![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक रायचूर. |
कोल्हापूर, दि. २१ फेब्रुवारी: संशोधनासाठी निधी
मिळवणे ही केवळ आर्थिक प्रक्रिया नसून ती संशोधकाच्या कल्पकतेची, विश्वासार्हतेची आणि नियोजनक्षमतेची कसोटी असते,
असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अशोक रायचूर
यांनी केले.
संशोधन प्रकल्पांसाठी निधी मिळवण्याच्या विविध
संधी, त्या निधीचा
पारदर्शक आणि परिणामकारक वापर तसेच संशोधनातील नैतिकता याविषयी संशोधकांना सखोल
मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रायचूर बोलत
होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते.
भारतातील नवोन्मेषी संशोधन आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा
एएनआरएफ-पेअरच्या हब अॅड स्पोक उपक्रमांतर्गत, शिवाजी विद्यापीठ, देशातील आघाडीच्या
अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या हबचे स्पोक
म्हणून जोडले गेले आहे. या एएनआरएफ-पेअरच्या
माध्यमातूनच या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
डॉ. रायचूर म्हणाले, संशोधन प्रस्ताव तयार
करताना त्यातील उद्दिष्टे स्पष्ट, समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. निधी देणाऱ्या
संस्था संशोधनाचा समाजावर होणारा परिणाम, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर विशेष भर देतात. मिळालेल्या निधीचा
योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे ही संशोधकाची नैतिक जबाबदारी आहे. संशोधनात
कोणत्याही प्रकारची अनियमितता, माहितीचा चुकीचा वापर किंवा नैतिकतेचा भंग होऊ नये, यासाठी संशोधकांनी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता
जपली पाहिजे. संशोधनातील नितीमत्ता सांभाळल्यास संशोधनाची गुणवत्ता आणि
विश्वासार्हता वाढते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, आजच्या
स्पर्धात्मक युगात संशोधनासाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून
मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी संशोधकांनी दर्जेदार प्रस्ताव तयार करण्याची आणि निधीचा
परिणामकारक वापर करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळांमुळे
संशोधकांना योग्य दिशा मिळते आणि विद्यापीठाच्या संशोधन दर्जात वाढ होते. संशोधनातील
नैतिक मूल्यांचे पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संशोधनाची विश्वासार्हता आणि
समाजातील स्वीकारार्हता टिकवण्यासाठी नैतिकता ही मूलभूत अट आहे. विद्यापीठ
संशोधकांना आवश्यक मार्गदर्शन, सुविधा आणि प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे.
तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. टी. ए. अभिनंदन, डॉ. विक्रम जयराम, डॉ.
रोहित कुमार यांनी कार्यशाळेच्या विषयाच्या अनुषंगाने अधिक तपशीलवार मार्गदर्शन
केले. कार्यशाळेला प्रा. आदित्य सधनाला, आयआयएससी-एसयूके स्पोकचे समन्वयक डॉ. सचिन रॉन्डीया
हेही उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालये आणि परिसरातील
विविध विद्यापीठांतील दोनशेहून अधिक प्राध्यापक, संशोधकांनी कार्यशाळेचा लाभ
घेतला.
विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनो सायन्स अॅड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक
तसेच एएनआरएफ-पेअर, आयआयएससी-एसयूके स्पोकचे प्रमुख अन्वेषक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी स्वागत
व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. के.डी. कुचे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ.
किरण पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. प्रमोद कसबे, डॉ. सुनीलकुमार निर्मळे तर स्थानिक व्यवस्थापन डॉ. सोमनाथ पवार तसेच डॉ.
कविता ओझा यांनी पाहिले. प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. कल्याणराव गरडकर यांनी जबाबदारी
पार पाडली.









