Showing posts with label Maharshi Vitthal Ramaji Shinde. Show all posts
Showing posts with label Maharshi Vitthal Ramaji Shinde. Show all posts

Tuesday, 2 January 2018

मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्याचा गाभा: प्रा. पुष्पा भावे


शिवाजी विद्यापीठात 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे:  एक दर्शन- भाग २' या ग्रंथाचे प्रकाशन करताना भारती अभिमत विद्यापीठाचे (पुणे) कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्रा. पुष्पा भावे. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. राजन गवस, डॉ. एन.डी. पाटील, रमेश चव्हाण, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, सौ. सुजाता पवार, डॉ. गो.मा. पवार, अशोक शिंदे व डॉ. रणधीर शिंदे.
प्रा. पुष्पा भावे



महर्षी वि.रा. शिंदे: एक दर्शन- भाग २ ग्रंथाचे विद्यापीठात प्रकाशन

कोल्हापूर, दि. २ जानेवारी: मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरुपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे महर्षींच्या स्मृतिदिनानिमित्त रा.ना. चव्हाण लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक दर्शन, भाग-२ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आज सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर पुण्याच्या भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Prof. Pushpa Bhave
प्रा. पुष्पा भावे म्हणाल्या, महर्षी शिंदे यांचे कार्य आणि विचार आजच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना देशामध्ये जे सामाजिक बदल अभिप्रेत होते, त्या दिशेने त्यांनी काम केले. ते आपल्या उद्दिष्टप्राप्तीच्या दिशेने कार्यरत राहिले. लोकांना एकत्र करून, चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची भूमिका असे. अशा सुसंवादातून ते बदल घडवू पाहात होते. महर्षींची ही पद्धत आपण अंगिकारणे अत्यावश्यक आहे.
महर्षी शिंदे यांनी अन्य कोणत्याही बाबीपेक्षा नेहमी विवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य दिल्याचे सांगून प्रा. भावे म्हणाल्या, शिंदे यांचा प्रवास हा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीनुसार अथवा धर्मानुसार नव्हे, तर त्यांनी स्वतः ठरविलेल्या तत्त्वांनुसार झाला. भाषाशास्त्रासह धर्मशास्त्राचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला, तथापि, एक धर्म पद्धती त्यांना अमान्य होती. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज अथवा ख्रिस्ती धर्म या प्रत्येक धर्मामधील चांगली मूल्ये त्यांनी उचलली आणि ती राबविण्यावर भर दिला. त्या आधारे प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी होऊन कार्य करण्याचा, बदल घडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला;, मात्र, त्यांचे स्थान आपल्याला इतिहासात निश्चित करता आले नाही, हे आपले दुर्दैव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
महर्षी शिंदे हे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामधला दुवा असल्याचे सांगून प्रा. भावे म्हणाल्या, बाबासाहेबांच्या कार्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी, पूर्वतयारी करण्याचे कार्य महर्षींनी केले. अस्पृश्यता निवारणाचे कार्य महाराष्ट्रासह देशभरात पसरविण्याचेकाम आंबेडकर यांच्यापूर्वी महर्षींनी केले. त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या कार्याकडे वळले. अस्पृश्य, स्त्रिया, शेतकरी यांचे येणाऱ्या स्वातंत्र्यात नेमके स्थान कोणते व कसे असेल, याविषयी त्यांना चिंता होती. वाईसारख्या सनातनी ठिकाणाची आपल्या समाजसुधारणावादी चळवळीसाठी निवड करणे, यातून महर्षींची या कार्याबद्दलची कळकळ आणि निष्ठाच दिसून येते. त्याचप्रमाणे समाज सुधारणेचे कार्य करीत असताना आपल्या समकालीनांबरोबर विवेकी वादविवाद करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, महर्षी शिंदे हे काळाच्या पुढे पाहणारे द्रष्टे विचारवंत होते. विचारांची स्पष्टता, निर्मळ सहृदयता या गुणांसह मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्याविषयीच्या ग्रंथातून समाज इतिहासाचा एक आदर्श वस्तुपाठ प्रदर्शित झाला आहे. आज जगभरात नैतिक, भौतिक मूल्यांचा ऱ्हास होत असताना त्यातून मूल्यव्यवस्था प्रस्थापनेच्या दृष्टीने महर्षी शिंदे यांच्यावरील हा ग्रंथ पथदर्शक ठरेल.
Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, पुष्पाताईंनी आपल्या व्याख्यानातून महर्षी शिंदे अध्यासनाच्या कार्याला अत्यंत दिशादर्शक असे मार्गदर्शन केले आहे. अध्यासनाच्या वतीने पुढील वर्षभर महर्षींचे विचार व कार्य याविषयी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांच्या ७५व्या स्मृतिदिनी वाईमध्येही एखादे चिंतन शिबीर आयोजित करण्याबाबत विचार करावा, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
यावेळी डॉ. गो.मा. पवार यांच्यासह ग्रंथाचे संपादक रमेश चव्हाण, महर्षींचे नातू निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, महर्षी शिंदे यांच्या नात सौ. सुजाता पवार, पणतू राहुल पवार, आनंद भावे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. अरुण शिंदे, रमेश शिपूरकर, डॉ. टी.एस. पाटील, रमेश कोलवालकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 2 January 2017

महर्षी वि.रा. शिंदे यांचा बहुजनवाद सर्वसमावेशक: डॉ. सदानंद मोरे




शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात बोलताना डॉ. सदानंद मोरे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. राजन गवस, सुजाता पवार, डॉ. एन.डी. पाटील, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. रणधीर शिंदे.

कोल्हापूर, दि. २ जानेवारी: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा बहुजनवाद हा समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेणारा सर्वसमावेशक स्वरुपाचा होता. त्यांचा हा बहुजनवाद समजून घेणे ही आजची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनामार्फत महर्षी वि.रा. शिंदे यांची बहुजनविचाराची संकल्पना आणि सद्यस्थिती या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बीजभाषक म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो.मा. पवार होते, तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांची उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, काँग्रेसच्या चळवळीपासून अंतर राखून असणाऱ्या बहुजन समाजाच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य महर्षी शिंदे यांनी केले. बहुजन समाजामध्ये स्वतःच्या उद्धाराची चेतना निर्माण करणारे ते एक आद्य समाज क्रांतीकारक होते. अठरापगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन स्वराज्याच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सभा घेतल्या. बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रयोग केले. त्या काळात सर्वांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील होते. पक्षीय राजकारण हे जातीच्या नव्हे, तर आर्थिक पायावर उभे राहिले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते, असेही ते म्हणाले.
डॉ. एन.डी. पाटील म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात महर्षी वि.रा. शिंदे यांचे कार्य आणि कर्तृत्व अद्वितिय आहे. ज्या कालखंडात त्यांनी काम केले, त्या काळात महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात चिंताजनक वातावरण होते. सामाजिक चळवळीबद्दल समाजातच मोठी अनास्था होती. सामाजिक क्षेत्रात काळाच्या पुढे जाऊन अतिशय पुरोगामी पाऊल उचलणारे आणि राजकीय क्षेत्रातही आपले वैचारिक योगदान देऊन स्थान निर्माण करणारे महर्षी शिंदे हे महान समाजचिंतक होते. दुर्दैवाने त्यांच्या कार्याची महाराष्ट्राने म्हणावी तितकी दखल घेतली नाही. त्यांच्या कार्याचा अभ्यास सामाजिक महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यातून करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गो.मा. पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनात महर्षी शिंदे यांनी मोठी घुसळण केली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचे युगप्रवर्तक कार्य केले. त्यानंतरच्या काळात त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी महर्षी शिंदे यांनी बजावली.
यावेळी डॉ. टी.एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले. यावेळी महर्षी शिंदे यांची नात सुजाता पवार यांच्यासह डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. गोपाळ गुरू, डॉ. रविंद्र ठाकूर, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. भारती पाटील, डॉ. मेघा पानसरे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, सदा डुम्बरे, सुरेश शिपूरकर, उन्मेष अमृते आदी उपस्थित होते.

Wednesday, 23 April 2014

जातिनिर्मूलन हे राष्ट्राचे उद्दिष्ट बनावे: भाई वैद्य



शिवाजी विद्यापीठ: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व्याख्यानमाला

कोल्हापूर, दि. २३ एप्रिल: जातिनिर्मूलनाखेरीज आपले राष्ट्र बलवान होऊ शकणार नाही. त्यासाठी जातिनिर्मूलन हे राष्ट्राचे उद्दिष्ट बनले पाहिजे. भारत हे जातिविरहित सार्वभौम प्रजासत्ताक बनविण्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे आयोजित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक व राजकीय कार्य या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे होते.
भाई वैद्य म्हणाले, अस्पृश्यता निर्मूलन हा महर्षी शिंदे यांच्या कृतीशील सामाजिक कार्याचा प्रमुख ध्यास होता. लोकमान्य टिळक यांच्यासारख्या दुर्दम्य महापुरूषाचा विरोध असतानाही काँग्रेसला अस्पृश्यता निवारणाचा ठराव करायला भाग पाडणे, ही सोपी गोष्ट नव्हती. ती महर्षींनी साध्य केली. व्हॉईसरॉयपासून ते अगदी कमिशनरपर्यंत अस्पृश्यता निवारणासाठी अखंड पाठपुरावा करून सामाजिक समतेच्या लढ्याला प्रचंड गती देण्याचे महत्तम कार्य महर्षींनी केले. त्याचप्रमाणे आधी सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय?’ या वादग्रस्त विषयावर आंबेडकर, आगरकर आदी प्रभृतींप्रमाणेच अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नालाच त्यांनी प्राधान्य दिले. केवळ मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ द्यावेत, पण जातवार मतदारसंघाला विरोध करण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. आजघडीला भारतात असलेल्या पाच हजार जाती आणि त्याहून अधिक उपजाती पाहता त्यांची भूमिका किती उचित होती, हे लक्षात येते.
समाजकारण आणि राजकारण या दोन्ही बाबतीत जहाल भूमिका घेणारे महर्षी शिंदे हे तत्कालीन परिस्थितीतील अनोखे नेतृत्व असल्याचे सांगून श्री. वैद्य म्हणाले, महर्षींचा अद्वैतवादी जागतिक दृष्टीकोन आजच्या काळात समजून घेण्याची नितांत गरज आहे. त्यांचा अद्वैतवाद हा शंकराचार्यांप्रमाणे पारमार्थिक नव्हता, तर लौकिक सामाजिक व राजकीय होता. जगभरात आज जाती-जमाती, वंश, भाषा, प्रांत यांच्या द्वैताची आणि द्वंद्वाची भाषा सुरू आहे. वर्गकलह, वर्गद्वंद्व ही आजची वस्तुस्थिती आहे. जागतिकीकरणाच्या माध्यमातून या द्वंद्वाला अधिकच खतपाणी घातले जाते आहे. या पार्श्वभूमीवर त्या काळात या भूमीची भावना वसुधैव कुटुम्बकम् अशी कधी होणार?, याची चिंता महर्षी शिंदे यांना भेडसावत होती. ती चिंता आजही अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
ऐहिक सुखाला नीतीचा आधार नसेल तर जगाचे कसे होणार?, हा सुद्धा महर्षींच्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून भाई वैद्य म्हणाले, राजकारण, समाजकारण, धर्मकारण अशा कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना त्याला नैतिक अधिष्ठान देण्याचा विचार आपल्याला करावाच लागेल, अशा मताचे ते होते. त्या अर्थाने महर्षी हे आध्यात्मवादी ठरतात. पण तेवढ्यापुरतेच. कारण त्यांनी कधीही अवतार, धर्मप्रामाण्य किंवा मूर्तीपूजा मानली नाही. पण आपल्या सर्वव्यापी कार्याला नीतीचे अधिष्ठान असलेच पाहिजे, यासाठी मात्र ते आग्रही राहिले. राजकारणातील ढासळणारी नैतिकता हा सुद्धा त्यांच्या चिंतेचा विषय होता.
स्त्रियांच्या प्रश्नांबाबतही महर्षी शिंदे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण, सकारात्मक व प्रसंगी आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगून श्री. वैद्य म्हणाले, सर्वच धर्मांनी जनमानसात स्त्रीचे दुय्यमत्व रुजविण्याचे काम केले. ख्रिश्चनांच्या मते, आधी ॲडम जन्मला आणि नंतर त्याच्या बरगडीतून इव्ह निर्माण झाली. इस्लाममध्ये स्त्रीला कधी कधीसन्मान द्या, असे सांगितले जाते. मनुस्मृती तर शूद्र, अतिशूद्र आणि महिला यांच्या गुलामगिरीचा जाहीरनामाच आहे. हे दुय्यमत्व स्त्रियांनी झुगारून दिले पाहिजे, त्यांची या मानसिकतेमधून सुटका झाली पाहिजे, यासाठी महर्षींनी या देशाचा दौरा करून इथे पूर्वापार मातृसत्ताक पद्धती आस्तित्वात होती, याचे संशोधनपर पुरावे गोळा केले. पुणे नगरपरिषदेने केवळ मुलांसाठी सक्तीच्या शिक्षणाचा ठराव केला; त्यात मुलींचाही समावेश करावा, यासाठी महर्षी शिंदे यांनी प्रचंड संघर्ष उभारला आणि यश मिळविले. देवाला मुरळी वाहण्याच्या प्रथेविरोधात कार्य करत असताना त्यांच्यावर हल्लाही झाला. महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा वसा खऱ्या अर्थाने पुढे चालविण्याचे कार्य महर्षी शिंदे यांनी केले.
याखेरीज दुष्काळग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कार्य, गुन्हेगार समजल्या गेलेल्या मातंग समाजाच्या पुनरुत्थानाचे कार्य, शेतकरी व कामगारांच्या संदर्भातील महर्षींचे चौफेर कार्य याविषयीही भाई वैद्य यांनी व्यापक विचार मांडले.
यावेळी चंद्रकांत बोंद्रे यांनी अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. याबद्दल प्र-कुलगुरू डॉ. भोईटे यांनी त्यांना धन्यवाद दिले. सुरवातीला अध्यासनाचे समन्वयक डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी आभार मानले. सीमा मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानास डॉ. एन.डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. गो.मा. पवार, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.
लोकशाहीची वाटचाल धनाढ्यशाहीकडे
आपल्या देशात एकीकडे अंबानींची संपत्ती चार लाख कोटींची आहे, तर दुसरीकडे ७६ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे. अशा परिस्थितीत आपल्या लोकशाही व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक द्वैत माजले आहे. त्यामुळे इथल्या लोकशाहीची वाटचाल धनाढ्यशाहीकडे अधिक जोमाने होऊ लागली आहे, ही चिंतेची बाब असल्याचे मत भाई वैद्य यांनी यावेळी व्यक्त केले.