 |
| पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची डी.लिट. ही सन्मानदर्शक पदवी प्रदान करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.जे. पवार. सोबत (डावीकडून) परीक्षा नियंत्रक महेश काकडे, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे आणि कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळ्ये. |
(शिवाजी विद्यापीठाने पद्मश्री डॉ. डी.
वाय. पाटील यांना दि. २९ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या ५१ व्या दीक्षान्त समारंभात
डी.लिट. ही सन्मानदर्शक सर्वोच्च पदवी देऊन गौरविले. त्यावेळी डॉ. पाटील यांना
प्रदान करण्यात आलेले गौरवपत्र...)
शैक्षणिक, सामाजिक
आणि आध्यात्मिक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा वैशिष्टयपूर्ण ठसा उमटविणारे, राजकीय
क्षेत्रात अत्यंत निःस्पृह वृत्तीने राहून यशोशिखरे सर करणारे, बिहार
आणि त्रिपुरा या राज्याचे राज्यपालपद यशस्वीपणे भूषविलेले आणि स्वतःच्या कार्याचा
ठसा अखिल भारतीय पातळीवर उमटवून नावलौकिक प्राप्त करणारे, कोल्हापूरच्या
वैभवशाली परंपरेला अधिक समृध्द आणि देदिप्यमान करणारे, उंच
यशोशिखरावर आरूढ झालेले अत्यंत विनयशील व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री डॉ. डी. वाय.
पाटील तथा दादा.
जन्मतःच सामाजिकतेचे भान असलेले आणि
दुःखी जनांच्या सांत्वनासाठी, अज्ञान अंधःकारात पिचत पडलेल्या
समाजासाठी शिक्षणाचा प्रारंभ झाला पाहिजे असे, मौलिक
विचारचिंतन करणारे, अवघ्या समष्टीचा विचार हाच ज्यांचा
ध्यास आहे, असे थोर, झळझळीत
रत्न या कोल्हापूरच्या मातीच्या कुशीत जन्मले ते म्हणजे पद्मश्री डॉ. डी. वाय.
पवार पाटीलसाहेब हे होत.
डी. वाय. पाटीलसाहेब! शेतकऱ्यांचे
कैवारी, गरिबांचे वाली, प्रतिष्ठित
शेतकरी आणि साऱ्या पंचक्रोशीत ज्यांना ‘बावड्याचे
आबा’ म्हणून ओळखले जात असे, त्या आध्यात्मिक वृत्तीच्या यशवंतराव या
पित्याच्या आणि वत्सलाबाई या मातेच्या पोटी २२ ऑक्टोबर १९३५ रोजी आपला जन्म झाला.
आपण केवळ सात वर्षाचे असताना १९४२ मध्ये आपल्या मातोश्री देवाघरी गेल्या आणि ६
फेब्रुवारी १९५४ रोजी वडिलांचा मृत्यू झाला. आईवडिलांचा मृत्यू हा आपल्यावर झालेला
वज्राघात होता. प्राप्त परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे गेलात आणि शिक्षण अर्धवट
सोडून आपण मोठ्या हिमतीने शेतीची आणि घराची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतलीत. आपण
स्वतःला सावरून शेतीत लक्ष घातलंत. शेतीबरोबरच लाल मातीची मशागत सुरू झाली, नामवंत
मल्ल म्हणून अल्पकाळात लौकिक प्राप्त केला. कुस्तीबरोबर, क्रिकेट
हा देखील आपला आवडता खेळ होता कुस्तीमुळे आपलं शरीर बलदंड झालं आणि क्रिकेटमुळे ते
पोलादी बनलं.
अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण
करण्यासाठी आपण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन बी.ए. ही पदवी घेतली
आणि पुढे शिवाजी विद्यापीठाच्या एल.एल.बी. या परीक्षेत आपण प्रथम श्रेणीत प्रथम
क्रमांकाने उत्तीर्ण झालात. तसेच राज्यशास्त्र एम.ए. ही पदवी आपण पुणे
विद्यापीठातून प्राप्त केली. वयाच्या १९ व्या वर्षी आपण सहकार आणि राजकीय
क्षेत्रात प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा मार्केटिंग कमिटीचे चेअरमन, शेतकरी
सहायक मंडळाचे अध्यक्ष अशी मानाची पदे आपल्यापर्यंत चालत आली, १९६४
साली कैरो व युगोस्लाव्हिया येथे भरलेल्या युथ कॉन्फरन्ससाठी आपण प्रतिनिधित्व
केले. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काळम्मावाडी धरण झाले पाहिजे
म्हणून शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढा उभा केला. त्यासाठी आपली आमदारकी पणाला लावली
आणि त्या कामात आपण यशस्वी झालात.
शेती महामंडळाचे संचालक, इंटकचे
अध्यक्ष, रेल्वे सल्लागार मंडळाचे सदस्य, पश्चिम
महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे चेअरमन अशा विविध पदांवर आपण १९७२ पासून सतत कार्यरत
राहिलात.
आपणास भूतकाळाचा आधार असला तरी त्यातच
रमून न जाता आपण वर्तमानातून उज्ज्वल भविष्याचा वेध घेतला. कोणतेही सामर्थ्य हे
नित्यकर्मातून मिळते असे मानून कर्मसाधना केली. प्रारब्ध हे काही आकाशातून पडत
नाही, आपल्या सत्त्वशील कर्मातूनच ते साकार होते. अशी
मनोमनी खूणगाठ बांधून आपण समाजाच्या उत्कर्षाच्या क्षितिजाकडे झेपावत राहिलात.
आपल्या अंतःकरणात गोरगरीब, दुःखीत,
वंचित यांच्याविषयी अपार करूणा असल्याने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा
फोडण्यासाठी ऐन तारुण्यात चळवळ उभी केली. अशा चळवळी उभ्या करताना आपण सतत भलेपणाची, सच्चेपणाची
सोबत केली. कोल्हापूर शुगर मिल हा खाजगी मालकीचा कारखाना शेतकऱ्यांच्या घामाला
न्याय देत नाही असे दिसताच आपण त्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी, त्याविरुद्ध
लढा उभारण्यासाठी शेतकऱ्यांची संघटना बांधली. महाराष्ट्रातील ही पहिलीच शेतक-यांची
संघटना होती. या संघटनेद्वारे अन्यायाविरुध्द लढा उभारला आणि खाजगी कारखाना सहकारी
कारखाना व्हावा यासाठी प्रयत्न केला. अशाप्रकारे 'सहकार' तत्त्वाचा
पहिला उद्घोष आपण केलात.
वारणेतील चांदोली धरणाच्या चळवळीत आपला
सक्रीय सहभाग सर्वपरिचित आहे. धरणग्रस्तांविषयी, विस्थापित
होणाऱ्या भूधारकांच्याविषयी आपल्या मनात आस्था होती. काळम्मावाडी धरणाच्या
आंदोलनात तर आपण अग्रणी होताच. त्यासाठी आपण त्याची निर्गत लागेपर्यंत अथक परिश्रम
केले. सीमाप्रश्नाची चळवळ उभी राहिली, तेव्हा मराठी भाषकांवर होणारा अन्याय पाहून
आपण पेटून उठलात आणि विधानसभेत आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केलीत.
कसबा बावड्याच्या श्रीराम सोसायटीला
विकासाची योग्य दिशा मिळावी, तिचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक व्हावे,
म्हणून अल्प वयातच तिची धुरा आपण सांभाळलीत. दुर्बल, निराधार, असहाय, वंचित, उपेक्षित
घटकांविषयी केवळ शाब्दिक, भावनिक, पोकळ
आणि भोंगळ असा कैवार आपल्या ठायी कधीच नव्हता. तो आपल्या आत्मिक कर्मनिष्ठेचा सबल
उद्गार होता. 'संकल्पसिध्दी'साठी
होकारार्थी मन असणे महत्त्वाचे असते, तसे ते आपले आहे. आपण हाती घेतलेले संकल्पित
कार्य आपल्या मनावर अगोदरच पूर्णार्थाने ठसलेले असावे, असे आपले मत आहे.
जीवनात यशस्वी, सुखी, स्थिर
व्हायचे असेल तर, आपले विचार, भावना
आणि वर्तन यात समतोल असावा. निर्णयक्षमता, जजमेंट, परिपक्वता, प्रगल्भता
या सर्वांचा सुमेळ विचारपूर्वक घालावा लागतो. अशी निर्णयक्षमता आपण मिळवली,
म्हणूनच आपण नवनव्या वाटा शोधल्या, आपण
राजकारण स्वीकारले तेही समाजकारणासाठीच. लोकविकास हेच त्याचे मूळ सूत्र होते.
आपल्या राजकारणातील अकरा वर्षे जनसामान्यांच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी
वेचली. डोंगराळ, मागास, अडाणी, उपेक्षित, दुर्लक्षित
भागांचा विकास हाच आपला ध्यास होता. म्हणूनच आपल्या कार्यकर्तृत्त्वाने भारावलेली
निरपेक्ष लोकशक्ती आपल्या पाठीशी उभी राहिली, असा
लोकजिव्हाळा उगाच मिळत नाही. त्यासाठी निर्मम वृत्तीने वागावे लागते. आचरण शुद्ध
राहावे लागते. निर्वैर वृत्तीने प्रत्येक पाऊल टाकावे लागते. आपण अष्टावधानी
वृत्तीने हे साधले आहे.
आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात
१९५७ ला झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा तो काळ. या काळात कोल्हापुर
म्युनिसिपल कौन्सिलवर काँग्रेसचा फक्त एक नगरसेवक निवडून आला. तो नगरसेवक म्हणजे
डी. वाय. पाटील!
एवढी लोकप्रियता आपण त्या काळात मिळवलेली होती. त्यानंतर आपण अनेक पदांवर काम
केले. १९६७ ते १९६८ या काळात आपण महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सदस्य होतात.
१९८८ पासून आपण भारत 'मॉरीशस ब्रदरहूड ऑफ महाराष्ट्राचे' अध्यक्ष
म्हणून काम पहात आहात. आपल्या नेतृत्वाखाली हे मैत्रबंध खूपच दृढ झाले आहेत. अनेक
जबाबदाऱ्या आपल्या राजकीय कारकिर्दीत आपण स्वीकारल्या आणि त्या आपण समर्थपणे पार
पाडल्यात. परंतु आपण राजकारणात फार काळ रमला नाहीत.
पाटीलसाहेब, आपला
पिंड मुळात राजकीय नेता म्हणून नव्हता. समाजाभिमुख व्यापक जनहितासाठी कळवळा
असलेल्या मनस्वी साधकाचा हा मनोधर्म होता. मतदारांकडे ‘मतदाता’
म्हणून पाहणाऱ्या कोरड्या राजकारण्यांच्या पलीकडे आपण उमदेपणाने उभे होता. सर्वस्पर्शी, सर्वांगीण
विकासाने समाजऋण फेडता येईल, या प्रांजल भावनेने आपण राजकारण केले. मतलबी, सत्तास्पर्धा, राजकीय
डावपेच, भेदाभेद, कपटनीती
यांचा स्पर्शही आपल्या मनाला झाला नव्हता. सर्वात्मक समभावाने विकासाची सर्व
क्षेत्रे आपण जवळ केलीत. म्हणूनच राजकारणाचा पट सोडल्यानंतर सर्वसामान्यांच्या
मनःपटलावर जिव्हाळ्याचे स्थान मिळवता आले. आपल्याविषयी माजी केंद्रीय मंत्री
शंकरराव चव्हाण "सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा
व ध्येयपूर्तीची जिद्द जीवनाची मूल्ये मानल्याने आज आपण समाजाच्या विश्वासाचे
प्रतीक बनले आहात," असे म्हणतात, ते सर्वार्थाने खरेच आहे. राजकारणात कटू
अनुभव आल्याने प्रसंगी सत्याचा अपलाप झालेला पाहून आपण राजकारणातून संन्यास घेऊन
शैक्षणिक कार्याकडे वळलात. मूलतः मानवी कल्याणाला हितकारक असणारे शिक्षण आपल्या
अध्यात्मप्रवण मनाला अधिक भावत होते. साधुसंतांच्या शिकवणुकीचा प्रभाव आपल्या
श्रध्दाशील अंतःकरणावर होता. म्हणूनच आपण शिक्षण प्रसाराचा ज्ञानमार्ग अंगीकारला.
दुरितांचे तिमिर जाओ! विश्व स्वधर्म
सूर्येपाहो!
जो जे वांछिल तो ते लाहो! प्राणीजात!
हेच संत ज्ञानदेवांचे पसायदान आपल्या
व्यक्तिमत्वात मुरलेले आहे, त्या ज्ञानसूर्याची आराधना
आरंभण्यापूर्वी म. फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी
शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक
कार्याची मुद्रा आपल्या मनावर ठसली होती. त्यांच्या सामाजिक समतेचा स्फुल्लिंग
आपल्या मनाला चेतवित होता. कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी
बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक
कार्याचे प्रत्यक्ष दर्शन आपणास घडले होते. आपण अमर्याद जिद्दीने महाराष्ट्राचे
शैक्षणिक अवकाश उजळून टाकलेत.
नित्याचे दूरदर्शी विचारमंथन व नव्याचा
शोध घेणाऱ्या विचारांची खंबीर बैठक यामुळे पारंपरिक शिक्षणाची कालबाह्यता ओळखून, गतिमान
विज्ञान युगाचा वेध घेऊन आपण तंत्रज्ञान शिक्षणाची कास धरली. आपली क्रिकेटची आवड
नव्या मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान या रुपाने फलद्रूप
झाली.
देशविख्यात मौनी विद्यापीठाचा अनुभव
आपल्या गाठीशी होताच. शिवाय कर्नाटकातील बंगळूर येथील टी.एम.ए. पै यांची तांत्रिक
शिक्षणसंस्था १९६७ साली पाहून तशीच शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात झाली पाहिजे, असा
ध्यास आपल्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हता. या विचाराला पूरक व प्रेरणा देणारी
घटना १९८३ साली घडली. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, सहकार
महर्षी मा. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विनाअनुदान तत्त्वावर
तांत्रिक व वैद्यकिय शिक्षणसंस्था सुरू करण्याचा क्रांतिकारक, तितकाच
धाडसी निर्णय घेतला गेला. त्यामध्ये सक्रीय सहभागी होण्याचे आपण निश्चित केले, त्यासाठी
एक संस्थात्मक संरचनेची गरज होती. ती गरज आपण १९८३ मध्ये रामराव आदिक यांच्या
पाठिंब्याने संस्था स्थापना करून भरून काढली. पहिल्या अभियांत्रिकी
महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आपण स्वतःची सर्व स्थावर, जंगम
मालमत्ता गहाण ठेवली आणि शैक्षणिक कार्याची सुरूवात केली. याचबरोबर आपण
महाराष्ट्रातील इतर शिक्षण संस्थांच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. १९७५ ते
१९९४ या काळात आपण गारगोटी, जि. कोल्हापूर येथील मौनी विद्यापीठाचे
अध्यक्ष होतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या
कार्यकारिणीचे सदस्य (१९७२-१९७८) मुंबई विद्यापीठ (१९८५-८७) तसेच पुणे विद्यापीठ
(१९८९-१९९१) आणि शिवाजी विद्यापीठ (१९९०-१९९३) यांच्या सिनेटचे सदस्य म्हणूनही काम
केले आहे. एआयसीटीईच्या वेस्टर्न रिजनचे चेअरमन म्हणून १९९४-१९९८ या काळात आपण
उत्कृष्ट काम केले आहे.
आपण शिक्षण क्षेत्रात पदार्पण केलेत
आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला. जागतिक
घटितांच्या संदर्भातून नवनिर्माण सुरू झाले. एकविसाव्या शतकाच्या अवघ्या पटावर
आत्मविश्वासाने पावले टाकणारी समर्थ अशी नवी पिढी घडत राहिली, घडत
राहील. आपल्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. शिक्षण समूहाने शिक्षणक्षेत्रात गरूडभरारी
घेतली आहे. आर्टस, कॉमर्स, वैद्यकिय, अभियांत्रिकी, फार्मसी, आय.टी., आर्किटेक्चर, कृषी
व हॉस्पिटॅलिटी अशा सर्वच क्षेत्रातील शिक्षणसाठीच्या
सर्व सोयीसुविधा आपण उपलब्ध करून दिल्या. आज आपल्या नावे तीन अभिमत विद्यापीठे
कार्यरत आहेत. आणि त्याअंतर्गत १५० हून अधिक शैक्षणिक केंद्रे उभी आहेत. त्यामधून
२ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.
आपण एवढ्यावर थांबला नाहीत, तर
त्रिपुराच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्रिपुरा हे 'एज्युकेशन
हब' म्हणून विकसित करण्यास आपण सुरूवात केली. त्यास
आज मूर्त स्वरूप आले असून तेथे दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, दोन
अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्रिपुरा विद्यापीठाची स्थापनाही आपण
केली. तथापि, आपल्या मनात घर करून असलेला शेतकरी आपणास शांत बसू देत नव्हता.
राजभवनातच ऊस लागवडीचा प्रयोग सुरू केला आणि त्रिपुरामधील शेतकऱ्यांना ऊस लागवडीस
प्रोत्साहन दिले. त्रिपुरावासियांना फक्त आपण सहकाराचा मंत्र सांगितला नाही, तर
सहकारामधून विकास कसा साधता येतो याचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, म्हणून त्रिपुराच्या
शिष्टमंडळास कोल्हापुरातील ‘गोकुळ
दूध प्रकल्प’ पाहण्यासाठी
पाठविले आणि त्या प्रकल्पास गती दिली. त्रिपुरामधील हायकोर्ट बेंचही आपल्याच
प्रयत्नाने सुरू झाले. काही काळ आपणास बिहारचे राज्यपाल म्हणूनही काम करण्याची संधी
मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करण्याची आपली जीवनपद्धती असल्याने आपण तेथे पाटणा
येथील गंगा नदीवर लिफ्ट इरिगेशन सुरू करून दाखविले. बारा खाजगी साखर कारखाने बंद
पडले होते. त्यांना प्रोत्साहन दिले. परिणामी बंद साखर कारखाने सुरू झाले.
त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळताना राज्यपालपदाचे मानधन म्हणून
फक्त रूपया मानधन स्वीकारण्याचा एक नवीन पायंडा पाडला. हे एक वेगळेपण डी. वाय. या
नावातच दडलेले आहे.
विधायक विचार, ज्ञानप्रसाराची
दुर्दम्य आकांक्षा, हितचिंतकांची सदिच्छा, संकल्पसिद्धीला
पूर्णत्वाला नेणारी अनाकलनीय शक्ती, मानवी
करूणा यामुळे आपले हे सामाजिक उत्थानाचे शिक्षणकार्य अधिक व्यापक विशाल रूप घेऊन
देशविदेशात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करीत आहे. यामुळेच विदेशातही आपला गौरव
झाला. सन्मान मिळाले. १९८८ मध्ये अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठाने आपणास 'डॉक्टरेट' पदवी
देऊन आपला सन्मान केला तर १९९६ मध्ये इंग्लंडच्या नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठानेही
आपणास डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी बहाल केली. अलीकडेच भारतातील काही
विद्यापीठांनीही आपणास डॉक्टरेट पदवी देऊ केली आहे. २०१२ साली भुवनेश्वरच्या
कलिंगा इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रिअल टेक्नॉलॉजीने आपणास डॉक्टरेट तर
महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २०१४ मध्ये डी. एस्सी. पदवी देऊन
आपल्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आहे.
आपल्या देशानेही 'पद्मश्री' ही
बहुमानाची पदवी बहाल करून आपणास सन्मानाने अलंकृत केले आहे. पाटीलसाहेब, आपण
राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, सांस्कृतिक
क्षेत्र, कला, क्रीडा, साहित्य
इत्यादी क्षेत्रात निर्लोभी वृत्तीने भरघोस असे कार्य केले आहे. निरलसपणे, अखंड
व्रत घेऊन आपण माणसं घडवली. समाज घडवला. भौतिकातून आधिभौतिकातून मानव घडणीचे काम
केले आहे. ज्ञान हाच आपला श्वास आहे. निगर्वी वृत्ती हा ध्येयधर्म आहे.
आपण विचारवंत शिक्षणमहर्षी, समाजसेवी
राजकारणी आहात. भरभरून प्रेम देणारे कलाप्रेमी आहात. मनोज्ञ रसिक आहात. प्रत्येक
गोष्टीकडे पाहाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असणारे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे
श्रध्दानिष्ठ भक्त आहात. सौंदर्यवादी संवेदनशीलता असलेले आस्वादक आहात. अनेक
विचारवंताच्या, समाज सुधारकांच्या, संत
महंतांच्या तत्त्वविचारांचा व्यासंग असणारे समृद्ध व्यक्तिमत्व आहात.
आपण एक गुरूकुलच आहात. आपल्या
सहवासातले क्षण माणसाला जग विसरायला लावतात. विविध मानसिक स्तरांतील, अनेकविध
परिस्थितीच्या अवस्थांतील, अशिक्षितांपासून उच्च
विद्याविभूषितांपर्यत, सामान्य जनांपासून देशाच्या सर्वोच्च
पदावरील महनीय व्यक्तिंपर्यंत सारेच आपल्यावर मनापासून प्रेम करताना दिसतात.
पाटीलसाहेब, आपण शिवाजी विद्यापीठाचे
पदवीधर आहात. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून आपण काम केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आपण शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय, कृषी
अशा विविध शिक्षण शाखांची सुरूवात केली, त्यामधून
पिढ्या घडविल्या जात आहेत. कोल्हापूरच्या शैक्षणिक परंपरेत आपल्या माध्यमातून जी
चळवळ सुरू झाली आहे, ती फक्त कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता पुणे, मुंबई, मॉरीशस
पर्यंत पोहचली आहे. आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनाचा फायदा त्रिपुरा आणि बिहार राज्यांनाही
मोठ्या प्रमाणात झाला आहे. अशा करवीर नगरीतल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सन्मान
करण्याची संधी शिवाजी विद्यापीठास मिळत आहे, हा सुयोग आहे. आदरणीय पद्मश्री डॉ.
डी. वाय. पाटीलसाहेब, मोठ्या कृतज्ञ भावनेने डी. लिट. ही
सन्मानदर्शक पदवी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या वतीने आपणास आज प्रदान
करीत आहोत. प्रस्तुत पदवीचा आपण स्वीकार करावा, अशी विनंती आहे.