Sunday 18 November 2018

नव्या बदलांना सामोरे जाण्यास विद्यापीठांनी सज्ज व्हावे: कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचे प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा वर्धापनदिन उत्साहात

 


शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी समारंभाचे प्रमुख पाहुणे व जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील. सोबत अन्य अधिकारी.

शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी समारंभाचे प्रमुख पाहुणे व जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील. सोबत अन्य अधिकारी.

शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात काढण्यात आलेल्या रॅलीत मान्यवरांनी सहभाग घेतला.
शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापन दिन समारंभात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे तथा जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.


 जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. आर.के. कामत. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना प्रा.डॉ. भारती पाटील.

 विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना श्रीमती टी.एस. भुतकर.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना श्री. नामदेव चरापले.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना श्री. भास्कर सांगावकर.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना श्री. सदानंद माने.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना श्री. मारुती मगदूम.

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना डॉ. अरुणकुमार सकटे.
शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात विविध पारितोषिक विजेत्यांसमवेत प्रमुख पाहुणे तथा जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.


 
Dr. P.P. Patil, Vice-Chancellor of KBCNMU, Jalgaon
कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल गतीने होत आहेत. या नव्या बदलांना सामोरे जाण्यास विद्यापीठांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, सध्या उच्चशिक्षण क्षेत्रासमोर अनेक आर्थिक तसेच प्रतिकूल आव्हाने उभी राहताहेत. या परिस्थितीत जागतिक स्पर्धेत आपला विद्यार्थी कसा टिकेल, याची चिंता करण्याची वेळ प्रादेशिक विद्यापीठांवर आलेली आहे. त्यामुळे केवळ पदवीधर घडविण्यापेक्षा निश्चित रोजगाराची हमी देणारे शिक्षण देण्याची जबाबदारी विद्यापीठांनी स्वीकारण्याची गरज आज निर्माण झाली आहे. यापुढील काळात समाज विद्यापीठांकडे येणार नाही; तर विद्यापीठांनीच आता समाजाकडे जाण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःच्या कार्यप्रणालीत आणि धोरणांत बदल करण्याचीही गरज आहे. पारंपरिक शिक्षण पद्धती बदलून आता नवतंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा अंगिकार करण्याची आवश्यकता आहे.
विद्यापीठांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यामध्ये संशोधनाचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. पाटील पुढे म्हणाले, संशोधन ही विद्यापीठांची अविभाज्य ओळख आहे. यापुढील काळातही नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख संशोधनाचे महत्त्व अबाधित राहणार आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय संशोधनाच्या पलिकडे जाऊन विद्यापीठांनी संशोधनाला चालना देण्याची गरज आहे. कल्पकता आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर नवसंशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. परिसरातील एकही विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी विद्यापीठांनी स्वीकारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातील साम्यस्थळांचा उल्लेखही केला. ही दोन्ही विद्यापीठे कृषीबहुल क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपापल्या विभागात उच्चशिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय स्वरुपाची कामगिरी बजावली आहे. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामीणतेचा शिक्का पुसत राष्ट्रीय स्तरावर उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात मोहोर उमटविली असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या पुरोगामी प्रतिमा निर्मितीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे अतुलनीय योगदान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.


विद्यापीठात होणार व्हीएलएसआय डिझाईन व नॅनो-फॅब्रिक्स केंद्रे : कुलगुरू डॉ. शिंदे यांची घोषणा

Dr. Devanand Shinde, Vice Chancellor, Shivaji University
अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाने अलीकडच्या काळात घेतलेल्या भरारीची माहिती दिली. शिवाजी विद्यापीठात सेंटर फॉर व्हीएलएसआय डिझाईन आणि सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्स ही दोन केंद्रे उभारण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केली. ते म्हणाले, सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्समध्ये नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक कापड निर्मितीच्या अनुषंगाने संशोधन करण्यात येणार आहे. भविष्यातील कपडे हे याच तंत्रज्ञानाच्या आधाराने निर्माण होणारे असतील. काळाची पावले ओळखून विद्यापीठात हे केंद्र विकसित होते आहे. सेंटर फॉर व्हीएलएसआय डिझाईन हे केंद्र आपल्या राष्ट्रीय योगदानाचे प्रतीक ठरणार आहे. आजवर साऱ्या जगात केवळ गुगल या अमेरिकी कंपनीची जीपीएस प्रणाली वापरली जात होती. तथापि, भारताने स्वतः विकसित केलेली आय.आर.एन.एस.एस. ही उपग्रह मालिका अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केली आहे आणि त्यांच्या सहाय्याने भारत स्वतःची अत्याधुनिक जीपीएस प्रणाली विकसित करतो आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश केंद्रामध्येही या उपग्रह मालिकेचा एक रिसिव्हर बसविण्यात आला आहे आणि तो अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. हा रिसिव्हर बसविण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. या नव्या सेंटरच्या माध्यमातून संरक्षण खात्याला या आयआरएनएसएससाठी आवश्यक असणारे काही अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या चिप्स बनविण्याचे काम करण्यात येणार आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय प्रकल्पामध्ये योगदान देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आता सज्ज झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठात सुरू करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सायबर सिक्युरिटी रिसोर्स सेंटरबाबत माहिती देताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, देशातील आयआयटीसह अनेक आघाडीच्या शैक्षणिक व संशोधन संस्था यासाठी स्पर्धेत होत्या. अशा परिस्थितीतही शिवाजी विद्यापीठाला सायबर सिक्युरिटी सेंटर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंजूर केले आहे आणि त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे. सध्या ऑनलाइन आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असणारे घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार आणि इतर प्रकारची सायबर गुन्हेगारी यांना आळा घालण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची देशाला खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याचे काम हे केंद्र करणार आहे. हे मनुष्यबळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, यासाठी विद्यापीठ नॅसकॉम या राष्ट्रीय संघटनेच्या सहाय्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. त्या दृष्टीने या केंद्रामध्ये येत्या २६ नोव्हेंबरपासून पहिले प्रशिक्षण सुरू होणार असून प्रवेशही पूर्ण भरले आहेत. या केंद्रामार्फत सेफ्टी ऑडिट सेवा, शिक्षक व शासकीय अधिकारी प्रशिक्षण तसेच जागृती कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही या केंद्राचा मोठा लाभ होणार आहे. एक प्रकारे विद्यापीठाच्या लोकल टू ग्लोबल वाटचालीमधील हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठात इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरची स्थापना सुद्धा करण्यात आली असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठासारख्या शैक्षणिक व संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत सुविधांनी सुसज्ज असलेल्या व्यवस्थेला बाह्य जगताशी जोडण्याचा हा कालखंड आहे. विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या संशोधनाला जसे उद्योगांमध्ये स्थान मिळणे अभिप्रेत असते; त्याचप्रमाणे समाजामध्येही असे अनेक उपक्रमशील आणि उद्मशील लोक असतात, जे नाविन्यपूर्ण संकल्पनांतून समाजासाठी उपयुक्त असे नवे संशोधन करण्यासाठी प्रयत्नरत असतात. त्यांच्या प्रयत्नांना विद्यापीठातील सुविधांची जोड देऊन या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे संशोधन आकाराला आणण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अलिकडेच कोल्हापुरी चप्पलसारख्या जागतिक ख्यातीच्या उपक्रमाला क्लस्टरच्या माध्यमातून गती व ऊर्जा प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. असे अनेकानेक उपक्रम आता विद्यापीठाकडे चालून येत आहेत. त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ करीत आहे. नजीकच्या काळात शिवाजी विद्यापीठाचे हे सर्वात गतीशील केंद्र असणार आहे. समाजातील प्रयोगशील आणि नवनवीन संकल्पना राबवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पना घेऊन विद्यापीठाकडे यावे. विद्यापीठाचे इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटर त्यांना निश्चितपणे सर्वोतोपरी सहकार्य करील, असे आवाहनही कुलगुरूंनी या प्रसंगी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील विशेष मल्टिमीडिया संग्रहाचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांवरील विविध स्वरुपातील उपलब्ध ऑनलाईन स्रोतांचे एकत्रित संकलन करून त्याचे विशेष वेब-पेज विद्यापीठाच्या वेबसाईटवर निर्माण करण्यात आले आहे. यामध्ये महाराजांवरील १४२ ई-बुक्स व ऑडिओ बुक्स, विकिपीडियावरील लिंक्स, चित्रपट आणि पीएच.डी. शोधप्रबंध या सामग्रीचा समावेश आहे.

या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात 'नॅक'चे '+''' मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.

विविध पारितोषिक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा.डॉ. भारती पाटील (राज्यशास्त्र अधिविभाग), प्रा.डॉ. आर.के. कामत (इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग). विद्यापीठातील गुणवंत सेवक: श्रीमती टी.एस. भुतकर (सहाय्यक कुलसचिव), श्री. नामदेव नानासो चरापले (वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (रसायन)), श्री. भास्कर राजाराम सांगावकर (वरिष्ठ लघुलेखक), श्री. सदानंद श्रीधर माने (वरिष्ठ लघुलेखक), श्री. मारुती नारायण मगदूम (हवालदार). महाविद्यालयीन गुणवंत सेवक: डॉ. अरुणकुमार जयराम सकटे (प्रबंधक, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा).

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. श्रीमती नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच विद्यापीठ परिसरातून विशेष रॅलीचेही आयोजन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ.ए.एम. गुरव, डॉ. भारती पाटील, इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

6 comments:

  1. nice programme, special thanks to PRO Section of Shivaji University, for Create a Nice Blogs.

    Congratulation to team of PRO for developing nice Informative Blog

    Dr. Somnath Vadnre
    CHB Faculty of Dept. of Mass Communication and Journalism, KBC North Maharashtra University, Jalgoan

    ReplyDelete
  2. nice programme, special thanks to PRO Section of Shivaji University, for Create a Nice Blogs.

    Congratulation to team of PRO for developing nice Informative Blog

    Dr. Somnath Vadnre
    CHB Faculty of Dept. of Mass Communication and Journalism, KBC North Maharashtra University, Jalgoan

    ReplyDelete
  3. खूप छान वृत्तांकन. विद्यापीठ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. A very neatly arranged Programme

    ReplyDelete
  5. विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्या उत्कृष्ट कर्मचारी यांचे अभिनंदन

    ReplyDelete