Saturday 30 December 2023

शिवाजी विद्यापीठात डॉ.आप्पासाहेब पवार यांना अभिवादन

 कोल्हापूर, दि.30 डिसेंबर - शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त आज विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारामध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि        प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ.पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 'डॉ. आप्पासाहेब पवार कमवा शिका प्रबोधिनी'च्या वतीने डॉ.सी.टी.पवार यांनी पुष्पहार अर्पण केला.



शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन 
प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनी.

यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, प्रा.किसनराव कुराडे, डॉ.जे.जी.जाधव, डॉ.मानसिंगराव जगताप, डॉ.जे.पी.माळी, डॉ.प्रकाश बिलावर, डॉ.डी.के.गायकवाड, डॉ.के.एम.गरडकर, डॉ.एन.एल.तलवार, डॉ. जे जे जाधव, प्रा.टी.के.सरगर, प्रा.सी.एच.भोसले, डॉ.अशोक जगताप, विद्यार्थी भवन अधीक्षक डी.एच.भादले, अशोक साबळे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

मा.कुलगुरू यांच्या हस्ते विद्यापीठ अतिथीगृहासमोरील डॉ.पवार यांच्या पुतळयासह विद्यार्थी भवनमधील पुतळयास अभिवादन करण्यात आले.  त्यानंतर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे माजी विभागप्रमुख प्रा.चंद्रकांत भोसले यांचे 'विद्यार्थी भवनचे संस्कार आणि करिअरची जडणघडण' या विषयावर व्याख्यान झाले. डॉ.डी.एच.भादले यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती करूणा गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.सी.टी.पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. योगेश करचे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण कारंडे यांनी आभार मानले. विद्यार्थी भवनचे अधीक्षक डी.एच.भादले, सचिन बनसोडे, कागल बागल, जयदिप गुरव, गजानन नाईक, बाहुबली पाटीलयांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

-----

 

Friday 29 December 2023

संशोधकीय दृष्टीकोन रुजविण्यामध्ये ‘अन्वेषण’ उपयुक्त: डॉ. अमरेंद्र पाणी

 निकालात महाराष्ट्रातील विद्यापीठांची आघाडी

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोेनदिवसीय अन्वेषण संशोधन महोत्सवाच्या समारोप समारंभात बोलताना भारतीय विद्यापीठ महासंघाचे डॉ. अमरेंद्र पाणी. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. कविता ओझा, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. उषा राय नेगी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोेनदिवसीय अन्वेषण संशोधन महोत्सवातील विविध गटांतील विजेत्यांसमवेत  भारतीय विद्यापीठ महासंघाचे डॉ. अमरेंद्र पाणी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. उषा राय नेगी, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. कविता ओझा आदी. 


कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्यामध्ये अन्वेषण संशोधन महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरतो आहे, हे या स्पर्धेला वर्षागणिक वाढत्या प्रतिसादामधून स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसंचालक व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. अमरेंद्र पाणी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात एआययू, संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय अन्वेषण विद्यार्थी संशोधन महोत्सव-२०२३च्या समारोप समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकेही प्रदान करण्यात आली. निकालामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आघाडी नोंदविली.

डॉ. पाणी म्हणाले, अन्वेषण संशोधन महोत्सव हा देशभरातील संशोधक तरुणाईमध्ये एक लोकप्रिय मंच म्हणून पुढे येत आहे. २००७ पूर्वी महाराष्ट्रातील आविष्कार संशोधन स्पर्धा वगळता देशात एकही संशोधन, नवसंशोधन वा नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी स्पर्धा नव्हती. ही उणीव दूर करण्यासाठी भारतीय विद्यापीठ महासंघाने अन्वेषण संशोधन महोत्सव देशभरात आयोजित करण्यास सुरवात केली. याला देशातील तरुण संशोधकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून त्याद्वारे दर्जेदार संशोधने साकार झालेली आहेत. या स्पर्धेची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत वाढविण्यात येत असून त्यामध्ये अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धा ज्यात आंतरराष्ट्रीय संशोधक विद्यार्थी सहभागी होतील, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्यात राष्ट्रीय संशोधक सहभागी होतील आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधक तरुणाईला एकल पद्धतीनेही सहभागी होता येईल, अशा तीन प्रकारे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेचे यजमानपद अत्यंत यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह विद्यापीठ परिवाराला धन्यवाद दिले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, एखाद्या विषयावर संशोधन करीत असताना आपण अनेक प्रश्नांची उत्तरे सहजरित्या देतो. मात्र, सर्वसामान्यांच्या ज्या साध्यासोप्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला तितक्या सहजपणे देता येत नाहीत, त्या प्रश्नांना भिडून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तरुण संशोधकांनी भावी आयुष्यात करावा. अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपासून पळून न जाता, त्यांना सामोरे जा. विकास ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. प्रत्येक संशोधकाने स्वतःच्या संशोधनापुरती विकासाची व्याख्या शोधावी आणि तो विकास साध्य करण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी, अन्वेषण महोत्सवात सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे समाजोपयोगी तंत्रज्ञानात व अल्पखर्चिक व्यावसायिक उपयोजनात रुपांतरण करण्यासाठी युवा संशोधकांनी प्रयत्न करावा, असे सांगितले.

यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते. सुरवातीला समन्वयक डॉ. कविता ओझा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अहवाल वाचन डॉ. कबीर खराडे यांनी केले. राजेंद्र अतिग्रे यांनी निकाल वाचन केले. तृप्ती भापकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. विजयकुमार कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमास विषयतज्ज्ञ, संघ प्रमुख, देशभरातून आलेले परीक्षक, समन्वयक संघातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, पश्चिमा विभागातील पाच राज्यांतून आलेले संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर महोत्सवात पदवी स्तरापासून ते पीएचडी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा समावेश राहिला. पश्चिम विभागामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व राजस्थान या पाच राज्यांतील ११ विद्यापीठांच्या एकूण १०८ संशोधक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला. त्यांनी एकूण ६४ संशोधन प्रकल्प सादर केले. या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेचा अंतिम निकाल विभागनिहाय गुणानुक्रमे असा-

सामाजिक विज्ञान व मानव्यशास्त्रे: प्रथमेश पंडित खेडकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), गौरव पांडे, ऋतुजा जगतकर, स्नेहा कुमारी, गिन्नी केवलरमाणी (मुंबई विद्यापीठ, मुंबई), हर्षाली राठोड, शिवानी नरसीकर, प्रेम बिडवे (एम.जी.एम. विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर).

आरोग्य विज्ञान व संलग्न क्षेत्रे: सोपान नांगरे, (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), मानस मोरेश्वर महाले (मुंबई विद्यापीठ, मुंबई), अनुष्का शिंदे, श्रेया लोहकरे, निखिल मराठे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे).

मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान: सर्गुण तुषार बासराणी (डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर), अवंती पुराणिक, श्रावणी निघोत, प्रज्ञा मगदूम (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), सुरजीत घनश्याम अडगळे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर).

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान: लीना चौधरी (डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर), टोनी थॉमस, जस्टिना चतुर्वेदी, राझी शेख (डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई), दीपकुमार पटेल, मानन पटेल, झील पटेल, हिलाय पटेल (गणपत युनिव्हर्सिटी, गुजरात).

कृषी व संलग्न क्षेत्रे: ओम मनोज यादव (मुंबई विद्यापीठ, मुंबई), शंकर मोरे, साईनाथ सूर्यवंशी (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), भाविक चौधरी, ध्रुव सोनी, मितकुमार पटेल, साहील अमीन (गणपत युनिव्हर्सिटी, गुजरात).

आंतरविद्याशाखीय संशोधन: नामदेव ठोंबरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), संकेत पवार, दीपांशु शर्मा (एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर), तेजस पाटील (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव).

 

 

Thursday 28 December 2023

शिवाजी विद्यापीठात ‘अन्वेषण’ संशोधन महोत्सवास प्रारंभ

पाच राज्यांतील ११ विद्यापीठांतून ६४ संशोधन प्रकल्पांचा समावेश

शिवाजी विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ अन्वेषण-२०२३ संशोधन महोत्सवाचे उद्घाटन करताना भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसंचालक डॉ. अमरेंद्र पाणी व कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. कविता ओझा आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ अन्वेषण-२०२३ संशोधन महोत्सवातील संशोधन प्रकल्पाची संशोधकांकडून माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसंचालक डॉ. अमरेंद्र पाणी, डॉ. उषा राय नेगी, डॉ. कविता ओझा आदी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ अन्वेषण-२०२३ संशोधन महोत्सवातील संशोधन प्रकल्पाची संशोधकांकडून माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसंचालक डॉ. अमरेंद्र पाणी, डॉ. उषा राय नेगी, डॉ. कविता ओझा, डॉ. तानाजी चौगुले आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ अन्वेषण-२०२३ संशोधन महोत्सवातील संशोधन प्रकल्पाची माहिती जाणून घेताना विद्यार्थिनी.


(शिवाजी विद्यापीठात आयोजित 'अन्वेषण-२०२३' संशोधन महोत्सवाचा लघु- व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठात आज दोन दिवसीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ अन्वेषणविद्यार्थी संशोधन महोत्सव-२०२३ ला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसंचालक तथा संशोधन विभागाचे प्रमुख व अन्वेषणचे निमंत्रक डॉ. अमरेंद्र पाणी यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

भारतीय विद्यापीठ महासंघ, शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पदवी स्तरापासून ते पीएचडी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा या महोत्सवामध्ये समावेश आहे. पश्चिम विभागामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व राजस्थान या पाच राज्यांतील ११ विद्यापीठांनी महोत्सवात सहभाग घेतला असून त्यांनी एकूण ६४ संशोधन प्रकल्प सादर केले आहेत. महोत्सवात एकूण १०८ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले असून त्यात विद्यार्थिनींची संख्या ४५ इतकी आहे. संघप्रमुख १९ असून विषयतज्ज्ञ १७ आहेत.

महोत्सवात मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व संलग्न क्षेत्रे, आरोग्य विज्ञान व संलग्न क्षेत्रे, सामाजिक विज्ञान, मानव्यशास्त्रे, वाणिज्य, व्यावसायिक व्यवस्थापन आणि विधी या विविध क्षेत्रांतर्गत संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. त्यामध्ये बायोसेन्सर्स, ऑटोमेटेड कापणीयंत्रे, जिव्हास्पर्शावर चालणारी खुर्ची, अत्याधुनिक तंत्राधारित कांदाचाळ, आधुनिक एअरो-सेल, औषधे पुरविणारे फार्मा एटीएम, पाईपलाईनमधील बिघाड शोधणारे उपकरण, विजेचे प्रिपेड मीटर, वीज चोरी ओळखणारे थेफ्ट डिटेक्टर, एडव्हान्स्ड थिन फिल्म डिपॉझिशन, औषधी सुगंधी मेणबत्ती, अळंबीच्या साक्यापासून थ्री-डी प्रिंटींग, गवत व तंतूमुळांपासून भांडी निर्मिती, ऑटो कम्पोस्टेबल सॅनिटरी पॅड, ग्रामीण भागातील बालकांसाठी स्लीपिंग बॅग्ज, नाकाद्वारे मेंदूपर्यंत औषधवाही जेल, लिंगभेदविरहित ओष्ठशलाका यांसह शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना अशा विविध लक्ष्यवेधी संशोधन प्रकल्प व पोस्टर्सचा समावेश आहे. यातील अनेक संशोधने पेटंटपर्यंतही गेलेली आहेत.

उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिर्के, डॉ. पाणी, डॉ. नेगी यांनी सर्व संशोधन मांडणीची पाहणी केली. त्याचप्रमाणे सहभागी संशोधकांकडून त्यांच्या संशोधनाविषयी सविस्तर जाणूनही घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, अन्वेषण समन्वयक डॉ. कविता ओझा, डॉ. विजयकुमार कुंभार, डॉ. कबीर खराडे, डॉ. दत्तात्रय गायकवाड, डॉ. शंकर हंगीरगेकर, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. ऊर्मिला पोळ यांच्यासह विविध अधिविभागांचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



नागरी बँकांच्या कार्यक्षमतेत सर्वांगीण वाढ आवश्यक: डॉ. महादेव देशमुख

 शिवाजी विद्यापीठात शाखा व्यवस्थापकांसाठी विशेष उद्बोधन उपक्रम


 
शिवाजी विद्यापीठात नागरी सहकारी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांसाठी आयोजित मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. समोर उपस्थित शाखा व्यवस्थापक.



कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: सहकार क्षेत्रातील नागरी सहकारी बँकांचे योगदान खेडोपाड्यापासून नागरी समूहापर्यंतच्या लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उल्लेखनीय आहे, पण आजची बँकिंग क्षेत्रातली स्पर्धा पाहता नागरी सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेमध्ये सर्वच बाजूंनी लक्षणीय वाढ होणे गरजेचे आहे. असे झाले तरच नागरी सहकारी बँका या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी अधिक उत्तुंग काम करू शकतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी काल येथे केले. शिवाजी विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया चेअर, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांसाठी सदरचा मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला.

बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक डॉ. राजन पडवळ यांनी स्वागत केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे पहिले पुष्पही त्यांनी गुंफले. "मॉडर्न मॅनेजरियल ऍप्रोच" या विषयावर त्यांनी अवगत केले. कुंभी कासारी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय राऊत यांनी उपस्थितांना आरबीआय गाईडलाईन्स व डिपॉझिट्सचे महत्त्व तसेच ऍप्राईजल ऑफ लोन प्रोपोजल याबद्दल सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रा पंचगंगा नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस यांनी ब्रांच मॅनेजरच्या जबाबदाऱ्या व व्यवस्थापकीय मंडळाकडून त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि कस्टमर सर्विस याबद्दल मार्गदर्शन केले. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी ऑडिट्सचे विविध प्रकार आणि शाखेचा व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी सायबर कॉलेजच्या कौन्सिलर उर्मिला चव्हाण यांनी उपस्थितांना ब्रांच संभाळत असताना मोटिवेशनचे महत्त्व आणि संवाद कौशल्य याविषयी अवगत केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकांच्या असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर राजन पडवळ यांनी आभार मानले.