Wednesday, 9 April 2025

जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केली - ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे

 

 

कोल्हापूर, दि.09 एप्रिल - जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांनी आज येथे केले.


शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित 2024 साठीचा पहिला पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार आणि सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.





डॉ.मोरे पुढे म्हणाले, मारूतीराव जाधव (तळाशीकर) गुरूजींच्या गाथेचे प्रकाशन होणे ही फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. या गाथेचे प्रचार आणि प्रसार हळूहळू संपूर्ण राज्यभर होणार आहे, ही सुखावणारी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आय.आय.टी.सारख्या आधुनिक वैज्ञानिक संस्थेमध्ये कार्य करीत असताना तुकोबांच्या अभंगाचा सखोल विचार करून डॉ.समीर चव्हाण यांनी खंड प्रकाशित करून पुरस्कार प्राप्त केलेला आहे. संत नामदेव, संत तुकोबा, संत एकनाथ महाराज यांनी संत परंपरा कायम ठेवली.महाराष्ट्र राज्यामध्ये वैचारीक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अध्यात्मीक जडण-घडणीमध्ये सांप्रदायिक समाजाचा विस्तार करण्यामध्ये संत ज्ञानोबांचा-तुकोबांचा मोठा वाटा आहे. श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यामध्ये अर्जुनाला जसे गीतचे सार सांगितले तसेच सार उध्दवाला भगवत गीतेमधील अकराव्या खंडात सांगितले.अर्जुनाला सांगितलेले उपदेश आपल्यासमोर आले. परंतु, उध्दवाला सांगितलेले उपदेश जगा समोर आणण्याचे मोठे कार्य एकनाथ महाराज यांनी केले.अशा पध्दतीने ज्ञानोबा आणि तुकोबांचा महासमन्वय या ठिकाणी झालेला आहे. विज्ञान, कला, भाषा साहित्य अशा सर्व प्रकारच्या लोकांना तुकोबा महाराज आकृष्ट करू शकतात. एवढे सामर्ऱ्थ्य त्यांच्या गाथेमध्ये आहे. संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रेसर करावयाचे असेल तर सर्व संतांना एकत्र ठेवणे आवश्यक आहे.सर्व संतांनी आपणांस फार मोठी दिशा दाखविलेली आहे. आजही संत साहित्य अभ्यासणे आणि त्याचा योग्य तो अर्थ लावणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज हयात असतानाच त्यांच्या अभंगाचा महाराष्ट्रावर फार मोठा प्रभाव पडला होता. पुढे बहिणाबार्‌इंनी वारसा सुरू केला. गेली साडेतीन ते चारशे वर्षे तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू आहे. अभंग गद्य स्वरूपात असते त्याचे पद्य स्वरूपात रूपांतर केले जाते.सर्व प्रथम ब्रिटशांनी तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.तद्नंतर, प्रार्थना समाजाच्या लोकांनी आठराशे अभंगाचा अर्थ लावलेला खंड प्रकाशित केला. त्या परंपरेमध्ये समाविष्ट होणारे तळाशीकर गुरूजी आणि सद्गुरू डॉ. मुंगळे यांच्या कार्याची दखल शिवाजी विद्यापीठाने घेतली हे अधिक कौतुकास्पद आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, संत साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्व.तळाशीकर गुरूजी यांना पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आले.तर, सद्गुरू डॉ. मुंगळे हे पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे अध्यात्मिक गुरू असा हा गुरू-शिष्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जात आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. गुरूजींनी गेल्या तीस वर्षांमध्ये सेवानिवृत्ती नंतरच्या कालखंडामध्ये समाजाला तुकोबा महाराज समजावे म्हणून अभ्यास केला आणि तो अभ्यास विद्यापीठाने प्रसिध्द केला.तळाशीकर गुरूजी आणि डॉ.गुरूनाथ मुंगळे पुरस्कार प्राप्त डॉ.चव्हाण या दोघांचा केंेद्रबिंदू एकच आहे ते म्हणजे संत तुकाराम महाराज.या दोघांनीही तुकाराम महाराज समजावून सांगण्यामध्ये भर घालण्याचे काम केले आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार स्व.तळाशीकर गुरूजी यांच्यावतीने श्रीमती आनंदी मारूतीराव जाधव यांनी स्विकारला. तर, सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार आय.आय.टी.कानपूर उत्तर प्रदेश येथील प्रा.समीर चव्हाण यांना ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी गौरी कहाते (सोलापूर), डॉ.अरूण जाधव (तळाशी), डॉ.समीर चव्हाण (कानपूर) आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अरूण जाधव आणि श्रीमती आनंदी मारूतीराव जाधव, तळाशीकर गुरूजींच्या आठवणीने भाऊक झाले होते.

कार्यक्रमास माजी खासदार प्रा.संजय मंडलीक, डॉ.प्रतापराव माने, अरूण डोंगळे यांचेसह अधिकार मंडळाचे सदस्य, तळाशीकर गुरूजी यांचेवर प्रेम करणारे तळाशीकरवासी, सद्गुरू डॉ.गुरूनाथ मंुगळे आणि पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे कुटुंबीय मोठया प्रमाणात सभागृहात उपस्थित होते. संपूर्ण सभागृह उपस्थितांमुळे भरले होते.

संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले तर मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले.

-----