Friday 29 November 2019

‘तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण’ ग्रंथाचे उत्साही प्रकाशन

मराठी भाषा घडविण्यात तुकारामांचे योगदान मोलाचे: डॉ. सदानंद मोरे



शिवाजी विद्यापीठात 'तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण' या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. राजन गवस, डॉ. मोरे, निरुपणकार मारुती जाधव-तळाशीकर गुरूजी, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे. 

कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: मराठी भाषा घडविण्यामध्ये संत तुकाराम यांचे मोलाचे योगदान आहे. तुकारामांमुळेच मराठी भाषेचे सौंदर्य महाराष्ट्राच्या घराघरांत आणि मनामनांत वास करते आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन आज डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. वारकरी भक्ती संप्रदायाच्या अनुयायांची लक्षणीय उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रा. राजन गवस, गाथेचे निरुपणकार मारुती भाऊसाहेब जाधव तथा तळाशीकर गुरूजी, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधील भाषेचे सौंदर्य अमर्याद आहे. त्यांनी मराठी भाषेला कितीतरी नवनवीन शब्दांची देणगी दिलेली आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांची भाषा इतकी सामर्थ्यशाली आहे की, तुकाराम गाथेचा समावेश मराठी भाषेच्या बीजग्रंथांमध्ये करण्यात आलेला आहे. मराठी भाषेत वेदांताचा अर्त सर्वप्रथम तुकारामांनीच सांगितला. हे अभंग एकीकडे समजायला जितके सोपे, तितकेच आशयात्मकदृष्ट्या गहनही आहेत. संत बहिणाबाईंनी त्यांच्या अभंगांना तुकाराम वेद असे नाव दिले, इतकी ताकद त्या अभंगांमध्ये आहे. तुकारामांचे हे अभंग सर्वसामान्य बहुजननांपर्यंत, वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्या. रानडे, प्रा. भांडारकर यांच्यापासून अनेकांनी प्रयत्न व कार्य केले. त्यांच्या पंक्तीमध्ये तळाशीकर गुरूजी जाऊन बसले आहेत. गुरूजींनी आशयसूत्रे लक्षात घेऊन या अभंगांचे अत्यंत चिकित्सकपणे आणि सर्वसामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून वर्गीकरण केले आहे, हे या गाथा निरुपण ग्रंथाचे मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
संत तुकाराम आणि कोल्हापूर यांचा जवळचा संबंध असल्याचे सांगताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले, औरंगाबादजवळच्या सिऊर या गावामध्ये बहिणाबाई नावाची मुलगी जन्मली. भावकीमध्ये काही कारणाने वाद होऊन तिच्या कुटुंबियांनी घर, गाव सोडले. फिरत फिरत ते कोल्हापुरी येऊन दाखल झाले. काही वर्षे ते येथे होते. त्यावेळी येथे साताऱ्याच्या जयरामस्वामी वडगावकर यांची कीर्तने सुरू होती. ते आपल्या कीर्तनांत तुकारामांचे अभंग सादर करीत. बहिणाबाईंना जणू त्या अभंगांचे वेड लागले. त्यांनी तुकारामांना गुरू करायचे ठरविले. सुरवातीला नाराज असणाऱ्या पतीचेही मन त्यांनी वळविले आणि अखेरीस देहू येथे तुकारामांच्या दर्शनाला पोहोचल्या. तेथे त्यांना तुकारामांचा गुरुपदेश आणि सहवास लाभला. त्या पुढे संत बहिणाबाई झाल्या. कोल्हापूरमध्ये त्या काळी तुकारामांचे अभंग बहिणाबाईंच्या कानी आले नसते, तर हा इतिहास होऊ शकला नसता. त्यामुळे तुकारामांच्या एक महत्त्वाच्या शिष्या कोल्हापूरमध्ये घडल्या, हे लक्षात घ्यावे लागेल.
विद्यापीठांनी स्थानिक परंपरा, कला, संस्कृती जोपासना व संवर्धनाच्या कामी योगदान देणे ही बाब महत्त्वाची आहेच; पण विद्यापीठांत त्यासाठी कार्यरत असणाऱ्या अध्यासनांना लोकाश्रय प्रदान करणे ही स्थानिक जनतेचीही जबाबदारी आहे, असे मतही डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.. असे आदराने म्हटले जात असल्याचे सांगून अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या विस्ताराचा अत्यंत व्यापक स्वरुपाचा पाया रचला, हे जितके खरे; तितकेच तुकारामांनी या भाषेला अधिक बहुप्रसवी बनविताना सहजसोपेपणाचे, बोली भाषेचे, संवादाच्या प्रवाहीपणाचे आयामही दिले. त्यांच्या साडेचार हजारांहून अधिक असणाऱ्या या गाथेमधील आशयसूत्रे आणि विषयसूत्रांचा साकल्याने विचार केला असता, अभ्यास केला असता असे दिसून येते की, मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाला तुकारामांनी आपला परीसस्पर्श केला आहे. मानवी मूल्यांना शब्दरुप प्रदान करताना तुकाराम मानवी जीवनमूल्ये इतक्या स्पष्ट आणि निःसंदिग्धपणाने प्रकट करतात की, त्यामधून खऱ्या अर्थाने विश्वरुपदर्शन घडावे. जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची शिदोरी तुकारामांनी आपल्या अभंगांमधून खुली केली आहे. हे ज्ञान माणसाचे जगणे सहजसोपे आणि नितांतसुंदर बनविणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे पुढे म्हणाले, तुकारामांच्या गाथेतील अभंगांची भाषा व्यवहाराची, साधीसोपी असली तरी, ती सतराव्या शतकातील आहे. आज या भाषेतील अनेक शब्द व्यवहारातून गेले आहेत. त्यामुळे या अभंगांची उकल करून घेताना भाषेच्या पातळीवर काही प्रश्न संभवतात. शिवाय, तुकारामांचे सारेच अभंग बहुअर्थप्रसवी असल्याने अर्थाची उकल ही जीवनानुभवाच्या क्षमतेवर अवलंबून असते. वाचक जीवनाचा किती सखोल विचार करीत असतो, त्याच्या चिंतनाला जीवनाकलनाचे किती आयाम आहेत, यावर अभंगांचे अर्थनिर्णयन होत असते. त्यामुळे संपूर्ण गाथेत येणारे अनेकविध विषय आणि विचारांची व्यापकता अभ्यासकांना नेहमीच आव्हानात्मक वाटत आली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, भक्तीमार्ग आणि संत परंपरेत तुकारामांचे कार्य पथदर्शक स्वरुपाचे आहे. आपल्या काव्यातून त्यांनी मानवी जीवनाविषयी व्यक्त केलेली अपार आस्था आणि भाकलेली करूणा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडविते. सुमारे साडेतीनशेहून अधिक वर्षे तुकारामांच्या अभंगांचा सर्व स्तरांतील मराठी जीवनावर व्यापक प्रभाव आहे. प्रत्येक काळात तो अधोरेखित करणे हे विद्यापीठांसारख्या संस्थांचे कर्तव्य आहे. म्हणूनच शिवाजी विद्यापीठाच्या वतीने या गाथेचे प्रकाशन करणे हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे.
यावेळी मारुती जाधव गुरूजी म्हणाले, संत तुकाराम अध्यासनाच्या रुपाने शिवाजी विद्यापीठाने तुकारामांचे एक लोकाभिमुख प्रभावी स्मारक उभे केले आहे. त्यातही एखाद्या संताच्या अभंगांचा ग्रंथ प्रकाशित करणारेही हे एकमेव विद्यापीठ आहे. ही गाथा प्रकाशित करून विद्यापीठाने माझा व्यक्तीगत सन्मान तर वाढविलाच, पण वारकरी समाजासाठीही भरीव योगदान दिले आहे. येथून पुडेही संतांचे कार्य जगासमोर आणण्याचे काम विद्यापीठाने सुरू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संत तुकाराम यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तळाशी ग्रामस्थांच्या वतीने मारुती जाधव गुरूजींसह मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला.  डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत तर प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

विद्यापीठाने अनुभवली वारकऱ्यांची प्रचंड उपस्थिती
या प्रकाशन सोहळ्यासाठी दुपारपासूनच वारकरी संप्रदायातील नागरिकांची मोठी रीघ विद्यापीठाकडे लागली होती. गाड्या भरभरून लोकांचे आगमन होत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहाने वारकऱ्यांची अभूतपूर्व गर्दी आज पाहिली. सभागृहात पाऊल ठेवण्यासही जागा नव्हती. विद्यापीठाच्या वतीने सभागृहाबाहेरील लॉन परिसरात एलईडी स्क्रीन उभारून कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे सर्वच उपस्थितांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला.

ग्रंथ खरेदीलाही मोठा प्रतिसाद
तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण हा द्विखंडात्मक ग्रंथ सुमारे १८००हून अधिक पृष्ठांचा आहे. बाजारभावानुसार त्यांची किंमत तीन हजारांहून अधिक होते. तथापि, सर्वसामान्य वाचकांना डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाने ८७० रुपये इतक्या सवलतीच्या दरात हा ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध केला. त्यामुळे उपस्थितांचा त्याच्या खरेदीलाही मोठा उत्साही प्रतिसाद लाभला.  

Monday 25 November 2019

बाबासाहेबांकडून संविधानाच्या निर्मितीमधून गुलामगिरीचे जोखड भिरकावून देण्याचे कार्य: डॉ. श्यामसुंदर मिरजकर


शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. श्यामसुंदर मिरजकर. व्यासपीठावर डॉ. श्रीकृष्ण महाजन.

कोल्हापूर, २५ नोव्हेंबर: भारतीय संविधानाची निर्मिती करून भारतातल्या कनिष्ठ समजल्या गेलेल्या समाजाच्या मानेवर पारंपरिक व्यवस्थेने लादलेले गुलामगिरीचे जोखड भिरकावून देऊन नष्ट करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने संविधान दिनानिमित्त “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.
डॉ. मिरजकर म्हणाले, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे व्यापक दृष्टीने पाहिले पाहिजे. भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतामध्ये धर्मसूत्रे आणि मनुस्मृतीने निर्माण केलेल्या नियमांमध्ये भारतीय समाजव्यवस्थेमधील शासन, प्रशासन कसे चालेल, याची मांडणी केली होती. भारतीय समाजावर वैदिक परंपराचा पगडा तत्कालीन शासन व्यवस्थेवर दिसून येत होता. ती व्यवस्था गुलामीची होती. भारतीय संविधानाच्या निर्मितीमधून ही गुलामगिरी डॉ. आंबेडकर यांनी नष्ट केली. ब्रिटीश साम्राज्यात सुद्धा बाबासाहेबांनी विविध समित्या, गोलमेज परिषदा आदींच्या माध्यमातून समता, सामाजिक न्याय आणि बंधुत्व या मूलभूत मानवी मूल्यांची आग्रही मांडणी केलेली दिसते. भारतीय संविधानाने जनसामान्यांना प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांमुळे त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थी, शिक्षकांनी आपापल्या विषयासंदर्भातील भारतीय संविधानाच्या योगदानाचे संशोधन केले पाहिजे. आपण संविधान आत्मीयतेने समजावून घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, आपण आता सांविधानिक नितीमत्ता, सांविधानिक भाषा आणि संविधानातील आशय, तत्त्वज्ञान व व्यवहार यांच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन काम करावे लागणार आहे. भोवताली ज्या काही असंविधानिक गोष्टी घडत असतील, तेथे प्रखर भूमिका घेणे काळाची गरज आहे.
अविनाश भाले यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले, तर आभार तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. या व्याख्यानास डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. ए.बी. कांबळे, डॉ. के.डी. सोनवणे, डॉ. रामोत्रा, डॉ. पवनकुमार गायकवाड, कास्ट्राईब संघटनेचे आनंद खामकर, कुमार कांबळे यांच्यासह विविध अधिविभागांतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सलमान काकतीकर, सचिन देठे, सुशांत पंडित, विक्रम कांबळे यांनी परिश्रम घेतले.

Thursday 21 November 2019

१७ वी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा (साखळी फेरी: तिसरा दिवस):

शिवाजी विद्यापीठाची विजयी वाटचाल कायम

आयरेकर, वरुटेची एकाच डावात हॅटट्रीक;

पुणे, अकोला, राहुरी, पटियाळा, रोहटक संघांचेही विजय

नांदेडच्या संघाविरुद्ध एक जोरदार फटका मारताना शिवाजी विद्यापीठाचे कप्तान सागर पवार.


शिवाजी विद्यापीठाचे हॅटट्रीकवीर अजय आयरेकर व विश्वनाथ वरुटे

कोल्हापूर, दि. २१ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत यजमान शिवाजी विद्यापीठ संघाने आज तिसऱ्या दिवशीही आपली विजयी वाटचाल सुरू राखली. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ९ गडी राखून पराभव केला. विद्यापीठाचे अजय आयरेकर आणि विश्वनाथ वरुटे यांच्या एकाच सामन्यातील दोन हॅटट्रीकची चर्चा दिवसभर होत राहिली. अन्य सामन्यांत पुणे, अकोला, राहुरीसह पटियाळा, रोहटक या विद्यापीठांनी विजय मिळविले.
आज सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठ आणि नांदेड विद्यापीठ यांच्यातील सामना अक्षरशः एकतर्फी स्वरुपाचा झाला. आजचा दिवस विद्यापीठाच्या गोलंदाजांनी गाजविला. नाणेफेक जिंकून शिवाजी विद्यापीठाने नांदेड संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. नांदेड संघाला अवघ्या १२.१ षटकांत ७० धावांत गुंडाळण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संघाला यश आले. यामध्ये अजय आयरेकर यांनी चार षटकांत २७ धावांत हॅटट्रीकसह ४ बळी टिपण्याची कामगिरी बजावली. त्यानंतर विश्वनाथ वरुटे यानेही हॅटट्रीक नोंदविली. योगेश दळवी यांनी २ तर रमेश ढोणुक्षे यांनी १ बळी मिळविला. ७० धावांचे हे आव्हान कप्तान सागर पवार यांनी राजेश कोळी आणि विनायक शिंदे यांच्या साथीने ८.१ षटकांतच गाठले. अजय आयरेकर यांना सामनावीर घोषित करण्यात आले.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर यांच्या दरम्यानचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. अकोला विद्यापीठाच्या १२३ धावांचा पाठलाग करताना सुरिंदर कुमावत यांनी ४८ धावांची खेळी केली. कुमावत पायचीत झाल्यानंतर अजमेर संघाचा कोसळणारा डाव संदीप चक्रवर्ती यांनी सावरण्याचा प्रयत्न करीत ३१ धावांची महत्त्वाची खेळी केली. मात्र अखेरीस तीन धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अकोल्याकडून ५५ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या अनुज राऊत याला सामनावीर घोषित करण्यात आले.
दुपारच्या सत्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्यातील सामनाही असाच चुरशीचा झाला. नागपूर विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आणि राहुरीच्या संघाला १७.४ षटकांत ११८ धावांत तंबूत धाडले. नागपूरच्या दीपक घोडमारे यांनी ३ तर रितेश पुरकम यांनी २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर विद्यापीठाचा संघ २० षटकांत ७ बाद १११ धावाच करू शकला. अवघ्या ७ धावांनी त्यांना पराभूत व्हावे लागले. आठव्या क्रमांकावर खेळण्यास येऊन ३९ धावांची उपयुक्त खेळी उभारण्यासह ३ बळी टिपण्याची कामगिरी करणारा राहुरीचा सतपाल गायकवाड सामनावीर ठरला.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज आपल्या विजयाचे खाते उघडले. जम्मूच्या शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाविरोधात खेळताना पुण्याच्या संघाने २० षटकांत ७ बाद १४६ धावा केल्या. पुण्याच्या विनोद नरके (५१) आणि मनिष गायकवाड (५४) यांनी अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावसंख्येस आकार दिला. प्रत्युत्तरादाखल शेर-ए-काश्मीर विद्यापीठाचा संघ २० षटकांत ८ बाद १३६ धावाच करू शकला. पुणे संघ ११ धावांनी विजयी झाला. धडाकेबाज ५१ धावांची खेळी आणि २४ धावांत ३ बळी अशी कामगिरी बजावणारा पुण्याचा विनोद नरके सामनावीर ठरला.
मुंबई विद्यापीठाला मात्र पटियाळाच्या बपंजाबी विद्यापीठाकडून २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाबी विद्यापीठाने मुंबईसमोर १६१ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युतरादाखल खेळताना मुंबई विद्यापीठाचा संघ २० षटकांत ८ बाद १३४ इतकीच धावसंख्या उभारू शकला. मुंबईच्या सिद्धेश चव्हाण याने नाबाद ७४ धावा करीत विजयासाठी एकाकी झुंज दिली. पंजाबी विद्यापीठाकडून ४७ धावा काढून १७ धावांत २ बळी घेणाऱ्या गुरुप्रीत सिंग याला सामनावीर घोषित करण्यात आले.
दुपारच्या सत्रातला सिमला विद्यापीठ, सिमला आणि महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहटक यांच्यातील सामनाही रोमहर्षक ठरला. सिमला विद्यापीठाने प्रथम फलंदाजी करताना रोहटकसमोर ८ बाद १२८ धावांचे आव्हान ठेवले. नरेंद्र कुमारच्या ३८ आणि गौरव कुमारच्या ४३ धावांच्या बळावर रोहटकच्या संघाने हे आव्हान लीलया गाठले. ३८ धावांसह १ बळी घेणारा रोहटकचा नरेंद्र कुमार सामनावीर ठरला.

उद्याचे सामने:
सकाळचे सत्र (स. ८.३० वा.):
·         शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि. लाला लजपतराय पशुविज्ञान विद्यापीठ, हिस्सार
·         जम्मू विद्यापीठ, जम्मू वि. पंजाबी विद्यापीठ, पतियाळा
·         मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर
दुपारचे सत्र (दु. १ वा.):
·         पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना वि. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
·         शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मू वि. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
·         पंजाब विद्यापीठ, चंदिगढ वि. हिमाचल प्रदेश विद्यापीठ, सिमला


डिजीटल व्यवहारांमध्ये पायाभूत सुविधांद्वारे बळकटी आणण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील - आरबीआयच्या सहाय्यक महाव्यवस्थापक अरूंधती सिन्हा


                                                                                


                                                                                                          
कोल्हापूर, दि.21 नोव्हेंबर - आज, कागदोपत्री व्यवहार कमी होवून डीजीटल पेमेंट, कार्ड पेमेंट या बरोबरच मोबाईल बैंकींगच्या मागणीमध्ये मोठयाप्रमाणात झालेली वाढ ही ग्राहकांच्या मागणीबरोबरच काळाची गरज बनलेली आहे.त्यामुळे आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  यासाठी आरबीआय एक सुरक्षित प्रणाली तयार करीत आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बैंक ऑफ इंडीया विभागीय कार्यालय मुंबई येथील सहाय्यक महाव्यवस्थापक अरूंधती सिन्हा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बैंक ऑफ इंडीया अध्यासन आणि रिझर्व्ह बैंक ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने 'ई-पेमेंट सायबर घोटाळे' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये करण्यात आलेे.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सिन्हा बोलत होत्या.  विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी होते.  यावेळी आरबीआय मुंबई येथील विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक अंकुर सिंग, बैंक ऑफ इंडिया कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
               अरूंधती सिन्हा पुढे म्हणाल्या, नव्या तंत्र प्रगत बैंकींग व्यवस्थेचा पेमेंट हा भाग असून त्याबाबत जनजागृती करण्याचे काम रिझर्व्ह बैंकेने हाती घेतले आहे.  यासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार केला असून सुरक्षित, खात्रीशीर, परवडणारी देय प्रणाली करीत असताना खर्च घट, स्पर्धावाढ, सोईस्करता विश्वसनीयता हे चार महत्वाचे घटक आहेत.  ग्राहकांना जलदगतीने, सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी ई-पेमेंटची व्यापकता वाढविण्याचे काम सुरू आहेे.  पुढील काळात अद्यावत तंत्रज्ञानामुळे बैंकींग आणि वित्त क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत.  मागील पंधरा वर्षात मोबाईल बैंकींग नव्हते.  आपल्या देशामध्ये आर्थिक व्यवहार करीत असताना ओटीपीद्वारे प्रमाणिकरण करण्याच्या पध्दती अवलंबल्या जात आहेत.   देशभर ही एक अद्वितीय प्रणाली विकसित होत आहे.  बाहेरील देशांमध्ये आर्थिक व्यवहार करताना ही प्रणाली अवलंबली जात नाही. ते आपल्याकडून शिकून अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरक्षित आर्थिक व्यवहारांमध्ये जलदता आणण्यासाठी संपूर्ण बैंकींग उद्योगांसह अन्य पेमेंट सिस्टम ऑपरेटर्संनाही या प्रणालीबाबत सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.  रोख आर्थिक व्यवहार कमी करून डिजीटल व्यवहारांकडे जनसामान्यांचा कल वाढविण्याची प्रक्रीया दीर्घकालीन असली तरी त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. बैंकींग क्षेत्रामधील पेमेंट पध्दती ही अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण कणा आहे. डिजीटील व्यवहारांसाठी लोकपाल सुरक्षा पध्दती चांगल्या प्रकारे कार्यान्वीत झालेली आहे.  अनेक तरूणांना या क्षेत्रामधील नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. 
             आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, सायबर गुन्हयांकडे गंभीरतेने सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे.  इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये बैंकींग व्यवहारामध्ये काही चुकीच्या आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत.  त्यासाठी बैंक, वित्त आणि ऑनलाईन डीजीटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.  ग्राहाकांनीही कोणत्याही प्रकारच्या अमिशाला बळी पडता जागृकतेने व्यवहार केले पाहिजेत.
           या प्रसंगी बैंक ऑफ इंडिया कोल्हापूर, लिड बॅॅंकचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.तळुले डी.सी. यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या बैंक ऑफ इंडीया चेअर इन रूरल बैंकींगचे समन्वयक डॉ.व्ही.बी.ककडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले.  याप्रंसगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ.पाटील, अनिल पाटील यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठयाप्रमाणात उपस्थित होते.
-----