Saturday, 18 July 2026

खेळाडूंसाठी मानसशास्त्र आणि नैतिकता अत्यंत महत्वाचे - क्रीडा आहारतज्ज्ञ अवंती दामले


कोल्हापूर, दि.१८ जुलै - खेळाडूंनी जागरूक राहून मानसशास्त्र आणि नैतिकता या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन क्रीडा आहारतज्ज्ञ अवंती दामले यांनी आज येथे केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात 'क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा पोषण आणि डोपिंग' या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी क्रीडा आहारतज्ज्ञ दामले मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत उपस्थित होते.प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

            क्रीडा आहारतज्ज्ञ दामले म्हणाल्या, आपल्या देशाला जागतिक स्तरावर मान्यता मिळण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे.येणार पुढील काळ हा खेळासाठी आणि खेळाडूंसाठी अत्यंत पोषक आहे.देशाला पुढे घेवून जाण्यासाठी खेळाडूंनी स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. अन्न हे आपले पोषक घटक आहे. परंतू, आपण त्याला फारसे महत्व देत नाही.फक्त आपल्या जिभेचा विचार करतो, आरोग्याचा विचार करीत नाही.खेळाडूंनी याच गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे. आपला आहार आपल्या खेळास सहायय करणारा असणे गरजेचे असते. सामना असो वा नसो खेळातील गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्याने सराव करणे आवश्यक आहे.शरीराची झिज भरून काढण्यासाठी झोप महत्वाची आहे.त्याचबरोबर, स्मार्टफोनवर लगाम ठेवणेही गरजेचे आहे.उत्कृष्ट खेळाडू घडण्यासाठी अनुशासन, निष्ठा आणि समर्पण अत्यंत महत्वाचे आहे.  डाळी, कडधान्य, भरडधान्य, मध, दूध, गूळ, बटाटा यामध्ये कार्बोहायड्रेडस् मोठया प्रमाणात मिळतात. त्याचा आहारामध्ये निश्चित समावेश करावा. दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे असते.जे पदार्थ हृदय, किडनी आणि हाडांवर दुष्परिणाम करतात आणि ज्या पदार्थांवर बंदी आहे त्यापासून खेळाडूंनी दूर राहिलेे पाहिजे.आपण अविचाराने कृती करणार नाही हे निश्चित केले पाहिजे.

            फिजिओथेरपिस्ट सल्लागार डॉ.यशवंत वेलणकर म्हणाले, खेळात यश प्राप्त करण्यासाठी खेळाडूंची मानसिक आणि भावनिक तयारी अत्यंत महत्वाची असते. खेळाच्या मैदानावर अन्य कारणांमुळे मानसिकता खराब झाली असेत तर ती त्वरित स्थिर करण्याचा प्रयत्न करावा.यासाठी आवश्यक असणाऱ्या काही सोप्या व्यायाम प्रकाराचा सराव करावा.कामगिरीवर परिणाम करणाऱ्या घटकांकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करावे.स्नायू बळकट करण्यासाठी जशी मेहनत घेतो तशीच मेहनत बुध्दीचा विकास करण्यासाठी घ्यावी.आपले लक्ष फक्त खेळाकडेच असले पाहिजे. प्रत्येक खेळाडूने लक्ष केंद्रीत करण्याचे कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. सर्व खेळांमध्ये क्रीडा मानसशास्त्र खूप महत्वाचे मानले जाते.कारण, खेळाडूंना जिंकू देणारे, जिंकण्याचा विचार करण्यास प्रेरित करणारे महत्वाचे मेंदू असते. यामुळे, स्वयंप्रेरणा अथवा स्वयंसूचना देऊन खालावलेली कामगिरी उंचावणे शक्य होते.जे खेळाडू अपयश पचवू शकतात तेच खेळाडू मोठे होतात.डोपिंगचे दुष्परिणाम दीर्घकालीन असतात. खेळ बाजूलाच राहते आणि मनुष्य सामान्य आयुष्य सुध्दा जगू शकत नाही.म्हणूनच, खेळाडूंनी एकाग्रता वाढविण्याचे कौशल्ये आत्मसात करावीत.

           याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे म्हणाले,खेळाचे मानसशास्त्र खेळाडूंना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि आत्मविश्वासाने खेळण्यास मदत करते.खेळामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे.खेळाचे मानसशास्त्र खेळाडूंना त्यांच्या चुकांमधून शिकण्यास आणि सुधारणा करण्यास मदत करते.ज्यामुळे ते सातत्याने चांगले प्रदर्शन करू शकतात.

अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले, खेळाडूंची मानसिकता उत्तम राहण्यासाठी पोषण आणि पोषणमूल्य महत्वाचे आहेत. गैरप्रकाराने यश मिळविणे हे चुकीचे आहे.खेळताना खेळाडूंचे लक्ष विचलित हाऊ नये यासाठी एकाग्रता आवश्यक असते. खेळाचे मानसशास्त्र खेळाडूंना त्यांचे ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.खेळताना अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतात या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असतेे.यामुळे खेळाडूंना त्यांच्यातील नेतृत्व क्षमता विकसित करण्यास मदत होतेे, जेणेकरून ते आपल्या संघाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतील.

            कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.एन.डी.पाटील आणि अजय मराठे यांनी केले तर डॉ.किरण पाटील यांनी आभार मानले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचेसह क्रीडा प्रशिक्षक सविता भोसले, डॉ.अतुल टोने, डॉ.कृष्णात पाटील, डॉ.सुजित नाईक, डॉ.आकाश बनसोडे, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.धनंजय पाटील, डॉ.रामचंद्र पाटील, डॉ.विजय रोकडे, डॉ.विकास जाधव, डॉ.सुनिल खराडे, डॉ.महेश पाटील, विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक आणि क्रीडाप्रेमी जनता मोठया संख्येने उपस्थित होते.

------

 

कुलगुरूंच्या भेटीने भारावले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी जुन्या आठवणींत रमलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी त्यांना आपली काही पुस्तके भेट देताना ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे.

(या सदिच्छा भेटीची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १८ जुलै: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांची सदिच्छा भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. कुलगुरूंच्या या अचानक भेटीमुळे ९२ वर्षांचा हा साहित्यिक भारावून गेला.

कुलगुरु डॉ. रजनीश कामत यांनी नलगे यांची त्यांच्या कोतोली रोडवरील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या भेटीदरम्यान डॉ. कामत आणि नलगे यांच्यात मनमोकळा संवाद झाला. कुलगुरू डॉ. कामत यांनी नलगे यांच्या साहित्यिक योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्ण भावना व्यक्त केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या 'कमवा आणि शिका' या योजनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच अन्य जुन्या आठवणींविषयी बोलताना चंद्रकुमार नलगे यांना गहिवरुन आले. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आपण इतक्या आस्थेने विचारपूस करण्यासाठी आलात, असे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी आपली काही निवडक पुस्तके कुलगुरूंना भेट दिलीयावेळी प्रदीप नलगे, अनिता नलगे आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते. 

शिवाजी विद्यापीठासाठी लवकरच स्वतंत्र एआय प्रणाली: कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांची घोषणा

प्रशासन, अध्यापन आणि संशोधनाला लाभणार आधुनिकतेचे बळ

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'एआय'विषयक विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'एआय'विषयक विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. केदार मारुलकर, बळवंत गोरड, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. विलास शिंदे, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. सुहासिनी पाटील.


शिवाजी विद्यापीठात आयोजित 'एआय'विषयक विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन करताना तज्ज्ञ बळवंत गोरड.

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'एआय'विषयक विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन करताना तज्ज्ञ बळवंत गोरड.

(एआय कार्यशाळेची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १८ जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित अशी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रणाली लवकरच विकसित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केली. प्रशासन, अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थी-सुविधा या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये ही प्रणाली उपयुक्त ठरणार असून, विद्यापीठाच्या कार्यपद्धतीला अधिक वेग, अचूकता आणि कार्यक्षमतेची दिशा मिळणार आहे.

स्वतःच्या सुरक्षित सर्व्हरवर चालणारी ही प्रणाली विद्यापीठाच्या डिजिटल परिवर्तनातील एक निर्णायक पाऊल ठरेलजिथे गती, अचूकता आणि गोपनीयता एकाच वेळी साध्य होईल, ” असे डॉ. कामत यांनी यावेळी नमूद केले.

शिवाजी विद्यापीठात आज विद्यापीठातील सर्व अधिकारी, अधिष्ठाता, संचालक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी एआयच्या वापराबाबत विशेष कार्यशाळा झाली. त्यावेळी कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. कार्यशाळेत टाटा कम्युनिकेशन्स लि. कंपनीचे वरिष्ठ एआय अधिकारी बळवंत गोरड यांनी मार्गदर्शन केले. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, विद्यापीठातील बैठका, अधिकृत टिपण्या, नियमावली, अधिनियम, अध्यादेश, तसेच विविध प्रशासकीय नोंदींचे विश्लेषण करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होतो. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एआयचा वापर केल्यास संबंधित कागदपत्रांचे पिन-पॉईंट विश्लेषण, संदर्भाधारित नोंदी, नियमांची पडताळणी आणि आवश्यक ते संदर्भ स्वयंचलितपणे उपलब्ध होऊ शकतील. ही प्रणाली पूर्णपणे शिवाजी विद्यापीठाच्या सर्व्हरवर कार्यरत राहणार असल्याने डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि संस्थात्मक माहितीचे संरक्षण यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सार्वजनिक एआय साधनांच्या तुलनेत ही व्यवस्था विद्यापीठाच्या गरजांनुसार सानुकूलित असेल. विशेषतः विद्यापीठाचे अंतर्गत नियम, अधिनियम आणि इतर अप्रकाशित माहितीही या प्रणालीमध्ये समाविष्ट करता येणार आहे.

डॉ. कामत यांनी सांगितले की, या एआय प्रणालीचा उपयोग केवळ प्रशासनापुरता मर्यादित न राहता अध्यापन- अध्ययन प्रक्रियेतही होईल. विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासक्रम, संदर्भग्रंथ, प्रकल्प सूचना आणि संशोधन साधने यांचा योग्य वेळी लाभ मिळू शकेल. याशिवाय फ्लिप्ड क्लासरूम, ओपन एज्युकेशन मॉडेल, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि संशोधनासाठीची स्वतंत्र डिजिटल लायब्ररी या संकल्पनांनाही यामुळे बळ मिळणार आहे. या उपक्रमामुळे कामाचा ताण कमी होऊन निर्णयप्रक्रिया जलद होईल, उत्पादकता वाढेल आणि प्रशासन अधिक पारदर्शक व परिणामकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाचे तांत्रिक पथक, आयटी सेल आणि संबंधित तज्ज्ञांच्या सहकार्याने विकसित होणारी ही प्रणाली विद्यापीठाच्या डिजिटल परिवर्तनातील महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक संस्थांसाठी एआय अत्यंत उपयुक्त: बळवंत गोरड

कार्यशाळेत बळवंत गोरड यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) उपयुक्ततेवर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या जगातील भारताची आर्थिक व तांत्रिक स्थिती स्पष्ट करताना शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून देशाचा विकास कसा वेगाने होऊ शकतो, हे सविस्तर मांडले. विशेषतः शैक्षणिक संस्थांसाठी एआय प्रणाली अत्यंत उपयुक्त असून विद्यापीठांतील प्रशासकीय कामकाज, कागदपत्र प्रक्रिया, नियामक अनुपालन, संशोधन, परीक्षा, वित्त, मानव संसाधन आणि विद्यार्थीसेवा यांसारख्या विविध विभागांमध्ये तो प्रभावी ठरू शकतो. चॅटजीपीटीसारखी साधने ही एआयची केवळ उदाहरणे असून, संस्थेच्या स्वतःच्या डेटासह स्थानिक सर्व्हरवर एलएलएम आधारित प्रणाली उभारल्यास गोपनीयता जपली जाऊ शकते, असे स्पष्ट केले. सर्क्युलरचे सारांश, महत्त्वाचे मुद्दे, कृतीसूची तयार करणे, मीटिंगचे इतिवृत्त, पत्रलेखन, बजेट विश्लेषण, टेंडर ड्राफ्टिंग, नॅक, एनआयआरएफ इत्यादींसाठी एसएसआर निर्मिती व दस्तऐवजीकरण यांसारखी कामे अल्पावधीत कशी करता येतील, हे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले.

यावेळी अॅकॅडमी ऑफ अॅकॅडेमिक अॅडमिनिस्ट्रेशनचे समन्वयक डॉ. केदार मारुलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुहासिनी पाटील यांनी आभार मानले.