Saturday, 14 February 2026

शाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी: डॉ. इंद्रजीत घोष

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषद

शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषदेत मार्गदर्शन करताना झेक रिपब्लिक येथील व्हीएसबी-टेक्निकल ओसावा युनिव्हर्सिटीचे डॉ. इंद्रजीत घोष.



शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषदेत बोलताना रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण. मंचावर (डावीकडून) डॉ. संजय कोळेकर, डॉ. इंद्रजीत घोष आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.




कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: शाश्वत विकासासाठी संशोधन हे रसायनशास्त्राच्या सामाजिक, नैतिक जबाबदारीचे अधोरेखन आहे, असे प्रतिपादन झेल रिपब्लिक येथील व्हीएसबी- टेक्निकल ओसावा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत घोष यांनी केले. शिवाजी विद्यापीठात ‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत विकास’ या विषयावर आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या.

डॉ. घोष म्हणाले, हरित रसायनशास्त्र हे केवळ पर्यावरण संवर्धनाचे साधन नसून आर्थिकदृष्ट्या परवडणारा आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार विकासाचा मार्ग आहे. आपण निर्माण केलेली प्रत्येक अणुसंरचना, प्रत्येक प्रक्रिया आणि प्रत्येक उत्पादन हे भविष्यातील पिढ्यांसाठी महत्त्वाचा संदेश ठरणारे आहे, हे लक्षात घेऊन आपल्या संशोधनाच्या दिशा ठरविण्याचा हा कालखंड आहे. ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, नूतनीकरणीय कच्चा माल, जैव-उत्प्रेरण, सतत प्रवाही तंत्रज्ञान आणि शाश्वत अर्थव्यवस्थेच्या संकल्पना या भविष्यातील औद्योगिक प्रगतीसाठी अत्यावश्यक ठरणार आहेत.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या संतुलित संशोधनाची आज सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. रसायनशास्त्राच्या क्षेत्रात ही जबाबदारी स्वीकारून या परिषदेत सर्वंकष चर्चा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी रसायनशास्त्राची भूमिका अधोरेखित करत ही परिषद विज्ञान, उद्योग आणि समाज यांच्यातील सेतू म्हणून कार्य करेल. संशोधनातील आंतरशाखीय सहकार्य वाढीस लागण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संशोधन प्रवाहांची ओळख करून देण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेचे समन्वयक डॉ. संजय कोळेकर यांनी स्वागत केले. रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. संदीप संकपाळ यांनी आभार मानले.

देशविदेशांतील नामांकित संशोधकांचे मार्गदर्शन

या परिषदेत प्रा. ग्यानविटो विले (इटली), प्रा. जगदीश राजेनहळ्ळी (जर्मनी), डॉ. सचिन नानावटी (इंग्लंड), प्रा. अनंत कापडी, आयसीटी, मुंबई, डॉ. दिनेश सावंत, एनसीएल, पुणे, प्रा. व्यंकट कृष्णन, आयआयटी, मंडी आदी नामवंत शास्त्रज्ञांनी परिषदेस उपस्थित राहून आधुनिक रसायनशास्त्राच्या विविध बाजूंवर विविध सत्रांमध्ये प्रकाश टाकला. उत्प्रेरक हरित रसायनशास्त्र, आयोनिक द्रव पदार्थांची निर्मिती, फोटो कॅटॅलिस्ट आणि हायड्रोजन संबधित प्रक्रियासह उर्जा साठवणूक आणि उर्जा रूपांतरण तंत्रज्ञानातील नवकल्पना इत्यादींबाबत परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. परिषदेत सुमारे ३५० पेक्षा अधिक देशविदेशांतील संशोधक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले. दिवसभरात दोनशेहून अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले.

परिषदेच्या यशस्वितेसाठी डॉ. शंकर हंगीर्गेकर, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ. दिलीप दगडे यांनी परिश्रम घेतले..

Wednesday, 11 February 2026

साहित्य, समाज, वास्तवाशी जोडलेले चित्रपट हे प्रभावी माध्यम: डॉ. डेल्फिम द सिल्वा

शिवाजी विद्यापीठात ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठात आयोजित ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना लिस्बनच्या कमॉईश इन्स्टिट्यूटचे डॉ. डेल्फिम कोरेइया द सिल्वा. सोबत (डावीकडून) डॉ. मेघा पानसरे, डॉ. अक्षय सरवदे आणि डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन समारंभात बोलताना लिस्बनच्या कमॉईश इन्स्टिट्यूटचे डॉ. डेल्फिम कोरेइया द सिल्वा. मंचावर (डावीकडून) डॉ. मेघा पानसरे, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. अक्षय सरवदे.

चित्रपट महोत्सवाचे माहितीपत्रक


कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी: चित्रपट हे साहित्य, समाज आणि वास्तव जीवनाशी जोडलेले प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन लिस्बन (पोर्तुगाल) येथील कमॉईश इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. डेल्फिम कोरेइया द सिल्वा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा विदेशी भाषा अधिविभाग आणि कमॉइश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन द सिल्वा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात हा तीनदिवसीय महोत्सव सुरू आहे.

डॉ. डेल्फिम कोरेइया द सिल्वा म्हणाले, चित्रपटांमधून विविध देशांचे धर्म, संस्कृती, भाषा आणि मानवी अनुभव समजून घेता येतात. कल्पनारम्य कथादेखील वास्तव जीवनातूनच जन्म घेतात आणि मानवी मूल्यांची जाणीव करून देतात. या महोत्सवाच्या माध्यमातून विविध देशांची भाषा, संस्कृती, इतिहास आणि मानवी मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पोर्तुगालचे भारताशी असलेले जुने संबंध तसेच या मैत्रीपूर्ण संबंधांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी चित्रपट हे जागतिक भाषा, संस्कृती, भूगोल आणि इतिहास समजून घेण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. मराठा साम्राज्याच्या इतिहासात पोर्तुगीजांच्या ऐतिहासिक संदर्भांची मोलाची मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. अक्षय सरवदे यांनी कमॉइश इन्स्टिट्यूटसोबतच्या सामंजस्य कराराविषयी उपस्थितांना अवगत केले. माजी विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी पोर्तुगाल भेटीचा अनुभव आणि गतवर्षी आयोजित पोर्तुगीज व ब्राझिलियन चित्रपट महोत्सवांचे स्मरण करून दिले. विद्यार्थ्यांना विदेशी संस्कृती आणि साहित्याशी जोडणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. प्रभंजन माने, स्नेहल शेट्ये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अदिती दळवी यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्योती पाटील यांनी आभार मानले.

जागतिक पुरस्कारप्राप्त चित्रपट पाहण्याची संधी

या चित्रपट महोत्सवात तीन दिवसांत जागतिक पुरस्कारप्राप्त पोर्तुगीज आणि ब्राझिलियन अशा दहा चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील विद्यार्थी त्यात सहभागी झाले आहेत. या महोत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सरवदे यांनी केले आहे.

Monday, 9 February 2026

पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार

कोते आदिवासी आश्रमशाळेत विद्यापीठाचा स्कूल कनेक्ट उपक्रम

 

कोते येथील आदिवासी आश्रमशाळेत शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल कनेक्ट उपक्रमांतर्गत मार्दर्शन करताना डॉ. सुधीर कुंभार. मंचावर (डावीकडून) जगन्नाथ दराडे,  डॉ. श्रीकृष्ण महाजन व अविनाश भाले.

कोल्हापूर, दि. ९ फेब्रुवारी: पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. केंद्राचे समन्वयक डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.

डॉ. कुंभार म्हणाले, वणवा पेटवू नका. वणवा लागला तर तो कसा विझवायचा, हे शिकून घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा. सर्प शेतकऱ्याचा, आपला मित्र आहे. त्यांना मारु नका. झाडे लावून जगविली पाहिजेत. निसर्ग वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी सीड बॉल्स तसेच गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया, जलसंवर्धनाची प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक जगन्नाथ दराडे यांनी आभार मानले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Friday, 6 February 2026

वेणूताई चव्हाण यांच्या कार्यात परिवर्तनाची स्पष्ट दिशा: डॉ. भारती पाटील

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण अध्यासनातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. भारती पाटील.

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण अध्यासनातर्फे आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी उद्घाटन करताना डॉ. नितीन माळी. सोबत (डावीकडून) डॉ. गजानन साळुंखे, डॉ. भारती पाटील, डॉ. उमेश गडेकर आणि ऊर्मिला दशवंत.


कोल्हापूर, दि. ६ फेब्रुवारी: वेणूताई चव्हाण यांच्या कार्यात केवळ सेवा नव्हे, तर परिवर्तनाची स्पष्ट दिशा होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारती पाटील यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासनाच्या वतीने वेणूताई चव्हाण यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी डॉ. पाटील यांचे काल विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन माळी होते.

डॉ. भारती पाटील यांनी वेणूताई चव्हाण यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. त्या म्हणाल्या, वेणूताई चव्हाण यांच्याकडे केवळ यशवंतराव चव्हाण यांची सावली म्हणून पाहिले जाते. तथापि, त्यांचे स्वतःचे म्हणून असे एक स्वतंत्र व्यक्तीमत्त्व होते. त्यांचा संघर्ष, धैर्य आणि सामाजिक योगदानाप्रती त्यांच्या मनात असलेल्या जाणीवा या सर्वच बाबी त्यांचे वेगळेपण दाखविणाऱ्या होत्या. वेणूताई चव्हाण यांनी आपल्या कार्यातून स्त्रीला स्वावलंबी, आत्मविश्वासी आणि विचारक्षम बनवण्याचा ध्यास घेतला होता. सामाजिक सेवेपलिकडे एक परिवर्तनाची स्पष्ट दिशा त्यांच्या समग्र कार्याला लाभलेली होती. आजच्या पिढीने वेणूताईंच्या व्यक्तीमत्त्वाचे हे पैलू लक्षात घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. नितीन माळी म्हणाले, वेणूताई चव्हाण यांनी ज्या तन्मयतेने यशवंतराव चव्हाण यांना अखंड साथसोबत केली, तिला तोड नाही. आजच्या पिढीसाठी ते अत्यंत आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे.

यावेळी डॉ. गजानन साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रताप खोत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला डॉ. उमेश गडेकर, चेतन गळगे, डॉ. संतोष सुतार, मृणालिनी जगताप, डॉ. उर्मिला दशवंत यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Thursday, 5 February 2026

पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यश

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनास भारतीय पेटंट


शिवाजी विद्यापीठाचे पेटंटप्राप्त पोर्टेबल साऊंड अॅबसॉर्प्शन टेस्टर उपकरण

डॉ. कल्याणराव गरडकर

डॉ. संदीप साबळे

डॉ. रोहंत ढब्बे

डॉ. चंद्रला जतकर



कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: एखाद्या ठिकाणी बसविलेली ध्वनीयंत्रणा योग्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करणारे सुवाह्य (पोर्टेबल) ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळविले आहे. या संशोधनाला भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. कल्याणराव गरडकर, जयसिंगपूर महाविद्यालयातील डॉ. संदीप साबळे डॉ. रोहंत ढब्बे आणि इचलकरंजी येथील डी.के.टी.ई.एस. टेक्स्टाईल अँन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या डॉ. चंद्रला जतकर या संशोधकांनी पोर्टेबल साऊंड अॅबसॉर्प्शन टेस्टरहे उपकरण तयार केले आहे. व्यावसायिक ध्वनीयंत्रणेच्या ध्वनीशोषण क्षमतेच्या चाचणीसाठी सदर उपकरण अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहे. आजपर्यंत एखादा रेकॉर्डिंग स्टुडिओ, रेकॉर्डिंग कक्ष, थिएटर, सभागृह इत्यादी ठिकाणी ध्वनीयंत्रणेसह ध्वनीशोषक यंत्रणा बसविल्यानंतर तिची क्षमता, ध्वनीशोषणातील अपेक्षित परिणामकारकता यासंदर्भात अनुभवातूनच चाचपणी केली जात आहे. तथापि, सदर उपकरणामुळे आता ध्वनीशोषण यंत्रणा बसविल्यावर लगोलग तिच्या क्षमतेची शास्त्रीय चाचणी करता येणे शक्य होणार आहे. अशा प्रकारचे हे उपकरण प्रथमच निर्माण करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे.

ध्वनीशोषण करणाऱ्या पोर्टेबल शीट्स आणि पॅनल यांचा उपयोग मुख्यत्वे थिएटर, स्टुडिओ आणि व्होकल रेकॉर्डिंग कक्ष यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. ध्वनीशोषक वापरल्यामुळे मायक्रोफोनभोवती येणारा प्रतिध्वनी (एको) शोषून रेकॉर्डिंगसाठी 'शांत' वातावरण तयार केले जाते. यामुळे अधिक स्वच्छ आणि अधिक व्यावसायिक व्होकल किंवा वाद्यांचा आवाज मिळविण्यास मदत होते. सदर पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरणाचा वापर आवाज नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध अॅबसॉर्बर उदा. छिद्र असणारे फोम, फायबर, फॅब्रिक, मेंम्ब्रेन, पॅनल, रेझोनंट अॅबसॉर्बर तसेच प्रतिध्वनी कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीशोषकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी होतो.

ध्वनीशोषक उपकरणाची कार्यप्रणाली

या पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरणाच्या कार्यपद्धतीची माहिती देताना डॉ. गरडकर म्हणाले, मानवी कानासाठीचा मानक श्रवणीय ध्वनी २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ स्पेक्ट्रम इतका आहे. या नव्याने शोधलेल्या ध्वनीशोषक चाचणी उपकरणामध्ये त्या दरम्यानच्या क्षमतेचे ध्वनीतरंग तयार करून चाचणी करावयाच्या ध्वनीशोषक वस्तूंवर प्रक्षेपित करून त्यावरुन परावर्तित केली जातात.  त्या वस्तूंकडून शोषले न गेलेले ध्वनीतरं माइक्रोफोन (डिटेक्टर) द्वारे करंट / व्होल्ट स्वरुपात उपकरणाच्या स्क्रीनवर प्रदर्शित केली जातात. याद्वारे त्याठिकाणी ध्वनीशोषक यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित आहे किंवा कसे, याविषयीचा अंदाज बांधून लगेच त्यावर उपयोजनही करणे शक्य होते. ध्वनीशोषण फॅब्रिकेशन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठीही हे उपकरण उपयुक्त आहे. हे उपकरण सुवाह्य म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतेच, त्याशिवाय ते कमी खर्चिकही आहे. ध्वनीयंत्रणा तपासणीच्या क्षेत्रात ते अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या पेटंटच्या प्राप्तीबद्दल शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

Wednesday, 4 February 2026

नवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवार

शिवाजी विद्यापीठात प्रा. नरहर विष्णू कारेकर व्याख्यानमालेत बोलताना डॉ. प्रकाश पवार. मंचावर डॉ. प्रल्हाद माने आणि डॉ. महादेव देशमुख.

शिवाजी विद्यापीठात प्रा. नरहर विष्णू कारेकर व्याख्यानमालेत बोलताना डॉ. प्रकाश पवार.

(व्याख्यानाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ४ फेब्रुवारी: यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशाने विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत असून, संगणक क्षेत्राच्या पुढे जाऊन आता नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योग विकसित होण्याच्या दिशेने भारताच्या विज्ञान क्षेत्राची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे आज प्रा. नरहर विष्णू कारेकर व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. पवार यांचे भारताचे विज्ञान धोरण या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते.

भारताच्या विज्ञान धोरणाचा व्यापक आढावा घेताना डॉ. प्रकाश पवार म्हणाले, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाचा नवा टप्पा अधोरेखित झाला आहे. विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राला पुन्हा प्राधान्य देत भारत आता संगणक व सेवा क्षेत्राच्या पुढे जाऊन नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योगांच्या उभारणीकडे वळत असल्याचे दिसते आहे. जागतिकीकरणानंतर जुन्या ज्ञानव्यवस्थेच्या जागी नव्या तंत्रज्ञानाधारित ज्ञाननिर्मिती सुरू झाली असून औद्योगिक क्रांतीपासून संगणकीकरण, डिजिटल तंत्रज्ञान यांच्या मार्गे आता कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा हा प्रवास भारताच्या विज्ञान क्षेत्राला नवे परिमाण प्राप्त करून देत आहे.

डॉ. पवार यांनी भारताच्या विज्ञान धोरणाचा ऐतिहासिक प्रवास स्वातंत्र्यपूर्वकालीन आधुनिकतावादाचा काळ, स्वातंत्र्योत्तर काळातील वैज्ञानिक संस्थांची उभारणी आणि १९९० नंतरच्या जागतिकीकरणोत्तर तंत्रज्ञानप्रधान युगाचा कालखंड असा तीन टप्प्यांत मांडला. ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी स्वीकारलेला आधुनिकतावादी दृष्टिकोन हा वैज्ञानिक विचारांचा पाया ठरला. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे आयआयटी, भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र, एन.पी.एल., एन.सी.एल. यांसारख्या शैक्षणिक व वैज्ञानिक संस्थांची उभारणी झाली आणि भारतात विज्ञानवादाची मजबूत पायाभरणी झाली. १९५१ मध्ये खरगपूर येथे पहिली आयआयटी स्थापन झाल्यानंतर मुंबई, कानपूर, दिल्ली आदी ठिकाणी या संस्था उभारण्यात आल्या. त्या काळात ३,७०३ संशोधक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि ५९,९६५ विद्यार्थी या संस्थांत शिक्षण घेत होते. एका नव्या आधुनिक पर्वाची नांदी ठरणारा असा हा कालखंड होता. भारताच्या भावी वैज्ञानिक विकासाची पायाभरणी या पर्वाने केल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. देशमुख म्हणाले, विज्ञान आणि मानव्यविज्ञानामधील परस्परसंबंध हा फार महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या वैज्ञानिक वाटचालीविषयी बोलत असताना डॉ. पवार यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचा अत्यंत साकल्याने वेध घेतला आहे. सर्वसामान्य माणसाचे राहणीमान उंचावणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट असते. त्या दृष्टीने जास्त लोकसंख्या असलेल्या देशाचा प्राधान्यक्रम रोजगारनिर्मिती असतो. अशा स्वावलंबी मनुष्यबळाच्या विकासामधूनच देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुकर होणार आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानव्यविज्ञान या तिहेरी संगमातूनच विकसित भारताची उभारणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि परिचय करून दिला. मयुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश ब्राह्मणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुखदेव उंदरे, भारत शास्त्री, डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.