Saturday, 31 May 2025

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य एकमेवाद्वितिय आणि प्रेरक: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज दोन ग्रंथांचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) अविनाश भाले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. जी.बी. कोळेकर, डॉ. रामचंद्र पोवार, डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, दत्तात्रय घुटूगडे, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. नीलेश शेळके, डॉ. जयवंत भोसले आदी.

शिवाजी विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी.

(ग्रंथ प्रकाशन तसेच अभिवादन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ३१ मे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे समग्र कार्य हे एकमेवाद्वितिय आणि प्रेरक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने डॉ. मच्छिंद्र गोफणे आणि डॉ. नीलेश शेळके लिखित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर: जीवन आणि कार्य आणि दत्तात्रय भैरवनाथ घुटूगडे संपादित कोल्हापूर पुराभिलेखागारातील राजर्षी छत्रपती शाहू दप्तरातील होळकर रियासतीसंबंधी कागदपत्रांची सूची अशा दोन ग्रंथांचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्ताने विद्यापीठात विविध विचारवंत मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. पण ती व्याख्याने केवळ कार्यक्रम पत्रिकेपुरती न राहता त्या कार्यक्रमाच्या पाऊलखुणांचे जतन करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न म्हणजे डॉ. गोफणे आणि डॉ. शेळके यांचा ग्रंथ होय. नेटक्या संपादनामुळे हा ग्रंथ सुबक आणि वाचनीय झाला आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय घुटूगडे यांच्या कागदपत्र सूचीच्या संकलनामुळे करवीर संस्थान आणि इंदूर संस्थान यांच्या दरम्यान असणारे सहसंबंध सामोरे आले आहेत. विशेषतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी होळकर संस्थानाशी केलेला पत्रव्यवहार या द्वारे सामोरा आला आहे. संशोधकांना यामुळे एक वेगळे दालन या ग्रंथाने खुले करून दिले आहे. त्यामुळे सर्वच लेखक, संपादक अभिनंदनास पात्र असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाने अवघ्या दीड वर्षांत केलेले हे ग्रंथनिर्मितीचे कार्य मौलिक आहे. याद्वारे मराठेशाहीच्या अलक्षित इतिहासाचे जागरण झाले आहे, ही महत्त्वाची बाब आहे.

कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक अध्यानाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनी केले. दत्तात्रय घुटूगडे यांनी आभार मानले.

यावेळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. नीलेश शेळके, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. जी. बी. कोळेकर, अविनाश भाले, डॉ. जयवंत भोसले, डॉ. किशोर खिलारे, यश आंबोळे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

Friday, 16 May 2025

एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत सिक्कीम राज्य स्थापना दिवस राजभवन येथे साजरा

आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 कोल्हापूर, दि.१६ मे - आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देश प्लास्टिक कचऱ्याने  विद्रुप होत आहे. सिक्कीम मात्र देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे ते राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांनी शिकण्यासारखी असून युवकांनी किमान आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला तर देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.









सिक्कीम राज्याचा ५० वा राज्य स्थापना वर्धापन दिवस राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन मुंबई शुक्रवारी (दि. १६ मे) साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.  'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत राजभवनातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने सिक्कीम राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

साधारण तीन दशकांपूर्वी देशात कुणीही प्लास्टिक - पॉलिथिन बॅग वापरात नसत. प्लास्टिक न वापरल्यामुळे कुणाचेही फारसे काम अडत नव्हते. आज मात्र लोक खरेदीसाठी बाहेर जाताना कधीही कापडी पिशवी नेत नाही. प्रत्येक वस्तू प्लास्टिक मध्ये आणली जाते. साधा चहा देखील लोक पॉलिथिन बॅग मध्ये आणतात. अशा प्रकारच्या चहाचे आरोग्यावर काय परिणाम होतात याचा विचार देखील करीत नाहीत. या स्थितीचा विचार करून युवकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा व बाहेर पडताना नेहमी कापडी पिशवी सोबत बाळगावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

सिक्कीम व इतर उत्तरपूर्व राज्याचे सौंदर्य स्वित्झर्लंड पेक्षा तसूभर देखील कमी नाही. आपण स्वतः स्वित्झर्लंडला जाऊन आलो. त्या देशापेक्षा कितीतरी पटीने नैसर्गिक सौंदर्य भारतात आहे.  मात्र उत्तम मार्केटिंग मुळे  काही देश पर्यटनात पुढे गेले आहे असे सांगून लोकांनी सिक्कीमसह उत्तरपूर्व राज्ये तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

आज सिंगापूर व थायलंड जगातील सर्वाधिक पर्यटक आकर्षित करतात. मात्र, भारतात इतक्या नदया, गडकिल्ले, वारसा शिल्पे व निसर्ग संपदा आहे की जगातील अर्धे पर्यटक आपण आकर्षिक करू शकतो असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

संपूर्ण देशातील लोकांमध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेमुळे पाकिस्तान 'सिंदूर' मोहिमेनंतर शांत झाला असे सांगून लोकांनी एकता टिकवून ठेवली तर भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचे लोक नृत्य  घोंटू व लोकगीत लेपचा तसेच सिक्कीमचे राज्यगीत उत्कृष्ट सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलदीप जठार व श्रद्धा चराटकर या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून सिक्कीम येथील तरुणीचे सुंदर चित्र साकारल्याबद्दल तसेच ओंकार गोमासे या विद्यार्थ्याने सिक्कीम येथील लोकजीवनाचे तैलचित्र काढल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे विशेष कौतुक केले. 

विद्यापीठाच्या वृत्तविद्या व जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेला सिक्कीम राज्यावरील माहितीपट  'सिक्कीम या पॅराडाईज ऑफ इंडिया' यावेळी दाखविण्यात आला.

राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अवर सचिव सुशील  मोरे यांनी  आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ डी. टी शिर्के, प्रकुलगुरु पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कला सादरीकरण केल्याबददल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

 **

Maharashtra Raj Bhavan celebrates Sikkim State Foundation Day

Governor appeals to youth to make their neighbourhood 'plastic free'

 

Kolhapur, Dt.16 May - The 50th Anniversary of the State Foundation Day of Sikkim was celebrated at Maharashtra Raj Bhavan Mumbai in presence of Maharashtra Governor and Chancellor of State Universities C.P. Radhakrishnan on Fri (16 May). The Sikkim State Foundation Day was organised as part of Ek Bharat Shreshtha Bharat initiative of Government of India.

The Sikkim State Foundation was organised by Maharashtra Raj Bhavan as part of the Ek Bharat Shreshtha Bharat initiative of Government of India. 

Observing that plastic waste has littered the country from Kashmir to Kanyakumari, the Governor called upon the youth to follow the example of 'plastic free' Sikkim State and keep their neighbourhood plastic free.

The Governor applauded Sikkim for becoming the State with the least use of plastic and for promoting organic farming. 

The Governor applauded the students Kuldeep Jathar and Shraddha Charatkar for their beautiful rangoli of a Sikkim woman and patted Omkar Gomase for his painting of the monuments and life of the Sikkimese people.

The Cultural team of the University presented the Ghantu folk dance, Lepcha folk song and Lepcha Folk Dance of Sikkim on the occasion.  An audio visual film showcasing the beauty, history and  heritage of Sikkim made by the students of the Media department of the University was also shown on the occasion.

Secretary to the Governor Dr Prashant Narnaware delivered the welcome address, while Under Secretary Sushil More proposed a vote of thanks.

Vice Chancellor of Shivaji University Prof D. T. Shirke, Pro Vice Chancellor P S Patil, Registrar Dr V N Shinde, members of the Management Council of the University, students and members of the cultural team of the University were present.

-------

Thursday, 15 May 2025

शिवाजी विद्यापीठात माजी सैनिकांचा सन्मान






कोल्हापूर, दि. १५ मे - "देशभक्ती सप्ताह" साजरीकरण अंतर्गत शिवाजी विद्यापीठांमध्ये सिक्युरिटी विभागा मध्ये कार्यरत असलेले संरक्षण दलातील माजी सैनिक व अधिकारी यांनी देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के, प्र कुलगुरू, प्रा डॉ पी एस पाटील आणि कुलसचिव, डॉ व्ही एन शिंदे  यांच्या हस्ते गौरव चिन्ह आणि शाहू महाराजांचे चरित्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यापीठाच्या सेवेत असणारे एकूण 37 माजी संरक्षण दलातील सेवकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चीफ सेक्युरिटी ऑफिसर श्री शिवाजी शिंदे त्याचबरोबर बोर्ड ऑफ स्टडीचे उपकुलसचिव डॉ. एस एम कुबल यांनी आपले सेवेतील अनुभव सर्वांसमोर मांडले. कारगिल युद्ध दरम्यान त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल आणि केलेल्या कामगिरीबद्दल विशेषत्वाने उल्लेख केला. कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के यांनी देशसेवा करणाऱ्या सर्वच संरक्षण दलातील जवानांबद्दल आदराची भावना व्यक्त केली. देशसेवा, देशप्रेम, देशभक्ती या ध्येयाने ते आपली सेवा देशाला समर्पित करून देशाच्या नागरिकांचे संरक्षण करतात म्हणून देशातले नागरिक सुखाने झोपू शकतात असे ते म्हणाले. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, डॉ. टी एम चौगले यांनी केले तर आभार कुलसचिव, डॉ. व्ही एन शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी विकास विभाग प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

                                                                                      _____ 

Tuesday, 13 May 2025

शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रभक्ती जागृती सप्ताहाअंतर्गत रक्तदान शिबिर

 


कोल्हापूर, दि.13 मे - भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभर 'राष्ट्रभक्ती जागृती सप्ताह' साजरा करण्याबाबत मा.कुलपती कार्यालयाने निर्देशित केले आहे.त्यानुसार, शिवाजी विद्यापीठामार्फतही 'देशभक्ती सप्ताह' दि.13 ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.





याची सुरूवात म्हणून आज, दि.13 मे रोजी दसरा चौक ते बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक आणि पुन्हा छत्रपती प्रमिला राजे रूग्णालयामार्गे दसरा चौक असे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रभात फेरीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.सरिता ठकार, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.शरद बनसोडे यांचेसह दीडशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

याच उपक्रमाचा भाग म्हणून दि.17 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच, रक्ताचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन विद्यार्थी, शिक्षक, इच्छुक रक्तदाते आणि समाजातील सजग नागरिकांनी या शिबिरामध्ये मोठया प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

-----    


Tuesday, 6 May 2025

वंचितांच्या ज्ञानवर्धनासाठी आधुनिक प्रयत्न आवश्यक: खासदार शाहू छत्रपती

 ब्रेल लिपीमधील पहिल्या शाहूचरित्र पुस्तिकेचे विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात ब्रेलमधील पहिल्या शाहू चरित्र पुस्तिकेचे प्रकाशन करताना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती व कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, विक्रम रेपे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि गणेशकुमार खोडके.


कोल्हापूर, दि. ६ मे: दृष्टीहीन तसेच वंचित घटकांच्या ज्ञानवर्धनासाठी आधुनिक पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.

राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने आयोजित विक्रम रेपे संकल्पित राजर्षी शाहू महाराज ब्रेल पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ब्रेल लिपीमध्ये प्रकाशित होणारे हे पहिलेच शाहूचरित्र आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

खासदार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, विक्रम रेपे आणि त्यांच्या मित्र परिवाराने सामाजिक जाणीवेच्या भावनेतून अंध व्यक्तींपर्यंत शाहू महाराजांचे जीवनकार्य पोहोचविण्यासाठी केलेला ब्रेल पुस्तिकेचा प्रयत्न अनुकरणीय आहे. त्यांच्याप्रमाणे इतर समाजघटकांनीही वंचितांच्या सक्षमीकरणासाठी पुढे येणे अपेक्षित आहे. अंध विद्यार्थ्यांना विविध विषयांतील ज्ञान देण्यासाठी अशा अनेकानेक उपक्रमांची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी ऑडिओबुक्सही करता येऊ शकतील. आजघडीला समाजात अंधांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेतच, त्याच बरोबरीने अंध अवस्थेचे मानवी जीवनातूनच निर्मूलन करण्यासाठी आधुनिक संशोधन करण्याचीही आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, राजर्षी शाहूंचे जीवनकार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रामार्फत भरीव कार्य झालेले आहे. विद्यापीठात दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी स्थापित केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. दृष्टीहीन व्यक्तींपर्यंत राजर्षी शाहूंचे कार्य पोहोचविण्याच्या दृष्टीने ब्रेल पुस्तिकेचा उपक्रम अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर पुरालेखागाराचे अभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक यांसह सर्वच क्षेत्रांतील कार्य महान आहे. त्यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती आजही लोकांना नाही. महाराजांनी हत्तींची पैदास करण्यासाठी खास निर्माण केलेले शिवारण्य, चहा-कॉफीच्या मळ्यांचा यशस्वी प्रयोग, संस्थानात ठिकठिकाणी उभारलेली अंबाबाईची मंदिरे आदी बाबी अज्ञातच आहेत. महाराजांचा वारसा सांगत असताना आपण त्यांचे चरित्र अंगिकारणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी शाहू महाराजांच्या चरित्राचा व कार्याचा सविस्तर वेध घेतला. ते म्हणाले, शाहू महाराज हे प्रत्येक नागरिकाला एक वेगळी जीवनदृष्टी प्रदान करणारे व्यक्तीमत्त्व आहे. दीनदुबळ्यांना माणुसकीची वागणूक देणारे आणि सर्वंकष मानवी विकासाची नवी परिभाषा निर्माण करणारे शाहू महाराज होते. महाराजांच्या जीवनचरित्रामधून सातत्याने विकासाची नवी दृष्टी मिळत राहते.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदैव सहानुभूतीचा दृष्टीकोन बाळगला आहे. विशेषतः दृष्टीहीन व्यक्तींसाठी रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड या केंद्रामार्फत त्यांच्यासाठी अनेकविध उपक्रम राबविले जातात. अंध विद्यार्थी हे प्रयोगपद्धतीमुळे विज्ञानाच्या शिक्षणापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन वैज्ञानिक प्रयोग कसे करावेत, यासाठीचे प्रशिक्षण शिबीरही विद्यापीठ घेते. अंध विद्यार्थ्यांना बुद्धीबळाचे प्रशिक्षण देऊन असे दहा विशेष संचही त्यांना प्रदान केले आहेत. आता लवकरच त्यांच्या स्पर्धा भरविण्याचाही मानस आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असणारे आपले विद्यापीठ राजर्षी शाहूंचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी प्रतिबद्ध आहे. डॉ. विलास संगवे यांच्यापासून ते डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ संशोधकांनी विद्यापीठाच्या माध्यमातून शाहूचरित्राचे अनेक पैलू समाजासमोर आणण्याची मोलाची कामगिरी केली आहे.

यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या काही अंध विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात त्यांच्या हस्ते पुस्तिका प्रदान करण्यात आली. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विक्रम रेपे यांनी केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, वसंतराव मुळीक, डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. नमिता खोत, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. सचिन पवार, नॅबचे एम. बी. डोंगरे, भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे -पाटील, डॉ. प्रतिभा देसाई, उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, विक्रम जरग यांच्यासह नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड्स, मिरजकर तिकटी अंधशाळा, अंध युवक मंच या संस्थांचे संचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुस्तिकेचे राज्यातील सर्व अंधशाळांमध्ये वितरण

आज प्रकाशित करण्यात आलेल्या शाहूचरित्राच्या ब्रेल पुस्तिकेचे मुद्रक स्वागत थोरात यांच्याकडून येत्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील सर्व अंधशाळांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुस्तिकेचा हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचाही मानस संकल्पक विक्रम रेपे यांनी यावेळी व्यक्त केला.