा- लहान गट (मुले): भावेश बिष्ट, राजवीर चौगुले, सर्वज्ञ खोत. लहान गट (मुली): येसू पाटील, पूर्वा गुरव, संस्कृती खंडागळे. मोठा गट (मुले): विक्रम भोसले, ज्योतिबा पाटील, श्रीधर खोत. मोठा गट (मुली): अवंती अवधूत सूर्यवंशी, प्रज्ञा प्रशांत जाधव, स्वरा शैलेश कुलकर्णी. शिक्षकेतर कर्मचारी (४० वर्षांखालील): रोशन पाटील, अभिजीत जाधव, अभिजीत कोठावळे. शिक्षकेतर कर्मचारी (४१ ते ५० वर्षे): प्रशांत जाधव, सतीश हुक्केरी. शिक्षक गट: डॉ. नवनाथ वळेकर, जयप्रकाश पाटील, रवींद्र खैरे. महिला शिक्षक: प्रा. आसावरी कागवाडे, प्रा. दिपाली गवस. शिक्षकेतर कर्मचारी (महिला): सुरेखा अडके. प्रशासकीय अधिकारी: अजित इंगळे. यावेळी वॉकेथॉनमध्ये प्रेरणादायी सहभाग नोंदविल्याबद्दल माजी सैनिक प्रकाश गुरव आणि श्रीमती आसमा बडेखान यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.

शिवाजी विद्यापीठात आयोजित बँकिंगविषयक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक सर्वानन एम.

शिवाजी विद्यापीठात आयोजित बँकिंगविषयक कार्यशाळेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर डॉ. सुभाष कोंबडे, आदित्य व्यास, संध्या शशी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक सर्वानन एम., निलेश गावडे, गुरूदत्त कुलकर्णी, सुरेश शिंदे.

(कार्यशाळेची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: सहकारी बँकिंग क्षेत्र भारताच्या तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. ठेवीदांराचा विश्वास टिकवून ठेवणे आणि बँकेचे भविष्य सुरक्षित करणे हे मजबूत ट्रेझरी मॅनेजमेंट आणि पारदर्शक प्रशासन यांच्यावरच अवलंबून आहे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पर्यवेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक सर्वानन एम. यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट अर्बन बँक्स को-ऑपरेटीव्ह असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर आणि एसटीसीआय प्रायमरी डिलर्स लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवस्थापन विकास कार्यक्रमांतर्गत 'फिक्स्ड इन्कम मार्केट्स इन इंडिया: करंट ट्रेंड्स, थीम्स अँड परस्पेक्टीव्हज् फॉर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वानन एम. बोलत होते.  कुलगुरू डॉ.राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते.

महाव्यवस्थापक सर्वानन म्हणाले, गुंतवणूक धोरणाचे तंतोतंत पालन करणे, अंतर्गत लेखापरीक्षण मजबूत ठेवणे आणि आरबीआयच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हे उच्च प्रशासनाचे मुख्य लक्षण आहे. देशामधील एकूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकांपैकी जास्तीत जास्त बँका महाराष्ट्रात आणि त्यातही कोल्हापूर परिक्षेत्रात विस्तारलेल्या आहेत. भारत सरकारच्या वित्तीय धोरणांमधील सकारात्मक बदल आणि रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे आज भारतीय फिक्स्ड इन्कम मार्केट एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय रोखे बाजार अधिक पारदर्शक आणि त़ंत्रज्ञानस्नेही झाला आहे. जागतिक घडामोडींमुळे बाँड यील्डमध्ये गतिमान बदल होत आहेत. यामध्ये आरबीआय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी केवळ वैधानिक तरलता प्रमाण पूर्ण करणे पुरेसे नाही, तर पोर्टफोलिओचे यिल्ड कसे वाढवता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. पारंपरिकरित्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी केवळ पैशांची बचत करणे पुरेसे नसून ॲक्टिव्ह पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. ठेवीदारांचा विश्वास आणि बँकेची नफाक्षमता वाढवण्यासाठी ट्रेझरी मॅनेजमेंटमधील 'सुरक्षा, तरलता आणि परतावा' या तिन्ही तत्त्वांचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. हा कार्यक्रम फिक्स्ड इन्कम मार्केटमधील जोखीम ओळखण्यासाठी आणि नवीन संधीचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या, लहान व्यापाऱ्यांच्या आणि तळागाळातील घटकांच्या आर्थिक गरजा भागवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. परंतु, आजचे बँकिंग केवळ ठेवी स्वीकारणे आणि कर्जे वाटणे यापुरते मर्यादित राहिलेले नाही. तंत्रज्ञान आणि बाजारातील साधने दिवसेंदिवस बदलत आहेत. या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. बँकेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे ही केवळ कायदेशीर गरज नसून आपल्या बँकेच्या सुरक्षिततेचे कवच आहे.

केंद्राचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एसटीसीआय संशोधन विभागाचे प्रमुख आदित्य व्यास यांनी आभार मानले. यावेळी आरबीआय (मुंबई)चे सहाय्यक महाव्यवस्थापक निलेश गावडे, उपाध्यक्ष आणि एसटीसीआयच्या प्रमुख संध्या शशी, एसटीसीआयचे सहाय्यक उपाध्यक्ष गुरूदत्त कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी बँकांमधील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 27 August 2026

संविधानातील बंधुता मूल्य सर्वोच्च महत्त्वाचे: भन्ते डॉ. यश काश्यपायन

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या कार्यक्रमात बोलताना भन्ते डॉ. यश काश्यपायन.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या कार्यक्रमात बोलताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. कुलवीर कांबळे, डॉ. पवन गायकवाड, भन्ते डॉ. यश काश्यपायन, डॉ. दीपा श्रावस्ती.


कोल्हापूर, दि. २७ ऑगस्ट: भारतीय संविधान मानवतावादाची शिकवण देणारे असून, त्यातील बंधुता मूल्य सर्वोच्च महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भन्ते डॉ. यश काश्यपायन यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते काल (दि. २६) बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.

केंद्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय संविधान, पाली भाषा आणि संवैधानिक आरक्षण धोरण या विविध पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यास सुमारे दीडशेहून अधिक जणांची उपस्थिती लाभली. त्यांना संबोधित करताना भन्ते डॉ. काश्यपायन म्हणाले, माणसाने दुसऱ्या माणसाचा शत्रू होऊ नये, परस्परांमध्ये ऐक्य आणि मानवतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी संविधानाची गरज आहे. मानवाचे संरक्षण आणि त्याच्या प्रतिष्ठेचे जतन करण्यासाठी भारतीय संविधानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टीने संविधान आणि बुद्धाच्या धम्मातील मानवतावादी विचारांमध्ये खूप साम्य आहे. बुद्धाची शिकवण माणसाला अहंकार, क्रोध आणि द्वेषापासून दूर नेत असून, मैत्री, करुणा आणि सर्व जीवांप्रती असीम दया बाळगण्याचा मार्ग दाखवते. बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू मानव आणि मानवतेशी संबंधित असून, मनुष्य हा जगाचे रक्षणही करू शकतो आणि विनाशही करू शकतो, त्यामुळे मानवतेचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पाली भाषा संवर्धनाची चळवळ ही केवळ भाषेपुरती मर्यादित न राहता विचारांची चळवळ बनली पाहिजे, अशी अपेक्षा कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे विचार आणि कार्य वेगवेगळे न पाहता त्यातील सकारात्मक विचारांची सांगड घालण्याची गरज आहे. समाजातील विविध घटकांना समान महत्त्व देण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत आणि भारतीय संविधानातही दिसून येते. भारतीयत्व हा आपला धर्म आणि संविधान हा आपला धर्मग्रंथ बनला, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत साकार होईल, असे प्रतिपादन केले.

धम्माचे गाढे अभ्यासक अमित मेधावी यांनी पाली भाषा ही केवळ एक प्राचीन भाषा नसून भारतीय मानवतावादी परंपरेचे मूळ तत्त्वज्ञान समजून घेण्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पाली, मागधी आणि संस्कृतसारख्या प्राचीन भाषांचा अभ्यास केल्याशिवाय प्राचीन भारताचे ज्ञान आणि धम्मातील मूळ अर्थ समजणे अशक्य आहे. धम्मपदातील शिकवण पाहता मैत्री आणि करुणा हाच खरा सनातन धर्म आहे, असे स्पष्ट केले. अधिकाधिक युवकांनी या अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होऊन धम्माचा चिकित्सक अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शशिकांत कांबळे, सुरेखा नरदे, विजय कुशाण, नेहा विटेकरी, सुप्रभा चोपडे, सिद्धार्थ दीक्षित, समर्थ भारतीय, डॉ. बालाजी लातुरे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुलवीर कांबळे, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. अमोल मिणचेकर उपस्थित होते. तसेच, डॉ. कपिल राजहंस, अॅड. करूणा मिणचेकर, अनिल वेटम, डॉ. चंद्रकांत कुरणे, डॉ. तेजपाल मोहरेकर उपस्थित होते. केंद्राचे संचालक डॉ. पवन गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सागर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

महिलांना संधी, हक्क आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यावर भर: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात आयोजित कायदेविषयक कार्यक्रमात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. मंचावर डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. ज्योती खराडे.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात आयोजित कायदेविषयक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. मीना पोतदार आदी.


कोल्हापूर, दि. २७ ऑगस्ट: महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, रोजगार आणि समाजातील विविध क्षेत्रांत पुढे यावे, यासाठी त्यांना उपलब्ध संधी, सुविधा आणि हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. महिलांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढविण्यासोबतच समाजातील प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी संवाद आणि मार्गदर्शनाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले. महिलांना सक्षमीकरणाच्या दिशेने प्रेरित करणाऱ्या ‘She Talk’सारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना त्या बोलत होत्या.

शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थिनी वसतिगृह आणि स्वयंसिद्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘She Talk’ उपक्रमात बोलताना डॉ. जाधव म्हणाल्या, महिलांना उपलब्ध असलेल्या विविध संधी, सुविधा, हक्क आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि निर्णयक्षमता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे महिलांनी उपलब्ध संधींचा केवळ लाभ न घेता स्वतःच्या क्षमता ओळखून आत्मनिर्भर होण्याची दिशा स्वीकारावी, असे आवाहनही डॉ. जाधव यांनी केले.

डॉ. प्रतिभा देसाई यांनी ‘स्वयंसिद्धा’ या महिलांसाठीच्या ॲपची माहिती देताना महिलांनी केलेले उपक्रम, मिळविलेले यश तसेच महिलांनी सामूहिकपणे राबविलेले उल्लेखनीय उपक्रम या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचविता येत असल्याचे सांगितले. तसेच ‘स्त्रीशक्ती पोर्टल’वर नोंदणी करण्याची प्रक्रिया आणि त्याचा उपयोग याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

विद्यार्थिनी वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी असलेल्या POSH’ कायद्याबाबत मार्गदर्शन केले. सुरक्षित कार्यस्थळ, महिलांचे कायदेशीर अधिकार, लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी उपलब्ध यंत्रणा तसेच तक्रार निवारणाची प्रक्रिया याबाबत त्यांनी माहिती दिली.

साक्षी धनावडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. कविता वड्राळे, डॉ. मीना पोतदार, विद्यार्थिनी वसतिगृहातील कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. ज्योती खराडे यांनी आभार मानले.

संवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

  

शिवाजी विद्यापीठात तृतीयपंथी कायद्याविषयक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करताना शिवानी गजबर.

(कार्यशाळेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २७ ऑगस्ट: संवाद आणि जनजागृती या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांचे मुख्य प्रवाहात समावेशन करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आज सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, कोल्हापूर आणि विद्यापीठाचे सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय कल्याण, हक्क व संरक्षण कायदा २०१९ व सुधारित नियम २०२० यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेश्मा पाटील, शासनाच्या तृतीयपंथी हक्क कल्याण समिती सदस्य मयुरी आळवेकर आणि शिवानी गजबर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली गेली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला, त्याची लैंगिक ओळख कोणतीही असो, सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार दिला. मात्र, कायद्यात अधिकारांची तरतूद असली तरी समाजात त्याबाबत व्यापक जनजागृती आणि सातत्यपूर्ण संवादाची गरज आहे. तृतीयपंथी समुदायातील अनेक व्यक्ती सामाजिक भीती अथवा संकोचामुळे आपली ओळख उघडपणे मांडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे अनुभव, अडचणी आणि अपेक्षा समजून घेणे तसेच समाजाने त्यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे.  तृतीयपंथी समुदाय हा समाजाचा उपेक्षित नव्हे, तर अविभाज्य घटक असून त्यांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तृतीयपंथी बांधवांसाठी संवेदनशील वातावरण, सर्वसमावेशक पायाभूत सुविधा, शैक्षणिक संधी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम हे समावेशाचे प्रभावी उदाहरण

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम उभारण्यात आल्याचा उल्लेख करून डॉ. कामत म्हणाले, पूरस्थितीत बोट चालविणे, बचावकार्य आणि प्रथमोपचार यासाठी ही टीम सक्षम आहे. समाजाकडून अनेकदा उपेक्षा सहन करावी लागलेल्या समुदायाने संकटकाळात इतरांच्या जीवितरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, हे सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक समावेशाचे प्रभावी उदाहरण आहे. समता, बंधुता, न्याय आणि करुणा या मूल्यांवर आधारित समाजाच्या निर्मितीसाठी प्रशासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मयुरी आळवेकर यांनी, शिवाजी विद्यापीठाने तृतीयपंथीयांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेतले आहे. त्यांना वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यातही पुढाकार घेतला आहे. तथापि, व्यापक समाजाने तृतीयपंथीयांना वेगळे न पाहता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घ्यावे आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. सहायक आयुक्त सचिन साळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समाजकल्याणचे तालुका समन्वयक सचिन परब यांनी सूत्रसंचालन केले, तर समाजकल्याण अधिकारी अक्षय कुरणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी अंजली केसरकर यांच्यासह डॉ. किशोर खिलारे, डॉ. दीपक भोसले, डॉ. सरोज बीडकर तसेच, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी विविध महाविद्यालयांचे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तृतीयपंथी समजून घेताना...

दरम्यान, आज दिवसभरात झालेल्या विविध सत्रांमध्ये तृतीयपंथीय नागरिकांच्या समस्या, त्यांचे निराकरण, त्यांना सहकार्य आणि कायदेशीर मदत या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. कोल्हापूर जिल्हास्तरीय तृतीयपंथी हक्क व तक्रार निवारण समिती सदस्य शिवानी गजबर यांनी तृतीयपंथी समजून घेताना... या विषयावर अतिशय अंतर्मुख करणारे सादरीकरण केले. त्यानंतर तृतीयपंथी कायदे व धोरणांबाबत सामाजिक जागृती या विषयावर अविनाश भाले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

Tuesday, 25 August 2026

शिवाजी विद्यापीठाचे काळसेकर काव्य पुरस्कार

प्रभा गणोरकर आणि रवी कोरडे यांना जाहीर

प्रभा गणोरकर


रवी कोरडे


कोल्हापूर, दि. २५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांना तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ रवी कोरडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नियतकालिकांच्या संपादन व लघुनियतकालिक चळवळीत सक्रीय सहभाग असणाऱ्या सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. शिवाजी विद्यापीठात लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली आहे.

काळसेकर कुटुंबियांच्या वतीने सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून काव्य क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या कवींना ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ देण्यात येतो. रुपये २१,०००/- आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, आश्वासक कविता लेखन करणाऱ्या तरुण कवीला ‘ऋत्विज काळसेकर पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. या पुरस्‍काराचे स्‍वरूप रुपये १०,०००/- आणि सन्मानचिन्ह असे आहे.

सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्‍येष्‍ठ कवयित्री व समीक्षक प्रभा गणोरकर यांना देण्यात येत आहे. प्रभा गणोरकर या मूळच्‍या अमरावती येथील असून मराठीतील ज्‍येष्‍ठ कवयित्री आणि समीक्षक म्‍हणून त्‍यांची साहित्‍यविश्‍वाला ओळख आहे. त्‍यांचे विवर्त’, ‘व्‍यतीतव्‍यामोह हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. गणोरकर यांची कविता पुरुषी पर्यावरणात स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या यातनामय आयुष्याचे अत्यंत गंभीर व संयत स्वरात केलेलं आर्त प्रकटन आहे. आधुनिक स्त्रीची संवेदनशीलता व तिच्या अस्तित्वाशी निगडीत वेगवेगळे प्रश्न गणोरकर यांच्या कवितेतून अभिव्यक्त झाले आहेत. निसर्ग आणि सृष्टीविषयीचे एक वेगळे संवेदन त्यांच्या काव्यसृष्टीत आहे.

नव्‍या पिढीतील आश्‍वासक काव्‍य लेखनासाठी दिला जाणारा ‘ऋत्विज काळसेकर पुरस्कार’ हा छत्रपती संभाजीनगर येथील कवी रवी कोरडे यांना जाहीर झाला. त्‍यांचे धूसर झालं नसतं गाव’, ‘भुंड्या डोंगरांचे दिवस हे महत्‍वाचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कृषी जीवनातील पडझड, ग्रामीण व मानवी जीवनातील गुंतागुंत, ग्रामीण माणसाचे मातीशी असणारे घट्ट नाते, हरवलेल्या भूतकाळ व मातीवरील गाढ निष्ठेची ही कविता आहे. रवी कोरडे यांना यापूर्वी युवा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

काळसेकर काव्‍य पुरस्‍काराचे हे पाचवे वर्ष असून सतीश काळसेकर काव्‍य पुरस्‍कार यापूर्वी वसंत आबाजी डहाके, नारायण कुलकर्णी-कवठेकर, अनुराधा पाटील, अरुणचंद्र गवळी यांना देण्‍यात आला आहे. तर ऋत्विज काळसेकर पुरस्कार दिशा पिंकी शेख, वर्जेश सोळंकी, वीरधवल परब, फेलिक्‍स डिसोजा यांना देण्‍यात आला आहे. पुरस्‍कार निवड समितीचे प्रा. नीतीन रिंढे (मुंबई), प्रा. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) व प्रा. रणधीर शिंदे यांनी काम पाहिले.