Showing posts with label Mumbai. Show all posts
Showing posts with label Mumbai. Show all posts

Monday, 22 July 2024

विद्यापीठातील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करावे: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. धनंजय सुतार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व गिरीश कुलकर्णी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.




कोल्हापूर, दि. २२ जुलै: शिवाजी विद्यापीठाचा लौकिक हा जागतिक स्तरावर प्रकाशित होणाऱ्या संशोधनाच्या दर्जामुळे सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे संशोधकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये आपले संशोधन प्रकाशित व्हावे, यासाठी दर्जेदार संशोधन करावे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकदिवसीय स्कोपस व निंबस यांविषयी जागरुकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, संशोधनासाठी विविध प्रकारची संदर्भसाधने हाताशी असणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने ग्रंथालये मौलिक भूमिका बजावतात. माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वी संशोधकाला ग्रंथालयांत जाऊन दुर्मिळ आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचे संदर्भग्रंथ, शोधपत्रिका पाहाव्या लागत. त्यांच्या आधारे आवश्यक संदर्भ हाताने उतरून घ्यावे लागत. तथापि, आता आधुनिक काळात सर्व प्रकारचे ई-रिसोर्सेस उपलब्ध आहेत. ग्रंथालये ऑनलाईन झाली आहेत. सर्व संदर्भसाधने ऑनलाईन उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवरील कोणतीही माहिती, पुस्तक, संदर्भ क्षणात मिळविता येते. यामुळे संशोधनाचा दर्जा उंचावणे शक्य झाले आहे. हे दर्जानिश्चितीचे काम स्कोपस आणि निम्बससारखे निर्देशांक करतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून संशोधक आपले संशोधन प्रकाशित करतात, तेव्हा स्कोपसमध्ये त्यांची नोंद होण्याची शक्यता वाढते. गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे सुमारे ९०० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकांतून प्रकाशित झाले. त्यांनी सुमारे दीड लाख सायटेशन्स मिळाले. विद्यापीठाच्या एच-इंडेक्स १३५च्या घरात आहे, जो महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ही कामगिरी उंचावत ठेवण्यासाठी संशोधकांनी प्रयत्नरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठासह देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांचा संशोधकीय वेध घेतला असता भौतिकशास्त्र, मटेरियल सायन्स, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र अशा निवडक विषयांतील संशोधनाची संख्या अत्यधिक असल्याचे जाणवते. त्याचवेळी मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान शाखांकडील विषयांतील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी आहे. मराठीसारख्या विषयांचा अपवाद गृहित धरला तरीही या विद्याशाखांमधील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या दृष्टीने संशोधकांनी आणि विद्यापीठांनीही प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधनासाठी, विशेषतः संदर्भसाधनांच्या उपलब्धतेसाठी शिवाजी विद्यापीठाने भरीव तरतूद केली आहे, त्या साधनांचा संशोधक, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रुपाली भोसले व एस.डी. हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी आभार मानले.

उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात मुंबईच्या ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम टेक्नॉलॉजी (जिस्ट) या कंपनीचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी निम्बसच्या उपयोजनाविषयी, तर नवी दिल्लीच्या एल्सव्हियरच्या कस्टमर कन्सल्टंट ऐश्वर्या नायल यांनी स्कोपसच्या उपयोजनाविषयी उपस्थित संशोधक, विद्यार्थ्यांना अवगत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. एस.व्ही. थोरात, डॉ. वाय.जी. जाधव यांच्यासह ग्रंथालयातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Friday, 22 April 2022

शिवाजी विद्यापीठाचा ‘आयसीटी’समवेत सामंजस्य करार

 

ICT, Mumbai


 

कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी, मुंबई) यांचा येथील शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराचा लाभ या दोन्ही शैक्षणिक व संशोधकीय संस्थांमधील प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर घटकांनाही होईल, अशी अपेक्षा आयसीटीचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या विविध विज्ञान विभागांत, सैफ-सीएफसी (SAIF-CFC) येथे आणि आयसीटीच्या विविध कॅम्पसमध्ये उपलब्ध असणारी अत्याधुनिक उपकरणे वापरण्यासाठीचे कौशल्यही त्यांना परस्परपूरक स्वरुपाचे ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठ आणि आयसीटी, मुंबई यांच्या दरम्यान १२ एप्रिल २०२२ रोजी पाच वर्षांच्या कालावधीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि आयसीटीच्या संशोधन व नवोन्मेष विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. पद्मा व्ही. देवराजन यांनी स्वाक्षरी केल्या.

संयुक्त संशोधनपर व शैक्षणिक उपक्रम या संदर्भातील देवाणघेवाण हा या सामंजस्य कराराचा प्रमुख हेतू आहे. यातून नवीन तंत्रज्ञानवर्धित संशोधन अपेक्षित आहे. या करारामध्ये गरजेनुसार अन्य विज्ञान अधिविभागांना सामावून घेण्याचीही अगर स्वतंत्र करार करण्याचीही तरतूद आहे.

आता या सामंजस्य करारामुळे, दोन्ही विद्यापीठांनी विविध संशोधन उपक्रम सुरू केले आहेत त्याचे प्रस्ताव निधी संस्थांकडे सादर केले जातील. दोन्ही संस्थांमधील या समान स्वारस्य असणाऱ्यांना या सामंजस्य करारामुळे संयुक्त संशोधन आणि प्रकाशनाला आणखी गती मिळेल.

कराराच्या अनुषंगाने माहिती देताना पदार्थविज्ञान अधिविभागाचे डॉ. आर.जी. सोनकवडे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आयसीटीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहकार्याने कौशल्य विकास करवून ज्ञान वाढवण्यासाठी हा करार नक्कीच उपयुक्त ठरेल. संयुक्त संशोधन आणि प्रकाशनांच्या शक्यता विकसित करण्यासाठी संयुक्त चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळा आयोजित करून प्रशासन आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनुभव आणि कौशल्याची देवाणघेवाण केली जाणेही याअंतर्गत अभिप्रेत आहे.

या कराराच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आयसीटी ही राज्यातील एक महत्त्वपूर्ण संशोधन संस्था असून त्यांच्यासमवेतच्या करारामुळे संयुक्त संशोधन उपक्रमांना चालना मिळेल. विशेषतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा विविध प्रमुख विज्ञान विभागांमधील संशोधनाला गती मिळेल. तसेच, शिवाजी विद्यापीठात उपलब्ध संशोधन सामग्रीचा आयसीटीच्या संशोधक, विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल.

Friday, 18 November 2016

महाराष्ट्राच्या मुकुटात शिवाजी विद्यापीठाकडून अनेक मानाचे तुरे

कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचे गौरवोद्गार



शिवाजी विद्यापीठाचा ५४वा वर्धापनदिन उत्साहात;
विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाची रेश्मा माने ब्रँड ॲम्बॅसॅडर



कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी

 
विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा.डॉ. ज्योती जाधव (जीव-रसायनशास्त्र अधिविभाग)

महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक: डॉ. शरद सदाशिवराव हुंसवाडकर (राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर)

बॅ.पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. अरुण अण्णासाहेब पाटील (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर)

विद्यापीठातील गुणवंत सेवक: श्रीमती संपत्ती गणेश पाटील (अधीक्षक)

रणजीत मारुती शिंदे (सहाय्यक अधीक्षक)

पांडुरंग गोविंद शिरगावे (हवालदार)

गुणवंत सेवक: पांडुरंग दत्तात्रय चौगले (वरिष्ठ लघुलेखक, न्यू कॉलेज, कोल्हापूर)

बाळकृष्ण इंगवले (ग्रंथालय परिचर, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर)


कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्राच्या मुकुटात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत, असे गौरवोद्गार मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५४वा वर्धापन दिन समारंभ आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. या समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. 
कार्यक्रमास राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने प्रमुख उपस्थित होती. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानासाठी ब्रँड ॲम्बॅसॅडर म्हणून रेश्मा माने हिच्या नावाची घोषणा केली.
यावेळी कुलगुरू डॉ. वंजारी म्हणाल्या, अमर्याद एक्सलन्सचा आग्रह धरुन उच्चशिक्षणाचे क्षेत्र अनेक पैलूंनी सालंकृत करणाऱ्या कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते डॉ. देवानंद शिंदे यांच्यापर्यंत द्रष्टे नेतृत्व शिवाजी विद्यापीठास सातत्याने लाभले. याच्या परिणामी विद्यापीठाने संशोधनासह विविध क्षेत्रांत बहुआयामी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आज राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर विविध मानांकने या विद्यापीठास प्राप्त झाली आहेत. सामाजिक जाणीवांतून निर्माण होणारी बांधिलकी, कर्तव्याची जाण आणि सारासार विवेक ही त्रिसूत्री पदवीइतकीच महत्त्वाची असून ज्या व्यक्तीमध्ये या तीन गोष्टी आहेत, तो एक उत्तम व यशस्वी माणूस बनतो, असे त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. वंजारी पुढे म्हणाल्या, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विद्यापीठांकडून अपेक्षित असणारी चतुःसूत्री सांगितलेली आहे. यामध्ये मानवता, सहिष्णुता, सत्यान्वेषण आणि कारणमीमांसा या चार मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये प्रस्थापना करण्यासाठी विद्यापीठांनी कार्य करणे नेहरुंना अभिप्रेत होते. त्या दृष्टीने उच्चशिक्षणाची ही राष्ट्रीय उद्दिष्ट्येच आहेत. ती आजही कालबाह्य झालेली नसून त्यांची गरज नववर्तमानात अधिकच अधोरेखित झालेली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे निर्भय, स्वाभिमानी आणि ज्ञानाचा मुक्त प्रसार करणाऱ्या व्यवस्थेचीही आज गरज निर्माण झाली आहे. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या व्हीजन-२०२०च्या माध्यमातून या देशातल्या युवकांना ज्ञान, संपत्ती आणि अगदी अंतरीच्या दुःखाच्याही देण्यातला आनंद शिकविला आहे. आपले मन आणि काळीज वापरून या देशाच्या हिताचा वापर करण्याचे त्यांनी केलेले सूचन अत्यंत महत्त्वाचे आहे. राजेंद्र सिंह यांच्या जलक्रांतीचे उदाहरण देताना कोणताही बदल घडविण्यासाठी सजगतेचे महत्त्व पटवून दिले.
भाषणाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. वंजारी यांनी महाराष्ट्राला लाभलेले एक कल्पक कुलगुरू अशा शब्दांत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले.

बेटी बचाओ अभियानासाठी कुस्तीपटू रेश्मा माने ब्रँड अम्बॅसॅडर: कुलगुरू डॉ. शिंदे
रेश्मा माने हिचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी
अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठामार्फत बेटी बचाओ अभियान अत्यंत जोमाने राबविण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणारे हेएकमेव विद्यापीठ असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानासाठी कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचा झेंडा विदेशातही झळकावणारी कुस्तीपटू रेश्मा माने हिची ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी या प्रसंगी केली. आणि रेश्मा हिला व्यासपीठावर बोलावून सन्मानित केले. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या जल्लोषात कुलगुरूंच्या या घोषणेचे स्वागत केले.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आपल्या भाषणात गत वर्षभरात विद्यापीठाने विविध क्षेत्रांत मिळविलेल्या लौकिकाचा तसेच वर्षभरातील घडामोडींचा आढावा घेतला. ते म्हणाले, मी येथे रुजू होण्यापूर्वीच या विद्यापीठाने ३.१६ इतक्या सर्वाधिक सीजीपीए गुणांकनासह नॅकची श्रेणी प्राप्त करून राज्यातील अग्रमानांकित विद्यापीठ बनण्याचा बहुमान पटकाविलेला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये विद्यापीठाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले आहेत. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे गतवर्षी प्रथमच देशातील विद्यापीठांची क्रमवारी ठरविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) हा उपक्रम हाती घेण्यात आला. या क्रमवारीत देशातील सुमारे ५५० विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाने २८वा तर राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. काही दिवसांपूर्वीच यू.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्ट या अमेरिकेतील प्रतिष्ठित संस्थेने भारतातील बेस्ट ग्लोबल युनिव्हर्सिटीजची यादी जाहीर केली. यामध्ये शिवाजी विद्यापीठ २१व्या स्थानी झळकले आहे. करन्ट सायन्स या अग्रमानांकित जर्नलने स्कोपस आकडेवारीच्या आधारावर केलेल्या सर्वेक्षणात संशोधनाच्या बाबतीत शिवाजी विद्यापीठाचा देशात १९ वा क्रमांक लागतो. देशातील अकृषी विद्यापीठांमध्ये ६वा, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो. मटेरियल सायन्सच्या संशोधनात देशातील अकृषी विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ हे देशात प्रथम क्रमांकावर असून या यादीत स्थान मिळविणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. जगातील अग्रगण्य नेचर संशोधन पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार, ऑनलाइन संदर्भांचा व्यापक वापर करणाऱ्या विद्यापीठांच्या यादीत शिवाजी विद्यापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे, आमचे विद्यार्थी आता ग्रामीणतेचा शिक्का पुसून ग्लोबल होण्याकडे वाटचाल करीत आहेत, हेच यातून अधोरेखित होते, असेही ते म्हणाले.
या समारंभात शिवाजी विद्यापीठाच्या ५३व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी खास शिवाजी विद्यापीठामधील वातावरण पाहून भारावून जाऊन तयार केलेल्या पोवाड्याच्या ऑडिओ सीडीचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र तसेच एम.ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या 'माध्यमविद्या' 'मीडिया स्पेक्ट्रम' या प्रायोगिक अनितकालिकांचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर या वर्षी 'नॅक'चे '+''' मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील १३ संलग्नित महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला.
विविध पारितोषिक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे: विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा.डॉ. ज्योती जाधव (जीव-रसायनशास्त्र अधिविभाग), महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक: डॉ. शरद सदाशिवराव हुंसवाडकर (राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर), बॅ.पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. अरुण अण्णासाहेब पाटील (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर), विद्यापीठातील गुणवंत सेवक: श्रीमती संपत्ती गणेश पाटील (अधीक्षक), रणजीत मारुती शिंदे (सहाय्यक अधीक्षक), पांडुरंग गोविंद शिरगावे (हवालदार), महाविद्यालयीन गुणवंत सेवक: पांडुरंग दत्तात्रय चौगले (वरिष्ठ लघुलेखक, न्यू कॉलेज, कोल्हापूर), बाळकृष्ण इंगवले (ग्रंथालय परिचर, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर).
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वॉक्हार्ट फाऊंडेशनचा प्रभावी कुलगुरू पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणात प्रमुख पाहुण्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाने अत्यंत लयबद्ध व प्रभावी सादरीकरण केले. सांगली जिल्हा एन.एस.एस. समन्वयक प्रा. सदाशिव मोरे यांनी पथकाचे नियोजन केले.
बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, नूतन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या पोवाडा भेटीने भारावले उपस्थित
शिवाजी विद्यापीठाच्या गतवर्षीच्या ५३व्या वर्धापनदिनाचे प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचा परिसर, विद्यापीठाचा जाज्ज्वल्य इतिहास आणि लौकिक पाहून, ऐकून भारावून गेले होते. याची मोहिनीच जणू त्यांच्या मनावर पडली. त्यातून आपल्या शिवाजी विद्यापीठ भेटीला चिरंतनतेचे आयाम प्रदान करताना त्यांनी शिवाजी विद्यापीठाचा पोवाडाच तयार केला. हा पोवाडा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांकरवी संगीतबद्ध करवून घेऊन यंदाच्या ५४व्या वर्धापन दिन समारंभासाठी आवर्जून आठवणीने पाठवून दिला. या पोवाड्याची सीडी ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पोवाडा संपल्यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात डॉ. देशमुख यांना मनापासून धन्यवाद दिले.

गजानन चव्हाण यांचे पोस्टर प्रदर्शन
शिवाजी विद्यापीठाचे प्रशासकीय सेवक गजानन चव्हाण यांनी शिवाजी विद्यापीठातील विविध घडामोडींविषयी, सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांविषयीचे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमस्थळी भरविले होते. त्यांच्या या उपक्रमाचे दोन्ही कुलगुरूंसह उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

महिला सन्मान दिन
शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानासाठी ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून रेश्मा माने हिची निवड जाहीर केल्यानंतर आजच्या समारंभाच्या प्रमुख अतिथींसह पुरस्कार विजेत्यांमधील महिलांची संख्या पाहता विद्यापीठाचा आजचा वर्धापनदिन हा महिला सन्मान दिन म्हणूनच साजरा होत असल्याची भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.