Thursday, 5 June 2014

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठात वृक्षारोपण



तंत्रज्ञान अधिविभाग परिसरात वृक्षारोपण करताना कुलगुरू, प्र-कुलगुरू व इतर मान्यवर.
पर्यावरण शास्त्र अधिविभाग परिसरात वृक्षारोपण करताना कुलगुरू, प्र-कुलगुरू व इतर मान्यवर.

कोल्हापूर, दि. ५ जून: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज सकाळी शिवाजी विद्यापीठात तंत्रज्ञान आणि पर्यावरणशास्त्र या दोन्ही अधिविभागांच्या परिसरात कुलगुरू डॉ. एन.जे. पवार आणि प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज सकाळी तंत्रज्ञान अधिविभागाच्या परिसरात कुलगुरूंसह अन्य मान्यवरांच्या हस्ते महोगनीची सुमारे ५० रोपे लावण्यात आली. त्यानंतर दहा वाजता पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या परिसरात कैलासपतीची रोपे लावण्यात आली. झटपट वाढणारी आणि चांगली सावली देणारी ही रोपे आहेत. पर्यावरणशास्त्र, जीव-रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान अधिविभागांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ.जी.एस. कुलकर्णी, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्रा.डॉ. पी.डी. राऊत, प्रा.डॉ. एस.पी. गोविंदवार, प्रा.डॉ. एस.आर. यादव, डॉ. जे.पी. जाधव, डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. ए.डी. जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Tuesday, 3 June 2014

परीक्षा विभागाच्या सक्षमीकरणात डॉ. हिर्डेकर यांचे योगदान मोलाचे : कुलगुरू डॉ. एन.जे. पवार


 शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रकांसह १४ जणांना निरोप

कोल्हापूर, दि. ३१ मे: शिवाजी विद्यापीठाचा परीक्षा विभाग आधुनि्क व सक्षम करण्याच्या कामी डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यापीठ प्रशासनाचा विश्वास त्यांनी सार्थ ठरविला, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी आज येथे काढले. परीक्षा नियंत्रक डॉ. हिर्डेकर यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी असे विद्यापीठातील एकूण १४ जण सेवानिवृत्त झाले. या निमित्त विद्यापीठाच्या शाहू सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
डॉ. पवार म्हणाले, विद्यार्थ्यांशी सर्वाधिक निगडित अशा परीक्षा विभागाच्या सक्षमतेवरुन विद्यापीठाच्या सक्षमतेची खात्री पटविली जात असते. डॉ. हिर्डेकरांमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामगिरीची शासन स्तरावरही नोंद घेण्यात आली. उत्तम प्रशासक असलेल्या डॉ. हिर्डेकर यांच्या व्यापक सामाजिक संपर्काचाही विद्यापीठाला लाभ झाला. त्यांची वाचनाची आवड म्हणजे त्यांच्यातील शिक्षकही जागृत असल्याचे लक्षण आहे, असेही कुलगुरू म्हणाले. सेवानिवृत्त होणाऱ्या सर्वांनाच कुलगुरू डॉ. पवार यांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे म्हणाले, डॉ. हिर्डेकर यांच्या सहभागामुळे विद्यापीठ अधिकाऱ्यांची एक परिपूर्ण टीम तयार झालेली होती. त्यामध्ये आता पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. हिर्डेकर यांचे विद्यार्थीकेंद्री प्रशासन, त्यांचे अद्ययावत ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य आणि मैत्रीपूर्ण कौटुंबिक जिव्हाळा या गोष्टी नेहमीच स्मरणात राहतील, असे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. हिर्डेकर यांनीही कामाप्रती निष्ठा हेच आपल्या कामकाजाचे ब्रीद असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठ प्रशासनामधील माझे येणे हा निव्वळ एक अपघात होता. इथे पूर्णकाळ राहणे मनातही नव्हते. तथापि, तत्कालीन परिस्थितीमध्ये तणाव निवळण्यासाठी आपल्यासारख्या सहकाऱ्याची मला नितांत आवश्यकता आहे, असे कुलगुरूंनी सांगितल्यामुळे आणि मी त्यांना तसा शब्द दिल्यामुळे मी येथे थांबलो. माझ्यावर व्यक्तिनिष्ठेचा आरोप केला गेला, पण मी नेहमीच माझ्या कामाशी आणि संस्थेशी प्रामाणिक राहिलो. माझ्या सहकाऱ्यांवर प्रसंगी रागावलो, पण तेही प्रेमापोटीच, असेही त्यांनी सांगितले. भविष्यात खाजगी विद्यापीठांच्या स्पर्धेमध्ये सार्वजनिक विद्यापीठे जगविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची जाणीव ठेवून काम करावे, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सहकाऱ्यांना दिला.
यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. डी. के. गायकवाड, न्यू कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. नाईक, प्रा. आबासाहेब वैराट, उपकुलसचिव कॅप्टन नितीन सोनजे, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, सहाय्यक कुलसचिव डॉ. यु.के. सकट, विष्णू खाडे, सुरेश बंडगर, रमेश गवळी, सुरेश पाटील, अभाविपचे शंकरराव कुलकर्णी आदींनी मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्तींपैकी डॉ. सी.एच. भोसले, डॉ. (श्रीमती) एस.ए. वायंगणकर, बी.पी. माने, ए.एन. साबळे आणि डी.बी. पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले.
कार्यक्रमात सर्व सेवानिवृत्तांचा शाल, श्रीफळ, विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी प्रास्ताविक व आभार मानले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट-
विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींची नावे:-
१)      डॉ. बी.एम. हिर्डेकर, परीक्षा नियंत्रक
२)      डॉ. सी.एच. भोसले, प्राध्यापक, पदार्थविज्ञान अधिविभाग
३)      डॉ. श्रीमती एस.ए. वायंगणकर, सहयोगी प्राध्यापक, संगीत व नाट्यशास्त्र विभाग
४)      बी.पी. माने, सहाय्यक कुलसचिव
५)      एम.आर. कडियाळ, सहाय्यक कुलसचिव
६)      बी.एस. चव्हाण, अधीक्षक
७)      पी.बी. येडेकर, सहाय्यक अधीक्षक
८)      श्रीमती एस.जी. कनोजे, सहाय्यक अधीक्षक
९)      ए.एन. साबळे, संशोधन सहाय्यक
१०)  डी.बी. पाटील, लघुलेखक
११)  जी.आर. शिंदे, पंप ऑपरेटर
१२)  आर.टी. कट्टी, प्रयोगशाळा परिचर
१३)  श्रीमती ए.बी. वाडकर, हावलदार
१४)  श्रीमती पी.डी. पाटील, शिपाई
--००--

Monday, 26 May 2014

विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत यश



कोल्हापूर, दि. २३ मे: केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑन द स्पॉट निबंध लेखन स्पर्धे शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या तीन विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत. आदर्श नागरे, महेश देशपांडे आणि राजश्री सलामवाडे अशी त्यांची नावे आहेत. गतवर्षीही या अधिविभागाच्या विद्यार्थ्याने या स्पर्धेत द्वितिय क्रमांक प्राप्त केला होता, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. डी.टी. शिर्के यांनी दिली.
या तिन्ही विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार असून नवी दिल्ली येथे विशेष समारंभात ही पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. नवी दिल्ली येथील निवास व्यवस्था आणि रेल्वेच्या एसी-थ्री टिअरने जाण्या-येण्याचा प्रवास खर्चही दिला जाणार आहे.
केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मध्यवर्ती सांख्यिकी कार्यालयातर्फे सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑन द स्पॉट निबंध लेखन स्पर्धा-२०१४ चे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १९ जानेवारी रोजी ही स्पर्धा संपूर्ण देशभरात एकाच वेळी घेण्यात आली. ऐनवेळी देण्यात आलेल्या विषयावर तीन तासांच्या अवधीत सुमारे ५००० शब्दांचा निबंध लिहीण्याची आव्हानात्मक अशी ही स्पर्धा होती. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रु. १५,०००/- चे एक, द्वितिय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. १२,०००/- ची दोन, तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. १०,०००/- ची तीन आणि प्रत्येकी रु. ५,०००/- ची उत्तेजनार्थ पाच अशी पारितोषिके होती. तृतीय क्रमांकाची तीनही पारितोषिके शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाच्या किरण निहलानी या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.

Thursday, 22 May 2014

विद्यापीठ प्रवेश परीक्षांचा दुसरा टप्पा २५ मे रोजी; परीक्षा केंद्रांतील बदलाची नोंद घेण्याचे आवाहन



 कोल्हापूर, दि. २१ मे: शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा दुसरा टप्पा येत्या २५ मे रोजी पार पडणार असून त्या परीक्षांसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यात आलेला आहे, याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी केले आहे.
दि. २५ मे रोजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑफलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहेत. त्यासाठी यापूर्वी जाहीर केलेली परीक्षा केंद्रे किमान आवश्यक विद्यार्थी संख्येअभावी रद्द करण्यात आली असून आता या परीक्षा पुढीलप्रमाणे जिल्हावार केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सायबर, कोल्हापूर,
सांगली जिल्हा: श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स ॲन्ड सायन्स, सांगली
सातारा जिल्हा: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा आणि सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड.
     उपरोक्त प्रवेश परीक्षांना बसलेल्या संबंधित विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक व परीक्षा केंद्रांबाबतची माहिती विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, याची नोंद घेण्याचे आवाहनही कुलसचिव डॉ. मुळे यांनी केले आहे.
ग्रिव्हन्स फॉर्मची तरतूद
     ज्या परीक्षार्थींनी दोन विषयांच्या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरला असेल आणि २५ मे रोजी त्या परीक्षा एकाच वेळी होणार असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या दोहोंपैकी एक परीक्षा त्यावेळी द्यावी. त्यानंतर वरिष्ठ पर्यवेक्षकांकडे उपलब्ध करून देण्यात आलेले ग्रिव्हन्स फॉर्म भरून द्यावेत. त्यानुसार त्या परीक्षार्थींच्या उर्वरित विषयाची प्रवेश परीक्षा दि. १ जून २०१४ रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे घेण्यात येईल, असेही कुलसचिव डॉ. मुळे यांनी कळविले आहे.

दरम्यान, २५ मे रोजी होणाऱ्या ऑफलाइन प्रवेश परीक्षा व त्यांची वेळ पुढीलप्रमाणे:

प्रवेश परीक्षेचे नाव
वेळ
एम.सी.ए. (सायन्स)
स. ९.०० ते १०.३०
एम.सी.ए. (कॉमर्स)
एम.एस्सी. केमिस्ट्री (इंडस्ट्रीयल/ ॲप्लाइड/ इनऑरगॅनिक/ ऑरगॅनिक/ फिजिकल/ ॲनालिटीकल)
एम.एस्सी. (बॉटनी)
एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स)



स. ११.०० ते १२.३०
एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)
दु. १.०० ते २.३०
एम.ए./ एम.एस्सी. (भूगोल)
एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी)
एम.एस्सी. (फिजिक्स)
एम.एस्सी. (जिऑलॉजी)
एम.लिब. ॲन्ड इन्फॉ. सायन्स



दु. ३.०० ते ४.३०
एम.एस्सी. (मॅथेमॅटिक्स)
बी.लिब. ॲन्ड इन्फॉ. सायन्स
एम.एस्सी. (स्टॅटिस्टीक्स, ॲप्लाइड स्टॅटिस्टीक्स ॲन्ड इन्फॉर्मेटिक्स)


सायं. ५.०० ते ६.३०

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी विद्यापीठाचा सामंजस्य करार



अभिनव संशोधन प्रकल्पांना लाभणार प्रोत्साहन

कोल्हापूर, दि. २० मे: विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिनव व नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी शिवाजी विद्यापीठाने नुकताच सामंजस्य करार केला. या अंतर्गत सन २०१३-१४ साठीचा सुमारे ५० लाख रुपयांचा निधी लवकरच विद्यापीठाला प्राप्त होईल, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी दिली.
मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे १३ मे रोजी आयोगाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यावेळी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारावर आयोगाच्या वतीने सदस्य सचिव डॉ. ए.व्ही. सप्रे यांनी तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी स्वाक्षरी केली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. मुळे यांनी सांगितले की, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राजीव गांधी आयोगातर्फे विद्यापीठाला ठराविक निधी देण्यात येणार आहे. सरधोपट संशोधन प्रकल्पांपेक्षा अभिनव व नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांनाच विशेषत्वाने प्राधान्य देण्याचे आयोगाचे धोरण आहे. विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय संस्था, तंत्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना विद्यापीठाच्या माध्यमातून विकेंद्रित पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. सदर सामंजस्य करारात विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करणे, त्यांचे परीक्षण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर समिती गठित करणे आदींसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक मुद्द्यांचा समावेश आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रात वेगळ्या व दर्जेदार संशोधनाला निश्चितपणे चालना मिळेल, असा विश्वास डॉ. मुळे यांनी व्यक्त केला.