Friday 25 January 2019

विद्यार्थिनी उच्चशिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी सदैव प्रयत्नशील: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींसाठीच्या बस पास योजनेसाठी लोकसहभागातून जमा केलेल्या सुमारे नऊ लाख रुपयांच्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना प्रदान करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.



शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींच्या बस पास योजनेसाठी प्रातिनिधिक स्वरुपात महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थिनींना धनादेश प्रदान करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींसाठी बस पास योजनेच्या धनादेश प्रदान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: केवळ आर्थिक कारणांमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थिनी उच्चशिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाबरोबरच शासकीय तसेच वैयक्तिक स्तरावरही सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे उच्चशिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींसाठी बस पास योजना जाहीर करण्यात आली होती. त्या योजनेचे उद्घाटन आणि योजनेसाठी लोकसहभागातून जमविण्यात आलेला निधी विद्यापीठास प्रदान करणे तसेच त्याचे प्रातिनिधिक स्वरुपात प्राचार्य, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना वितरण असा संयुक्त समारंभ आज दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडला. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
Chandrakantdada Patil
श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासनातर्फेही मोफत बस पास योजना आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय स्तरावरुन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असले तरीही तिला काही मर्यादा आहेत. त्यामुळे सर्वदूर विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचू शकत नाही. शिवाजी विद्यापीठाने मात्र आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींचे उच्चशिक्षण केवळ बस पासअभावी रखडू नये आणि त्यांना त्यांची शैक्षणिक प्रगती साध्य करता यावी, चांगले करिअर करता यावे, या दृष्टीने आखलेली योजना अत्यंत चांगली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शुल्कामधून जमा झालेल्या विद्यापीठ फंडावर त्याचा भार न टाकता लोकसहभागातून निधी उभारून त्या माध्यमातून या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे धोरण स्वीकारले, ही बाबही स्तुत्य आहे. विद्यापीठाच्या या प्रामाणिक प्रयत्नांना पाठबळ लाभावे आणि कार्यक्षेत्रातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक कल्याण व्हावे, या हेतून आम्ही सुमारे ९ लाख रुपयांचा निधी जमा केला आणि तो आज विद्यापीठाकडे सुपूर्द करीत असताना अतिशय आनंद होतो आहे. यासाठी संवेदना फौंडेशन आणि रोहिणी ज्वेलर्स यांनीही मोलाचा हातभार लावला आहे. आमच्या या मदतीचा योग्य विनियोग विद्यापीठ प्रशासन निश्चितपणे करेल, याची आम्हाला खात्री आहे. यापुढील काळातही विद्यापीठाच्या अशा विद्यार्थी विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांना शासकीय तसेच व्यक्तीगत स्तरावर सदैव सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांनी विद्यापीठाप्रती दाखविलेल्या सहृदयतेचे स्वागत केले. ते म्हणाले, विद्यार्थिनींसाठी बस पास योजनेबरोबरच संलग्नित महाविद्यालयांमध्ये स्वच्छतागृह उभारण्यासाठीही लोकसहभागातून निधी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना स्वच्छतागृहांअभावी विद्यार्थिनींची होणारी कुचंबणा व त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न विचारात घेऊन स्वच्छतागृह उभारणीची योजना आखण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणाऱ्या या स्वच्छतागृहांच्या एका युनिटचा खर्च एक लाख रुपये इतका आहे. प्राथमिक टप्प्यात ५० अत्यंत गरजू संलग्नित महाविद्यालये निवडून त्यांना अशी स्वच्छतागृहे तयार करून देण्याचा मानस आहे. यासाठीही दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन कुलगुरूंनी केले. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडण्यासाठी सब-वे बांधणे आणि विद्यापीठाच्या संरक्षक भिंतींवर सुंदर कोल्हापूरचे दर्शन घडविण्याच्या अनुषंगाने कोल्हापूरच्या कलाकारांकरवी कला-संस्कृतीदर्शक चित्रे काढून घेण्याचा मनोदयही त्यांनी जाहीर केला.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ९ लाख रुपयांचा निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रातिनिधिक स्वरुपात काही महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थिनी यांना मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते बस पास योजनेसाठी निधीचे वितरण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

Wednesday 23 January 2019

शेतीच्या कंपनीकरणाची गरज: सुधाकर जाधव


ज्येष्ठ पत्रकार सुधाकर जाधव यांच्या 'शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. प्रकाश पवार. सोबत डॉ. माया देशपांडे, कृषी पत्रकार व प्रकाशक रावसाहेब पुजारी आणि आलोक जत्राटकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात मार्गदर्शन करताना सुधाकर जाधव. व्यासपीठावर डॉ. प्रकाश पवार.

कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: शेतकऱ्यांसमोरील समस्या संपविण्यासाठी त्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम ठेवून शेतीचे कंपनीकरण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पांढरकवडा (यवतमाळ) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा कृषी विचारवंत सुधाकर जाधव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित समकालीन शेतीचे प्रश्न आणि युवक या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी स्कूलचे संचालक डॉ. प्रकाश पवार आणि ज्येष्ठ कृषी पत्रकार रावसाहेब पुजारी प्रमुख उपस्थित होते.
Sudhakar Jadhav
सुधाकर जाधव म्हणाले, शेतजमिनीचे तुकडे आणि वाटण्या हा भारतीय शेतीसमोरचा मोठा प्रश्न आहे. शेती हा जणू अल्प भूधारक शेतकऱ्यांचा मेळावाच बनला आहे. अल्पभूधारकांना कोणी कर्ज देत नाही, ही त्यातली आणखी एक मोठी समस्या आहे. या समस्येवर कंपनीकरणाचा तोडगा उपयुक्त ठरेल. सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्या एका कंपनीच्या छताखाली आणल्या पाहिजेत. संसाधनांचा वापरही एकत्रितच करावा. त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात त्यांना शेअर द्यावेत आणि नफ्यात लाभांश द्यावा. शेतकऱ्यांना तेथे आठ तास रोजगार द्यावा. त्यांचा मेहनताना द्यावा. अशा प्रकारे काम केल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांनाही ओलिताचे लाभ मिळतील. या दृष्टीने आता शेतीचा विचार करण्याची गरज आहे.
तरुणांशी निगडित शेतीच्या समस्या सांगताना श्री. जाधव म्हणाले, आज कोणी तरुण शेती करण्यास तयार होत नाही आणि शेती करणाऱ्या मुलाला अगदी शेतकरी सुद्धा आपली मुलगी द्यायला तयार होत नाही, या दोन्ही अत्यंत गंभीर समस्यांनी आपली शेती आणि तरुण शेतकरी ग्रासला आहे. इतर रोजगार, धंदा नसला तरीही आजया तरुण शेती करण्यास तयार होत नाही. उलट शेतीतून आपली सुटका कधी होईल, याचाच विचार आणि प्रयत्न सुरू असतात. आज शेतीला मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या शेतीचे करायचे काय, हा मोठा प्रश्न आहे. कोणीही शेतीचा गांभिर्याने विचार करीत नाही आणि त्यामुळे शेतीचा प्रश्न सुटणे अवघड आहे. राज्यकर्त्यांसाठी, शेतीचा प्रश्न हा शेतमाल हमीभावाचा आणि शेतीवरील कर्जापुरताच मर्यादित आहे. शेतकरी संघटनांची आंदोलनेही तेवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. त्यामुळे शेतीचे प्रश्न वर्षानुवर्षे त्याच चक्रव्यूहाच्या गर्तेत आहेत. शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थात्मक, कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण होत नाही कारण तरुण या प्रश्नांबद्दल विचार करीत नाही. तरुणांना आणि त्यांच्या संघटनांना शेतीचे प्रश्न आपल्या प्राधान्यक्रमावर घ्यावेसे वाटत नाही, हे चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आज शेतीत अभावाची स्थिती नसली तरी शेतकरी सुखी नाही, हे सत्य आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या अतिरिक्त लोकसंख्येला शेतीतून बाहेर काढणे आणि त्याचवेळी शेतीत नियोजनपूर्वक रोजगार निर्मिती करणे या दोन्ही गोष्टींची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाल्याचेही जाधव यांनी सांगितले. श्री. जाधव यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या विविध शंकांचे समाधानही केले.
यावेळी सुधाकर जाधव यांनी लिहीलेल्या शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती या तेजस प्रकाशनाच्या पुस्तकाचे डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कविता वड्राळे यांनी परिचय करून दिला, तर डॉ. संतोष सुतार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. माया देशपांडे, डॉ. ओमप्रकाश कलमे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Friday 18 January 2019

उत्कृष्ट संशोधनासाठी संयुक्त प्रकल्पांची गरज: डॉ. पी.पी. वडगावकर

शिवाजी विद्यापीठाने पुणे येथील सीएसआयआर-एनसीएल या संस्थेशी संशोधनविषयक सामंजस्य करार केला. या प्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि एनसीएलचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर. सोबत (डावीकडून) डॉ. अकल्पिता अरविंदेकर, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. पी.एस. पाटील आणि डॉ. जे.एस. बागी.


शिवाजी विद्यापीठाचा सीएसआयआर-एनसीएलशी संशोधनविषयक सामंजस्य करार

कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: प्रयोगशाळेत संशोधकाने एकट्याने संशोधन करण्याचे दिवस आता मागे पडले असून उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी विविध संस्थांनी संयुक्त प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ आणि सीएसआयआर-एनसीएल यांच्या दरम्यानचा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठ आणि सीएसआयआर-एनसीएल यांच्यात आज संशोधनविषयक सहकार्याचा सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. वडगावकर म्हणाले, उत्कृष्ट संशोधनासाठी संयुक्त प्रकल्प हाती घेणे आज आवश्यक झाले आहे. त्यासाठी संशोधन संस्थांनी, तेथील संशोधकांनी एकत्र येऊन एकमेकांशी चांगला परिचय करून घेतला पाहिजे. आपापल्या संशोधन क्षेत्राची माहिती एकमेकांना दिली पाहिजे. त्यातून संशोधनाच्या नवनव्या संधी सामोऱ्या येतील. यामध्ये आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पांचेही महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ पायाभूत सुविधाच नव्हेत, तर मानवी स्नेहबंधही अशा संयुक्त प्रकल्पांमधून वाढीस लागतात, हे अशा करारांचे महत्त्वाचे फलित असते, हे दुर्लक्षून चालणार नाही.

यावेळी डॉ. वडगावकर यांनी आपणही शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे १९७९च्या बॅचचे विद्यार्थी असल्याचा अभिमानपूर्वक उल्लेख केला. एनसीएलच्या प्रगतीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे योगदान लाभले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, या सामंजस्य करारामुळे संशोधन, संयुक्त प्रकल्प, प्रयोगशाळा सहकार्य या बाबींविषयी एनसीएलबरोबर संवाद आणि साहचर्य वाढेलच, पण त्याचबरोबर आपल्या संशोधनाचे पेटंट मिळविण्याच्या कामी एनसीएलच्या अनुभवी संशोधकांचे मार्गदर्शन विद्यापीठाच्या संशोधकांना लाभेल. त्याचप्रमाणे संशोधनाचे तंत्रज्ञानात रुपांतरण आणि औद्योगिक साहचर्य वृद्धी या दृष्टीनेही त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी, तर एनसीएलच्या वतीने डॉ. वडगावकर यांनी स्वाक्षरी केल्या. या वेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

Wednesday 16 January 2019

शिक्षणाच्या चळवळीचे फुले दाम्पत्यच उद्गाते - प्राचार्य टी.एस.पाटील



कोल्हापूर, दि.16 जानेवारी - महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची चळवळ निर्माण झाली.समाज परिवर्तन कार्यामध्ये त्यांचे अमूल्य योगदान होते, असे प्रतिपादन प्राचार्य टी.एस.पाटील यांनी केले.

  शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागामार्फत कै.पी.बी.साळुंखे व्याख्यानमालेअंतर्गत 'महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आजच्या संदर्भात प्रस्तुतता' या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये प्राचार्य टी.एस.पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.मानव्यशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ.भारती पाटील होत्या.यावेळी श्री.सुभाष साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य टी.एस.पाटील पुढे म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाला वैचारिक धन दिले.नव समाज निर्माण होण्यासाठी आहोरात्र कार्यरत राहिले.  आपल्या देशामध्ये कृषीवल संस्कृतीत स्त्री ही समाजप्रमुख होती.  सामान्य शेतकरी, कष्टकरी यांच्यावर होत असलेल्या अन्यायास ते सातत्याने विरोध करीत होते.  त्यांनी त्यांच्या कार्यातून भारतातील सामान्य वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले.महात्मा फुले शिकत असताना इंग्रज या देशातून कसे हद्दपार होतील यासाठी विचारमग्न असायचे.शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा महात्मा फुलेंनी शोधून काढली.आपल्या देशातील लोकांना गुलामगिरीतून जोपर्यंत मुक्त केले जाणार नाही तो पर्यंत आपल्या देशातील कुठल्याही प्रकारच्या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होणार नाही हे त्यांनी जाणले होते.त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे यासाठी ते कायम प्रयत्नशील होते.या माध्यमातूनच त्यांनी पहिल्यांदा स्त्रियांसाठी शाळा सुरू केली.ते स्वत: काही विषय शिकवत होते.पुढे अतिशय परिश्रमपूर्वक शिक्षण देवून सावित्रीबार्‌इंना शिक्षक म्हणून तयार केले.1852-53 मध्ये मुक्ता साळवे या आठ, नऊ वर्षांच्या मुलीने लिहिलेले निबंध आजही विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे, अशा प्रकारचे शिक्षण सावित्रीबार्‌इंनी दिले होते.महात्मा ज्योतिबा फुलेंनी वंचितांसाठी शाळा काढली हे क्रांतीकारी कार्य होते म्हणून त्यावेळेस इंग्रज सरकारने त्यांचा सत्कार केला होता.त्यावेळी ते पंचवीस वर्षांचे होते.अनाथ बालकांचा सांभाळ ते करीत होते.यासाठी त्यांना घरच्या प्रचंड रोषास सामोरे जावे लागले होते.आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून त्यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली.जातीधार्मातील भेदाभेद त्यांनी कधीही मान्य केले नाही.ते मानवतावादी होते.स्वत: काम करून आपल्या सामाजिक कार्यासाठी पैसे मिळवत होते.

अध्यक्षीय मनोगतामध्ये अधिष्ठाता डॉ.भारती पाटील म्हणाल्या,महात्मा फुलेंनी मांडलेली परंपरा प्रामुख्याने विवेकाधिष्ठीत परंपरा आहे.डोळे झाकून नाही तर डोळे उघडे ठेवून कार्य करणारी महान परंपरा आहे.सावित्रीबाई फुलेंचे अद्वितीय जीवन कार्य होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातील कै.पी.बी.साळुंखे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे श्री.यशोधन बोकील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
-----