Tuesday 23 July 2019

'बीएआरसी 'च्या 'आयर्मोन' सुविधेची शिवाजी विद्यापीठात प्रस्थापना


-      अणुसंशोधन क्षेत्रातील संशोधनाचे नवे दालन खुले

-      सुविधा प्रस्थापित करणारे राज्यातील पहिलेच विद्यापीठ

कोल्हापूर, दि. २३ जुलै: भाभा अणू संशोधन केंद्राच्या 'आयर्मोन'  (IERMON) या सुविधेची प्रस्थापना हा शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा असून त्यामुळे येथील संशोधक शिक्षक व विद्यार्थ्यांना संशोधनाचे एक नवे दालन खुले झाले आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागामध्ये भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहकार्याने इंडियन एनव्हायर्नमेंटल रेडिएशन मॉनिटरिंग नेटवर्क (IERMON) ही सुविधा प्रस्थापित करण्यात आली आहे. तिचे औपचारिक उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के  म्हणाले, भाभा अणू संशोधन केंद्राने ही सुविधा विद्यापीठामध्ये मोफत प्रस्थापित केली आहे. अशी सुविधा प्रस्थापित करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले आहे. पर्यावरणात विविध प्रकारचे किरणोत्सार (रेडिएशन) असतात. त्यामध्ये गॅमा रेडिएशनचाही समावेश असतो. या किरणोत्साराच्या पातळीचे मापन, नोंदी घेऊन त्यावर सातत्याने नजर ठेवून विशिष्ट मर्यादेपलिकडे ती गेल्यास त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करणे या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे अणू संशोधन क्षेत्रामधील संशोधक शिक्षक व विद्यार्थी यांना या सर्व माहितीचा अभ्यास व विश्लेषण यासाठी अतिशय महत्त्वाचा उपयोग होणार आहे. विद्यापीठीय अणू संशोधन क्षेत्रात या निमित्ताने एक नवे दालन आज खुले झाले आहे. 'इस्रो'च्या रिसिव्हर प्रस्थापनेमुळे या पूर्वीच अवकाश संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचे दालन विद्यापीठातील संशोधकांना खुले झाले आहे. त्यानंतर आता या नव्या सुविधेमुळे विद्यापीठाच्या संशोधकीय वाटचालीला आणखी गती प्राप्त होईल. या सुविधेचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहनही डॉ. शिर्के यांनी केले.

'आयर्मोन' सुविधेच्या प्रस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. आर.जी. सोनकवडे यावेळी माहिती देताना म्हणाले, अणुऊर्जेमुळे केवळ विध्वंसक अणुबॉम्ब तयार होतो, असे नाही; तर त्यापासून विधायक अशा अनेक बाबी साध्य केल्या जातात. वीजनिर्मिती हा त्याचा महत्त्वाचा पैलू आहेच, पण त्यापुढे जाऊन उद्योग, कृषी, आरोग्य उपचार अशा अनेक बाबींसाठी अणुऊर्जा ही वरदान ठरली आहे. या क्षेत्रात अद्यापही संशोधनाच्या बऱ्याच संधी आहेत. त्याचप्रमाणे खनिज इंधनांच्या अतिरेकी वापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या परिणामांना सामोरे जावे लागत असताना अणुऊर्जेकडे पर्यायी स्रोत म्हणूनही पाहिले जाते आहे. किरणोत्सार नियंत्रित स्वरुपात असेल तर तो मानवासाठी वरदान ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर, निसर्गामध्ये सुद्धा भूजन्य आणि अवकाशजन्य अशा दोन प्रकारचे किरणोत्सार सुरू असतात. जमिनीमधील युरेनियम, थोरियम आणि पोटॅशियम हे पदार्थ सातत्याने किरणोत्सार करीत असतात. युरेनियमचे प्रमाण १ ते ५ पीपीएम आणि थोरियमचे प्रमाण २ ते १० पीपीएम इतके असते. जमिनीत मुळातच अवघे १ ते २ टक्के पॉटॅशियम असते. त्यातीलही केवळ ०.०१२ टक्के इतकेच पोटॅशियम किरणोत्सारी असते. याखेरीज अवकाशात, पर्यावरणात, हवेतही काही विशिष्ट प्रकारचे किरणोत्सार उपलब्ध असतात. काही विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांचा मानवावर काही अनिष्ट परिणाम होत नाही. मात्र, पातळी ओलांडल्यास ती मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकते. म्हणून त्यांचे सातत्याने मापन करीत राहणे आवश्यक असते. अशा सर्व प्रकारच्या किरणोत्साराचे मापन करणे 'आयर्मोन' सुविधेमुळे शक्य होते. नैसर्गिक किरणोत्साराची पातळी ओलांडली जात असल्याचे यामुळे वेळीच लक्षात येऊ शकते आणि त्यावर गरजेनुसार लघु, मध्यम आणि दूरगामी स्वरुपाच्या योग्य उपाययोजना करणेही संशोधकांना शक्य होते. त्या दृष्टीने नैसर्गिक पर्यावरणीय किरणोत्साराच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे दालन शिवाजी विद्यापीठात खुले होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.

या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख तथा अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील, डॉ.व्ही.जे.फुलारी, डॉ.एन.व्ही.मोहळकर, डॉ.आर.एस.व्हटकर, डॉ.एम.व्ही.टाकळे, डॉ.एन.एल.तरवार यांचेसह संशोधक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
------



Wednesday 17 July 2019

द्वेषाधारित राष्ट्रवादामुळे बुद्धीप्रामाण्यवाद आंधळा: डॉ. सूरज येंगडे


माणगाव परिषद शताब्दी वर्ष व्याख्यानमाला: पुष्प दुसरे

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'राष्ट्रवाद आणि आंबेडकरवाद' या विषयावर बोलताना अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथील डॉ. सूरज येंगडे. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.


कोल्हापूर, दि. १७ जुलै: सध्याचा आपला राष्ट्रवाद हा द्वेषाधारित असून तिने आपला बुद्धीप्रामाण्यवाद आंधळा करून सोडला आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथील संशोधक डॉ. सूरज येंगडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित माणगाव परिषद शताब्दी वर्ष व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना राष्ट्रवाद आणि आंबेडकरवाद या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
Dr. Suraj Yengade
भारतीय राष्ट्रवादाचे अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण करताना डॉ. येंगडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय समाज हा हजारो जातीजातींत विभागला गेला आहे. त्या अंतर्गत आणखी पोटजाती आहेत. इथली प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक नागरिक हा ज्याच्या त्याच्या जातीय-राष्ट्राशी प्रामाणिक आणि बांधील राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. या प्रत्येक पोटजातीत जिचा तिचा राष्ट्रवाद आहे. ही बाब एखाद्या स्फोटकापेक्षा कमी नाही. म्हणून खऱ्या राष्ट्रवादाच्या प्रस्थापनेसाठी प्रथमतः हा जातीजातींमधील, पोटजातींमधील भेद संपूर्णतः नष्ट करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपला राष्ट्रवाद हा परस्पर द्वेषाबरोबरच क्रिकेट-राष्ट्रवाद आहे. यामुळे खेळामध्ये अभिप्रेत असलेल्या खिलाडूवृत्तीला हरताळ फासला जातो आणि अखिलाडू राष्ट्रवाद हा खरा राष्ट्रवाद पुढे आणला जातो.
डॉ. येंगडे पुढे म्हणाले, अंबानी, अदानी, मल्ल्या असले धनिक लोक आपल्या राष्ट्रवादाची भूमिका व दिशा ठरवितात. तो देशाचा राष्ट्रवाद म्हणून पुढे केला जातो. कष्टकरी, मजूर, महिला, शोषित, वंचित यांचा राष्ट्रवाद हा आपला कधीच होत नाही. त्याचबरोबर जुन्या काळात संस्कृतीच्या नावाखाली झालेल्या चुकीच्या, समाजविघातक गोष्टींचे नव्याने पुनरुज्जीवन आणि त्यांची बहुजनांच्या पाठिंब्यावरच पुनर्प्रस्थापना करून सांस्कृतिक राष्ट्रवाद या गोंडस नावाखाली थोपविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राष्ट्रवादाचा पुरस्कारच करावयाचा असेल तर तो आर्थिक राष्ट्रवादाचा केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

डॉ. सूरज येंगडे
राष्ट्रवाद या संकल्पनेच्या उगमाविषयी बोलताना डॉ. येंगडे म्हणाले, राष्ट्रवाद ही संकल्पना समूहवादातून पुढे आलेली आहे. पूर्वीच्या काळी माणूस छोट्या छोट्या समूहांतून राहायचा. त्यामुळे साहजिकच तिथे असुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात असायची. या असुरक्षिततेमधून त्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन देणारा त्यांचा म्होरक्या असायचा. त्याच्याप्रती त्यांना वारंवार उद्घोष व जयजयकार करून आपली निष्ठा प्रदर्शित करावी लागायची. त्यातून त्या राजाचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर तयार होत असत. पुढे आपले वर्चस्व टिकविण्यासाठी वेगवेगळे कायदे करून समाजघटकांवरील आपले नियंत्रण व वर्चस्व अबाधित राखण्याचा हे वरिष्ठ घटक प्रयत्न करीत. मनुस्मृती आणि तत्सदृश कायद्यांनी कनिष्ठ समाजघटकांवर असे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या बळावर त्यांनी हजारो वर्षे आपली सत्ता त्यांच्यावर गाजविली. भारतातील विषमतेचे मूळ या सामाजिक कारणांमध्येच दडलेले आहे. हीच असुरक्षिततेची भीती व दहशत आजच्या राष्ट्रवादातही प्रतिबिंबित झालेली दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादाला भावनिक व मानसिक स्तरावरील दुधारी तलवार म्हणत. राष्ट्रवादासाठी तुम्हाला एक बाह्यशक्ती आणि तिची भिती यांची गरज असते. भीती नसेल तर राष्ट्रवादाचीही गरज नाही, असे ते म्हणत. खरे तर आजच्या युगात अशी भीती नसेल तर आपण उत्तम ग्लोबल सिटीझन होऊन जाऊ; मुक्त, स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरू शकू.
डॉ. येंगडे पुढे म्हणाले, जागतिकीकरणाने आपल्याला जगाशी उन्मुक्तपणे जोडले, हा सकारात्मक आणि आर्थिक बाबतीत दुय्यमत्व लादले, हा नकारात्मक, असे परिणाम आपल्यावर झाले. या काळात अशा प्रकारचे राष्ट्रवादी होणे आपल्याला परवडणारे नाही. राष्ट्रवाद हवाच असेल तर तो प्रागतिक मुक्ततावादी असायला हवा, महिला सबलीकरणाचा आग्रह धरणारा राष्ट्रवाद असायला हवा, मध्ययुगीन, पुरणमतवादी संकल्पनांतून बाहेर कढून भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने घेऊन जाणारा राष्ट्रवाद हवा, भावनिक आणि मानसिक असुरक्षिततेमधून बाहेर काढणारा राष्ट्रवाद हवा, कोणाला वाचविणारा अगर कोणाला बदनाम करणारा नव्हे, तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या मार्गाने जाणारा राष्ट्रवाद हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. महाजन म्हणाले, भारतीय म्हणून आपली ओळख देत असताना आपण स्वतःच्या इतर ओळखी मात्र आपण सोडल्या नाहीत, ही फार मोठी चूक आहे. असे साऱ्या प्रकारचे भेद आपण सोडून दिले पाहिजेत. राष्ट्रवादापेक्षा मानवतावाद हा सर्वश्रेष्ठ आहे. मानवी मूल्याधिष्ठित, समतामूलक आणि अहिंसात्मक राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानिक मूल्ये अंमलात आणण्याची खरी गरज आहे.
सुरवातीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तेजपाल मोहरेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर सचिन देठे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday 11 July 2019

कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसमवेत झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि क्लस्टरचे अरुण सातपुते. यावेळी (डावीकडून) व्ही.टी. पाटील, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, डॉ. ए.एम. गुरव, उपमहापौर भूपाल शेटे, महेश काकडे आदी.


कोल्हापूर, दि. ११ जुलै: कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चप्पल क्लस्टरला सर्वोतोपरी सहाय्य करील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि कोल्हापुरी चप्पल क्लस्टर समूह यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कोल्हापुरी चप्पल ही अत्यंत दर्जेदार आहे. या चप्पलला कालसुसंगत असे आधुनिक रुप प्रदान करण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान विकास, पाणन व व्यवस्थापन आणि कौशल्य निर्मिती या चार आघाड्यांवर विद्यापीठ सक्रियपणे मदत करील. त्या दृष्टीने हा सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
उपमहापौर तथा क्लस्टरचे अध्यक्ष भूपाल शेटे म्हणाले, कोल्हापूर चप्पलच्या निर्मितीमध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कारागीरांवर पारंपरिक स्वरुपाची अनेक बंधने आहेत. त्या बंधनात तसेच अत्यंत वंचित स्थितीत राहून ते कोल्हापुरी चप्पलचा दर्जा आणि वैभव जपण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी आणि कोल्हापुरी चप्पलला तिचे पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी क्लस्टर प्रयत्नशील आहे. कोल्हापुरी चप्पलच्या बरोबरीनेच कोल्हापुरी शूज सुद्धा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड कर्नाटकात नेण्याचे काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे कोल्हापुरी चप्पलला जी.आय. मिळविण्यासाठीही आम्ही प्रयत्न करतो आहोत. या सर्व बाबींमध्ये विद्यापीठाकडून सहकार्य अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे.
यावेळी सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि अरुण सातपुते यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

शिवबा क्राफ्ट बुकचे प्रकाशन
'शिवबा' या क्राफ्टबुकचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, साईप्रसाद बेकनाळकर यांच्यासह मान्यवर.

या प्रसंगी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या संकल्पनेतून साईप्रसाद बेकनाळकर यांनी साकारलेल्या शिवबा या क्राफ्ट बुकचे प्रकाशन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवबा हे क्राफ्ट बुक हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांवर बेतलेले असून गड-किल्ल्यांच्या निर्मितीसह अनेक अभिनव उपक्रम यात विद्यार्थ्यांसाठी आहेत.
या क्राफ्ट बुकची संकल्पना अत्यंत अत्यंत अभिनव असून नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.
यावेळी साईप्रसाद बेकनाळकर यांनी अशा आणखी २३ महनीय व्यक्तीमत्त्वांवर बेतलेल्या क्राफ्ट बुकच्या निर्मितीचा हा प्रकल्प असून त्याचे विद्यार्थी-पालकांतून अत्यंत सकारात्मक स्वागत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कलाकौशल्य विकासासाठी विद्यापीठाचा एनडीज् आर्ट वर्ल्डसमवेत सामंजस्य करार



चित्रपटसृष्टीला आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी करार उपयुक्त: नितीन चंद्रकांत देसाई

खालापूर (मुंबई) येथील एनडीज् आर्ट वर्ल्डसमवेत सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. सोबत (डावीकडून) वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, उपमहापौर भूपाल शेटे, अरुण सातपुते.

कोल्हापूर, दि. ११ जुलै: चित्रपटसृष्टीला विविध २८ प्रकारच्या कलाकौशल्यांची गरज असते. या सर्व कलाप्रकारांत कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाला संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलादिग्दर्शक तथा खालापूर (मुंबई) येथील एनडीज् आर्ट वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि एनडीज् आर्ट वर्ल्ड यांच्यामध्ये विविध कौशल्य विकास व प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार झाला. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते.
श्री. देसाई म्हणाले, शिवाजी विद्यापीठाशी करण्यात आलेला हा सामंजस्य करार केवळ पुस्तकी स्वरुपाचा नाही, तर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह काम शिकवून तयार करण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. या कौशल्य विकास कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रतेची अगर वयाचीही अट असणार नाही. ज्या कोणाला आपल्याकडील उपजत कौशल्यांचा विकास करावयाचा आहे किंवा एखादे कौशल्य शिकून त्यामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला इथे प्रशिक्षणाची संधी देण्यात येईल. या कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी तर उपलब्ध होतीलच, मात्र त्यांच्यातून पुढे एखादा लघुउद्योजक अगर व्यावसायिक सुद्धा निर्माण होईल, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूरच्या कलाकारांमध्ये तशी क्षमता निश्चितपणे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. देसाई पुढे म्हणाले, सुमारे ३३ वर्षांचा कलादिग्दर्शनासह चित्रपट क्षेत्रातला अनुभव गाठीशी बांधून दोन वेळा ऑस्करविजेत्या ऑलिव्हर स्टोन यांचा एक प्रकल्प आवश्यक सुविधांअभावी भारताऐवजी मोरोक्कोला गेल्यानंतर मोठ्या जिद्दीने एनडी स्टुडिओ निर्माण केला. या स्टुडिओमुळे परिसरातल्या २७ गावांतील तरुण-तरुणींना अनेक प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात यश आले. कोल्हापूरच्या तर मातीत प्रचंड कस आहे आणि मुलामुलींत भरपूर कला आहे, त्यामुळे या परिसरातून तर कलाकारांची मोठी फौजच आपण निर्माण करू शकतो.
कोल्हापूर हे चित्रपटसृष्टीचे माहेरघर असल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, बाबूराव पेंटर यांनी पहिला स्वदेशी कॅमेरा याच भूमीत बनविला. त्यांच्यासह भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या मातीत घडले. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. त्यांना इथल्या कुशल, प्रयोगशील कलाकारांची आणि मनुष्यबळाची मोठी साथ लाभली. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये कोल्हापूरची स्वतंत्र अशी ओळख आहे. विद्यापीठाने ही ओळख वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या साथीने कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या ऊर्जितावस्थेसाठी काम करण्यास एनडी स्टुडिओला अतिशय आनंद वाटत आहे.
कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या अनुषंगाने बोलताना श्री. देसाई म्हणाले, या चित्रनगरीच्या प्रकल्प विकासाचा आराखडा महाराष्ट्र शासनाला सादर केला आहे. त्यावर शासकीय स्तरावर कार्यवाही सुरू आहे. एखाद्या ठिकाणी चित्रपट निर्माण करण्यासाठी लोकेशन, लोक आणि चांगले भोजन या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात. कोल्हापूर या तीनही बाबतीत अत्यंत समृद्ध आहे. त्यामुळे येथे चित्रपट निर्मितीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. केवळ चित्रनगरीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर केवळ बांधकामे करून भागत नाही, तर त्यामध्ये आत्मा फुंकावा लागतो. शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यास अवघ्या दोन वर्षांत इथल्या चित्रनगरीचा जागतिक दर्जाचा विकास केल्याखेरीज राहणार नाही. म्हणूनच कर्जतनंतर महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीचे पुढील डेस्टीनेशन म्हणून मी कोल्हापूरकडे मोठ्या आशा-अपेक्षेने पाहतो आहे. त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत राहीन, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, नितीन देसाई यांच्यासारख्या महान कलाकाराच्या कष्टातून साकारलेल्या संस्थेबरोबर सामंजस्य करार करीत असताना विद्यापीठाला अतिशय आनंद होतो आहे. विविध २८ प्रकारची कौशल्ये केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे आणि मनोरंजनाचे रुपांतर रोजगारात करण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. पुढे त्यातूनच कलेचे रुपांतर व्यवसायात करणेही शक्य होणार आहे. आज कोणाही उद्योजक-व्यावसायिकाला प्रशिक्षण देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे जॉब-रेडी मनुष्यबळ घडविण्याचे काम याद्वारे साध्य होईल.
या प्रसंगी सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि श्री. नितीन देसाई यांनी स्वाक्षरी केल्या. या प्रसंगी कोल्हापूरचे उपमहापौर भूपाल शेटे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Friday 5 July 2019

समाजशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संकेतस्थळाचे विद्यापीठात उद्घाटन



 
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संकेतस्थळाचे लाँचिंग करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

या प्रसंगी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. जगन कराडे
वेबसाईटचे होमपेज


डिसेंबरमध्ये परिषद; २५ देशांचे समाजशास्त्रज्ञ उपस्थित राहणार

कोल्हापूर, दि. जुलै: आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी स्वतंत्र वेबसाईट निर्माण करून त्याद्वारे नोंदणी करण्याचा समाजशास्त्र अधिविभागाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य स्वरुपाचा आहे. यातून विद्यापीठाबरोबरच अधिविभागाची जगभरातील समाजशास्त्रज्ञांमध्ये उत्तम प्रतिमानिर्मिती होईल, असा विश्वास प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागामार्फत दि. १० ते १२ डिसेंबर २०१९ या कालावधी 'सोसायटी: रिकन्स्ट्रक्शन, रिफ्लेक्शन अँड रिस्पॉन्सिबीलिटीज' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या नोंदणीसाठी एसआरआरआर डॉट इन’ (srrr.in) या विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून या संकेतस्थळाचे द्घाटन प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आज झाले. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात या संकेतस्थळाच्या लाँचिंगचा औपचारिक कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून समाजशास्त्र विषयातील जागतिक स्तरावरील विचारवंत, प्रज्ञावंत, शास्त्रज्ञ, अभ्यासक यांच्या विचारांचे आदान-प्रदान होणार आहे. विद्यापीठासाठी ही अत्यंत महत्त्वाची पर्वणी आहे. स्थानिक संशोधकांना या परिषदेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनीही विशेष वेबसाईट निर्मितीच्या उपक्रमाचे स्वागत केले आणि इतर विभागांसाठी सुद्धा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे सांगितले.
कोल्हापूर येथील मीडियाटेकच्या वतीने या वेबसाईटची निर्मिती केली आहे. समाजशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सुमारे २५ देशांतील समाजशास्त्रज्ञ व विचारवंत उपस्थित राहतील आणि त्यांच्या सहभागामुळे या परिषदेचा दर्जा हा अत्यंत वरचा राहील, असे समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.जगन कराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. डॉ. प्रतिमा पवार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. आर. बी. पाटील, डॉ. एस. एस. महाजन, डॉ. के. व्ही. मारूलकर, डॉ. एच. एम. ठकार, डॉ. व्ही. बी. ककडे, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. पी. एम. माने, राजेश शिंदे यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.