Friday, 10 April 2026

शिवाजी विद्यापीठात ‘सुरण’ फुलले

बॉटेनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ फूल पाहण्याची निसर्गप्रेमींना संधी

 

शिवाजी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये फुललेल्या सुरणाची पाहणी करताना ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस.आर. यादव. सोबत डॉ. सावलीराम घाणे व डॉ. संतोष जयागौडर

शिवाजी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये फुललेल्या सुरणाची माहिती देताना ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस.आर. यादव.

दुर्मिळ व आकर्षक सुरणाचे फूल

दुर्मिळ व आकर्षक सुरणाचे फूल


(विद्यापीठात उमललेल्या सुरण फुलाची माहिती देताना डॉ. एस.आर. यादव (व्हिडिओ))


कोल्हापूर, दि. १० एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये सुरण (Amorphophallus paeoniifolius) या वनस्पतीला फुलोरा आला असून निसर्गप्रेमी आणि वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष संधी आहे. “एलीफंट फूट याम” किंवा मृतदेहासारखा वास येणारे फूल म्हणून “कॉर्प्स फ्लॉवर” नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा फुलोरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस.आर. यादव यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, सामान्यपणे मान्सूनपूर्व काळात फुलणाऱ्या या वनस्पतीचे फूल आकाराने मोठे असते. त्यातून येणारा तीव्र दुर्गंध हा सडलेल्या मांसासारखा वाटतो. ही वनस्पती प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशिया आणि भारतातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते. स्थानिक पातळीवर “सुरण” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचे कंद खाद्य म्हणून वापरले जाते; मात्र तिचा फुलोरा हा काही वर्षांतून एकदाच घडणारे अतिशय देखणे नैसर्गिक दृश्य असते.

ही वनस्पती उत्क्रांतीतील एक अत्यंत रोचक उदाहरण आहे. ती सडलेल्या सेंद्रिय पदार्थासारखा वास निर्माण करून विशिष्ट परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करते, ज्यामुळे गर्दीच्या परिसंस्थेतही तिचे परागीभवन सुनिश्चित होते. विशेषतः माश्या आणि भुंगे (beetles) हे या वनस्पतीचे मुख्य परागीभवन करणारे घटक आहेत.

या फुलरचनेत मोठ्या, लहरी, जांभळट-तपकिरी रंगाच्या “स्पेथ” (spathe) नावाच्या आवरणात मध्यभागी मांसल “स्पॅडिक्स” (spadix) असतो. पूर्ण फुलोऱ्यात हे फूल साधारणपणे २ ते ३ फूट उंच वाढते, त्यामुळे ते अत्यंत आकर्षक दिसते. या फुलोऱ्याचा कालावधी अत्यंत मर्यादित असून ते साधारणतः २४ ते ४८ तासांपर्यंतच टिकते. त्यानंतर स्पॅडिक्स हळूहळू कोमेजू लागतो.

शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र विभाग पश्चिम घाटातील दुर्मिळ व संकटग्रस्त वनस्पतींच्या संवर्धनासाठी ओळखला जातो. संशोधकांसाठी हा फुलोरा अरासी (Araceae) कुलातील वनस्पतींच्या प्रजननशास्त्र आणि परागीभवन प्रक्रियेचा अभ्यास करण्याची एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देतो.

सध्या हे फूल पूर्ण बहरात असून इच्छुक विद्यार्थी व नागरिकांना विद्यापीठाच्या लीड बॉटॅनिकल गार्डनमध्ये ते पाहता येईल. आठवड्याच्या अखेरपर्यंत हा फुलोरा ओसरण्याची शक्यता आहे.

यावेळी डॉ. यादव यांच्यासमवेत डॉ. सावलीराम घाणे आणि कर्नाटक विद्यापीठाचे डॉ. संतोष जयागौडर होते.

माणूस म्हणून मान्यतेसाठीच बाबासाहेबांकडून धम्मस्वीकार: प्रा. सुकुमार कांबळे

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे. 

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे. 


(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



 

कोल्हापूर, दि. १० एप्रिल: माणूस म्हणून जगायचे असेल, तर बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही या जाणीवेतून आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन आज प्रा. कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मचिंतन या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

प्रा. सुकुमार कांबळे यांनी आपल्या व्याख्यानात धम्माचे मानवी मूल्य आणि सामाजिक परिवर्तनातील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, प्राचीन काळातील वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था आणि विषमताधिष्ठित रचनेने समाजात माणसाला माणूस म्हणून मान्यता दिली नाही. हीच अन्यायकारक व्यवस्था पालटून टाकण्यासाठी बुद्धांनी “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हा मानवकल्याणाचा मार्ग दिला. सिद्धार्थ गौतम राजघराण्यात जन्माला आले असले तरी त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत सत्य आणि मानवकल्याणाचा शोध घेतला. रोहिणी नदीच्या पाण्यावरून उद्भवलेल्या संघर्षाच्या वेळी त्यांनी युद्धाला विरोध करत शांततामय मार्गाचा आग्रह धरला. “निसर्गाच्या संसाधनासाठी माणसाने माणसाचा जीव घेऊ नये,” हा त्यांचा विचार पुढे बुद्धधम्माच्या तत्त्वज्ञानात दिसून येतो. सिद्धार्थांनी उपवास, तपश्चर्या आणि विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास व चिंतन करून शेवटी माणसाच्या दुःखाचे मूळ ‘तृष्णा’ असल्याचे सांगितले. “अत्त दीप भव” या संदेशातून त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या विवेकबुद्धीने विचार करून जीवन जगण्याचा मार्ग दिला.

ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता, अन्याय आणि विषमता अनुभवली होती. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिरप्रवेश या चळवळींच्या माध्यमातून त्यांनी मूलभूत मानवी हक्कांसाठी लढा दिला. यावेळी आलेल्या विदारक अनुभवातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी नव्या मार्गाची गरज असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले. याच चिंतनातून १९५६ मध्ये त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. हे केवळ धर्मांतर नव्हते, तर सामाजिक क्रांतीचा निर्णायक टप्पा होता. बुद्धधर्म हा विज्ञाननिष्ठ, तर्कसंगत आणि प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणारा आहे. अंधश्रद्धेला स्थान न देता विचारस्वातंत्र्य देतो. त्यामुळे आजच्या काळातही बुद्धधम्म मानवकल्याणासाठीचा अत्यंत उपयुक्त मार्ग आहे.

फुले-शाहू-आंबेडकर या त्रयीच्या विचारांचा एकात्म दृष्टिकोन मांडण्याची आज गरज असल्याचे अधोरेखित करताना अध्यक्षीय मनोगतात डॉ. विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष कार्यातूनच महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांच्या परंपरा विकसनाला बळ लाभले असावे, असे अभ्यासांती माझे मत बनले आहे. शेतकरी हित, स्त्री सन्मान आणि शिक्षण या तीन प्रमुख आधारस्तंभांवर या सर्व महापुरुषांचे कार्य उभे असून, समाजपरिवर्तनाचा हा व्यापक वारसा समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारकार्याचा तुकड्या-तुकड्यांत नव्हे, तर एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या आंबेडकरी संदेशाचा पाया ‘शिक्षण’ असून विद्यार्थ्यांनी विवेकनिष्ठ, चिकित्सक आणि स्वविचारक्षम बनण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Wednesday, 8 April 2026

विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू करावे: वासुदेव कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सत्कार कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक वासुदेव कुलकर्णी. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, भाग्यश्री कासोटे-पाटील, कृष्णात दिवटे आणि डॉ. आलोक जत्राटकर


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सत्कार कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक वासुदेव कुलकर्णी. 

शिवाजी विद्यापीठात प्रकाशन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल भाग्यश्री कासोटे-पाटील यांचा सत्कार करताना वासुदेव कुलकर्णी. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आलोक जत्राटकर, कृष्णा दिवटे


शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करताना वासुदेव कुलकर्णी. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, भाग्यश्री कासोटे-पाटील व कृष्णा दिवटे.


(सत्कार समारंभाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ८ एप्रिल: जीवनात वाचनासारखा अन्य मोठा आनंद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचते व्हावे, ग्रंथांना गुरू करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व संपादक वासुदेव कुलकर्णी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात आयोजित व्याख्यान आणि विशेष सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पुस्तकप्रेमी समूहाचे प्रवर्तक कृष्णा दिवटे प्रमुख उपस्थित होते.

श्री. कुलकर्णी म्हणाले की, आजच्या काळामध्ये माणुसकी शिकविणारे शिक्षण घ्यायला हवे. त्याची नितांत गरज आहे. त्यासाठी माणसाने सतत शिकत रहावे. शिकण्याची जिद्द मनात ठेवून विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या मातीशी जोडून राहिले पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगून वाचनसंस्कृती टिकविण्याचे काम आपणच केले पाहिजे.

या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या 'ब्लकॅ व्हाईट अन् ग्रे' आणि 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकांना अनुक्रमे महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा ईश्वरपूर) आणि मारोतराव नारायणे प्रतिष्ठान, वर्धा या महाराष्ट्रातील नामांकित साहित्य संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्याबद्दल त्यांचा श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, भाग्यश्री प्रकाशनाच्या संचालिका भाग्यश्री कासोटे-पाटील यांचा प्रकाशन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. आलोक जत्राटकर म्हणाले, आजच्या काळातील प्रश्नांना विद्यार्थ्यांनी स्वच्छ हेतूने आणि निर्भयतेने भिडले पाहिजे. सभोवतालच्या विविध गोष्टींचे सूक्ष्म आकलन करून त्याविषयी आपण लिहीते राहिले पाहिजे. सतत वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे.

भाग्यश्री कासोटे-पाटील यांनी आपल्या प्रकाशन वाटचालीमधील अनुभव कथन केले आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या नव्या वाटा शोधून वाटचाल केली पाहिजे, असे सूचित केले. कृष्णा दिवटे यांनी आपल्या मनोगतामधून वाचन संस्कृती चळवळीविषयी अनुभवकथन करताना आजच्या काळात वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी मराठी अधिविभागातील एम..भाग एकमधील मृण्मयी पांचाल, विमल मोरे, संशोधक विद्यार्थिनी गौरी कुंभार यांचा विशेष प्राविण्याबद्दल सत्कार करण्यात आला.

अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्योती वराळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनॉईंग व कयाकिंग स्पर्धेत

गुरु नानक देव विद्यापीठास विजेतेपद

चंदीगड विद्यापीठ उपविजेते; शिवाजी विद्यापीठास अखेरच्या दिवशी दोन पदके

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनॉईंग व कयाकिंग स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक स्वीकारताना अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाचा संघ.


सांगली, दि. ८ एप्रिल: शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) यांच्या संयुक्त विद्यमाने येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनॉईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) अजिंक्यपद स्पर्धेत एकूण १९ पदके प्राप्त करीत अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेत चुरशीची लढत देणाऱ्या मोहालीच्या चंदीगड विद्यापीठाने उपविजेतेपद मिळविले आणि चंदीगडच्या पंजाब विद्यापीठास तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यांनी अनुक्रमे एकूण १८ व १५ पदके प्राप्त केली. सांगली येथील रॉयल कृष्णा बोट क्लब येथे आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला.

दरम्यान, गेले चार दिवस विविध गटांत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी आज अखेरच्या दिवशी २०० मीटर शर्यतीत आपला खेळ उंचावत दोन पदके प्राप्त केली. पुरूषांच्या कयाकिंगमध्ये के-४ गटात रौप्य आणि महिलांच्या कॅनॉईंगमध्ये सी-२ गटात कांस्य पदक पटकावले. महिलांच्या के-४ गटातही चौथे स्थान प्राप्त केले.

अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने स्पर्धेच्या सुरवातीपासून सर्वच गटांत आपले वर्चस्व कायम राखले. स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण कामगिरीच्या जोरावर एकूण ११ सुवर्ण, ८ रौप्य अशी एकूण १९ पदकांची कमाई करत त्यांनी अजिंक्यपद पटकावले. मोहालीच्या चंदीगड विद्यापीठाने ६ सुवर्ण, ६ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १८ पदके प्राप्त करीत उपविजेतेपद मिळविले. चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाने ७ सुवर्ण, २ रौप्य व ६ कांस्य अशा एकूण १५ पदकांसह तृतीय स्थान पटकावले.

स्पर्धेत लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने २ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य अशी ८ पदके प्राप्त करीत चौथे, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १ सुवर्ण ४ रौप्य व १ कांस्य अशी ६ पदके मिळवित पाचवे स्थान प्राप्त केले. गुरू काशी विद्यापीठ, केरळ विद्यापीठ यांनी प्रत्येकी ४, पुण्याचे भारती अभिमत विद्यापीठ, मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, राजस्थान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी प्रत्येकी ३ पदके प्राप्त केली.

यावेळी खासदार विशाल पाटील यांनी महाराष्ट्रात या स्पर्धा प्रथमच भरविण्याचा सन्मान शिवाजी विद्यापीठाला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सांगलीकरांनी या स्पर्धा यशस्वी करून दाखवून भविष्यातील या स्पर्धांमध्येही क्रीडापटूंना मोठी संधी असल्याचे दाखवून दिले असून या स्पर्धेमुळे आता कॅनॉईंग व कयाकिंग या जलक्रीडा प्रकाराला केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे, तर राज्यभरात मोठी चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

या प्रसंगी स्पर्धा निरीक्षक डॉ. संदीप शिंदे, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, पुण्याच्या युवक सेना संचालनालयाचे उपसंचालक सुहास पाटील, सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, अधिसभा सदस्य धैर्यशील यादव, संजय परमणे, काव्याश्री नलवडे, श्वेता परुळेकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, कास्ट्राईबचे आनंद खामकर, पंच प्रतिनिधी मुकेश शर्मा, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. एन. डी. पाटील, प्रा. किरण पाटील, डॉ. मयूर सिंहासने, डॉ. आकाश बनसोडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल मगदूम, विजय रोकडे, संजय पाटील, डॉ. श्रीदेवी पवार, दत्ता पाटील, डॉ. एन.आर. कांबळे, डॉ. धनंजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अधिसभा सदस्य विशाल गायकवाड यांनी आभार मानले.

सांगलीमध्ये प्रथमच होत असलेल्या या स्पर्धांना क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चितळे उद्योग समूहाच्या वतीने सहभागी क्रीडापटूंना भेटवस्तू देण्यात आल्या.

तत्पूर्वी आज झालेल्या २०० मीटर शर्यतींमध्ये पुरुष गटात चंदीगड विद्यापीठ, भारती विद्यापीठ, गुरू नानक देव विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे, तर महिला गटात चंदीगड विद्यापीठ आणि गुरू नानक देव विद्यापीठ या संघांचे वर्चस्व दिसून आले.

२०० मीटर शर्यतींचा अंतिम निकाल अनुक्रमे (कंसात विद्यापीठ व नोंदविलेली वेळ याप्रमाणे) असा-

पुरुष गट-

के-१ - राजेश शेट्टी (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 00:45.12), योगेश सिंग (पाँडिचेरी विद्यापीठ पुद्दुचेरी, 00:46.18), निरंजन पाटील (भारती अभिमत विद्यापीठ, 00:46.32), अनोश बारला (बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ, 00:47.38),

सी-१ - प्रिन्स गोस्वामी (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:49.85), अनिकेत (लव्हली प्रोफेशन विद्यापीठ, 00:50.85), आधिनाथ ए. (केरळ विद्यापीठ, 00:52.41), मोहम्मद शोएब अली (कुरूक्षेत्र विद्यापीठ, 00:53.70)

के-२ - निरंजन पाटील व प्रथमेश पाटील (भारती अभिमत विद्यापीठ, 00:41.46), लक्षवीर सिंग व विशाल डांगी (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:41.82), एन. निवास सिंग व रोहित (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 00:42.45), वंश शर्मा व साहिल गायरी (मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर, 00:43.79),

सी-२ - अल्पेश धुळे व दर्शन मोरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 00:41.85), अक्षय बी. व मनिंदर सिंग (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 00:41.88), राजू कुमार व हर्षपाल (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 00:44.39), प्रतीक कसबे व दिव्यांग थोरात (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, 00:48.24),

के-४आदर्श बिजू व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, 00:39.64), करण घुणके, स्वानंद आकिवाटे, अमेय भुयेकर व श्रीसमर्थ सासणे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 00:40.83), अथर्व महाजन व सहकारी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 00:41.55), साहील ग्यारी व सहकारी (मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर, 00:42.93),

महिला गट-

के-१ - गरिमा (चंदीगड विद्यापीठ, 00:56.05), चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:56.48), आंद्रिया पॉलोज (केरळ विद्यापीठ, 00:57.52), दिव्यांशी राघोरटे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 00:59.76),

सी-१ - अनु (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 01:04.87), विचित्रा गुप्ता (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 01:08.63), ओ. बिद्यालक्ष्मी देवी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 01:08.85), अनुष्का अंबेकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 01:09.03),

के-२ - निधी व चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:53.69), वंशिका व कुलसुम (चंदीगड विद्यापीठ, 00:56.68), आंद्रिया पॉलोज व देविका (केरळ विद्यापीठ, 00:58.33), दिव्यांशी राघोरटे व वैष्णवी अजबाळे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 00:58.37),

सी-२ - निक्की व अनु (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 00:56.31), अनुष्का अंबेकर व संस्कृती सिंगाडे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 01:01.56), प्रिया चव्हाण व प्रतीक्षा खोत (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 01:05.82), लीना नागलवाडे व अपेक्षा हजारे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 01:14.58),

के-४ – ह्रषिता व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, 00:47.35), भूमी सोनकर व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:48.70), कुसुम गुप्ता व सहकारी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 00:51.60), अपूर्वा पोकळे, समृद्धी खोत, प्रणाली कोपार्डे व स्फूर्ती माने (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 00:52.65).

अंतिम पदकतालिका पुढीलप्रमाणे-

विद्यापीठाचे नाव

सुवर्ण

रौप्य

कांस्य

एकूण पदके

गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर

११

१९

चंदीगड विद्यापीठ, मोहाली

१८

पंजाब विद्यापीठ, चंदीगड

१५

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब

०८

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

०६

गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा

०४

केरळ विद्यापीठ, केरळ

०४

मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर

०३

भारती अभिमत विद्यापीठ, पुणे

०३

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

०३

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

०२

पंजाब विद्यापीठ, पतियाळा

०२

पं. रवीशंकर शुक्ला विद्यापीठ, रायपूर

०१

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

०१