Thursday, 23 April 2026

डॉ.श्रीकृष्ण महाजन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे गाढे अभ्यासक होते-प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव

 



कोेल्हापूर, दि.23 एप्रिल - शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता आणि वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे गाढे अभ्यासक होते. विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्र आणि सामाजिक समावेशन केंद्रास त्यांनी भरीव योगदान दिले. मागील काही वर्षांपासून फुले, शाहू, आंबेडकर यांचा सप्ताह विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने डॉ.महाजन यांचा मोठा सहभाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण खऱ्या अर्थाने अंगी बाणावलेले एक शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यावर त्यांचा भर होता. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा त्यांच्या कृतीमधून दिसून येतो. डॉ.महाजन यांनी कार्याच्या माध्यमातून विभागास राष्ट्रीय पातळीवर पुढे नेहले. एक सहृदयी आदर्श व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठाची, समाजाची आणि शैक्षणिक क्षेत्राची भरून येणारी हानी झाली आहे, अशी भावना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.श्रीकृष्ण महाजन यांचे अपघातामुळे निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आलेे.याप्रसंगी डॉ.जाधव बोलत होत्या.

           वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागाचे डॉ.केदार मारूलकर म्हणाले, सकारात्मक विचार करताना विद्यार्थी आणि विद्यापीठ हीत यांचा कायम डॉ.महाजन विचार करीत असत. भविष्यातील शैक्षणिक सुधारणांबाबत ते नेहमी काळाच्या पुढे जाऊन विचार करीत आणि प्राधान्याने अंमलबजावणी करीत होते.

            कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले.

यावेळी आजीवन अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, नॅक विभागाचे डॉ.सागर डेळेकर, इतिहास अधिविभागाचे माजी अधिविभागप्रमुख डॉ.माधो पाटील, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ.उदय पाटील,एमबीए अधिविभागप्रमुख डॉ.दिपा इंगवले, रसायनशास्त्र अधिविभागाचे डॉ.गोविंद कोळेकर, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागप्रमुख डॉ.पवन गायकवाड, डॉ.मुरलीधर भानारकर, डॉ.किशोर खिलारे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष आनंदराव खामकर, उपकुलसचिव निवास माने, संशोधक विद्यार्थी यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

            याप्रसंगी परीक्षा मूल्यमापन केेंद्राचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव,क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे, डॉ.अवनिश पाटील, डॉ.निशा मुढे, डॉ.राजेंद्र सोनकवडे, लेखा विभागाचे उपकुलसचिव प्रिया देशमुख यांचेसह विविध अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठयासंख्येने उपस्थित होते.

------

महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवस

शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले व महर्षी शिंदे यांच्याविषयी आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस.

शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले व महर्षी शिंदे यांच्याविषयी आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस. मंचावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, प्रा. सुशील धसकटे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. रणधीर शिंदे.

शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले व महर्षी शिंदे यांच्याविषयी आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना प्रा. सुशील धसकटे.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर : महात्मा ज्योतीराव फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे स्वतंत्र काळातील असले तरी त्यांच्या विचारांमध्ये समाजपरिवर्तनाची एक सलग परंपरा दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन यांच्या वतीने महात्मा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष व महर्षी शिंदे यांची १५३ वी जयंती या संयुक्त निमित्ताने “महात्मा फुले आणि महर्षी शिंदे: अनुबंधांचा अन्वयार्थ” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून डॉ. गवस बोलत होते.

डॉ. गवस म्हणाले, महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांची कार्यपद्धती व अनुभव वेगवेगळे असले तरी दोघांचाही केंद्रबिंदू सामाजिक विषमता दूर करणे हा होता. फुले यांनी जातिव्यवस्था, कर्मविपाक सिद्धांत आणि अवतार संकल्पना यांना ठामपणे विरोध करत “सत्य” हा धर्म मानला आणि समाजाला पर्यायी मूल्यव्यवस्था दिली. त्यांनी थेट अन्यायावर प्रहार करत समाजजागृती केली. तर, महर्षी शिंदे यांनी अध्यात्म आणि सामाजिक सुधारणांचा समन्वय साधत जीवनाभिमुख अध्यात्माचा पुरस्कार केला. फुले यांच्या काळातील सामाजिक जखमा, अपमान आणि अन्याय यांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता, तर शिंदे यांचा प्रवास तुलनेने वेगळा होता. तरीही शिंदे यांनी धर्माचा अभ्यास करून समाजातील विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळात हिंदू धर्मावर विविध बाह्य प्रभावांचा दबाव असताना फुले यांनी “सत्यधर्म” मांडला, तर शिंदे यांनी प्रार्थना समाजासारख्या चळवळींतून सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग स्वीकारला.

फुले आणि शिंदे यांच्या विचारांचा अनुबंध समजून घेताना त्यांच्या काळाचा संदर्भ लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांनीही समाजाला नवीन विचार दिले, परंतु त्यांची पद्धत आणि दृष्टिकोन वेगळा होता. या दोन्ही प्रवाहांचा एकत्रित विचार केल्यास महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांची व्यापक परंपरा अधिक स्पष्ट होते, असेही डॉ. गवस यांनी अधोरेखित केले.

यावेळी पुण्याच्या प्रा. सुशील धसकटे यांचे बीजभाषण झाले. त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील या दोन विचारवंतांच्या कार्यातील परस्परसंबंध अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून दाखवला. धसकटे यांनी पुणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भातून या अनुबंधाचा वेध घेतला. पुणे हे बहुजनांचे शहर असताना कालांतराने प्रस्थापितांचे केंद्र कसे बनले, याचा उल्लेख करत त्यांनी पूर्व पुण्यातूनच महाराष्ट्राला समतेचा, पुरोगामी विचार मिळाल्याचे सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले यांचा वाडा आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा अहिल्याश्रम या दोन्ही ठिकाणांची भौगोलिक जवळीक हा त्यांच्या विचारसरणीतील अनुबंध अधोरेखित करणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धसकटे म्हणाले, फुले यांनी ज्या ठिकाणी अस्पृश्य मुलांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच भूमीवर पुढे महर्षी शिंदे यांनी आपले कार्य उभारले. यावरून शिंदे यांनी फुले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते. फुले यांनी सुरू केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला शिंदे यांनी अधिक संशोधक, चिकित्सक दृष्टिकोनातून पुढे नेले.

धसकटे यांनी या महामानवांच्या धर्मविषयक चिंतनावर विशेष भर दिला. त्यांनी नमूद केले की, १९व्या शतकात फुले यांनी धर्मसुधारणेची ठाम भूमिका घेत “सत्य” हा धर्माचा पाया असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी धर्मातील अंधश्रद्धा व शोषणाविरुद्ध आवाज उठवला आणि सत्यशोधक समाज सारखा संस्थात्मक पर्याय उभा केला. त्याच धर्तीवर महर्षी शिंदे यांनी प्रार्थना समाज आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून समाजकार्य केले. या दोघांनीही केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून परिवर्तन घडवण्यावर भर दिला. धर्माच्या नावाखाली होणारे शोषण थांबवण्यासाठी या विचारवंतांनी संस्थात्मक पर्याय उभे केले. मात्र, पुढील काळात या संस्था दुर्लक्षित झाल्याने धर्माचे विकृत आणि हिंस्र स्वरूप समाजात वाढीस लागले. आजच्या परिस्थितीत या संस्थांचा पुनर्विचार आणि पुनरुज्जीवन आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

धसकटे यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भातही फुले आणि शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट केला. गांधींमध्ये फुले यांचा आग्रहीपणा आणि शिंदे यांचा उदारमतवाद यांचा संगम दिसतो, असे त्यांनी नमूद करत “फुले–शिंदे–गांधी” हे सूत्र समाजाने नव्याने स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, समताधारित समाजनिर्मितीसाठी काम करणाऱ्या सर्व महामानवांचा एकत्रित, संतुलित असा अभ्यास साकल्याने करण्याची आजघडीला गरज आहे. फुले आणि शिंदे यांनी समाजसुधारणा आणि प्रबोधनाचे मोठे पर्व महाराष्ट्रभूमीत निर्माण केले. त्या पर्वाच्या स्मृती जागवत असताना त्यातील चांगले वेचून घेणे आणि समाजामध्ये रुजविणे याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरवातीला महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी अभिवादन केले. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला, तर प्रांजली क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. अनिल गवळी, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. अवनीश पाटील, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. दत्तात्रय मचाले आदी उपस्थित होते.

 

दुपारच्या पहिल्या सत्रात महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या कार्याचा अन्वयार्थ या विषयावरील चर्चेत उद्धव धुमाळ (पुणे), डॉ. प्रकाश पवार आणि रमेश चव्हाण (पुणे) यांनी सहभाग घेतला. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या सत्रात महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या कार्याचा सामाजिक- सांस्कृतिक अनुबंध या विषयावरील चर्चेत डॉ. भक्ती महाजन (गोवा), डॉ. सुरेश शिखरे, मोहसीन पठाण यांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. शंकरराव कदम (कराड) यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप झाला.

Sunday, 19 April 2026

शिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरव

समाजमाध्यमांवरून लघुचित्रफीत केली प्रसारित

शिवाजी विद्यापीठाचे सीएफसी-सैफ केंद्र

शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्रात उपलब्ध अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे


केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची लिंक्ड-इनवरील पोस्ट

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एक्स हॅंडलवरील पोस्ट

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या फेसबुक पेजवरील पोस्ट

(केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने शेअर केलेला शिवाजी विद्यापीठाच्या सैफ केंद्राचा व्हिडिओ)

(शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्राचे संचालक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांची प्रतिक्रिया)


कोल्हापूर, दि. १९ एप्रिल: भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) शिवाजी विद्यापीठाच्या कॉमन फॅसिलिटी सेंटर- सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज (सीएफसी– सैफ) या विभागाच्या दर्जेदार कामगिरीची दखल घेतली आहे. विद्यापीठाच्या या केंद्रात उपलब्ध असलेली अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधा यांची माहिती देणारी लघुचित्रफीत केंद्रीय विभागाने त्यांच्या समाजमाध्यमांच्या सर्व मंचावरून प्रदर्शित केली आहे. अशा प्रकारे केंद्रीय मंत्रालयाकडून गौरव होण्याचा बहुमान मिळविणारे शिवाजी विद्यापीठाचे ह देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या एक्स, लिंक्डइन आणि फेसबुक या समाजमाध्यमांच्या मंचांवरून शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्राची माहिती देणारी तीन मिनिटांची लघुचित्रफीत प्रदर्शित केली आहे. लघुचित्रफीतीसमवेत लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे पाठबळ लाभलेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज' (#SAIF) हे केंद्र संपूर्ण भारतातील संशोधक, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना अत्याधुनिक विश्लेषणात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा पुरवत आहे. मंत्रालयाच्या सैफ कार्यक्रमांतर्गत २०१४ मध्ये स्थापन झालेले हे केंद्र, अतिप्रगत उपकरणांच्या साहाय्याने अचूक विश्लेषण आणि नाविन्यपूर्णतेला चालना देऊन वैज्ञानिक संशोधनाला यशस्वीपणे बळकटी देत आहे.

या पोस्टमध्ये मंत्रालयाने खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह, सचिव अभय करंदीकर यांच्यासह केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, सीएसआयआर-इंडिया यांना टॅग केले आहे.

या केंद्राचे संचालक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी मंत्रालयाकडून झालेल्या गौरवाबद्दल समाधान व्यक्त केले. केंद्राच्या वाटचालीविषयी सांगताना ते म्हणाले, विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्रामध्ये एकूण सोळा विविध अतिउच्च दर्जाची अत्याधुनिक वैज्ञानिक संश्लेषक उपकरणे आहेत. त्यावर भारतातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांमधील संशोधकही आपल्या संशोधनाचे नमुने तपासणीसाठी पाठवित असतात. मागील पाच वर्षांचा आढावा घेत असता, सन २०२०-२१मध्ये देशभरातून २४०० नमुने तपासणीसाठी आले होते. त्या माध्यमातून दोन लाख ४४ हजार रुपये इतके उत्पन्न विद्यापीठास मिळाले होते. आता २०२५-२६मध्ये देशभरातील संशोधन संस्थांकडून तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या आठ हजारांच्या घरात गेली असून उत्पन्नही ५२ लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. त्याखेरीज केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळा, विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम या माध्यमातून दरवर्षी साधारणतः १२०० विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरण हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येते. केंद्राच्या या सर्व विज्ञानाभिमुख कामगिरीची केंद्रीय मंत्रालयाने दखल घेतली, याचा मोठा आनंद वाटत आहे. यापुढील काळातही येथील उपकरणांची संख्या वाढविण्यात येऊन आणखी दर्जेदार व आधुनिक विश्लेषण सुविधा संशोधकांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच हा सन्मान केंद्राला लाभला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

--

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यमांवरून प्रसारित केलेल्या लघुचित्रफीतींच्या लिंक पुढीलप्रमाणे-

https://x.com/IndiaDST/status/2044997863554646129

https://www.linkedin.com/posts/indiadst_saif-ugcPost-7450765283746820096-xdk4?utm_source=share&utm_medium=member_desktop&rcm=ACoAAENLVvkBSDJcfw-kYkvD27JZxQSEgqi9udw

https://fb.watch/Gxs-uCul9M/ 

Saturday, 18 April 2026

शिवाजी विद्यापीठाचा एक्सलॉजिया कंपनीसमवेत सामंजस्य करार

.आर.’ शैक्षणिक प्रणाली, क्यू. आर.’ बॅंकिंग प्रणालीच्या औद्योगिक उपयोजनासाठी महत्त्वपूर्ण

शिवाजी विद्यापीठात एक्सलॉजिया कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि शैलेश कोपार्डेकर. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. नितीन माळी, डॉ. सुधीर देसाई आणि उपस्थित शिक्षक व कंपनीचे अधिकारी


कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर व्हावा, या दृष्टीने तिची सिद्धता होणे हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. त्याचा समाजाबरोबरच विद्यार्थ्यांनाही लाभ मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि पुणे येथील एक्सलॉजिया टेक एलएलपी यांच्यामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या आभासी वास्तविकता (SUK-AR)  शैक्षणिक प्रणालीतील डिजिटल अ‍ॅसेट्स आणि क्विक रिस्पॉन्स आधारित (QR based) बँकिंग प्रणालीचा वापर आणि वितरण यासाठी काल सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी एक्सलॉजिया कंपनीचे शैलेश कोपर्डेकर म्हणाले, विद्यापीठाने विकसित केलेले नवोपक्रम आणि तंत्रज्ञान प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय क्षेत्रापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन या करारासाठी पुढाकार घेतला. या समाजोपयोगी विद्यापीठीय संशोधनाचा समाज आणि उद्योग क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी नजीकच्या काळात प्रयत्न करण्यात येतील.

यावेळी सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि श्री. कोपार्डेकर यांनी स्वाक्षरी केल्या. स्कूलचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुधीर देसाई यांनी सामंजस्य कराराविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. वैशाली भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. परशुराम वडार, डॉ. तेजश्री मोहरेकर, डॉ. मनस्वी कोपार्डेकर व अभिजित जाधव उपस्थित होते.