Showing posts with label Dr. A.M. Gurav. Show all posts
Showing posts with label Dr. A.M. Gurav. Show all posts

Wednesday, 23 February 2022

विशेष वृत्त:

गुळापासून साठहून अधिक पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण


 

गुळाच्या विविध उपपदार्थ उत्पादनांसमवेत डॉ. ए.एम. गुरव

विद्यापीठाच्या उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्राची कामगिरी

 

कोल्हापूर, दि. ३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्रामार्फत गुळापासून एक-दोन नव्हे, तर तब्बल साठपेक्षा अधिक प्रकारचे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन गूळ उद्योजकांना दिले जाते आहे. गूळ कँडी, गूळ पावडर, काकवी, गुळाचा चहा, गुळाची चॉकलेट अशा पदार्थांचा यात समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठातील उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव सातत्याने गुळवे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. स्वतः डॉ. गुरव वीस वर्षांहून अधिक काळ गुळावर संशोधन करीत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठासह अन्यत्रही २५ गुळवे प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सहा गूळ प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये सांगली, मजले, रहिमतपूर, पंचतारांकित एम.आय. डी.सी, नेज आणि कणेरी मठ येथील गूळ-उत्पादन प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्रामार्फत कोल्हापूरबरोबरच नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शंभरहून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. सध्या कोविड काळात कार्यशाळांचे प्रमाण कमी झाले असले तरी शक्य तिथे ऑनलाईन मार्गदर्शनही करण्यात येते.   

या संदर्भात बोलताना डॉ. गुरव म्हणाले, सध्याच्या आधुनिक युगात युवकांचा ओढा उद्योजकतेच्या दिशेने वाढतो आहे. त्यामध्ये नवनवीन उद्योगांचा समावेश आहे. त्यामध्येच शरीरासाठी अत्यंत लाभदायक असणाऱ्या गुळापासून विविध पदार्थ बनवण्याचा व्यवसाय वाढत आहे. या व्यवसायातून रोजगार निर्मितीही होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र गेली अनेक वर्षे गूळ उद्योगासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहे. सध्या कोल्हापूरजवळील ५ ते १० गुऱ्हाळघरांवर कार्यशाळा घेण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. गुरव म्हणाले की, खरेदी विक्रीतील पारदर्शकता हेच कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे गमक असते. गुळात साखरेची भेसळ करून गोडवा वाढवण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात. अशा भेसळीच्या प्रकारांपासून शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक दूर राहायला हवे. उत्पादनातील गुणवत्ता सांभाळली की आपोआप त्याची उत्तम विक्री होऊ शकते.

गुळापासून बनणाऱ्या पदार्थांचे उत्पादन घेण्यासाठी तरुण उद्योजक, बँका आणि शासनाची सकारात्मक भूमिका या तिन्हीची सांगड आवश्यक आहे. हा व्यवसाय सुरू करणे सुरवातीला थोडे खर्चिक असले तरी तरुणांनी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. काही तरुणांनी या व्यवसायात कमी कालावधीत उत्तम यश संपादन केल्याचीही उदाहरणे आहेत. योग्य नियोजन आणि मार्गदर्शन यांच्या आधारे हा व्यवसाय यशस्वी होतो. गुळापासून बनवलेल्या उत्पादनांचा उपयोग सणा-सुदीला भेट देण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर होतो आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागात अशा आरोग्यदायी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गुरव २०१३ साली गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे मार्केटिंग करण्यासाठी दुबईला गेले होते, त्यावेळी या उत्पादनांना उत्तम प्रतिसाद लाभल्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.

या पदार्थांचा समावेश आहे गूळ उत्पादनांत...

गुळापासून बनविण्यात येणाऱ्या या पदार्थांमध्ये गुळाची ढेप, गूळ पावडर, गुळाचे वेगवेगळ्या आकाराचे क्यूब (घन), काकवी, मोदक, गुळाचे ग्रॅन्युल्स, गुळाचे कॅडबरीसदृश चॉकलेट्स, गुळाचे सरबत, गुळाची बिस्किटे, नाचणी-गुळाची बिस्किटे, गूळ चहा प्रि-मिक्स, गूळ कॉफी प्रि-मिक्स, गूळ लिंबूपाणी, चिक्की- शेंगदाणे, चणा डाळ, गूळ सुजी, डार्क चॉकलेट, गूळ कँडी ज्यात इलायचीसह नऊ वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहेत. गुळाचा वापर करून बनाना आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम तयार केले आहे. चिरमुरा लाडू, राजगिरा लाडू, बुंदीचे लाडू, नाचणीचे लाडू, गुळाची रेवडी बनवले जातात. हळद आणि गुळ पावडर एकत्र करून त्यापासून कॅप्सूल तयार केली आहे, जी चेहऱ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मिकी माऊस, ससा, बैल, हत्ती आदी खेळणी आणि भेटवस्तूही गुळापासून बनविता येतात. मऊ खारकेतील बी काढून त्यामध्ये उत्तम प्रतीचा गुळ भरून तुपाचे दोन थेंब घालून ते बंद केले जाते. ते आठ दिवस ठेवल्यानंतर अत्यंत चविष्ट पदार्थ तयार होतो. अशा प्रकारे गुळापासून विविध पदार्थ तयार केले जातात, ज्यामुळे गुळाला मागणी वाढून शेतकऱ्यांना त्यापासून नफा मिळू शकेल, असे डॉ. गुरव यांनी सांगितले.

Friday, 10 November 2017

कौशल्य विकास, रोजगाराभिमुख ज्ञानरचनावादाची गरज: डॉ. विलास नांदवडेकर

डॉ. विलास नांदवडेकर

प्रशिक्षणात सहभागी शिक्षक

विद्यापीठात 'इन्फोसिस'च्या सहकार्याने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात कौशल्य विकास व रोजगाराभिमुख ज्ञानरचनावादाच्या निर्मितीची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात इन्फोसिसच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन आज सकाळी डॉ. नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रसायनशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्याया कार्यक्रमास इन्फोसिसच्या सी.एस.आर. व डायव्हर्सिटी इनिशिएटिव्ह्ज व्यवस्थापक रिना रवी आणि ट्रेनर लीना अमृते, श्री. जोसेफ प्रमुख उपस्थित होत्या. उपक्रमात विविध महाविद्यालयांतील ४५ शिक्षक सहभागी झाले आहेत.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांत सृजनशीलता विकास डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानरचनावाद आकाराला आला. त्याच धर्तीवर उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातही सृजनशीलता विकास, आऊटकम बेस्ड लर्निंग, कौशल्य विकास व उपयोजित ज्ञान देऊन हातांना काम प्रदान करणाऱ्या शिक्षणाची आणि ते देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचे ३५०हून अधिक विशेष अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. आजचा विद्यार्थी हा माहितीसंपन्न आहे. तथापि, त्यांच्याकडील माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्याचा पद्धतशीरपणे वापर करण्याची क्लृप्ती या शिक्षकांनी शिकविणे नव्या व्यवस्थेत अभिप्रेत आहे.
या उपक्रमाच्या आयोजनामागील हेतू अधिक स्पष्ट करून सांगताना कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, आपण निवडक शिक्षकांनी या प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे. संशोधनाची गरज, सृजनशीलता वृद्धी, अभिनव संकल्पना विकास व सहभाग, रोजगार व रोजगारक्षमता निर्मिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास करण्याची जबाबदारी आपणा सर्व शिक्षकांवर आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीगत विकास करीत असतानाच संस्थेच्या हिताचा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
उपक्रमाचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. इन्फोसिसच्या रिना रवी यांनी सुधा मूर्ती यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ट्रेन द ट्रेनर उपक्रमाचे समाजाच्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व विषद केले. सचिन जाधव यांनी आभार मानले.

Friday, 15 July 2016

कौशल्यांच्या योग्य वापराने ध्येयसिद्धी निश्चित: कौस्तुभ बंकापुरे


कौस्तुभ बंकापुरे





शिवाजी विद्यापीठात जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात

कोल्हापूर, दि. १५ जुलै: आपल्याला आयुष्यात कोठे पोहोचायचे आहे, ते ठरवून त्या दृष्टीने आपल्या अंगभूत कौशल्यांचा विकास करण्याबरोबरच अन्य आवश्यक कौशल्ये आत्मसात करून त्यांचा योग्य वापर केल्यास आपले ध्येय निश्चितपणे साध्य करता येते, असा विश्वास कौशल्य प्रणेते कौस्तुभ बंकापुरे यांनी आज विद्यार्थ्यांच्या मनात जागविला.
शिवाजी विद्यापीठाच्या 'कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रा'तर्फे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज 'आइस ब्रेकिंग फॉर स्कील डेव्हलपमेंट' या विषयावर श्री. बंकापुरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. जे.एस. बागी प्रमुख उपस्थित होते.
विविध उदाहरणांसह कौशल्याचे महत्त्व पटवून देताना श्री. बंकापुरे यांनी कौशल्य विकासाची चतुःसूत्रीच विद्यार्थ्यांना दिली. ते म्हणाले, आयुष्यात कोणतेही कौशल्य मिळवायचे असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम आपली तयारी असणे हा पहिला मंत्र आहे. त्यानंतर तुम्हाला काय येते, ही गोष्टही महत्त्वाची ठरते. आपल्या मनात आलेल्या प्रत्येक विचाराला गांभीर्याने घेऊन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे ही तिसरी महत्त्वाची बाब, तर तांत्रिक व अतांत्रिक कौशल्यांचा समतोल अंगिकार व विकास ही चौथी महत्त्वाची बाब ठरते. या बळावर आयुष्यात कोणत्याही कौशल्याचे उत्तम रोजगारात यशस्वी रुपांतर करता येऊ शकते. संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर करणे आणि सामान्यज्ञान या मूलभूत गोष्टींच्या बळावर स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा ठसा निर्माण करणे ही बाबही महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, आजच्या युवा पिढीची तंत्रज्ञानावर उत्तम पकड आहे. त्यामुळे तंत्रविषयक कौशल्ये सहजतेने आत्मसात केली जाताहेत. कौणतेही कौशल्य शिकण्याची संधी विद्यार्थ्यांनी अजिबात सोडता कामा नये. ते आत्मसात करणे अवघड आहे, असे मानू नये. आत्मसात केलेले कोणतेही कौशल्य कधीही वाया जात नाही. त्याचा योग्य वेळी वापर केला तर ते निश्चितच आयुष्याला दिशादर्शक ठरते.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी इंग्रजी भाषा आणि संभाषण कौशल्याचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, वाचन, लिखाण या बाबींप्रमाणेच श्रवण ही सुद्धा कौशल्यपूर्ण बाब आहे. आणि संभाषण हे तर त्याहूनही महत्त्वाचे कौशल्य आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा बाऊ न करता तिच्या माध्यमातून हे संभाषण कौशल्य विकसित केले पाहिजे. तथापि, पारंपरिक ज्ञानाबरोबर आयुष्यात उभे करणारे कोणतेही कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची नितांत गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोगजार विभागाचे सहाय्यक संचालक सचिन जाधव यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.