Friday, 30 January 2026

शिवाजी विद्यापीठात हुतात्मा दिन





कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात हुतात्मा दिन पाळण्यात येऊन दोन मिनिटे मौन राखून अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीच्या प्रांगणात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह अधिकारी आणि प्रशासकीय सेवकांनी सकाळी ठीक ११ वाजता दोन मिनिटे स्तब्धता पाळून महात्मा गांधी यांच्यासह हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठाच्या सर्व अधिविभागांत आणि प्रशासकीय विभागांमध्येही सर्व अधिविभाग प्रमुखांसह शिक्षक, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपापल्या जागेवर उभे राहून हुतात्म्यांना अभिवादन केले.

 

Thursday, 29 January 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवाजी विद्यापीठात श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे शिवाजी विद्यापीठात आयोजित शोकसभेत शोकप्रस्तावाचे वाचन करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. मंचावर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत डॉ. अजितसिंह जाधव आणि डॉ. सुहासिनी पाटील.


कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे एक कुशल, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जाण असणारे, तडफदार आणि उमदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठात आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज राजर्षी शाहू सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले. अजित पवार यांना शिवाजी विद्यापीठाप्रती आस्था होती. त्यामुळेच त्यांनी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव सुवर्णमहोत्सव निधीची तरतूद केली. त्यामधून विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी, बाळासाहेब देसाई अध्यासन, राजर्षी शाहू म्युझियम कॉम्प्लेक्स इत्यादी उपक्रमांची उभारणी करता येऊ शकली, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. गोविंद कोळेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, सागर लांडे, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. शोकसभेला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 27 January 2026

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांना

शिवाजी विद्यापीठाचा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार

प्रा. चंद्रकांत पाटील
 

कोल्हापूर, दि. २७ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५१ हजार रुपये व सन्मान चिन्ह असे आहे. ज्येष्ठ लेखक प्रा.राजन गवस यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. (डॉ). सुरेश गोसावी असतील

या संदर्भात अधिक माहिती देताना मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी सांगितले की, प्रा. चंद्रकांत पाटील यांची समीक्षा ही मराठीतील महत्त्वाची समीक्षा आहे. सर्जनशील लेखनाबरोबरच त्यांनी अनुवाद व समीक्षा या प्रकारात महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या लेखनाचे स्वरूप हे द्वैभाषिक आहे. मराठी कविता भारतीय स्तरावर नेण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मराठी हिंदीतील सांस्कृतिक अनुबंध अधिक विकसित करण्यामध्ये प्रा. पाटील यांचे लेखन महत्त्वाचे ठरले आहे. "आणि म्हणूनच", "आणि तोपर्यंत" व "कवितेसमक्ष" हे त्यांचे महत्त्वाचे समीक्षा ग्रंथ होतविश्लेषक स्वरूपाची समीक्षा असे पाटील यांच्या समीक्षेचे स्वरूप आहे. १९६० नंतरच्या आधुनिक मराठी साहित्याचा पुरस्कार करण्यामध्ये प्रा.पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते साठोत्तरी काळातील मराठी-हिंदी साहित्याचे विशेषतः कवितेचे महत्त्वाचे टीकाकार आणि समीक्षक असून भीष्म साहनी यांच्या "तमस" या कादंबरीचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद विशेष गाजला. १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमातून केलेले लेखन त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आजवरच्या त्यांच्या एकूणच समीक्षा कारकीर्दीचा सन्मान म्हणून या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्काराच्या निवड समितीचे सदस्य म्हणून प्रा. एकनाथ पगार (देवळा), प्राचार्य गोविंद काजरेकर (बांदा) व प्रा. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) यांनी काम पाहिले.

Monday, 26 January 2026

शिवाजी विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन

 ६३ वर्षांत प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन; घडला नवा इतिहास

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. विलास शिंदे, डॉ. धनंजय सुतार, डॉ. राजाराम गुरव, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. शरद बनसोडे आणि वसंत एकले.

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. विलास शिंदे, डॉ. धनंजय सुतार, डॉ. राजाराम गुरव, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. शरद बनसोडे आणि वसंत एकले.

शिवाजी विद्यापीठात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना अभिवादन करून शुभेच्छा देताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत अधिकारी.

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, डॉ. धनंजय सुतार, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख, डॉ. विलास शिंदे, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. राजाराम गुरव, डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. तानाजी चौगुले.


(शिवाजी विद्यापीठ प्रजासत्ताक दिन समारंभ- लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २६ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले आणि विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या वाटचालीत एक नवा इतिहास रचला गेला. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आल्याच्या या घटनेचे उपस्थित सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि औचित्य या निमित्ताने नव्याने अधोरेखित झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात येणार असल्याने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते आज सकाळी ठीक आठ वाजता शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात आले. विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्याने शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांना त्याचा मोठा आनंद व अभिमान वाटला. प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांचे उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. डॉ. जाधव यांनी यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गर्दी झाली.

यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) छात्रांनी संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर केले. ध्वजवंदनानंतर प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी गुरव, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, सुरक्षा अधिकारी वसंत एकले, माजी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Friday, 23 January 2026

महिलांप्रती पुरुषांसह महिलांचेही वर्तन बदलल्यास समाज बदलेल: रुपाली चाकणकर

शिवाजी विद्यापीठात सक्षमा कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित सक्षमा कार्यशाळेचे उद्घाटन करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. सोबत (डावीकडून) डॉ. माधुरी वाळवेकर, नंदिनी आवडे, डॉ. प्रतिभा दे्साई, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले.


शिवाजी विद्यापीठात आयोजित सक्षमा कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. मंचावर (डावीकडून) लक्ष्मण मानकर, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. विलास शिंदे, नंदिनी आवडे, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की आदी

शिवाजी विद्यापीठात आयोजित सक्षमा कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर.

(सक्षमा कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचा व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: महिलांकडे पाहण्याचा पुरूषांचा दृष्टीकोन बदलण्याबरोबरच महिलांचेही महिलांप्रती वर्तन बदलल्यास समाज खऱ्या अर्थाने बदलेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठाची अंतर्गत तक्रार समिती, बेटी बचाओ अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज एकदिवसीय सक्षमा: महिलांविषयक कायदे जाणीव जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की व आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे प्रमुख उपस्थित होते.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामी नगरी असून महाराणी ताराराणी यांच्या कार्याचाही तिला वारसा आहे. इथून सुरू झालेला महिला सक्षमीकरणाचा विचार संपूर्ण राज्यभर जाईल, याची खात्री असल्यानेच या उपक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यात महिला हक्कांसाठीचा लढा लढत असताना पुरूषांची मानसिकता बदलल्यास समाज बदलेल, हे खरेच आहे. पण महिलांचे अधिकार नाकारण्यात महिलाच अधिक पुढाकार घेतात, हेही खरे आहे. त्यामुळे महिलांनीही आपली मानसिकता बदलून अन्य महिलांची मानहानी करू नये. विशेषतः विधवा महिलांचे हळदीकुंकू घडवून आणा, त्यांची सौभाग्यलेणी काढू नका, त्यांना विविध समारंभात सामावून घ्या, मुलीच्या जन्माला पाठिंबा द्या, बालविवाहाविरोधात उभे राहा. सावित्रीबाई फुले यांनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी सुरू केलेल्या लढ्यामधून आजवर आपण बाईपणाची लढाई लढलो, आता यापुढील काळात आईपणाची लढाई लढण्यासही सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला दिला. त्याद्वारे आपण आपल्या मुलींना शिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. त्यामधून निर्माण होणारे आत्मबल आपल्याला सन्मानप्राप्तीच्या लढ्याला प्रवृत्त करेल. महिलांमध्ये आरोग्यविषयक जाणीवा आणि आर्थिक सक्षमता निर्माण होण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याचे मत चाकणकर यांनी व्यक्त केले.

अंतर्गत तक्रार समित्यांचे लेखापरीक्षण अनिवार्य

२२ जुलै २०२५च्या सुधारित कायद्यानुसार आता महिला आयोगाला दंडात्मक कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. हा कायदा आता ३१ टक्के नोकरदार महिलांचा सक्षम आधार बनला आहे. हा कायदा म्हणजे महिलांसाठीचे एक प्रभावी शस्त्र आहे. अंतर्गत तक्रार समित्यांबाबतही आयोग अतिशय आग्रही असून सर्वच कार्यस्थळी त्यांची स्थापना आणि कामकाज आवश्यक आहे. या समित्यांना आता लेखापरीक्षण करवून घेणेही अनिवार्य करण्यात आले असल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्वाचे सूत्र महिला सन्मान हे होते. शिवाजी विद्यापीठाने सुरवातीपासून हे सूत्र सांभाळले आहे. आज संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही दृष्टीने विद्यापीठातील विद्यार्थिनींचे प्रमाण मोठे आहे. विद्यापीठात प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण ६५ टक्के असून पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण ९० टक्के आहे. या विद्यार्थिनींना आवश्यक सर्व सुविधा आणि सुरक्षा पुरविण्याविषयी विद्यापीठ काळजीपूर्वक प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत केले. निवासी प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष माधुरी वाळवेकर यांनी आभार मानले.

यावेळी मंचावर आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, शिल्पा पाटील आणि वर्षा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमास डॉ. रुपा शहा, डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रभंजन माने यांच्यासह विविध महिला संस्था, संघटनांच्या प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विविध कायद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन

उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात विविध सत्रांमध्ये महिलांविषयक विविध कायद्यांबाबत कार्यशाळेत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. भारती पाटील यांनी ‘’पॉश कायदा नेमकं काय सांगतो?’, डॉ. सुनील कुबेर, डॉ. गीता हसूरकर आणि अॅड. गौरी पाटील यांनी पी.सी.पी.एन.डी.टी. बाबत जनजागृती, डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वयंसिद्धाची माहिती व स्त्रीशक्ती पोर्टल, अॅड. सीमा पाटील आणि नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आजच्या काळात का आवश्यक आहे?’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

Thursday, 22 January 2026

संशोधक विद्यार्थ्यांनी ग्रीन एेनर्जी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देणे आवश्यक - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.प्रमोद पाटील

 

कोल्हापूर, दि.21 जानेवारी - आपणांस कोळसा आणि तेल मोठयाप्रमाणात आयात करावे लागत आहे. यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी ग्रीन एेनर्जी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डी.वाय.पाटील विद्यापीठाचे संशोधन संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात सुरू झालेल्या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषदेचा सांगता समारंभ विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.प्रमोद पाटील बोलत होते. मलेशिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ.मोहम्मद याहा, डॉ.अहमद ईलियास यांची विशेष उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.संजय चव्हाण होते.

डॉ. प्रमोद पाटील पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या परिषदांच्या आयोजनामधून विविध आयडीयांची देवाण-घेवाण करून शैक्षणिक संस्था आणि उद्योगधंदे यांच्यामधील आंतर कमी करणे शक्य आहेे.आत्मनिर्भरता इंडेक्स वाढून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांच्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.देशामध्ये उत्पादीत साहित्य निर्यात होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी प्रगत यंत्रसामग्री आणि उत्पादन क्षमता यांच्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.भारत सरकार उत्पादन क्षेत्राला बळकट करण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहे.मर्यादीत स्वरूपात असलेली ऊर्जा मोठयाप्रमाणात उपलब्ध होण्यासाठी नवनवे संशोधन झाले पाहिजे.त्यासाठी ऊर्जेच्या पूर्नवापराचा अभ्यास होणे आवश्यक आहे. शाश्वत विकास हा एक पैलू आहे.औद्योगीक क्षेत्रास नेमके काय आवश्यक आहे हे पाहून ते पुरवठा करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत.विद्यार्थी आणि तरूणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे आवश्यकच आहे.पुढच्या पिढींसाठी पृथ्वीवरील जैवविविधतेचे संवर्धन करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरूणांनी योग्य माहितीच्या आधारे नवनिर्मिती करण्याचा ध्यास घेतला पाहिजे.भारत सरकार विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहे.आपली योजना योग्य असेल तर देश-विदेशातूनही त्यास मागणी होवू शकते.शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करावे. नवनिर्मितीच्या माध्यमातून समाजाभिमूख संशोधनाकरिता शिक्षकांनी विद्यार्थी आणि उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

यावेळी मार्व्हल्स् इंजिनिअरिंगचे संग्राम पाटील मनोगतामध्ये म्हणाले, तरूण पिढींच्या आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या संकल्पनेतून आपण जगावर राज्य करू शकतो.यासाठी उत्सफुर्तपणे केलेले प्रयत्न महत्वाचे ठरू शकतात.तरूणांनी वेगवेगळे विषय हाताळू नयेत.ज्या विषयामध्ये आपण पारंगत आहात त्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत.यश प्राप्त करण्याची जो पर्यंत मनामध्ये भूक निर्माण होत नाही तो पर्यंत तुम्हाला यश प्राप्त होणार नाही.  भारत सरकारच्या सोईसुविधांचा लाभ घेता आला पाहिजे. नवीन विचार घेवून विकसित भारत करण्याचा सामुहीक प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

पुणे येथील एनसीएलचे संचालक डॉ. पी पी वडगांवकर मनोगतामध्ये म्हणाले, तरूणांनी प्रगतीच्या मार्गामध्ये येणाऱ्या आवाहनांना भिडण्याचे धाडस दाखविले पाहिजे.  शिवाजी विद्यापीठामध्ये संशोधनासाठी आवश्यक असलेली इको सिस्टीम तयार झालेली आहे.  समाज ज्या समस्यांना तोंड देत आहे ते सोडविण्यासाठी तरूण संशोधकांनी पुढाकार घेतला पाहिजे.  उद्योजकतेमध्ये करिअर पर्यायाचा विचार करण्यासाठी योग्य हालचाली होणे आवश्यक आहे.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.एस.एस.चव्हाण म्हणाले, शिवाजी विद्यापीठ आता ज्ञानाचे एक अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखले जात आहे. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर विद्यापीठाची विश्वासार्हता वाढेली आहे. संशोधन कार्याना नवीन दिशा दिली जात आहे. समाज आणि उद्योगासाठी फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टींवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.  रोजगारक्षमतेमध्ये वृध्दी होण्यासाठी औद्योगिक कौशल्ये प्राप्त करून घेणे गरजेचे आहेे.  विकसित भारत घडविण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्रांनी मोलाचे योगदान देणे आवश्यक आहे.  

दरम्यान, स्टार्टअप  प्रदर्शन, इनोव्हेशन हॅकेथॉन, पोस्टर स्पर्धा यामध्ये विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.  शार्कटैंक कम् हॅकॅथॉन गटामधील श्रेणीप्रमाणे निकाल असा, शाश्वतता आणि आरोग्यमध्ये  दिपक सावंत (प्रथम), राजेश कांबळे (द्वितीय), अभियांत्रिकी आणि फॅबटेकमध्ये अमित चव्हाण (प्रथम), एैश्वर्या मुंगळे (द्वितीय), माहिती तंत्रज्ञान आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान यामध्ये अभेय वासंबेकर, ओम कोळेकर आणि निलेश पाटील (प्रथम), प्रणव यादव (द्वितीय), सामाजिक व्यवस्थापन आणि वित्तीय तंत्रज्ञान यामध्ये सोहम देशपांडे (प्रथम) यांना मिळाला.

तसेच, पोस्टर प्रझेन्टेशन स्पर्धेमध्ये शाश्वतता आणि आरोग्य यामध्ये महेश पोरे (प्रथम), साहील पाटील आणि वैष्णवी पाटील (द्वितीय), अभियांत्रिकी आणि फॅबटेकमध्ये मृगेंद्र गुरव (प्रथम), सागर पोर्लेकर (द्वितीय), माहिती तंत्रज्ञान आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान यामध्ये प्रियदर्शनी पाटील (प्रथम), प्रसाद कोळी (द्वितीय), सामाजिक व्यवस्थापन आणि वित्तीय तंत्रज्ञान यामध्ये शंतनू पिसाळ (प्रथम), अश्विनी हवालदार (द्वितीय) यांना मिळाला.

कार्यक्रमास डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ.गोविंद कोळेकर, डॉ.दिपा इंगवले, डॉ.हेमराज यादव, शिवानंद पाटणे, नितीन वाडकर, यांच्यासह इंडस्ट्रीचे पदाधिकारी, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक समन्वयक डॉ.सागर डेळेकर यांनी केले.    डॉ सुभाष माने यांनी आभार मानले तर राजनंदिनी पाटील आणि अंकिता दळवी यांनी सूत्रसंचालन केले

------