Saturday, 5 April 2025

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या मूल्यचौकटीचा वारसा

पत्रकारितेने मांडत राहणे महत्त्वाचे: डॉ. राधेश्याम जाधव

 शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

डॉ. शिवाजी जाधव लिखित 'शाहूपूर्व व शाहूकालीन पत्रकारिता' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि वरिष्ठ पत्रकार-संपादक डॉ. राधेश्याम जाधव.

डॉ. शिवाजी जाधव लिखित 'शाहूपूर्व व शाहूकालीन पत्रकारिता' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना वरिष्ठ पत्रकार-संपादक डॉ. राधेश्याम जाधव.


डॉ. शिवाजी जाधव लिखित 'शाहूपूर्व व शाहूकालीन पत्रकारिता' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना वरिष्ठ पत्रकार-संपादक डॉ. राधेश्याम जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. शिवाजी जाधव आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

(डॉ. शिवाजी जाधव लिखित 'शाहूपूर्व व शाहूकालीन पत्रकारिता' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ५ एप्रिल: पत्रकारितेच्या क्षेत्राने शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या मूल्यांच्या चौकटीचा वारसा पुनःपुन्हा अधोरेखित करीत राहून त्याची नव्याने मांडणी करीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन दि हिंदू या दैनिकाचे सिनिअर डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांच्या शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रेया पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते शाहूकालीन पत्रकारितेची मूल्यमीमांसा या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. मास कम्युनिकेशन विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

डॉ. राधेश्याम जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी होता. यामध्ये कोणत्याही स्वरुपाच्या भेदभावाला थारा नव्हता. या मूल्यांच्या प्रस्थापनेचा वसा घेऊन सत्यशोधक चळवळीतील वर्तमानपत्रे कार्यरत झाली आणि त्यांनी माहितीच्या पलिकडे जाऊन ज्ञानाच्या निर्मितीवर भर दिला. राजर्षी शाहू महाराज हे वेदोक्त प्रकरणाकडे मूल्यांसाठीचा लढा याच दृष्टीकोनातून पाहात होते. या मूल्यांतूनच नैतिकता उभी राहते. त्यातून नीतीशास्त्राची चौकट सामाजिक आयुष्यात उभी राहते, याची जाणीव त्यांना होती. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य मानले, तर चिकित्सा थांबते; आणि कर्मसिद्धांतान्वये प्रारब्ध मानले, तर कर्तृत्व थांबते. त्यामुळे या सर्व महामानवांनी या बाबींना स्पष्ट नकार दिला. सर्व प्रकारच्या शोषणाच्या चौकटींना तोंड देण्यासाठी त्यांनी सकारात्मक विचारांची मांडणी केली. त्यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या वृत्तपत्रांनीही कधी द्वेषाची मांडणी केली नाही, तर स्वीकारासाठीचा आग्रह मांडला. याच मूल्यचौकटीचा वारसा आजच्या पत्रकारितेनेही पुढे न्यायला हवा.

डॉ. शिवाजी जाधव यांच्या पुस्तकातून कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या अनुषंगाने अनेक नवे संदर्भ सामोरे आले आहेत, ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. राधेश्याम जाधव यांनी अत्यंत विद्वत्तापूर्ण मांडणी केली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता असताना स्थानिक भारतीयांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला त्यांनी प्राधान्य दिले, याचा अभिमान वाटतो. कला आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे पत्रकारिता हा नवा दृष्टीकोन त्यांनी आपल्या भाषणातून दिला. पत्रकारितेच्या प्रयोजनाची जाणीवही त्यांनी करून दिली, हेही महत्त्वाचे आहे. मंचावर उपस्थित असणारे दोन्ही डॉ. जाधव हे शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी आहेत, याविषयीही त्यांनी अभिमानाची भावना व्यक्त केली.

यावेळी डॉ. जयप्रकाश पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण पांढरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. जे.के. पवार, इंद्रजीत सावंत, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. जी.बी. कोळेकर, वसंतराव मुळीक, वासुदेव कुलकर्णी, सचिन सूर्यवंशी, डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. नितीन माळी, शशिकांत पंचगल्ले, उमेश सूर्यवंशी, डॉ. अरुण शिंदे, डॉ. श्रीराम पवार, जयसिंग पाटील, गुरूबाळ माळी, चारुदत्त जोशी, डॉ. श्रीरंग गायकवाड, राजेंद्रकुमार चौगुले, कृष्णात जमदाडे, डॉ. रत्नाकर पंडित, तेजा दुर्वे, गणेश खोडके, अश्विनी पाटील, प्रा. टी. के. सरगर, वृषाली पाटील यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत मान्यवरांसह शाहू अभ्यासक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 3 April 2025

शाश्वत विकासाद्वारे राष्ट्रनिर्मितीत युवकांनी योगदान द्यावे: सिद्धार्थ शिंदे

 

शिवाजी विद्यापीठात 'शाश्वत विकास' या विषयावर बोलताना राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे. मंचावर डॉ. पवन गायकवाड व डॉ. मुरलीधर भानारकर


 

कोल्हापूर, दि. ३ एप्रिल: शाश्वत विकासाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्याच्या कामी युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी आज येथे केले.

विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागात ई-कचरा व्यवस्थापन केंद्राद्वारे ”शाश्वत विकास” या विषयावर श्री. शिंदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अधिविभाग प्रमुख डॉ. पवन गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात शाश्वत विकासाकडे लक्ष द्यायला हवे. इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाच्या अनुषंगाने संशोधन करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शैक्षणिक संस्थांनी जास्तीत जास्त विद्यार्थीकेंद्री धोरणे अवलंबण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. गायकवाड यांनी शाश्वत विकास हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शिंदे यांनी ई-कचरा व्यवस्थापन केंद्राची पाहणी केली. संजीवनी कदम यांनी सूत्रसंचालन केले तर ई-कचरा व्यवस्थापन केंद्राचे समन्वयक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी आभार मानले.

Thursday, 27 March 2025

अहिल्यादेवी होळकर महिला सक्षमीकरणाचे आदर्श उदाहरण: विनिता तेलंग

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना लेखिका विनिता तेलंग.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लेखिका विनिता तेलंग, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. प्रभंजन माने, चंद्रकांत पाटील आदी


कोल्हापूर, दि. २७ मार्च: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे महिला सक्षमीकरणाचे मोठे आदर्श उदाहरण आहे, असे प्रतिपादन लेखिका विनिता तेलंग यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि. २६) विद्वत्ता परिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रथम सत्रात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य व महिला सबलीकरण या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे होते.

विनिता तेलंग म्हणाल्या, अहिल्यादेवींनी केवळ धार्मिक कार्य केले, असे नव्हे, तर त्याबरोबरीनेच अनेक लोककल्याणकारी कामे केली. महिला सक्षमीकरणाचे त्या स्वतः प्रतीक होत्याच, पण त्यांच्यामुळे राज्यातील इतर महिलांसाठीही त्यांचे कर्तृत्व प्रेरणादायी ठरले. आजही त्यांचे कार्य स्फूर्तीदायक आहे. त्यांचे कार्य देशातील प्रत्येकासाठी महत्त्वाचे सून त्याची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रापासून नव्या पिढीने सर्वसमावेशक, सर्वव्यापक प्रेमाचा, सर्वांच्या हिताचा बोध घ्यावा आणि त्याप्रमाणे जीवन व्यतित करावे. अहिल्यादेवींचा आदर्श घेवून लोककल्याणाचे राजकारण, समाजकारण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर दुसऱ्या सत्रात सुखदेव थोरात यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राजकीय, सामाजिक धोरण व प्रशासकीय कार्य या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रशांत आयरेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर दत्तात्रय घोटुगडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने, सामाजिक कार्यकर्ते बबनराव रानगे, शहाजी सिद, प्रा.लक्ष्मण करपे, डॉ. संतोष कोळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे शिक्षक, संशोधक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

गौरवगाथा आणि सांस्कृतिक कार्यक्रम

कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची गौरवगाथा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अहिल्यादेवींची जीवन गाथा सांगणारी नाटिका, गीते, पोवाडे, ओव्या, लोकगीते व पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.

Tuesday, 25 March 2025

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षा गरजेची: आशुतोष कापसे

 

ऑस्ट्रेलियाच्या फाल्कन लॅब्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष कापसे यांचे स्वागत करताना भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे.


कोल्हापूर, दि. २५ मार्च: ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी, संस्थांनी सायबर सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाच्या फाल्कन लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष कापसे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातर्फे काल (दि. २४) "सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय): आव्हाने आणि संधी" या विषयावर श्री. कापसे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले. अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे अध्यक्षस्थानी होते.

डिजिटल युगातील सुरक्षा आणि तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रातील आव्हानात्मक पैलूंवर प्रकाश टाकताना कापसे म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेला त्यांच्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः, डिजिटल युगात वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती सहज उपलब्ध होते, त्याचे दुरुपयोग टाळण्यासाठी एन्क्रिप्शन आणि नियमित सॉफ्टवेअर अपडेट्सचा वापर करणे गरजेचे आहे. डिजिटल गोपनीयता राखण्यासाठी आणि सुरक्षित डेटा शेअरिंग सुनिश्चित करण्यासाठी, मजबूत प्रमाणीकरण पद्धती आणि विश्वसनीय नेटवर्क सुरक्षा प्रोटोकॉल वापरावेत. फिशिंग हल्ल्यांच्या संदर्भात सातत्याने जागरुक राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी खाजगी माहिती, छायाचित्रे उघड करीत असताना सावधगिरी बाळगावी. कोणतेही ॲप अधिकृत ॲप स्टोअरमधूनच इन्स्टॉल करावे, अन्यथा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. कोणत्याही बँकिंग व्यवहारासाठी कधीही मोफत वायफाय वापरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात बोलताना कापसे म्हणाले, एआयच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण, ऑटोमेशन आणि संशोधन प्रक्रियांमध्ये सुधारणा शक्य आहे. तथापि, एआयचे विश्लेषण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये अद्यापही मर्यादा असून त्यासाठी मानवी निरीक्षण आणि नियंत्रण आवश्यक आहे. अधिक कनेक्टिव्हिटीमुळे आय.ओ.टी. उपकरणांमध्ये अनेकदा सुरक्षाविषयक त्रुटी आढळतात. अशा परिस्थितीत, योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यास हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. या संदर्भात सतर्कता बाळगण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात  प्रा. सोनकवडे यांनी तांत्रिक प्रगतीशी संबंधित फायदे आणि जोखीम याबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व सांगितले. ऑनलाइन फसवणुकीमध्ये गेलेले पैसे परत मिळवणे खूप कठीण असल्याने शेअर बाजाराशी निगडित अधिकृत ॲप्सव्यतिरिक्त इतर ॲपचा वापर करणे धोक्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरवातीला डॉ. मानसिंग टाकळे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. सुप्रिया पाटील आणि वैष्णवी यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. आर. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. केशव राजपुरे, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. एस. पी. दास, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. एम. आर. वायकर, डॉ. एस. एस. पाटील आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धतीचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासमवेत सहभागी विद्यार्थी, परीक्षक आणि शिक्षक

समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे,  डॉ. दिनेश अरोरा, डॉ. वैशाली पवार, डॉ. तानाजी चौगुले आदी



(फोटोओळ- उपरोक्त ३ फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठात आयोजित समूह युवा संसद स्पर्धेत सादरीकरण करताना शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी

 

कोल्हापूर, दि. २५ मार्च: केवळ राज्यशास्त्राच्याच नव्हे, तर सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धतीचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल (दि. २४) बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, संसदीय राजकारण हा सार्वत्रिक अभ्यासाचा विषय आहे. संविधानिक मूल्यांचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांना युवा संसदसारख्या उपक्रमातून चालना मिळते.

या स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी जालंधर (पंजाब) येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयाचे डॉ. दिनेश अरोरा (समूह समन्वयक) आणि पुण्याच्या श्री शाहू विद्यामंदिर महाविद्यालयाच्या डॉ. वैशाली पवार (शिक्षणतज्ज्ञ  परीक्षक)  उपस्थित होते. शपथविधीपासून ते कायदानिर्मिती प्रक्रियेपर्यंत सर्व घटकांचा समावेश असलेल्या या उपक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उत्तम सादरीकरण केले. यावेळी गायत्री सोनवणे, तेजस सन्मुख, संदेश लडकट, श्रेया म्हापसेकर, स्वप्नील माने, विश्वजित पाटील या सहा विद्यार्थ्यांची उत्कृष्ट संसदरत्न म्हणून निवड करण्यात आली. कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, सुरेखा आडके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. प्रल्हाद माने यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. संतोष सुतार, डॉ. कविता वड्राळे, आकाश ब्राह्मणे, डॉ. अतुल जाधव आदींनी संयोजन केले.

Friday, 21 March 2025

‘एआय’ पूरक; पर्याय नव्हे!: निखिल पंडितराव

डिजिटल माध्यम उद्योग कार्यशाळेचा समारोप

डिजिटल माध्यम उद्योग कार्यशाळेस उपस्थित असणारे (डावीकडून) दिग्दर्शक सुमित पाटीलबी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशीदैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितरावजर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवारडॉ. शिवाजी जाधव आदी.


कोल्हापूर, दि. २१ मार्च: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) जगभर बोलबाला आहे. माध्यमांमध्ये हे तंत्रज्ञान स्वीकारणे अपरिहार्य आहे. तथापि, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सर्वस्व नसून ते पूरक असेल, पण पर्याय असू शकत नाही, असे मत दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी आज व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित डिजिटल माध्यम उद्योग या दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी अध्यक्षस्थानी होते.

पंडितराव म्हणाले, मुद्रित माध्यमांनी गेल्या पावणेतीनशे वर्षांमध्ये अनेक बदल केले आहेत. डिजिटल माध्यमाच्या प्रभावाच्या काळातही वर्तमानपत्रे आपले अस्तित्व टिकवून आहेत. उलट कोविडनंतर वर्तमानपत्राच्या खपामध्ये आणि संख्येमध्ये वाढ झाली आहे. विश्वासार्हता जपल्यामुळे मुद्रित माध्यमांना या पुढील काळातही धोका असणार नाही. परंतु डिजिटल माध्यमांच्या प्रभावामुळे काही प्रमाणात वर्तमानपत्रातील वृत्त सादरीकरण बदललेले आहे. मुद्रित माध्यम आणि डिजिटल माध्यम यांचा स्वतंत्र वाचक आणि ग्राहक आहे. ही दोन्ही माध्यमे एकत्र येणं शक्य नाही. या पुढील काळात वर्तमानपत्रांसाठी संशोधन, शोध पत्रकारिता आणि मानवी स्वारस्याच्या बातम्या दिल्याशिवाय गत्यंतर नाही. 

चारुदत्त जोशी म्हणाले, टेलिव्हिजन पत्रकारितेमध्ये अनेक तांत्रिक बदल झाले आहेत. हे बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे. सध्या देशभर बाराशेपेक्षा जास्त विविध चॅनल्स आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे यातील अनेक चॅनलवर परिणाम होताना दिसत आहे. डिजिटल माध्यम हेच टीव्हीकडे जाण्याचे भविष्यातील माध्यम असेल. विशेषतः मोबाईलच्या माध्यमातून मोठा वर्ग टीव्हीशी जोडला जाईल. केबल नेटवर्क कंपन्यांमध्ये अलीकडच्या काळात मनोमिलन सुरू असून स्पर्धा करण्यामध्ये त्यांना विशेष रुची उरली नाही. त्या ऐवजी आपला ग्राहक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे चित्र आहे. भारतात इंटरनेटची गती वाढल्यानंतरचे चित्र अजून वेगळे असू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

चित्रपट दिग्दर्शक सुमित पाटील म्हणाले, चित्रपट क्षेत्रापुढे आज अनेक आव्हाने आहेत. चांगला आशय असूनही लोक चित्रपटगृहात जात नाहीत, हे वास्तव आहे. चित्रपटाच्या पायरसीमुळे निर्माते आणि दिग्दर्शकांची खूप मोठी आर्थिक हानी होऊ लागली आहे. डिजिटल माध्यमामुळे मोठ्या प्रमाणात आशयाची निर्मिती होत असली तरी चित्रपट माध्यमांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म फारसे फलदायी ठरले नसल्याचे दिसते.

विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख डॉ. शिवाजी जाधव यांनी करून दिली. चंद्रशेखर वानखेडे यांनी आभार मानले. 

ज्ञानसंक्रमणात अनुवादित साहित्याची भूमिका महत्त्वाची: डॉ. रघुनाथ ढमकले

 

शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. चेतना सोनकांबळे यांच्यासह शिक्षक, संशोधक व विद्यार्थिनी


कोल्हापूर, दि. २१ मार्च: ज्ञानाच्या संक्रमणामध्ये अनुवादित साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी आज केले.

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात "अध्ययन साहित्याचे भाषांतर" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांबळे होते.

डॉ. ढमकले म्हणाले, भाषांतर ही केवळ कला नसून ती सर्जनशील नवनिर्मिती असते. एका भाषेतील ज्ञान दुसऱ्या भाषेमध्ये नेऊन भाषेसह माणूस समृद्ध करण्याचे काम या माध्यमातून होते. अनुवाद प्रक्रियेमुळेच सामान्य माणसापर्यंत ज्ञान पोहोचू शकते.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. कांबळे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय ज्ञानाच्या प्रसाराला महत्त्व देण्यात आले आहे. त्याचे योग्य उपयोजन करण्यासाठी अध्ययन साहित्य स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे.

शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या  समन्वयक डॉ. रूपाली संकपाळ कार्यशाळेचे प्रयोजन स्पष्ट केले. बन्सी होवाळे व आरती पाटील यांनी परिचय करून दिला. प्रतिक्षा माने व दर्शना डोकरमारे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.

यावेळी सरस्वती कांबळे, आनंदा कुंभार, अर्चना कुराडे, अंजली गायकवाड, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, संजय चव्हाण उपस्थित होते. विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.