Saturday, 5 September 2026

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे - कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

 कोल्हापूर, दि.05 सप्टेंबर - आदिलशाही आणि मुघल साम्राज्याशी लढा देणारे शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे होते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द कादंबरीकार श्रीमती मेधा देशमुख भास्करन (बेंगलोर) यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रामार्फत गणित अधिविभागामधील रामानुजन सभागृहामध्ये 'आर्ट अँड लिटरेचर क्लब अंतर्गत' प्रसिध्द इंग्रजी कादंबरीकार श्रीमती मेधा देशमुख भास्करन (बेंगलोर) यांची मुलाखत तसेच संशोधक विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी कादंबरीकार देशमुख भास्करन बोलत होत्या.लेखिका प्रमिला जरग, मित्रा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख भास्करन मुलाखतीमध्ये पुढे म्हणाल्या, कादंबरीचे लेखन करताना अत्यंत उच्च दर्जाचे शब्द वापरून लोकांना शब्दकोश पाहण्यास भाग पाडले जावू नये. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती साध्य करण्यासाठी भाषा अडथळा ठरू शकत नाही. संयम असेल तर कोणतीही भाषा आत्मसात करता येते. नेपोलियन बोनापार्टवर एक लाखाहून अधिक पुस्तके इंग्रजीमधून लिहिलेली आहेत.तसेच, जागतिक पातळीवरील अनेक योद्धे, महायोद्‌ध्यांवर इतिहासकारांनी हजारो पुस्तके इंग्रजीमध्ये लिहिली आहेत.परंतू, जागतिक स्तरावर शिवरायांवर एकही पुस्तक इंग्रजीमध्ये उपलब्ध नव्हते.यातूनच, छत्रपती शिवाजी महाराजांवर इंग्रजीमधून लेखन करण्याची प्रेरणा मिळाली.वैश्विक पातळीवर शिवरायांचे कर्तृत्व योग्य प्रकारे पोहोचावे यासाठी इंग्रजी भाषेतून बायो-फिक्शन आणि चरित्रात्मक लेखन केले.शिवरायांवर पुस्तक लिहिण्यापूर्वी सुमारे 10 वर्षे 50 पेक्षा जास्त एेतिहासिक ग्रंथांचा आणि कागदपत्रांचा सखोल अभ्यास केला. शिवराय विरूध्द औरंगजेब हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता तर एका आक्रमाकाविरूध्द स्वत:च्या मातीचे आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी उभारलेले स्वराज्य होते.ज्येष्ठ इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार लिखित 'चिकित्सा' या पुस्तकाच्या प्रेरणेतून 'लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या पुस्तकासाठीची प्रेरणा मिळाली. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करताना संभाजी राजेंंनी दाखवलेली निष्ठा ही भारतीय इतिहासातील अतुलनीय शौर्यगाथा आहे.

शाहू संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.मंजुश्री पवार आणि इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.अवनीश पाटील यांनी मुलाखत घेतली. सूत्रसंचालन अभय गायकवाड यांनी केले तर डॉ.देविकाराणी पाटील यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमानंतर कादंबरीकार मेधा भास्करन यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देवून एेतिहासिक घटनांचे लेखन करताना घटना कोणत्या परिस्थितीत आणि कशा प्रकारे मांडली गेली हे कसे पाहावे लागते याचे वर्णन केले.

           याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ धमकले, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.अरूंधती पवार, अनिता पवार यांचेसह इतिहास प्रेमी जनता, विविध अधिविभागातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठयाप्रमाणात उपस्थित होते.

-----

Wednesday, 2 September 2026

बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर

विद्यापीठात वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, सुचेता कोरगांवकर, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. माणिकराव साळुंखे आणि डॉ. अतुल कापडी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर. समोर मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर व श्रोते.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात विविध ग्रंथ व विशेषांकांचे  कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. सुनीलकुमार लवटे, सुचेता कोरगांवकर, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. विजय चोरमारे, चंद्रकांत पोतदार, नीलम माणगावे, डॉ. सागर देशपांडे, अखिल मेहता आणि डॉ. रणधीर शिंदे.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)





कोल्हापूर, दि. २ सप्टेंबर: मानवी जीवनातील नैतिक द्वंद्व, स्त्री-पुरुष संबंध, सामाजिक विषमता, शिक्षणाचे उद्दिष्ट आणि शोषणमुक्त समाजाची आकांक्षा यांचा वेध घेणारे, वि. स. खांडेकरांचे साहित्य आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतही तितकेच प्रस्तुत आहे. त्यांच्या साहित्याचा गाभा मानवी जीवनाच्या सार्वकालिक प्रश्नांशी जोडलेला असल्याने नव्या पिढीने खांडेकरांना केवळ अभ्यासक्रमापुरते न पाहता त्यांच्या साहित्याचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्षाच्या सांगता समारंभात ‘वि. स. खांडेकर : सुवर्ण स्मरण’ या विषयावर विशेष स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सुनीलकुमार लवटे, खांडेकरांचे नातू डॉ. अतुल कापडी प्रमुख उपस्थित होते.

खांडेकरांच्या ‘ययाती’ची आजची प्रस्तुतता १९६०च्या दशकापेक्षाही अधिक असल्याचे सांगताना डॉ. मुणगेकर यांनी ‘क्रौंचवध’मधील दिनकर-सुलोचना यांच्या नात्यातून शारीरिक वासनेपलीकडील आंतरिक प्रेम, तर ‘ययाती’मधून पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्रीच्या शोषणाचे टोकदार चित्रण खांडेकरांनी केले असल्याचे नमूद केले. मानवी जीवनातील विविध टोकांमधील संघर्ष आणि त्याचा आलेख मांडणारा साहित्यिक म्हणून खांडेकरांचे महत्त्व अधोरेखित होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. मुणगेकर यांनी खांडेकरांच्या विविध साहित्यकृतींच्या आधारे त्यांच्या लेखनातील मानवी जीवनाचा व्यापक पट उलगडला. ते म्हणाले, खांडेकरांच्या साहित्यातून उपभोगवाद, पुरुषप्रधान मानसिकता आणि मानवी वासनेचा संघर्ष, प्रेम, त्याग, नैतिकता आणि हिंसेविषयीची भूमिका आजच्या समाजातील अनेक प्रश्नांशी थेट संवाद साधते. खांडेकर केवळ अलंकारिक भाषेचे साहित्यिक नव्हते, तर मानवी जीवनाचे भाष्यकार होते. जीवनात निर्मळता, सुसंस्कृतपणा, ध्येयनिष्ठा आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, हे त्यांच्या साहित्यामागील मूलभूत स्वप्न होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढेही टिकून राहते.

‘क्रौंचवध’चा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव

क्रौंचवध’मधील दिनकरच्या व्यक्तिरेखेने मला इतके प्रभावित केले की, माझ्या आयुष्याची वाटचालही त्याच मार्गाने व्हावी, अशी इच्छा निर्माण झाली. विद्यार्थीदशेतील त्या साहित्यिक अनुभवाने मला जीवन जगण्याची प्रेरणा दिली. गेल्या पन्नास वर्षांच्या माझ्या जीवनप्रवासात खांडेकरांचे ऋण अग्रस्थानी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते माझ्यावर राहील, अशी कृतज्ञ भावना डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी खांडेकरांचे साहित्य हे केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, तंत्रज्ञानामुळे माणूस अधिक सामर्थ्यवान झाला असला, तरी तो अधिक ‘माणूस’ झाला आहे का, हा प्रश्न आज विचारण्याची गरज असून खांडेकरांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असलेली माणुसकी, नैतिकता, संवेदना, सामाजिक बांधिलकी आणि जीवनदृष्टी आजच्या पिढीला दिशादर्शक ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पदवी नव्हे, तर विचार; केवळ कौशल्य नव्हे, तर विवेक आणि रोजगारासाठीच नव्हे, तर जीवनासाठी शिक्षण देणे, हीच खऱ्या अर्थाने खांडेकरांना आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे शिवाजी विद्यापीठाशी स्थापनेपासूनच अतूट नाते राहिले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून खांडेकरांनी प्रारंभीच्या काळात विद्यापीठाला मार्गदर्शन केले, तर ज्ञानपीठ पुरस्कारानंतर त्यांना मानद डी.लिट. पदवी देणारे महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले. शिवाजी विद्यापीठाने साकारलेले खांडेकरांचे स्मृती संग्रहालय म्हणजे विद्यापीठाने खांडेकरांविषयी जपलेल्या आदरभावाचेच प्रतीक आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही साहित्यिकांच्या प्रत्यक्ष विचारांतून आणि अनुभवांतून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, आज माहिती आणि भाषणे काही क्षणांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होत असली, तरी प्रत्यक्ष दिग्गज साहित्यिकांचे विचार ऐकताना मिळणारा भावनिक आणि मानवी स्पर्श कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकत नाही. खांडेकरांच्या साहित्यात केवळ एका पिढीला नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही घडविण्याची क्षमता असल्याने अशा साहित्यिकांच्या विचारांशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद घडविणारे कार्यक्रम सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.

यावेळी सुचेता कोरगावकर आणि डॉ. अतुल कापडी यांनीही खांडेकरांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला डॉ. शरद नावरे, बी.एस. पाटील, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. अनिल गवळी, चंद्रकांत पोतदार, तनुजा शिपूरकर, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. सागर देशपांडे यांच्यासह शिक्षक, आंतरभारती संस्थेतील शिक्षक व सेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खांडेकरांविषयी ग्रंथचर्चा व विशेषांकांचे प्रकाशन

दिवसभरात झालेल्या सत्रांमध्ये पुणे येथील प्रा. मिलींद जोशी व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वि.स.खांडेकर यांचे असंग्रहित लेखन व त्यांच्याविषयीचे ग्रंथ या विषयीचे सत्र पार पडले. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. या सत्रात वि.स. खांडेकर लिखित वृंदावन (कादंबरी), आगरकर चरित्र, स्मृतींची चाळता पाने (संकीर्ण), अर्ध्यदान (काव्यसंग्रह प्रस्तावना) या ग्रंथांसह आंतरभारती: उगम आणि विकास (लेखक- डॉ. सुनीलकुमार लवटे), कुमारांसाठी वि.स. खांडेकर (ले. नीलम माणगावे), वि.स. खांडेकर: साहित्यिक आणि माणूस (ले. राम देशपांडे), वि.स. खांडेकर चरित्र (ले. डॉ. लवटे), वि.स. खांडेकर: एक ध्येयवादी शिक्षक (ले. जया दडकर) या पुस्तकांचेही प्रकाशन झाले. त्याचबरोबर साप्ताहिक साधना, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जडण-घडण, मेहता ग्रंथजगत या नियतकालिकांच्या खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले.

Monday, 31 August 2026

विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, आकांक्षांचे अभ्यासक्रमात रूपांतर होणे गरजेचे: प्राचार्य अनिल राव

शिवाजी विद्यापीठात एनईपी-२०२०विषयक कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्राचार्य अनिल राव. सोबत (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. अजय साळी, विवेक सिनारे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि डॉ. चेतना सोनकांबळे.


शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राचार्य अनिल राव.

कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित असणारे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी.

(कार्यशाळेची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात उमटून त्यांचे रूपांतर प्रत्यक्ष शिक्षणात झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य, बहुविषयांचे शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, इंटर्नशिप तसेच विविध माध्यमांतून क्रेडिट मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी-२०२०) अंमलबजावणी सर्व स्तरांवर प्रभावीपणे होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या एनईपी-२०२० टास्क फोर्सचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि शिक्षणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिविभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी ‘एनईपी-२०२०ची अंमलबजावणी आणि त्यामधील आव्हाने’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. अजय साळी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनिल राव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना एनईपीच्या विविध पैलूंविषयी त्यांची मते जाणून घेतली. विषय निवडीतील लवचिकता, मल्टिपल एंट्री-एक्झिट, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, सर्वांगीण विकास, कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षण, इंटर्नशिप आणि इंडियन नॉलेज सिस्टिम या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अपेक्षा प्रत्यक्षात आणणे हीच धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीची खरी कसोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एनईपीची अंमलबजावणी करताना विद्यापीठांनी पारंपरिक व कठोर चौकटींपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक लवचिक पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगताना राव म्हणाले, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, ‘कॅफेटेरिया ॲप्रोच’द्वारे विषय निवडीचे स्वातंत्र्य, विविध संस्थांमधून क्रेडिट मिळविण्याची सुविधा, कौशल्य व ऑन-जॉब ट्रेनिंग, अप्रेंटिसशिप, मातृभाषेतून शिक्षण आणि पूर्वज्ञानाला मान्यता अशा संधी विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी अभ्यास मंडळांनी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि बदलत्या जगाच्या गरजा समजून घेऊन अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करावे, तसेच शिक्षक व प्रशासकीय यंत्रणेने मानसिकतेतील पारंपरिक बंधने दूर करून प्रयोगशीलता स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पुणे येथील रेझोनन्स आंत्रप्रिन्युअर अँड एम्प्लॉएबिलिटी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सिनारे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, उच्चशिक्षणाचे लोकशाहीकरण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असून, ते साध्य करण्यासाठी एनईपी-२०२०ची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. उच्चशिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण २०३५ पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांची गळती रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘स्कूल कनेक्ट’सारखे उपक्रम, बहुविषयांचे शिक्षण, मल्टिपल एंट्री-मल्टिपल एक्झिट, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित परीक्षा पद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. एनईपीच्या अंमलबजावणीतील मोठे आव्हान हे केवळ प्रशासकीय नसून मानसिकता, धोरणाची समज आणि विविध संस्थांमध्ये आवश्यक असलेली सुसूत्रता हे आहे. त्यामुळे धोरणकर्ते, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यशाळेपुरते मर्यादित न राहता त्यातील विचार प्रत्यक्ष शैक्षणिक व्यवहारात आणण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही डॉ. कामत यांनी केले.

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी परिचय करून दिला. डॉ. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.