Friday, 22 May 2026

कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्याकडून महामानवांना अभिवादन

 

दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

राजर्षी शाहू समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.




कोल्हापूर, दि. २२ मे: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज रुजू झालेल्या दिवशी कोल्हापूर शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ केला.

डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार आज स्वीकारला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. ऐतिहासिक बिंदू चौक येथील हुतात्मा स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे पुतळे येथे पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींचा पुतळा, दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा यांनाही अभिवादन केले. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळाला भेट देऊन तेथे महाराजांच्या समाधीस्थळासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. अखेरीस कावळा नाका येथील करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या पुतळ्यालाही त्यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.


मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध; शिवाजी विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वागत समारंभात बोलताना नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वागत समारंभात बोलताना नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. अजितसिंह जाधव आणि डॉ. सुहासिनी पाटील.

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचा स्वागतपर सत्कार करताना वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. अजितसिंह जाधव आणि डॉ. सुहासिनी पाटील.



(कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या स्वागत समारंभाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २२ मे: ज्या शिवाजी विद्यापीठाने मला घडवले, त्या मातृसंस्थेचे ऋण फेडणे ही आता माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे. विद्यापीठाला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अधिक सक्षम, तंत्रज्ञानाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करू, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. कामत यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा वारणा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. कामत यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या प्रशिक्षणामुळेच विविध ठिकाणी काम करताना आव्हानात्मक परिस्थितीतही यशस्वीपणे कार्य करता आले. होमी भाभा राज्य विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह इतर विद्यापीठांमध्ये काम करताना तंत्रज्ञानाधारित प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रिसर्जंट एआय, डिजिटल प्रणाली आणि परिणामकारक व्यवस्थापन यांच्या साहाय्याने अनेक प्रश्न सोडवता आले.

विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, प्लेसमेंट आणि ब्रँडिंग या बाबींवर विशेष भर देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे अभ्यासक्रम, रोजगारक्षम शिक्षण आणि आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. बी.एस्सी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, आयओटी, स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांसारखे अभ्यासक्रम काळाची गरज आहेत. विद्यापीठाने बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत पावले उचलली पाहिजेत.

नॅक मूल्यांकन, एनआयआरएफ क्रमवारी आणि जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या निकषांचा उल्लेख करताना त्यांनी आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली. विद्यापीठाने ‘एस्टॅब्लिश्ड’ स्तरावरून ‘नॅशनल’ आणि ‘ग्लोबल’ स्तराकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. प्लेसमेंट, संशोधन, उद्योग सहकार्य आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवाजी विद्यापीठाला महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक समावेशकता, ज्ञान, संशोधन आणि समाजाभिमुख शिक्षण यांचा समन्वय साधण्याची भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी नॅक मूल्यांकनाच्या आगामी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्रितपणे परिश्रम घेण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, हायड्रोजन इंधन संशोधन आणि आधुनिक प्रयोगशाळा उभारणी यांवरही आगामी काळात भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वागतासाठी येणे टाळण्याचे आवाहन

सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाचा उल्लेख करत डॉ. कामत यांनी स्वागतासाठी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले. “फोन, ई-मेल किंवा शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केलेले प्रेमही तितकेच महत्त्वाचे आहे. इंधन, वेळ आणि राष्ट्रीय संसाधनांची बचत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे अभिनंदन करताना म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक म्हणून विविध स्तरांवर कार्य केलेली व्यक्ती आज या विद्यापीठाचे नेतृत्व स्वीकारत आहे, हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आपल्यापेक्षा अधिक सक्षम आणि व्यापक अनुभव असलेले नेतृत्व मिळणे आवश्यक असते. तसे नेतृत्व शिवाजी विद्यापीठाला डॉ. कामत यांच्या रुपाने मिळाल्याचा आनंद वाटतो. डॉ. कामत यांनी इतर विद्यापीठांमध्ये काम केल्यामुळे व्यापक शैक्षणिक जगाचा त्यांचा परिचय आहे आणि त्या अनुभवाचा फायदा ते मातृसंस्थेला निश्चितपणे मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. शिर्के यांनी डॉ. कामत यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करताना नॅक मूल्यांकन, सायबर सिक्युरिटी, संगणक केंद्र आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून दिले. “जिथे प्रश्न तिथे कामत सर” अशी त्यांची ओळख असल्याचे सांगत त्यांनी, अत्यंत बारकाईने, संयमाने आणि रात्रंदिवस परिश्रम घेऊन काम पूर्ण करण्याची त्यांची वृत्ती विद्यापीठासाठी मोठी ताकद ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात नॅक, एनआयआरएफ, क्यूएस आणि टीएचईसारख्या राष्ट्रीय व जागतिक मानांकनांमध्ये विद्यापीठाची प्रगती वाढविण्यासाठी अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. जी.बी. कोळेकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. सागर डेळेकर, प्रा. शंकरराव कुलकर्णी, डॉ. डी.आर. मोरे, डॉ. निखिल गायकवाड, तेजस्विनी गोरनाळे, धैर्यशील यादव, माजी कुलगुरू प्रा. एस.एच. पवार आणि नाथाजी शिंदे यांनी स्वागतपर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन नंदिनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी केले, तर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी आभार मानले.

यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विद्यापीठातील अनेक माजी व विद्यमान पदाधिकारी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी

शिवाजी विद्यापीठाचे ‘सूकाणू’ घेतले हाती

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला.

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे आदी.




शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी विद्यापीठ प्रांगणात दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश केला.


शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज इलेक्ट्रीक वाहन स्वतः चालवित विद्यापीठाच्या प्रांगणातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

 
(नूतन कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेला बाईट)


कोल्हापूर, दि. २२ मे: शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी मावळत्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कामत कुटुंबिय उपस्थित होते.

डॉ. कामत यांनी आज सकाळी कुलगुरू निवासस्थानापासून विद्यापीठाच्या प्रांगणामधील सर्व प्रवास इलेक्ट्रीक वाहनातून केला. विशेष म्हणजे या वाहनाचे सुकाणू त्यांनी स्वतःच हाती घेतले होते. त्यांच्यासोबत पत्नी, मुलगी आणि आत्या यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. डॉ. कामत यांनी  विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले.  डॉ. आप्पासाहेब पवार, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांनाही त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्रवेश केला. कुलगुरू दालनामध्ये प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडून त्यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.

यानंतर लगेचच व्यवस्थापन परिषद सभागृहात प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांचा औपचारिक निरोप समारंभ झाला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्यासह विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि आंतरविद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय साळी यांनाही निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. शिंदे यांनी केले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातृसंस्थेच्या ऋणातून उतराई होण्याची संधी: कुलगुरू डॉ. कामत

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळणे ही माझ्यासाठी मातृसंस्थेचे ऋण काही अंशी का होईना फेडून त्या ऋणातून उतराई होण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी सदोदित प्रयत्नशील राहीन. ही संधी दिल्याबद्दल राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील सर्व सहकारी मला या कामी तत्परतेने मदत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. कामत यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठातील कामाची शिस्त कौतुकास्पद: डॉ. गोसावी

शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय शिस्त ही वाखाणण्याइतकी चोख आहे. वरती अधिकारी कोणीही असला तरी इथला प्रत्येक सहकारी त्याला नेमून दिलेले काम मन लावून करीत असतो. आवश्यक तेथे सूचना देण्यापलिकडे त्यांना वेगळे काही सांगावे लागत नाही. शिवाजी विद्यापीठातील ही कार्यप्रणाली कौतुकास्पद स्वरुपाची आहे. त्यामुळे येथील प्रभारी कुलगुरू पदाचा कालखंड खूप चांगला पार पडला, असे मावळते प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी निरोप समारंभात सांगितले.

संधी दिल्याबद्दल कृतज्ञ: डॉ. ज्योती जाधव

केवळ शिक्षण आणि संशोधन यापलिकडे न पाहणाऱ्या माझ्यासारख्या एका प्राध्यापकाला प्रशासकीय काम करण्याची संधी देऊन शिवाजी विद्यापीठाची पहिली महिला प्रभारी प्र-कुलगुरू होण्याचा मान दिल्याबद्दल मावळत्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी डॉ. गोसावी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या काळात खूप काही प्रशासकीय बाबी शिकून घेता आल्या, असेही त्यांनी सांगितले.



Thursday, 21 May 2026

डॉ. राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

डॉ. राजनीश कामत

 

कोल्हापूर, दि. २१ मे: मुंबई येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज डॉ. कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. आदेशाची प्रत आज सायंकाळी विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाली.

डॉ. कामत यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करतील, यापैकी जी तारीख अगोदर असेल त्या तारखेपर्यंत असेल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ दिनांक ७ ऑक्टोंबर २०२५ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ. राजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरु ठरले आहेत. डॉ. दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडेच कुलगुरू पदाचा पदभार आलेला आहे. डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. सध्या ते मुंबई येथील डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.

डॉ कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एससी. तसेच गोवा विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.  डॉ कामत यांच्या २११ संशोधन पत्रिका आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाल्या असून त्यांची १६ पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत.  त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या  कुलगुरुंच्या  निवडीसाठी राज्यपालांनी कोईम्बतूर येथील भारतीय विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख (निवृत्त) डॉ. पी. कंदास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाचे (मध्य प्रदेश) माजी कुलगुरू प्रा. एन.सी. गौतम हे या समितीवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) प्रतिनिधी होते. इंदोर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुहास जोशी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. राजनीश कामत  यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

 

डॉ. राजनीश कमलाकर कामत यांचा अल्पपरिचय

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. राजनीश कमलाकर कामत यांचे मूळ गाव कागल (जि. कोल्हापूर) असून त्यांचा जन्म मिरज (जि. सांगली) येथे झाला. त्यांचे कुटुंब करवीर संस्थान आणि कोल्हापूरच्या सामाजिक-शैक्षणिक परंपरेशी निगडित आहे. त्यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराजांचे खासगी वैद्य होते. त्यांचे काका डॉ. बाळकृष्ण कामत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कागल येथे त्यांच्या घरी मुक्काम केला होता. त्यांचे वडील कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागात उपअधीक्षक पदावर कार्यरत होते.

डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दोन्ही पदव्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. पुढे त्यांनी गोवा विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथे उच्च तांत्रिक प्रशिक्षण घेतले.

गोवा, कोल्हापूर आणि सोलापूर येथील विद्यापीठांमध्ये सुमारे अठ्ठावीस वर्षांचा अध्यापनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित कार्यकारी बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, स्नायुरूपी संगणन, यंत्रशिक्षण, विद्युत परिपथ रचना आणि सायबर-भौतिक प्रणाली या विषयांमध्ये त्यांनी संशोधन कार्य केले आहे. त्यांनी तेवीसहून अधिक अभ्यासक्रम विकसित केले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे त्यांनी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या सहकार्याने क्वांटम संगणन उत्कृष्टता केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून त्यांची १३ आंतरराष्ट्रीय पुस्तके प्रकाशित आहेत.

संशोधनासाठी त्यांनी देश-विदेशांतून पंचवीस कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त केला. पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान, मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि युरोपियन महासंघ यांच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या एसईआरसी तरुण शास्त्रज्ञ जलदगती योजनेअंतर्गत त्यांना संशोधन अनुदान मिळाले.

त्यांच्या नावावर ११ मंजूर स्वामित्व हक्क, १३ प्रकाशित आणि ४३ दाखल स्वामित्व हक्क (पेटंट) आहेत. यामध्ये जैव-पदार्थ आधारित मेंदू-प्रेरित संगणन साधन, स्मार्ट प्रकाश-संधारित्र साधन, कीटकनाशक शोध प्रणाली, आरोग्यसेवेसाठी महाकाय माहिती साधन आणि हस्तमुक्त स्मार्ट आवाज सहाय्यक साधन यांचा समावेश आहे. त्यांपैकी एका संशोधनाला युनायटेड किंग्डममध्ये रचना स्वामित्व हक्क प्राप्त झाला आहे.

डॉ. कामत यांनी विविध विद्यापीठांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. २०२२ पासून ते डॉ. होमी भाबा राज्य समूह विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून कार्यरत होते. त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे प्रभारी कुलगुरू म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना तेरा वर्षांहून अधिक सांविधानिक प्रशासकीय अनुभव आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेकडून (नॅक) मिळालेल्या ‘अ++’ मानांकन प्रक्रियेमध्ये त्यांनी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक म्हणून मोलाचे योगदान दिले. निष्पत्ती आधारित शिक्षण, अध्ययन व्यवस्थापन प्रणाली, ३६० अंश अभिप्राय आणि गुणवत्ता प्रयोगशाळा या उपक्रमांमध्ये त्यांनी काम केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी विविध संस्थांसोबत कार्य केले आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन तंत्रज्ञान संस्था येथे ते मानद प्राध्यापक आहेत. युरोपियन महासंघाच्या ‘इरॅस्मस+’ योजनेअंतर्गत त्यांनी बार्सिलोना, व्हॅलेन्सिया, सॅपिएन्झा, रोम आणि माद्रिद येथील संस्थांसोबत शैक्षणिक सहकार्य केले आहे. तैवान, जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि स्पेन येथे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय नौदलाच्या पाणबुडी डिजिटलीकरण प्रकल्पातही त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे.

समाजाभिमुख उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे. गोवा विद्यापीठात त्यांनी पंचायत राज कार्यक्रमासाठी उपग्रहाधारित दूरशिक्षण केंद्र उभारले. ग्रामीण भागासाठी तंतूप्रकाश इंटरनेट सुविधा, आदिवासी भागांसाठी भूस्खलन पूर्वसूचना यंत्रणा आणि सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवले. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या साहाय्याने दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवजांचे डिजिटलीकरणाचे कामही त्यांनी केले.

महाराष्ट्र शासनाने त्यांची विविध समित्यांवर नियुक्ती केली आहे. जिओ विद्यापीठ, पिल्लई विद्यापीठ, संजीवनी विद्यापीठ आणि एलार्ड विद्यापीठ यांच्या स्थापनेसाठीच्या सत्यापन समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. सार्वजनिक ग्रंथालयांचे डिजिटलीकरण, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम सुधारणा, आदिवासी विद्यापीठ आणि ललित कला विद्यापीठ अभ्यासगटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

डॉ. कामत यांनी होमी भाभा राज्य विद्यापीठात पंचवीस नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित केले. क्वांटम विज्ञान, क्रीडा प्रशिक्षण आणि व्यावसायिक कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखे अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले. राष्ट्रीय स्वयम् मंचासाठी त्यांनी ऑनलाइन शिक्षक पुनश्चर्या अभ्यासक्रम विकसित केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले संशोधक विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत.

त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अमेरिकन बौद्धिक संपदा कायदा संघटनेचा नेतृत्व पुरस्कार (२०२४), विज्ञान प्रसार पुरस्कार (२०२५), भारत रोजगारक्षम करणारा पुरस्कार (२०२५), जागतिक सायबर सुरक्षा पुरस्कार, सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार आणि टेक्सास उपकरण कंपनीचा प्राध्यापक मार्गदर्शन पुरस्कार यांचा त्यात समावेश आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियंते संस्थेचे साथीपदही त्यांना प्राप्त झाले आहे. 

शिवाजी विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन

शिवाजी विद्यापीठात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ ग्रहण करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. कृष्णा पाटील, डॉ. कबीर खराडे आदी.


कोल्हापूर, दि. २१ मे: शिवाजी विद्यापीठात आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन पाळण्यात आला.

दहशतवाद व हिंसाचारविरोधी पाळण्यामागे जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवणे, देशासाठी व दहशतवादाविरोधात लढणाऱ्या सैनिकांच्या त्याग व बलिदानाचा सन्मान करणे तसेच भावी पिढीच्या मनात देशाच्या प्रगतीसाठी व संरक्षणाप्रति जागरूकता निर्माण करणे असा यामागील हेतू आहे.

आज शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये दहशतवाद व हिंसाचारविरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, सुरेश बंडगर, वसंत एकले, सुजीत मुंढे, संदीप हेगडे, सुजीत सकटे, सैफ सज्जन, अनिकेत पाटील, जुबेर पठाण यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. 

Thursday, 14 May 2026

नॅनो सायन्सच्या १६० हून अधिक विद्यार्थ्यांची

आंतरराष्ट्रीय कंपन्यांत प्लेसमेंट: डॉ. किरणकुमार शर्मा


कोल्हापूर, दि. १४ मे: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या गेल्या दहा बॅचमधील १६० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कंपन्या, विद्यापीठांमध्ये प्लेसमेंट्स झालेली आहेत, अशी माहिती संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी दिली.

विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या दहाव्या बॅचचा निरोप समारंभ नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्लेसमेंट यशामुळे अधिविभागाने सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली असल्याचे सांगून डॉ. शर्मा म्हणाले, अधिविभागातील विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठांसह नामांकित उद्योगसंस्थांमध्ये ६५ लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळविण्यापर्यंत मजल मारली आहे. 'बीएससी-एमएससी नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी' या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आजपर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्स झालेल्या आहेत. १६० पेक्षा अधिक विद्यार्थी अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, इस्राइल, फिनलँड, फ्रान्स, झेक रिपब्लिक, पोलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, जपान, चीन, सौदी अरेबिया, तैवान तसेच स्वीडन इत्यादी देशांमध्ये कार्यरत आहेत. सहा विद्यार्थी केंद्र सरकारमध्ये तर आठ विद्यार्थी राज्य शासनात विविध पदांवर नियुक्त झाले आहेत. विविध प्रकारच्या नॅनोफॉर्म्युलेशन्स, कोटिंग्ज, फॅब्रिक्स, पेंटिंग, फार्मास्युटीकल्स्, नॅनोमटेरियल्स निर्मिती, पुरवठा तमेच सर्विसेस इत्यादीसाठीच्या विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तसेच विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुलात करिअर प्रोग्रेशनसाठी येथील शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी नियुक्त झाले आहेत.

प्रतिवर्षी ६५ लाख रुपये पॅकेज मिळविणाऱ्यांमध्ये डॉ. रोहन पाष्टे (मायक्रॉन टेक्नॉलॉजी, तैवान), डॉ. हर्षदा पाटील (मायक्रॉन टेक्नॉलॉजी, सिंगापूर), डॉ. अतुल खोत (सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, दक्षिण कोरिया), डॉ. किरण निर्मल (सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, दक्षिण कोरिया), डॉ. शुभम पाटील (नेक्स्टईन सेमीकंडक्टर, दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे. विभागातील आठ विद्यार्थ्यांनी भारतात स्वतःच्या स्टार्टअप कंपन्या स्थापित केल्या असून त्या उत्तमरीत्या कार्यरत आहेत. या यशस्वी प्लेसमेंटमुळे अधिविभागाची शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनक्षमता अधोरेखित झाली असून, विद्यार्थ्यांसाठी जागतिक पातळीवरील संधींचे दरवाजे खुले झाले आहेत. या प्लेसमेंट्समध्ये वर्षागणिक वाढ होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.

बारावी सायन्सनंतर बी.एस्सी.-एम.एस्सी. (नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी) या पाच वर्षांच्या एकत्रित अभ्यासक्रमासाठी तसेच बी.एस्सी. सायन्सनंतर एम.एस्सी. (नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु झालेला आहे. याच अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कोल्हापुरासह महाराष्ट्रातल्या तसेच इतर राज्यातल्याही खेडोपाड्यांतील मुलांना आपले उज्ज्वल भवितव्य घडविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा इच्छुक विद्यार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले.

यावेळी सन २०२१-२२ मध्ये बी.एस्सी.-एम.एस्सी. (नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी) या पाच वर्षांच्या एकत्रित अभ्यासक्रमाच्या तसेच सन २०२४-२५ मध्ये एम.एस्सी. अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभात शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. प्रमोद जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. के. व्ही. खोत यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. के. के. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. प्रमोद कसबे, डॉ. एस. एस. निर्मळे, डॉ. एस.ए. सावंत, डॉ. वाय.वाय. पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.