Monday 30 September 2019

सामाजिक न्यायासाठी प्रस्थापितांविरोधात राजा ढालेंचा अखेरपर्यंत संघर्ष: पँथर ज.वि. पवार

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत ज.वि. पवार. शेजारी डॉ. हरिष भालेराव व डॉ. जगन कराडे.


शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत ज.वि. पवार. शेजारी डॉ. हरिष भालेराव व डॉ. जगन कराडे.

कोल्हापूर, दि. ३० सप्टेंबर: मंत्रीपद, खासदारकी अशा क्षणभंगूर आमिषाच्या मोहात न पडता सामाजिक न्यायासाठी प्रस्थापितांविरोधात अखेरपर्यंत संघर्षाचा निर्धार राजा ढाले यांचा होता आणि त्यांनी तो अखेरच्या श्वासापर्यंत निभावला, असे प्रतिपादन दलित पँथर चळवळीचे प्रवर्तक व ज्येष्ठ विचारवंत ज.वि. पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने दलित चळवळ ते आंबेडकरी चळवळ: पँथर राजा ढाले यांचा परिप्रेक्ष्य या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव अध्यक्षस्थानी होते.
ज.वि. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये राजा ढाले यांचे पँथर चळवळीसह आंबेडकरी चळवळ आणि त्यांचे साहित्यिक-सांस्कृतिक योगदान यांच्यावर प्रकाश टाकला. ५० वर्षांहूनही अधिक काळचे निकटचे स्नेही या नात्याने त्यांच्याविषयी बोलताना श्री. पवार यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, राजा ढाले यांचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान हे त्यांनी आंबेडकरी चळवळीला दिलेल्या योगदानाइतकेच महत्त्वाचे आहे. किंबहुना, या चळवळीला वैचारिक अधिष्ठान देण्याचे काम त्यांनी आपल्या साहित्यातून केले. दलित साहित्याचा उगम झाला, त्यावेळी राजा ढाले यांनी पुढे होऊन त्या चळवळीला रक्षण पुरविले नसते, तर त्या चळवळीची तेव्हाच भ्रूणहत्या झाली असती, हे वास्तव आहे. त्यांचे हे योगदान कोणालाही नाकारता न येणारे आहे. दलित साहित्याच्या टीकाकारांना सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर देऊन त्यांनी त्यांची तोंडे बंद केली.
लघु अनियतकालिकांच्या चळवळीला खतपाणी घालून मोठे करण्याचे काम राजा ढाले यांनी केल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले, लघु अनितकालिक चळवळीच्या विद्यापीठाचे राजा कुलगुरू होते. या लढ्याला महत्त्व प्राप्त करून देणारे विद्रोह हे अनियतकालिक त्यांनी सुरू केले आणि तेव्हापासून मराठी साहित्यात दलित साहित्याची लाट निर्माण झाली. या चळवळीला दलित हे संबोधन असले तरी व्यवस्थेने लादलेले हे दलितत्व झुगारून त्यापासून उन्नत होण्यासाठी राजा ढाले सातत्याने आग्रही राहिले.
दलित हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी वापरला नसला तरी तो त्यांना अमान्य होता, असे मात्र नाही; असे त्यांनी दलित साहित्य सेवक संघातर्फे १७ डिसेंबर १९५६ रोजी आयोजित साहित्य संमेलनाच्या स्वीकारलेल्या निमंत्रणावरुन दिसते. तथापि, तत्पूर्वीच त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांची साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सविस्तर भूमिका आपल्याला समजू शकली नाही, अशी खंत श्री. पवार यांनी व्यक्त केली.
Dr. Harish Bhalerao
अध्यक्षीय भाषणात डॉ. हरिष भालेराव म्हणाले, राजा ढाले यांनी माणुसकीचा पाणउतारा करणारी व्यवस्था नाकारण्याचे बळ शोषित समाजात निर्माण केले. दलित ही नकारात्मक ओळख करून देणारा शब्द आम्ही राजा ढाले यांच्याच प्रेरणेने नाकारला. वैचारिक चळवळ केल्याखेरीज प्रस्थापितांविरोधातील बंड यशस्वी होऊ शकत नाही, याची जाणीवनिर्मिती ढाले यांच्या सामाजिक-साहित्यिक चळवळीने केली, हे त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. श्रीकृष्ण महाजन, रमेश शिपूरकर, प्रा. विनय कांबळे, नामदेवराव कांबळे यांच्यासह शहर व परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.


Friday 27 September 2019

तृतीयपंथीयांना सामाजिक हक्कांसाठी विद्यापीठ कटिबद्ध: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठातर्फे तृतीयपंथीयांसाठी आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) विशाल पिंजानी, मयुरी आळवेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव.


शिवाजी विद्यापीठातर्फे तृतीयपंथीयांसाठी आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासमवेत सहभागी तृतीयपंथी नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी.

कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: समाजातील प्रत्येक घटकाला शैक्षणिक सेवा पुरवणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. शिक्षणासह सामाजिक हक्कांपासून तृतीयपंथीय नागरिक वंचित राहणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्यास शिवाजी विद्यापीठ कटिबद्ध आहे, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे दिली.
विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे तृतीयपंथी व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, कौशल्य विकास अधिकारी महेश चव्हाण, मैत्री फौंडेशनच्या अध्यक्ष मयुरी आळवेकर आणि विशाल पिंजानी उपस्थित होते.
डॉ. शिर्के यावेळी म्हणाले की, अशी कार्यशाळा विद्यापीठात प्रथमच होत असून तृतीयपंथी व्यक्तींमधील कौशल्य विकासासाठी सुरु झालेला हा उपक्रम या पुढील काळातही निरंतर आणि व्यापक स्वरुपात विद्यापीठ राबवेल. या लोकांना सर्वांनी समतेची आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे. ही आपली सार्वजनिक जबाबदारी आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तृतीयपंथीय लोकांच्या समस्यांचे स्वरुप लक्षात येण्यासाठी विविध संशोधन प्रकल्पही हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या बृहत-आराखड्यामध्ये तृतीयपंथी व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठीही तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.
यावेळी मयुरी आळवेकर म्हणाल्या की, तृतीयपंथीयांचे प्रश्न विद्यापीठ प्रशासन समजावून घेत आहे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी विद्यापीठ पुढे आले आहे, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क विद्यापीठाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यशाळेत दिवसभरात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय व्याख्याते कौस्तुभ बंकापुरे, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. कृष्णा पाटील, पद्मश्री मादनाईक, डॉ. ए. एम. गुरव यांनी विविध विषयांवर कौशल्य प्रशिक्षण दिले. कार्यशाळेसाठी कोल्हापूर परिसरातील बहुसंख्य तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते.

अॅलिलोपॅथीविषयक सार्वत्रिक जागृती आवश्यक: डॉ. राबिया होउयाला

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ग्यान व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात बोलताना ट्युनिशियाच्या डॉ. राबिया होउयाला.


विद्यापीठात ग्यान व्याख्यानमालेस प्रारंभ
कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: कृत्रिम रसायनांच्या अतिवापरामुळे होत असलेल्या वातावरणातील प्रदूषणास मानवच जबाबदार आहे. या परिस्थितीमध्ये विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांमध्ये अॅलिलोपॅथीविषयक सार्वत्रिक जागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ट्युनिशिया येथील सौजे विद्यापीठाच्या प्राध्यापक व ट्युनिशियन असोसिएशन फॉर सस्टेनेबल अॅग्रीकल्चर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. राबिया  होउयाला यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अॅकॅडेमिक नेटवर्क (GIAN) या प्रकल्पांतर्गत डॉ. होउयाला यांच्या वनस्पतींच्या परस्परातील संबंधाचा शाश्वत शेतीमध्ये वापर या विषयावरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन आज नीलांबरी सभागृहात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.
भाषणाच्या सुरुवातीलाच डॉ. राबिया होउयाला यांनी हिंदीमधून उपस्थितांना अभिवादन केले. त्या म्हणाल्या, अॅलिलोपॅथीमध्ये पर्यावरणीय बदलांमुळे एका वनस्पतीकडून दुसऱ्या वनस्पतीवर किंवा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवावर होणाऱ्या जैवरासायनिक अभिक्रियांचा, परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अॅलिलोपॅथी. आजच्या काळात सातत्याने असे बदल होत आहेत आणि मानवी हस्तक्षेपामुळे ते अधिक गतिमान पद्धतीने होत आहेत. यामध्ये सकारात्मक परिणामांपेक्षा दुष्परिणामांचे प्रमाण अधिक दिसते आहे. ते रोखण्यासाठी या शास्त्राच्या अभ्यासाची मोठी गरज आहे. त्या दृष्टीने अशा व्याख्यानमालांचे आयोजन खूप महत्त्वाचे आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, ग्यानसारखे उपक्रम हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठीय समुदायांमध्ये विचारांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने अतिशय कळीची भूमिका बजावत आहेत. त्यातून ज्ञानवर्धनाबरोबरच अनेक नवनव्या गोष्टी स्थानिक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना माहिती होतात. त्यांचे उपयोजन करण्यासाठी तज्ज्ञांसमवेत चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन मिळविता येते. विद्यार्थी आणि संशोधक  यांच्यात अशा संकल्पनांची देवाणघेवाण होणे अत्यंत आवश्यक आहे.
या अभ्यासक्रमासाठी ४५ जणांनी नोंदणी केलेली आहे. यावेळी वनस्पतीशास्त्र  अधिविभागप्रमुख डॉ. वर्षा जाधव, प्रा. एस. आर. यादव,  प्रा. जी. बी. दीक्षित, प्रा. पी. डी. चव्हाण, प्रा. बी . कारदगे आदी उपस्थित होते. सुरवातीला डॉ. डी. के. गायकवाड यांनी स्वागत केले. प्रा. एस. एस. कांबळे यांनी परिचय करून दिला. प्रा. एन. बी. गायकवाड यांनी आभार मानले.

शिवाजी विद्यापीठात वैद्यकीय माहिती व्यवस्थापन शास्त्राचा नूतन अभ्यासक्रम



जर्मन विद्यापीठाच्या सहकार्याने राबविला जाणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम

कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाने एम.एस्सी.साठी वैद्यकीय माहिती व्यवस्थापन शास्त्रामधील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत आणि कालसुसंगत शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नवे दालन खुले केले आहे. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून चालविला जाणारा हा विद्यापीठातील पहिलाच अभ्यासक्रम आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत आहे.
वैद्यकीय माहिती व्यवस्थापन शास्त्र (मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट) ही जागतिक स्तरावरील हेल्थकेअर उद्योगाच्या दृष्टीने उदयास आलेली एक अतिशय महत्त्वाची विज्ञानशाखा आहे. तिचे महत्त्व लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र अधिविभागाने जर्मनीस्थित हॉश्चुल हॅनोव्हर युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस अँड आर्ट्स या विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या विषयाचा एम.एस्सी.साठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत अखेरच्या चौथ्या सत्रामध्ये उपरोक्त दोन विद्यापीठांच्या दरम्यान स्टुडंट्स एक्स्चेंज उपक्रम राबविण्यात येणार असल्याने येथील विद्यार्थ्यांना जर्मनीतील विद्यापीठात जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील या क्षेत्रातील नवनवीन प्रवाहांचा वेध घेता येणे शक्य होणार आहे. या कालावधीतील सदर विद्यार्थ्यांची तेथील निवास व भोजन व्यवस्था संबंधित विद्यापीठ करणार आहे. त्यासाठी वेगळे शैक्षणिक शुल्क नसेल.
या अभ्यासक्रमाचे महत्त्व व वैशिष्ट्ये सांगताना जैवरसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. के.डी. सोनवणे म्हणाले, या अभ्यासक्रमामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अध्यापन व संशोधन पद्धतींची थेट ओळख होणार आहे. त्याचप्रमाणे क्लिनिकल रिसर्चसाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. हेल्थकेअर क्षेत्रात ड्रग सिन्थेसिसपासून एनिमल अगर ह्युमन टेस्टिंगपर्यंत आणि तेथून अंतिम मान्यतेपर्यंतचा एक मोठा टप्पा असतो. त्यातल्या विविध टप्प्यांवर या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी असते. पोस्ट क्लिनिकल अभ्यास व संशोधन करण्यासाठीही मोठे अवकाश त्यांना उपलब्ध असते. अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स उद्योगांसह क्लिनिकल रिसर्च करणाऱ्या संस्था, औषध कंपन्या, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स, टेलिमेडिसीन आदी अनेकविध क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, क्लिनिकल डाटा असोसिएट्स, क्लिनिकल रिसर्चर, मेडिकल राईटिंग, कॅपिटल सीआरएफ डेव्हलपर तसेच संशोधक म्हणून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
झायडस, साव्हा, सिंजेन, एरिस लाइफ सायन्सेस, कॅक्टस, कॉग्निझंट, टाटा इएलएक्सआय, एस्ट्रा झेनिका, मर्क फार्मा, सिप्ला आदींसारख्या प्रख्यात हेल्थकेअर कंपन्यांसह वैद्यकीय हॉस्पिटल्समध्येही अनेक नवनवीन रोजगार संधी निर्माण होत असल्याचेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह डॉ. ज्योती जाधव, डॉ. अतुल कापडी, जर्मनी येथील डॉ. ज्ञानेश लिमये आणि हॉश्चुल हॅनोव्हर विद्यापीठातील अधिविभाग प्रमुख तसेच युनेस्कोच्या बायोएथिक्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. गेरहार्ड फर्टविंगेल यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

एम.एस्सी.- एम.एम.आय. अभ्यासक्रम असा आहे-
या अभ्यासक्रमात पुढील अनेक आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन हेल्थ सायन्सेस, एपिडिमियॉलॉजी, मेडिकल इन्फॉर्मेटिक्स, जर्मन लँग्वेज ए-१, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, क्लिनिकल क्वालिटी मॅनेजमेंट, क्लिनिकल रिसर्च, ड्रग डिस्कव्हरी, हॉस्पिटल मॅनेजमेंट, एथिक्स इन क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल, केस रिपोर्ट फॉर्मेट (सीआरएफ), ड्रग अप्रूव्हल प्रोसेस, नर्सिंग इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी इन्फॉर्मेशन सिस्टीम, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (टीक्यूएम), क्वालिटी एश्योरन्स, फार्मेको व्हिजिलन्स (पीव्ही), फार्मेको व्हिजिलन्स ग्लोबल परस्पेक्टीव्ह, ग्लोबल ऑडिट, ड्रग रेग्युलेटरी ऑथोरिटी, गाइडलाइन्स फॉर फार्मास्युटिकल्स- न्युट्रास्युटिकल्स अँड कॉस्मेटिक्स, गाइडलाइन्स फॉर हर्बल अँड अल्टरनेटिव्ह मेडिसीन, प्रोसेस ऑफ नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अॅन्ड हेल्थकेअर प्रोफेशनल्स (एन.ए.बी.एच.), डेटा अॅक्विझिशन, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट (सीडीएम), कलेक्शन इंटिग्रेशन अॅन्ड अव्हेलॅबिलिटी ऑफ डेटा, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन अँड क्वालिटी कंट्रोल, हॉस्पिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचआयएस), पेशंट रिपोर्टेड सिस्टीम्स (पीआरएस), पब्लिक हेल्थ अँड एचआयएस, प्रायव्हेट हॉस्पिटल्स अँड एचआयएस इत्यादी अत्याधुनिक हेल्थकेअर विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.

हेल्थकेअर उद्योगाला अद्ययावत मनुष्यबळासाठी उपयुक्त अभ्यासक्रम: डॉ. अतुल कापडी
शिवाजी विद्यापीठाने जर्मनीच्या विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू केलेला वैद्यकीय माहिती व्यवस्थापन हा एम.एस्सी. अभ्यासक्रम हेल्थकेअर उद्योगाला अद्ययावत शिक्षण व प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा एक अत्यावश्यक अभ्यासक्रम आहे, असे विद्यापीठाच्या एम.एम.आय. अभ्यासक्रमासाठी नियुक्त अभ्यास मंडळ उपसमितीचे सदस्य डॉ. अतुल कापडी यांनी सांगितले.
डॉ. कापडी म्हणाले, हेल्थकेअर इंडस्ट्री आता इन्फॉर्मेटिक्स, आयटी आधारित काम करणारी आहे. या डाटा ड्रिव्हन उद्योगाला माहिती तंत्रज्ञानाच्या ज्ञानाबरोबरच हेल्थकेअर विश्लेषणाचे ज्ञान असणारे मनुष्यबळही आवश्यक आहे. भारत सरकारने आयुष्मान भारत हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालविलेला आहे. तो संपूर्णतः इन्फोर्मेटिक्स आधारित आहे. त्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय हॉस्पिटलना आवश्यक असणाऱ्या एन.ए.बी.एच. (नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अॅन्ड हेल्थकेअर प्रोफेशनल्स) या अॅक्रिडिटेशनसाठी मोठ्या प्रमाणात डाटा द्यावा लागतो. त्यासाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासते. तिथेही या विद्यार्थ्यांना मोठी संधी असेल, असेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना लाभ: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
हेल्थकेअर उद्योगाशी निगडित असणारा मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा आजघडीचा एक महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. त्याचा लाभ शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व्हावा, या दृष्टीने जर्मनीतील हॉश्चुल हॅनोव्हर विद्यापीठाशी शिवाजी विद्यापीठाने सहकार्य करार करून स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम राबविण्याचे ठरविले. त्याचा या शाखेच्या विद्यार्थ्यांना भावी करिअरच्या दृष्टीने खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे.

Thursday 26 September 2019

ट्युनिशियाच्या डॉ. राबिया होउयाला यांची

शिवाजी विद्यापीठात ‘ग्यान’अंतर्गत व्याख्याने



आजपासून प्रारंभ
कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात उद्या, शुक्रवार (दि. २७ सप्टेंबर) पासून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर एकॅडेमिक नेटवर्क (GIAN) या प्रकल्पांतर्गत ट्युनिशिया येथील सौजे विद्यापीठाच्या प्राध्यापक व ट्युनिशियन असोसिएशन फॉर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती  डॉ. राबिया  होउयाला यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन उद्या सकाळी ११ वाजता नीलांबरी सभागृहात होईल. ही माहिती समन्वयक डॉ. कल्याणी पवार यांनी दिली.
ग्यान उपक्रमांतर्गत आयोजित या व्याख्यानमालेत डॉ. होउयाला या वनस्पतींच्या परस्परातील संबंधाचा शाश्वत शेतीमध्ये वापरया विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. वर्षा जाधव,  प्रा. एस. एस. कांबळे, प्रा. डी.के. गायकवाड,  प्रा. एन.बी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.
सध्याच्या कृत्रिम रसायनांच्या अतिवापरामुळे वातावरणातील प्रदूषण, मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, पिकांचे घटते उत्पादन आदी परिस्थितीमध्ये ऍलिलोपॅथीचा (Allelopathy) उपयोग शेतीला उपयुक्त ठरेल. वनस्पतींची ही क्षमता केवळ पर्यावरण रक्षणाच्याच नव्हे; तर, पिकांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असते. विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांमध्ये या उपयुक्ततेची जागृती करणे तसेच याच्या वापराचे प्रशिक्षण देणे या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत ऍलिलोपॅथीची संकल्पना, त्याचा शाश्वत शेतीमध्ये होऊ शकणारा उपयोग, जागतिक स्तरावरील त्याच्याशी निगडित घडामोडी, तणनाशकांचे दुष्परिणाम, तण कीडींचे जैविक नियंत्रण आदी विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
दि. २७ सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान चालणाऱ्या या व्याख्यानमालेसाठी ४५ पदवीधर, पदव्युत्तर  तसेच संशोधक विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहितीही डॉ. पवार यांनी दिली.