‘शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन
![]() |
डॉ. शिवाजी जाधव लिखित 'शाहूपूर्व व शाहूकालीन पत्रकारिता' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि वरिष्ठ पत्रकार-संपादक डॉ. राधेश्याम जाधव. |
![]() | |
|
कोल्हापूर, दि. ५ एप्रिल: पत्रकारितेच्या
क्षेत्राने शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या मूल्यांच्या चौकटीचा
वारसा पुनःपुन्हा अधोरेखित करीत राहून त्याची नव्याने मांडणी करीत राहिले पाहिजे,
असे प्रतिपादन ‘दि हिंदू’ या दैनिकाचे सिनिअर डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांच्या ‘शाहूपूर्व व शाहूकालीन
वर्तमानपत्रे’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते ‘शाहूकालीन पत्रकारितेची मूल्यमीमांसा’ या विषयावर बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. मास कम्युनिकेशन विभागाच्या
सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
डॉ. राधेश्याम जाधव
म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या
मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी होता. यामध्ये कोणत्याही स्वरुपाच्या भेदभावाला थारा
नव्हता. या मूल्यांच्या प्रस्थापनेचा वसा घेऊन सत्यशोधक चळवळीतील वर्तमानपत्रे
कार्यरत झाली आणि त्यांनी माहितीच्या पलिकडे जाऊन ज्ञानाच्या निर्मितीवर भर दिला. राजर्षी
शाहू महाराज हे वेदोक्त प्रकरणाकडे मूल्यांसाठीचा लढा याच दृष्टीकोनातून पाहात
होते. या मूल्यांतूनच नैतिकता उभी राहते. त्यातून नीतीशास्त्राची चौकट सामाजिक
आयुष्यात उभी राहते, याची जाणीव त्यांना होती. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य मानले, तर
चिकित्सा थांबते; आणि कर्मसिद्धांतान्वये प्रारब्ध मानले, तर कर्तृत्व थांबते. त्यामुळे या
सर्व महामानवांनी या बाबींना स्पष्ट नकार दिला. सर्व प्रकारच्या शोषणाच्या
चौकटींना तोंड देण्यासाठी त्यांनी सकारात्मक विचारांची मांडणी केली. त्यांच्या
प्रेरणेतून साकार झालेल्या वृत्तपत्रांनीही कधी द्वेषाची मांडणी केली नाही, तर स्वीकारासाठीचा
आग्रह मांडला. याच मूल्यचौकटीचा वारसा आजच्या पत्रकारितेनेही पुढे न्यायला हवा.
डॉ. शिवाजी जाधव यांच्या
पुस्तकातून कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या अनुषंगाने अनेक नवे संदर्भ सामोरे आले
आहेत, ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. राधेश्याम जाधव यांनी अत्यंत विद्वत्तापूर्ण
मांडणी केली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता असताना स्थानिक
भारतीयांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला त्यांनी प्राधान्य दिले, याचा अभिमान वाटतो.
कला आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे पत्रकारिता हा नवा दृष्टीकोन त्यांनी आपल्या
भाषणातून दिला. पत्रकारितेच्या प्रयोजनाची जाणीवही त्यांनी करून दिली, हेही
महत्त्वाचे आहे. मंचावर उपस्थित असणारे दोन्ही डॉ. जाधव हे शिवाजी विद्यापीठाच्या
पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी आहेत, याविषयीही त्यांनी अभिमानाची भावना
व्यक्त केली.
यावेळी डॉ. जयप्रकाश
पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले.
प्रवीण पांढरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास
क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.
सुनीलकुमार लवटे, डॉ. जे.के. पवार, इंद्रजीत सावंत, डॉ. रणधीर
शिंदे, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. नंदकुमार
मोरे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. विनोद
ठाकूरदेसाई, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. जी.बी. कोळेकर, वसंतराव मुळीक, वासुदेव कुलकर्णी, सचिन सूर्यवंशी, डॉ. सुभाष
कोंबडे, डॉ. नितीन माळी, शशिकांत पंचगल्ले, उमेश
सूर्यवंशी, डॉ. अरुण शिंदे, डॉ. श्रीराम पवार, जयसिंग पाटील, गुरूबाळ माळी, चारुदत्त जोशी, डॉ. श्रीरंग
गायकवाड, राजेंद्रकुमार चौगुले, कृष्णात जमदाडे, डॉ. रत्नाकर
पंडित, तेजा दुर्वे, गणेश खोडके, अश्विनी पाटील, प्रा. टी. के. सरगर, वृषाली पाटील यांच्यासह
पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत मान्यवरांसह शाहू अभ्यासक, विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.