Saturday 31 July 2021

धर्मनिरपेक्षता मूल्यातूनच लोकशाही बळकट

‘लोकशाही आणि अल्पसंख्याक विचार’ वेबिनारमध्ये तज्ज्ञांचा सूर

 

कोल्हापूर दि, ३१ जुलै: धर्मनिरपेक्षता या घटनात्मक मूल्याची जोपासना कसोशीने केल्यास लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा सूर लोकशाही आणि अल्पसंख्याक विचारया विषयावरील एकदिवसीय वेबिनारमध्ये विविध तज्ज्ञांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलमेंट (वायसीएसआरडी) अधिविभागाच्या वतीने काल (दि. ३०) या वेबिनारचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के होते.

यावेळी सोलापूर येथील वालचंद कॉलेजच्या संस्कृत आणि प्राकृत विभागाचे प्रमुख डॉ. महावीर शास्त्री यांनी लोकशाही: जैन समाज विषयक विचार’, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी लोकशाही: मुस्लिम समाज विषयक विचार’, बेळगावच्या जी.एम.एस. कॉलेजचे प्राचार्य आनंद मेणसे यांनी लोकशाही: लिंगायत समाज विषयक विचारतर शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी महर्षि शिंदे यांचे धर्मविषयक विचारया विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. महावीर शास्त्री म्हणाले, भगवान महावीर यांच्या काळातच लोकशाहीची बीजे रोवली गेली होती. अनेक धर्मांना सामावून घेणारा महावीरांचा अनेकान्तवाद याचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. शमशुद्दीन तांबोळी म्हणाले, अल्पसंख्याक ही संकल्पना जगभरात आहे. संयुक्त राष्ट्रानेही अल्पसंख्याकांचे प्रश्न गंभीर असल्याचे म्हटले आहे. भारतात अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम समाजाने इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा नीटपणे इस्लाम समजून घेणे आवश्यक आहे.

कृष्णा मेणसे म्हणाले, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी जातविरहित समाजाची संकल्पना मांडली होती. बसवेश्वर वैज्ञानिक दृष्टीकोनाचे होते. जातव्यवस्था संपल्याशिवाय लोकशाही मूल्ये रूजणार नाहीत, अशी त्यांची धारणा होती.

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, परिघाबाहेरील समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. विशेषतः अल्पसंख्याकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. यासाठी बहुसंख्यांनी स्वतःत बदल करावा. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी अशाच पद्धतीचे सर्वसमावेशक विचार केला होता.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, लोकशाही मूल्य रूजण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकशाहीला अनेकवेळा हादरे बसले असले तरी प्रत्येक वेळी लोकशाही त्यातून अधिक बळकट होत गेली. लोकशाहीत परस्पर सामंजस्य खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः सर्व समाजघटकांचे सौहार्द आणि अल्पसंख्याक समूहाकडे पाहण्याचा बहुसंख्याकांचा दृष्टीकोनही तितकाच सकारात्मक असला पाहिजे. यातून निकोप लोकशाही वाढीस लागण्यास मदत होईल.

डॉ. नितीन माळी यांनी स्वागत केले. डॉ. वैशाली भोसले आणि डॉ. संतोष सुतार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यशवंतराव चव्हाण स्कूलचे प्रभारी संचालक प्रा. प्रकाश पवार यांनी वेबिनारचा हेतू विशद केला. डॉ. कविता वड्राळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment