Tuesday, 30 December 2025

संतवाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी विस्तारण्याची गरज: डॉ. सतीश बडवे

शिवाजी विद्यापीठात संत साहित्य संमेलन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात आयोजित संत साहित्य संमेलनात बोलताना संमेलनाध्यक्ष डॉ. सतीश बडवे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित संत साहित्य संमेलनात बोलताना संमेलनाध्यक्ष डॉ. सतीश बडवे. मंचावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रवीण बांदेकर व डॉ. रणधीर शिंदे.


शिवाजी विद्यापीठात संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथदिंडीचे उद्घाटन करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि सहभागी वारकरी व मान्यवर

शिवाजी विद्यापीठात संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथदिंडीत सहभागी वारकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथदिंडीत विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या सादरीकरणाने मोठी रंगत आणली.

(संत साहित्य संमेलनाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ३० डिसेंबर: समकाळातील विचारांच्या मर्यादा ओलांडून संतवाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी, व्याप्ती आणि समज वाढविण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलन अनुदानातून येथील भाषाविकास संशोधन संस्था आणि शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकोबारायांना समर्पित संत साहित्य संमेलन-२०२५च्या संमेलनाध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे आणि प्रा. प्रवीण बांदेकर प्रमुख उपस्थित होते.

डॉ. बडवे म्हणाले, संतांनी आणि त्यांच्या साहित्याने समाजाविषयीचे भान सातत्याने जागे ठेवण्याचे काम केले. भक्तीच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी असल्याचे सांगणारा आणि प्रदान करणारा वारकरी संप्रदाय आहे. संतसाहित्याने समाजपरिवर्तनाची हाक देत असताना सामाजिक उत्थानासाठीचा विचार सतत मांडला. रंजल्या-गांजल्यांना उराशी पकडून त्यांच्यामध्ये उत्थानाची आस निर्माण करीत समग्र समाजामध्ये नैतिकतेची शिकवण प्रवाहित केली. संवाद साधणे ही वारकरी परंपरा आहे. संतांनी लोकांशी संवाद साधत कथनात्मक विवेचनावर भर दिल्याने संतविचारांचा, साहित्याचा प्रसार व्यापक प्रमाणात झाला. साहित्यनिर्मितीबरोबरच त्याचे सादरीकरणही महत्त्वाचे असल्याची बाब वारकरी परंपरा अधोरेखित करते. माणसात देव पाहण्यास शिकविणाऱ्या या परंपरेने समाजाला पर्यायी मूल्यव्यवस्था प्रदान केली. मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये संतसाहित्याचे अतुलनीय योगदान असून समाजातील सर्व स्तरांतील घटकांच्या भाषेचे प्रतिबिंब त्यामध्ये पडले आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. प्रमोद मुनघाटे म्हणाले, साहित्य संमेलनांमध्ये साहित्याखेरीज सर्व प्रकारच्या स्थानिक लोकपरंपरा, लोकसंस्कृती यांचे प्रतिबिंब दिसल्याखेरीज त्याची उद्दिष्टपूर्ती झाली, असे म्हणता येत नाही. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेले संत साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आहे. शिवाजी विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या अनेकविध दर्जेदार साहित्यिक उपक्रमांमुळे येथील मराठी अधिविभागाचा दबदबा राज्यात सर्वदूर पसरला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

प्रा. प्रवीण बांदेकर म्हणाले, संत साहित्य माणसाला ताठ कण्याने उभे राहण्याचे बळ पुरविते. अंतरीचा ज्ञानदीप प्रज्वलित करण्याचे कार्य हे साहित्य सातत्याने करीत आले आहे, याविषयी आपण कृतज्ञ असायला हवे.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, नितीमान समाज घडविणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य आहे. हेच कार्य संतसाहित्याने गेली अनेक शतके केले आहे. स्वार्थाच्या काळोखामध्ये मग्न असलेल्या समाजाला ज्ञानदीपाच्या प्रकाशात उजळून टाकण्यात संतांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अंगी नैतिकता धारण करणारा समाज घडविण्यासाठी संतसाहित्याने उपयुक्त कार्य केले. या साहित्याचे वाचन आणि चिंतन तर महत्त्वाचेच आहे, त्याचबरोबर त्याचे आचरणही तितकेच महत्त्वाचे आहे.

उद्घाटन सत्रात भास्कर हांडे यांनी रेखाटलेल्या संत तुकाराम यांच्या चित्राच्या प्रतींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विशेष प्रावीण्याबद्दल डॉ. राजेश पाटील, मृण्मयी पांचाळ, अनुराधा गुरव आणि ऋतुजा बारवे यांचा सत्कार करण्यात आला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत केले, संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अरूण शिंदे, अरुणदादा जाधव, यांच्यासह शिक्षक, संत साहित्याचे अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथदिंडी, झिम्मा-फुगडीने जल्लोषी सुरवात

संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज सकाळी ९.३० वाजता कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. पालखीमध्ये भारतीय संविधान, श्री ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, कान्होबा महाराजांची अभंगगाथा आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. शिपूर (ता. मिरज) येथील दत्त भजनी मंडळ आणि हुपरी येथील बाळूमामा भजनी मंडळ यांच्या साथीने पारंपरिक वारकरी भजनाच्या गजरात विद्यापीठ प्रांगणातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीत विठठ्ल-रखुमाईसह विविध संतांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लक्ष वेधून घेतले. यावेळी धुंदवडे येथील जय जिजाऊ लेझीम पथक आणि मोरजाई झिम्मा फुगडी पथकातील विद्यार्थिनींनी आपल्या उत्साही सादरीकरणाने दिंडीत मोठी रंगत आणली. 

यावेळी शिवाजी विद्यापीठ प्रकाशन विभाग, महाराष्ट्र शासनाचा मुद्रणालय विभाग, वाचनकट्टा प्रकाशन यांच्या वतीने विशेष ग्रंथ प्रदर्शन व विक्री स्टॉल मांडण्यात आले. त्यांना उपस्थितांचा मोठा प्रतिसाद लाभला.

 

परिसंवाद, मुलाखत आणि अभंगवाणी

संमेलनात दुपारच्या सत्रात वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान या विषयावर डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगला. यामध्ये ज्ञानेश्वर बंडगर, डॉ. श्रीरंग गायकवाड, डॉ. गोविंद काजरेकर, प्रभाकर देसाई, प्रवीण बांदेकर, डॉ. अनिल गवळी यांनी सहभाग घेतला. त्यानंतर वारी- एक आनंदयात्रा या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार आणि वारीचे अभ्यासक संदेश भंडारे यांची ज्ञानेश्वर बंडगर यांनी मुलाखत घेतली. अविनास श्रीधर कुदळे (दुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) यांच्या निवेदनासह शिपूर (ता. मिरज) येथील श्री दत्त भजनी मंडळाच्या सदस्यांनी कबीरपंथी भजन सादर केले, तर सायंकाळी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगवाणीने संमेलनाची सांगता झाली.

Tuesday, 23 December 2025

शिवाजी विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षान्त सोहळ्यास ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने प्रारंभ

महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीस पालखीपुजनाने प्रारंभ करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. यावेळी दिंडीत सहभागी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. यावेळी दिंडीत सहभागी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी.


शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवाचे प्रतिमापूजनाने उद्घाटन करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत (डावीकडून) डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. धनंजय सुतार, डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. शरद बनसोडे आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवामध्ये पुस्तकांची पाहणी करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत डॉ. सुहासिनी पाटील,डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. महादेव देशमुख, डॉ. प्रमोद पांडव, डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. शरद बनसोडे, .

शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथमहोत्सवातील वन्यजीव विभागाच्या स्टॉलची पाहणी करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील पुस्तकांची उत्सुकतेने पाहणी करताना विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शेतकरी नृत्य सादर करताना विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शिवराज्याभिषेकाचे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शिवराज्याभिषेकाचे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले.


कोल्हापूर, दि. २३ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभास आजपासून ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सव आणि महाराष्ट्राची लोकधारासांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांनी सुरवात झाली. उद्या सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात मुख्य दीक्षान्त समारंभ होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारी ग्रंथदिंडी आणि ग्रंथमहोत्सव हे शहरवासियांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. यंदाही ग्रंथदिंडीमधील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्साही सहभागाने ही बाब अधोरेखित केली.

आज सकाळी कमला महाविद्यालय येथे शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले. पालखीमध्ये भारताचे संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी यांसह आधुनिक विज्ञानाविषयीचे ग्रंथ ठेवण्यात आले होते. तेथून टाळमृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. वाचनसंस्कृतीचा जागर करीत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा पुतळा आणि सायबर संस्थेमार्गे दिंडी विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून व अभिवादन करून पालखी अखेरीस राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आणण्यात येऊन तेथे स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहात होता.

ग्रंथदिंडीमध्ये कुलसचिव, डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय साळी, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, उप-ग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, डॉ. प्रमोद पांडव, संगणक केंद्र संचालक अभिजीत रेडेकर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, कमला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुजय पाटील यांच्यासह बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयांतील समन्वयक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्रंथदिंडीमध्ये विविध महाविद्यालयांतील ग्रंथपालही सहभागी झाले.

विद्यार्थ्यांचे आवेशपूर्ण लेझीमवादन

यंदाच्या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग लक्षणीय होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींचे संचलनही लक्षवेधक ठरले. मात्र शहराचे लक्ष वेधून घेतले ते विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोल आणि झांज पथकांनी. अत्यंत आवेशपूर्ण अशा पद्धतीने ढोल, ताशा आणि झांज वादन करीत ग्रंथदिंडीमध्ये या मुलांनी चैतन्य आणले. प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

वैविध्यपूर्ण विषयांवरील ग्रंथांची वाचकांना पर्वणी

ग्रंथदिंडीनंतर सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या अनेक्स इमारत परिसरात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून हे उद्घाटन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ प्रकाशन विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिकांसह बाहेरगावचेही १९ प्रकाशक व ग्रंथविक्रेते महोत्सवात सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध विषयांवरील हजारो ग्रंथ वाचकांना पाहणी व खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथप्रेमी व वाचनवेड्या व्यक्तींसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच आहे. या सर्व स्टॉलची प्र-कुलगुरूंसह अधिकाऱ्यांनी फिरून पाहणी केली आणि सहभागींना शुभेच्छा व धन्यवाद दिले.

याखेरीज येथे खाद्यपदार्थ व पेय विक्रीचे १० स्टॉल आहेत. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य व व्यवस्थापन, एम.बी.ए. आदी अधिविभागांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध स्टॉल लावले आहेत. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, एसयूके-आरडीएफ कंपनी यांसह स्टार्टअप उपक्रमाला वाहिलेल्या स्टॉलचाही त्यात समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी, पदार्थ किंवा साहित्य विक्रीच्या पलिकडे जाऊन संपूर्ण बिझनेस मॉडेलचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहावे, असे सांगितले.

वन्यजीव विभागाच्या स्टॉलचे आकर्षण

महोत्सवात यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा वन्यजीव विभाग सहभागी झाला आहे. वने आणि वन्यजीवांशी संबंधिक पुस्तके, माहितीपुस्तके, वेगवेगळी आकर्षक आभूषणे, टी शर्ट, सॅक, बॅग इत्यादी वस्तू त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. या स्टॉलविषयी विद्यार्थ्यांमध्ये विशेष कुतूहल होते. त्याखेरीज काही महिला बचत गट, महिला यांनीही विविध वस्तूंचे स्टॉल लावले आहेत. तसेच, ग्रंथ आमुचे साथी असा उद्घोष करणारा सेल्फी पॉईंटही उभारला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी

राष्ट्रीय सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाचा संघ नुकताच जम्मू येथील जम्मू विद्यापीठामध्ये जाऊन आला. तेथे महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमासह शिवराज्याभिषेक, मर्दानी खेळांचे प्रदर्शन करून त्यांनी तेथील लोकांची मने जिंकली. याच कार्यक्रमाचे आज विद्यार्थी विकास विभागातर्फे राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात फेर सादरीकरण करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणेशवंदनेने सुरवात करीत वासुदेव, शेतकरी, खंडोबा, धनगरी नृत्य, मंगळागौर, भारुड, लेझीम, सासनकाठी, भारतीय लोककला वाद्यवृंद, लावणी, पोतराज, गंधार, कोळीगीत, महाराष्ट्र लोककला वाद्यवृंद, पोवाडा, लाठीकाठी आणि अखेरीस राज्याभिषेक या कलाप्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या संघातील विद्यार्थ्यांना प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

विद्यापीठ रंगलं काव्यात’!

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभाची पूर्वसंध्या विश्वविक्रमी कविता सादरकर्ते विसुभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगलंय काव्यात या एकपात्री काव्यनाट्यानुभवाने रंगली. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी विद्यापीठासह विद्यापीठाबाहेरूनही अनेक रसिक उपस्थित राहिले. सुमारे दोन तासांच्या या कार्यक्रमात बापट यांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना भावनांच्या हिंदोळ्यावर खेळवताना खऱ्या अर्थाने खिळवून ठेवले. तत्पूर्वी, सुरवातीला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी ग्रंथ व स्मृतिचिन्ह भेट देऊन बापट यांचे स्वागत केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात सादरीकरण करताना विसुभाऊ बापट

शिवाजी विद्यापीठात विसुभाऊ बापट यांचे स्वागत करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. शेजारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे


Monday, 22 December 2025

विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त उद्या ग्रंथदिंडी; ग्रंथमहोत्सवाचे होणार उद्घाटन

कुटुंब रंगलंय काव्यातसह विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम



शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित दोनदिवसीय ग्रंथमहोत्सवासाठी मंडप व अन्य सुविधा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.


कोल्हापूर, दि. २२ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्याला उद्या (दि. २३) ग्रंथदिंडीने प्रारंभ होत असून ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. विश्वविक्रमी कविता सादरकर्ते विसूभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलंय काव्यात हा प्रयोग सादर होईल. ग्रंथमहोत्सवासाठीची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी (दि. २४) सकाळी होणाऱ्या दीक्षान्त समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही माहिती समन्वयक तथा बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त दरवर्षीप्रमाणे उद्या (दि. २३) सकाळी ७.३० वाजता कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते कमला महाविद्यालयात ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. तेथून जनता बझार, राजारामपुरी मुख्य मार्ग, आईचा पुतळा, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ गेट क्र. ६ या मार्गे दिंडी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात दीक्षान्त सभामंडपात येईल आणि तेथे दिंडीचे विसर्जन होईल.

त्यानंतर सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या अनेक्स इमारत परिसरात आयोजित ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन होईल. यंदा ग्रंथमहोत्सवात नामवंत प्रकाशक, विक्रेते यांचे एकूण ४० स्टॉल असून त्यापैकी पुस्तकांचे १९ तर, खाद्यपदार्थ व अन्य वस्तू, पदार्थांचे १० स्टॉल असतील. ग्रंथमहोत्सवात यंदा प्रथमच वन्यजीव संवर्धन विभागाचेही २ स्टॉल असणार आहेत. ग्रंथमहोत्सव २३ व २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहतील. ग्रंथमहोत्सवासाठी मंडप उभारणीसह सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या कलाकार विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्राची लोकधाराहा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता प्रख्यात कवी विसूभाऊ बापट यांचे विश्वविक्रमी कुटुंब रंगलंय काव्यात हे सुप्रसिद्ध एकपात्री काव्य सादरीकरण होईल. हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य खुला राहील. या सर्व कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांसह सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Friday, 19 December 2025

शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी

प्रख्यात संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणे

अक्षय जहागीरदार यांना राष्ट्रपती सुवर्णपदक; आर्या देसाई यांना कुलपती सुवर्णपदक

डॉ. जी. सतीश रेड्डी


अक्षय नलवडे-जहागीरदार

आर्या देसाई


कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षान्त समारंभ येत्या बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून भारताचे प्रख्यात संरक्षण व अवकाश संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी असतील; तर प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित असतील. यंदाच्या दीक्षान्त समारंभात एकूण ४९,९०२ स्नातक पदवी घेणार आहेत. समारंभानिमित्त विद्यापीठात ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सव आदी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ही माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र तसेच एनसीसी, एनएसएस यांमधील गुणवत्ता तसेच व्यक्तीमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्वगुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल राज्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी अक्षय अरुण नलवडे-जहागीरदार यांना विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच, मार्च २०२५ मध्ये सर्व एम.ए. परीक्षांमधून मानसशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल आर्या संजय देसाई (हुपरी) यांना कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे.

दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. जी. सतीश रेड्डी हे चार दशकांहून अधिक काळ भारताच्या संरक्षण संशोधन व विकास आणि तंत्रज्ञान नेतृत्व क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी ते सर्वदूर ओळखले जातात. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे (NSAB) सदस्य, आंध्र प्रदेश शासनाचे मानद सल्लागार (कॅबिनेट दर्जा) तसेच एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव, डी.आर.डी.ओ.चे अध्यक्ष तसेच केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार अशी अत्यंत जबाबदारीची पदे भूषविली आहेत. समारंभात ते स्नातकांना उद्देशून दीक्षान्त भाषण करतील.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभानिमित्त सलग १८ व्या वर्षी ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ ते २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या या महोत्सवात नामवंत भारतीय व परदेशी कंपनीचे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजीटल ग्रंथ, उपाहारगृह इत्यादींचे ४० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या निमित्त दरवर्षीप्रमाणे २३ डिसेंबरला ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सकाळी ७.३० वाजता कमला महाविद्यालयात कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन होईल. तेथून जनता बझार, राजारामपुरी मेन रोड, आईचा पुतळा, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ गेट क्र. ६ या मार्गे दिंडीचे राजमाता जिजाऊ साहेब सभागृहातील दीक्षान्त सभा मंडपात आगमन होऊन तेथे विसर्जन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठाच्या अॅनेक्स इमारत प्रांगणात ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम होतील. ग्रंथमहोत्सवातील स्टॉल दोन्ही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील.

यंदा ४९,९०२ स्नातक घेणार पदवी; मुलींचे प्रमाण ५७ टक्के

यंदाच्या दीक्षान्त समारंभात पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यविद्या आणि आंतरविद्याशाखा या चार विद्याशाखांच्या मिळून एकूण ४९,९०२ स्नातकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या २८,५१३ (५७.१४%)  इतकी लक्षणीय आहे. १६,१५९ स्नातक प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी घेणार आहेत, तर ३३७४३ स्नातक पोस्टाने पदवी घेणार आहेत. दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर स्नातकांना त्यांची प्रमाणपत्रे त्यांच्या नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरी अकाऊंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या स्नातकांची विद्याशाखानिहाय माहिती पुढीलप्रमाणे-

विद्याशाखा

प्रत्यक्ष उपस्थित

पोस्टाने

 

एकूण

मुले

मुली

मुले

मुली

विज्ञान व तंत्रज्ञान

२८५३

३५३१

७४३४

६५०१

२०३१९

वाणिज्य व व्यवस्थापन

१९००

३५९६

४४३१

७०७५

१७००२

मानव्यविद्या

१२७३

२२६७

२८४८

४१६३

१०५५१

आंतरविद्याशाखा

२४८

४९१

४०२

८८९

२०३०

एकूण

६२७४

९८८५

१५११५

१८६२८

४९९०२

 

१६१५९

३३७४३

४९९०२