Saturday 12 January 2019

‘यांचा’ दिवस कधी ढळणार नाही;

विचारांचा मधुघट रिता होणार नाही!

प्रा. एन.डी. पाटील यांच्याप्रती ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कृतज्ञ भावना;

शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' प्रा. पाटील यांना प्रदान




शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत.


शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत.

शिवाजी विद्यापीठाच्या 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' प्रदान समारंभात बोलताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रा. एन.डी. पाटील, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत.

शिवाजी विद्यापीठाच्या कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या 'कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया' या डॉ. भारती पाटील संपादित ग्रंथाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार व सौ. सरोज (माई) पाटील. सोबत (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रा. एन.डी. पाटील. 


कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: यांचादिवस कधी ढळणार नाही, विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही, अशा काव्यमय शब्दांत ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांच्या संपूर्ण कारकीर्दीचा गौरव केला. शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य आर.के कणबरकर पुरस्कार आज ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना श्री. पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. १ लाख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
श्री. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये प्रा. पाटील यांच्या समग्र जीवनसंघर्षाचा अत्यंत ओघवत्या भाषेत आढावा घेतला. त्यावेळी कवीवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितेचा संदर्भ देऊन त्यांच्या जीवन उद्दिष्टाचाच स्तुतीपर वेध घेतला. ते म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, कामगार आदी वंचित शोषित वर्गाच्या हक्कांसाठी हयातभर संघर्षरत राहणारे प्रा. पाटील त्यांना हव्या त्याच पद्धतीनं जीवन जगले, हव्या त्या प्रश्नांसाठी लढले, लढत राहिले. आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी, सर्वसामान्य माणसाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी, प्रसंगी संघर्ष करण्यासाठी घालविली. त्यांची ही भूमिका नव्या पिढीसाठी अतीव मार्गदर्शक आहे.
उपेक्षितांच्या न्यायासाठी संघर्ष करावयाचा म्हणूनच सार्वजनिक जीवनात उतरलेल्या प्रा. पाटील यांनी विधीमंडळातल्या आपल्या पदाचा उपयोग सदैव समाजातल्या शेवटच्या माणसाच्या व्यथा मांडण्यासाठी, सोडविण्यासाठी केल्याचे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वसामान्यांच्या व्यथा सोडविण्यासाठी काँग्रेसची विचारधारा पुरेशी ठरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातून शंकरराव मोरे, केशवराव जेधे आदी प्रभृतींनी त्या विचारांशी फारकत घेऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यातून साकारलेल्या दाभाडे प्रबंधातून सत्तेतील फोलपण लक्षात आणून दिले. या विचारांचे आकर्षण प्रा. पाटील यांच्या मनात निर्माण झाले. तेव्हापासून आजतागायत त्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी आपले कार्य चालविले आहे. थोरले मेहुणे असलेले प्रा. पाटील विधीमंडळात विरोधी पक्षनेते तर मी सत्तारुढ पक्षाचा मंत्री, अशी अवस्था होती. मात्र, ते जेव्हा विधीमंडळात बोलण्यास उभे राहात, तेव्हा संपूर्ण विधीमंडळ त्यांचा शब्द न् शब्द कानात साठवून ठेवण्यासाठी उत्सुक असे. त्यांच्या मांडणीमध्ये व्यक्तीगत स्वार्थ कधीही डोकावला नाही. समाजाप्रतीची तळमळच त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरत असे. सामान्य माणसाच्या हिताचीच भूमिका त्यांनी सातत्याने घेतली.
वसंतदादा पाटील यांच्याशी १९७८ साली मतभेद होऊन सत्तेतून बाहेर पडल्यानंतरच्या काळात आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मंत्रीमंडळात प्रा. पाटील यांचा सहकार खात्याचा मंत्री म्हणून समावेश होणे, हा त्यांच्या जीवनातील फार मोठा अपघात होता, असे सांगून श्री. पवार म्हणाले, तत्पूर्वी, प्रश्नांची जाण, त्यांची मांडणी इथवर मर्यादित कामकाज असलेल्या प्रा. पाटील यांनी मंत्री म्हणून आणि प्रशासक म्हणून आपली उत्तम छाप पाडली. काम हातात घेतलं की, ते शंभर टक्के यशस्वी झालंच पाहिजे आणि त्यातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन झालंच पाहिजे, अशी त्यांची भूमिका असे. कापूस एकाधिकार योजना, स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना हे त्यांच्या कारकीर्दीतील अतिशय महत्त्वाचे आणि यशस्वी निर्णय. मात्र, त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी त्यांनी दौरे काढून अखंड महाराष्ट्र पिंजून काढला आणि या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो की नाही, याची चाचपणी केली. शेतकऱ्यांसाठी त्यांनी सातत्यानं आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली. त्यासाठी प्रकृतीचीही कधी तमा बाळगली नाही, आजही बाळगत नाहीत, अशी भावना त्यांनी मांडली.
शिक्षण हा सुद्धा प्रा. एन.डी पाटील यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले, मधुकरराव चौधरी मुख्यमंत्री असताना चित्रा नाईक समितीने नवे शैक्षणिक धोरण आणले. शिक्षणाचा आकृतीबंध म्हणून ते आणले गेले. ज्याच्यात कुवत असेल, त्यानंच शिकायचं, बाकीच्यांनी थांबायचं, असे त्याचे स्वरुप होते. या आकृतीबंधाविरोधात प्रा. पाटील यांनी राज्यभरात रान उठविले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शासनाला हे धोरण बदलावे लागले आणि शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाला प्रदान करावा लागला. हे त्यांच्या लढ्याचे फलित होते. रयत शिक्षण संस्था हे तर त्यांचे दुसरे घरच आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी त्यांची जी तळमळ आहे, त्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात नितांत कृतज्ञता आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न हाही त्यांच्या प्रचंड जिव्हाळ्याचा विषय असून त्यासाठी ते अखंडितपणे कार्यरत आहेत. त्यामुळेच सीमाभागातल्या लोकांचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. आजच्या कार्यक्रमालाही बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, हे त्यांच्या या प्रेमाचंच द्योतक आहे, असे गौरवोद्गार श्री. पवार यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. एन.डी. पाटील यांनी प्राचार्य कणबरकर यांच्याशी असलेल्या आपल्या स्नेहाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. त्याचप्रमाणे या पुरस्काराबद्दल शिवाजी विद्यापीठाप्रती ऋण व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रा. एन.डी. पाटील यांचे जीवन म्हणजे मानवी मूल्यांची समरगाथा असल्याचे सांगितले. प्रा. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करताना हा त्यांचा नव्हे, तर विद्यापीठाचाच गौरव आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी श्री. पवार यांच्या हस्ते डॉ. एन.डी. पाटील व सौ. सरोज (माई) यांना पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया या डॉ. भारती पाटील संपादित ग्रंथाचे प्रकाशनही श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य कणबरकर यांच्या जीवनावरील चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य कणबरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. बी.ए. खोत यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सदस्य, पदाधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षण, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

पुरस्काराची रक्कम गुरुवर्य खैरमोडे यांच्या स्मृतीमंदिर उभारणीसाठी...
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शब्दाखातर मुंबईतून बीए ऑनर्स झालेले श्री. रामकृष्ण वेताळ खैरमोडे यांनी आष्टा येथील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये तळमळीने सेवा बजावली; मात्र, त्यांचे असाध्य आजाराने अकाली निधन झाले. या गुरुंची चार महिने सर्व प्रकारची सुश्रुषा करण्याची संधी आपल्याला मिळाली, मात्र त्यातून ते वाचले नाहीत. या खैरमोडे यांचे आष्टा येथे स्मृतीमंदिर उभारण्यात यावे, अशी भावना व्यक्त करून त्यासाठी पुरस्काराच्या रकमेपोटी देण्यात आलेली १ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम प्रा. पाटील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर श्री. पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना व्यासपीठावर बोलावून संस्थेच्या वतीने या पुरस्काराच्या रकमेत आणखी दहा लाख रुपयांची भर घालून खैरमोडे यांचे स्मारक उभारण्यात येईल, याची ग्वाही या प्रसंगी दिली.


2 comments:

  1. Replies
    1. Dear Sir/Madam,
      Thank you for your appreciation. But, I request you to kindly disclose your identity so readers can know who you are! Thank you.

      Delete