शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र, भारत) येथील दैनंदिन ठळक घडामोडींचा वृत्तांत देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी निर्मिलेला ब्लॉग.
‘ए.आर.’ शैक्षणिक प्रणाली, ‘क्यू. आर.’ बॅंकिंग प्रणालीच्या औद्योगिक उपयोजनासाठी
महत्त्वपूर्ण
शिवाजी विद्यापीठात एक्सलॉजिया कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि शैलेश कोपार्डेकर. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. नितीन माळी, डॉ. सुधीर देसाई आणि उपस्थित शिक्षक व कंपनीचे अधिकारी
कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: शिवाजी
विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर व्हावा, या दृष्टीने
तिची सिद्धता होणे हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. त्याचा समाजाबरोबरच विद्यार्थ्यांनाही
लाभ मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण
स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि पुणे येथील एक्सलॉजियाटेक एलएलपी
यांच्यामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या आभासी वास्तविकता (SUK-AR)शैक्षणिक प्रणालीतील डिजिटल अॅसेट्स आणि क्विक रिस्पॉन्स आधारित(QR based)बँकिंग प्रणालीचा वापर आणि वितरणयासाठी काल सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या
बोलत होत्या.
यावेळी एक्सलॉजिया कंपनीचेशैलेश कोपर्डेकर म्हणाले, विद्यापीठाने विकसित केलेले नवोपक्रम आणि तंत्रज्ञान
प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय क्षेत्रापर्यंत पोहोचविणे
आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन
या करारासाठी पुढाकार घेतला.यासमाजोपयोगी विद्यापीठीय संशोधनाचासमाज आणि उद्योग क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी नजीकच्या काळात प्रयत्न
करण्यात येतील.
यावेळी सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि श्री.
कोपार्डेकर यांनी स्वाक्षरी केल्या. स्कूलचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. डॉ. सुधीर देसाई
यांनी सामंजस्य कराराविषयी सविस्तर माहिती दिली.डॉ. वैशाली भोसले
यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी डॉ. कविता वड्राळे,डॉ. संतोष सुतार, डॉ. परशुराम वडार, डॉ. तेजश्री मोहरेकर,डॉ. मनस्वी
कोपार्डेकर व अभिजित जाधव उपस्थित होते.
तीन महिन्यांपासून जोडीचे वास्तव्य; समृद्ध व सुरक्षित जैवविविधतेवर शिक्कामोर्तब
शिवाजी विद्यापीठात आढळलेली पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाची जोडी (छाया. महेंद्र गायकवाड)
शिवाजी विद्यापीठात जोडीने विहार करणारी पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाची जोडी (छाया. महेंद्र गायकवाड)
(उपरोक्त तीन फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षित पर्यावरणात मुक्तपणे विहार करणारा समुद्री गरूड (छाया. महेंद्र गायकवाड)
(डॉ. सुनील गायकवाड यांनी दिलेल्या माहितीची लघुचित्रफीत)
कोल्हापूर, दि. १७ एप्रिल:शिवाजी विद्यापीठ परिसरात दुर्मिळ मानल्या
जाणाऱ्या पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूड (White-bellied Sea Eagle) या भव्य
पक्ष्याच्या जोडीचे दर्शन घडल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नोंद
झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही जोडी विद्यापीठ परिसरात वास्तव्यास असून त्यामुळे
विद्यापीठ परिसरातील सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ. सुनील गायकवाड आणि
युवा पक्षीनिरीक्षक महेंद्र गायकवाड यांना फेब्रुवारी २०२६मध्ये सर्वप्रथम भाषा
भवन तलाव परिसरात या जोडीचे दर्शन घडले. तेव्हापासून त्यांचे येथे नियमित वास्तव्य
असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. गायकवाड यांनी केलेल्या संशोधनानुसार,
विद्यापीठ परिसरात पक्ष्यांच्या १२६ प्रजातींची आढळ नोंद झालेली आहे. आता या
पक्ष्याच्या दर्शनाने त्यामध्ये महत्त्वाची नोंद समाविष्ट झाली आहे.
डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या पोटाचा समुद्री
गरूड हा प्रामुख्याने समुद्रकिनारी आढळणारा पक्षी आहे. मात्र, सुरक्षित वातावरण
आणि मुबलक खाद्यसंपन्नता असलेल्या अंतर्गत भूभागाकडेही तो स्थलांतर करतो. सध्या
विद्यापीठ परिसरात नर व मादी अशी जोडी आढळून आली असून, जोडीने उपस्थिती
असल्यामुळे त्यामागे प्रजोत्पादनाचा हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरीदेखील, त्यांनी अद्याप या परिसरात घरटे बांधल्याचे आढळलेले नाही.
त्यामुळे त्याविषयी ठोस सांगता येणार नाही.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील जलाशयांची पातळी कमी झाल्यामुळे
मासे व इतर जलचर सहज उपलब्ध होत असल्याने खाद्यसंपन्नतेमुळे हे पक्षी येथे थांबले
असावेत, असा अंदाज डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केला. याशिवाय, समुद्रकिनाऱ्यांवरील
वाढते पर्यटन प्रकल्प, बोटिंग आणि किनारपट्टीवरील प्रदूषण हीदेखील
त्यांच्या स्थलांतरामागील कारणे असू शकतात, असे ते म्हणाले.
वन्यजीव कायद्याच्या ‘अनुसूची-१’मध्ये समाविष्ट
पक्षी
पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूडाचे शास्त्रीय नाव हॅलिएटस ल्युकोगॅस्टर (Haliaeetus leucogaster)आहे. हा पक्षी आकाराने मोठा असून मादी साधारणपणे नरापेक्षा
मोठी असते. याची लांबी साधारण ७० ते ९० सेंमी दरम्यान असते, तर पंख पसरल्यावर
(wingspan) त्यांची रुंदी सुमारे १.८ ते २.२ मीटरपर्यंत पोहोचते. पंख
मिटल्यावर त्याचा आकार भरीव व मजबूत दिसतो.या गरूडाचे
सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शुभ्र डोके, मान, छाती आणि पोट.त्याची पाठ व पंख राखाडी (slate-grey) रंगाचे असतात. शेपटी लहान व पूर्णपणे पांढरी असते. चोच मोठी, मजबूत व वाकडी
असून ती करड्या-निळसर रंगाची असते. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून शिकार पकडण्यासाठी
त्याचे पाय व नखे अत्यंत शक्तिशाली असतात.तो प्रामुख्याने मासे, जलचर, लहान सस्तन
प्राणी तसेच प्रसंगी मृत प्राण्यांवरही उपजीविका करतो. जलाशयांच्या आसपास उंच
झाडांवर बसून गतीने झेप घेऊन शिकार टिपतो.
हा पक्षी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत अनुसूची-१ (Schedule-I) मध्ये समाविष्ट असून त्याला सर्वोच्च संरक्षण प्राप्त आहे. या श्रेणीत
समाविष्ट पक्ष्यांची शिकार किंवा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा असून, त्यासाठी कठोर
शिक्षेची तरतूद आहे, अशी माहितीही डॉ. गायकवाड
यांनी दिली.
शिवाजी
विद्यापीठात आकर्षक शोभायात्रेसह जयंती साजरी
शिवाजी विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत महामानवांच्या वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि उपस्थित शिक्षक, अधिकारी.
शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय सेवक आदी.
शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. प्रशांत बनसोडे.
शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. प्रशांत बनसोडे. मंचावर (डावीकडून) डॉ. महादेव देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.
(संपूर्ण कार्यक्रमाची लघुचित्रफीत)
कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ भारतापुरते
मर्यादित नसून जागतिक पातळीवर प्रभाव टाकणारे आहेत. आज जगभरात आंबेडकर जयंती साजरी
होत असून, त्यांचे कार्य आणि विचार आंतरराष्ट्रीय
बौद्धिक चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहे, असे प्रतिपादन पुणे येथील गोखले
इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रशांत
बनसोडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आज डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांची १३५ वी जयंती आकर्षक शोभायात्रेसह लेझीम, हलगीची सादरीकरणे आणि
व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात
आली. या निमित्त फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आंतरराष्ट्रीय
परिप्रेक्ष्य’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होत्या.
डॉ. बनसोडे यांनी डॉ. आंबेडकर यांचा
जागतिक प्रभाव स्पष्ट करीत असताना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि जर्मनीतील बॉन
विद्यापीठ येथे आपणाला आलेल्या व्यक्तीगत अनुभवांच्या आधारे विवेचन केले. ते
म्हणाले, आंबेडकरांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील
शिक्षणाचा मोठा प्रभाव राहिला. येथे त्यांचा लोकशाही, समानता, समाजवाद
आणि सामाजिक न्याय यांसारख्या विचारधारांशी परिचय झाला. विशेषतः जॉन ड्युई यांच्या
प्रागतिक विचारांचा प्रभाव आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनात दिसून
येतो. याशिवाय डॉ. आंबेडकरांनी कार्ल मार्क्स आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांचे
तुलनात्मक चिंतन करत स्वतःची स्वतंत्र विचारप्रणाली विकसित केली. सामाजिक क्रांती
ही अहिंसक आणि लोकशाही मार्गाने घडवून आणण्याची त्यांची भूमिका ‘डेमोक्रॅटिक
सोशलिझम’ या चौकटीतून समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आंबेडकरांना
‘सोशल जस्टिस क्रुसेडर’ आणि ‘ऑर्गॅनिक इंटेलेक्चुअल’ म्हणून मान्यता मिळाल्याचे
सांगतानाच अँटॉनिओ ग्रामशी यांचा सिद्धांत आणि ड्यु बॉईस यांच्याशी वैचारिक संवादाच्या
अनुषंगानेही विश्लेषण केले. याद्वारेच दलित व आफ्रो-अमेरिकन प्रश्नातील साम्य
याबाबत बाबासाहेबांना विवेचन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंबेडकरांना केवळ प्रतीक म्हणून नव्हे, तर
त्यांच्या विचारांची सखोल शास्त्रीय मांडणी समजून घेऊन समाजपरिवर्तनासाठी त्याचा
उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे
म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेला शिक्षणाचा खरा अर्थ आणि मानवाधिकार व समतेच्या विचारांची प्रस्तुतता विद्यार्थ्यांनी लक्षात
घेणे आवश्यक आहे. केवळ परीक्षेपुरते न शिकता, मिळवलेल्या
ज्ञानावर चिंतन करून ते समाजात वापरण्याचा आणि स्वतःला एक परिपक्व माणूस म्हणून
घडवणे आवश्यक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा "शिका, संघटित
व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी जोडलेला
आहे, असे
वाटते कारण महाराजांची शिकवण, सर्व
जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून केलेली संघटनात्मक बांधणी आणि रयतेच्या
राज्यासाठी केलेला लढा हे त्याचेच उदाहरण वाटते. महामानवांच्या जयंती उत्सवातून केवळ तात्पुरता उत्साह न दाखविता
आपल्या आयुष्याला आकार द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अधिष्ठाता डॉ. महादेव
देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी सूत्रसंचालन
केले, तर डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी आभार मानले.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना अभिवादन
तत्पूर्वी, विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या
हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.
सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन
अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी
संचालक डॉ. सावलीराम घाणे, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. दीपा
श्रावस्ती, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. राहुल
माने, डॉ. नितीन कांबळे, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. उत्तम सकट, सुरेश बंडगर, सुरेखा
अडके आदींसह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची
उत्साहपूर्ण शोभायात्रा
विद्यापीठाच्या वसतिगृहातील
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातून भव्य अशी
शोभायात्रा काढली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ साहेब, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अण्णाभाऊ
साठे, लहुजी साळवे आदी महामानवांच्या वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी
अग्रस्थानी होते. सजवलेल्या घोडाबग्गीमध्ये डॉ. आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र
ठेवलेले होते. लेझीम, हलगी आणि ढोल, झांजपथकाच्या निनादात आणि स्फूर्तीगीते गात
विद्यार्थ्यांनी महामानवाला आगळे अभिवादन केले. शोभायात्रेमध्ये प्र-कुलगुरू डॉ.
ज्योती जाधव यांच्यासह सर्वच अधिकारी सहभागी झाले.
रिल
मेकिंग स्पर्धेत प्रतिभा जाधव प्रथम
विद्यापीठाने फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत
महामानवांवरील खुल्या रिल्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उदंड
प्रतिसाद लाभला. आज त्याचे प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
करण्यात आले. या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा: प्रतिभा जयसिंग
जाधव (रु. ५००१/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), केदार सुरेश माने
(रु. ३००१/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), प्रेरणा आर.
खटावकर (रु. २००१/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), उत्तेजनार्थ-
प्रकाश चांगदेव आवारे (प्रशस्तीपत्र) व कोमल चंद्रकांत गरड (प्रशस्तीपत्र).
शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. प्रकाश कांबळे.
शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे.
शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे.
(परिसंवादाची लघुचित्रफीत)
कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारतीय विकासनितीचे धोरणकर्ते होते, असा सूर
आज शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात उमटला.
सप्ताहांतर्गत आज डॉ. प्रकाश कांबळे यांच्या “वर्तमान उपयुक्त अर्थशास्त्रज्ञ डॉ.
बाबासाहेब आंबेडकर” या पुस्तकावर विशेष परिसंवाद रंगला.
यामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीष
मोरे आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे सहायक संचालक अविनाश भाले यांनी सहभाग
घेतला. परिसंवादात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय विकासनीतीचे खरे
शिल्पकार म्हणून अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे प्रभारी
अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते, तर लेखक डॉ. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे म्हणाले,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान केवळ सामाजिक किंवा राज्यघटनात्मक क्षेत्रापुरते
मर्यादित नसून त्यांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी ठोस आणि दूरदर्शी धोरणांचा
आराखडा तयार केला. या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्या पुस्तकाने आंबेडकरांच्या
आर्थिक विचारांना समकालीन संदर्भ दिला आहे. आंबेडकरांच्या विकासनीतीत शेती आणि
उद्योग यांच्यातील समतोलाला विशेष महत्त्व देण्यात आले होते. शेतीतील अतिरिक्त
मनुष्यबळ औद्योगिक क्षेत्रात वळवून उत्पादनक्षमतेत वाढ साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन
होता. यामुळे ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होऊन व्यापक आर्थिक प्रगती
साधता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आत्मनिर्भरतेवर आधारित अर्थनीती ही
आंबेडकरांच्या विचारांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे सांगताना, देशाच्या
संसाधनांचा योग्य वापर करून स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था उभी करणे हे त्यांचे ध्येय
होते, असे डॉ. मोरे यांनी नमूद केले. आर्थिक
लोकशाहीच्या संकल्पनेवर विशेष भर देताना डॉ. मोरे यांनी सांगितले की, प्रत्येक
नागरिकाला समान आर्थिक संधी मिळणे, उत्पन्नातील
विषमता कमी करणे आणि संसाधनांवर सर्वांचा समान हक्क सुनिश्चित करणे हीच खरी
लोकशाही आहे. यासाठी आंबेडकरांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्य समाजवादाच्या
माध्यमातून महत्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण आणि सार्वजनिक नियंत्रण यावर
त्यांनी भर दिला. मोठ्या उद्योगांमधून निर्माण होणारा नफा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत
पोहोचावा, यासाठी सरकारची भूमिका निर्णायक असावी.
याचबरोबर संपत्ती व संसाधनांचे संतुलित वितरण, सामाजिक
न्याय आणि आर्थिक समता यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. खाजगी व
सार्वजनिक क्षेत्राचा समतोल साधणारी मिश्र अर्थव्यवस्था हीच आंबेडकरांची विकासाची
दिशा असल्याचेही त्यांनी सांगितले.आज बेरोजगारी, वाढती विषमता,
ग्रामीण-शहरी दरी इत्यादी आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची
विकासनीती अधिकच महत्त्वाची ठरते. सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवणारे त्यांचे
विचार आजही मार्गदर्शक असल्याचे डॉ. मोरे यांनी नमूद केले.
सहायक संचालक अविनाश भाले म्हणाले, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांचे इतक्या सोप्या आणि सर्वसामान्यांना
समजेल अशा भाषेत केलेले सादरीकरण हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. अर्थशास्त्रासारखा
गुंतागुंतीचा विषयही सामान्य वाचकाला सहज समजेल, अशा पद्धतीने मांडताना लेखकाने
बाबासाहेबांच्या विचारांची मूळ गाभा जपला आहे. विशेषतः शेती व औद्योगिक विकासाचा
परस्परसंबंध, संशोधनातील बाबासाहेबांची प्रागतिक
दृष्टी, ‘लोकल टू ग्लोबल’ असा व्यापक दृष्टिकोन
आणि आजच्या धोरणांशी साधलेली सांगड हे या पुस्तकाचे महत्त्वपूर्ण पैलू असल्याचे
त्यांनी नमूद केले. तसेच, समावेशकता (Inclusivity) आणि
शाश्वतता (Sustainability) हे बाबासाहेबांच्या विकासनीतीचे
केंद्रस्थान असून, त्यांची अंमलबजावणी आजच्या
परिस्थितीतही शक्य आहे, असा स्पष्ट दृष्टिकोन या पुस्तकातून सामोरा
येतो.
लेखक डॉ. प्रकाश कांबळे म्हणाले की, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील अर्थशास्त्रज्ञ हा महत्त्वाचा पैलू
समाज आणि अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिला असून, तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे
पुस्तक लिहिले. बाबासाहेबांचे अर्थशास्त्रीय संशोधन,
भारताच्या नियोजन प्रक्रियेतले योगदान,
वित्तीय समतोल, चलनव्यवस्था, रिझर्व्ह बँकेची संकल्पना, तसेच शेती व औद्योगिक विकासाचा समन्वय या सर्व
बाबी आजच्या समस्यांवरही प्रभावी उपाय सुचवतात, असे
त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक विषमता, बेरोजगारी, गरिबी यांसारख्या प्रश्नांची उत्तरे
बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांत दडलेली आहेत, या
विश्वासातूनच उपलब्ध विस्तृत साहित्याचा अभ्यास करून ते सोप्या आणि सुबोध पद्धतीने
समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे आपण केल्याचे त्यांनी नमूद
केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. महादेव देशमुख म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय
विचारांची सुस्पष्ट, संक्षिप्त
आणि संदर्भाधारित मांडणी हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहेअवघ्या १५२ पृष्ठांच्या या
पुस्तकात २५ प्रकरणांद्वारे आंबेडकरांचे व्यापक आर्थिक तत्त्वज्ञान प्रभावीपणे
उलगडले असून, संशोधनासाठी
केवळ समस्या मांडण्यापेक्षा तिचे उपाय सुचवण्याची बाबासाहेबांची दृष्टी विशेष
अधोरेखित होते. चलननीती, वित्तीय
स्थैर्य, स्वायत्त
संस्थांची गरज, तसेच,
“रुपयाची समस्या” आणि
“लहान जमिनींचा प्रश्न आणि त्यावरील उपाय” यांसारख्या
ग्रंथांमधून त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. समावेशक व मानवी
चेहऱ्याचा विकास, शिक्षण-आरोग्य-उपजीविका
यांवर आधारित मानवी विकास निर्देशांकाचे महत्त्व आणि बदलत्या अर्थव्यवस्थेत
शेतीपासून सेवा क्षेत्राकडे झालेला प्रवास या सर्व बाबींचा संदर्भ देत, आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आजच्या काळातही
अत्यंत उपयुक्त ठरते, असा
निष्कर्ष त्यांनी मांडला.
यावेळी डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. सिद्धांत माने यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. किशोर खिलारे
यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, डॉ. एल.एन. घाटगे,
ए.बी. कांबळे, आनंद खामकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वप्नाली मगदूम हिचे भूगोल अधिविभागात अभिनंदन करताना डॉ. सचिन पन्हाळकर. सोबत शिक्षक, संशोधक आदी.
कोल्हापूर: शिवाजी
विद्यापीठातील भूगोल विभागातील एम.एस्सी. जिओइन्फॉर्मेटिक्स
प्रथम वर्षात (M.Sc. I)शिकणाऱ्या
स्वप्नाली मगदूम या विद्यार्थिनीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन
आधारित आणि जीआयएस (GIS) क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी संस्था
असलेल्या 'एसरी' (ESRI)च्या
भारतीय शाखेतर्फे आयोजित 'यंग स्कॉलर' स्पर्धेत
स्वप्नालीने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली
आहे.
'एसरी' या जागतिक
संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील विविध देशांमधून प्रत्येकी एका गुणवंत विद्यार्थ्याची 'यंग स्कॉलर' म्हणून
निवड केली जाते. २०२६ वर्षासाठी जगभरातून निवडल्या गेलेल्या अशा ७० तरुण संशोधकांमध्ये स्वप्नाली
मगदूम हिने आपले स्थान निश्चित केले आहे. या निवडीमुळे तिला
जुलै महिन्यात सॅन डिएगो, कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे
आयोजित होणाऱ्या 'ग्लोबल एसरी युझर कॉन्फरन्स'मध्ये
सहभागी होण्याचे अधिकृत आमंत्रण मिळाले आहे. या जागतिक
व्यासपीठावर ती भारताचे प्रतिनिधित्व करेल.
स्वप्नालीने या स्पर्धेसाठी
'Smart FloodGuard: A Mobile and IoT Based Real Time Flash Flood
Monitoring, Early Warning, and Evacuation System’या विषयावर
आपले संशोधन सादर केले होते. अचानक येणाऱ्या महापुराचे
रिअल टाइम मॉनिटरिंग करणे, त्याबद्दल पूर्वसूचना
देणे आणि आपत्ती काळात सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचवणे, अशी अत्याधुनिक
यंत्रणा तिने विकसित केली आहे. मोबाईल ॲप आणि आयओटी
(IoT) तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ही प्रणाली आपत्ती व्यवस्थापनासाठी मैलाचा
दगड ठरणार आहे.
स्वप्नालीच्या या
यशामागे तिची जिद्द आणि भूगोल विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. या संशोधन
प्रकल्पासाठी तिला भूगोल अधिविभागप्रमुख डॉ. सचिन
पन्हाळकर, डॉ. अभिजित पाटील, डॉ. प्रशांत
पाटील, डॉ. विद्या
चौगुले, डॉ. सुधीर
पवार आणि शुभम गिरीगोसावी यांचे तांत्रिक व शैक्षणिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या
मार्गदर्शनाखाली तिने आधुनिक जिओस्पॅशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प यशस्वीरीत्या
पूर्ण केला.
‘विद्यापीठासाठी
अभिमानास्पद’
विद्यापीठाच्या भूगोल
अधिविभागातील सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी
आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी स्वप्नालीचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
"जगातील
निवडक ७० स्कॉलर्समध्ये स्थान मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने थेट अमेरिकेतील
परिषदेमध्ये स्थान प्राप्त करणे, ही बाब शिवाजी विद्यापीठासह
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे," अशा शब्दांत प्रभारी
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.