Friday, 5 June 2026

लोकनेते देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही: मंत्री शंभूराज देसाई

शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री शंभूराज देसाई. सोबत कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री शंभूराज देसाई.

शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री शंभूराज देसाई. सोबत कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह उपस्थित अधिकारी

शिवाजी विद्यापीठात मंत्री शंभूराज देसाई यांचे पर्यावरण दिनानिमित्त रोप देऊन स्वागत करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

(लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या उपक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री श्री. देसाई यांनी आज शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात झाले. त्यांचे व्यक्तीमत्त्व आणि जीवनकार्य याविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, या दृष्टीने विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान वीस महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा, व्याख्याने इत्यादींचे व्यापक पातळीवर आयोजन करावे. ग्रामीण, शहरी अशा सर्वच स्तरांतील युवकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचाही सुयोग्य वापर करावा. त्याखेरीज विद्यापीठाने लोकनेते देसाई दालनाचा प्रस्ताव तयार करून सत्वर शासनाकडे पाठवावा. त्याचप्रमाणे आवश्यक पदांचा प्रस्तावही द्यावा. या अध्यासनाच्या रचनात्मक कार्यासाठी शासन निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही.

यावेळी कुलगुरू डॉ. कामत यांनी, लोकनेते देसाई यांच्याविषयीच्या माहिती संकलन प्रकल्पाच्या दुसऱ्या भागाचे काम गतीने सुरू असून त्यांच्याविषयी मान्यवरांच्या मुलाखतींचे डिजीटल अर्काइव्ह सुद्धा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत करून अध्यासनाच्या कामगिरीचा आढावा सादर केला. बैठकीला डॉ. व्ही.जी. पानस्कर, डॉ. वैभव ढेरे, गजानन पळसे, डॉ. दत्तात्रय मचाले, अवधूत चव्हाण, डॉ. माया देसाई, डॉ. सोनल मंगल, संदीप केसरकर, डॉ. उमाकांत हत्तीकट आदी उपस्थित होते.