Saturday 18 July 2020

शिवाजी विद्यापीठाचे कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन

‘व्हायरस कवच’ फॅब्रिक स्प्रेची निर्मिती

कोरोना विषाणूला ९९ टक्क्यांहून अधिक निष्क्रिय करण्याची क्षमता


शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्सतर्फे संशोधित 'व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे' कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर करताना इकोसायन्स इनोव्हेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर. सोबत (डावीकडून) डॉ. किरणकुमार शर्मा, डॉ. पी.एस. पाटील, अजय म्हेतर व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.
 
शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्सतर्फे संशोधित 'व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे'ची बाटली कुतुहलाने पाहताना प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर. 


कोल्हापूर, दि. १८ जुलै: संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोविड-१९ अर्थात कोरोना या विषाणूला निष्क्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक संशोधन येथील शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांनी केले आहे. येथे संशोधित करण्यात आलेल्या व्हायरस कवच या फॅब्रिक स्प्रे (कपड्यांवर मारावयाचा फवारा) तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरससह अन्य अनेक घातक विषाणूंना निष्क्रिय करणे शक्य होणार आहे. ही माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज येथे दिली.

विद्यापीठात आज सकाळी नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे संशोधक डॉ. किरणकुमार शर्मा यांच्यासह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी कुलगुरू डॉ. करमळकर व कुलसचिव डॉविलास नांदवडेकर यांना भेटून या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन व उत्पादनाबद्दल माहिती दिली. व्हायरस कवच तंत्रज्ञानाच्या प्रभावाने कोविड-१९ विषाणू ९९.९९ टक्क्यांपेक्षाही अधिक निष्क्रिय झाल्याचे आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आढळल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे संशोधक प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी.एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

काय आहे संशोधन?


व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञान हे वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे आहे. हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे. वाळल्यानंतर पुढे तो कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे ते काम करते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा त्यावर हे फवारले की झाले. यामध्ये केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिडची संयुगे आहेत, जी अजिबात विषारी नाहीत, तर पर्यावरणपूरक आहेत, असा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सी- ‘USEPA’ ने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे.

काय आढळले चाचण्यांत?

व्हायरस कवचया उत्पादनाच्या देशासह जगातील आघाडीच्या प्रयोगशाळांत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विविध घातक विषाणूंना निष्क्रिय करण्याच्या त्याच्या गुणधर्मावर शिक्कामोर्तब झाले आहे. याचे अँटिमायक्रोबायल गुणधर्म तपासण्यासाठी व्हायरस कवच फवारलेल्या कपड्याच्या पृष्ठभागावर ग्राम-पॉझिटिव्ह प्रकारांतील (स्टॅफिलोकोकस ऑरेयस) आणि ग्राम-निगेटिव्ह प्रकारांतील (इशेरिषिया कोलाय) जीवाणूंचा सुमारे १५ मिनिटे संपर्क आला असता ती ९९.९९ टक्क्यांहूनही अधिक निष्क्रिय झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे या स्प्रेच्या अँटिव्हायरल गुणधर्मांची तपासणी अमेरिकेतील बायोसेफ्टी लेव्हल-४ प्रयोगशाळेत करण्यात आली. या ठिकाणी व्हायरस कवचफवारलेल्या कपड्यांवर सार्स-कोव्ह-२ हा कोविड-१९ साथीला जबाबदार असलेला विषाणू सुद्धा ९९.९९ टक्क्यांहून अधिक निष्क्रिय झाल्याचे आढळून आले. अमेरिकेतील बी.एस.एल.-४ ही प्रयोगशाळा फॅब्रिक अॅनालिसिसमध्ये जगातल्या आघाडीच्या सहा लॅबपैकी एक असून तेथील निष्कर्ष जगभरात मान्य केले जातात.

कशी होणार उपलब्धता?

व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे हा लवकरच सर्व महत्त्वाच्या औषध दुकानांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. याची किंमत २५० मि.ली. बाटलीसाठी रु. २७० तर ५०० मि.ली. साठी रु. ४९५ इतकी असणार आहे. सध्या पुण्यातील इकोसायन्सच्या प्रकल्पाची सुमारे ५००० बाटल्या प्रतिदिन इतकी उत्पादन क्षमता आहे.

विद्यापीठाच्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाचे मोलाचे संशोधन

शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागामध्ये गतवर्षी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) अंतर्गत प्राप्त निधीमधून सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्स सुरू करण्यात आले. नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक कपड्यांच्या निर्मितीसाठीचे संशोधन या ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा त्यामागे आहे. केंद्राने पहिल्याच दणक्यात साऱ्या जगाची डोकेदुखी असणाऱ्या कोविड-१९ या विषाणूला निष्क्रिय करणाऱ्या संयुगाची निर्मिती करून प्रभावी कामगिरी करून दाखविली आहे. व्हायरस कवच संयुगाच्या संशोधनाने भारत सरकारच्या निती आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या स्पर्धेत पहिल्या पाच अभिनव संशोधनांत स्थान मिळविले होते. या संशोधनाला मूर्त स्वरुप देऊन समाजापर्यंत आणण्यासाठी इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.


शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती देणारे संशोधन: कुलगुरू डॉ. करमळकर

कोविड-१९ साथीला आटोक्यात आणण्याबरोबरच या कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठीचे संशोधन साऱ्या जगभरात सुरू आहे. प्रत्येक समाजघटक आपापल्या परीने त्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात तर या विषाणूने कहर मांडला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स विभागातील प्रा. कििरणकुमार शर्मा यांनी व्हायरस कवच या संयुगाची निर्मिती करून आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती दिली आहे. त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढले.

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, सार्स-कोव्ह-२ हा विषाणू एखाद्या पृष्ठभागावर सात सात दिवस राहू शकतो. इतका दीर्घकाळ टिकून राहण्याचा चिवटपणा असल्यामुळे त्याच्या स्पर्शातून संसर्गाची शक्यताही अधिक असते. यामध्ये आपल्या शरीरावरील कपड्यांचा वाटाही मोठा असू शकतो. आज कोरोना विषाणूच्या सामाजिक संसर्गाची साखळी तोडणे हेच आपल्यासमोरील प्रमुख आव्हान आहे. अशा वेळी व्हायरस कवच तंत्रज्ञानामुळे ती साखळी तोडण्याचे एक सक्षम अस्त्र आपल्या हाती आले आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील डॉ. किरणकुमार शर्मा यांच्यासह इकोसायन्स इनोव्हेशनमधील सर्व तंत्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत.


No comments:

Post a Comment