Wednesday 29 November 2023

डिजीटल युगात विद्यार्थ्यांना लेखनाद्वारे अभिव्यक्त व्हावेसे वाटणे स्वागतार्ह: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 विद्यापीठात महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख  यांच्यासमवेत शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेतील बिगर-व्यावसायिक गटातील प्रथम तीन क्रमांकांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी आणि संपादक.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख  यांच्यासमवेत शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेतील व्यावसायिक गटातील प्रथम तीन क्रमांकांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी आणि संपादक.


कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: डिजीटल युगातही विद्यार्थ्यांना लेखनाद्वारे अभिव्यक्त व्हावेसे वाटते आहे, ही बाब अतिशय स्वागतार्ह आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेच्या (सन २०२१-२२) पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सृजनशीलतेची जोपासना व्हावी आणि ती अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, यास्तव महाविद्यालयामधून प्रति वर्षी प्रकाशित केल्या जाणाऱ्या नियतकालिकांची स्पर्धा विद्यापीठामार्फत प्रतिवर्षी आयोजित केली जाते. या अंकांतून वाङ्मयनिर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्याच्या आणि महाविद्यालयांकडून दर्जेदार नियतकालिके प्रकाशित व्हावीत, या हेतूने शिवाजी विद्यापीठाची ही योजना सन १९७० पासून सुरु आहे. तेव्हापासून आजतागायत अनेक महाविद्यालयीन नियतकालिकांनी आपले सातत्य टिकविले आहे आणि आपली वैशिष्ट्यपूर्णताही जपली आहे. काही नियतकालिकांत तर मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पलिकडे ऊर्दू, कन्नड आणि संस्कृत भाषांतूनही विद्यार्थी व्यक्त झाले आहेत, हे प्रशंसनीय आहे. विद्यार्थ्यांमध्ये लेखनाच्या ऊर्मी आहेत, त्यांना स्थान देण्यात महाविद्यालयांनी कमी पडू नये. छपाई खर्चिक होत असल्यास ई-मॅगेझीन स्वरुपात आपल्या वेबसाईटवर त्यांची निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व व लेखन कौशल्य विकासाच्या दृष्टीने नियतकालिक स्पर्धा हा महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामध्ये त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळण्याबरोबरच सुप्तगुण प्रदर्शित करण्याची संधी मिळते. त्यांची प्रतिभा त्या निमित्ताने सामोरी येते. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभागी होणे महत्त्वाचे आहे.

यंदा सन २०२१-२२च्या स्पर्धेमध्ये ४३ बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी आणि १३ व्यावसायिक महाविद्यालयांनी भाग घेतला. यापैकी ३० बिगर व्यावसायिक व ११ व्यावसायिक गटातील महाविद्यालयांतील एकूण २५४ विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पारितोषिक प्राप्त केली आहेत. यामध्ये १६६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. महाविद्यालयांच्या सर्वसाधारण पुरस्कारासाठी विषय तज्ज्ञांकडून नियतकालिकांचे परीक्षण करून, स्वतंत्ररित्या गुणांकनाच्या आधारे बिगर व्यवसायिक व व्यवसायिक गट यामध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या पहिल्या तीन महाविद्यालयांना फिरते चषक व प्रशस्तिपत्र देऊन संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व नियतकालिकांचे संपादक यांचा यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेतील सन २०२१-२२साठीच्या विजेत्या महाविद्यालयांची नावे (कंसात प्राचार्य व संपादक आणि नियतकालिकाचे नाव यानुसार) अनुक्रमे पुढीलप्रमाणे:

बिगर व्यावसायिक गट: मुधोजी महाविद्यालय, फलटण (प्राचार्य डॉ. पी.एच. कदम, प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर - उदय), विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (डॉ. आर.आर. कुंभार, डॉ. आरिफ शौकत महात - विवेक), सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, जि. सातारा (डॉ. एम. एम. राजमाने, डॉ. दिलीपकुमार कसबे - सद्गुरू)

व्यावसायिक गट: तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, वारणानगर, जि. कोल्हापूर (डॉ. एस.व्ही. अणेकर, डॉ. बाळासो साळोखे - होरायझन), आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, आष्टा, जि. सांगली (डॉ. व्ही.एस. पाटील, डॉ. एस.एस. मोहिते - ज्ञानदारंभ), डी.के.टी.ई.चे टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनियरिंग इन्स्टिटयूट, इचलकरंजी, जि.कोल्हापूर (डॉ. श्रीमती एल.एस. अडमुठे, डॉ. आर.डी. शिर्के - अंबर)

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, उपकुलसचिव डॉ. नीलेश बनसोडे व सेमिनार विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून आभार मानले, तर राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Sunday 26 November 2023

शिवाजी विद्यापीठात संविधान दिन, शहीद दिन

 


कोल्हापूर, दि.26 नोव्हेंबर - शिवाजी विद्यापीठात आज संविधान दिन आणि शहीद दिन या निमित्ताने भारतीय संविधानकर्ते आणि वीर शहीद जवान यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.



विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते संविधानाची प्रास्ताविका, संविधानाची मूळ प्रत यांना अभिवादन करण्यात आले.त्याचप्रमाणे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.





याप्रसंगी, '26/11' च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांसह अन्य शहीदांच्या स्मृतिप्रतिमांनाही कुलगुरू डॉ.शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.डॉ.अमोल कुलकर्णी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले.यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.प्रकाश कांबळे, डॉ.शिवलिंगप्पा सपली, डॉ.सचिन पाटील, डॉ.युवराज जाधव, डॉ.शिवराज थोरात, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार,डॉ.प्रकाश बिलावर, डॉ.कैलास सोनवणे, डॉ.शरद बनसोडे, उदय शिंदे, सुरेश मोरे, राजश्री चिखलवाळे, योगेश पाटोळे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

----


Friday 24 November 2023

शिवाजी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार

 

कोल्हापूर, दि. २४ नोव्हेंबर - भारतातील कृषी संशोधन प्रणाली जागतिक दर्जाची बनलेली असल्यामुळे आज आपला देश अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे.  समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्यातील चार आणि देशामधील सत्तर कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन कार्य मोठयाप्रमाणात सुरू आहे, असे मत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांनी व्यक्त केले.  आज, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.  यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते.  कुलगुरू डॉ.शिर्के आपले मत व्यक्त करताना म्हणाले, हा सामंजस्य करार समाजास आणि शेतकरी वर्गाला उपयुक्त ठरेल. जगाच्या पाठीवरील प्रत्येक वनस्पती उपयोगी असते.  त्याचे संवर्धन करून मानवाच्या विकासामध्ये त्या वनस्पतींचा कसा उपयोग होईल यावर संशोधकांनी महत्वपूर्ण काम करणे आवश्यक आहे. कृषी पिके आणि औषधी वनस्पतींमुळे भारताचे महत्व जागतिक पातळीवर गणले जाणार आहे.

या सामंजस्य करार अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने आजरा घनसाळ,काळा जिरगा, काळ भात आणि ब्लॅक राईस या  स्थानिक देशी वाणांच्या उन्नतीचे (mutation) जे कार्य केले आहे त्याचे परीक्षण राज्य आणि देश पातळीवर करण्यासाठी या  करारातून पुढील कार्य होणार आहे.तसेच या करारा अंतर्गत भविष्यात विद्यापीठातून तयार होणारे विविध पिकांचे आणि औषधी वनस्पतींचे सुधारित वाण व त्याचे राज्य व देश पातळीवरील ट्रायल्स ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाईल. त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या पदवी पूर्ण करण्यासाठी फिल्ड प्रोजेक्ट/ जॉब ऑन ट्रेनिंग/  किंवा रिसर्च प्रोजेक्ट अनिवार्य करण्यात आले आहेत. या फिल्ड प्रोजेक्ट /जॉब ऑन ट्रेनिंग  आणि रिसर्च प्रोजेक्टच्या कार्यासाठी दोन्ही विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाचे दालन खुले होणार आहे.  अशा सामंजस्य करारामधून कृषी आणि अकृषी विद्यापीठातील दरी कमी होईल आणि दोन्ही विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि समाज यांना विद्यापीठातील उपलब्ध असलेल्या सुविधांचा फायदा करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी आवाहन केले.

 याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ तर्फे कुलसचिव डॉ. व्ही. एस. शिर्के, कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ सातापा खरबडे, वित्त अधिकारी श्री सदाशिव पाटील, शेंडा पार्क येथील कृषी संशोधन केंद्राचे डायरेक्टर डॉ ए ए पिसाळ, इगतपुरी येथील कृषी संशोधन केंद्राचे डायरेक्टर डॉ हेमंत पाटील, डॉ सुनील कराड, डॉ शैलेश कुंभार उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ पी. एस. पाटील , अधिष्ठता विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा डॉ. एस. एच. ठकार,कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही डी जाधव, डॉ. एन. बी. गायकवाड, डॉ. एस. जी. घाणे, डॉ. के. बी. पवार ,डॉ. एस.. पाटील, डॉ. एम. एस. निंबाळकर, डॉ. एस. एम. पाटील, डॉ. जे. पी. जाधव,    डॉ.के. डी. सोनवणे, डॉ... देशमुख, डॉ. एस. आर. एनकंची,डॉ. पी. डी. पाटील इत्यादी उपस्थित होते.

-------

Thursday 23 November 2023

‘लोकस्मृती’ विद्यार्थिनी वसतिगृहासाठी

विद्यापीठाकडे मदतीचा ओघ सुरू

उद्योजक सचिन मेनन यांच्याकडून साडेसहा लाखांचा निधी

उद्योजक सचिन मेनन यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे निधी सुपूर्द करताना संभाजी पाटील. सोबत (डावीकडून) रणजीत यादव, डॉ. गिरीष कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.


कोल्हापूर, दि. २३ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित लोकस्मृती विद्यार्थी वसतिगृहासाठी मदतनिधीचा ओघ विद्यापीठ कार्यालयाकडे सुरू झालेला आहे. कोल्हापुरातील नामांकित उद्योगसमूह असलेल्या मेनन पिस्टन्स लि. कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक सचिन मेनन यांनी साडेसहा लाख रुपयांचा निधी काल कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला.

शिवाजी विद्यापीठाने लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह हा सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेसाठीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. हे वसतिगृह लोकांच्या सहभागातून उभारावे आणि त्यातून लोकांच्या स्मृती जतन केल्या जाव्यात, अशा हेतूने विद्यापीठाने या वसतिगृहाची संकल्पना मांडली. लोकांनी आपले कुटुंब, आप्तस्वकीय यांमधील प्रिय व्यक्तीच्या नावे ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यावयाचा आणि त्या व्यक्तीच्या नावे निवासी खोल्यांची उभारणी करावयाची, अशी ही संकल्पना आहे.

यानुसार श्री. मेनन यांनी विद्यापीठास साडेसहा लाख रुपयांचा निधी विद्यापीठास दिला आहे. मेनन यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी संभाजी पाटील यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निधीचा धनाकर्ष सुपूर्द केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव उपस्थित होते.

 

विविध घटक मदतीसाठी इच्छुक: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाशी संबंधितांसह समाजातील विविध संस्था-संघटनांशी तसेच उद्योग-व्यवसायांशी निगडित घटकांकडूनही लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह प्रकल्पास मदत करणेबाबत विचारणा झाली आहे. त्यातील अनेकांनी आपण लवकरच निधी सुपूर्द करणार असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये शंभर टक्के लोकसहभागातून साकारत असलेला हा प्रकल्प कोल्हापूरकरांच्या दातृत्वातून निश्चितपणे पूर्णत्वास जाईल, अशी भावना व्यक्त करून कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी इच्छुक दात्यांनी सदर लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहास आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही केले आहे.


Saturday 18 November 2023

शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा वर्धापनदिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठाची शैक्षणिक-संशोधन क्षेत्रातील भरारी गौरवास्पद: कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

 

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. जगन कराडे. मंचावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

१)   

बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. विनोद भीमराव शिंपले.


मराठी विज्ञान परिषदेचा प्रा. मनमोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या डॉ. तुकाराम डोंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना सहाय्यक कुलसचिव सुरेश तुकाराम बंडगर 


विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना विजय बापूसाहेब माजगावकर

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना नंदिनी दिगंबर पाटील

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना सतीश दत्तू केसरकर

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना सदानंद शिवाजी सुभेदार

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना सागर भास्कर पाटील (इस्लामपूर)

महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. सारंग भोला (वर्ये, सातारा)

महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना डॉ. सर्जेराव रघुनाथ पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. शेजारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी व शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या ६१व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठाच्या ६१व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

अध्यक्षीय भाषण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनअंतर्गत 'कमवा व शिका' योजनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त 'आधारवड' या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.


 

कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शैक्षणिक व संशोधकीय कार्याद्वारे ठसा उमटविला आहे. विद्यापीठाची ही भरारी गौरवास्पद स्वरुपाची आहे, असे कौतुकोद्गार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

आज विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार समाजशास्त्र अधिविभागातील डॉ. जगन कराडे यांना, तर बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. विनोद भीमराव शिंपले (न्यू कॉलेज, कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात आला. तसेच, मराठी विज्ञान परिषदेचा प्रतिष्ठेचा प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्कूल ऑफ नॅनो सायन्स व टेक्नॉलॉजीचे डॉ. तुकाराम डोंगळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी कुलगुरू डॉ. कुलकर्णी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाच्या दहा महिन्यांच्या कालखंडात मुंबई विद्यापीठामध्ये प्रशासकीय शिस्त लावण्याचे काम केले, ते मला प्र-कुलगुरू म्हणून जवळून अनुभवता आले. त्याचप्रमाणे राज्यात नॅक मूल्यांकनात ३.५२ गुणांकनासह राज्यात अव्वल ठरलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या चमूने मुंबई विद्यापीठासही अमूल्य मदत केल्याने मुंबई विद्यापीठ तिसऱ्या पुनर्मूल्यांकनात ३.६६ गुणांकनासह ‘A++’ मानांकन मिळवू शकले. ही सहकार्याची भावना व भूमिका फार मोलाची आहे. आता या दोन्ही विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कॅटेगरी-१ दर्जा प्राप्त झाल्याने ऑनलाईन अध्यापनाची प्रणाली निर्माण करण्याच्या कामी सोबत काम करीत आहेत. हे साहचर्य येथून पुढील कालखंडात फार महत्त्वाचे ठरणार आहे.

नजीकच्या भविष्यात भारतीय विद्यापीठांना जागतिक वेध घेऊन वाटचाल करावी लागणार असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, आपली विद्यापीठे शैक्षणिक, संशोधकीय, पूरक उपक्रम आणि सामाजिक दायित्व या चारही बाबतीत चांगलीच कामगिरी करीत आहेत. मात्र, त्याबरोबरीने आपण आता आपल्या क्षमतावर्धनाच्या दिशा शोधण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध अल्प संसाधने आणि शिक्षक-विद्यार्थी यांचे व्यस्त गुणोत्तर प्रमाण असताना देखील आपले शिक्षक करीत असलेले कार्य, विशेषतः परीक्षेच्या अनुषंगाने असणारे काम कौतुकास्पद आहे. मात्र केवळ तेवढ्यावर समाधानी राहणेही गैर आहे. त्या दृष्टीने आपल्या माजी विद्यार्थ्यांशी नित्य संपर्क राखणे महत्त्वाचे आहे. परदेशी विद्यापीठे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामधील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करतात. आपणही आपल्या जगभर पसरलेल्या विद्यार्थ्यांशी जोडले जाण्यासाठी धोरण राबविणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा आणि पायाभूत सुविधा विकास याकामी त्यांची मदत घेतली जाणे आवश्यक आहे. आपण सामाजिक दायित्वाची अनेक कामे करतो, मात्र विविध रॅंकिंग प्रणालीमध्ये पिअर परसेप्शनमध्ये कमी गुणांकन मिळते. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनी, संशोधकांनी आता कन्सल्टन्सी सेवांचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे. कन्सल्टन्सी आऊटपुटमध्ये भारत खूप मागे आहे, ही चिंतेची बाब आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा चॅट-जीपीटी ही एका चांगल्या शिक्षकाला कधीही पर्याय ठरणार नसल्याचे सांगून कुलगुरू डॉ. कुलकर्णी म्हणाले, या गोष्टींच्या बाबतीत भयाची भावना बाळगण्याची गरज नाही. सध्या त्यावरुन प्राप्त माहिती पाहता ती विशुद्ध स्वरुपाची नसल्याचे दिसते. एक विवेकी शिक्षक विद्यार्थ्याला वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहिती देऊन सक्षम बनवितो. ती क्षमता या तंत्रज्ञानात अद्याप नाही. या तंत्रज्ञानाच्या आधारे बिग डाटा विश्लेषण करीत असताना नैतिक मार्गांनी त्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यासाठी योग्य धोरणे आखली पाहिजेत. त्याचप्रमाणे लघु व मध्यम उद्योग-व्यवसायांसोबत सहकार्यवृद्धी करण्याच्या दिशेने भारतीय विद्यापीठांनी आगेकूच करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. भारतीय विद्यापीठांचे नाव जागतिक नकाशावर अधोरेखित करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

 नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यापीठ आघाडीवर: कुलगुरू डॉ. शिर्के

यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने राज्यात आघाडी घेतली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीमध्ये सर्वच घटकांचा वाटा आहे. विशेषतः अधिकार मंडळांच्या चांगल्या बाबींना पाठिंबा देण्याच्या सकारात्मक धोरणाचा यात मोठा वाटा आहे. विद्यापीठाने माहिती संवाद तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून अनेक दर्जेदार सॉफ्टवेअर निर्माण केले आहेत आणि ते उत्तररित्या कार्यान्वितही केले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील रोखीचे सर्व व्यवहार आता ऑनलाईन झाले आहेत. दीक्षान्त समारंभाचे शंभर टक्के कामकाज कागदविरहित पद्धतीने ऑनलाईन झाले. पीएच.डी.ची प्रवेशापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन मोडमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहे. परीक्षा विभागाचा वेळेत निकाल लावण्यासाठी लौकिक आहेच, पण यंदा सर्वच्या सर्व ६८० परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत लावण्यात आले. प्रत्यक्षात सरासरी कालावधी हा १४ दिवसांचाच राहिला. नव्या धोरणामुळे शिक्षणक्षेत्रात अनेक दूरगामी बदल होऊ घातले आहेत. पुढील १५ वर्षांत सारेच चित्र बदललेले असेल. त्याचा वेध घेऊन विद्यापीठाने आपल्या कॅम्पसवर अनेक नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यात बी.ए. (स्पोर्ट्स), बी.ए. (जिओइन्फर्मेटिक्स) यांसारख्या पदवीस्तरीय अभ्यासक्रमाचाही समावेश आहे. यावेळी कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा वेधही थोडक्यात घेतला.

या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नॅक मानांकित २६ महाविद्यालयांचा गौरव

'नॅक'चे ++’, +’ आणि मानांकन मिळविणाऱ्या २६ संलग्नित महाविद्यालयांचा वर्धापनदिन समारंभात गौरव करण्यात आला. या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये टेक्स्टाईल अँन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर, कर्मवीर हिरे कला, वाणिज्य, विज्ञान व शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँन्ड रिसर्च, कोल्हापूर, डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर, श्री विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय, पेठ वडगांव, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर, शिवराज कला व वाणिज्य आणि डी.एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली, डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट्स डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग महाविद्यालय, कराड, दहीवडी महाविद्यालय, दहीवडी, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, आष्टा, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी. फार्मसी, आष्टा, बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण, वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द, डी.पी. भोसले महाविद्यालय, कोरेगांव, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी, कोल्हापूर, बळवंत महाविद्यालय, विटा, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (सातारा), धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा, के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोकुळ शिरगांव, कोल्हापूर, श्री वेंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी, विलिंग्डन कॉलेज, सांगली, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा (सातारा), तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगर आणि आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, सांगली.

 उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार प्राणीशास्त्र व वाय.सी.एस.आर.डी. अधिविभागांस!

शिवाजी विद्यापीठाने सन २०१९पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. यंदा उत्कृष्ट अधिविभागांसाठीचा पुरस्कार प्राणीशास्त्र अधिविभाग आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांना देण्यात आला.

 आधारवड स्मृतीग्रंथाचे प्रकाशन

कमवा व शिका योजना राबविणारे शिवाजी विद्यापीठ हे अग्रणी विद्यापीठ आहे. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून विद्यापीठात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी घडले, मोठे झाले. अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थी भवनच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने लिहीलेल्या आठवणी व लेखांचा संग्रह असलेल्या आधारवड या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन आजच्या समारंभात करण्यात आले. या ग्रंथाचे संपादन डॉ. जी.पी. माळी यांनी केले आहे. सहाय्यक संपादक म्हणून डॉ. डी.के. सरगर व डॉ. एन.एल. तरवाळ यांनी काम पाहिले आहे. यावेळी डॉ. माळी यांच्यासह संपादक मंडळाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 विद्यापीठ गीताच्या रिंगटोनचे लोकार्पण

शिवाजी विद्यापीठाच्या कीर्ती तुझी मंगलमय स्मरणी असू दे, ज्ञान हेच अमृत हे ब्रीद असू दे... या विद्यापीठ गीताचे गतवर्षी लोकार्पण करण्यात आले होते. यंदाच्या वर्धापनदिन समारंभात गीताच्या मोबाईल रिंगटोन्सचे कुलगुरू डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व उपस्थितांना टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. ही धून तयार करणाऱ्या सचिन जगताप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 

वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: डॉ. जगन कराडे, समाजशास्त्र अधिविभाग

विद्यापीठातील गुणवंत सेवक:

१. सुरेश तुकाराम बंडगर, सहाय्यक कुलसचिव

२. विजय बापूसाहेब माजगांवकर, अधीक्षक

३. नंदिनी दिगंबर पाटील, सहाय्यक अधीक्षक

४. सदानंद शिवाजी सुभेदार, हावलदार

५. सतीश दत्तू केसरकर, ग्रंथालय मदतनीस

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य:

१. डॉ. सर्जेराव रघुनाथ पाटील, प्राचार्य, देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखली, ता. शिराळा, जि. सांगली

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक:

१.      डॉ. सारंग भोला, कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँन्ड रिसर्च, वर्ये, जि. सातारा

महाविद्यालयीन गुणवंत सेवक:

१. सागर भास्कर पाटील, मुख्य लिपिक, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर, इस्लामपूर, जि. सांगली

बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. विनोद भीमराव शिंपले, न्यू कॉलेज, कोल्हापूर

 

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान व राष्ट्रगीत सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

 

तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.