Wednesday 2 January 2019

महर्षी वि.रा. शिंदे यांच्या संशोधनपर लेखनाचा

अनुभवसंपन्न चिंतनशीलता महत्त्वाचा गुणविशेष

- डॉ. गोपाळ गुरू यांचे प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठात महर्षी वि.रा. शिंदे अध्यासनातर्फे 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न; संशोधन आणि कार्य' या विषयावर आयोजित  एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून संबोधित करताना डॉ. एन.डी. पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. राजन गवस, डॉ. भारती पाटील, डॉ. गोपाळ गुरू, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले.


शिवाजी विद्यापीठात महर्षी वि.रा. शिंदे अध्यासनातर्फे 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न; संशोधन आणि कार्य' या विषयावर आयोजित  एकदिवसीय चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. गोपाळ गुरू. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. राजन गवस, डॉ. भारती पाटील, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले.


कोल्हापूर, दि. २ जानेवारी: अनुभवशील चिंतनातून संशोधनपर लेखनामध्ये झळकणारा अस्सलपणा हे महर्षी वि.रा. शिंदे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत णि वस्तुनिष्ठ मांडणी त्यांना करता आली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन आणि एन.डी. पाटील प्रतिष्ठान, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न: संशोधन व कार्य या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील उद्घाटक म्हणून तर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले प्रमुख उपस्थित होते.
Dr. Gopal Guru
डॉ. गोपाळ गुरू म्हणाले, मायावी अर्थव्यवस्था, कृत्रिम वर्णव्यवस्था आणि दमट ग्रामव्यवस्था या तीन व्यवस्थांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न जटिल करून ठेवण्याचे काम केले. ही अस्पृश्यता म्हणजे उच्चवर्णियांच्या मनाच्या तळाशी खोल रुतून बसलेली मळमळ आहे आणि ती पूर्णतः ओकून टाकल्याशिवाय संपणार नाही, असे महर्षींचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण आहे. त्यामुळे अस्पृश्यता हे हीनतेचे नव्हे, तर दीनतेचे कारण आहे, असे ते म्हणतात. अस्पृश्यता वाहती राखण्यात उच्चवर्णीय समाजाचा स्वार्थ आहे. कारण ती तुंबली की संपली, याची जाणीव असल्याने ती थांबविली जात नाही. त्यामुळे महर्षी शिंदे या साऱ्या व्यवस्थेला बहिष्कृतांची बंदिशाळा असे संबोधतात. अशी अनेक रुपके (मेटाफोअर) महर्षींच्या लेखनात जागोजागी आढळतात. त्यांचाही स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महर्षींच्या उपेक्षेच्या अनुषंगाने बोलताना डॉ. गुरू म्हणाले, महर्षी शिंदे यांची त्यांच्या हयातीत आणि त्याउपरांतही मोठी सामाजिक उपेक्षा झाली. समाजाला खोलवर विचार करणारे लोक नको असतात आणि महर्षी हे त्यांनी अंगिकारलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाचा अत्यंत खोलवर, सर्वांगीण आणि कृतीशील विचार करणारे होते. साहजिकच त्यामुळे समाजाने त्यांच्यावर उपेक्षेचे शिक्कमोर्तब केले. आत्मटीका हा सुद्धा महर्षींच्या लेखनाचा गुणधर्म होता. या आत्मटिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पानोपानी आढळते. ती सुद्धा त्यांच्या उपेक्षेला कारण ठरली. मात्र, त्याची तमा न बाळगता महर्षी आपण अंगिकारलेले कार्य व्रतस्थ भावनेने करीत राहिले. हेच त्यांचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण आहे.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील म्हणाले, महर्षी शिंदे हे एक क्रांतीकारक समाजसुधारक होते. आपली संपूर्ण हयात त्यांनी अस्पृश्यता निवारणासारख्या मूलभूत प्रश्नासाठी वेचली आणि आपल्या कार्याने साऱ्या महाराष्ट्राची मान उंचावली. महाराष्ट्राने मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा फारसा गांभिर्याने विचार केला नाही. तरीही अस्पृश्योद्धाराचे कार्य सर्व तऱ्हेची उपेक्षा सोसून ते करीत राहिले. एकट्यानेच नव्हे, तर साऱ्या कुटुंबियांना सोबत घेऊन त्यांनी हे काम केले, हे त्यांच्या कार्याचे तत्कालीन समाज परिस्थितीत फार झळाळून उठून दिसणारे वैशिष्ट्य आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, अस्पृश्यतेच्या प्रश्नाची मूलभूत मांडणी करण्याबरोबरच त्याला सांख्यिकीय मांडणीची जोड देऊन या प्रश्नाचे गांभीर्य साऱ्या देशाला पटवून देण्याचे काम महर्षी वि.रा. शिंदे यांनी देशात सर्वप्रथम केले. त्यांचे हे पुस्तक म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. महाराष्ट्राला त्याची पुरोगामी ओळख प्रदान करून देण्यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने महर्षी शिंदे यांचे योगदान आहे, याचे नित्य स्मरण प्रत्येकाने सदोदित मनी बाळगण्याची गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर यंदाचे महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त करणारे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार आणि साहित्यिक कृष्णात खोत यांचा डॉ. गुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. भारत पाटणकर, डॉ. गेल ऑम्वेट, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. जगन कराडे, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. अरुण शिंदे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. मेधा पानसरे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, डॉ. रफिक सूरज, डॉ. सुरेश शिपूरकर यांच्यासह संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment