Showing posts with label Dr. Prakash Pawar. Show all posts
Showing posts with label Dr. Prakash Pawar. Show all posts

Saturday, 1 May 2021

‘महाराष्ट्र दिन विशेष’ मुलाखत:

महाराष्ट्राकडून सदैव देशाचे ज्ञाननेतृत्व: डॉ. प्रकाश पवार

 

डॉ. प्रकाश पवार

('महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा' या मुलाखतीची ध्वनीचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १ मे: महाराष्ट्राने सदैव देशाचे ज्ञाननेतृत्व केले आहे. देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तरेतून जातो, असे म्हटले जाते; मात्र, देशाच्या ज्ञानाचा महामार्ग हा आजही महाराष्ट्रातूनच जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता या युट्यूब वाहिनीला महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा या विषयावर दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली.

डॉ. प्रकाश पवार म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत महाराष्ट्राने सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्वगुणांची छाप पाडली आहे. तथापि, केंद्रीय स्तरावर महाराष्ट्रातील नेतृत्व मोठ्या प्रमाणावर दिसत नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तरेकडे उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, जम्मू-काश्मीर आदी मोठी राज्ये आहेत. त्यांच्या लोकसभेतील जागा अधिक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास उत्तर ही मागास तर दक्षिण ही प्रगत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेकडे अनेक चळवळी उदयास आल्या. त्यांनी देशाला सामाजिक, सांस्कृतिक चेहरा देण्याचे काम केले. म्हणजे एकीकडे केंद्रीय सत्तेचा मार्ग उत्तरेतून जात असला तरी अंतिमतः ज्ञानाचा मार्ग मात्र महाराष्ट्रातूनच जातो. आजही हे नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. प्रसंगी आपली विचारसरणी बाजूला ठेवून मानवी जीवनातील समस्या सोडविण्यासाठी धावून जाण्याची वृत्ती आजही महाराष्ट्राच्या नेतृत्वात आहे. कोरोनाच्या काळातला लॉकडाऊनचा पॅटर्न महाराष्ट्राने देशाला दिला. केरळ पॅटर्न हा कमी घनतेच्या प्रदेशासाठी होता; मात्र, लोकसंख्येची दाटी असलेल्या बड्या शहरांमध्ये संसर्ग आटोक्यात आणण्याचा पॅटर्न महाराष्ट्र देऊ पाहतो आहे. तो केंद्राने व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून निरपेक्ष भावनेने स्वीकारण्याची गरज आहे.

डॉ. पवार पुढे म्हणाले, केवळ राज्यांतर्गतच नव्हे; तर देशपातळीवरील राज्य-प्रांताशी महाराष्ट्राचे दृढ सांस्कृतिक बंध ऐतिहासिक काळापासून निर्माण झालेले आहेत. येथील समृद्धीमुळे येथे बहुभाषिक, बहुसांस्कृतिकतेचा विकास या भूमीत झाला आहे. त्यातून येथे एक वैचारिक, सांस्कृतिक प्रगल्भता निर्माण झाली आहे. राजकारणनिरपेक्ष भाषिक, सांस्कृतिक सलोख्याचे दर्शन येथे त्यामुळेच घडते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्य करण्याचे, त्यांचे निर्णय त्यांच्या पातळीवर घेण्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्याची आजघडीला मोठी गरज असल्याचे सांगून डॉ. पवार म्हणालेबळवंतराय मेहता, वसंतराव नाईक आदींच्या प्रयत्नांमुळे सन १९६२ ते १९७०च्या कालखंडात केंद्र, राज्य, प्रांत ही राजकारणाची केंद्रे होती, तर स्थानिक स्वराज्य संस्था या जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील निर्णय घेणाऱ्या व्यवस्था होत्या. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे आमच्या गावात, आमचेच सरकार ही भावना सर्वदूर दृढमूल झालेली होती. मात्र, काळाच्या ओघात या संस्था निधी वाटप करणाऱ्या मध्यस्थ यंत्रणा बनून राहिल्या आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढून पुनश्च स्वतंत्रपणे काम करण्याची, निर्णय घेण्याची संधी मिळावी, ही महाराष्ट्राच्या ६१व्या वर्धापन दिनाची मागणी आहे. ती पूर्ण करण्याची आज गरज आहे.

महाराष्ट्र विविध क्षेत्रांत प्रगतीपथावर असला तरी संसाधनांच्या उपलब्धतेसह भौगोलिक, शैक्षणिक, औद्योगिक आदी स्वरुपाच्या अनेक विषमताही येथे आहेत. त्यामुळे निर्माण होणारी सामाजिक विषमतेची दरी सांधली तर या प्रगतीची दिशा अधिक उज्ज्वल असणार आहे. त्या दिशेने घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची महाराष्ट्राला खरी गरज आहे, असेही ते म्हणाले.

ही सविस्तर मुलाखत शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता या युट्यूब वाहिनीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.


Wednesday, 23 January 2019

शेतीच्या कंपनीकरणाची गरज: सुधाकर जाधव


ज्येष्ठ पत्रकार सुधाकर जाधव यांच्या 'शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. प्रकाश पवार. सोबत डॉ. माया देशपांडे, कृषी पत्रकार व प्रकाशक रावसाहेब पुजारी आणि आलोक जत्राटकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात मार्गदर्शन करताना सुधाकर जाधव. व्यासपीठावर डॉ. प्रकाश पवार.

कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: शेतकऱ्यांसमोरील समस्या संपविण्यासाठी त्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम ठेवून शेतीचे कंपनीकरण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पांढरकवडा (यवतमाळ) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा कृषी विचारवंत सुधाकर जाधव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित समकालीन शेतीचे प्रश्न आणि युवक या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी स्कूलचे संचालक डॉ. प्रकाश पवार आणि ज्येष्ठ कृषी पत्रकार रावसाहेब पुजारी प्रमुख उपस्थित होते.
Sudhakar Jadhav
सुधाकर जाधव म्हणाले, शेतजमिनीचे तुकडे आणि वाटण्या हा भारतीय शेतीसमोरचा मोठा प्रश्न आहे. शेती हा जणू अल्प भूधारक शेतकऱ्यांचा मेळावाच बनला आहे. अल्पभूधारकांना कोणी कर्ज देत नाही, ही त्यातली आणखी एक मोठी समस्या आहे. या समस्येवर कंपनीकरणाचा तोडगा उपयुक्त ठरेल. सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्या एका कंपनीच्या छताखाली आणल्या पाहिजेत. संसाधनांचा वापरही एकत्रितच करावा. त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात त्यांना शेअर द्यावेत आणि नफ्यात लाभांश द्यावा. शेतकऱ्यांना तेथे आठ तास रोजगार द्यावा. त्यांचा मेहनताना द्यावा. अशा प्रकारे काम केल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांनाही ओलिताचे लाभ मिळतील. या दृष्टीने आता शेतीचा विचार करण्याची गरज आहे.
तरुणांशी निगडित शेतीच्या समस्या सांगताना श्री. जाधव म्हणाले, आज कोणी तरुण शेती करण्यास तयार होत नाही आणि शेती करणाऱ्या मुलाला अगदी शेतकरी सुद्धा आपली मुलगी द्यायला तयार होत नाही, या दोन्ही अत्यंत गंभीर समस्यांनी आपली शेती आणि तरुण शेतकरी ग्रासला आहे. इतर रोजगार, धंदा नसला तरीही आजया तरुण शेती करण्यास तयार होत नाही. उलट शेतीतून आपली सुटका कधी होईल, याचाच विचार आणि प्रयत्न सुरू असतात. आज शेतीला मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या शेतीचे करायचे काय, हा मोठा प्रश्न आहे. कोणीही शेतीचा गांभिर्याने विचार करीत नाही आणि त्यामुळे शेतीचा प्रश्न सुटणे अवघड आहे. राज्यकर्त्यांसाठी, शेतीचा प्रश्न हा शेतमाल हमीभावाचा आणि शेतीवरील कर्जापुरताच मर्यादित आहे. शेतकरी संघटनांची आंदोलनेही तेवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. त्यामुळे शेतीचे प्रश्न वर्षानुवर्षे त्याच चक्रव्यूहाच्या गर्तेत आहेत. शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थात्मक, कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण होत नाही कारण तरुण या प्रश्नांबद्दल विचार करीत नाही. तरुणांना आणि त्यांच्या संघटनांना शेतीचे प्रश्न आपल्या प्राधान्यक्रमावर घ्यावेसे वाटत नाही, हे चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आज शेतीत अभावाची स्थिती नसली तरी शेतकरी सुखी नाही, हे सत्य आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या अतिरिक्त लोकसंख्येला शेतीतून बाहेर काढणे आणि त्याचवेळी शेतीत नियोजनपूर्वक रोजगार निर्मिती करणे या दोन्ही गोष्टींची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाल्याचेही जाधव यांनी सांगितले. श्री. जाधव यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या विविध शंकांचे समाधानही केले.
यावेळी सुधाकर जाधव यांनी लिहीलेल्या शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती या तेजस प्रकाशनाच्या पुस्तकाचे डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कविता वड्राळे यांनी परिचय करून दिला, तर डॉ. संतोष सुतार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. माया देशपांडे, डॉ. ओमप्रकाश कलमे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tuesday, 6 December 2016

बाबासाहेब प्रखर भारतीयत्वाचे प्रतीक: डॉ. प्रकाश पवार


Dr. Prakash Pawar





शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन

कोल्हापूर, दि. ६ डिसेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर भारतीयत्वाचे मूर्तीमंत प्रतीक होते, असे गौरवोद्गार राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रकाश पवार यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. पवार म्हणाले, बाबासाहेबांचे व्यक्तीमत्त्वच मुळी बहुआयामी स्वरुपाचे होते. त्यांच्या विविधांगी पैलूंचा वेध घेणे हे त्यामुळेच आव्हानात्मक बनले आहे. विविध विषयांमध्ये संशोधन आणि अभ्यासपूर्ण, व्यासंगी प्रतिपादन हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विशेष होता. बाबासाहेब हे केवळ तुमच्या माझ्या दृष्टीनेच मोठे आहेत, असे नव्हे, तर जागतिक परिप्रेक्ष्यातून त्यांच्याकडे पाहिले असतानाही त्यांचे मोठेपण व्यापून उरते. ते केवळ दलितांचे मुक्तीदाते होते, असे म्हणून त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही. या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या संकुचित, बंदिस्त मानसिकतेतून मुक्त करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी या देशात सर्वप्रथम केले. देशातील स्त्रियांना ज्याप्रमाणे आत्मभान देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला, त्याचप्रमाणे या देशातील पुरूषांचीही बंदिस्त पुरूषी मानसिकतेतून मुक्तता करण्याचे त्यांनी केलेले कार्यही दुर्लक्षिता न येणारे आहे.
यावेळी नेहरू अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. वासंती रासम, गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, वनस्पतीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, वाणिज्य अधिविभाग प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंचा वेध घेतला. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. व्ही.वाय. धुपदाळे, डॉ. चेतना सोनकांबळे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 21 July 2016

चीन समजण्यासाठी आधी भारत समजून घेणे आवश्यक: डॉ. जबीन जेकब




कोल्हापूर, दि. २१ जुलै: चीन समजून घेण्यासाठी भारताला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज, दिल्लीचे सहाय्यक संचालक डॉ. जबीन जेकब यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागामार्फत आयोजित 'भारत चीन संबंध' या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. जेकब पुढे म्हणाले, चीनी अभ्यासासाठी अन्य वैचारिक सामग्री आवश्यक आहे, केवळ कटूता असणे महत्वाचे नाही. भारत चीन संबंधाचे भविष्य हे फक्त दिल्ली किंवा बिजिंग केंद्रिनव्हे, तर ते राज्य, प्रदेश आणि शहर केंद्री असले पाहिजे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला चीनशी आर्थिक, औद्योगिक तसेच व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्याची मोठी संधी आहे. मुंबई हे आशियाचे एक मोठे बिझनेस केंद्र आहे. त्यामुळे चीनमध्ये मुंबईविषयी मोठे आकर्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होणे ही त्यामुळे स्वाभाविक बाब होती. या पार्श्वभूमीवर, चीन एकीकडे भारताचा प्रतिस्पर्धी मानला जात असला तरी, त्याच्या क्षमतांचा अभ्यास करून त्यांच्याशी तदअनुषंगिक सहकार्य वृद्धी करणे गरजेचे आहे. चीन महाराष्ट्राचा महत्त्वाचा आर्थिक सहकारी होऊ शकतो. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास चीनी कंपन्याही उत्सुक आहेत. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.
चीनने अत्यंत धोरणीपणाने चीनी उत्पादनांचा 'ब्रँड चायना' ज्या पद्धतीने जगभरात विकसित केला आहे, तशा प्रकारे भारतीय उत्पादनांचा 'ब्रँड' जगभरात कसा निर्माण करता येईल, याची शिकवण चीनी अर्थतज्ज्ञांकडून आपण घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने चीनी तंत्रज्ञान, चीनी अर्थकारण समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही जेकब यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोल्हापूरच्या कृषी व कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांमध्येही चीनी तंत्रज्ञानाच्या सहकार्याने वृद्धी करण्यासाठी त्याचा अभ्यास केला पाहिजे. मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातीलच कुरुंदवाड येथील गिरी देशिंगकर यांनी चीनविषयक अभ्यासक म्हणून भारत व चीन या दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वृदधीसाठी १९८०-९०च्या दशकांत मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे चीनशी संबंधांचा कोल्हापूरचा हा वारसा देशिंगकर यांनी आधीच निर्माण करून ठेवला आहे. तो कोल्हापूरकरांनी पुनरुज्जिवित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, चीनी भाषा शिकणे भारतीय अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. चीनसमवेत शैक्षणिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी विदयापीठ प्रयत्नशील राहील.
यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र विभागाचे डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, 'न्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज्' या संस्थेत विदयार्थ्यांना संशोधनाची मोठी संधी आहे. शेजारी राष्ट्र म्हणून चीनसंदर्भातील अध्ययनाची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणे आवश्यक आहे.


डॉ. वासंती रासम यांनी प्रास्ताविक केले; तर, डॉ. रविंद्र भणगे यांनी आभार मानले. राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ.भगवान माने यांच्यासह शिक्षक, संशोधक, विदयार्थी उपस्थित होते.