Thursday 17 October 2024

बायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती

 शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त

 

डॉ. शंकर हांगिरगेकर


अक्षय गुरव

ललित भोसले


कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी बायोमासपासू औषधनिर्माण क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या संयुगांची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या संशोधनाला यूकेचे पेटंट प्राप्त झाले आहे. प्रतिजैविके व कर्करोगावरील चाचण्यांमध्ये त्यांचे उपयोजन शक्य आहे.

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. शंकर हांगिरगेकर आणि अक्षय गुरव व ललित भोसले या संशोधकांनी ग्राइंडस्टोन केमिस्ट्री वापरुन बायोमासपासून हायड्रॉक्झी मिथाईल फुरफुराल हे मूलद्रव्य वापरून नवीन हायड्राझिनिल थायाझोल संयुगे तयार करण्याची पद्धती शोधली आहे. या शोधाला संयुक्त राष्ट्रांचे (यूके) प्रतिष्ठित पेटंट मिळले आहे.

डॉ. हांगिरगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनात नवीन हायड्राझिनिल थायाझोल संयुगे तयार करण्यासाठी ग्राइंडस्टोन केमिस्ट्री या अत्यंत सोप्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, या नव्या पद्धतीमध्ये कोणत्याही उत्प्रेरकाचा किंवा द्रावणाचा वापर करता कमी वेळेत उत्कृष्ट उत्पादन मिळवता आले. बायोमासपासूनिर्मित फाईव्ह-हायड्रॉक्सी मिथाइल फुरफुराल याचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून वापर करून संशोधकांनी औषधनिर्माण क्षेत्रात उपयुक्त असलेल्या हायड्राझिनिल थायाझोल संयुगांचा संग्रहच तयार केला आहे. हे संशोधन औषधनिर्माण क्षेत्रासाठी अभिनव ठरले असून पर्यावरणपूरक रसायनशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील नवकल्पना आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या विकासासाठीची वचनबद्धता या यशातून अधोरेखित होते. या पद्धतीच्या वापरामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल तसेच हा शोध हरित संशोधनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मत डॉ. हांगिरगेकर यांनी व्यक्त केले.

संशोधनाचे महत्त्व असे...

जैव-नविकरणीय स्रोतांपासून प्राप्त होणाऱ्या संयुगांमध्ये 5-हायड्रॉक्सी मिथाइल फुरफुराल (HMF) हे महत्त्वाचे जैव-आधारित रासायनिक मध्यवर्ती असते. लिग्नोसेल्युलोसिक बायोमास आणि अन्न कचऱ्यापासून ते सहज उपलब्ध होऊ शकते. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून, रासायनिक प्रक्रिया अधिक शाश्वत करण्यासाठी 5-हायड्रॉक्सी मिथाइल फुरफुराल  (HMF) सारख्या बायोमास-आधारित संयुगांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. तसेच, त्यापासून तयार केलेल्या हायड्राझिनिल थायाझोल या  रसायनाचा संशोधन क्षेत्रात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कॅन्सर या चाचण्यांसाठी देखील उपयोग झाला आहे. हायड्राझिनिल थायाझोलचे संशोधन औषध उत्पादनात मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरले आहे आणि त्याचे औषधी फायदेदेखील आढळले आहेत. अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी हे महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे डॉ. हांगिरगेकर यांनी सांगितले.

Wednesday 16 October 2024

वाचनामुळेच माणूस अधिक प्रगल्भ: नंदकुमार मोरे

 

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित साहित्यकृतींचे अभिवाचन कार्यक्रमाचा आस्वाद घेताना अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह डॉ. सुखदेव एकल आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात वाचन प्रेरणा दिनानिमित्त साहित्यकृतींचे अभिवाचन करताना विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात वाचन प्रेरणा दिनानिमित्त साहित्यकृतींचे अभिवाचन करताना विद्यार्थिनी


कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: वाचनामुळेच माणूस अधिकाधिक प्रगल्भ बनतो, असे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित साहित्यकृतींचे अभिवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

डॉ. मोरे म्हणाले, आज मोबाईलच्या युगात वाचन कमी झाले असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी चांगले साहित्य वाचले पाहिजे, तरच आपण समृद्ध होऊ शकतो.

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले की, वाचन ही आनंद देणारी गोष्ट आहे. आपण अनेक चांगल्या साहित्यकृतींचे वाचन केले पाहिजे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी काय वाचले पाहिजे, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

सदर साहित्यकृतींचे अभिवाचन कार्यक्रमांतर्गत मराठीतील निवडक साहित्यकृतींचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. त्यामध्ये योगिता ठोंबरे (नदीष्ट-मनोज बोरगावकर), प्रज्योती शिंदे (झाडवाटा-आनंद यादव), पृथ्वीराज पाटील (ढव्ह आणि लख्ख ऊन-राजन गवस), जय बाचनकर (डियर तुकोबा-विनायक होगाडे), संजना शेरखाने (एक पत्र भाईसाठी-सुनिता देशपांडे), प्रमोदिनी पुंगावकर (चानी-चिं.त्र्यं.खानोलकर), प्रांजली क्षिरसागर (माझ्या इंग्रजीची बोलू कौतूके-मंगला गोडबोले), हिना दळवी (पर्स हरवलेली बाई-मंगला गोडबोले), स्मिता राजमाने (संगीत देवबाभळी-प्राजक्त देशमुख), ज्योती चौरे (भुरा-शरद बाविस्कर), ऋणाली नांद्रेकर (आहे हे असं आहे-गौरी देशपांडे), करूणा उकीरडे (आता अमोद सुनासि आले-दि.बा.मोकाशी) या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिवाचनात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पारदे तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी एम.. भाग एक-दोन आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

जीवनात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य, सादरीकरण महत्त्वाचे: डॉ. बबन जोगदंड

  

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. बबन जोगदंड. मंचावर (डावीकडून) डॉ. कैलास सोनवणे व डॉ. जगन कराडे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. बबन जोगदंड.

कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: आजचे हे जग निव्वळ स्पर्धेचे नसून ते संवाद कौशल्य, सादरीकरण, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनविषयक ज्ञान मिळविण्याचे आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ते आत्मसात केले पाहिजे. सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कष्ट केल्यास यशप्राप्ती शक्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील 'यशदा'चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी काल (दि. १५) केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मानव्यशास्त्र सभागृहात 'स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या संधी' या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ.जोगदंड बोलत होते.  कार्यक्रमास रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.

डॉ. जोगदंड म्हणाले, परीक्षार्थींनी राजहंसाप्रमाणे नीर-क्षीर विवेकवृत्तीने आवश्यक तेच ज्ञान प्राशन करण्याची कला आत्मसात करणे अनिवार्य ठरते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भिती आणि न्यूनगंड बाळता कामा नये. पुस्तके स्वत: शांत राहून व्यक्तीस बोलायला, जगायला शिकवितात आणि आत्मविश्वास देतात. आज प्रचंड संसाधने उपलब्ध आहेत, त्यांचा उत्तम उपयोग करून घेता आला पाहिजे.  जर्मन, फ्रेंच, जपानी या भाषा कौशल्यांसह पर्यटन आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचेही उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याग, चौकस बुद्धी, वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्तीची जोड असणे गरजेचे आहे. वाचन, मनन, लेखन, चिंतन, एकाग्रता आणि आकलन यामधून उत्तम स्पर्धक घडू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी किती अंतर कापतो, यापेक्षा तो कोणत्या दिशेने जातो, याला खूप महत्त्व असते. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वक्तृत्व व लेखनशैली सुधारणेही गरजेचे आहे. वाचन करणे, नोटस् काढणे, पठण, मनन करणे, आकलन आणि विश्लेषण करणे या पध्दतीने अभ्यासाचा क्रम ठेवल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. 

यावेळी स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पवन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday 15 October 2024

विद्यापीठासह सर्व महाविद्यालयांत

एकाच वेळी शिवराज्याभिषेकाचा स्मृतीजागर

 वाचन प्रेरणा दिनाच्या अनोख्या उपक्रमात हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

शिवाजी विद्यापीठात डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवर अधिकारी व शिक्षक


शिवाजी विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात शिवराज्याभिषेकाशी संबंधित उताऱ्यांचे मूकवाचन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. रघुनाथ ढमकले, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. धनंजय सुतार.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झालेले पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झालेले वडूज येथील दादासाहेब गोडसे महाविद्यालयातील विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमानिमित्त इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेली ग्रंथदिंडी.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झालेले लोणंद येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झालेले कोल्हापूरच्या न्यू कॉलेज येथील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी



 

(शिवाजी विद्यापीठातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी बखरकार कृष्णाजी अनंत सभासद यांनी या सोहळ्याचे महत्त्व विषद करणारे उपरोक्त विधान केले. आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठासह संलग्नित २९७ महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सकाळी १०.४५ ते ११.०० या पंधरा मिनिटांच्या कालावधीत शिवराज्याभिषेक दिनाच्या स्मृतींचा जागर करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षापासून त्याची व्याप्ती महाविद्यालयांपर्यंत वाढवून सर्व संबंधित घटकांना सामावून घेऊन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. आज सकाळी १०.३० ते ११ वा. या कालावधीत हा उपक्रम विद्यापीठासह सर्व संलग्नित महाविद्यालयांत एकाच वेळी राबविण्यात आला. यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन असणारा मजकूर विद्यापीठामार्फत सर्व अधिविभाग व महाविद्यालयांना पाठविण्यात आला. याच मजकुराचे १०.४५ ते ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत वाचन करून विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी आदी संबंधित घटकांनी शिवराज्याभिषेकाच्या स्मृती जागविल्या.

शिवाजी विद्यापीठात सकाळी ठीक साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र जमून डॉ. सदानंद मोरे संपादित शिवराज्याभिषेक या ग्रंथातील सोहळ्याशी संबंधित उताऱ्यांचे मूकवाचन केले. वाचन प्रेरणा दिन समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी स्वागत करून उपक्रमाचा हेतू विषद केला. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, आयक्यूएसी संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. शिवराज थोरात, डॉ. प्रकाश बिलावर, डॉ. राजेंद्र खामकर, डॉ. के.डी. कुचे, डॉ. एस.एस. कुंभार, डॉ. जे.पी. खराडे, डॉ. जे.पी. भोसले, एस.डी. थिटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिविभागांसह महाविद्यालयांतही विविध उपक्रम

वाचन प्रेरणा दिनाचा हा उपक्रम विद्यापीठाच्या सर्व अधिविभागांसह संलग्नित महाविद्यालयांतही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. महाविद्यालयांनी आपापल्या परिसरात ग्रंथदिंडीसह अनेकविध उपक्रम राबविले. महाविद्यालयांतील सभागृहे, मैदाने यांसह विविध वर्गांमध्येही सकाळी १०.३० ते ११ या वेळेत विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे शिवराज्याभिषेकाशी संबंधित उताऱ्यांचे वाचन केले.

 

Monday 14 October 2024

शिक्षण, करिअरच्या दृष्टीने युवकांनी मानसिक आरोग्य जपावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

शिवाजी विद्यापीठात मानसिक आरोग्य सप्ताह उत्साहात

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात पथनाट्य सादर करताना मानसशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. सुभाष कोंबडे आदी सहभागी झाले.


कोल्हापूर, दि. १४ ऑक्टोबर - आजच्या काळात शिक्षण व करिअरच्या दृष्टीने युवकांचे मानसिक आरोग्य चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी नुकतेच केले.

शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र अधिविभाग आणि व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोस्टर प्रदर्शन, जनजागृती रॅली व पथनाटय आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू डॉ.शिर्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाले. मानसशास्त्र अधिविभागातील पोस्टर प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

याप्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, मानसशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. अश्विनी पाटील, समुपदेशक उर्मिला शुभंकर, मिलींद सावंत, साक्षी गावडे, विशाल पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.