Tuesday 11 May 2021

विद्यापीठात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त

रामन स्पेक्ट्रोमीटरचे ऑनलाईन प्रशिक्षण


कोल्हापूर, दि. ११ मे: शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त सुविधा केंद्रातर्फे (कॉमन फॅसिलिटी सेंटर) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त रामन स्पेक्ट्रोमीटर वापराबाबत विशेष ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. 

रामन स्पेक्ट्रोमीटर हे पदार्थ विश्लेषणात्मक अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. अधिविभागातील संशोधक विद्यार्थ्यांना याविषयी सखोल ज्ञान मिळावे याउद्देशाने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाअंतर्गत रेनिशॉ युके सेल्स लिमिटेडचे अभियंते युवराज पाटील यांनी बेंगलोर येथून संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवराज पाटील यांनी उपकरणाची रचना, कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, पदार्थविज्ञान अभ्यासाच्या दृष्टीने उपकरण अधिक प्रभावीपणे कसे वापरता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ व अधिविभाग बंद असताना विद्यार्थ्यांची संशोधकीय मानसिकता विचलित होऊ नये, यासाठी अशा सहज आणि मूलभूत उपक्रमांचे महत्त्व ओळखत विद्यापीठाने आयोजन केल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले. या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि  सोलापूर येथील विद्यार्थ्यांनीही घेतला. या प्रशिक्षणाचे आयोजन सीएफसी विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी केले.

भारताचे तीन महत्त्वाचे विज्ञान दिवस

भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रामन इफेक्टचा शोध लावला. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ३० ऑक्टोबर १९०९ हा भारताचे आण्विक शिल्पकार डॉ. होमी भाभा यांचा जन्मदिवस. तसेच, डॉ कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे १९९८ रोजी पोखरण येथे भारताने दुसरी अणुचाचणी यशस्वी केली. भारताच्या वैज्ञानिक वाटचालीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा या तीन घटनांच्या सन्मानार्थ देशभरात २८ फेब्रुवारी रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिवस', ३० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय 'शास्त्रज्ञ दिवस' तर ११ मे रोजी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा केला जातो.


शिवाजी विद्यापीठाच्या इनक्युबेशन केंद्रास

राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘उदयोन्मुख’ दर्जा

५० लाख रुपयांचा निधी मंजूर






कोल्हापूर, दि. ११ मे: शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिसला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून उदयोन्मुख केंद्राचा दर्जा प्राप्त झाला असून त्याअंतर्गत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती केंद्राचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख यांनी दिली आहे.

डॉ. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून राज्यातील विद्यापीठातील नवोपक्रम केंद्रांच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. संस्थेच्या आढावा बैठकीमध्ये विविध विद्यापीठांचे बिगिनर्स (प्राथमिक), इमर्जिंग (उदयोन्मुख) आणि लीडर (नेतृत्वकर्ता) अशी विभागणी करण्यात आली असून त्यामध्ये उदयोन्मुख प्रकारात शिवाजी विद्यापीठाच्या केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.

याअंतर्गत शिवाजी विद्यापीठास दोन टप्प्यात मिळून एकूण ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ३५ लाखांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. याअंतर्गत नवीन स्टार्टअप उपक्रमांची सुरवात, विविध कार्यक्रम, कार्यशाळा, हॅकेथॉन इत्यादी उपक्रमांचे आयोजन, नवीन सहकार्य संधींचे विकसन, नवीन मेंटॉर्सना प्रशिक्षण, रोजगार निर्मितीस प्रोत्साहन आणि स्टार्टअप्सना बाह्य संस्थांकडून निधीप्राप्तीस प्रोत्साहन इत्यादी उपक्रम केंद्राकडून राबविण्यात येणार आहेत.

शिवाजी विद्यापीठास महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून लाभलेल्या दर्जाबद्दल कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिस स्थापन करण्यामागे विद्यापीठ परिक्षेत्रातील ग्रामीण भागातील नवकल्पना निर्माण करणाऱ्या, काही वेगळ्या संकल्पनांवर काम करू इच्छिणाऱ्या युवकांना, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. राज्य नवोपक्रम संस्थेकडून प्राप्त झालेला दर्जा आणि निधी यामुळे अशा नवसंकल्पनांना लॅब टू लँड अँड टू मार्केट असे मूर्त स्वरुप देणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने नजीकच्या काळात नवोपक्रम विकास व प्रोत्साहनाचे नियोजन केंद्रामार्फत करण्यात येईल.

Saturday 1 May 2021

‘महाराष्ट्र दिन विशेष’ मुलाखत:

महाराष्ट्राकडून सदैव देशाचे ज्ञाननेतृत्व: डॉ. प्रकाश पवार

 

डॉ. प्रकाश पवार

('महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा' या मुलाखतीची ध्वनीचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १ मे: महाराष्ट्राने सदैव देशाचे ज्ञाननेतृत्व केले आहे. देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तरेतून जातो, असे म्हटले जाते; मात्र, देशाच्या ज्ञानाचा महामार्ग हा आजही महाराष्ट्रातूनच जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता या युट्यूब वाहिनीला महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा या विषयावर दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली.

डॉ. प्रकाश पवार म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत महाराष्ट्राने सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्वगुणांची छाप पाडली आहे. तथापि, केंद्रीय स्तरावर महाराष्ट्रातील नेतृत्व मोठ्या प्रमाणावर दिसत नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तरेकडे उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, जम्मू-काश्मीर आदी मोठी राज्ये आहेत. त्यांच्या लोकसभेतील जागा अधिक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास उत्तर ही मागास तर दक्षिण ही प्रगत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेकडे अनेक चळवळी उदयास आल्या. त्यांनी देशाला सामाजिक, सांस्कृतिक चेहरा देण्याचे काम केले. म्हणजे एकीकडे केंद्रीय सत्तेचा मार्ग उत्तरेतून जात असला तरी अंतिमतः ज्ञानाचा मार्ग मात्र महाराष्ट्रातूनच जातो. आजही हे नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. प्रसंगी आपली विचारसरणी बाजूला ठेवून मानवी जीवनातील समस्या सोडविण्यासाठी धावून जाण्याची वृत्ती आजही महाराष्ट्राच्या नेतृत्वात आहे. कोरोनाच्या काळातला लॉकडाऊनचा पॅटर्न महाराष्ट्राने देशाला दिला. केरळ पॅटर्न हा कमी घनतेच्या प्रदेशासाठी होता; मात्र, लोकसंख्येची दाटी असलेल्या बड्या शहरांमध्ये संसर्ग आटोक्यात आणण्याचा पॅटर्न महाराष्ट्र देऊ पाहतो आहे. तो केंद्राने व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून निरपेक्ष भावनेने स्वीकारण्याची गरज आहे.

डॉ. पवार पुढे म्हणाले, केवळ राज्यांतर्गतच नव्हे; तर देशपातळीवरील राज्य-प्रांताशी महाराष्ट्राचे दृढ सांस्कृतिक बंध ऐतिहासिक काळापासून निर्माण झालेले आहेत. येथील समृद्धीमुळे येथे बहुभाषिक, बहुसांस्कृतिकतेचा विकास या भूमीत झाला आहे. त्यातून येथे एक वैचारिक, सांस्कृतिक प्रगल्भता निर्माण झाली आहे. राजकारणनिरपेक्ष भाषिक, सांस्कृतिक सलोख्याचे दर्शन येथे त्यामुळेच घडते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्य करण्याचे, त्यांचे निर्णय त्यांच्या पातळीवर घेण्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्याची आजघडीला मोठी गरज असल्याचे सांगून डॉ. पवार म्हणालेबळवंतराय मेहता, वसंतराव नाईक आदींच्या प्रयत्नांमुळे सन १९६२ ते १९७०च्या कालखंडात केंद्र, राज्य, प्रांत ही राजकारणाची केंद्रे होती, तर स्थानिक स्वराज्य संस्था या जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील निर्णय घेणाऱ्या व्यवस्था होत्या. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे आमच्या गावात, आमचेच सरकार ही भावना सर्वदूर दृढमूल झालेली होती. मात्र, काळाच्या ओघात या संस्था निधी वाटप करणाऱ्या मध्यस्थ यंत्रणा बनून राहिल्या आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढून पुनश्च स्वतंत्रपणे काम करण्याची, निर्णय घेण्याची संधी मिळावी, ही महाराष्ट्राच्या ६१व्या वर्धापन दिनाची मागणी आहे. ती पूर्ण करण्याची आज गरज आहे.

महाराष्ट्र विविध क्षेत्रांत प्रगतीपथावर असला तरी संसाधनांच्या उपलब्धतेसह भौगोलिक, शैक्षणिक, औद्योगिक आदी स्वरुपाच्या अनेक विषमताही येथे आहेत. त्यामुळे निर्माण होणारी सामाजिक विषमतेची दरी सांधली तर या प्रगतीची दिशा अधिक उज्ज्वल असणार आहे. त्या दिशेने घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची महाराष्ट्राला खरी गरज आहे, असेही ते म्हणाले.

ही सविस्तर मुलाखत शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता या युट्यूब वाहिनीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.


कोरोना काळात शासन निर्देशांचे काटेकोर पालन करावे: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

(कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या शुभसंदेशाची चित्रफीत)


कोल्हापूर, दि. १ मे: कोरोना साथीच्या कठीण प्रसंगात विद्यापीठाशी संबंधित सर्वच घटकांनी शासनामार्फत वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे ऑनलाईन पद्धतीने बोलताना केले. 

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सकाळी आठ वाजता सर्व संबंधित घटकांना विद्यापीठाच्या शिव वार्ता या युट्यूब वाहिनीद्वारे संबोधित केले आणि ६१व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापनदिन साधेपणाने करण्याबाबत तसेच जिल्हास्तरावर एकाच ठिकाणी शासकीय ध्वजवंदन करण्यात यावे, असे निर्देश जारी केले आहेत. यामुळे शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे दरवर्षी सकाळी आठ वाजता होणारा ध्वजवंदन समारंभ यंदा स्थगित केला. त्याऐवजी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी ऑनलाईन स्वरुपात शुभेच्छा दिल्या.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाने २२ मार्चपासून ऑनलाईन स्वरुपात परीक्षा घेण्यास सुरवात केली आहे. विद्यार्थी त्यांना सामोरे जात आहेत. याउपरही ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे ऑनलाईन परीक्षा देता येऊ शकत नसेल, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोना साथीचे वातावरण निवळण्यानंतर ऑफलाईन स्वरुपात घेण्यात येईल. सद्यस्थितीत मात्र सर्वांनी शासन व प्रशासन यंत्रणांना कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करून पूर्णपणे सहकार्य करावे.