Wednesday, 18 March 2026

स्वयंसिद्धा उपक्रमातून महिलांचे सामाजिक नेतृत्व घडेल: डॉ. प्रशांत नारनवरे

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे.



शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे. इनसेटमध्ये अवर सचिव विकास कुलकर्णी, तर मंचावर (डावीकडून) डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. अनुराधा पोतदार आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अवर सचिव विकास कुलकर्णी.



शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्वयंसिद्धा नोडल ऑफिसर डॉ. अनुराधा पोतदार.

(स्वयंसिद्धा कार्यशाळेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १८ मार्च: स्वयंसिद्धा उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होऊन सक्षम सामाजिक नेतृत्व निर्माण होईल, असा विश्वास महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठात बेटी बचाव अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि स्वयंसिद्धा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयंसिद्धा, स्त्रीशक्ती पोर्टल आणि आदिशक्ती’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. नारनवरे म्हणाले, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार आणि सक्षमीकरण ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. या त्रिसूत्रीच्या आधारावर महिलांना सक्षम करून त्यांच्यातून नेतृत्व विकसित करण्याची गरज आहे. विशेषतः महिलांचा कार्यबलातील सहभाग वाढविणे ही आजघडीसाठी महत्त्वाची बाब आहे. स्वयंसिद्धा पोर्टल हे केवळ सोशल प्लॅटफॉर्म नसून शैक्षणिक व व्यावसायिक संवादाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थिनींनी व महिलांनी या पोर्टलचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. या प्लॅटफॉर्मद्वारे कौशल्यविकास, प्रशिक्षण, ऑनलाइन कोर्सेस, तसेच उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. तसेच, विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून महिलांची रोजगारक्षमता वाढविण्याबाबत शासन गंभीर आहे. डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्धा उपक्रमाला बळकटी देण्यात येत असून येणाऱ्या काळात या माध्यमातून उद्योजकीय आणि सामाजिक नेतृत्व मोठ्या प्रमाणात तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी लोकभवनचे अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनीही ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, स्वयंसिद्धा व स्त्रीशक्ती पोर्टल हे महिलांसाठी महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ असून यावर जास्तीत जास्त नोंदणी करून सक्रिय सहभाग आवश्यक आहे. केवळ नोंदणी करून न थांबता विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याची नोंद पोर्टलवर करणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या कामाचा डिजिटल ठसा निर्माण होऊन त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेता येतो.

या पोर्टलच्या प्रभावी वापरातून विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो, असे सांगून ते म्हणाले, पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्यविकासाशी संबंधित उपक्रमांचे दस्तऐवजीकरण होऊन विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. शासन निर्णय समजून घेणे, सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेणे आणि विविध योजनांमध्ये योगदान देणे हेही महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग आहे.

कार्यशाळेत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या स्वयंसिद्धा नोडल ऑफिसर डॉ. अनुराधा पोतदार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शिक्षण, कौशल्यविकास आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर यांद्वारे महिलांचे सक्षमीकरण साधता येते, असे सांगताना त्या म्हणाल्या, स्वयंसिद्धाच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भागातील प्रत्येक महिलेला जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पोर्टलवर नोंदणी करून महिलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होता येते. कौशल्याधारित प्रशिक्षण देणे ही काळाची गरज असून विद्यार्थिनींना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. सुकन्या योजना, लखपती दीदी यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या कामी विद्यार्थिनींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य, सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण आणि भारतीय ज्ञान प्रणाली या घटकांवर भर देत असतानाच महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवाज उठवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, आज राज्यात स्वयंसिद्धा पोर्टलवर नोंदणी करण्यात शिवाजी विद्यापीठ अग्रेसर आहे. पण हे अग्रेसरत्व नोंदणीपुरते मर्यादित न राहता महिलांविषयक प्रश्न, अनुभव, समस्या निवारण आदींविषयक चर्चेचे सर्वंकष व्यासपीठ म्हणून पुढे येणे अभिप्रेत आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचा उद्देश सफल होईल. महिला दिनासह अनेक प्रसंगांचे उत्सवीकरण टाळून त्यांचा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी उपयुक्त वापर केला पाहिजे. शिक्षण, स्वास्थ्य, स्वावलंबन, सामाजिक न्याय, संवेदनशीलता आणि समानता या सहा बाबींवरच महिलांचे सक्षमीकरण अवलंबून आहे. त्यामुळे त्या प्रत्येक महिलेला कशा प्रदान करता येतील, यादृष्टीने पोर्टलवर चर्चा घडवून आणत राहणे अगत्याचे आहे.

सुरवातीला प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. बेटी बचाव अभियानाच्या डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. उज्ज्वला बिर्जे, सुप्रिया वडर यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश ब्राह्मणे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह विविध संलग्नित महाविद्यालयांतील स्वयंसिद्धा समन्वयक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tuesday, 17 March 2026

निसर्गाच्या शाळेनं शिकवलं; तेच लोकांना सांगते: बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे

शिवाजी विद्यापीठात दिला माती, जंगल, पर्यावरण वाचविण्याचा संदेश

शिवाजी विद्यापीठात पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना 'पद्मश्री' राहीबाई पोपेरे. मंचावर (डावीकडून) प्रिया देशमुख, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. सुहासिनी पाटील, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. भारती पाटील आणि डॉ. आसावरी जाधव.

शिवाजी विद्यापीठात पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना 'पद्मश्री' राहीबाई पोपेरे.


('पद्मश्री' राहीबाई पोपेरे यांच्या व्याख्यानाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १७ मार्च: मी कोणत्याही शाळेत शिकले नाही, पण निसर्गाच्या शाळेनं मला जगण्याचं खरं शिक्षण दिलं, तेच मी लोकांना सांगत असते, असं अत्यंत प्रांजळपणानं सांगत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्याचे इंगित उलगडले. शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी माती, निसर्ग, जंगल आणि रानभाज्या जपण्याचे महत्त्व अधोरेखित करतानाच मानवी जीवन, शेती आणि पर्यावरण यांच्यातील अतूट नात्याची प्रेरक आणि हृदयस्पर्शी मांडणी केली.

शिवाजी विद्यापीठाचे कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, पर्यावरणशास्त्र अधिविभाग, यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि समाजशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती पोपेरे यांचे देशी बियांचे संवर्धन आणि स्त्रियांची भूमिका या विषयावर विशेष व्याख्यान आज झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. व्याख्यानाला कोल्हापूरसह जिल्ह्यातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या राहीबाई पोपेरे यांनी आपल्या सुमारे तासभराच्या अतिशय ओघवत्या भाषणामध्ये स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष, गरिबी आणि अनुभव यांमधून घेतलेले धडे सांगितले आणि विचार करायला प्रवृत्त केले. त्या म्हणाल्या, निसर्गच आपला खरा गुरु आहे. माती चांगली असेल तर अन्न चांगले येते, अन्न चांगले असेल तर माणूस निरोगी राहतो आणि पुढची पिढी सुदृढ घडते. रासायनिक शेतीमुळे वाढणारे आजार, बदलती जीवनशैली आणि पारंपरिक अन्नधान्यापासून दूर जाण्याचे दुष्परिणाम स्वतःच्या आयुष्यात भोगले. त्यामुळेच देशी वाणांकडे वळले. पूर्वीच्या काळात रानभाज्या, कंदमुळे आणि स्थानिक धान्य खाल्ल्यामुळे लोक दीर्घायुषी आणि निरोगी होते. आज मात्र आपण पैशाने विष खरेदी करून खात आहोत.

राहीबाईंनी पारंपरिक बियाण्यांचे जतन, सेंद्रिय शेती आणि ‘किचन गार्डन’ या संकल्पनांवर विशेष भर दिला. प्रत्येक घरात, प्रत्येक शेतात आणि अगदी शाळांच्या परिसरातही भाजीपाला पिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. दिसायला सुंदर असलेले अन्न नेहमी आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. कमी खा, पण शुद्ध, सात्विक खा, असा संदेश त्यांनी दिला.

जंगल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत त्या म्हणाल्या, जंगल आपली माऊली आहे. जंगल जाळून आपण स्वतःचं नुकसान करतो. त्यात असंख्य जीवांचा जीव जातो. निसर्ग वाचवायचा असेल तर झाडे, रानभाज्या आणि जैवविविधता जपली पाहिजे. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, पारंपरिक बियाण्यांचे महत्त्व आणि स्थानिक अन्नपद्धतीचे वैज्ञानिक मूल्य नव्या पिढीने जाणून ते आचरण्यात आणण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाढदिवस, सण-उत्सव यावेळी झाडे लावणे आणि बियाणे भेटी देणे आदी माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचेही आवाहन केले. यावेळी त्यांनी जंगलातील वणवे रोखण्याचे आवाहन करणारी आणि रानमेव्याचे महत्त्व अधोरेखित करणारी दोन गाणीही म्हटली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे समाधानही केले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी राहीबाई पोपेरे यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. संकरित वाणांचे दुष्परिणाम ओळखणारी आणि त्याच वेळी शुद्ध देशी बीजाचं महत्त्व लक्षात आणून देणारी महिला म्हणजे राहीबाई असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी राहीबाईंच्या कार्याला अभिवादन करतानाच जे कार्य राहीबाई शेतावर करत आहेत, तेच कार्य आपण विद्यापीठातल्या प्रयोगशाळेत करत असल्याबद्दल समाधान वाटत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ज्या त्या भागामध्ये ज्या त्या देशी वाणाचे महत्त्व असते. जे आपल्या परिसरात पिकते, तेच खावे, असे म्हटले जाते. याला कारण तिथली माती असते. एका ठिकाणचे वाण दुसरीकडे नेऊन लावले, तर ते येते; मात्र त्यामध्ये ती चव उतरेलच असे नसते. याला कारण म्हणजे या वनस्पतींच्या मुळाशी विशिष्ट प्रकारचे जीवाणू वाढत असतात. हे जीवाणू त्या विशिष्ट पर्यावरणीय घटकांतच वाढतात. अशा वेळी संबंधित वनस्पती आणि जीवाणू यांचे सहजीवन फुलते. जीवाणू मातीतील आवश्यक घटक वनस्पतीला पुरवितात आणि तिला विशिष्ट चव आणि पोषणमूल्य प्राप्त होते. सर्वच प्रकारच्या रानभाज्यांना हे लागू पडते. दाहशमनार्थ त्या उपयुक्त ठरतात. या अभ्यास व संशोधनासाठीच अॅग्री बायोटेक्नॉलॉजी, मेटाजिनॉमिक्स, सॉईल मायक्रोबायोलॉजी इत्यादी आधुनिक विज्ञानशाखा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून उद्घाटन करण्यात आले. डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. आसावरी जाधव यांनी परिचय करून दिला. ऊर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.

कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, निसर्गमित्र अनिल चौगुले, डॉ. नितीन माळी, प्रिया देशमुख यांच्यासह शिक्षक, शेतकरी महिला, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 13 March 2026

राजकीय व्यवहार विसंगतीवर राज्यशास्त्रीय मंथन व्हावे: डॉ. पी.डी. देवरे

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय चर्चासत्राला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय राज्यशास्त्र चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. पी.डी. देवरे.


शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय राज्यशास्त्र चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. पी.डी. देवरे. मंचावर (डावीकडून) डॉ. टी.एम. पाटील, डॉ. अरुण चव्हाण, डॉ. भारती पाटील, डॉ. रविंद्र भणगे व डॉ. शिरीषकुमार पवार.

डॉ. रविंद्र भणगे यांच्या 'भूराजकारण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील जागतिक व्यवस्था' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. पी.डी. देवरे. सोबत (डावीकडून) डॉ. टी.एम. पाटील, डॉ. अरुण चव्हाण, डॉ. भारती पाटील, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. भणगे व डॉ. शिरीषकुमार पवार.

(राज्यशास्त्र राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन: लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १३ मार्च: राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामध्ये वाढत चाललेली विसंगती समजून घेणे आणि त्यावर नव्या पद्धतीने विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. पी. डी. देवरे यांनी आज येथे केले. ‘राज्यशास्त्रातील नवीन प्रवाहांचे चर्चाविश्व’ या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बीजभाषक म्हणून बोलताना देवरे यांनी बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत विचारप्रवाहांची नवी मांडणी करण्याची गरज अधोरेखित केली.

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आज उद्घाटन झाले. मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. प्राचार्य व्ही.एम. पाटील उद्घाटन समारंभाचे तर डॉ. भारती पाटील बीजभाषण सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. देवरे म्हणाले, विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्राचे सिद्धांत, संकल्पना आणि विचारधारा शिकविल्या जातात; मात्र प्रत्यक्ष राजकारण आणि समाजव्यवहार यामध्ये मोठी तफावत दिसून येते. ही तफावत समजून घेऊन विद्यार्थ्यांना आणि समाजाला वास्तव परिस्थिती समजावून सांगणे ही राज्यशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांची जबाबदारी आहे. विचारसरणींच्या इतिहासात कोणताही विचार कायमस्वरूपी संपत नाही; उलट एका विचारातून दुसरा विचार जन्म घेतो. हेगेलने मांडलेली ‘थिसिस-अँटीथिसिस-सिंथेसिस’ ही प्रक्रिया समाजातील वैचारिक परिवर्तन सातत्याने घडवत राहते, असे त्यांनी नमूद केले.

समाजातील बदल, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि माहितीचा प्रस्फोट यामुळे नव्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगताना डॉ. देवरे म्हणाले, मोबाईल, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या प्रभावामुळे माहिती सहज उपलब्ध झाली असली तरी ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण झाला आहे का, हा प्रश्न आहे. सोशल मीडियाद्वारे कृत्रिम आणि बनावट विचारनिर्मिती होण्याचा धोका वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

विकासाच्या प्रक्रियेतील विसंगतींकडे लक्ष वेधताना डॉ. देवरे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाढत असतानाही समाजातील मोठा वर्ग अद्याप मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहे. भौतिक विकास झाला असला तरी त्याची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कोणतीही विचारसरणी समाजाच्या वास्तव परिस्थितीपासून वेगळी असू शकत नाही. मार्क्सवादाचा प्रभाव जगभर पडला असला तरी प्रत्येक समाजाच्या परिस्थितीनुसार त्यात बदल झाले. भारताच्या संदर्भात शरद पाटील यांनी मार्क्सवादी विचारांसोबत फुले-आंबेडकरांच्या विचारांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

विद्यापीठे आणि महाविद्यालये ही संवादाची केंद्रे म्हणून अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगताना डॉ. देवरे म्हणाले, व्यवस्था आणि विचार यांच्यातील संघर्षातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर नव्या पद्धतीने विचार करणे ही आजच्या राज्यशास्त्रज्ञांची जबाबदारी असून लोकशाहीची वाटचाल समजून घेताना तिच्यातील विसंगती आणि नव्याने उद्भवणारे प्रश्न यावर बौद्धिक नेतृत्वाने मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. समाजातील वैचारिक वारसा जपून त्याला नव्या संदर्भात पुढे नेण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, अन्यथा लोकशाहीची वैचारिक पायाभरणी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

उद्घाटनपर मनोगतात बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख म्हणाले, विकसित भारताचे स्वप्न घेऊन वाटचाल करीत असताना त्या विकासाला मानवी चेहरा देण्याची आपली जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या बळावरच हा विकास शक्य आहे. त्यासाठी राज्यशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय धोरणांचा मिलाफ आवश्यक आहे.

डॉ. भारती पाटील म्हणाल्या, राजकारणाचा सार्वत्रिक आणि सर्वस्तरीय ऱ्हास, नैतिक पतन या पार्श्वभूमीवर राज्यशास्त्रीय संकल्पना मुळातून समजून घेणे आणि त्यांचे सातत्याने अधोरेखन करणे आवश्यक आहे. आदर्श राज्यनिर्मितीसाठी अर्थकारण समजून घेतल्याखेरीज राजकारण समजून घेता येणार नाही. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता माहिती देणारे न होता विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक होऊन त्यांचे ज्ञानवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही.एम पाटील म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा राज्यशास्त्रीय विचारप्रणाली आणि प्रवाह यांच्यावर मोठा प्रभाव पडला आहे. त्या प्रभावांचा आणि प्रवाहांचा वेध घेण्याच्या दृष्टीने सदरचे चर्चासत्र उपयुक्त भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र भणगे यांनी लिहीलेल्या भूराजकारण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील जागतिक व्यवस्था या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सुरवातीला डॉ. भणगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी परिचय करून दिला. डॉ. दत्ता सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी.एम. पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. श्रीराम पवार, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. बाळासाहेब भोसले, डॉ. बी.बी. पाटील, सिकंदर जमादार यांच्यासह परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्राचे अध्यापक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आज दिवसभरात झालेल्या उर्वरित सत्रांपैकी एका सत्रात 'भारतीय राजकीय विचारांची सद्यकालीन प्रस्तुतता' या विषयावर डॉ. अशोक चौसाळकर यांनी मार्गदर्शन केले. तर, पुढील सत्रात डॉ. के. के. उर्फ काशिनाथ कावळेकर स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. जयदेव डोळे यांनी 'सामाजिक चळवळ आणि राजकारण' या विषयावर विचार प्रकट केले.

Monday, 9 March 2026

महिलांना संधीचा अभाव ही गंभीर सामाजिक समस्या: डॉ. जगन्नाथ पाटील

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यशाळेत बीजभाषण करताना डॉ. जगन्नाथ पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. प्रविण पाटील, डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. भारती पाटील, डॉ. विजय चोरमारे आदी.

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यशाळेत बीजभाषण करताना डॉ. जगन्नाथ पाटील. 

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यशाळेत बीजभाषण करताना डॉ. जगन्नाथ पाटील. 


(आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यशाळेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ९ मार्च: शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये मुली सातत्याने अव्वल येत असतानाही उच्च शिक्षण, संशोधन आणि कामकाजाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या पातळीवर त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी दिसते. ही संधीच्या अभावाची परिस्थिती समाजातील आर्थिक प्राधान्यक्रम, पितृसत्ताक मानसिकता आणि संस्थात्मक अडथळ्यांमुळे निर्माण झालेली गंभीर सामाजिक समस्या आहे, असे प्रतिपादन जागतिक ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाओ अभियान, श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन, केंद्रीय तक्रार निवारण समिती आणि शिक्षणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बीजभाषक म्हणून ते बोलत होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, दहावी-बारावीच्या निकालांमध्ये मुली मोठ्या प्रमाणात अव्वल येतात. अनेक विद्यापीठांतील सुवर्णपदकेही मुलींनाच मिळतात; मात्र काही वर्षांनंतर या प्रतिभावान मुली उच्च शिक्षण, संशोधन किंवा व्यावसायिक क्षेत्रात फारशा दिसत नाहीत. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांची संख्या कमी होत जाण्याच्या या प्रक्रियेला जगभरात ‘लिकी पाइपलाइन’ असे संबोधले जाते. कुटुंबातील आर्थिक निर्णयांमध्ये मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे, ग्रामीण भागात मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याबाबतचा संकोच, तसेच विवाह आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांच्या करिअरमध्ये येणारा खंड ही या समस्येची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक स्तरावरील अभ्यासांचा उल्लेख करताना डॉ. पाटील म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेताना मुलींचे प्रमाण चांगले असले तरी संशोधन आणि नेतृत्वाच्या पदांवर त्यांची उपस्थिती कमी आहे. महिलांना समान संधी दिल्यास देशाच्या आर्थिक वाढीतही मोठी भर पडू शकते. या समस्येवर उपाय म्हणून उच्च शिक्षणासाठी मुलींना अधिक शिष्यवृत्ती, कार्यक्षेत्रात लवचिक कामकाज पद्धती, बालसंगोपनासाठी आवश्यक सुविधा, तसेच शिक्षण व प्रशासनातील महत्त्वाच्या पदांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याची गरज आहे. समाजातील मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत, मुलींच्या शिक्षणाला व करिअरला प्राधान्य दिल्यास देशाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात पदवी घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या गेल्या दशकभरात सातत्याने ५० टक्क्यांहून अधिक राहिली आहे. तथापि, पुढील कारकीर्दीमध्ये त्यांचे प्रमाण तितके राहात नाही, हे चिंताजनक आहे. त्यासाठी महिला समानतेची आणि सक्षमीकरणाची सुरवात ही घरापासून होणे अत्यावश्यक आहे.

सुदृढ समाजासाठी महिलांना त्यांचे न्याय्य हक्क प्रदान करणे आवश्यक असल्याचे सांगताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, समतेच्या संदेशाचे सार्वत्रिकीकरण होत नाही, तोवर सुदृढ समाज घडणार नाही. स्त्रियांप्रती आदर असलेल्या समाजाचीच भरभराट होत असते. म्हणूनच महिला दिवस हा उत्सवीकरणाचा नव्हे, तर सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण कुठवर पोहोचलो आहोत, याचे पुनरावलोकन करीत पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा आहे, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.

उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात पुणे येथील जेएसपीएम विद्यापीठाच्या डॉ. ज्योती शिंदे, शहाजी लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. प्रविण पाटील आणि ज्येष्ठ संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी मार्गदर्शन केले.

स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चेतना सोनकांबळे यांनी आभार मानले. यावेळी मंचावर डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. प्रतिभा देसाई होत्या. कार्यक्रमास विविध अधिविभागांतील शिक्षिका, संशोधक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Friday, 6 March 2026

पोर्ट्रेट, लँडस्केप चित्रकलेविषयी शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रा. अभिजीत कांबळे


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व्यक्तीचित्रणाचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रा. अभिजीत कांबळे

शिवाजी विद्यापीठातील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेअंतर्गत अधिविभागात असे भव्य भित्तीचित्र रेखाटले.

शिवाजी विद्यापीठात चित्रकला कार्यशाळेप्रसंगी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई, प्रा. अभिजीत कांबळे, बबन माने आणि विजय उपाध्ये यांच्यासमवेत  सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी.

(चित्रकला कार्यशाळेची लघुचित्रफीत)




कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे दोनदिवसीय चित्रकला कार्यशाळा आज उत्साहात पार पडली. कार्यशाळेचा विषय “पोर्ट्रेट, लँडस्केप अँड कॉम्पोझिशन” असा होता. दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध चित्रकार प्रा. अभिजीत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतील बारकावे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगत मार्गदर्शन केले.

संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे सभागृह आणि परिसरात कार्यशाळा झाली. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पोर्ट्रेट, लँडस्केप तसेच चित्ररचनेतील संतुलन, रंगसंगती आणि मांडणी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारची चित्रे साकारली. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या भिंतीवर चित्रकला पदविकेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले भित्तीचित्र पाहून उपस्थित रसिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यासोबत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात पोर्ट्रेट, निसर्गचित्रे आणि विविध संकल्पनांवर आधारित चित्रांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना उपस्थित कला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करण्यात आले.

अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बबन माने, विजय उपाध्ये यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. कार्यशाळेसाठी प्राचार्य अजेय दळवी, डॉ. मानसिंग टाकळे, चित्रकार विजय टिपुगडे, संग्राम भालकर, सुदर्शन वंडकर, गजानन वाघमारे यांच्यासह अधिविभागातील शिक्षक, चित्रकला शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. 

समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची

कर्नाटक, तमिळनाडूतील सेवाभावी संस्थांना भेट

कर्नाटक राज्य आदिवासी संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

बंगळुरू येथील ओअॅसिस इंडिया या संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.


कोल्हापूर, दि. ६ मार्च: समाजकार्याच्या अभ्यासामध्ये सैद्धांतिकतेबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभवालाही मोठे महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक आणि तमिळनाडूतील काही महत्त्वाच्या सामाजिक, सेवाभावी संस्थांना भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली.

शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच कर्नाटकातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, बंगळुरू, अॅसिस इंडिया, कॅडबॅम्स हॉस्पिटल, अक्षयपात्रा फाऊंडेशन, स्टंप शूल अँड सोमप्पा स्प्रिंग्ज प्रा. लि., बंगळुरू, राणे ग्रुप, मैसुरू, आदिवासी संशोधन केंद्र, मैसुरू इत्यादी रुग्णालये, उद्योग समूह आणि स्थानिक सेवाभावी संस्थांना भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची माहिती घेतली. या अभ्यास सहलीत एकूण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समाजकार्य अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर, डॉ. उर्मिला दशवंत आणि सौरभ धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल पार पडली.

या अभ्यास सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना वर्गात शिकविल्या जाणाऱ्या सैद्धांतिक संकल्पनांचा प्रत्यक्ष क्षेत्रात अनुभव देणे, विविध सामाजिक संस्थांची कार्यपद्धती समजून घेणे आणि समाजकार्याच्या विविध क्षेत्रांतील संधींबाबत व्यापक दृष्टीकोन निर्माण करणे हा होता. मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, पुनर्वसन, पोषण, आदिवासी विकास, समुदाय संघटन आणि शाश्वत विकास या विविध क्षेत्रांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.

बंगळुरूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस येथे विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सेवा, आधुनिक निदान पद्धती आणि बहुविद्याशाखीय उपचार प्रणालीचा अभ्यास केला. समाजकार्य विभागातील अधिकाऱ्यांनी मानसोपचार प्रक्रियेत समाजकार्यकर्त्यांची भूमिका, कुटुंब समुपदेशन, पुनर्वसन आणि समुदाय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रमांची माहिती दिली. अॅसिस इंडिया संस्थेला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांनी बेघर, व्यसनाधीन व्यक्ती आणि रस्त्यावरच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन कार्यक्रमांची माहिती घेतली. तर, कॅडबॅम्स हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती उपचार, समुपदेशन आणि दीर्घकालीन पुनर्वसन प्रक्रियेबाबत जाणून घेतले. बंगळुरूमधील अक्षयपात्रा फाउंडेशन येथे विद्यार्थ्यांनी शालेय मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीतील अत्याधुनिक स्वयंपाकगृह, गुणवत्ता नियंत्रण आणि वितरण व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास केला. म्हैसूर येथील आदिवासी संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती, परंपरा आणि विकास धोरणांविषयी माहिती मिळाली. याशिवाय, मनुष्यबळ विकास शिकणाऱ्या स्टंप शूल अँड सोमप्पा स्प्रिंग्ज प्रा. लि., बंगळुरू आणि राणे ग्रुप, मैसुरू येथे औद्योगिक व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया आणि मानव संसाधन विकासाच्या पद्धतींचा अभ्यास केला. उटी येथे विद्यार्थ्यांनी स्थानिक समुदाय व स्वयंसहायता गटांशी संवाद साधून शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांविषयी माहिती घेतली.