Saturday, 28 February 2026

धोरणात्मक निर्णयांमध्ये सर्वेक्षणांची भूमिका महत्वाची: डॉ. गीता सिंग राठोड

राष्ट्रीय अर्थमिती परिषदेची विद्यापीठात सांगता

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना सांख्यिकी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रदीप्तरथी पांडा, डॉ. महादेव देशमुख, डॉ. उषा थोरात, डॉ. नीरज हातेकर, डॉ. के. षण्मुगन, डॉ. व्ही.एम. पाटील.  

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना सांख्यिकी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड.


(अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: शैक्षणिक संशोधनाबरोबरच शासकीय आणि संस्थात्मक धोरणात्मक निर्णयांसाठी विविध प्रकारची सर्वेक्षणे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड यांनी आज व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग (स्वायत्त), भारतीय अर्थमिती संस्था आणि डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अर्थमिती संस्था हीरकमहोत्सवी (६० व्या) वार्षिक राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भारतीय अर्थमिती संस्थेचे डॉ.नीरज हातेकर होते, तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. उषा थोरात आणि प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गीता सिंग राठोड म्हणाल्या, रोजगार पद्धती, उद्योग गतिशीलता, औद्योगिक कामगिरी आणि गुंतवणूक वर्तन हे भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे मुख्य प्रवर्तक घटक आहेत. ते नेमकेपणाने समजून घेण्याच्या कामी सर्वेक्षणे मदत करतात. चांगले संशोधन चांगल्या डेटाच्या उपलब्धतेमुळे सुरु होते. मजबूत आकडेवारी हे भारताचे बलस्थान आहे. सर्वेक्षणांमुळे धोरणात्मक निर्णय देखील अधिक प्रभावी झाल्याचे दिसतात. सांख्यिकी आपल्याला तथ्ये देते, अर्थमिती आपल्याला स्पष्टता देते आणि एकत्रितपणे ते समाजाला सूज्ञपणे निवड करण्याचा आत्मविश्वास देतात. भारताला अशा तरुण विद्वानांची गरज आहे, जे तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक उद्देशाची सांगड घालू शकतील. सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपणास कोणत्याही क्षेत्रातील विश्लेषण करता येते. नियोजन आणि प्रगतीसाठी त्याचा उपयोग होतो, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी डॉ. उषा थोरात म्हणाल्या, सन १९९१ मध्ये रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे देशाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आणि चलन व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. तेव्हापासून देशाच्या अर्थव्यवस्थेने आपल्या प्रगतीचा वेग कायम राखला आहे.

यावेळी डॉ.नीरज हातेकर, डॉ. महादेव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तर, भारतीय अर्थमिती संस्थेचे सचिव डॉ. के. षण्मुगन यांनी परिषदेचा आढावा सादर केला. संस्थेचे खजिनदार डॉ. प्रदीप्तरथी पांडा यांनी आभार मानले. 

महिलांनी विज्ञानाचे आधुनिक ज्ञान आत्मसात करावे: डॉ. अपर्णा कलावते

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रमाची सांगता

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सांगता समारंभात बोलताना झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वरिष्ठ संशोधक डॉ. अपर्णा कलावते.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सांगता समारंभात बोलताना झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वरिष्ठ संशोधक डॉ. अपर्णा कलावते. मंचावर (डावीकडून) डॉ. माधुरी वाळवेकर, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. राजाराम गुरव आणि डॉ. एस.आर. यन्कंची.


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: विकसित भारताच्या जडणघडणीमध्ये महिलांचे मोलाचे योगदान राहणार असून त्यासाठी त्यांनी संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह विज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (पुणे) येथील वरिष्ठ संशोधक डॉ. अपर्णा कलावते यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, डॉ. एस.आर. यंन्कंची उपस्थित होते.

डॉ. अपर्णा कलावते यांनी विज्ञान क्षेत्रातील महिलांची परंपरा आणि योगदान यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, भारतीय विज्ञान क्षेत्राला जानकी अम्मल, शकुंतला देवी, रेशे कार्सन, असीमा चटर्जी, डॉ. इंदिरा हिंदुजा इत्यादी अनेक प्रभावी महिला संशोधक, शास्त्रज्ञांनी योगदान देऊन समृद्ध बनविले आहे. विपरित परिस्थितीशी दोन हात करीत त्यांनी आपल्या संशोधनाची वाट चोखाळली. त्यांचा आदर्श ठेवून आजच्या युवतींनी विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास सज्ज व्हायला हवे. त्यासाठीच केंद्र सरकारने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची मध्यवर्ती संकल्पनाच विज्ञान क्षेत्रातील महिला: विकसित भारतासाठी प्रेरक शक्ती अशी ठेवली आहे. महिलांचे सर्वंकष योगदान लाभले तरच भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल. म्हणून महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द करीत असताना आणि वावरत असताना संकोच बाळगू नये, आत्मविश्वासाने पुढे यायला हवे. विद्यार्थ्यांनी लघु आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करून ध्येयवादी वृत्तीने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी गणित (STEM) या क्षेत्रां महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून संशोधन नवोपक्रमात आघाडी घेण्यासाठी सध्या सुवर्णकाळ आहे. या संधीचा विद्यार्थिनींनी लाभ घ्यायला हवा. विकसित भारताला अपेक्षित विज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीतील योगदान देण्यासाठी त्यांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. डॉ. सुनील गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विज्ञान दिन उपक्रमाच्या समन्वयक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी संपूर्ण उपक्रमाचा अहवाल सादर केला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नितीन कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

‘विज्ञानातील महिला’ विषयावर विद्यापीठात विशेष ग्रंथप्रदर्शन



(राष्ट्रीय विज्ञान दिन ग्रंथप्रदर्शनाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: विकसित भारताच्या उभारणीमध्ये विज्ञानाची भूमिका महत्त्वाची राहणार असून वैज्ञानिक क्षेत्रातील महिलांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने या क्षेत्रात आजपर्यंत महिलांनी बजावलेल्या कार्याची माहिती होण्यासाठी त्याविषयीच्या पुस्तकांचे वाचन अगत्याचे आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय साळी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे विज्ञानातील महिला या विषयावरील विशेष ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त केंद्र सरकारने विज्ञान क्षेत्रातील महिला: विकसित भारत निर्मितीमध्ये योगदान ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित केली आहे. त्या अनुसरून विद्यापीठाच्या ग्रंथालयामधील निवडक, दुर्मिळ आणि महत्त्वाच्या विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रदर्शन आज आयोजित करण्यात आले. डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे, डॉ. बाळ फोंडके, अच्युत गोडबोले, माधव गाडगीळ, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, सुरेश कुमार जिन्दल, कॅप्टन एस. शेषाद्री अराधिका शर्मा, मीरा सिमसरकर इत्यादी वैज्ञानिक, विज्ञान लेखरांची पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली. यामध्ये वैज्ञानिक संकल्पनांचे विश्लेषण करणारी, विज्ञान व वैज्ञानिकांचा इतिहास, जीवनकार्य, चरित्रे व आत्मचरित्रे, माहितीपर अशी एकूण ११६ पुस्तके समाविष्ट होती. शिवाजी विद्यापीठास सादर करण्यात आलेले महिला संशोधकांचे शोधप्रबंध तसेच महिला वैज्ञानिकांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे स्वतंत्र दालनही होते. या प्रदर्शनाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, डॉ. राजेंद्र खामकर यांच्यासह ग्रंथालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 27 February 2026

दृष्टिदिव्यांगांनी स्पर्श, गंध, चवीतून ‘अनुभवले’ वनस्पतीजगत

शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'सुगम्यविज्ञान' उपक्रम





शिवाजी विद्यापीठाच्या सुगम्यविज्ञान उपक्रमांतर्गत स्पर्श, गंध व चवीतून वनस्पतींची ओळख करून घेताना दृष्टीदिव्यांग विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बीजारोपण ते उत्पादन या विषयावर विशेष सुगम्यविज्ञान हा उपक्रम आयोजित केला. याअंतर्गत स्पर्श, गंध, आकार आणि चवीच्या माध्यमातून विविध वनस्पती ओळखण्याचे तंत्र या विद्यार्थ्यांना आत्मसात करता आले. वनस्पतीजगताची अनोखी ओळख आणि अनुभव या विद्यार्थ्यांना घेता आला.

राष्ट्रीय विज्ञान दिन – २०२६ अंतर्गत शिवाजी विद्यापीठात युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दृष्टि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित विज्ञान उपक्रम राबविण्यात आला. बीजरोपणापासून उत्पादनापर्यंतच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करत वनस्पतींची वाढ, बियांची रचना, अंकुरण प्रक्रिया, रोपांची निगा आणि शेतीतील उत्पादन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना विविध फळे, मसाले, औषधी व सुगंधी वनस्पतींचे स्पर्श, गंध तसेच चव यांच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आली.

या उपक्रमात सुशिलाबाई घोडावत अंध विद्यालय (सांगली-मिरज), ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध विद्यालय (कोल्हापूर) आणि श्री सद्‌गुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय (पलूस) येथील सुमारे शंभर दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक आणि पालकही उपस्थित होते. स्पर्श, सुगंध, चव आणि आकार यांच्या आधारे वनस्पती ओळखण्याचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रयत्न केला.

कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. माधुरी वाळवेकर, संयोजक डॉ. एस. आर. यंन्कंची, युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा जाधव आणि डॉ. एस. ए. पाटील यांनी उपक्रमाचे नियोजन केले. 

संवेदनशील, रचनात्मक शिक्षणातूनच सामाजिक समावेशन शक्य: प्रा. रेणू दांडेकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात बीजभाषण करताना प्रा. रेणू दांडेकर. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अशोक कांबळे, डॉ. कोमाराईह आणि अविनाश भाले.


कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: संवेदनशील, रचनात्मक शिक्षण व्यवस्थेतूनच खऱ्या अर्थाने सामाजिक समावेश शक्य आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या लोकसाधना संस्थेच्या संस्थापक प्रा. रेणू दांडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या 'सामाजिक समावेशन  अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित “कोणीही मागे राहू नये: सामाजिक समावेशासाठी शिक्षणाचा पुनर्विचार" या राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डी.ए. सावकार अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. अशोक कांबळे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

प्रा. दांडेकर म्हणाल्या, निर्मितीक्षम आणि रचनात्मक शिक्षणच सर्वांना सक्षम करणारे व सामाजिक समावेशन घडविणारे ठरते. शिक्षणाचा पुनर्विचार करताना ‘माणूसपण’ जपणारे शिक्षण देणे ही काळाची गरज असून संवेदनशील शिक्षकच त्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत स्वातंत्र्य, नवदृष्टी आणि बौद्धिक संधी मिळाल्यासच त्यांचे सामाजिक समावेशन शक्य होईल.

डॉ. अशोक कांबळे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. तरच निष्पत्तीआधारित मूल्यमापनातून शिक्षणाचा सामाजिक समावेशनासाठी उपयोग होईल. विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे विषय समजणे आणि ते प्रत्यक्ष जीवनाशी जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, औपचारिक शिक्षण घेतले नाही म्हणून एखादी व्यक्ती अयोग्य ठरत नाही. शिक्षणाचा सामाजिक समावेशनासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार होणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेने संधी निर्माण केल्यास समाजातील सर्व घटक मुख्य प्रवाहात येऊ शकतात.

यावेळी बनारस हिंदू विद्यापीठ येथील सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. जे. बी. कोमाराईह यांची प्रमुख उपस्थिती होती. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी राऊत, डॉ. राजू श्रावस्ती, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. केदार मारुलकर, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. तेजपाल मोहरेकर, डॉ.सुप्रिया पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.

या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात डॉ. निकोत्चा मेंडसे (गोवा), डॉ. प्रशांत बनसोडे (पुणे), डॉ. जयानंद खंडागळे (संभाजीनगर), प्रा. डी. श्रीकांत (कर्नाटक), प्रा. शंकरनारायण पालीरी (केरळ), डॉ. मोझीन्हा फर्नांडिस (गोवा) यांच्यासह सामाजिक समावेशन व शिक्षण या विषयांवरील देशभरातील तज्ज्ञ, संशोधक व अभ्यासक सहभागी झाले आहेत.

भाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील परिसंवादात सूर

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. अनिल गवळी. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. गिरीष मोरे व डॉ. नंदकुमार मोरे.


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. अनिल गवळी.


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे. 

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन समारंभात सहभागी झालेल्या मराठी अधिविभागाच्या विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मृण्मयी पांचाळ या विद्यार्थिनीने रेखाटलेली वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची रांगोळी.


(मराठी भाषा गौरव दिन समारंभाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: भाषिक घोटाळे आणि उद्भवू शकणारे अप्रयोजित विनोद टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष परिसंवादामध्ये उमटला.

शिवाजी विद्यापीठात आज मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भवनातील मराठी अधिविभाग आज रांगोळ्या आणि सुवासिक फुलांच्या माळांनी सजला. विद्यार्थ्यांनी सर्व अधिविभाग आकर्षक पद्धतीने सजविला. या आनंदाच्या वातावरणात विरामचिन्हांचा वापर आणि महत्त्व या विषयावरील परिसंवाद अतिशय उत्तम रंगला. या परिसंवादात विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीष मोरे यांनी सहभाग घेतला. जनसंपर्क अधिकारी तथा विद्यापीठाचे मराठी भाषा अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गवळी आणि डॉ. मोरे या दोघांनीही आपल्या भाषणात भारतातील विरामचिन्हांच्या उगमाच्या इतिहासापासून ते सद्यस्थितीपर्यंत साद्यंत आढावा घेतला.

डॉ. गवळी म्हणाले, भारतात पूर्वी लेखनापेक्षा पाठांतरावर अधिक भर होता. त्यामुळे पाठांतर आणि उच्चारशास्त्र अधिक प्रमाण मानले जाई. दीर्घ, ऱ्हस्व, आरोह, अवरोह इत्यादींसह पाठांतर केले जाई. त्यामुळे त्यावेळी विरामचिन्हे नसावीत. प्रचलित पद्यपद्धतीला अनुसरून विसर्ग आणि दंड हीच विरामचिन्हे प्रचलित होती. मेजर थॉमस कँडी यांनी १८५०मध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह आणि प्रश्नचिन्ह ही पाच विरामचिन्हे मराठी भाषेला दिली. थॉमस कॅंडी यांनी केवळ मोल्सवर्थच्या मराठी इंग्रजी शब्दकोषाचे निर्मितीकार्य सिद्धीस नेले, इतकेच नव्हे, तर इंग्रजी-मराठी शब्दकोषाची निर्मितीही केली. त्याखेरीज येथील पंतोजींच्या शाळांतून इसापनिती, सिंहासन बत्तिशी या पुस्तकांच्या पलिकडे जाऊन वाचन पाठमाला, भाषांतर पाठमाला इत्यादी पुस्तकांचाही अभ्यासक्रमात समावेश करून शिक्षणाला आधुनिक रुप दिले. विरामचिन्हांच्या वापरांबाबतचे अनेक संकेत कँडी यांनी त्यांच्या पुस्तिकेत दिले आहेत, तथापि, विरामचिन्हे वापरताना प्रचलित व्याकरणाचे नियम लक्षात घ्यायला हवेत, अन्यथा घोटाळे होण्याची शक्यता वाढेल.

डॉ. गिरीष मोरे म्हणाले, वक्त्याच्या बोलण्यात स्वर आणि लय या दोहोंना महत्त्व आहे. बोलण्यातून विरामचिन्हे व्यक्त होतात, तर लेखनातून दृश्यरुपात प्रकट होतात. विरामचिन्हे म्हणजे शिस्तीची काटेकोर लेखनसंहिता होय. आपल्या देशात मौखिक परंपरेतून आलेले साहित्य ऐकण्यात येत असे, पण वाचनात फारसे येत नसे. त्यामुळे विरामचिन्हांऐवजी काही बिघडत नसे. आजच्या काळात मात्र विरामचिन्हांऐवजी निश्चित बिघडू शकते. विरामचिन्हांमुळे वाक्याचा नेमका अर्थ स्पष्ट होऊन वाचन सुलभ होते. अर्थस्पष्टतेसाठी वाचकाची दमछाक टाळण्यासाठी विरामचिन्हे आवश्यक आहेत. विरामचिन्हे ही अर्थनिर्णयाची साधना होत. सर्वच लेखकांनी त्यांचा वापर करावा. कवी आणि ललितलेखक यांना त्या बाबतीत थोडी सवलत घेण्याची संधी असते. संशोधकांनी मात्र विरामचिन्हांचा काटेकोर वापर केलाच पाहिजे कारण संशोधनात त्यांच्याकडून अचून विधानांची अपेक्षा असते. ती अपेक्षा विरामचिन्हांमुळेच तडीस जाते. संदर्भनिर्देशाच्या विविध पद्धती यादेखील केवळ विरामचिन्ह वापरातील फरकामुळे निर्माण झालेल्या दिसतात. केवळ अवतरणचिन्ह नसेल तरी सुद्धा वाङ्मयचौर्य ठरू शकते, इतके संशोधनात त्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, मेजर कँडी यांच्यासारख्या अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मराठी भाषा व संस्कृतीची मनोभावे सेवा केली. विरामचिन्हे ही त्यांची अमूल्य देणगी होय. बोलण्या-लिहीण्यात विरामचिन्हांच्या वापराअभावी अराजक निर्माण होऊ शकते. बा.सी मर्ढेकर, विलास सारंग, र.कृ. जोशी यांच्या कवितांत विरामचिन्हांचा ठाशीव वापर दिसून येतो. विरामचिन्हे ही भाषेत वाहतूक नियंत्रण यंत्रणेप्रमाणे काम करतात. नियम पाळले नाहीत तर वाक्यांचे अपघात होण्याची मोठी शक्यता असते.

सुरवातीला मृण्मयी पांचाळ या विद्यार्थिनीने मराठी भाषा गौरव गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचा स्टॉलही मांडण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचे विविध पैलू उलगडून दाखविणारा विशेष गुणदर्शन कार्यक्रमही सादर झाला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. तर अमोल देशमुख यांनी आभार मानले.