Thursday 25 July 2024

शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा

विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील विविध विद्यापीठांत प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींशी शैक्षणिक शिष्यवृत्ती व योजनांबाबत वेबिनारद्वारे संवाद साधला. शिवाजी विद्यापीठात या वेबिनारला मोठा प्रतिसाद लाभला.


महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वेबिनारसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वेबिनारसाठी शिवाजी विद्यापीठात मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनी.



कोल्हापूर, दि. २५ जुलै: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अनेक शिष्यवृत्तींसह विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्यांचा लाभ घेऊन उच्चशिक्षण क्षेत्रातील आपली वाटचाल सुकर करावी, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.

मंत्री श्री. पाटील यांनी आज सकाळी १० वाजता ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थीहिताच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांबाबतची माहिती देताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, दि. ७ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) आणि सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के लाभ देण्यात येतो. त्याचप्रमाणे नुकत्याच ८ जुलै २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठ, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) आणि सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (व्यवस्थापन कोट्यातील/संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामायिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या) मुलींना शंभर टक्के लाभ देण्यास चालू शैक्षणिक वर्षापासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

तसेच वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परिक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या), महिला व बालविकास विभागाच्या दि. ६ एप्रिल २०२३च्या शासन निर्णयात नमुद केलेल्या संस्थात्मकसंस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुध्दा अनुज्ञेय करण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या वेबिनारला कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. उपकुलसचिव भक्ती नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर प्रवेश विभागाने कार्यक्रमाचे नियोजन केले.

Tuesday 23 July 2024

लोकमान्य टिळक यांना विद्यापीठात अभिवादन

 



कोल्हापूर, दि. २३ जुलै: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. विद्या कट्टी, डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. शशिकांत पंचगल्ले, डॉ. मच्छिंद्र गोफणे, उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव, गजानन पळसे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

डॉ. बाळकृष्ण यांच्याकडून कोल्हापूरचे शैक्षणिक-सांस्कृतिक जीवन समृद्ध: डॉ. अरूण भोसले

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ. अरूण भोसले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ. अरूण भोसले. मंचावर (डॉवीकडून) ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व डॉ. अवनीश पाटील.


कोल्हापूर, दि. २३ जुलै: प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी कोल्हापूरचे शैक्षणिक-सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्याची अजरामर कामगिरी बजावली आहे, असे गौरवोद्गार इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. अरूण भोसले यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ. भोसले बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी डॉ. बाळकृष्ण यांच्या जीवनकार्याचा आपल्या व्याख्यानात साक्षेपी वेध घेतला. ते म्हणाले, स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या व्यासंगी विद्वत्तेचा लौकिक प्रस्थापित करणारे डॉ. बाळकृष्ण हे महान संशोधक होते. राजर्षी शाहू महाराजांच्या निमंत्रणाचा मान राखून पंजाबमधून कोल्हापूर येथे राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारणारे बाळकृष्ण स्वतःला मराठा म्हणवून घेत, इतकी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा होती. बहुआयामी व्यक्तीमत्त्वाच्या डॉ. बाळकृष्ण यांनी कोल्हापूरला महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याबरोबरच येथे आर्य समाजाच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक प्रबोधन चळवळीचेही केंद्र बनविले. त्याचप्रमाणे १९३२ ते १९४० या अवघ्या आठ वर्षांच्या कालावधीत चार खंडांमध्ये शिवाजी द ग्रेट हे महान चरित्र साकारले, ही त्यांची फार मोलाची देणगी महाराष्ट्राला आहे. शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्यनिर्मिती हे प्रखर राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असल्याचे ते मानत. बाळकृष्ण यांनी कोल्हापूरमध्ये इतिहास संशोधकांची वैभवशाली परंपरा निर्माण केली. यामध्ये विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अ.रा. कुलकर्णी यांचा समावेश आहे.

डॉ. बाळकृष्ण यांनी राजाराम महाविद्यालयाला मुंबई इलाख्यातील नामवंत महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त करून देण्याची मोलाची कामगिरी केल्याचे सांगून डॉ. भोसले म्हणाले, ६ मे १९२२ रोजी शाहू महाराजांचे निधन झाले आणि १५ मे रोजी बाळकृष्ण यांनी राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा भार स्वीकारला. त्यावेळी येथे केवळ इंटरपर्यंत शिक्षण होते आणि विद्यार्थीसंख्या अवघी १७० होती. पुढे प्राचार्यांनी इतिहासासह विविध विषयांच्या ऑनर्सपर्यंतच्या शिक्षणाची सोय केली. विज्ञान शाखेसह एम.ए., एम.एस्सी. सुरू केले. १९३१ साली महाविद्यालयाने सुवर्णमहोत्सव साजरा केला, त्यावेळी विद्यार्थीसंख्येच्या बाबतीत महाविद्यालय मुंबई इलाख्यात सहाव्या, तर गुणवत्तेच्या बाबतीत पहिल्या तीनमध्ये होते. कोल्हापूरमध्ये विधी आणि शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये सुरू करण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला. १९३५ साली त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचे डोळस स्वप्न पाहिले. विद्यापीठाचे भौगोलिक स्थान कोठे असावे इथपासून ते विद्यापीठाच्या परिसरात कोणकोणत्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध असावे, या साऱ्याचा आराखडा त्यांनी निर्धारित केलेला होता. त्यानुसारच शिवाजी विद्यापीठ अस्तित्वात आले, मात्र ते पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. मात्र, यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई या त्यांच्या दोन शिष्योत्तमांनी ते साकार केले, याची नोंद घ्यायला हवी.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चर्चा आपण सध्या करतो आहोत. पण सुमारे शतकभरापूर्वी शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन आधुनिक प्रवाह आणणारे विद्वान म्हणजे डॉ. बाळकृष्ण होते. बाळकृष्ण यांच्या जीवनचरित्राविषयी अधिक सखोल संशोधन करण्याची गरज आहे. डॉ. भोसले यांच्या व्याख्यानाची पुस्तिका करण्याबरोबरच डॉ. बाळकृष्ण यांचा चरित्रग्रंथही निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवचरित्राचा महाप्रकल्प डॉ. बाळकृष्ण यांनी अथक परिश्रमांनी साकारल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जसिंगराव पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. ते म्हणाले, सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचे भव्य स्वप्न पाहणाऱ्या डॉ. बाळकृष्ण यांनी लिहीलेल्या शिवाजी द ग्रेटया महाग्रंथाचे वैशिष्ट्य असे की, शिवचरित्राने आणि त्यांच्या कार्याने भारावलेल्या डॉ. बाळ कृष्ण यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात या महाग्रंथाचा संकल्प सोडला. १९३२ ते १९४० या कालावधीत त्यांनी या चार खंडांत विभागलेल्या सुमारे १६३५ पृष्ठसंख्येच्या महाग्रंथाचे लेखन पूर्ण केले. कित्येकदा अंगात प्रचंड ताप असतानाही त्यांनी हे लेखन पूर्ण करण्याचा ध्यास सोडला नाही. शिवछत्रपतींविषयी वाटणारा भक्तीभाव व त्यातून निर्माण झालेली त्यांची मिशनरी वृत्ती या गुणांच्या जोरावर त्यांनी दम्यासारख्या रोगाशी झुंज देत आपले जिवितकर्तव्य पूर्ण केले. डॉ. बाळकृष्णांच्या शिवचरित्राचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते मुख्यतः डच, पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच आदी युरोपियन भाषांमधील संदर्भ व कागदपत्रांवर आधारित आहे. विशेषतः हेग व बटव्हिया येथून डच साधने मिळवून शिवचरित्रात मोलाची भर घालणारे ते पहिले इतिहासकार आहेत. शिवाजी विद्यापीठाची स्थापना आणि शिवचरित्र ही बाळकृष्णांनी पाहिलेली दोन स्वप्ने होती. त्यातील शिवचरित्राचे स्वप्न त्यांच्या हयातीत, तर विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्या मृत्योपरांत साकार झाले.

कार्यक्रमात सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. आर.बी. पाटील, डॉ. एम.ए. लोहार, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. दत्ता मचाले यांच्यासह विविध महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Monday 22 July 2024

विद्यापीठातील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करावे: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. धनंजय सुतार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व गिरीश कुलकर्णी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.




कोल्हापूर, दि. २२ जुलै: शिवाजी विद्यापीठाचा लौकिक हा जागतिक स्तरावर प्रकाशित होणाऱ्या संशोधनाच्या दर्जामुळे सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे संशोधकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये आपले संशोधन प्रकाशित व्हावे, यासाठी दर्जेदार संशोधन करावे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकदिवसीय स्कोपस व निंबस यांविषयी जागरुकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, संशोधनासाठी विविध प्रकारची संदर्भसाधने हाताशी असणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने ग्रंथालये मौलिक भूमिका बजावतात. माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वी संशोधकाला ग्रंथालयांत जाऊन दुर्मिळ आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचे संदर्भग्रंथ, शोधपत्रिका पाहाव्या लागत. त्यांच्या आधारे आवश्यक संदर्भ हाताने उतरून घ्यावे लागत. तथापि, आता आधुनिक काळात सर्व प्रकारचे ई-रिसोर्सेस उपलब्ध आहेत. ग्रंथालये ऑनलाईन झाली आहेत. सर्व संदर्भसाधने ऑनलाईन उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवरील कोणतीही माहिती, पुस्तक, संदर्भ क्षणात मिळविता येते. यामुळे संशोधनाचा दर्जा उंचावणे शक्य झाले आहे. हे दर्जानिश्चितीचे काम स्कोपस आणि निम्बससारखे निर्देशांक करतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून संशोधक आपले संशोधन प्रकाशित करतात, तेव्हा स्कोपसमध्ये त्यांची नोंद होण्याची शक्यता वाढते. गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे सुमारे ९०० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकांतून प्रकाशित झाले. त्यांनी सुमारे दीड लाख सायटेशन्स मिळाले. विद्यापीठाच्या एच-इंडेक्स १३५च्या घरात आहे, जो महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ही कामगिरी उंचावत ठेवण्यासाठी संशोधकांनी प्रयत्नरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठासह देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांचा संशोधकीय वेध घेतला असता भौतिकशास्त्र, मटेरियल सायन्स, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र अशा निवडक विषयांतील संशोधनाची संख्या अत्यधिक असल्याचे जाणवते. त्याचवेळी मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान शाखांकडील विषयांतील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी आहे. मराठीसारख्या विषयांचा अपवाद गृहित धरला तरीही या विद्याशाखांमधील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या दृष्टीने संशोधकांनी आणि विद्यापीठांनीही प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधनासाठी, विशेषतः संदर्भसाधनांच्या उपलब्धतेसाठी शिवाजी विद्यापीठाने भरीव तरतूद केली आहे, त्या साधनांचा संशोधक, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रुपाली भोसले व एस.डी. हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी आभार मानले.

उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात मुंबईच्या ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम टेक्नॉलॉजी (जिस्ट) या कंपनीचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी निम्बसच्या उपयोजनाविषयी, तर नवी दिल्लीच्या एल्सव्हियरच्या कस्टमर कन्सल्टंट ऐश्वर्या नायल यांनी स्कोपसच्या उपयोजनाविषयी उपस्थित संशोधक, विद्यार्थ्यांना अवगत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. एस.व्ही. थोरात, डॉ. वाय.जी. जाधव यांच्यासह ग्रंथालयातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Saturday 20 July 2024

कोणत्याही संस्थेचा चतुर्थश्रेणी कर्मचारी हा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर: मेधा जेरे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. राजन पडवळ, अनिल नागराळे आणि मेधा जेरे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पुण्याच्या लाईफ अॅन्ड सॉफ्ट स्कील प्रशिक्षक मेधा जेरे.


(कार्यशाळेची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २० जुलै: कोणत्याही संस्थेचा, आस्थापनेचा चतुर्थश्रेणी कर्मचारी हा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर (सदिच्छादूत) असतो, ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवून सेवातत्पर राहायला हवे, असे मार्गदर्शन पुणे येथील लाइफ व सॉफ्ट स्कील प्रशिक्षक मेधा जेरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया अध्यासन, गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात नागरी सहकारी बँकांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधील कार्यनैतिकता या विषयावर एकदिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रथम सत्रात श्रीमती जेरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

श्रीमती जेरे यांनी अनेक वस्तुनिष्ठ व अनुभवातून आलेल्या उदाहरणांतून उपस्थित चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या, कर्मचारी कोणत्याही श्रेणीचा असला तरी त्याने आपल्या कामावर निर्व्याज आणि निस्वार्थ प्रेम केले पाहिजे. कर्मनिष्ठा ही महत्त्वाची मानली पाहिजे. आपले कामच आपल्याला समाजात ओळख प्राप्त करून देते. त्यामुळे काम करीत असताना ते कर्मचारी म्हणून कधीही करू नका तर संस्थेचे भागीदार म्हणून करा. आपण ग्राहकाला सेवा देण्यासाठी आहोत, हे तर खरेच; पण, त्या सेवेपलिकडे ग्राहक आपल्या आस्थापनेतून जाताना सोबत येथील अनुभव घेऊन जात असतो. विशेषतः बँकिंग क्षेत्रात येणाऱ्या ग्राहकाची पहिली भेट ही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याशीच होते. त्यामुळे त्याला आपण मनापासून सेवा दिली, त्याच्याशी योग्य सुसंवाद साधला, तर तो कर्मचारी आणि त्याची संस्था या दोघांनाही ग्राहकाच्या हृदयात स्थान मिळते. त्या अर्थाने चतुर्थश्रेणी कर्मचारी हा संस्थेचा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर असतो, ही बाब या कर्मचाऱ्यांसह सर्वच घटकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी नवनवे ज्ञान आत्मसात करण्यास प्राधान्य द्यावे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान सामोरे असताना आपल्या कामाशी, ग्राहकांशी भावनिकदृष्ट्या नाते जोडावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, शिक्षणाचे उपयोजन आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये प्रभावी पद्धतीने कसे करावे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची मोठी गरज आहे. आपल्या भोवतालाच्या आणि विशेषतः कार्यस्थळाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या मनात आपुलकीची भावना आणि जाणीवा असणे फार महत्त्वाचे असते. एखादी संस्था केवळ आपल्याला नोकरी, पगार देत नाही, तर त्यासोबत एक सामाजिक प्रतिष्ठाही प्रदान करीत असते. ही प्रतिष्ठा जपण्याबरोबरच ती वृद्धिंगत करण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे. आपल्या व्यक्तीगत प्रतिष्ठेसोबतच आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढविण्यामध्ये कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते, हे डॉ. शिंदे यांनी उदाहरणे देत स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. राजन पडवळ यांनी स्वागत व परिचय करून दिला, तर कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी प्रास्ताविक केले. दिवसभरात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नागरी सहकारी बँकांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यशाळेस उपस्थित होते.


Monday 15 July 2024

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून जागतिक नागरिक घडविणे आवश्यक - कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

 


कोल्हापूर, दि.15 जुलै -  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत असताना कौशल्यधारक जागतिक नागरिक तयार करण्यासाठी सर्वांच्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

            शिवाजी विद्यापीठाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध विषयांच्या अनुषंगाने राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित केलेल्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या बैठकीस अध्यक्षस्थानावरून उद्बोधीत करताना कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के बोलत होते.  प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

       डॉ.श्रीकृष्ण महाजन, अधिष्ठाता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत माहिती विशद करताना म्हणाले, एनईपीची अंमलबजावणी करणे म्हणजे फक्त ढाचा तयार करणे असे नाही. यामध्ये सगळयात महत्वाचा बदल म्हणजे परिणामाधारित शिक्षण राबविणे आणि त्याद्वारे चॉईस बेसड् क्रेडीट सिस्टीम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे. नाविण्यपूर्ण शैक्षणिक पध्दतींचा अवलंब करून शिक्षकांच्या क्षमता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेेचे आहे. 

             महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागातील अधिकारी आनंद मापुस्कर आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राबाबत मार्गदर्शन करताना म्हणाले, ग्रामपंचायतींच्या ठिकाणी कौशल्य केंद्र असले पाहिजेत यासाठी 511 कौशल्य केंद्रे सुरू केलेली आहेत.  120 महाविद्यालयांपासून ही संख्या सुरू करून हजार महाविद्यालयांपर्यंत हे घेवून जावयाचे आहे.  उच्च शिक्षण हे कौशल्यपूरक असले पाहिजे यासाठी हे विशेष प्रयत्न केले जात आहेत.  राज्य आणि केंद्रीय पातळीवरील कौशल्य विकासाच्या विविध योजना महाविद्यालयस्तरांवर राबविणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय नोंदणी शिबीराचे लवकरच आयोजन केले जाईल.

 याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळ, नवोपक्रम, नवसंशोधन साहचार्य विभागाचे संचालक डॉ.सागर डेळेकर यांनी मार्गदर्शन केले. 

 प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले.  याप्रसंगी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, आजीवन विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांचेसह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयातील महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली संलग्नता विभागाकडून कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.