Monday, 6 July 2026

संवाद कौशल्य हीच प्रभावी प्रशासनाची गुरुकिल्ली : डॉ. आलोक जत्राटकर

शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर.

शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. कृष्णा पाटील, विनय शिंदे आणि दिलीप मोहाडीकर.

शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात डॉ. आलोक जत्राटकर यांचे स्वागत करताना विनय शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. कृष्णा पाटील व दिलीप मोहाडीकर.


(शिवाजी विद्यापीठात आयोजित उद्बोधन वर्गाची ध्वनीचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ६ जुलै: प्रशासकीय कामकाजात प्रभावी संवाद कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण ज्या संस्थेमध्ये कार्यरत आहोत, त्या संस्थेची उद्दिष्टे, कार्यपद्धती, नियम आणि विविध उपक्रमांची अचूक माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे आवश्यक आहे. विद्यार्थी,पालक आणि अभ्यागतांशी सकारात्मक व परिणामकारक संवाद साधण्याची क्षमता ही प्रभावी प्रशासनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने समूह जनजागृती कार्यक्रम (Community Awareness Programme) या अंतर्गत विद्यापीठातील हंगामी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी 'प्रशासकीय साक्षरता आणि जीवन कौशल्ये' या विषयावरील उद्बोधन वर्गाचे आयोजन मानव्यविद्या सभागृहात शनिवारी (दि. ४) करण्यात आले होते. यावेळी 'शिवाजी विद्यापीठ आणि संवाद कौशल्य' या विषयावर डॉ. जत्राटकर मार्गदर्शन करीत होते. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. जत्राटकर म्हणाले की, कोणत्याही कार्यालयाची सकारात्मक प्रतिमा घडविण्यात तेथील कर्मचाऱ्यांचा संवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रशासकीय प्रक्रियेची माहिती, कायद्याचे प्राथमिक ज्ञान आणि प्रभावी संवाद कौशल्य यांच्या साहाय्याने विद्यार्थी व नागरिकांना दर्जेदार सेवा देता येते. बदलत्या काळात संवाद कौशल्य ही प्रत्येक कर्मचाऱ्याची मूलभूत गरज बनली असून, प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वात व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि संवादातील स्पष्टता विकसित केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी 'प्रशासकीय साक्षरता आणि जीवन कौशल्ये' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी सांगितले की, प्रशासकीय कार्यात वेळेचे नियोजन, शिस्त, जबाबदारीची जाणीव, सकारात्मक वृत्ती, आवश्यक कौशल्ये आणि अद्ययावत ज्ञान यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या डिजिटल युगात प्रशासकीय साक्षरतेसोबतच डिजिटल साक्षरता, संगणक साक्षरता आणि कायद्याचे प्राथमिक ज्ञान प्रत्येक कर्मचाऱ्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. प्रशासनात होत असलेल्या तांत्रिक बदलांचा स्वीकार करून सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कोर्स को-ऑर्डिनेटर नाझिया मुल्लाणी यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत सुरू असलेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. तसेच ऑनलाईन एम.कॉम., ऑनलाईन एम.एस्सी. (गणित) आणि ऑनलाईन एम.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली.

डॉ. संजय चोपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दयानंद गावडे यांनी परिचय करून दिला. डॉ. नगीना माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर सुमन लोहार यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, सहाय्यक कुलसचिव दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. नितीन रणदिवे, विश्वनाथ वरुटे, रुपाली बन्ने, तेजस्विनी शिंदे यांच्यासह शंभरहून अधिक हंगामी रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.


संततधार पावसामुळे शिवाजी विद्यापीठातील जलाशयांच्या पातळीत लक्षणीय वाढ

शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाकडील तलाव पावसामुळे गतीने भरू लागला आहे.

शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाकडील तलाव पावसामुळे गतीने भरू लागला आहे.

शिवाजी विद्यापीठातील वि.स. खांडेकर भाषा भवनाकडील तलावात पावसामुळे धबधब्यांच्या स्वरुपात परिसरातील पाणी भरू लागले आहे.

 

कोल्हापूर, दि. ६ जुलै: कोल्हापूर शहर व परिसरात गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शिवाजी विद्यापीठ परिसरातील जलस्रोत वेगाने भरू लागले असून, परिसरातील तलाव, विहिरी आणि शेततळ्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसराला पुन्हा एकदा हिरवाईची आणि जलसमृद्धीची नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

विद्यापीठातील भाषा भवन परिसरातील 'शिव जलाशय' आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाजवळील तलाव यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिसरात पावसाचे पाणी साठविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या चरींमधून वाहत येणारे पाणी भाषा भवन तलावात धबधब्याप्रमाणे कोसळत असल्याने तेथील दृश्य विशेष आकर्षण ठरत आहे.

सध्या ढगाळ वातावरण, हिरवाईने नटलेला परिसर, जलाशयांतील वाढता पाणीसाठा आणि तलावात धबधब्यांप्रमाणे कोसळणारे पाणी यामुळे विद्यापीठ परिसराने रमणीय रूप धारण केले आहे. निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि विद्यापीठातील कर्मचारी या नयनरम्य दृश्याचा आनंद घेत आहेत.

पावसामुळे जलाशयांतील पाणीसाठा दिवसागणिक वाढत असून, परिसरातील वृक्षसंपदा आणि जैवविविधतेलाही त्याचा मोठा लाभ होत आहे. जलसंवर्धनाच्या दृष्टीने विद्यापीठाने उभारलेल्या विविध संरचनांमुळे पावसाच्या प्रत्येक थेंबाचे प्रभावी संधारण होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. विद्यापीठ परिसरातील नैसर्गिक जलस्रोत भरू लागल्याने भूजलपातळी वाढण्यास मदत होणार असून, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास हे जलाशय लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा आहे.

संत गुलाबराव महाराज यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन


कोल्हापूर, दि. ६ जुलै: संत गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज त्यांना प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

संत श्री गुलाबराव महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती...

संत श्री गुलाबराव महाराज (दि. ६ जुलै १८८१ - २० सप्टेंबर १९१५)


संत शिरोमणी प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांचा जन्म ६ जुलै १८८१ रोजी अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथे गोंदुजी व अलोकाबाई मोहोड यांच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव गुलाब गोंदुजी मोहोड असे होते. वयाच्या अवघ्या नऊ महिन्यांत त्यांना अंधत्व आले, परंतु असामान्य बुद्धिमत्ता, आध्यात्मिक चिंतन व विलक्षण स्मरणशक्तीच्या बळावर त्यांनी ज्ञानाचे अद्वितीय शिखर गाठले. त्यांचे बालपण माधान येथे व्यतीत झाले असून हे गाव त्यांच्या कार्यामुळे पावन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.

अल्पायुषी असूनही त्यांनी अध्यात्म, तत्त्वज्ञान, भक्ती, वेदान्त व साहित्य या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी सुमारे १३४ ग्रंथ, २०९९ अभंग, २२५२ पदे, १२५० गीते, १००० लोक व २३,००० ओव्या अशी अमूल्य साहित्यसंपदा निर्माण केली. त्यांचे लेखन संस्कृत, मराठी, हिंदी, ब्रजभाषा व वऱ्हाडी भाषेत उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणारे आणि माधुर्यभक्तीचे महान उपासक म्हणून त्यांना विशेष मान्यता मिळाली. भारत सरकारने सन २०१९ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित केले. २० सप्टेंबर १९१५ रोजी पुणे येथे त्यांचे निर्वाण झाले.

Thursday, 2 July 2026

पूर व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज : डॉ. वेंकटेश मेरवाडे

शिवाजी विद्यापीठात पूर व्यवस्थापनविषयक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. वेंकटेश मेरवाडे. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. अभिलाष आर. आणि आशिष दोशी.

(पूर व्यवस्थापन कार्यशाळेची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २ जुलै: पूर ही नैसर्गिक आपत्ती असली तरी आधुनिक तंत्रज्ञान, अचूक पूर मॉडेलिंग आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतात. समाज आणि समुदाय सुरक्षित ठेवण्यासाठी पूर व्यवस्थापन क्षेत्रात कौशल्य, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील जलसंपदा व पूर मॉडेलिंग तज्ज्ञ डॉ. वेंकटेश मेरवाडे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात भूगोल अधिविभाग, सेंटर फॉर क्लायमॅट चेंज अँड सस्टेनॅबिलीटी स्टडीज आणि अॅक्वास्फिअर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूर व्यवस्थापन व पूर मॉडेलिंग विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रकाश राऊत होते.

डॉ. मेरवाडे म्हणाले, काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाअभावी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिंता होती. मात्र, दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पूरस्थितीही उद्भवू शकते. पूर कोणालाही अपेक्षित नसला तरी तो वास्तव आहे. त्यामुळे अशा आपत्तींचा अभ्यास करून त्यासाठी सक्षम नियोजन करणे ही काळाची गरज आहे. समाज सुरक्षित ठेवण्यासाठी पूर व्यवस्थापन क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असून, त्यासाठी अचूक पूर मॉडेलिंग, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), आधुनिक संगणकीय तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञांची आवश्यकता आहे. पूर व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी एक-आयामी (1D) आणि द्वि-आयामी (2D) पूर मॉडेलिंग तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेत सहभागी संशोधक, विद्यार्थी आणि विविध संस्थांमधून आलेल्या प्रतिनिधींना 1D 2D पूर मॉडेलिंगविषयी सखोल माहिती देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून, कार्यशाळेतील प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि चर्चांमधून सहभागींची संशोधन क्षमता अधिक विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रकाश राऊत यांनी पूर व्यवस्थापनासाठी आधुनिक भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पूर मॉडेलिंगचे महत्त्व अधोरेखित केले. कोल्हापूर शहराला दर दोन-तीन वर्षांनी मोठ्या पुरांचा सामना करावा लागत असल्याने पूरपूर्व नियोजनासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पूर मॉडेलिंगमध्ये भूभागाची उंची (Elevation), उतार (Slope), नदीपासूनचे अंतर, मातीचा प्रकार, जमिनीचा वापर, पर्जन्यमान, जलप्रवाह आणि नदी जाळे यांसारख्या घटकांचा अचूक अभ्यास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाने GIS प्रयोगशाळा, GIS पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम तसेच अत्याधुनिक माहिती संच (डेटा) विकसित करून या क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. ArcGIS, QGIS आणि HEC-RAS यांसारख्या आधुनिक साधनांच्या साहाय्याने पूर मॉडेलिंग अधिक परिणामकारक होत असून, या कार्यशाळेमुळे महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी, संशोधक आणि तज्ज्ञांना पूर व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंचावर बेळगावच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. अभिलाष आर. आणि सिग्मा इन्फ्राप्लॅन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे आशिष दोशी उपस्थित होते. भूगोल अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी स्वागत केले. प्रशांत पाटील यांनी परिचय करून दिला, तर आशिष दोशी यांनी आभार मानले.

Monday, 29 June 2026

मोत्यांच्या शेतीसाठीच्या अभिनव टाकीच्या डिझाईनला पेटंट

शिवाजी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी वरदायी संशोधन


शिवाजी विद्यापीठाचे पेटंटप्राप्त टाकीचे डिझाईन

डॉ. नितीन कांबळे


साक्षी ढेकणे

दिलीप कांबळे

विशाल सुतार


 

कोल्हापूर, दि. २९ जून: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाने विकसित केलेल्या गोड्या पाण्यातील मोती शेतीसाठीच्या टाकीच्या डिझाईनला नुकतेच भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. प्रयोगशाळेपासून शेतीपर्यंत या प्रकारचे संशोधन करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्रज्ञांना हे यश मिळाले आहे.

विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या साक्षी श्रीकांत ढेकणे, विशाल संभाजी सुतार आणि दिलीप आनंदराव कांबळे यांच्या संशोधनकार्याचे हे फलित आहे.

भारतामध्ये गोड्या पाण्यातील मोती शेतीला मोठी संधी उपलब्ध असून, त्यासाठी आवश्यक असलेले नियंत्रित आणि नैसर्गिक वातावरण निर्माण करणे हे मोठे आव्हान मानले जाते. शिवाजी विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी प्राणीशास्त्र अधिविभागात गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रकल्प हाती घेऊन तो प्रमाणाबाहेर यशस्वी करून दाखविला आहे. आता या प्रकल्पाअंतर्गत विविध बाबींचा सूक्ष्म अभ्यास करून हा प्रयोग अधिकाधिक यशस्वी करण्याच्या दृष्टीने संशोधनाची दिशा केंद्रित केली आहे. याचाच भाग म्हणून या संशोधकांनी मोत्यांच्या शेतीसाठी आवश्यक अशा वैज्ञानिक निकषांनुसार दोन परस्पर जोडलेल्या टाक्यांची अभिनव रचना विकसित केली आहे.

टाकीची रचना व महत्त्व

या टाकीच्या डिझाईनमध्ये दोन वेगवेगळ्या आकारांच्या परस्पर जोडलेल्या टाक्यांचा समावेश आहे. पहिल्या टाकीतील सबमर्सिबल पंपाद्वारे पाणी दुसऱ्या टाकीत सतत प्रवाहित केले जाते. दुसऱ्या टाकीत विशेष पाईपलाइन आणि स्प्रिंकलर प्रणाली बसविण्यात आली असून त्यामुळे पाण्यात नैसर्गिक नदीप्रवाहासारख्या लहरी निर्माण होतात. छतावरील स्प्रिंकलर्समधून नियंत्रित वेगाने होणारा पाण्याचा शिडकावा कृत्रिम पावसासारखे वातावरण तयार करतो. या अखंड जलपरिभ्रमणामुळे पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण, तापमान, पीएच आणि एकूण पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ संतुलित राहते. परिणामी मोती उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शिंपल्यांना नैसर्गिक अधिवासासारखे पोषक वातावरण उपलब्ध होते. या अभिनव टाकीच्या माध्यमातून एकदाच भरलेले पाणी १५ ते १८ महिन्यांपर्यंत गुणवत्तेत कोणताही लक्षणीय बदल न होता वापरणे शक्य झाल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ही रचना केवळ मोती शेतीसाठीच नव्हे, तर संशोधन, शिक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कृषीपूरक उद्योगांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.

प्राणीशास्त्र अधिविभागात विकसित झालेल्या या तंत्रज्ञानामुळे भविष्यात शेतकरी, संशोधक तसेच लघु व मोठ्या उद्योजकांना मोती उत्पादनाचा पर्यायी व्यवसाय विकसित करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यासाठी अधिविभागाची संशोधक विद्यार्थिनी साक्षी ढेकणे हिने भुवनेश्वर (ओडिशा) येथील आयसीएआर-सीआयएफए (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर फ्रेशवॉटर एक्वाकल्चर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षणही घेतले आहे.

कृषीपूरक उद्योग म्हणून विकासाची क्षमता

या संदर्भात डॉ. नितीन कांबळे यांनी सांगितले की, या पेटंटमुळे शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाधारित तंत्रज्ञान विकसित करण्याच्या क्षमतेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. हे संशोधन भविष्यात तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) आणि व्यावसायिकीकरणासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गोड्या पाण्यातील मोती शेतीकडे शेतकरी वळू शकतात. कमी देखभाल खर्च, कमी वीज वापर आणि नियंत्रित जलव्यवस्थापनामुळे हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त ठरण्याची क्षमता आहे.

लॅब टू लँड संकल्पनेला मूर्त रुप देणारे संशोधन: कुलगुरू डॉ. कामत

या संदर्भात संशोधकांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले की, शिवाजी विद्यापीठात समाजोपयोगी आणि उद्योगाभिमुख संशोधनाला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. या पेटंटमुळे संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष तंत्रज्ञानात करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून, शेतकरी व उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान विकासाच्या दिशेने शिवाजी विद्यापीठाने टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून, 'प्रयोगशाळेतील संशोधन ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत' या संकल्पनेला मूर्त रूप देणारे हे पेटंट आहे.

 

गोड्या पाण्यातील मोती शेतीसाठीच्या टाकीची वैशिष्ट्ये-

* दोन परस्पर जोडलेल्या वैज्ञानिक पद्धतीने डिझाइन केलेल्या टाक्या

* सतत पाणी परिभ्रमण, कृत्रिम लहरी आणि पावसासारखा शिडकावा

* पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण वाढविणारी रचना

* तापमान, पीएच व पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ स्थिर ठेवण्याची क्षमता

* नैसर्गिक नदीसदृश परिसंस्था निर्माण करणारे डिझाईन

* कमी वीज वापर आणि कमी देखभाल खर्च

* सर्व ऋतूंमध्ये वापरण्यास सुलभ रचना

* संशोधन, शिक्षण व व्यावसायिक मोती शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान.

 

या संशोधनाचे फायदे-

* मोती उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शिंपल्यांचे आरोग्य सुधारते.

* मृत्यूदरात लक्षणीय घट होते.

* उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.

* पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते.

* अमोनियाचे प्रमाण नियंत्रित राहते.

* नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन होते.

* रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

* शेतकरी, संशोधक आणि उद्योजकांसाठी किफायतशीर तंत्रज्ञान.

* कृषीपूरक व्यवसाय म्हणून मोती शेतीला चालना मिळणार.

 

स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सत्राला उदंड प्रतिसाद


कोल्हापूर, दि. २९ जून: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चासत्राला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

एमएच-सीईटी २०२६ मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियसंदर्भातील अचूक, अद्ययावत व सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने २७ जून रोजी या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी सांगितले की, योग्य माहिती आणि योग्य निर्णय यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार, गुणवत्तेनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार महाविद्यालय व शाखेची निवड करावी. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देश-विदेशात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जाणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी स्तरावर कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. तसेच पदव्युत्तर स्तरावर कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध असून अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध आहे.

प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल अधिकारी तथा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सुमारे दीड तास सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी केंद्रीय नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, गुणवत्ता यादी (Merit List), पर्याय फॉर्म (Option Form) भरण्याची योग्य पद्धत, CAP च्या विविध फेऱ्या, महाविद्यालय व शाखा निवडीचे निकष, प्रवेश निश्चिती प्रक्रिया, शुल्क, शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.

यासोबतच भविष्यातील रोजगाराच्या संधी, उच्च शिक्षणाच्या संधी, विविध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना, सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली फी सवलत व मोफत वसतिगृह योजना, तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण स्वरूप याविषयीही विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शन सत्रानंतर प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थी व पालकांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रथम वर्ष प्रवेश समन्वयक डॉ. महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये डॉ. विश्वास पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. डॉ. वैशाली सावंत, डॉ. अमर डूम, डॉ. चेतन आवटी आणि डॉ. श्रीपाल गायकवाड यांनी परिश्रम घेतले. डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी आभार मानले.