Saturday, 1 July 2017

रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत संशोधनासाठी ‘डीबीटी’कडून विद्यापीठास दीड कोटींचा प्रकल्प

डॉ. ज्योती जाधव यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

प्रकल्प प्रक्रियेची माहिती देणारी आकृती.

कागल येथील प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाची छायाचित्रे.

राष्ट्रीय प्रकल्पाच्या प्रमुखपदी डॉ. ज्योती जाधव

कोल्हापूर, दि. १ जुलै: केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे (डीबीटी, नवी दिल्ली) रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत संशोधनासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे तीन विद्यापीठांमध्ये संयुक्तरित्या होणाऱ्या या राष्ट्रीय प्रकल्पाचे नेतृत्व शिवाजी विद्यापीठाच्या जीव-रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा.डॉ. ज्योती जाधव यांच्याकडे देण्यात आले आहे. याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून शिवाजी विद्यापीठासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैद्राबाद आणि चारोतर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅड टेक्नॉलॉजी, गुजरात या तीन संस्थांमध्ये या प्रकल्पाबाबत संयुक्त संशोधन होणार आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ. ज्योती जाधव या प्रकल्प प्रमुख तर प्रा. एस.पी. गोविंदवार उप-प्रकल्प प्रमुख काम पाहणार आहेत. या प्रकल्पासाठी डीबीटीकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या प्रकल्पाबाबत प्रकल्प प्रमुख डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखान्यातून बाहेर पडणारे रंगमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जाते. या रंगमिश्रीत सांडपाण्यातील विषारी रासायनिक प्रदूषकांमुळे अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. पाण्यातील वनस्पती व जलचरांबरोबरच मानवावरही त्याचे दुष्परिणाम होतात. विविध ॲलर्जिक रिॲक्शन, म्युटेशन, अगदी कर्करोगही होतो. हे रंगमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वच स्तरांवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. जाधव म्हणाल्या, वस्त्रोद्योग कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मानवनिर्मित रासायनिक पदार्थ व रंगद्रवे वापरली जातात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या सेंद्रिय कणांना ॲझो संयुग म्हणतात. त्यामध्ये नायट्रोजन- नायट्रोजनमध्ये तीन घट्ट बंध असतात, त्यामुळे ते निसर्गात खूप काळ जसेच्या तसे आढळून येतात. या ॲझो संयुगाचे निसर्गात पुन्हा वापर करण्याकरिता त्यामधील घट्ट बंध तुटून त्याचे साध्या बंधामध्ये रुपांतर करण्याकरिता त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रंगमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, पण काही रासायनिक पदार्थ यामध्ये प्रक्रियेनंतरही आढळून येतात.
शिवाजी विद्यापीठात ‘बायोरिमेडिएशन’ प्रक्रियेने रंगमिश्रीत सांडपाणी स्वच्छ करण्याची पद्धत प्रायोगिक तत्वावर जवळपास गेल्या दहा वर्षांपासून केली जात असून या प्रयोगशाळेचा या क्षेत्रात जगात प्रथम क्रमांक आहे. याच कामाची दखल घेऊन डीबीटी (नवी दिल्ली) यांच्या वेबसाईटच्या होमपेजवर दोन वेळा झळकण्याचा बहुमान विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाला दोनदा प्राप्त झाला आहे. ‘बायोरिमेडिएशन’ प्रक्रियेने नैसर्गिकरित्या रंगमिश्रित सांडपाण्यावर कोणतेही रासायनिक पदार्थ न वापरता यशस्वीपणे प्रक्रिया केली जाते. काही बॅक्टेरिया (उदा.सुडोमोनास बॅसिलास) निसर्गात उपलब्ध आहेत, ज्यांचाकडे मोठ्या संयुगाचे लहान/ सध्या संयुगात रुपांतर करण्याची क्षमता आहे. तसेच, आम्हाला असेही लक्षात आले की, वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये (जलचर वनस्पती: आयपोमिया अक्वॅटिका, आयपोमिया हेडरीफोलिया, साल्विनिया मोलेस्टा, टायफा अँगस्तीफोलिया, पॅस्पॅलम स्क्रोबीकुलॅटम, ब्लुमिया मालकोमी, फ्युम्रीस्टायलीस डायोक्टोमा; फुलझाडे:- पोरचुल्याका ग्रँडीफ्लोरा, ॲस्टर अमेलस, टेजेतेस प्याचुला, गेलाराडिया ग्रंडीफ्लोरा) मोठी संयुगे शोषून घेण्याची क्षमता आहे. रंगमिश्रित सांडपाणी या वनस्पतींच्या मधून सोडल्याने यातील हानीकारक पदार्थ शोषून घेतात. तसेच, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) आणि टोटल डीझॉव्हल्ड सॉलीड (टीडीएस) हे मूल्यांक कमी झाल्याचे दिसून येते. परिणामी, सांडपाणी स्वच्छ होते. तसेच, या वनस्पती काही पोषकद्रव्ये सांडपाण्यात सोडतात. ज्यांच्यामुळे नैसर्गिक बॅक्टेरिया वेगाने वाढतात. ते बॅक्टेरीया रंगद्रव्याचे रुपांतर साध्या रंगहीन पदार्थांत करतात; तसेच, हानीकारक/ विषारी पदार्थांचे रूपांतर बिनविषारी पदार्थांत करण्यासही मदत करतात. या वनस्पती काही संप्रेरके (ल्याकेज, ॲझो रीडक्टेज, लीगानीन पेरॉक्सिडेज) स्रवतात, ज्यामुळे विषारी पदार्थांचे रूपांतर बिनविषारी पदार्थांत होते. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता वनस्पती व बॅक्टेरिया यांचा एकत्रित वापर करणे ही अत्यंत कार्यक्षम प्रक्रिया आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

एमआयडीसीमध्ये प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित
सध्या रंगमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया कागल येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) सात एकर जागेवर प्रत्यक्ष यशस्वीपणे कार्यरत आहे. कागल एम.आय.डी.सी.त ४५ एकर क्षेत्रात हाय रेट ट्रान्समिशन सिस्टीम (एच.आर.टी.एस.) तयार केली आहे. यामध्ये सलग नाला तयार करून बांधावर निलगिरी लावली आहे. या नाल्यातून सांडपाणी सोडले जाते. कॉमन एफ्लूयंट ट्रीटमेंट प्लँट (सी.इ.टी.पी.) त्यांच्याकडील सांडपाणी बायोरिमेडिएशन प्रक्रियेकरिता एच.आर.टी.एस. यंत्रणेमध्ये सोडतात. या यंत्रणेचा फायदा असा की, यातील निलगिरीची झाडे जास्तीत जास्त सांडपाणी शोषून घेतात. त्या सांडपाण्याबरोबर हानिकारक पदार्थ देखील शोषून घेतले जातात आणि झिरो डिस्चार्ज सिस्टीम तयार होते. एच.आर.टी.एस. क्षेत्रात डि-कलरायझेशन (रंग घालवण्याची क्षमता असणारी प्रक्रिया) क्षमता असणाऱ्या वनस्पतींची लागवड करून त्यामध्ये बॅक्टेरिया मिसळून तयार होणाऱ्या सिस्टीमला ‘फायटोरिॲक्टर’ म्हणतात. ही सिस्टीम अधिक क्षमतेने डि-कलरायझेशन प्रक्रिया करते. ती पर्यावरणपूरक व कमी खर्चिक आहे. प्रा. ज्योती जाधव आणि प्रा. एस.पी. गोविंदवार यांनी या संशोधनावर आधारित सुमारे १६५ शोधनिबंध विविध अंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांतून प्रसिद्ध केले आहेत. डीबीटीच्या नवीन प्रकल्पात डिकलरायझेशन प्रक्रियेच्या जोडीला वीजनिर्मिती करण्याचे ध्येय संशोधकांनी बाळगले आहे.
दरम्यान, डीबीटी यांचेकडून हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. ज्योती जाधव यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील, डॉ. अनिल घुले, डॉ. एस.बी. सादळे उपस्थित होते.


Wednesday, 21 June 2017

शिवाजी विद्यापीठाच्या योग शिबिरात १५०० साधकांचा सहभाग



शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन उपक्रमाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. छायाचित्रात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. आर.आर. देशपांडे, डॉ. संदीप पाटील आदी.


योग साधना करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

योग शिबिरात सहभागी झालेले मान्यवर.







शिवाजी विद्यापीठाच्या योग शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योग साधक.

कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठ श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेली दोन वर्षे सुरू असलेल्या मोफत योग शिबीराचा द्विवर्षपूर्ती समारंभ तसेच तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दैनिक महाराष्ट्र टाइम्स परिवारही आजच्या योग दिन उपक्रमात सहभागी झाला. आजच्या विशेष योग शिबिरात सुमारे १५०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह आबालवृद्धांचा समावेश होता.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ९ या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून 'योगशक्ती - योगयज्ञ'अंतर्गत योग प्रशिक्षण कार्यक्रम सलग दोन वर्षे राबविण्यात येत आहे. या योग उपक्रमाचा दैनंदिन २००हून अधिक साधक लाभ घेतात.
या वेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, या दोन वर्षांत नागरिकांमध्ये योगसाधनेविषयी जागृती निर्माण करण्याबरोबरच त्यांना योगसाधना करण्यास प्रवृत्त करण्यात शिवाजी विद्यापीठ यशस्वी झाले आहे, याचे समाधान वाटते. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबीर कणेरी मठाच्या सहकार्याने या पुढेही राबविण्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी जाहीर केले.
यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव यांनी, या निरंतर योग शिबिराच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूरच्या नागरिकांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले गेले आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमात सहभागी होताना टाइम्स समूहास अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. अॅस्टर आधार हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांनी हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाच्या दक्षता या विषयी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी. शिंदे, महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, अॅस्टर आधार हॉस्पिटलचे संचालक आर.आर. देशपांडे, डॉ. संदीप पाटील, महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर गुरूबाळ माळी यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी सेवक उपस्थित होते.
यावेळी योग प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली. यापुढील काळातही साधकांनी दररोज सकाळी ६.३० ते ७.३० या कालावधीत विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिबिराचा उत्तम आरोग्यासाठी जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. दिव्यांग असूनही विद्यापीठाच्या योग शिबिरात सलग दोन वर्षे सहभागी होणारे योग साधक सुरेश माने यांचा यावेळी कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. आर.व्ही. गुरव यांनी स्वागत तर डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र मकोटे यांनी सूत्रसंचालन केले, तर शिरीष देसाई यांनी आभार मानले.

Saturday, 17 June 2017

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन बुक स्टोअरचे उद्घाटन




शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन बुक स्टोअरवरुन पहिले पुस्तक खरेदी करून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना प्रदान करताना प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले. सोबत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे.
कुलगुरूंच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त एम्प्लॉईज कॉर्नर सेवेचाही विस्तार

कोल्हापूर, दि. १७ जून: कुलगुरू पदाच्या कारकीर्दीस दोन वर्षे पूर्ण होत असतानाच विद्यापीठाच्या स्वतंत्र ऑनलाइन बुक स्टोअरचे उद्घाटन तथा लोकार्पण करीत असताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, अशी भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कारकीर्दीस आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रकाशने विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या एसयुके ई- स्टोअरचे तसेच एम्प्लॉईज कॉर्नरच्या विस्तारित सेवेचे आज कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या प्रकाशने विभागातर्फे आजपर्यंत अनेक दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. काही पुस्तकांना देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही मागणी आहे. मात्र ही पुस्तके केवळ प्रकाशने विभागातच उपलब्ध होती. हा माहितीचा, ज्ञानाचा खजिना वाचकांसाठी खुला करण्याचे स्वप्न मी बाळगले होते. त्यानुसार, आज विद्यापीठाच्या स्वतंत्र ई-बुक स्टोअरचे दालन वाचकांसाठी खुले करीत असताना अत्यंत आनंद होतो आहे. सध्या अधिक मागणी असणारी पुस्तके या व्यासपीठावर उपलब्ध केली असली, तरी टप्प्याटप्प्याने अन्य पुस्तकेही या व्यासपीठावरून खरेदीसाठी उपलब्ध केली जातील. ग्राहक कोणत्याही डिजीटल, कॅशलेस पद्धतीने ही पुस्तके खरेदी करू शकणार आहेत. विद्यापीठाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांतील ज्ञान अशा प्रकारे वाचकांसाठी खुले करण्याच्या या प्रयत्नाचे वाचकांतून निश्चितपणे स्वागत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी एसयुके ई-स्टोअरवरून पहिले पुस्तक खरेदी करून ते कुलगुरू डॉ. शिंदे यांना प्रदान केले.
त्याचप्रमाणे यावेळी विद्यापीठाच्या एम्प्लॉईज कॉर्नर या सुविधेद्वारे सेवकांना त्यांचे पगारपत्रक उपलब्ध करून देण्यात येत असे. त्यामुळे बराचसा कागद वाचविला गेला. आजपासून या व्यासपीठावर गुंतवणुकीचे विवरण आणि प्राप्तीकराचा अर्ज क्र. १६ही ऑनलइन उपलब्ध करून देण्यात आला. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या वैधानिक अधिकाऱ्यांना या तिन्हीचे वितरण वित्त व लेखा विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी मिडियाटेक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश शिंदे यांनी एसयुके ई-स्टोअरविषयी सादरीकरण केले. येत्या सोमवारपासून या स्टोअरची लिंक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. पी.एन. भोसले यांच्यासह विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.