Friday 4 January 2019

समाजाने दिव्यांगांकडे सहाय्य करण्याच्या भूमिकेतून पाहणे आवश्यक - डॉ.राजेंद्र हिरेमठ


कोल्हापूर, दि.4 जानेवारी - शैक्षणिक, प्रशासकीय, क्रीडा, सांस्कृतीक या सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये दिव्यांगांनी अत्यंत उंच भरारी घेतलेली आहे.सहानुभूतिने पाहता सहाय्यकाची भूमिका निभावण्याचे समाजाने ठरविल्यास दिव्यांग देश घडविण्यामध्ये निश्चितपणे हातभार लावतील, असे प्रतिपादन सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.राजेंद्र हिरेमठ यांनी केले.
          शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र-समावेशी शिक्षण संसाधन केंद्र, यु.जी.सी.स्कीम फॉर पर्सन विथ डिसेबल आणि सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ब्रेल दिवसानिमित्त 'दिव्यांग हक्क कायदा 2016' या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.हिरेमठ बोलत होते.छ.राजश्री शाहू सिनेट सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर होते.  यावेळी श्री.धनंजय भोले, समन्वयक, सेंटर फॉर इन्क्लुझीव्ह एज्युकेशन आणि अक्सेसीबिलीटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.राजेंद्र हिरेमठ पुढे म्हणाले, दिव्यांगांना अधिकार प्रदान करण्याचे मोठे कार्य सरकारने सुरू केलेले आहे.जो पर्यंत आपल्या मनामध्ये दिव्यांगांप्रती जी वेगळेपणाची भावना आहे, तो पर्यंत कितीही कायदे केले तरी दरी मिटणार नाही. यासाठी प्रथमत: सर्व सामान्यांमध्ये याची जाणीव-जागृती होणे आवश्यक आहे.क्षमता आणि पात्रतेचा विचार केला तर दिव्यांग सर्वसामान्यांपेक्षा वेगळे नाहीत.
यावेळी हेल्पर्स ऑफ दी हॅन्डीकॅप, कोल्हापूर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नसीमा हुरजूक आपल्या मनोगतामध्ये म्हणाल्या, दिव्यागांना कायद्याने प्राप्त झालेले हक्क सर्वच क्षेत्रामध्ये अंमलात आणले जावेत, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.कायद्याने दिव्यांगांना समान संधी, हक्क आणि संरक्षण प्राप्त होण्यासाठी मदत झालेली आहे. अडचणींकडे संधी म्हणून पाहून नवी दृष्टी निर्माण करण्यासाठी दिव्यांगांना बळ देणे गरजेचे आहे.
       अध्यक्षीय स्थानावरून बोलताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहीक प्रयत्न केल्यास जगामध्ये ते आदर्शवत होतील.विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये दिव्यांगांना सहजपणे वावरता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.योग्य वयात दिशा मिळाली तर समाजामध्ये त्यांचे जगणे सुसहय होईल.
     तत्पूर्वी, रोपटयाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिव्यांगांच्या कार्य कौशल्याचा समावेश असलेल्या 'गगनाला पंख नवे' 'दिव्यांगज' हे लघुचित्रफीत दाखविण्यात आले.
याप्रसंगी, डॉ.अंजली निगवेकर यांची संगीत नाटयशास्त्र अधिविभाग प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
संयोजक डॉ.नमिता खोत यांनी स्वागत प्रास्ताविक केले.डॉ.प्रतिभा देसाई यांनी पाहुण्यांचा परियच करून दिला.डॉ.नंदा पारेकर यांनी आभार मानले.यावेळी विद्यापीठातील सेवक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

------

No comments:

Post a Comment