Showing posts with label MoU. Show all posts
Showing posts with label MoU. Show all posts

Tuesday, 29 October 2024

शिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

 अधिकारी, जवानांना उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळणार


शिवाजी विद्यापीठाने भारतीय वायू दलासमवेत सामंजस्य करार केला. याप्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि एअर व्हाईस मार्शल राजीव शर्मा. सोबत (डावीकडून) विंग कमांडर बी.एम. जोसेफ, डॉ. महादेव देशमुख, विंग कमांडर विनायक गोडबोले, ग्रुप कॅप्टन रचना शर्मा, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रभंजन माने, डॉ. राजश्री बारवेकर आदी.




(सामंजस्य करार कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २९ ऑक्टोबर: भारतीय वायू दलाच्या (इंडियन एअर फोर्स) जवानांना सेवेवर कार्यरत असतानाही आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्राप्त होणार आहे, ही अतिशय मौलिक बाब असल्याचे मत भारतीय वायू सेनेचे एअर व्हाईस मार्शल राजीव शर्मा यांनी आज येथे व्यक्त केले.

भारतीय वायू सेना आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. तर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वायू सेनेच्या ग्रुप कॅप्टन रचना जोशी, विंग कमांडर विनायक गोडबोले, विंग कमांडर बी.एम. जोसेफ प्रमुख उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धे होते आणि त्यांचे नाव धारण करणाऱ्या विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करीत असताना भारतीय वायू सेनेला अत्यंत आनंद होत असल्याची भावना सुरवातीलाच व्यक्त करून एअर व्हाईस मार्शल श्री. शर्मा म्हणाले, या सामंजस्य कराराकडे मी केवळ अधिकारी आणि जवान यांच्याच कल्याणासाठीचा म्हणून पाहात नसून वायू सेनेच्या समग्र परिवाराचे शैक्षणिक उत्थान साधणारा हा करार आहे. देशातील अवघी २१ विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांसमवेत वायू दलाने करार केले त्यात शिवाजी विद्यापीठासह तीन संस्थांचा समावेश आहे. दहावी, बारावीनंतर सैन्यदलात भरती होणारे जवान, अग्नीवीर यांना त्यांचे पदवीचे शिक्षण घेता येईल, अधिकाऱ्यांना त्यांचे उच्चशिक्षण घेता येईल किंवा आवश्यक कौशल्याचे ज्ञान संपादन करता येईल, तसेच त्यांच्या परिवारातील मुलांनाही शिक्षण घेता येईल. वायू दल आणि विद्यापीठ या उभय बाजूंमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन त्याचा वायू दलाशी संबंधित घटकांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझ्या निळ्या युनिफॉर्ममधील सहकाऱ्यांना या कराराचा लाभ होणार असल्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे डीआरडीओ, डीआरडीई, डीएई, बीआरएनएस, बीएआरसी, आयआयजी, इस्रो इत्यादी विविध संरक्षण संस्थांशी संशोधकीय बंध प्रस्थापित झाले असल्याची माहिती दिली. अवकाश विज्ञान, हवामान शास्त्र, जिओ-इन्फॉर्मेटिक्स इत्यादी क्षेत्रांत विद्यापीठ मोठ्या प्रमाणात संशोधन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा भारतातील सैन्यदलासमवेत होणारा असा हा पहिलाच सामंजस्य करार असल्याने तो ऐतिहासिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भारतीय वायू दलातील अग्नीवीर, जवानांना उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ मदत करेलच. पण, त्यापुढे जाऊन वायू दलाने त्यांच्या शैक्षणिक गरजा कळविल्यास त्यास अनुसरून अभ्यासक्रमही निर्माण करता येतील. काही अभ्यासक्रम हे ऑनलाईन व ऑफलाईन अशा हायब्रीड स्वरुपात राबविण्यात येऊ शकतील. त्याखेरीज आवश्यकतेनुसार अल्प कालावधीच्या काही कार्यशाळाही आयोजित करता येतील. अशा प्रकारे सामंजस्य कराराच्या कक्षा वर्धित करता येऊ शकतील.

यावेळी सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी, तर भारतीय वायू दलाच्या वतीने एअर व्हाईस मार्शल श्री. शर्मा यांनी स्वाक्षरी केल्या. विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत केले. इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

माजी विद्यार्थ्याची भूमिका महत्त्वाची

विंग कमांडर विनायक गोडबोले हे विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे २१ वर्षांपूर्वीचे माजी विद्यार्थी आहेत. भारतीय वायू दलासमवेत आजचा सामंजस्य करार होण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उभय पक्षांमध्ये योग्य समन्वय राखून आजचा सामंजस्य करार त्यांनी घडवून आणला. मातृसंस्थेचे ऋण काहीअंशी फेडण्याचा आपला हा प्रयत्न असून हा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावनिक स्वरुपाचा असल्याचे श्री. गोडबोले यांनी यावेळी सांगितले.

सामंजस्य कराराविषयी थोडक्यात...

या सामंजस्य करारान्वये, भारतीय वायू दलातील पात्र जवानांना शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. त्यांना दलाच्या शिफारशीनुसार काही सवलतीही प्रदान केल्या जातील. वायू दलाच्या अधिकाऱ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी काही जागा विद्यापीठात राखीव ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे इच्छुक अधिकाऱ्यांना यूजीसी निकष पूर्ततेच्या अधीन पीएच.डी.साठीही प्रवेश देण्यात येईल. याखेरीज, सैन्यदलात कार्यरत, निवृत्त अथवा शहीद जवान, अधिकारी यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी काही सवलती देण्यात येतील.

या सामंजस्य करार प्रसंगी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, इंग्रजी अधिविभागातील डॉ. अक्षय सरवदे, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. एम.एस. वासवानी आदी उपस्थित होते.

Tuesday, 26 September 2023

सुप्रसिद्ध लॉरेन्स अँड मेयो कंपनीचा शिवाजी विद्यापीठासमवेत सामंजस्य करार

 

लॉरेन्स अँड मेयो कंपनीसमवेत सामंजस्य करार प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कंपनीचे समूह संचालक (विपणन) डॉ. विवेक मेंडोंसा. सोबत श्रीधर करंदीकर, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. महादेव देशमुख, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. कविता ओझा, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील आदी.


कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: ऑप्टीक्सच्या क्षेत्रातील आघाडीच्या सुप्रसिद्ध लॉरेन्स अँड मेयो प्रा. लि. (मुंबई) या कंपनीसमवेत आज शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य करार केला. सायबर सिक्युरिटी, ड्रोन तंत्रज्ञान आणि तत्सम आधुनिक डिजीटल ऑप्टीकल तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सहकार्यवृद्धीसाठी करार करण्यात आला आहे.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि कंपनीच्या वतीने समूह संचालक (विपणन) डॉ. विवेक मेंडोंसा यांनी स्वाक्षरी केल्या.

या सामंजस्य कराराचे स्वागत करताना प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, लॉरेन्स अँड मेयो ही केवळ कंपनी नसून एक सर्वंकष व्यवस्था म्हणून उदयास आली आहे. ऑप्टीक्सच्या क्षेत्रात अनेक गतिमान बदल होताहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे ज्ञान आणि लाभ पोहोचविणे आवश्यक बनले आहे. उद्योगामध्ये सामावण्यास तयार अशी प्रशिक्षित तरुणांची फळी घडविण्याच्या दृष्टीने आवश्यक शिक्षण, प्रशिक्षण व तंत्रज्ञान यांची गरज या सामंजस्य कराराद्वारे पूर्ण होईल. अन्वेषण, नवोन्मेष आणि पूरक सुविधा उभारण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन या सेक्शन-८ कंपनीने विशेष लक्ष पुरवून या करार यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. विवेक मेंडोंसा यांनी लॉरेन्स अँड मेयो कंपनीच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, गेल्या १४६ वर्षांत कंपनीने भारतासह जगभरात विश्वासार्हता प्राप्त केली आहे. ऑप्टोमेट्रीमधील शिक्षण देशात सुरू करण्यामध्येही कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वैद्यकीय संस्थांसाठी अत्याधुनिक क्रिटीकल व अॅनालिटीकल साधने निर्माण केली आहेत. विविध शैक्षणिक संस्थांसमवेत औद्योगिक प्रशिक्षणाबाबत करार केले आहेत. स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी कंपनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत आली आहे. शिवाजी विद्यापीठासमवेत करारान्वयेही विद्यार्थ्यांना अत्याधुनिक अभ्यासक्रम, विशेष कोर्सेस, नवसाधनांचा परिचय करून देऊन उद्योगास पूरक मनुष्यबळ निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, तंत्रज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. एस.एन. सपली, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिस केंद्राचे समन्वयक डॉ. एस.डी. डेळेकर, संगणकशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कविता ओझा, डीएसटी, पुणे येथील माजी संचालक श्रीधर करंदीकर, लॉरेन्स अँड मेयो कंपनीचे श्री. पिल्लई, श्री. लिअँडर आणि श्री. गिरीधर आदी उपस्थित होते.

उद्योगकेंद्री विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त करार: कुलगुरू डॉ. शिर्के

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे बैठकीच्या निमित्ताने बाहेर असल्याने सदर कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. तथापि, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वाचा आहे. लॉरेन्स अँड मेयो या कंपनीच्या अनुभवाचा लाभ घेऊन विद्यापीठात उद्योगकेंद्री युवक निर्माण होतील. त्या दृष्टीने विद्यापीठ सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

Friday, 22 April 2022

शिवाजी विद्यापीठाचा ‘आयसीटी’समवेत सामंजस्य करार

 

ICT, Mumbai


 

कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी, मुंबई) यांचा येथील शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराचा लाभ या दोन्ही शैक्षणिक व संशोधकीय संस्थांमधील प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर घटकांनाही होईल, अशी अपेक्षा आयसीटीचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या विविध विज्ञान विभागांत, सैफ-सीएफसी (SAIF-CFC) येथे आणि आयसीटीच्या विविध कॅम्पसमध्ये उपलब्ध असणारी अत्याधुनिक उपकरणे वापरण्यासाठीचे कौशल्यही त्यांना परस्परपूरक स्वरुपाचे ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठ आणि आयसीटी, मुंबई यांच्या दरम्यान १२ एप्रिल २०२२ रोजी पाच वर्षांच्या कालावधीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि आयसीटीच्या संशोधन व नवोन्मेष विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. पद्मा व्ही. देवराजन यांनी स्वाक्षरी केल्या.

संयुक्त संशोधनपर व शैक्षणिक उपक्रम या संदर्भातील देवाणघेवाण हा या सामंजस्य कराराचा प्रमुख हेतू आहे. यातून नवीन तंत्रज्ञानवर्धित संशोधन अपेक्षित आहे. या करारामध्ये गरजेनुसार अन्य विज्ञान अधिविभागांना सामावून घेण्याचीही अगर स्वतंत्र करार करण्याचीही तरतूद आहे.

आता या सामंजस्य करारामुळे, दोन्ही विद्यापीठांनी विविध संशोधन उपक्रम सुरू केले आहेत त्याचे प्रस्ताव निधी संस्थांकडे सादर केले जातील. दोन्ही संस्थांमधील या समान स्वारस्य असणाऱ्यांना या सामंजस्य करारामुळे संयुक्त संशोधन आणि प्रकाशनाला आणखी गती मिळेल.

कराराच्या अनुषंगाने माहिती देताना पदार्थविज्ञान अधिविभागाचे डॉ. आर.जी. सोनकवडे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आयसीटीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहकार्याने कौशल्य विकास करवून ज्ञान वाढवण्यासाठी हा करार नक्कीच उपयुक्त ठरेल. संयुक्त संशोधन आणि प्रकाशनांच्या शक्यता विकसित करण्यासाठी संयुक्त चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळा आयोजित करून प्रशासन आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनुभव आणि कौशल्याची देवाणघेवाण केली जाणेही याअंतर्गत अभिप्रेत आहे.

या कराराच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आयसीटी ही राज्यातील एक महत्त्वपूर्ण संशोधन संस्था असून त्यांच्यासमवेतच्या करारामुळे संयुक्त संशोधन उपक्रमांना चालना मिळेल. विशेषतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा विविध प्रमुख विज्ञान विभागांमधील संशोधनाला गती मिळेल. तसेच, शिवाजी विद्यापीठात उपलब्ध संशोधन सामग्रीचा आयसीटीच्या संशोधक, विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल.

Monday, 21 February 2022

‘भारतीय कंपनी सचिव संस्थान’समवेत

शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठ आणि आयसीएसआय (नवी दिल्ली) यांच्या दरम्यान कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. या प्रसंगी सामंजस्य कराराचे हस्तांतरण करताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयचे पवन चांडक. सोबत (डावीकडून) डॉ. केदार मारुलकर, डॉ. एस.एस. महाजन, ऐश्वर्या तोरस्कर, ज्योतिबा गावडे, अमित पाटील आणि अमित पसारे.


सामंजस्य करार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. समोर उपस्थित मान्यवर.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयचे पवन चांडक.



कोल्हापूर, दि. २१ फेब्रुवारी: भारतीय कंपनी सचिव संस्थान (आयसीएसआय, नवी दिल्ली) यांचा शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला सामंजस्य करार अत्यंत दिशादर्शक असा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन राजेश तरपरा यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारतीय कंपनी सचिव संस्थान यांच्या दरम्यान सहकार्यवृद्धीच्या अनुषंगाने आज सामंजस्य करार करण्यात आला. ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र स्वरुपात करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री. तरपरा ऑनलाईन सहभागी होऊन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्री. तरपरा म्हणाले, कंपनी सचिव पदासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्रदान करणारी आयसीएसआय ही एकमेव संस्था आहे. केंद्र सरकारचे कुशल भारत हे घोषवाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी संस्था अधिकाधिक प्रशिक्षण कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रम घेते आहे. शिवाजी विद्यापीठ आणि आयसीएसआय या दोन्ही संस्था आपापल्या क्षेत्रात प्रस्थापित आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ परस्परांबरोबरच विद्यार्थ्यांनाही होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठाने सेक्शन-८ कंपनी स्थापन केली असल्याचाही या कामी मोठा फायदा होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले संस्थेच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक मंडळाचे सदस्य पवन चांडक म्हणाले, आयसीएसआयचे देशभरात व्यापक जाळे आहे. १६ आयआयएम संस्थांसह विविध मान्यवर विद्यापीठांशी संस्थेने ७५ सामंजस्य करार केले आहेत. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या रुपाने एका दमदार साथीदाराचा समावेश झाल्याचा आनंद वाटतो. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात कंपनी सचिव पदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांत व्यापक जाणीवजागृती करण्यासाठी संस्था सर्वोतोपरी प्रयत्नशील राहील.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कंपनी सचिव या क्षेत्रातील संधींविषयी अद्याप शहरी भागाखेरीजचे बहुसंख्य विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. ग्रामीण, डोंगरी, दुष्काळी आदी दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना कंपनी सचिव क्षेत्रातील करिअर संधींची माहिती देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण, जागृती उपक्रम राबविण्याची गरज आहे. आंतरविद्याशाखीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने उपयुक्त असे उपक्रम राबविले जावेत. या सामंजस्य कराराअंतर्गत वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे विस्तृत नियोजन करावे आणि त्यानुसार वाटचाल करावी, तेव्हाच खऱ्या अर्थाने करार यशस्वी होईल. 

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह आयसीएसआय कोल्हापूर शाखेच्या चेअरपर्सन ऐश्वर्या तोरस्कर, व्हाईस चेअरमन ज्योतिबा गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयकडून पवन चांडक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत कराराच्या नस्तींचे हस्तांतर करण्यात आले.

सुरवातीला वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला, तर डॉ. केदार मारुलकर यांनी आभार मानले. यावेळी आयसीएसआयचे अमित पसारे आणि अमित पाटील उपस्थित होते.

सामंजस्य कराराअंतर्गत समाविष्ट ठळक मुद्दे-

·         संयुक्त संशोधन प्रकल्प राबविता येणार

·         राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवादांचे आयोजन करता येणार

·         नूतन अद्यावत व्यावसायिक अभ्यासक्रमांची आखणी करणे शक्य.

·         ट्रेन द ट्रेनर्स उपक्रम राबविता येणार

·         विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आयसीएसआय सिग्नेचर पुरस्कार योजनेत सहभागी होता येणार

·         आयसीएसआयच्या सहकार्याने आवश्यकता भासल्यास विद्यापीठात स्टडी सेंटर उभारता येणार

·         परस्परांच्या तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, प्रशिक्षक तसेच सीएस व्यावसायिक यांना संधी मिळणार

·         आयसीएसआयची दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. ती विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देणार

·         फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची आखणी करणार

·         उपरोक्तखेरीज वेळोवेळी आवश्यक वाटतील असे उपयुक्त उपक्रमही राबविले जाणार

 

Friday, 18 January 2019

उत्कृष्ट संशोधनासाठी संयुक्त प्रकल्पांची गरज: डॉ. पी.पी. वडगावकर

शिवाजी विद्यापीठाने पुणे येथील सीएसआयआर-एनसीएल या संस्थेशी संशोधनविषयक सामंजस्य करार केला. या प्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि एनसीएलचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर. सोबत (डावीकडून) डॉ. अकल्पिता अरविंदेकर, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. पी.एस. पाटील आणि डॉ. जे.एस. बागी.


शिवाजी विद्यापीठाचा सीएसआयआर-एनसीएलशी संशोधनविषयक सामंजस्य करार

कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: प्रयोगशाळेत संशोधकाने एकट्याने संशोधन करण्याचे दिवस आता मागे पडले असून उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी विविध संस्थांनी संयुक्त प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ आणि सीएसआयआर-एनसीएल यांच्या दरम्यानचा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठ आणि सीएसआयआर-एनसीएल यांच्यात आज संशोधनविषयक सहकार्याचा सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. वडगावकर म्हणाले, उत्कृष्ट संशोधनासाठी संयुक्त प्रकल्प हाती घेणे आज आवश्यक झाले आहे. त्यासाठी संशोधन संस्थांनी, तेथील संशोधकांनी एकत्र येऊन एकमेकांशी चांगला परिचय करून घेतला पाहिजे. आपापल्या संशोधन क्षेत्राची माहिती एकमेकांना दिली पाहिजे. त्यातून संशोधनाच्या नवनव्या संधी सामोऱ्या येतील. यामध्ये आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पांचेही महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ पायाभूत सुविधाच नव्हेत, तर मानवी स्नेहबंधही अशा संयुक्त प्रकल्पांमधून वाढीस लागतात, हे अशा करारांचे महत्त्वाचे फलित असते, हे दुर्लक्षून चालणार नाही.

यावेळी डॉ. वडगावकर यांनी आपणही शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे १९७९च्या बॅचचे विद्यार्थी असल्याचा अभिमानपूर्वक उल्लेख केला. एनसीएलच्या प्रगतीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे योगदान लाभले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, या सामंजस्य करारामुळे संशोधन, संयुक्त प्रकल्प, प्रयोगशाळा सहकार्य या बाबींविषयी एनसीएलबरोबर संवाद आणि साहचर्य वाढेलच, पण त्याचबरोबर आपल्या संशोधनाचे पेटंट मिळविण्याच्या कामी एनसीएलच्या अनुभवी संशोधकांचे मार्गदर्शन विद्यापीठाच्या संशोधकांना लाभेल. त्याचप्रमाणे संशोधनाचे तंत्रज्ञानात रुपांतरण आणि औद्योगिक साहचर्य वृद्धी या दृष्टीनेही त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी, तर एनसीएलच्या वतीने डॉ. वडगावकर यांनी स्वाक्षरी केल्या. या वेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

Wednesday, 6 September 2017

शिवाजी विद्यापीठाचा रिलायन्स जिओशी

वाय-फाय सुविधेसाठी सामंजस्य करार





कोल्हापूर, दि. ६ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांना वाय-फाय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने रिलायन्स जिओशी नुकताच सामंजस्य करार केला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या शुक्रवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या करार प्रसंगी प्रा-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले व इंटरनेट विभाग समन्वयक डॉ. मिलिंद जोशी उपस्थित होते.  रिलायन्स जिओतर्फे श्री. बालसुब्रमण्यम अय्यर व किशोर पाटील उपस्थित होते. सामंजस्य करारावर विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी तर रिलायन्सतर्फे श्री. अय्यर यांनी स्वाक्षरी केल्या.
या सामंजस्य करारानुसार रिलायन्स जिओतर्फे विद्यापीठाच्या प्रांगणात वाय-फाय सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहे. उपकरणे व देखभालीचा खर्च रिलायन्स जिओ करणार आहे. विद्यापीठ वर्धापन दिनादिवशी ही सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्या विद्यापीठाशी संलग्नित १६२ महाविद्यालयांत रिलायन्स जिओतर्फे वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व महाविद्यालये विद्यापीठास जोडली जातील. विद्यापीठासह महाविद्यालयांत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे प्रक्षेपण जिओ सेवेद्वारे करता येणे शक्य होणार आहे. तसेच, जिओ चॅट सेवेद्वारे दृश्य (व्हिडिओ) संपर्क साधणे सुलभ होणार आहे.