कोल्हापूर, दि.१६ फेब्रुवारी - शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागाने एकाचवेळी पाच यशस्वी माजी उद्योजक विद्यार्थ्यांसोबत सामंजस्य करार केला. या करारामुळे विद्यापीठातील चालू शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या, रोजगाराच्या आणि प्रशिक्षणाची नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. 'माझे विद्यार्थी, माझे संशोधक' या संकल्पनेवर आधारित अशा प्रकारचा सामंजस्य करार विद्यापीठामध्ये प्रथमच करण्यात आला. या करारामुळे संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्सहान व प्रेरणा मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण करार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहामध्ये प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या करारामुळे शिवाजी विद्यापीठ हे केवळ पदव्या देणारे केंद्र न राहता, उद्योजक घडवणारे केंद्र म्हणून समोर येत आहे.
विद्यापीठाने ज्या पाच कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे, त्या सर्व कंपन्यांचे नेतृत्व विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी करत आहेत. अक्षय पाटील (कॅलस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर), अजय अदाटे (ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे) , डॉ.स्वप्नील पाटील (इकोझेनिथ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर ), स्वप्नील देसाई (पेऑन लॅबोरेटरीज एलएलपी, कोल्हापूर), डॉ. पराग कोळेकर (अल्फा नोवोबायोटिक्स, सांगली) या करारामुळे विद्यार्थ्यांना या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. विद्यापीठातील संशोधक आणि कंपन्यांचे तज्ज्ञ मिळून नव्या उत्पादनांवर संशोधन करतील. गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकेल. माजी विद्यार्थी आपल्या अनुभवातून सध्याच्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे देतील.
कोल्हापूर, सांगली आणि पुणे यांसारख्या शहरांत कार्यरत असणाऱ्या या कंपन्यांमुळे स्थानिक पातळीवर संशोधनाला चालना मिळणार आहे. 'शिका आणि कमवा' यासोबतच 'शिकतानाच उद्योजक व्हा' या संकल्पनेला यामुळे बळ मिळणार आहे. याप्रसंगी डॉ. सुषमा पाटील यांनी प्रास्ताविक केले डॉ. दीप्ती कुऱ्हे यांनी आभार मानले.
-------------







.jpg)
.jpg)







