Monday, 25 May 2026

डॉ.के.आर.यादव यांच्या निधनामुळे बहुआयामी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड - कुलगुरू डॉ.राजनीश कामत

 

कोल्हापूर, दि.25 मे - शिवाजी विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरू डॉ.के.आर.यादव यांच्या निधनामुळे बहुआयामी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केले.


      विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये प्रथम प्र-कुलगुरू डॉ.के.आर.यादव यांच्या दु:खद निधनामुळे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

          कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, डॉ.के.आर.यादव यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले. कडक शिस्तीचे, उत्कृष्ट अध्यापक, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून डॉ.यादव यांचे नांवलौकिक होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नॅशनल सायन्स कौंग्रेसशी निगडीत असताना त्यांनी अग्रेसर पध्दीने कामे केली. शिवाजी विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर त्यांनी सदस्य आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर यांनी लावलेली शिस्त ते पुढे घेवून गेले.

प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव शोकभावना व्यक्त करताना म्हणाल्या, विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरू डॉ.के.आर.यादव यांनी न्यू-कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असताना लावलेल्या कडक शिस्तीमुळे कॉलेजचे नांव पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार आदराने घेतले जात होते. त्यांच्या शिस्तीतच आम्ही सर्व विद्यार्थी घडलो.

       याप्रसंगी समाजशास्त्र अधिविभागाचे डॉ.प्रल्हाद माने, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे शरद तळेकर, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे नंदकुमार झांजगे यांनी शोकभावना व्यक्त केले.

            शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

-----

 

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी

डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती

ठरल्या पहिल्या महिला प्र-कुलगुरू; प्रभारी अधिष्ठात्यांच्याही नियुक्त्या

शिवाजी विद्यापीठाच्या नूतन प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचे नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

(प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्तीनंतर पहिली प्रतिक्रिया)


कोल्हापूर, दि. २५ मे: शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज जाहीर केले. डॉ. जाधव या शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्रभारी प्र-कुलगुरू होत्या. त्या आज शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्र-कुलगुरू ठरल्या आहेत.

कुलगुरू डॉ. कामत यांनी डॉ. जाधव यांना आज दुपारी कुलगुरू कार्यालयात नियुक्तीचे पत्र प्रदान केले तसेच पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. या संदर्भात कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, डॉ. ज्योती जाधव यांचे शैक्षणिक आणि संशोधकीय योगदान उच्च दर्जाचे आहे. त्यांच्या या अनुभवाचा लाभ शिवाजी विद्यापीठाला निश्चितपणे होईल, याची खात्री वाटते. त्यांच्या रुपाने एक करवीरकन्या शिवाजी विद्यापीठाची पहिली महिला प्र-कुलगुरू होत आहे, याचा आनंद वाटतो.

त्याचप्रमाणे कुलगुरूंनी आज सर्व विद्याशाखांच्या प्रभारी अधिष्ठाता यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये डॉ. राजाराम गुरव (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), डॉ. महादेव देशमुख (मानव्यविज्ञान विद्याशाखा), डॉ. वर्षा मैंदर्गी (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) आणि डॉ. अजय साळी (आंतरविद्याशाखा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांवर भर: डॉ. ज्योती जाधव

शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती केल्याबद्दल डॉ. ज्योती जाधव यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना लर्नर टू अर्नर बनविणारे शिक्षण देणे, विद्यापीठातील संशोधनाला जागतिक ओळख प्राप्त करून देणे आणि सामाजिक बांधिलकी जपत असतानाच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अभिनव उपक्रम राबविणे या त्रिसूत्रीवर काम करीत विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्याचा मानस डॉ. जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

 

शाश्वत विकासात ई-कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठात 'मिशन लाईफ कॅम्पेन'अंतर्गत ई-कचरा संकलनाला प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. कविता वड्राळे, डॉ. कबीर खराडे, डॉ. मुरली भानारकर, डॉ. पवन गायकवाड, आनंद खामकर, अविनाश भाले आदी.


शिवाजी विद्यापीठात 'मिशन लाईफ कॅम्पेन'अंतर्गत ई-कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे व अन्य अधिकारी, शिक्षक व कर्मचारी.



शिवाजी विद्यापीठात 'मिशन लाईफ कॅम्पेन'अंतर्गत ई-कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. विलास शिंदे,  डॉ. मुरली भानारकर, डॉ. पवन गायकवाड, आनंद खामकर, अविनाश भाले आदी.

(मिशन लाईफ कॅम्पेन उद्घाटनाचा व्हिडिओ)


शिवाजी विद्यापीठात मिशन लाईफ कॅम्पेनला प्रारंभ

कोल्हापूर, दि. २५ मे: जागतिक शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सुसंगत ई-कचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन लाईफ कॅम्पेनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल आदी वाढत्या सुखसोयीच्या साधनांमुळे ई-कचऱ्याचे प्रमाणही जागतिक स्तरावर वाढत आहे. या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. त्यासाठी योग्य मार्ग काढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जनमानसात ई-कचरा व्यवस्थापनविषयक प्रचार व प्रसार व्हावा, त्याचे महत्त्व समजावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने हे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये ई-कचऱ्याच्या संकलनासह त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा समावेश आहे. लोकांनीही आवश्यकता असल्याविना इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल आदी वस्तूंची खरेदी करणे टाळावे, त्याचप्रमाणे नादुरुस्त किंवा खराब झालेल्या वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, ई-कचऱ्याचे वाढते प्रमाण मानवासह पर्यावरणासाठीही घातक आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये अनेक दुर्मिळ मूलद्रव्ये वापरली जातात. त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास ही मूलद्रव्ये अस्तंगत होतील. त्यामुळे ई-कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या मूलद्रव्यांचा पुनर्वापर कसा होईल, या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.

यावेळी कुलगुरू डॉ. कामत आणि कुलसचिव डॉ. शिंदे यांच्या हस्ते ई-कचऱ्याचे संकलन टाकीमध्ये संकलित करण्यात आला. तसेच, या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण संवर्धन आणि ई-कचरा या विषयावरील ऑनलाईन पोस्टर प्रदर्शनाचेही कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी स्वागत केले. अविनाश भाले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. पवन गायकवाड, आनंद खामकर, आशिष घाटे,  दिनेश उथळे, शरद पाटील, डॉ. कविता वड्राळे, डॉ. किशोर खिलारे, शरद पाटील, उदय पोवार, माऊली पांढरे, संतोष वंगार, विनोद लोखंडे आदी उपस्थित होते.

Friday, 22 May 2026

कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्याकडून महामानवांना अभिवादन

 

दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

राजर्षी शाहू समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.




कोल्हापूर, दि. २२ मे: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज रुजू झालेल्या दिवशी कोल्हापूर शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ केला.

डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार आज स्वीकारला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. ऐतिहासिक बिंदू चौक येथील हुतात्मा स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे पुतळे येथे पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींचा पुतळा, दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा यांनाही अभिवादन केले. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळाला भेट देऊन तेथे महाराजांच्या समाधीस्थळासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. अखेरीस कावळा नाका येथील करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या पुतळ्यालाही त्यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.


मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध; शिवाजी विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वागत समारंभात बोलताना नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वागत समारंभात बोलताना नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. अजितसिंह जाधव आणि डॉ. सुहासिनी पाटील.

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचा स्वागतपर सत्कार करताना वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. अजितसिंह जाधव आणि डॉ. सुहासिनी पाटील.



(कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या स्वागत समारंभाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २२ मे: ज्या शिवाजी विद्यापीठाने मला घडवले, त्या मातृसंस्थेचे ऋण फेडणे ही आता माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे. विद्यापीठाला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अधिक सक्षम, तंत्रज्ञानाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करू, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. कामत यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा वारणा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. कामत यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या प्रशिक्षणामुळेच विविध ठिकाणी काम करताना आव्हानात्मक परिस्थितीतही यशस्वीपणे कार्य करता आले. होमी भाभा राज्य विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह इतर विद्यापीठांमध्ये काम करताना तंत्रज्ञानाधारित प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रिसर्जंट एआय, डिजिटल प्रणाली आणि परिणामकारक व्यवस्थापन यांच्या साहाय्याने अनेक प्रश्न सोडवता आले.

विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, प्लेसमेंट आणि ब्रँडिंग या बाबींवर विशेष भर देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे अभ्यासक्रम, रोजगारक्षम शिक्षण आणि आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. बी.एस्सी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, आयओटी, स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांसारखे अभ्यासक्रम काळाची गरज आहेत. विद्यापीठाने बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत पावले उचलली पाहिजेत.

नॅक मूल्यांकन, एनआयआरएफ क्रमवारी आणि जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या निकषांचा उल्लेख करताना त्यांनी आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली. विद्यापीठाने ‘एस्टॅब्लिश्ड’ स्तरावरून ‘नॅशनल’ आणि ‘ग्लोबल’ स्तराकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. प्लेसमेंट, संशोधन, उद्योग सहकार्य आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवाजी विद्यापीठाला महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक समावेशकता, ज्ञान, संशोधन आणि समाजाभिमुख शिक्षण यांचा समन्वय साधण्याची भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी नॅक मूल्यांकनाच्या आगामी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्रितपणे परिश्रम घेण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, हायड्रोजन इंधन संशोधन आणि आधुनिक प्रयोगशाळा उभारणी यांवरही आगामी काळात भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वागतासाठी येणे टाळण्याचे आवाहन

सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाचा उल्लेख करत डॉ. कामत यांनी स्वागतासाठी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले. “फोन, ई-मेल किंवा शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केलेले प्रेमही तितकेच महत्त्वाचे आहे. इंधन, वेळ आणि राष्ट्रीय संसाधनांची बचत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे अभिनंदन करताना म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक म्हणून विविध स्तरांवर कार्य केलेली व्यक्ती आज या विद्यापीठाचे नेतृत्व स्वीकारत आहे, हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आपल्यापेक्षा अधिक सक्षम आणि व्यापक अनुभव असलेले नेतृत्व मिळणे आवश्यक असते. तसे नेतृत्व शिवाजी विद्यापीठाला डॉ. कामत यांच्या रुपाने मिळाल्याचा आनंद वाटतो. डॉ. कामत यांनी इतर विद्यापीठांमध्ये काम केल्यामुळे व्यापक शैक्षणिक जगाचा त्यांचा परिचय आहे आणि त्या अनुभवाचा फायदा ते मातृसंस्थेला निश्चितपणे मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. शिर्के यांनी डॉ. कामत यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करताना नॅक मूल्यांकन, सायबर सिक्युरिटी, संगणक केंद्र आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून दिले. “जिथे प्रश्न तिथे कामत सर” अशी त्यांची ओळख असल्याचे सांगत त्यांनी, अत्यंत बारकाईने, संयमाने आणि रात्रंदिवस परिश्रम घेऊन काम पूर्ण करण्याची त्यांची वृत्ती विद्यापीठासाठी मोठी ताकद ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात नॅक, एनआयआरएफ, क्यूएस आणि टीएचईसारख्या राष्ट्रीय व जागतिक मानांकनांमध्ये विद्यापीठाची प्रगती वाढविण्यासाठी अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. जी.बी. कोळेकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. सागर डेळेकर, प्रा. शंकरराव कुलकर्णी, डॉ. डी.आर. मोरे, डॉ. निखिल गायकवाड, तेजस्विनी गोरनाळे, धैर्यशील यादव, माजी कुलगुरू प्रा. एस.एच. पवार आणि नाथाजी शिंदे यांनी स्वागतपर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन नंदिनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी केले, तर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी आभार मानले.

यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विद्यापीठातील अनेक माजी व विद्यमान पदाधिकारी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी

शिवाजी विद्यापीठाचे ‘सूकाणू’ घेतले हाती

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला.

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे आदी.




शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी विद्यापीठ प्रांगणात दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश केला.


शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज इलेक्ट्रीक वाहन स्वतः चालवित विद्यापीठाच्या प्रांगणातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

 
(नूतन कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेला बाईट)


कोल्हापूर, दि. २२ मे: शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी मावळत्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कामत कुटुंबिय उपस्थित होते.

डॉ. कामत यांनी आज सकाळी कुलगुरू निवासस्थानापासून विद्यापीठाच्या प्रांगणामधील सर्व प्रवास इलेक्ट्रीक वाहनातून केला. विशेष म्हणजे या वाहनाचे सुकाणू त्यांनी स्वतःच हाती घेतले होते. त्यांच्यासोबत पत्नी, मुलगी आणि आत्या यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. डॉ. कामत यांनी  विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले.  डॉ. आप्पासाहेब पवार, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांनाही त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्रवेश केला. कुलगुरू दालनामध्ये प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडून त्यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.

यानंतर लगेचच व्यवस्थापन परिषद सभागृहात प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांचा औपचारिक निरोप समारंभ झाला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्यासह विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि आंतरविद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय साळी यांनाही निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. शिंदे यांनी केले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातृसंस्थेच्या ऋणातून उतराई होण्याची संधी: कुलगुरू डॉ. कामत

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळणे ही माझ्यासाठी मातृसंस्थेचे ऋण काही अंशी का होईना फेडून त्या ऋणातून उतराई होण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी सदोदित प्रयत्नशील राहीन. ही संधी दिल्याबद्दल राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील सर्व सहकारी मला या कामी तत्परतेने मदत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. कामत यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठातील कामाची शिस्त कौतुकास्पद: डॉ. गोसावी

शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय शिस्त ही वाखाणण्याइतकी चोख आहे. वरती अधिकारी कोणीही असला तरी इथला प्रत्येक सहकारी त्याला नेमून दिलेले काम मन लावून करीत असतो. आवश्यक तेथे सूचना देण्यापलिकडे त्यांना वेगळे काही सांगावे लागत नाही. शिवाजी विद्यापीठातील ही कार्यप्रणाली कौतुकास्पद स्वरुपाची आहे. त्यामुळे येथील प्रभारी कुलगुरू पदाचा कालखंड खूप चांगला पार पडला, असे मावळते प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी निरोप समारंभात सांगितले.

संधी दिल्याबद्दल कृतज्ञ: डॉ. ज्योती जाधव

केवळ शिक्षण आणि संशोधन यापलिकडे न पाहणाऱ्या माझ्यासारख्या एका प्राध्यापकाला प्रशासकीय काम करण्याची संधी देऊन शिवाजी विद्यापीठाची पहिली महिला प्रभारी प्र-कुलगुरू होण्याचा मान दिल्याबद्दल मावळत्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी डॉ. गोसावी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या काळात खूप काही प्रशासकीय बाबी शिकून घेता आल्या, असेही त्यांनी सांगितले.