Showing posts with label New Delhi. Show all posts
Showing posts with label New Delhi. Show all posts

Monday, 22 July 2024

विद्यापीठातील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करावे: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. धनंजय सुतार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व गिरीश कुलकर्णी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.




कोल्हापूर, दि. २२ जुलै: शिवाजी विद्यापीठाचा लौकिक हा जागतिक स्तरावर प्रकाशित होणाऱ्या संशोधनाच्या दर्जामुळे सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे संशोधकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये आपले संशोधन प्रकाशित व्हावे, यासाठी दर्जेदार संशोधन करावे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकदिवसीय स्कोपस व निंबस यांविषयी जागरुकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, संशोधनासाठी विविध प्रकारची संदर्भसाधने हाताशी असणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने ग्रंथालये मौलिक भूमिका बजावतात. माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वी संशोधकाला ग्रंथालयांत जाऊन दुर्मिळ आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचे संदर्भग्रंथ, शोधपत्रिका पाहाव्या लागत. त्यांच्या आधारे आवश्यक संदर्भ हाताने उतरून घ्यावे लागत. तथापि, आता आधुनिक काळात सर्व प्रकारचे ई-रिसोर्सेस उपलब्ध आहेत. ग्रंथालये ऑनलाईन झाली आहेत. सर्व संदर्भसाधने ऑनलाईन उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवरील कोणतीही माहिती, पुस्तक, संदर्भ क्षणात मिळविता येते. यामुळे संशोधनाचा दर्जा उंचावणे शक्य झाले आहे. हे दर्जानिश्चितीचे काम स्कोपस आणि निम्बससारखे निर्देशांक करतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून संशोधक आपले संशोधन प्रकाशित करतात, तेव्हा स्कोपसमध्ये त्यांची नोंद होण्याची शक्यता वाढते. गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे सुमारे ९०० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकांतून प्रकाशित झाले. त्यांनी सुमारे दीड लाख सायटेशन्स मिळाले. विद्यापीठाच्या एच-इंडेक्स १३५च्या घरात आहे, जो महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ही कामगिरी उंचावत ठेवण्यासाठी संशोधकांनी प्रयत्नरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठासह देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांचा संशोधकीय वेध घेतला असता भौतिकशास्त्र, मटेरियल सायन्स, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र अशा निवडक विषयांतील संशोधनाची संख्या अत्यधिक असल्याचे जाणवते. त्याचवेळी मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान शाखांकडील विषयांतील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी आहे. मराठीसारख्या विषयांचा अपवाद गृहित धरला तरीही या विद्याशाखांमधील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या दृष्टीने संशोधकांनी आणि विद्यापीठांनीही प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधनासाठी, विशेषतः संदर्भसाधनांच्या उपलब्धतेसाठी शिवाजी विद्यापीठाने भरीव तरतूद केली आहे, त्या साधनांचा संशोधक, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रुपाली भोसले व एस.डी. हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी आभार मानले.

उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात मुंबईच्या ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम टेक्नॉलॉजी (जिस्ट) या कंपनीचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी निम्बसच्या उपयोजनाविषयी, तर नवी दिल्लीच्या एल्सव्हियरच्या कस्टमर कन्सल्टंट ऐश्वर्या नायल यांनी स्कोपसच्या उपयोजनाविषयी उपस्थित संशोधक, विद्यार्थ्यांना अवगत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. एस.व्ही. थोरात, डॉ. वाय.जी. जाधव यांच्यासह ग्रंथालयातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Monday, 21 February 2022

‘भारतीय कंपनी सचिव संस्थान’समवेत

शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठ आणि आयसीएसआय (नवी दिल्ली) यांच्या दरम्यान कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. या प्रसंगी सामंजस्य कराराचे हस्तांतरण करताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयचे पवन चांडक. सोबत (डावीकडून) डॉ. केदार मारुलकर, डॉ. एस.एस. महाजन, ऐश्वर्या तोरस्कर, ज्योतिबा गावडे, अमित पाटील आणि अमित पसारे.


सामंजस्य करार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. समोर उपस्थित मान्यवर.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयचे पवन चांडक.



कोल्हापूर, दि. २१ फेब्रुवारी: भारतीय कंपनी सचिव संस्थान (आयसीएसआय, नवी दिल्ली) यांचा शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला सामंजस्य करार अत्यंत दिशादर्शक असा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन राजेश तरपरा यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारतीय कंपनी सचिव संस्थान यांच्या दरम्यान सहकार्यवृद्धीच्या अनुषंगाने आज सामंजस्य करार करण्यात आला. ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र स्वरुपात करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री. तरपरा ऑनलाईन सहभागी होऊन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्री. तरपरा म्हणाले, कंपनी सचिव पदासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्रदान करणारी आयसीएसआय ही एकमेव संस्था आहे. केंद्र सरकारचे कुशल भारत हे घोषवाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी संस्था अधिकाधिक प्रशिक्षण कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रम घेते आहे. शिवाजी विद्यापीठ आणि आयसीएसआय या दोन्ही संस्था आपापल्या क्षेत्रात प्रस्थापित आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ परस्परांबरोबरच विद्यार्थ्यांनाही होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठाने सेक्शन-८ कंपनी स्थापन केली असल्याचाही या कामी मोठा फायदा होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले संस्थेच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक मंडळाचे सदस्य पवन चांडक म्हणाले, आयसीएसआयचे देशभरात व्यापक जाळे आहे. १६ आयआयएम संस्थांसह विविध मान्यवर विद्यापीठांशी संस्थेने ७५ सामंजस्य करार केले आहेत. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या रुपाने एका दमदार साथीदाराचा समावेश झाल्याचा आनंद वाटतो. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात कंपनी सचिव पदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांत व्यापक जाणीवजागृती करण्यासाठी संस्था सर्वोतोपरी प्रयत्नशील राहील.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कंपनी सचिव या क्षेत्रातील संधींविषयी अद्याप शहरी भागाखेरीजचे बहुसंख्य विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. ग्रामीण, डोंगरी, दुष्काळी आदी दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना कंपनी सचिव क्षेत्रातील करिअर संधींची माहिती देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण, जागृती उपक्रम राबविण्याची गरज आहे. आंतरविद्याशाखीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने उपयुक्त असे उपक्रम राबविले जावेत. या सामंजस्य कराराअंतर्गत वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे विस्तृत नियोजन करावे आणि त्यानुसार वाटचाल करावी, तेव्हाच खऱ्या अर्थाने करार यशस्वी होईल. 

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह आयसीएसआय कोल्हापूर शाखेच्या चेअरपर्सन ऐश्वर्या तोरस्कर, व्हाईस चेअरमन ज्योतिबा गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयकडून पवन चांडक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत कराराच्या नस्तींचे हस्तांतर करण्यात आले.

सुरवातीला वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला, तर डॉ. केदार मारुलकर यांनी आभार मानले. यावेळी आयसीएसआयचे अमित पसारे आणि अमित पाटील उपस्थित होते.

सामंजस्य कराराअंतर्गत समाविष्ट ठळक मुद्दे-

·         संयुक्त संशोधन प्रकल्प राबविता येणार

·         राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवादांचे आयोजन करता येणार

·         नूतन अद्यावत व्यावसायिक अभ्यासक्रमांची आखणी करणे शक्य.

·         ट्रेन द ट्रेनर्स उपक्रम राबविता येणार

·         विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आयसीएसआय सिग्नेचर पुरस्कार योजनेत सहभागी होता येणार

·         आयसीएसआयच्या सहकार्याने आवश्यकता भासल्यास विद्यापीठात स्टडी सेंटर उभारता येणार

·         परस्परांच्या तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, प्रशिक्षक तसेच सीएस व्यावसायिक यांना संधी मिळणार

·         आयसीएसआयची दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. ती विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देणार

·         फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची आखणी करणार

·         उपरोक्तखेरीज वेळोवेळी आवश्यक वाटतील असे उपयुक्त उपक्रमही राबविले जाणार

 

Saturday, 21 December 2019

भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या सचिवपदी

डॉ. जगन कराडे यांची निवड



Dr. Jagan Karade
कोल्हापूर, दि. २१ डिसेंबर: देशातील समाजशास्त्रज्ञांची शिखर संस्था असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (इंडियन सोशियॉलॉजीकल सोसायटी, नवी दिल्ली) सचिवपदी शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा.डॉ. जगन कराडे यांची निवड झाली आहे. या पदावर निवड होणारे ते अवघे दुसरे महाराष्ट्रीय आहेत. त्यांच्या या निवडीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतीय समाजशास्त्र संस्थेचे भारतासह जगभरात सुमारे पाच हजार सदस्य आहेत. संस्थेच्या सचिव पदासाठी लखनौ विद्यापीठातील प्रा.डॉ. सुकांत चौधरी आणि डॉ. कराडे यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये डॉ. कराडे ५४६ विरुद्ध ५०६ मतांनी विजयी झाले. ही निवड दोन वर्षांसाठी आहे. महाराष्ट्रातून यापूर्वी माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे यांनी संस्थेचे सचिवपद भूषविले आहे. त्यांच्यानंतर या पदी निवड झालेले डॉ. कराडे दुसरेच महाराष्ट्रीय आहेत.
डॉ.कराडे यांचे राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पातळीवर अकरा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यातील दोन ग्रंथ केंब्रीज स्कॉलर पब्लिकेशन, लंडन येथून प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्रात कार्यरत मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. इंडियन सोशिओलॉजीकल सोसायटी या संस्थेच्या व्यवस्थापन समितीचेही ते सदस्य आहेत. त्यांनी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), टोरोंटो (कॅनडा) व तैपेई (तैवान) येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय परिषदांमध्येही सहभागी होऊन त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. टोरोंटो आंतराराष्ट्रीय परिषदे डब्ल्यूजी-०५ (फॅमिनियन अँड सोसायटी) या संशोधन समितीच्या २०१८ ते २०२२ या कालावधीकरिता संशोधन समिती कार्यकारिणीवर सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र परिषदेचे डॉ. कराडे यांनी अत्यंत यशस्वी आयोजन केले. या परिषदेत आठ माजी कुलगुरूंसह जगभरातून सुमारे २५० समाजशास्त्रज्ञ सहभागी झाले.
डॉ. कराडे यांच्या निवडीबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Saturday, 1 July 2017

रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत संशोधनासाठी ‘डीबीटी’कडून विद्यापीठास दीड कोटींचा प्रकल्प

डॉ. ज्योती जाधव यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

प्रकल्प प्रक्रियेची माहिती देणारी आकृती.

कागल येथील प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाची छायाचित्रे.

राष्ट्रीय प्रकल्पाच्या प्रमुखपदी डॉ. ज्योती जाधव

कोल्हापूर, दि. १ जुलै: केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे (डीबीटी, नवी दिल्ली) रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत संशोधनासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे तीन विद्यापीठांमध्ये संयुक्तरित्या होणाऱ्या या राष्ट्रीय प्रकल्पाचे नेतृत्व शिवाजी विद्यापीठाच्या जीव-रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा.डॉ. ज्योती जाधव यांच्याकडे देण्यात आले आहे. याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून शिवाजी विद्यापीठासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैद्राबाद आणि चारोतर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅड टेक्नॉलॉजी, गुजरात या तीन संस्थांमध्ये या प्रकल्पाबाबत संयुक्त संशोधन होणार आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ. ज्योती जाधव या प्रकल्प प्रमुख तर प्रा. एस.पी. गोविंदवार उप-प्रकल्प प्रमुख काम पाहणार आहेत. या प्रकल्पासाठी डीबीटीकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या प्रकल्पाबाबत प्रकल्प प्रमुख डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखान्यातून बाहेर पडणारे रंगमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जाते. या रंगमिश्रीत सांडपाण्यातील विषारी रासायनिक प्रदूषकांमुळे अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. पाण्यातील वनस्पती व जलचरांबरोबरच मानवावरही त्याचे दुष्परिणाम होतात. विविध ॲलर्जिक रिॲक्शन, म्युटेशन, अगदी कर्करोगही होतो. हे रंगमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वच स्तरांवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. जाधव म्हणाल्या, वस्त्रोद्योग कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मानवनिर्मित रासायनिक पदार्थ व रंगद्रवे वापरली जातात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या सेंद्रिय कणांना ॲझो संयुग म्हणतात. त्यामध्ये नायट्रोजन- नायट्रोजनमध्ये तीन घट्ट बंध असतात, त्यामुळे ते निसर्गात खूप काळ जसेच्या तसे आढळून येतात. या ॲझो संयुगाचे निसर्गात पुन्हा वापर करण्याकरिता त्यामधील घट्ट बंध तुटून त्याचे साध्या बंधामध्ये रुपांतर करण्याकरिता त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रंगमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, पण काही रासायनिक पदार्थ यामध्ये प्रक्रियेनंतरही आढळून येतात.
शिवाजी विद्यापीठात ‘बायोरिमेडिएशन’ प्रक्रियेने रंगमिश्रीत सांडपाणी स्वच्छ करण्याची पद्धत प्रायोगिक तत्वावर जवळपास गेल्या दहा वर्षांपासून केली जात असून या प्रयोगशाळेचा या क्षेत्रात जगात प्रथम क्रमांक आहे. याच कामाची दखल घेऊन डीबीटी (नवी दिल्ली) यांच्या वेबसाईटच्या होमपेजवर दोन वेळा झळकण्याचा बहुमान विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाला दोनदा प्राप्त झाला आहे. ‘बायोरिमेडिएशन’ प्रक्रियेने नैसर्गिकरित्या रंगमिश्रित सांडपाण्यावर कोणतेही रासायनिक पदार्थ न वापरता यशस्वीपणे प्रक्रिया केली जाते. काही बॅक्टेरिया (उदा.सुडोमोनास बॅसिलास) निसर्गात उपलब्ध आहेत, ज्यांचाकडे मोठ्या संयुगाचे लहान/ सध्या संयुगात रुपांतर करण्याची क्षमता आहे. तसेच, आम्हाला असेही लक्षात आले की, वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये (जलचर वनस्पती: आयपोमिया अक्वॅटिका, आयपोमिया हेडरीफोलिया, साल्विनिया मोलेस्टा, टायफा अँगस्तीफोलिया, पॅस्पॅलम स्क्रोबीकुलॅटम, ब्लुमिया मालकोमी, फ्युम्रीस्टायलीस डायोक्टोमा; फुलझाडे:- पोरचुल्याका ग्रँडीफ्लोरा, ॲस्टर अमेलस, टेजेतेस प्याचुला, गेलाराडिया ग्रंडीफ्लोरा) मोठी संयुगे शोषून घेण्याची क्षमता आहे. रंगमिश्रित सांडपाणी या वनस्पतींच्या मधून सोडल्याने यातील हानीकारक पदार्थ शोषून घेतात. तसेच, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) आणि टोटल डीझॉव्हल्ड सॉलीड (टीडीएस) हे मूल्यांक कमी झाल्याचे दिसून येते. परिणामी, सांडपाणी स्वच्छ होते. तसेच, या वनस्पती काही पोषकद्रव्ये सांडपाण्यात सोडतात. ज्यांच्यामुळे नैसर्गिक बॅक्टेरिया वेगाने वाढतात. ते बॅक्टेरीया रंगद्रव्याचे रुपांतर साध्या रंगहीन पदार्थांत करतात; तसेच, हानीकारक/ विषारी पदार्थांचे रूपांतर बिनविषारी पदार्थांत करण्यासही मदत करतात. या वनस्पती काही संप्रेरके (ल्याकेज, ॲझो रीडक्टेज, लीगानीन पेरॉक्सिडेज) स्रवतात, ज्यामुळे विषारी पदार्थांचे रूपांतर बिनविषारी पदार्थांत होते. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता वनस्पती व बॅक्टेरिया यांचा एकत्रित वापर करणे ही अत्यंत कार्यक्षम प्रक्रिया आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

एमआयडीसीमध्ये प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित
सध्या रंगमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया कागल येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) सात एकर जागेवर प्रत्यक्ष यशस्वीपणे कार्यरत आहे. कागल एम.आय.डी.सी.त ४५ एकर क्षेत्रात हाय रेट ट्रान्समिशन सिस्टीम (एच.आर.टी.एस.) तयार केली आहे. यामध्ये सलग नाला तयार करून बांधावर निलगिरी लावली आहे. या नाल्यातून सांडपाणी सोडले जाते. कॉमन एफ्लूयंट ट्रीटमेंट प्लँट (सी.इ.टी.पी.) त्यांच्याकडील सांडपाणी बायोरिमेडिएशन प्रक्रियेकरिता एच.आर.टी.एस. यंत्रणेमध्ये सोडतात. या यंत्रणेचा फायदा असा की, यातील निलगिरीची झाडे जास्तीत जास्त सांडपाणी शोषून घेतात. त्या सांडपाण्याबरोबर हानिकारक पदार्थ देखील शोषून घेतले जातात आणि झिरो डिस्चार्ज सिस्टीम तयार होते. एच.आर.टी.एस. क्षेत्रात डि-कलरायझेशन (रंग घालवण्याची क्षमता असणारी प्रक्रिया) क्षमता असणाऱ्या वनस्पतींची लागवड करून त्यामध्ये बॅक्टेरिया मिसळून तयार होणाऱ्या सिस्टीमला ‘फायटोरिॲक्टर’ म्हणतात. ही सिस्टीम अधिक क्षमतेने डि-कलरायझेशन प्रक्रिया करते. ती पर्यावरणपूरक व कमी खर्चिक आहे. प्रा. ज्योती जाधव आणि प्रा. एस.पी. गोविंदवार यांनी या संशोधनावर आधारित सुमारे १६५ शोधनिबंध विविध अंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांतून प्रसिद्ध केले आहेत. डीबीटीच्या नवीन प्रकल्पात डिकलरायझेशन प्रक्रियेच्या जोडीला वीजनिर्मिती करण्याचे ध्येय संशोधकांनी बाळगले आहे.
दरम्यान, डीबीटी यांचेकडून हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. ज्योती जाधव यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील, डॉ. अनिल घुले, डॉ. एस.बी. सादळे उपस्थित होते.


Monday, 26 December 2016

‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेची ‘युनिव्हर्सिटी न्यूज’कडून दखल





कोल्हापूर, दि. २६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या पावसाळ्यात कॅम्पसवर राबविलेल्याजलयुक्त विद्यापीठ या जलसंधारण मोहिमेची असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजकडून (ए.आय.यू.) दखल घेण्यात आली आहे. ए.आय.यू.च्या युनिव्हर्सिटी न्यूज या साप्ताहिकाच्या ताज्या अंकात या विषयी लेख प्रकाशित झाला आहे.
युनिव्हर्सिटी न्यूजचा नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१६ (खंड ५४, क्र. ४८) या कालावधीतील अंकात वॉटर कॉन्झर्व्हेशन इन कॅम्पस: ॲन इनिशिएटिव्ह ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी विद्यापीठात जलव्यवस्थापनाची केलेली कामे सर्वच विद्यापीठांसाठी आदर्शवत आहेत, असे यात म्हटले आहे.
शिवाजी विद्यापीठाने गतवर्षी पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी कॅम्पसमध्ये जलसंधारणाची अनेक कामे केली. यामध्ये दोन विहीरींच्या पुनरुज्जीवनासह तीन शेततळ्यांच्या कामाचा मुख्यत्वे समावेश होता. या कामी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध महाविद्यालयांचे शारिरीक शिक्षण संचालक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे पहिल्या पावसातच विद्यापीठ कॅम्पसवर ३० कोटी लीटर पाणी साठविण्यात यश आले. शिवाजी विद्यापीठाची ही जलयुक्त कॅम्पस मोहिमेची यशोगाथा जिल्हा प्रशासनासह सर्वच पातळ्यांवर वाखाणली गेली. माध्यमांनीही या कामाची प्रशंसा केली.
विद्यापीठाच्या या कामाची आता थेट ए.आय.यू.ने दखल घेतल्यामुळे अधिक उत्तम काम करण्यास बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.