Friday, 27 February 2026

दृष्टिदिव्यांगांनी स्पर्श, गंध, चवीतून ‘अनुभवले’ वनस्पतीजगत

शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'सुगम्यविज्ञान' उपक्रम





शिवाजी विद्यापीठाच्या सुगम्यविज्ञान उपक्रमांतर्गत स्पर्श, गंध व चवीतून वनस्पतींची ओळख करून घेताना दृष्टीदिव्यांग विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बीजारोपण ते उत्पादन या विषयावर विशेष सुगम्यविज्ञान हा उपक्रम आयोजित केला. याअंतर्गत स्पर्श, गंध, आकार आणि चवीच्या माध्यमातून विविध वनस्पती ओळखण्याचे तंत्र या विद्यार्थ्यांना आत्मसात करता आले. वनस्पतीजगताची अनोखी ओळख आणि अनुभव या विद्यार्थ्यांना घेता आला.

राष्ट्रीय विज्ञान दिन – २०२६ अंतर्गत शिवाजी विद्यापीठात युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दृष्टि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित विज्ञान उपक्रम राबविण्यात आला. बीजरोपणापासून उत्पादनापर्यंतच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करत वनस्पतींची वाढ, बियांची रचना, अंकुरण प्रक्रिया, रोपांची निगा आणि शेतीतील उत्पादन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना विविध फळे, मसाले, औषधी व सुगंधी वनस्पतींचे स्पर्श, गंध तसेच चव यांच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आली.

या उपक्रमात सुशिलाबाई घोडावत अंध विद्यालय (सांगली-मिरज), ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध विद्यालय (कोल्हापूर) आणि श्री सद्‌गुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय (पलूस) येथील सुमारे शंभर दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक आणि पालकही उपस्थित होते. स्पर्श, सुगंध, चव आणि आकार यांच्या आधारे वनस्पती ओळखण्याचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रयत्न केला.

कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. माधुरी वाळवेकर, संयोजक डॉ. एस. आर. यंन्कंची, युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा जाधव आणि डॉ. एस. ए. पाटील यांनी उपक्रमाचे नियोजन केले. 

संवेदनशील, रचनात्मक शिक्षणातूनच सामाजिक समावेशन शक्य: प्रा. रेणू दांडेकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात बीजभाषण करताना प्रा. रेणू दांडेकर. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अशोक कांबळे, डॉ. कोमाराईह आणि अविनाश भाले.


कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: संवेदनशील, रचनात्मक शिक्षण व्यवस्थेतूनच खऱ्या अर्थाने सामाजिक समावेश शक्य आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या लोकसाधना संस्थेच्या संस्थापक प्रा. रेणू दांडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या 'सामाजिक समावेशन  अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित “कोणीही मागे राहू नये: सामाजिक समावेशासाठी शिक्षणाचा पुनर्विचार" या राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डी.ए. सावकार अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. अशोक कांबळे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

प्रा. दांडेकर म्हणाल्या, निर्मितीक्षम आणि रचनात्मक शिक्षणच सर्वांना सक्षम करणारे व सामाजिक समावेशन घडविणारे ठरते. शिक्षणाचा पुनर्विचार करताना ‘माणूसपण’ जपणारे शिक्षण देणे ही काळाची गरज असून संवेदनशील शिक्षकच त्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत स्वातंत्र्य, नवदृष्टी आणि बौद्धिक संधी मिळाल्यासच त्यांचे सामाजिक समावेशन शक्य होईल.

डॉ. अशोक कांबळे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. तरच निष्पत्तीआधारित मूल्यमापनातून शिक्षणाचा सामाजिक समावेशनासाठी उपयोग होईल. विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे विषय समजणे आणि ते प्रत्यक्ष जीवनाशी जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, औपचारिक शिक्षण घेतले नाही म्हणून एखादी व्यक्ती अयोग्य ठरत नाही. शिक्षणाचा सामाजिक समावेशनासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार होणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेने संधी निर्माण केल्यास समाजातील सर्व घटक मुख्य प्रवाहात येऊ शकतात.

यावेळी बनारस हिंदू विद्यापीठ येथील सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. जे. बी. कोमाराईह यांची प्रमुख उपस्थिती होती. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी राऊत, डॉ. राजू श्रावस्ती, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. केदार मारुलकर, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. तेजपाल मोहरेकर, डॉ.सुप्रिया पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.

या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात डॉ. निकोत्चा मेंडसे (गोवा), डॉ. प्रशांत बनसोडे (पुणे), डॉ. जयानंद खंडागळे (संभाजीनगर), प्रा. डी. श्रीकांत (कर्नाटक), प्रा. शंकरनारायण पालीरी (केरळ), डॉ. मोझीन्हा फर्नांडिस (गोवा) यांच्यासह सामाजिक समावेशन व शिक्षण या विषयांवरील देशभरातील तज्ज्ञ, संशोधक व अभ्यासक सहभागी झाले आहेत.

भाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील परिसंवादात सूर

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. अनिल गवळी. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. गिरीष मोरे व डॉ. नंदकुमार मोरे.


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. अनिल गवळी.


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे. 

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन समारंभात सहभागी झालेल्या मराठी अधिविभागाच्या विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मृण्मयी पांचाळ या विद्यार्थिनीने रेखाटलेली वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची रांगोळी.


(मराठी भाषा गौरव दिन समारंभाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: भाषिक घोटाळे आणि उद्भवू शकणारे अप्रयोजित विनोद टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष परिसंवादामध्ये उमटला.

शिवाजी विद्यापीठात आज मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भवनातील मराठी अधिविभाग आज रांगोळ्या आणि सुवासिक फुलांच्या माळांनी सजला. विद्यार्थ्यांनी सर्व अधिविभाग आकर्षक पद्धतीने सजविला. या आनंदाच्या वातावरणात विरामचिन्हांचा वापर आणि महत्त्व या विषयावरील परिसंवाद अतिशय उत्तम रंगला. या परिसंवादात विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीष मोरे यांनी सहभाग घेतला. जनसंपर्क अधिकारी तथा विद्यापीठाचे मराठी भाषा अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गवळी आणि डॉ. मोरे या दोघांनीही आपल्या भाषणात भारतातील विरामचिन्हांच्या उगमाच्या इतिहासापासून ते सद्यस्थितीपर्यंत साद्यंत आढावा घेतला.

डॉ. गवळी म्हणाले, भारतात पूर्वी लेखनापेक्षा पाठांतरावर अधिक भर होता. त्यामुळे पाठांतर आणि उच्चारशास्त्र अधिक प्रमाण मानले जाई. दीर्घ, ऱ्हस्व, आरोह, अवरोह इत्यादींसह पाठांतर केले जाई. त्यामुळे त्यावेळी विरामचिन्हे नसावीत. प्रचलित पद्यपद्धतीला अनुसरून विसर्ग आणि दंड हीच विरामचिन्हे प्रचलित होती. मेजर थॉमस कँडी यांनी १८५०मध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह आणि प्रश्नचिन्ह ही पाच विरामचिन्हे मराठी भाषेला दिली. थॉमस कॅंडी यांनी केवळ मोल्सवर्थच्या मराठी इंग्रजी शब्दकोषाचे निर्मितीकार्य सिद्धीस नेले, इतकेच नव्हे, तर इंग्रजी-मराठी शब्दकोषाची निर्मितीही केली. त्याखेरीज येथील पंतोजींच्या शाळांतून इसापनिती, सिंहासन बत्तिशी या पुस्तकांच्या पलिकडे जाऊन वाचन पाठमाला, भाषांतर पाठमाला इत्यादी पुस्तकांचाही अभ्यासक्रमात समावेश करून शिक्षणाला आधुनिक रुप दिले. विरामचिन्हांच्या वापरांबाबतचे अनेक संकेत कँडी यांनी त्यांच्या पुस्तिकेत दिले आहेत, तथापि, विरामचिन्हे वापरताना प्रचलित व्याकरणाचे नियम लक्षात घ्यायला हवेत, अन्यथा घोटाळे होण्याची शक्यता वाढेल.

डॉ. गिरीष मोरे म्हणाले, वक्त्याच्या बोलण्यात स्वर आणि लय या दोहोंना महत्त्व आहे. बोलण्यातून विरामचिन्हे व्यक्त होतात, तर लेखनातून दृश्यरुपात प्रकट होतात. विरामचिन्हे म्हणजे शिस्तीची काटेकोर लेखनसंहिता होय. आपल्या देशात मौखिक परंपरेतून आलेले साहित्य ऐकण्यात येत असे, पण वाचनात फारसे येत नसे. त्यामुळे विरामचिन्हांऐवजी काही बिघडत नसे. आजच्या काळात मात्र विरामचिन्हांऐवजी निश्चित बिघडू शकते. विरामचिन्हांमुळे वाक्याचा नेमका अर्थ स्पष्ट होऊन वाचन सुलभ होते. अर्थस्पष्टतेसाठी वाचकाची दमछाक टाळण्यासाठी विरामचिन्हे आवश्यक आहेत. विरामचिन्हे ही अर्थनिर्णयाची साधना होत. सर्वच लेखकांनी त्यांचा वापर करावा. कवी आणि ललितलेखक यांना त्या बाबतीत थोडी सवलत घेण्याची संधी असते. संशोधकांनी मात्र विरामचिन्हांचा काटेकोर वापर केलाच पाहिजे कारण संशोधनात त्यांच्याकडून अचून विधानांची अपेक्षा असते. ती अपेक्षा विरामचिन्हांमुळेच तडीस जाते. संदर्भनिर्देशाच्या विविध पद्धती यादेखील केवळ विरामचिन्ह वापरातील फरकामुळे निर्माण झालेल्या दिसतात. केवळ अवतरणचिन्ह नसेल तरी सुद्धा वाङ्मयचौर्य ठरू शकते, इतके संशोधनात त्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, मेजर कँडी यांच्यासारख्या अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मराठी भाषा व संस्कृतीची मनोभावे सेवा केली. विरामचिन्हे ही त्यांची अमूल्य देणगी होय. बोलण्या-लिहीण्यात विरामचिन्हांच्या वापराअभावी अराजक निर्माण होऊ शकते. बा.सी मर्ढेकर, विलास सारंग, र.कृ. जोशी यांच्या कवितांत विरामचिन्हांचा ठाशीव वापर दिसून येतो. विरामचिन्हे ही भाषेत वाहतूक नियंत्रण यंत्रणेप्रमाणे काम करतात. नियम पाळले नाहीत तर वाक्यांचे अपघात होण्याची मोठी शक्यता असते.

सुरवातीला मृण्मयी पांचाळ या विद्यार्थिनीने मराठी भाषा गौरव गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचा स्टॉलही मांडण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचे विविध पैलू उलगडून दाखविणारा विशेष गुणदर्शन कार्यक्रमही सादर झाला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. तर अमोल देशमुख यांनी आभार मानले.

Thursday, 26 February 2026

समावेशन आणि शाश्वततेची कास धरल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य उज्ज्वल: डॉ. एस. महेंद्र देव

शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या उद्घाटन समारंभात दीपप्रज्वलन करताना पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव. सोबत (डावीकडून) डॉ. अनिल कुमार गुप्ता, डॉ. नीरज हातेकर, डॉ. महादेव देशमुख आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव. मंचावर (डावीकडून) डॉ. महादेव देशमुख, डॉ. के. षण्मुगन, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. नीरज हातेकर आणि डॉ. अनिल कुमार गुप्ता.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव.

(शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत.)



कोल्हापूर, दि.२६ फेब्रुवारी: भारताने समावेशक आणि शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असून सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास भारताच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. एस. महेंद्र देव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग (स्वायत्त), भारतीय अर्थमिती संस्था आणि डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अर्थमिती संस्था हीरक महोत्सवी (६० व्या) वार्षिक राष्ट्रीय परिषदेस आज शिवाजी विद्यापीठात प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उद्घाटक म्हणून तर डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता प्रमुख उपस्थित होते.

डॉ. देव यांनी यावेळी भारतीय अर्थव्यवस्था: काल, आज आणि उद्या या विषयावर सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अनेक आव्हाने असली तरी मजबूत देशांतर्गत मागणी, राजकीय स्थैर्य आणि व्यापक आर्थिक स्थैर्य यामुळे भारतीय अर्थव्यवस्था लवचिक  राहिली आहे. मात्र, केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढ पुरेशी नसून समावेशक आणि पर्यावरणपूरक विकासावर भर देणे आवश्यक आहे.

डॉ. देव म्हणाले की, विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी उत्पादन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः श्रमप्रधान उद्योगांना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे रोजगारनिर्मिती वाढेल, निर्यात मजबूत होईल आणि संरचनात्मक परिवर्तनाला गती मिळेल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकटी देणे, संशोधन व विकास मध्ये गुंतवणूक वाढविणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्थव्यवस्थेसाठी तयारी करणे हे भविष्यातील यशाचे प्रमुख घटक ठरतील. भारताच्या विकासात राज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक राज्याने आपल्या क्षमतेनुसार विकासाचे स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. देशातील विविध राज्यांमध्ये विकासाची असमानता असल्याने संतुलित प्रादेशिक विकासावर विशेष भर देणे गरजेचे आहे. भारतातील लोकसंख्यात्मक लाभांश ही मोठी संधी असून तिचा योग्य वापर करण्यासाठी कौशल्य विकास, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

हवामान बदल हा भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी गंभीर आव्हान असून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणपूरक आणि हवामान-संवेदनशील विकास धोरण स्वीकारल्यास भारत आर्थिक प्रगतीसोबतच पर्यावरणीय संतुलनही राखू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

उद्घाटनपर मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, भारतीय अर्थमिती संस्थेने देशाच्या आर्थिक विकासामध्ये मार्गदर्शकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. येथून पुढच्या काळात जनुकीय परिवर्तनाधारिक पिके तसेच नवऔषध निर्माणाला जगाच्या अर्थकारणात मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. कोविड-१९च्या साथीने त्याची चुणूक आपल्याला दाखविली आहे. त्यामुळे आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या युगामध्ये औषधनिर्माण शास्त्रातील संशोधन व विकास या बाबींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनेही अर्थशास्त्रज्ञांनी आता विचार व कृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. नीरज हातेकर यांनी संशोधकांना सूक्ष्म आणि स्थानिक आकडेवारीच्या अभ्यासाकडे वळण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड अशा स्थाननिहाय आकडेवारीतून अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण प्रवृत्ती आणि विषमता अधिक अचूकपणे समजून घेता येतात; मात्र, यासाठी प्रगत सांख्यिकी व अर्थमिती तंत्रांसह प्रचंड संगणकीय क्षमतेची आवश्यकता असते. भविष्यात संशोधनातील सर्वात मोठे आव्हान हे सॉफ्टवेअर किंवा डेटा नव्हे, तर संगणकीय क्षमता, इंटरनेट गती आणि हार्डवेअर असेल. तसेच, मोठ्या डेटावर आधारित संशोधनासाठी संशोधकांमध्ये व्यापक सहकार्य आणि नेटवर्किंग अत्यावश्यक असून या क्षेत्रात अधिकाधिक संशोधकांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. महादेव देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. देशमुख यांच्या ‘दि थ्री डीज्’ या पुस्तकाचे तसेच परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय अर्थमिती संस्थेचे सचिव डॉ. के. षण्मुगन यांनी आभार मानले. या तीनदिवसीय परिषदेसाठी २२ राज्यांतून ३०० पेक्षा अधिक शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित आहेत.

  

Tuesday, 24 February 2026

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - डॉ.राजन गवस

 


 

कोल्हापूर,दि.24 फेब्रुवारी - ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आज येथे केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ.म.सु.पाटील समीक्षा पुरस्कार, 2026 चे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिवडॉ.विलास शिंदे उपस्थित होते.

            डॉ.गवस पुढे म्हणाले,खेडयापाडयातील लिहित्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केले.अफाट वाचनामुळे साहित्याविषयीची त्यांची भूमिका पक्की होती.

            पुरस्कारस उत्तर देताना ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील म्हणाले, माणसांवर प्रेम करणाऱ्या समीक्षक म.सु.पाटील यांच्या नांवे दिला जाणारा पुरस्कार मला मिळणे हे गौरवास्पद आहे.नव्याने लिहिणाऱ्यांनी आपला आत्मा गहाण टाकता समग्र अवकाशाविषयी जागरूकतेने लिहिले पाहिजे.

            अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, पुस्तक परीक्षणाच्या पातळीवरील समीक्षेपेक्षा सैधांतिक पातळीवरील पातळीची समीक्षा चंद्रकांत पाटील यांची आहे.

            या पुरस्कार वितरण सोहळयाचे प्रास्ताविक मराठी अधिविभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी केले.  मानपत्राचे वाचन डॉ.नंदकुमार मोरे यांनी केले.  आभार डॉ.सुखदेव एकल यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रांजली क्षीरसागर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी डॉ. दिलीप धोंडगे, प्रा.प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत, डॉ.एकनाथ पगार, आशुतोष पाटील, विरधवल परब, डॉ.अवनिश पाटील, डॉ.मेघा पानसरे, गौतमी पुत्रकांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

-----

डॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक - प्राचार्य डॉ.दिलीप धोंगड

 


कोल्हापूर, दि.24 फेब्रुवारी - डॉ.म.सु.पाटील यांची समीक्षा व्रतस्थ आणि प्रमेयदर्शी आहे. त्यांनी निष्ठापूर्व गांभीर्यपूर्वक समीक्षा लिहिली. प्रबंधात्मक ग्रंथ लिहिले. सुक्ष्म आणि नेटके वाचन करीत असताना आदिबंधात्मकनिष्ठ समिक्षेचा वापर केला.कलाकृतीकेंद्री समीक्षा करावी, असे त्यांचे म्हणणे होते.ते वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.दिलीप धोंगडे (नाशिक) यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये मराठी अधिविभाग, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन नव-अनुष्टुभ प्रतिष्ठान, येवला (नाशिक) यांच्या वतीने 'डॉ.म.सु.पाटील यांचा समीक्षाविचार' या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे होते. डॉ.म.सु.पाटील यांच्या कन्या-मराठीतील प्रसिध्द लेखिका नीरजा यांची प्रमुख उपस्थिती होती.


                पुढे बोलताना डॉ.धोंगडे म्हणाले, आदिबंधात्मक समीक्षा ही मानसशास्त्रातून आलेली आहे.डॉ.पाटील यांनी उपयोजन केले आणि आकलनाचा पैस विस्तीर्ण केला. यामुळे त्यांनी लेखकाभ्यासाला एक नवी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी कर्तव्यबुध्दीने विपुल समीक्षा लिहून समीक्षेचा विस्तार मोठया प्रमाणात केला. त्यांंना साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. समीक्षेचा प्रदेश हा साकल्याचा आहे तो त्यांनी कधीही आखडू दिला नाही.ते कधीही कोणत्याही एका पंथाचे झालेले नाही.  त्यांच्या आधारवाटातील लेखन विद्यार्थ्यांच्या आणि समीक्षकांच्या उपयोगी पडत आहे.सामप्रदायकतेचे व्रतधारण केल्याशिवाय ग्रंथांचे वाचन आणि आकलन करणे शक्य नाही. ज्ञानेश्वरीच्या आकराव्या अध्ययनामध्ये रसांची पंगत बसलेली आहे. ज्ञानेश्वरीचे उत्तम विवेचन त्यांनी केले आहे.श्रीमद्भगवद्गीतेचे आकलन त्यांना झालेले होते.तृष्णेचा खरा सिध्दांत त्यांना गीतेमध्ये सापडला.तृष्णाक्षयसुख त्यांनी अनुभवला आहे.त्यांनी समीक्षेची अनेक बलस्थाने मांडण्याचा प्रयत्न केला.मराठीमध्ये स्वतंत्र साहित्यशास्त्र असावे याचा आग्रह करणे योग्य नाही, तसे इंग्रजीमध्येही ते नाही.  साहित्य ही एक वैश्विक गोष्ट आहे.जगभरातील गोष्टी एकत्र करून जे तयार होते ते साहित्यशास्त्र.  वैश्विक साहित्यशास्त्राचे आदान-प्रदान होत रहात असते.एक छोटा समुह परिभाषिकतेचा वापर करून दुसऱ्या समुहाशी बोलत असतो.

                अनुष्टुभ प्रतिष्ठान (येवला) डॉ.प्रविण बांदेकर मनोगतामध्ये म्हणाले, पाच दशकांपूर्वी अनुष्टुभच्या माध्यमातून वाड्मयीन चळवळ सुरू झाली.मागील काही वर्षांमध्ये खेडयापाडयातील लिहित्या मंडळींना एक व्यासपीठ मिळवून दिले आहे.आपली परंपरा पुन्हा नव्याने पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे.

                याप्रसंगी ज्येष्ठ लेखक डॉ.राजन गवस म्हणाले, डॉ.धोंगडे प्रशासनात असताना तुकारामांबाबत चिंतन करीत होते. डॉ.पाटील माणूस म्हणून उत्तुंग व्यक्तिमत्वाचे होते. त्यांची समीक्षा सहज, सोपी, सर्जनात्मक आहे.

                अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, ज्ञानेश्वरी, तुकाराम या साहित्यांकडे डॉ.म.सु.पाटील पहिल्यांदा गेलेले दिसतात.ते विवेकीय आणि विज्ञाननिष्ट दृष्टीकोन असलेले मातृहृदयी उत्तम समीक्षक होते.त्यांचे जीवन कार्य या दोन्ही गोष्टींचा विद्यार्थ्यांनी साक्षेपाने अध्ययन करणे आवश्यक आहे.

                तत्पूर्वी, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी अधिविभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांचा सत्कार डॉ.राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आला.  तसेच, नव-अनुष्टुभ प्रतिष्ठानच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

                कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ.रणधीर शिंदे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.नंदकुमार मोरे यांनी केला तर प्रांजली क्षीरसागर यांनी आभार मानेल.याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा कनेकर, एकनाथ पगार, अशितोष पाटील, वीरधवल परब उपस्थित होते.

------