Thursday, 5 February 2026

पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यश

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनास भारतीय पेटंट


शिवाजी विद्यापीठाचे पेटंटप्राप्त पोर्टेबल साऊंड अॅबसॉर्प्शन टेस्टर उपकरण

डॉ. कल्याणराव गरडकर

डॉ. संदीप साबळे

डॉ. रोहंत ढब्बे

डॉ. चंद्रला जतकर



कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: एखाद्या ठिकाणी बसविलेली ध्वनीयंत्रणा योग्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करणारे सुवाह्य (पोर्टेबल) ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळविले आहे. या संशोधनाला भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. कल्याणराव गरडकर, जयसिंगपूर महाविद्यालयातील डॉ. संदीप साबळे डॉ. रोहंत ढब्बे आणि इचलकरंजी येथील डी.के.टी.ई.एस. टेक्स्टाईल अँन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या डॉ. चंद्रला जतकर या संशोधकांनी पोर्टेबल साऊंड अॅबसॉर्प्शन टेस्टरहे उपकरण तयार केले आहे. व्यावसायिक ध्वनीयंत्रणेच्या ध्वनीशोषण क्षमतेच्या चाचणीसाठी सदर उपकरण अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहे. आजपर्यंत एखादा रेकॉर्डिंग स्टुडिओ, रेकॉर्डिंग कक्ष, थिएटर, सभागृह इत्यादी ठिकाणी ध्वनीयंत्रणेसह ध्वनीशोषक यंत्रणा बसविल्यानंतर तिची क्षमता, ध्वनीशोषणातील अपेक्षित परिणामकारकता यासंदर्भात अनुभवातूनच चाचपणी केली जात आहे. तथापि, सदर उपकरणामुळे आता ध्वनीशोषण यंत्रणा बसविल्यावर लगोलग तिच्या क्षमतेची शास्त्रीय चाचणी करता येणे शक्य होणार आहे. अशा प्रकारचे हे उपकरण प्रथमच निर्माण करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे.

ध्वनीशोषण करणाऱ्या पोर्टेबल शीट्स आणि पॅनल यांचा उपयोग मुख्यत्वे थिएटर, स्टुडिओ आणि व्होकल रेकॉर्डिंग कक्ष यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. ध्वनीशोषक वापरल्यामुळे मायक्रोफोनभोवती येणारा प्रतिध्वनी (एको) शोषून रेकॉर्डिंगसाठी 'शांत' वातावरण तयार केले जाते. यामुळे अधिक स्वच्छ आणि अधिक व्यावसायिक व्होकल किंवा वाद्यांचा आवाज मिळविण्यास मदत होते. सदर पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरणाचा वापर आवाज नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध अॅबसॉर्बर उदा. छिद्र असणारे फोम, फायबर, फॅब्रिक, मेंम्ब्रेन, पॅनल, रेझोनंट अॅबसॉर्बर तसेच प्रतिध्वनी कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीशोषकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी होतो.

ध्वनीशोषक उपकरणाची कार्यप्रणाली

या पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरणाच्या कार्यपद्धतीची माहिती देताना डॉ. गरडकर म्हणाले, मानवी कानासाठीचा मानक श्रवणीय ध्वनी २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ स्पेक्ट्रम इतका आहे. या नव्याने शोधलेल्या ध्वनीशोषक चाचणी उपकरणामध्ये त्या दरम्यानच्या क्षमतेचे ध्वनीतरंग तयार करून चाचणी करावयाच्या ध्वनीशोषक वस्तूंवर प्रक्षेपित करून त्यावरुन परावर्तित केली जातात.  त्या वस्तूंकडून शोषले न गेलेले ध्वनीतरं माइक्रोफोन (डिटेक्टर) द्वारे करंट / व्होल्ट स्वरुपात उपकरणाच्या स्क्रीनवर प्रदर्शित केली जातात. याद्वारे त्याठिकाणी ध्वनीशोषक यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित आहे किंवा कसे, याविषयीचा अंदाज बांधून लगेच त्यावर उपयोजनही करणे शक्य होते. ध्वनीशोषण फॅब्रिकेशन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठीही हे उपकरण उपयुक्त आहे. हे उपकरण सुवाह्य म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतेच, त्याशिवाय ते कमी खर्चिकही आहे. ध्वनीयंत्रणा तपासणीच्या क्षेत्रात ते अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या पेटंटच्या प्राप्तीबद्दल शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

Wednesday, 4 February 2026

नवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवार

शिवाजी विद्यापीठात प्रा. नरहर विष्णू कारेकर व्याख्यानमालेत बोलताना डॉ. प्रकाश पवार. मंचावर डॉ. प्रल्हाद माने आणि डॉ. महादेव देशमुख.

शिवाजी विद्यापीठात प्रा. नरहर विष्णू कारेकर व्याख्यानमालेत बोलताना डॉ. प्रकाश पवार.

(व्याख्यानाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ४ फेब्रुवारी: यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशाने विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत असून, संगणक क्षेत्राच्या पुढे जाऊन आता नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योग विकसित होण्याच्या दिशेने भारताच्या विज्ञान क्षेत्राची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे आज प्रा. नरहर विष्णू कारेकर व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. पवार यांचे भारताचे विज्ञान धोरण या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते.

भारताच्या विज्ञान धोरणाचा व्यापक आढावा घेताना डॉ. प्रकाश पवार म्हणाले, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाचा नवा टप्पा अधोरेखित झाला आहे. विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राला पुन्हा प्राधान्य देत भारत आता संगणक व सेवा क्षेत्राच्या पुढे जाऊन नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योगांच्या उभारणीकडे वळत असल्याचे दिसते आहे. जागतिकीकरणानंतर जुन्या ज्ञानव्यवस्थेच्या जागी नव्या तंत्रज्ञानाधारित ज्ञाननिर्मिती सुरू झाली असून औद्योगिक क्रांतीपासून संगणकीकरण, डिजिटल तंत्रज्ञान यांच्या मार्गे आता कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा हा प्रवास भारताच्या विज्ञान क्षेत्राला नवे परिमाण प्राप्त करून देत आहे.

डॉ. पवार यांनी भारताच्या विज्ञान धोरणाचा ऐतिहासिक प्रवास स्वातंत्र्यपूर्वकालीन आधुनिकतावादाचा काळ, स्वातंत्र्योत्तर काळातील वैज्ञानिक संस्थांची उभारणी आणि १९९० नंतरच्या जागतिकीकरणोत्तर तंत्रज्ञानप्रधान युगाचा कालखंड असा तीन टप्प्यांत मांडला. ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी स्वीकारलेला आधुनिकतावादी दृष्टिकोन हा वैज्ञानिक विचारांचा पाया ठरला. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे आयआयटी, भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र, एन.पी.एल., एन.सी.एल. यांसारख्या शैक्षणिक व वैज्ञानिक संस्थांची उभारणी झाली आणि भारतात विज्ञानवादाची मजबूत पायाभरणी झाली. १९५१ मध्ये खरगपूर येथे पहिली आयआयटी स्थापन झाल्यानंतर मुंबई, कानपूर, दिल्ली आदी ठिकाणी या संस्था उभारण्यात आल्या. त्या काळात ३,७०३ संशोधक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि ५९,९६५ विद्यार्थी या संस्थांत शिक्षण घेत होते. एका नव्या आधुनिक पर्वाची नांदी ठरणारा असा हा कालखंड होता. भारताच्या भावी वैज्ञानिक विकासाची पायाभरणी या पर्वाने केल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. देशमुख म्हणाले, विज्ञान आणि मानव्यविज्ञानामधील परस्परसंबंध हा फार महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या वैज्ञानिक वाटचालीविषयी बोलत असताना डॉ. पवार यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचा अत्यंत साकल्याने वेध घेतला आहे. सर्वसामान्य माणसाचे राहणीमान उंचावणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट असते. त्या दृष्टीने जास्त लोकसंख्या असलेल्या देशाचा प्राधान्यक्रम रोजगारनिर्मिती असतो. अशा स्वावलंबी मनुष्यबळाच्या विकासामधूनच देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुकर होणार आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानव्यविज्ञान या तिहेरी संगमातूनच विकसित भारताची उभारणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि परिचय करून दिला. मयुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश ब्राह्मणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुखदेव उंदरे, भारत शास्त्री, डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 2 February 2026

विद्यापीठस्तरीय रँकिंगमध्ये रसायनशास्त्र, अर्थशास्त्र अधिविभाग सर्वोत्कृष्ट

कामगिरीत सातत्य राखावे: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

शिवाजी विद्यापीठस्तरीय अधिविभागीय क्रमवारी मानांकन जाहीर करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी.

शिवाजी विद्यापीठस्तरीय अधिविभागीय क्रमवारी मानांकन जाहीर करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी. मंचावर (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठस्तरीय अधिविभागीय क्रमवारी मानांकनामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्वोत्कृष्ट अधिविभागासाठीचे पारितोषिक कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते स्वीकारताना रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण. सोबत अधिविभागातील शिक्षक.


शिवाजी विद्यापीठस्तरीय अधिविभागीय क्रमवारी मानांकनामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाव्यतिरिक्त अन्य विद्याशाखांतील सर्वोत्कृष्ट अधिविभागासाठीचे पारितोषिक कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते स्वीकारताना अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले. सोबत अधिविभागातील शिक्षक.

शिवाजी विद्यापीठस्तरीय अधिविभागीय क्रमवारी मानांकनामध्ये अध्यासने व केंद्र गटातील सर्वोत्कृष्ट केंद्रासाठीचे पारितोषिक कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते स्वीकारताना युसिकचे समन्वयक डॉ. ज्योतीप्रकाश यादव. सोबत केंद्रातील सहकारी

(युडीआरएफ पारितोषिक वितरण समारंभ व्हिडिओ)




कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: अधिविभागांच्या शैक्षणिक आणि संशोधकीय कामगिरीवरच समग्र विद्यापीठाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात असते. शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागांनी विद्यापीठ अधिविभागीय रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये अतिशय चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले असून यापुढील काळात ही कामगिरी सातत्याने उंचावत राहण्यासाठी विभागांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शनिवारी (दि. ३१) येथे केले.

महाराष्ट्र शासनाने, राज्यातील अकृषि सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठांतील विविध अधिविभागांकडून संशोधनाला चालना देणे, उपलब्ध संसाधनांचा पुरेपुर कार्यक्षम वापर करणे, कार्यपद्धतीत पारदर्शकता आणणे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे यासाठी विद्यापीठांतर्गत विभागांना मानांकन देण्याचा उपक्रम दरवर्षी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत सर्व अधिविभाग, अध्यासने आणि केंद्र यांची १० व ११ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात आली होती. शनिवारी त्या तपासणीचा निकाल जाहीर करण्यात आला.

विद्यापीठामध्ये राबविण्यात आलेल्या या अधिविभागनिहाय क्रमवारी मानांकनामध्ये (यू.डी.आर.एफ.) रसायनशास्त्र अधिविभाग आणि अर्थशास्त्र अधिविभाग यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले.

सदर उपक्रमांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि मानवविज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा यांच्याअंतर्गत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या अधिविभागांना अनुक्रमे रुपये दहा लाख व पाच लाख आणि अध्यासने आणि केंद्रांच्या गटामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्यांना अनुक्रमे रुपये दोन लाख व एक लाख तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह अशा पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत रसायानशास्त्र अधिविभागाने प्रथम, तर नॅनो विज्ञान आणि बायोटेक्नोलॉजी अधिविभागाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. इतर विद्याशाखांच्या गटात अर्थशास्त्र अधिविभागाने प्रथम आणि शिक्षणशास्त्र अधिविभागाने द्वितीय क्रमांक मिळविला. अध्यासने व केंद्र या गटामध्ये विद्यापीठ वैज्ञानिक उपकरण केंद्राने (युसिक) प्रथम आणि शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 

या सर्व मानांकनप्राप्त अधिविभाग व केंद्रांना कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते आणि  प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके वितरित करण्यात आली.

 

समाजोपयोगी संशोधनावर रसायनशास्त्र अधिविभागाचा भर

रसायनशास्त्र अधिविभागाने संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी व औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यावर विभागाने सातत्याने भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांत रसायनशास्त्र विभागाला संशोधनासाठी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला. या निधीच्या माध्यमातून स्मार्ट व प्रकाशोत्सर्जक पदार्थ, कॅन्सरवरील संशोधन, ऊर्जा साठवणुकीसाठी सुपर कॅपेसिटर बॅटरी, विविध प्रकारचे सेन्सर तसेच औद्योगिक वापरासाठी उपयुक्त रसायनांच्या निर्मितीवर महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात आले. विभागाने एकूण ४० समाजोपयोगी पेटंट्स प्राप्त केली असून त्यामध्ये भारतीय, जर्मन तसेच युनायटेड किंगडम (यूके) येथील पेटंट्सचा समावेश आहे. या पेटंट्समुळे विभागाच्या संशोधन कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. युडीआरएफमधील मानांकनामुळे अधिविभागाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया अधिविभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

Friday, 30 January 2026

शिवाजी विद्यापीठात हुतात्मा दिन





कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात हुतात्मा दिन पाळण्यात येऊन दोन मिनिटे मौन राखून अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीच्या प्रांगणात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह अधिकारी आणि प्रशासकीय सेवकांनी सकाळी ठीक ११ वाजता दोन मिनिटे स्तब्धता पाळून महात्मा गांधी यांच्यासह हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठाच्या सर्व अधिविभागांत आणि प्रशासकीय विभागांमध्येही सर्व अधिविभाग प्रमुखांसह शिक्षक, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपापल्या जागेवर उभे राहून हुतात्म्यांना अभिवादन केले.

 

Thursday, 29 January 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवाजी विद्यापीठात श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे शिवाजी विद्यापीठात आयोजित शोकसभेत शोकप्रस्तावाचे वाचन करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. मंचावर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत डॉ. अजितसिंह जाधव आणि डॉ. सुहासिनी पाटील.


कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे एक कुशल, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जाण असणारे, तडफदार आणि उमदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठात आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज राजर्षी शाहू सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले. अजित पवार यांना शिवाजी विद्यापीठाप्रती आस्था होती. त्यामुळेच त्यांनी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव सुवर्णमहोत्सव निधीची तरतूद केली. त्यामधून विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी, बाळासाहेब देसाई अध्यासन, राजर्षी शाहू म्युझियम कॉम्प्लेक्स इत्यादी उपक्रमांची उभारणी करता येऊ शकली, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. गोविंद कोळेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, सागर लांडे, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. शोकसभेला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 27 January 2026

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांना

शिवाजी विद्यापीठाचा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार

प्रा. चंद्रकांत पाटील
 

कोल्हापूर, दि. २७ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५१ हजार रुपये व सन्मान चिन्ह असे आहे. ज्येष्ठ लेखक प्रा.राजन गवस यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. (डॉ). सुरेश गोसावी असतील

या संदर्भात अधिक माहिती देताना मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी सांगितले की, प्रा. चंद्रकांत पाटील यांची समीक्षा ही मराठीतील महत्त्वाची समीक्षा आहे. सर्जनशील लेखनाबरोबरच त्यांनी अनुवाद व समीक्षा या प्रकारात महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या लेखनाचे स्वरूप हे द्वैभाषिक आहे. मराठी कविता भारतीय स्तरावर नेण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मराठी हिंदीतील सांस्कृतिक अनुबंध अधिक विकसित करण्यामध्ये प्रा. पाटील यांचे लेखन महत्त्वाचे ठरले आहे. "आणि म्हणूनच", "आणि तोपर्यंत" व "कवितेसमक्ष" हे त्यांचे महत्त्वाचे समीक्षा ग्रंथ होतविश्लेषक स्वरूपाची समीक्षा असे पाटील यांच्या समीक्षेचे स्वरूप आहे. १९६० नंतरच्या आधुनिक मराठी साहित्याचा पुरस्कार करण्यामध्ये प्रा.पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते साठोत्तरी काळातील मराठी-हिंदी साहित्याचे विशेषतः कवितेचे महत्त्वाचे टीकाकार आणि समीक्षक असून भीष्म साहनी यांच्या "तमस" या कादंबरीचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद विशेष गाजला. १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमातून केलेले लेखन त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आजवरच्या त्यांच्या एकूणच समीक्षा कारकीर्दीचा सन्मान म्हणून या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्काराच्या निवड समितीचे सदस्य म्हणून प्रा. एकनाथ पगार (देवळा), प्राचार्य गोविंद काजरेकर (बांदा) व प्रा. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) यांनी काम पाहिले.