Thursday 31 May 2018

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची

कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये निवड


डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ओंकार गुरवचे यश

Omkar Gurav
कोल्हापूर, दि. ३१: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या एकात्मिक लष्करी सेवा (कम्बाईड डिफेन्स सर्व्हिस) परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या ओंकार अनंत गुरव याने यश मिळविले असून त्याची लष्करी सेवेत निवड झाली आहे. ओंकारचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील हसुरसासगिरी असून सध्या विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) सन २०१७ मध्ये देशपातळीवर परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झालेल्या पहिल्या शंभर उमेदवारांची डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी (आयएमए) येथे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत ओंकार याने ९७वे स्थान मिळवून आयएमएमध्ये आपले स्थान पक्के केले. डेहराडून येथील दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ओंकार गुरव भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू होईल. 
ओंकारचे प्राथमिक शिक्षण पिंपरी येथील जयहिंद विद्यालय आणि एसएनबीपी स्कूलमध्ये झाले आहे. ओंकारची आई माधवी गुरव स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुण्यातील शाखेमध्ये व्यवस्थापक पदावर, तर वडील डॉ. अनंत गुरव दैनिकसामनामध्ये उपसंपादकपदी कार्यरत आहेत.

ओंकारची कामगिरी अभिमानास्पद: कुलगुरू डॉ. शिंदे
ओंकार गुरव याने अभियांत्रिकीचा अभ्यास करत असतानाच सीडीएस परीक्षेत यश मिळविले आहे. ही त्याची कामगिरी अत्यंत अभिमानास्पद असून विद्यापीठासह सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. राज्य सेवा आणि केंद्रीय सेवा परीक्षांच्या पलिकडेही विविध क्षेत्रांत तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध असून त्यांचा शोध आणि वेध घेण्याची गरज आहे. तसे केल्यास यश निश्चितपणे मिळते, हेच ओंकार याच्या यशातून अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.

Saturday 26 May 2018

बृहत आराखडा शैक्षणिक विकासाच्या वाटचालीचा आरसा - कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.देवानंद शिंदेव्यासपीठावर (डावीकडून) डॉ.मिलींद सोहानी, प्राचार्य अनिल राव, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, विद्यापीठाचे   माजी कुलगुरू डॉ.एन.जे.पवारडॉ.बी.एन.जगताप, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील.
कोल्हापूर, दि.26 मे - बृहत आराखडा शैक्षणिक विकासाच्या वाटचालीचा आरसा असतो. निश्चितपणे हे लक्ष आराखडयामध्ये प्रतिबिंबीत झाले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ यांचेकरिता  शैक्षणिक वर्ष सन 2019-20 ते 2023-24 या कालावधीचा पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन करताना कुलगुरु डॉ.शिंदे बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, विद्यापीठाचे माजी कुलगुरू महाराष्ट्र शासन नियुक्त बृहत आराखडा समिती सदस्य डॉ.एन.जे.पवार यांचेसह डॉ.बी.एन.जगताप, प्राचार्य अनिल राव, डॉ.मिलींद सोहानी, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील उपस्थित होते.
कुलगुरु डॉ.शिंदे पुढे म्हणाले, आजची कार्यशाळा बृहत आराखडाच्याबाबतीत जागृकता आणि कृती यांचे समन्वय करणारी ठरणार आहे.  कृतीशील आराखडा तयार करण्यासाठी निश्चितपणे मार्गदर्शन लाभणार आहे  महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाने पाच वर्षांकरिता बृहत आराखडा तयार करावयाचा आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे मान्यता मिळविण्याचा आहे, असे त्याचे स्वरूा आहे.  या ब्रहत आराखडयामध्ये मान्यताप्राप्त संस्था, विविध विद्याशाखा यांचा आंतर्भाव आहे.  जागतिक दर्जाची विद्यापीठे आपल्याकडे येत आहेत ओघाने स्पर्धात्मक स्वरूपात वाढ होणार आहे.  त्याअनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर येत आहे. बृहत आराखडा सर्व समावेशक होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने जिल्हानिहाय समिती निर्माण केलेल्या आहेत.  यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, लोकप्रतिनिधी, जिल्हा उद्योग प्रतिनिधी, अधिकार मंडळांचे सदस्य या सर्वांची समावेशक भूमिका घेवून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
 विद्यापीठ क्षेत्रातील भौगोलीक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ, शिक्षणामध्ये होणारे बदल या सर्वांचा विचार होवून विद्यापीठाचा विद्यार्थी स्पर्धेमध्ये कोठेही कमी पडणार नाही, याची काळजी घेतली आहे.कला शाखेमध्येे गुन्हेगारांचा अभ्यास, प्रशासन, अनुवाद, संरक्षण या क्षेत्रांना भविष्यामध्ये फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे.  अभियांत्रिकी शाखेपेक्षा वाणिज्य शाखेकडे मुलांचा कल वाढत आहे.  त्यासाठी काही नवीन विषय पुढे येत आहेत.  मोठया उद्योगांसाठी आवश्यक असलेले महत्वाचे विषय घेण्याचा विचार होत आहे.  शास्त्रशाखेमध्ये बीएससी इकॉनॉमिक्स हा विषय घेवून येत आहोत.  म्युझियालॉजी, बीएससी रिसर्च मॅनेजमेंट हे विषय पुढे येत आहेत.  शासन नियुक्त समितीमुळे महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये बृहत आराखडा तयार करण्यासंदर्भात सुसूत्रता निर्माण होत आहे.
 यावेळी, पुढील पाच वर्षांकरिता विद्यापीठाच्या विकासाचा दृृष्टीकोन कसा असावा याचे विस्तृत मार्गदशर्न माजी कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांनी केले.
 प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी स्वागत प्रास्ताविक केले.अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, अधिष्ठाता डॉ.ए.एम.गुरव, अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील यांचेसह शिवाजी विद्यापीठ सोलापूर विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, संस्था चालक, विविध अधिकार मंडळांचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                              
                                                       

Saturday 19 May 2018

शिवाजी विद्यापीठाच्या रोजगार महामेळाव्यात साडेपाच हजारांहून अधिक उमेदवारांना रोजगार


कोल्हापूर, दि. १९ मे: शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि मध्यवर्ती रोजगार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार व कौशल्य महामेळाव्यात आज दिवसभरात एकूण १७ हजार २६९ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून ३९३६ उमेदवारांना विविध कंपन्यांनी पुढील फेरीसाठी निवडले (शॉर्टलिस्ट) आहे, तर १६९८ उमेदवारांना ऑफर लेटर अगर नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. ही माहिती समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी दिली.
विद्यापीठात सुमारे १२२ कंपन्यांनी विविध ९,५३९ पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. एकूण २३ हजार ७३९ उमेदवारांनी या मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. त्यांच्यापैकी १७ हजार २६९ उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यातून या निवडी करण्यात आल्या आहेत. लोककला केंद्रात ६५०० उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षणही प्रदान करण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे डॉ. गजानन राशिनकर, महाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक विजय माळी, अशोक खेडेकर, सांगलीच्या कौशल्य विकास केंद्राचे सहायक संचालक एस.के. माळी, सातारा केंद्राचे सचिन जाधव, ऑपॉर्च्युनिटी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे अमर संकपाळ, सोलमॅन आयटी सर्व्हिसेसचे विजय कुमार व राजेंद्र मुधाळे यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिविभागांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि सेवक यांनी परिश्रम घेतले.