कोल्हापूर, दि.24 एप्रिल - शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती व कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृध्दीसाठी या विषयावर विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहामध्ये आज एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी सुरूवातीला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, कृषी उपसंचालक तथा जिल्हा नोडल अधिकारी नामदेव परीट, राजेंद्र माने, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ.विद्यासागर गेडाम, यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेचे प्रभारी संचालक डॉ.नितिन माळी यांच्या हस्ते व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेले ''द मिऱ्याकल ऑफ मिलेटस् : लोकल ग्रेन्स्, मॉडर्न वंडर्स'' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपण आरोग्य, पोषण आणि पर्यावरण या तिन्ही बाबींशी झगडत आहोत. अशा परिस्थितीत मिलेटस् अर्थात पारंपरिक भरड धान्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. ही भरड धान्य केवळ अन्नधान्य नव्हे तर आपल्या संस्कृतीचा, शाश्वत शेतीचा व आरोग्यदायी जीवनशैलीचा आधार आहेत. या पुस्तकांमध्ये मिलिटस् अर्थात भरडधान्यांचे वैज्ञानिक, पोषणात्मक, तांत्रिक परिचय तसेच त्यांचे मूल्यवर्धित अन्न प्रक्रिया यांची सखोल पणे मांडणी केली आहे.
या पुस्तकामध्ये विविध भरड धान्यांची वर्गीकरण, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच देशस्थरीय उत्पादन स्थिती, पोषणमूल्य त्यावर आधारित मूल्यवर्धित उत्पादने आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे यांचा सविस्तर आढावा या पुस्तकात दिलेला आहे. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा संशोधकांसाठी नव्हे तर शेतकरी उद्योग क्षेत्र आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
शिवाजी विद्यापीठ नेहमीच समाज उपयोगी विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. अशाच इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेटस्च्या पार्श्वभूमीवर ''फुड सेफ्टी स्टैंडर्ड ऑफ इंडिया'' अर्थात एफएसएसएआय, मुंबई द्वारे प्रायोजित ''ईट राईट मिलेट मेला'' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम पूर्णपणे मिलेटवर आधारीत होता.यामध्ये राज्यभरातील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले होते.
यातूनच, व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्त शिंदे यांना या पुस्तक निर्मितीची मूळ कल्पना सुचली.तसेच, विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांनी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाने या पुस्तक निर्मितीचे लक्ष पूर्ण केले.
या पुस्तक निर्मितीमध्ये श्री शितल पाटील, डॉ.स्नेहल खांडेकर, डॉ.प्रविणकुमार पाटील, डॉ.इराण्णा पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.
------

No comments:
Post a Comment