Thursday, 5 March 2026

आण्णासाहेब लठ्ठे महत्त्वाचे लोकशिक्षक: आनंद मेणसे

शिवाजी विद्यापीठात आयोजित आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना प्राचार्य आनंद मेणसे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना प्राचार्य आनंद मेणसे. मंचावर (डावीकडून) सुहास पाटील, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे.

(व्याख्यानमालेची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ५ मार्च: शाहूकार्याशी बांधिलकी आणि गांधीविचारांशी निष्ठा अशा मुशीतून घडलेले दिवाणबहादूर आण्णासाहेब लठ्ठे हे एक महत्त्वाचे लोकशिक्षक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र, मराठी अधिविभाग आणि इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेमध्ये आण्णासाहेब लठ्ठे: जीवन आणि कार्य या विषयावर ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते, तर सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुहास पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्राचार्य मेणसे यांनी आपल्या भाषणात प्रोफेसर लठ्ठे यांनी कोल्हापूरसह बेळगाव परिसरात केलेल्या विविधांगी कार्याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, लठ्ठे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक भूमिका पटलेली होती. विशेषतः कोल्हापूरमध्ये त्यांनी जैन विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वसतिगृहाच्या कृतीमुळे ते प्रभावित झाले होते. या माध्यमातून ते महाराजांच्या अधिक जवळ आले. त्यांच्या विचारकार्याशी त्यांनी अखेरपर्यंत बांधिलकी सांभाळली. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनात अस्पृश्यता निवारण, दलित आणि महिलांचे प्रश्न विषयपत्रिकेवर घेतल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतील अन्य मंडळींसह लठ्ठेही त्यांच्यासमवेत उभे राहिले. गांधींच्या श्रमप्रतिष्ठेच्या विचाराचे ते पाईक होते.

मेणसे पुढे म्हणाले, जयंती नदीवरील पूल, नगरविकास नियोजन, राजाराम महाविद्यालयांत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांच्यासारख्या गुणवंत शिक्षकांना आणून येथील शिक्षणव्यवस्था दर्जेदार करणाऱ्या लठ्ठे यांचा कोल्हापूर घडविण्यात जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो बेळगावच्या राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासामध्येही आहे. १९३७ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बेळगाव उत्तरमधून लठ्ठे विजयी झाले आणि मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्रीही झाले. त्यावेळी त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आदर्शवत स्वरुपाचा होता. त्यात त्यांनी दारूबंदीचे सूतोवाच केले. आणि त्यापोटी बुडणारा महसूल घोड्यांच्या शर्यती आणि श्रीमंतांच्या घरभाड्यावरील कर इत्यादी मार्गांनी वसूल करण्याची योजना केली. दक्षिण कोकण शिक्षण संस्थेची स्थापना आणि वृद्धी याकामीही त्यांनी फार मोलाचे योगदान दिले. आजही संस्थेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त चालतो, याला लठ्ठे यांनी घालून दिलेला आदर्श कारणीभूत आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, आण्णासाहेब लठ्ठे यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्रासह त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहीली. त्यांचे वाचन करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या कृती केल्या, त्यामागील कार्यकारणभाव आजच्या पिढीने जाणीवपूर्वक समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या विविध पैलूंविषयी संशोधन व अभ्यास करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुहास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर सुखदेव एकल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला डॉ. अशोक चौसाळकर, सुरेश शिपूरकर, डॉ. अनिल गवळी, डॉ. शरद गायकवाड, डॉ. रफिक सूरज, डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. सुभाष पाटील यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Wednesday, 4 March 2026

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला

शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा संघ.

शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा क्रीडा अधिविभागाचा संघ

शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत तृतीय स्थान मिळविणारा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा संघ


कोल्हापूर, दि. ४ मार्च: शिवाजी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने सलग चौथ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. क्रीडा अधिविभाग दुसऱ्या तर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.

शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धा २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल येथे झाल्या. यामध्ये कॅम्पसवरील सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा: क्रिकेट (पुरुष): स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट.

क्रिकेट (महिला): क्रीडा आधिविभाग, रसायनशास्त्र, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, गणित.

थ्रो बॉल (महिला): फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वाणिज्य व व्यवस्थापन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल अँड डेव्हलपमेंट, प्राणीशास्त्र.

व्हॉलीबॉल (पुरुष): स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वनस्पतीशास्त्र, क्रीडा,

बुद्धिबळ (पुरुष): आदित्य सावळकर (क्रीडा), अनिकेत धोतुरे (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), अपूर्व कदम (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग).

बुद्धिबळ (महिला): प्रतीक्षा गोसावी (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), सुरभी सिंग (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), नेहा कटके (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग).

बॅडमिंटन (पुरुष): स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अर्थशास्त्र, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी.

बॅडमिंटन (महिला): डिपार्टमेंट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, संगणकशास्त्र.

रस्सीखेच (महिला): क्रीडा, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गणित, शिक्षणशास्त्र.

रस्सीखेच (पुरुष): शिक्षणशास्त्र, पर्यावरणशास्त्र, क्रीडा.

अॅथलेटिक्स पुरुष आणि महिला गटात सर्वसाधारण विजेते अनुक्रमे: क्रीडा, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मराठी.

स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभाला विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, अमित कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले.

समाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी शाश्वत विकासाचे बीज: सिद्धार्थ शिंदे

चंदगड तालुक्यात सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबीराचा समारोप

शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबिराच्या समारोप प्रसंगी सिद्धार्थ शिंदे यांच्यासमवेत अमोल मिणचेकर, मंजुषा मोहिते आदी.


कोल्हापूर, दि. ४ मार्च: समाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी हा शाश्वत विकासाचे बीज असून आपल्या परिसराच्या विकासामध्ये भरीव योगदान देण्यासाठी सक्षम असावा, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी केले.

मौजे जाम्बरे व मजरे शिरगाव (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या समाजकार्य विभागामार्फत २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात २८ विद्यार्थ्यांनी शिबिर समन्वयक डॉ. अमोल मिणचेकर व मंजुषा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय परिस्थितीचा सखोल व वस्तुनिष्ठ अभ्यास केला. शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून विकासाच्या गरजा ओळखणे हा होता. या शिबिराच्या समारोप समारंभात श्री. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सिद्धार्थ शिंदे यांनी आपल्या मनोगतात समाजकार्य अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, समाजकार्य अभ्यासक्रम केवळ शासकीय नोकऱ्यांसाठीच नव्हे; तर, राजकारणेच्छु उमेदवारांसाठीही उपयुक्त आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसराच्या शाश्वत विकासासाठी योदान देणे अभिप्रेत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे. लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा करू इच्छिणाऱ्या युवकांनी किंवा शासकीय नोकरीत येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी या अभ्यासक्रमाचा लाभ योग्य प्रकारे घेतल्यास ग्रामीण जीवन अधिक उत्तम आणि शाश्वत बनण्यास मदत होईल.

या शिबिरादरम्यान मोबिलिटी मॅपिंग, सामाजिक नकाशा, संसाधन नकाशा, समस्या वृक्ष, कालबदल तक्ता आणि लक्षकेंद्री गट चर्चा या विविध साधनांचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेतून गावातील पाणीटंचाई, बेरोजगारी, शेतीतील घटते उत्पन्न, युवकांचे स्थलांतर, महिलांच्या मर्यादित हालचाली आणि पर्यावरणीय समस्या यांचे मूळ कारणांसह विश्लेषण करण्यात आले. महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिक यांच्या स्वतंत्र चर्चांमधून स्थानिक अडचणी आणि विकासाच्या संधी स्पष्ट झाल्या. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे समस्यांचे परस्परसंबंध समजून घेता आले आणि स्थानिक स्तरावर अमलात आणता येतील अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या. पाणी व्यवस्थापन सुधारणा, कौशल्य विकास प्रशिक्षण, महिला उद्योजकतेला चालना, पर्यावरण संवर्धन उपक्रम आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे  व स्कूलचे संचालक डॉ. नितीन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागावर आधारित गावाच्या शाश्वत विकासासाठीचा हा दिशादर्शक उपक्रम यशस्वी ठरला.

Saturday, 28 February 2026

धोरणात्मक निर्णयांमध्ये सर्वेक्षणांची भूमिका महत्वाची: डॉ. गीता सिंग राठोड

राष्ट्रीय अर्थमिती परिषदेची विद्यापीठात सांगता

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना सांख्यिकी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रदीप्तरथी पांडा, डॉ. महादेव देशमुख, डॉ. उषा थोरात, डॉ. नीरज हातेकर, डॉ. के. षण्मुगन, डॉ. व्ही.एम. पाटील.  

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना सांख्यिकी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड.


(अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: शैक्षणिक संशोधनाबरोबरच शासकीय आणि संस्थात्मक धोरणात्मक निर्णयांसाठी विविध प्रकारची सर्वेक्षणे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड यांनी आज व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग (स्वायत्त), भारतीय अर्थमिती संस्था आणि डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अर्थमिती संस्था हीरकमहोत्सवी (६० व्या) वार्षिक राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भारतीय अर्थमिती संस्थेचे डॉ.नीरज हातेकर होते, तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. उषा थोरात आणि प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गीता सिंग राठोड म्हणाल्या, रोजगार पद्धती, उद्योग गतिशीलता, औद्योगिक कामगिरी आणि गुंतवणूक वर्तन हे भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे मुख्य प्रवर्तक घटक आहेत. ते नेमकेपणाने समजून घेण्याच्या कामी सर्वेक्षणे मदत करतात. चांगले संशोधन चांगल्या डेटाच्या उपलब्धतेमुळे सुरु होते. मजबूत आकडेवारी हे भारताचे बलस्थान आहे. सर्वेक्षणांमुळे धोरणात्मक निर्णय देखील अधिक प्रभावी झाल्याचे दिसतात. सांख्यिकी आपल्याला तथ्ये देते, अर्थमिती आपल्याला स्पष्टता देते आणि एकत्रितपणे ते समाजाला सूज्ञपणे निवड करण्याचा आत्मविश्वास देतात. भारताला अशा तरुण विद्वानांची गरज आहे, जे तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक उद्देशाची सांगड घालू शकतील. सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपणास कोणत्याही क्षेत्रातील विश्लेषण करता येते. नियोजन आणि प्रगतीसाठी त्याचा उपयोग होतो, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी डॉ. उषा थोरात म्हणाल्या, सन १९९१ मध्ये रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे देशाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आणि चलन व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. तेव्हापासून देशाच्या अर्थव्यवस्थेने आपल्या प्रगतीचा वेग कायम राखला आहे.

यावेळी डॉ.नीरज हातेकर, डॉ. महादेव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तर, भारतीय अर्थमिती संस्थेचे सचिव डॉ. के. षण्मुगन यांनी परिषदेचा आढावा सादर केला. संस्थेचे खजिनदार डॉ. प्रदीप्तरथी पांडा यांनी आभार मानले. 

महिलांनी विज्ञानाचे आधुनिक ज्ञान आत्मसात करावे: डॉ. अपर्णा कलावते

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रमाची सांगता

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सांगता समारंभात बोलताना झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वरिष्ठ संशोधक डॉ. अपर्णा कलावते.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सांगता समारंभात बोलताना झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वरिष्ठ संशोधक डॉ. अपर्णा कलावते. मंचावर (डावीकडून) डॉ. माधुरी वाळवेकर, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. राजाराम गुरव आणि डॉ. एस.आर. यन्कंची.


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: विकसित भारताच्या जडणघडणीमध्ये महिलांचे मोलाचे योगदान राहणार असून त्यासाठी त्यांनी संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह विज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (पुणे) येथील वरिष्ठ संशोधक डॉ. अपर्णा कलावते यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, डॉ. एस.आर. यंन्कंची उपस्थित होते.

डॉ. अपर्णा कलावते यांनी विज्ञान क्षेत्रातील महिलांची परंपरा आणि योगदान यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, भारतीय विज्ञान क्षेत्राला जानकी अम्मल, शकुंतला देवी, रेशे कार्सन, असीमा चटर्जी, डॉ. इंदिरा हिंदुजा इत्यादी अनेक प्रभावी महिला संशोधक, शास्त्रज्ञांनी योगदान देऊन समृद्ध बनविले आहे. विपरित परिस्थितीशी दोन हात करीत त्यांनी आपल्या संशोधनाची वाट चोखाळली. त्यांचा आदर्श ठेवून आजच्या युवतींनी विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास सज्ज व्हायला हवे. त्यासाठीच केंद्र सरकारने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची मध्यवर्ती संकल्पनाच विज्ञान क्षेत्रातील महिला: विकसित भारतासाठी प्रेरक शक्ती अशी ठेवली आहे. महिलांचे सर्वंकष योगदान लाभले तरच भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल. म्हणून महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द करीत असताना आणि वावरत असताना संकोच बाळगू नये, आत्मविश्वासाने पुढे यायला हवे. विद्यार्थ्यांनी लघु आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करून ध्येयवादी वृत्तीने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी गणित (STEM) या क्षेत्रां महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून संशोधन नवोपक्रमात आघाडी घेण्यासाठी सध्या सुवर्णकाळ आहे. या संधीचा विद्यार्थिनींनी लाभ घ्यायला हवा. विकसित भारताला अपेक्षित विज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीतील योगदान देण्यासाठी त्यांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. डॉ. सुनील गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विज्ञान दिन उपक्रमाच्या समन्वयक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी संपूर्ण उपक्रमाचा अहवाल सादर केला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नितीन कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.