Showing posts with label Dr. D.T. Shirke. Show all posts
Showing posts with label Dr. D.T. Shirke. Show all posts

Tuesday, 29 July 2025

वारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के

डॉ. दिगंबर शिर्के


कोल्हापूर, दि. २९ जुलै: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश आज विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाला.

प्राप्त आदेशान्वये, डॉ. दिगंबर शिर्के यांची कुलगुरू पदावरील नियुक्ती, ते विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरू पदाचा पदभार ज्या दिनांकाला स्वीकारतील, त्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम ११ मधील तरतुदींन्वये नियुक्त केलेले कुलगुरू आपले पदग्रहण करेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल, तोपर्यंत करण्यात आली आहे.

डॉ. शिर्के हे शिवाजी विद्यापीठातील त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या पदाची कर्तव्ये सांभाळून वारणा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार धारण करतील आणि त्यानंतर ते वारणा विद्यापीठाचे पूर्णवेळ प्रथम कुलगुरू होतील, असेही आदेशामध्ये म्हटले आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यापूर्वी सातारा येथे नव्याने स्थापित कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.

मातृसंस्थेसाठी काम करण्याची संधी: कुलगुरू डॉ. शिर्के

वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचा प्रथम कुलगुरू होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. याचे कारण म्हणजे माझे पदवी स्तरावरील प्रथम वर्षाचे शिक्षण हे याच संस्थेमध्ये झाले आहे. तेथून पुढे मी कोल्हापूर येथे शिक्षणासाठी दाखल झालो आणि पुढील समग्र कारकीर्द शिवाजी विद्यापीठात साकार झाली. आता शिवाजी विद्यापीठासारख्या मातृसंस्थेतील सेवा समाधानपूर्वक पूर्ण करीत असतानाच ही नवी संधी प्राप्त झाल्याने या मातृसंस्थेसाठीही काम करता येणार आहे, याचा आनंद वाटतो, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Monday, 30 June 2025

‘प्राध्यापक’ दिगंबर शिर्के यांनी अधिविभागात घेतले अखेरचे लेक्चर!

 



(फोटोओळ- उपरोक्त सर्व फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात शिक्षक म्हणून अखेरचे लेक्चर घेताना कुलगुरू तथा प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के. 

(प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के यांच्या निवृत्तीदिवशी अधिविभागातील अखेरच्या व्याख्यानाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. ३० जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा संख्याशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्यांच्या शिक्षक म्हणून अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देऊन अधिविभागाचा निरोप घेतला. नियत वयोमानानुसार डॉ. शिर्के आज संख्याशास्त्र अधिविभागातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.

आजचा काळ स्मार्ट क्लासरुम शिक्षणाचा असला तरी सच्चा हाडाच्या शिक्षकासाठी मात्र खडू, फळा आणि डस्टर या साधनांचेच आकर्षण असते. साधारण ४० वर्षांपूर्वी जून १९८५ मध्ये डॉ. शिर्के हे विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात दाखल झाले. तेथपासून ते आजतागायत त्यांची संपूर्ण कारकीर्द शिवाजी विद्यापीठातच घडली, साकार झाली. विद्यार्थीदशेत असतानाच डॉ. शिर्के यांनी खडू, फळा आणि डस्टरधारी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. शिक्षकापासून ते अधिविभाग प्रमुख पदापर्यंत आणि प्रशासनातील कुलसचिव पदापासून ते कुलगुरू पदापर्यंत त्यांनी सर्व पदे यशस्वीरित्या भूषविली. प्रशासनात असतानाही त्यांनी वेळोवेळी अधिविभागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अध्यापन केले. शिक्षक म्हणून आपल्या अखेरच्या दिवशीही आपण विद्यार्थ्यांसमोर खडू, फळ्यावर लेक्चर घ्यावयाचे, अशी सुप्त इच्छा डॉ. शिर्के यांच्या मनी होती. ती त्यांनी आज त्यांच्या शिक्षक पदाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण केली.

सदर व्याख्यानासाठी ते नेहमीप्रमाणे अर्धा तास आधीच संख्याशास्त्र अधिविभागात उपस्थित झाले. शिकवावयाच्या विषयाचा अभ्यास केला. आवश्यक नोट्स तयार केल्या आणि वर्गात प्रवेश केला. त्यांनी "स्टॅटिस्टिकल सिम्युलेशन अँड इट्स अॅप्लीकेशन्स" या विषयावर अतिशय सोप्या पद्धतीने, सुसंगत उदाहरणांसह व्याख्यान दिले.

या व्याख्यानात त्यांनी अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या दि अमेरिकन स्टॅटिस्टिशियन या मान्यताप्राप्त शोधपत्रिकेमध्ये १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातील आयलस कॉन्स्टंट (e) संदर्भातील संख्याशास्त्रीय सिद्धांत, संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवल्या. त्या संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि विद्यार्थ्यांच्या आकलनास अनुरूप अशा शब्दांत मांडल्या.

विशेष म्हणजे, अधिविभागात स्मार्ट क्लासरुम आणि स्मार्ट बोर्ड असतानाही त्यांनी हा विषय खडू आणि फळा अशा पारंपरिक पद्धतीने शिकविण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या विषयावर आधारित पुढील अभ्यास आणि संशोधनाच्या दिशांचे स्वरुप याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्राध्यापक शिर्के यांनी आपल्या अधिविभागातील शिक्षक म्हणून अखेरच्या व्याख्यानाचा समारोप केला. कोणताही औपचारिक निरोप नाही, समारंभ नाही, पुष्पगुच्छांची देवाणघेवाण नाही, झाली ती केवळ विचारांची देवाणघेवाण. कुलगुरू पदाचा बडेजाव न मिरविता एक शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना किती निरलस भावनेने निवृत्तीकडे सरकता येते, याचा वस्तुपाठच जणू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या निमित्ताने घालून दिला.

Tuesday, 15 February 2022

अधिकाधिक संपत्तीसंचयाच्या हव्यासातून

गरीब-श्रीमंत दरीत वाढ: डॉ. उत्तमराव भोईटे

‘असमानता आणि दारिद्र्य’ ग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

 

'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत ग्रंथाचे संपादक डॉ. जगन कराडे आणि डॉ. आर.बी. पाटील.

'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करताना माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे. सोबत सहभागी समाजशास्त्रज्ञ.

'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


 

कोल्हापूर, दि. १५ फेब्रुवारी: भांडवलशाहीच्या रेट्यात अधिकाधिक संपत्तीसंचयाच्या हव्यासातून जगात गरीब-श्रीमंत अशी दरी वाढते आहे, असमानतेला खतपाणी घालते आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने ‘असमानता आणि दारिद्र्य’ (Inequality and Poverty) या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते.

डॉ. भोईटे म्हणाले, दारिद्र्य आणि असमानता या अनुषंगाने प्राचीन काळापासून चर्चा होतच आली आहे. महाभारत असो की कालिदासाचे मृच्छकटिक, प्राचीन वाङ्मयातही त्यांचे दाखले आढळतात. मानवी जगण्यासमोरची ही दोन मोठी आव्हाने आणि अविभाज्य घटक आहेत. दारिद्र्याचे दशावतारही अनेक स्वरुपाचे आढळतात. आपण एकावर उपाय शोधला की त्याचा नवा प्रकार सामोरा येतो. असे निरंतर सुरू आहे. लोक गरीबीसह जगणे स्वीकारतात. त्यांच्याहून अधिक भौतिक स्थितीतील लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात आपल्या गरीबीच्या जाणीवा निर्माण होतात. पूर्वी धट्टीकट्टी गरीबी, लुळीपांगळी श्रीमंती या ब्रीदाचा समाजाच्या राहणीमानावर वरचष्मा होता. आता भांडवलशाहीच्या रेट्यात मात्र अधिकाधिक संपत्ती जमा करण्याचा हव्यास घातक ठरतो आहे. ही बाब सर्वांनाच साधत नाही आणि समाजातील आर्थिक दरी अधिकाधिक रुंदावतेच आहे. हे खेदजनक आहे. मात्र, या अनुषंगाने समाजशास्त्रज्ञांनी, अर्थशास्त्रज्ञांनी आपापल्या परीने उपाययोजना शोधत राहणेही समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. डॉ. कराडे आणि डॉ. पाटील यांनी सदर संपादित पुस्तकाच्या माध्यमातून त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकलेले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, जगातील दारिद्र्य आणि असमानता यांवर मात करण्याची अगर त्या अनुषंगाने संशोधन करण्याची जबाबदारी ही केवळ काही ठराविक अभ्यासक्षेत्रांची अथवा संशोधकांचीच आहे, असे नव्हे; तर, प्रत्येक समाजघटकाचे त्यासाठी काही उत्तरदायित्व आहे, याची सर्वदूर जाणीव निर्माण होणे ही आजची खरी गरज आहे. जगातील सामाजिक-आर्थिक असमानता दूर होऊन संपत्तीचे सर्व घटकांत समन्यायी वितरण होण्याच्या दृष्टीने परिवर्तन होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. जगन कराडे आणि डॉ. राजेंद्र पाटील यांनी संपादित केलेल्या ‘असमानता आणि दारिद्र्य’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुस्तकाच्या अनुषंगाने झालेल्या परिसंवादात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मान्यवरांनी सहभाग घेतला. यामध्ये डॉ. विद्युत जोशी (गुजरात), डॉ. आर. इंदिरा (कर्नाटक), डॉ. आनंद कुमार (गोवा), डॉ. वेन्केटेश्वरलु (आंध्रप्रदेश), डॉ. एस. गुरुस्वामी (तमिळनाडू), डॉ. अरविंदर अन्सारी (नवी दिल्ली), डॉ. बिस्वजीत घोष (पश्चिम बंगाल), डॉ. नागराजू गुंडेमेडा (हैदराबाद) यांनी आपली मते नोंदविली. यावेळी नवी दिल्ली येथील रावत प्रकाशनाच्या प्रणित रावत यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले.

Wednesday, 7 October 2020

डॉ. डी.टी. शिर्के यांनी स्वीकारली कुलगुरू पदाची सूत्रे

 

शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून ज्ञानदंड स्वीकारून कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारताना नूतन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


कोल्हापूर, दि. ७ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज सायंकाळी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.

डॉ. डी.टी. शिर्के यांनी सायंकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास कुटुंबियांसमवेत अभिवादन केले. विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांना नूतन कुलगुरूंनी काल सायंकाळीच अभिवादन केले. त्यांच्यासमवेत पत्नी सौ. सुनिता आणि मुलगी श्रद्धा उपस्थित होत्या. डॉ. करमळकर यांनी डॉ. शिर्के यांचे स्वागत केले. त्यानंतर कुलगुरूंच्या दालनामध्ये नूतन कुलगुरूंकडे सूत्रे प्रदान करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. कार्यभाराच्या पत्रांचे हस्तांतरण व ज्ञानदंड स्वीकारून डॉ. शिर्के यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर यांच्याकडून शिवाजी विद्यापीठाचे तेरावे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला.

कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांकडून नूतन कुलगुरूंनी सुहास्य वदनाने शुभेच्छांचा स्वीकार केला. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद व अधिसभा सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर यांना निरोप

प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अल्प कार्यकाळात शांत, समंजस व संयमी कारभाराचे प्रत्यंतर दिले. त्यामुळे त्यांची अल्प कारकीर्दही संस्मरणीय ठरली, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी डॉ. करमळकर यांचा गौरव केला. प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर यांना आज निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. डी.जी. कणसे, डॉ. भारती पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, अमित कुलकर्णी, डॉ. हेमांगी कुलकर्णी, पंकज मेहता, जी.बी. कोळेकर, बाबा सावंत आणि व्ही.टी. पाटील आदींनी डॉ. करमळकर यांच्याविषयी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली.

डॉ. करमळकर यांनी शिवाजी विद्यापीठातील आपली ही कारकीर्द स्मरणीय ठरली. सर्वच घटकांचे अत्यंत सौहार्दपूर्ण सहकार्य लाभले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह, शिवप्रतिमा, शाल व ग्रंथभेट देऊन त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमास कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, सौ. सुनिता शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा सदस्य, विभागप्रमुख, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमात कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी प्रास्ताविक  केले, तर परीक्षा संचालक जी.आर. पळसे यांनी आभार मानले.

Thursday, 20 December 2018

औषधी वनस्पतींच्या लागवडीतून

शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी

- डॉ. एस.एस. बर्वे यांचे प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठात आयोजित औषधी व सुगंधी वनस्पतीविषयक शेतकरी प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना डॉ. एस.एस. बर्वे. सोबत (डावीकडून) डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

शिवाजी विद्यापीठात आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. एस.एस. बर्वे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित शेतकरी प्रशिक्षणाच्या निमित्ताने औषधी व सुगंधी वनस्पतींच्या प्रदर्शनाची पाहणी करताना डॉ. एस.एस. बर्वे यांच्यासह डॉ. अकल्पिता अरविंदेकर, डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. मानसिंगराज निंबाळकर.


कोल्हापूर, दि. २० डिसेंबर: भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध असून त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस.एस. बर्वे यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र अधिविभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्माचे प्रकल्प संचालक यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी व सुगंधी वनस्पती संवर्धन व प्रक्रिया या विषयावर एकदिवसीय जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक डी.डी. तांबाळे प्रमुख उपस्थित होते तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाच्या नीलांबरी सभागृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. बर्वे म्हणाले, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या संधी आहेत. जगभरातील औषध, सुगंधी द्रव्य आणि सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या उद्योगांना त्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. नैसर्गिक साधनसंपत्तीने भारत अतिशय समृद्ध आहे, तथापि, जागतिक स्तरावर या क्षेत्रातील भारताचा वाटा हा अवघा एक टक्का इतका अत्यल्प आहे. तो आणखी किमान दोन टक्क्यांनी तर आपण सहजरित्या वाढवू शकतो. केवळ पश्चिम घाटावर लक्ष केंद्रित केले तरी बराच पल्ला गाठता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी लागवडीची मोठी संधी आहे. केवळ जिरॅनियमच्या लागवडीमधूनही एकरी एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, इतकी त्याची मागणी आहे.
औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचे फायदे सांगताना डॉ. बर्वे म्हणाले, या वनस्पतींना सहजासहजी कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही. त्यांना जनावरे तोंड लावत नाहीत किंवा त्यांचा भाजी म्हणूनही वापर होत नाही. त्यामुळे ज्या हेतूसाठी त्या लावल्या जातात, त्यासाठीच वापरल्या जात असल्याने त्यातून होणारा फायदा मोठा असतो. तसेच, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या अगर संस्था शेतकऱ्यांना त्याचे प्रक्रिया तंत्रज्ञान मोफत देऊ करतात आणि तयार माल व तेलखरेदीची हमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल खपविण्यासाठीची अतिरिक्त यातायात करावी लागत नाही.
डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या संशोधनाचा लाभ व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. प्रयोगशाळेकडून शेतीकडे या धोरणाच्या अंगिकारातून विद्यापीठाने शेतकरी वर्गाला जोडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. औषधी व सुगंधी वनस्पतींच्या संदर्भातही विद्यापीठाने शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे ठरविले असून जे शेतकरी अशा वनस्पतींची लागवड करतील, त्यांच्या वनस्पतींपासून तेल निर्मिती करण्यासाठीचा प्रायोगिक प्रकल्पही विद्यापीठाने उभारण्याचे ठरविले आहे. त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. अकल्पिता अरविंदेकर यांच्यासह वनस्पतीशास्त्र अधिविभागातील शिक्षक, शासकीय अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.


Friday, 11 August 2017

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी

डॉ. डी.टी. शिर्के यांची नियुक्ती

Dr. D.T. Shirke
कोल्हापूर, दि. ११ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. दिगंबर तुकाराम ऊर्फ डी.टी. शिर्के यांची नियमित प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांनी डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. मा. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कार्यकाळाइतका डॉ. शिर्के यांचा कार्यकाळ असेल.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा, २०१६च्या कलम १३ (६) अन्वये मा. कुलपतींनी डॉ. शिर्के यांची निवड केल्याचे आदेशात म्हटले आहे. सध्या मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. शिर्के यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या हितासाठीच आजपर्यंत काम केले आहे. प्र-कुलगुरू पदाच्या कारकीर्दीतही विद्यापीठाच्या आणि सर्व संबंधित घटकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य राहील. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार आहे. मा. कुलपती यांनी आपल्यावर दर्शविलेल्या विश्वासाबद्दल डॉ. शिर्के यांनी त्यांना धन्यवाद दिले.
डॉ. शिर्के हे मूळचे वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील असून त्यांचे सुरवातीचे शिक्षण वडगाव हायस्कूलमध्ये झाले. वारणा महाविद्यालय तसेच विवेकानंद महाविद्यालयातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी अधिविभागातून १९८७ साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्याचवर्षी ज्युनिअर रिसर्च फेलोशीप प्राप्त करून ते संशोधक म्हणून विभागात रुजू झाले. १९९०मध्ये सांख्यिकी विभागात ते अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. मार्च २००५मध्ये ते प्राध्यापक झाले. सांख्यिकी विभागाच्या प्रमुख पदाबरोबरच त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिवपदही भूषविले आहे. त्यांना अध्यापनाचा २७ वर्षांचा, संशोधनाचा ३० वर्षांचा तर अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेसह विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरील प्रशासकीय कामकाजाचा १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. विद्यापीठाने त्यांना सन २०११मध्ये सर्वोत्कृष्ट अध्यापक म्हणूनही सन्मानित केले आहे.
डॉ. शिर्के यांचे ५५ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. अमेरिका, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, थायलंड, सिंगापूर, मलेशिया आदी देशांसह भारतातील ५० परिषदांना ते उपस्थित राहिले आहेत. सहा परिषदांच्या आयोजनात त्यांनी पुढाकार घेतला आहे. नेदरलँडच्या इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटसह इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन आणि इंडियन सोसायटी फॉर प्रोबॅबिलीटी अॅन्ड स्टॅटिस्टिक्सचे ते आजीव सदस्य आहेत.

Friday, 11 March 2016

मानवी जीवनाच्या पृथःकरणास संख्याशास्त्राचा आधार शोधा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे आवाहन



शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र राष्ट्रीय परिषदेचे द्घाटन


कोल्हापूर, दि. ११ मार्च: संख्याशास्त्राच्या आधारे मानवी जीवनाचे पृथ:करण कसे करता येईल, यासाठी संख्याशास्त्राच्या संशोधकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील संख्याशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या द्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
      डॉ. शिंदे म्हणाले, मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करता येईल, अशी मला आशा वाटते. राष्ट्रीय विकासात संख्याशास्त्राचे योगदान मोठे आहे. सर्व प्रकारच्या संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग होतो.  माझ्या व्यक्तिगत संशोधनातही संख्याशास्त्राचे मोठे योगदान आहे. उत्तम विद्यार्थी घडविण्यात संख्याशास्त्र अधिविभाग आघाडीवर आहे. या अधिविभागातील पूर्वीचे चारही विभागप्रमुख परिषदेस उपस्थित आहेत, यावरून आजी माजी प्राध्यापकांमधील समन्वय दिसून येतो. या राष्ट्रीय परिषदेत एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांचा शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असणेही महत्त्वपूर्ण बाब आहे.
      परिषदेचे द्घाटक माजी विभागप्रमुख डॉ. एम. एस. प्रसाद म्हणाले, संख्याशास्त्राचे अनेक पैलू आहेत. या सर्व पैलूंचा अभ्यास या परिषदेच्या निमित्ताने होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. आपण सुरू केलेल्या अधिविभागाचे यश पाहून समाधान वाटत असल्याची भावनाही डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केल.
परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रास्ताविक केले. रिझर्व्ह बँ ऑफ इंडियाचे माजी मुख्य सल्लागार परिषदेचे प्रमुख पाहुणे प्रा. डी.व्ही.एस. शास्त्री म्हणाले, अचूक संख्याशास्त्रीय मॉडेल वापरणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. दैनंदि जीवनातील परिस्थिती संशोधन या मोठा फरक आहे. संशोधकांची दैनंदिन जीवनाची मोठी फारकत निर्माण झाली आहे.  दैनंदिन जीवनातील आव्हानांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे.
      संख्याशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी.एन. काशी यांनी अधिविभागाची माहिती दिली. डॉ. एस. बी. महाडि यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेत बेंगलोर, मुंबई, मैस, हैद्राबाद, गुजरात, तमिळनाडू, सालेम, जळगाव, जालना, सोलापूर आदी ठिकाणच्या १४ विशेष वक्त्यांसह १४३ संशोधक सहभागी झाले आहेत.
--००--