Showing posts with label Government of Maharashtra. Show all posts
Showing posts with label Government of Maharashtra. Show all posts

Thursday, 2 April 2026

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटसाठी

शासनाकडून ९ कोटींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता


शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटची इमारत

कोल्हापूर, दि. २ एप्रिल: येथील शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुमारे ९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून हा निधी प्राप्त झाला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सन २०११-१२ मध्ये विद्यापीठास यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट हा विभाग महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झाला. सदर योजनेअंर्तगत इमारतीचा तळमजला बांधण्यासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले. सदर अनुदानातून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तळमजल्याचे काम पूर्ण झाले. या इमारतीचे उद्घाटन सप्टेंबर २०२५ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या इमारतीच्या पहिल्या मजल्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार शासन निर्णय क्रमांक बांधका-२०२६/ई-१५९३४८५/विशि-२ दि.२५ मार्च २०२६ अन्वये ९ कोटी १९ लाख ४४ हजार ८२० रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये पहिल्या मजल्याचे अंदाजित २२,०५९ चौरस फुट इतके बांधकाम प्रस्तावित आहे.

सदर अनुदान मंजूर होण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांच्यासह विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभाग, महाविद्यालये व विद्यापीठ विकास विभाग आणि संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग (पुणे) यांनीही प्रयत्न केले.

यापूर्वी विद्यापीठास मंत्री श्री. पाटील यांच्याच पाठपुराव्याने शासनाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या कामासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. हे काम वर्षभराच्या अवधीत पूर्ण होऊन भुयारी मार्ग वापरातही आला आहे.

Wednesday, 2 February 2022

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. औदुंबर सरवदे यांच्या

‘बोलीविज्ञान’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

डॉ. औदुंबर सरवदे

'बोलीविज्ञान' या पुस्तकाविषयी डॉ. औदुंबर सरवदे यांची विशेष मुलाखत (व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील प्राध्यापक डॉ. औदुंबर सरवदे यांच्या बोलीविज्ञान या पुस्तकाला यंदाचा महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यामध्ये प्रौढ वाङ्मय- भाषाशास्त्र/ व्याकरण या साहित्य प्रकारासाठीचा एक लाख रुपयांचा नरहर कुरुंदकर पुरस्कार बोलीविज्ञान पुस्तकाला जाहीर झाला. कोल्हापूरच्या भाषा विकास संशोधन संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

पुरस्कारासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. औदुंबर सरवदे म्हणाले की, पहिल्याच पुस्तकाला थेट महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभणे, ही बाब अतिशय आनंद देणारी आहे. भाषाविज्ञानासारखा गहन विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला. हे प्रयत्न यशस्वी झाल्याची पोचपावती पुरस्कारामुळे मिळाली. यापुढील काळातही अशा प्रकारे दर्जेदार संशोधन व लेखन करण्यासाठीची प्रेरणा या पुरस्काराने दिली आहे.

या पुरस्काराबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे यांनी डॉ. सरवदे यांचे अभिनंदन केले आहे.

बोलीविज्ञान या पुस्तकाविषयी...

बोली अभ्यासाला सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे. जगभरात झालेल्या बोलीअभ्यासामुळे आणि या अभ्यासातून पुढे येत गेलेल्या निष्कर्षांमुळे भाषा अभ्यासाचा विकास झालेला दिसतो. तथापि, बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक मराठीत नव्हते. ही उणीव 'बोलीविज्ञान' या पुस्तकाने भरून काढली आहे. बोली अभ्यासाच्या प्रारंभापासून आजपर्यंतची सारी स्थित्यंतरे या पुस्तकातून सांगितलेली आहेत. काळानुसार बोलीअभ्यासात परिवर्तन झाले. हे परिवर्तन बोली अभ्यासाची बदलत गेलेली उद्दिष्टे अधोरेखित करते. या उद्दिष्टांनुसार झालेला अभ्यास प्रस्तुत पुस्तकातून वाचकांसमोर येतो.

बोलींच्या मराठीतील अभ्यासाची स्थिती पाहता, बोलीविज्ञानातील स्थित्यंतरे अभ्यासकांना अपरिचित आहेत. त्यासाठी अभ्यासकांनी 'बोलीविज्ञान' समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे समजून घेणे समग्र भाषाविज्ञानाच्या आकलनासाठीही आवश्यक आहे. कारण, भाषाविज्ञान आणि बोलीविज्ञानाचा विकास परस्पर समन्वयाने झाला असून तो एकत्रित अभ्यासणे उद्बोधक ठरेल. हा विकास या पुस्तकात नेमकेपणाने सांगितला गेला आहे. या पुस्तकाद्वारे मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Saturday, 5 November 2016

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग सदस्यपदी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची निवड


Dr. Devanand Shinde

कोल्हापूर, दि. ५ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा या नियुक्तीमुळे खोवला गेला आहे.
महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग नुकताच पुनर्गठित केला. दि. २८ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे पुनर्गठित आयोगाची आणि नियुक्त सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. डॉ. अनिल काकोडकर आयोगाचे चेअरमन असून डॉ. ए.व्ही. सप्रे सदस्य सचिव आहेत.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची आयोगावर निवड झाल्याने विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या संशोधन कार्याचा आयोगाला आणि त्या अनुषंगाने राज्याला मोठा लाभ होणे अपेक्षित आहे. डॉ. शिंदे यांचे औषधनिर्माण शास्त्रातील संशोधनात मोठे योगदान असून त्यांच्या नावे तीन पेटंट नोंद आहेत, तर आणखी दोन पेटंटसाठी अर्ज दाखल केले आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे सध्या महाराष्ट्र शासनाच्या नवीन महाराष्ट्र विद्यापीठे कायदा, विद्यापीठे सेल्फ फायनान्स निवड समिती, तालुकानिहाय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांना वित्तसाह्यविषयक टास्क फोर्स तसेच सेटच्या सुकाणू समितीवरही कार्यरत आहेत.
या नियुक्तीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, मा. राज्यपाल महोदय आणि महाराष्ट्र शासन यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो सार्थ करण्यासाठी या आयोगाच्या माध्यमातून राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुरेपूर योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील.
--००--

Monday, 5 May 2014

‘एमआयएस’च्या यशस्वी अंमलबजावणीबाबत शिवाजी विद्यापीठाचे शासनाकडून अभिनंदन



Alok Jatratkar

कोल्हापूर, दि. ५ मे: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या (एम.आय.एस.) यशस्वी अंमलबजावणीमध्ये शिवाजी विद्यापीठाने घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र शासनाचे शिक्षण संचालक (उच्चशिक्षण) डॉ. प्र.रा. गायकवाड यांनी शिवाजी विद्यापीठाचे विशेष प्रशस्तीपत्र पाठवून अभिनंदन केले आहे. या प्रशस्तीपत्रात विद्यापीठाचे एमआयएस नोडल ऑफिसर आलोक जत्राटकर आणि अभिजीत रेडेकर यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे. ही माहिती विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. ए.बी. राजगे यांनी दिली.
Abhijeet Redekar
प्रशस्तीपत्रात म्हटले आहे की, उच्चशिक्षण संचालनालय तसेच अधिपत्याखालील राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये यांच्या दैनंदिन कामकाजात आमुलाग्र सुधारणा करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या हेतूने राज्य शासनाने माहिती व्यवस्थापन प्रणाली (एम.आय.एस.) राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रणालीमार्फत सन २०१३-१४ या वर्षाची शैक्षणिक व इतर बाबींची माहिती शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विहीत वेळेत व अचूकपणे संकेतस्थळावर ऑनलाइन भरून शासनाला उपलब्ध केली आहे. ही माहिती शानाला वेळेत आणि धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. याबाबत सहसंचालक कार्यालयाचे प्रशासन अधिकारी हरिविजय शिंदे, आणि विद्यापीठाचे एमआयएस नोडल ऑफिसर श्री. जत्राटकर आणि श्री. रेडेकर यांनी सदर प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. या पुढील कालावधीत देखील विद्यापीठाकडून अशाच प्रकारच्या सर्वोत्तम आणि इतर विद्यापीठांकरिता आदर्शवत कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या असल्याचे डॉ. राजगे यांनी सांगितले.