Friday, 8 December 2023

भारतीय बँका आणि डाक घरे यांचे समाजाच्या विकासामध्ये योगदान - क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग


कोल्हापूर, दि.0 डिसेंबर - भारतीय बँका आणि डाक घरे हे आर्थिक समावेशन योजनांद्वारे समाजाचा विकास करण्याची मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच बरोबर समाजाच्या विकासामध्येही यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग यांनी आज येथे केले.


      शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये आयोजित डॉ.प्रताप खोत आणि डॉ.केदार मारूलकर लिखित 'कोल्हापूर जिल्हयातील पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून आर्थिक समावेशन' या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग बोलत होते.याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

     राजीव कुमार सिंग पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आणि सर्व सामान्य लोकांना आर्थिक साक्षर करणे ही आजच्या काळाची गरज निर्माण झालेली आहे.समाजाच्या उत्कर्षासाठी विद्यापीठ आणि वित्तीय संस्था एकत्र येवून कार्य करणे आवश्यक आहे.भारतीय डाक घरांमध्ये बैंकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी अमुलाग्र बदल घडून येत आहे.ग्राहकोपयोगी विविध सुविधांही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.डाक घरांमध्ये होवू घोतलेला हा बदल देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहे.

     कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, देशाच्या विकासामध्ये डाक घरांचे मोठे योगदान आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून संशोधन प्रबंधांचे रूपांतर पुस्तक प्रकाशामध्ये होणे ही बाब समाज हिताच्यादृष्टीने विद्यापीठासाठी भूषणावह आहे.कोल्हापूर जिल्हयामध्ये शहरी आणि ग्रामीण दूर्गम भागांमध्ये पोहचलेल्या डाक घरांची संख्या जवळपास 563 इतकी आहे आणि त्यामध्ये सेवा देणारे एक हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.ग्रामीण आणि दूर्गमभागामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचून संदेशवहन, पत्रव्यवहार आणि अर्थ पुरवठा करणारी ही एक सामाजिक अर्थ वाहिनीच आहे.आवर्ती ठेव, बचत खाते, टाईम डिपॉझीट, मासिक उत्पन्न बचत योजना, ज्येष्ठ नागरीक बचत योजना, पीपीएफ, किसान विकास पत्र, सुकन्या समृध्दी योजना, पीएलआय, ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स प्रामुख्याने या योजनांचा समावेश डाक घरांमार्फत पुरविण्यात येत असलेल्या योजनामध्ये होतो. पत्रव्यवहार, ऑनलाईन बैंकींग, पैसे हस्तांतरण, स्टॅम्प, मोबाईल बैंकींग, बिझनेस सर्व्हीसेस, क्युआर कार्ड, रिटेल सर्व्हीसेस, सोशल सिक्युरीटी स्किम, कोअर बैंकींग, आधार एनेबल पेमेंट सिस्टीम, आधार अपडेशन, डोअर स्टेप सर्व्हीसेस या सेवांद्वारे सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये डाक घरे अग्रेसर झालेली आहेत.डाक घर सेवक हे वित्तीय सल्लागार म्हणूनही कामे पहातात. ज्या ठिकाणी बैंकांना पोहचण्यामध्ये काही मर्यादा येतात त्या ठिकाणी हमखास डाक घरे कार्यरत आहेत.त्यामुळे डाक घरांना नाविण्यपूर्ण योजनांमार्फत सेवासुविधा पूरविणे शक्त होत आहे.अद्यापही, काही प्रमाणात सामान्य जनतेपर्यंत विविध योजना पोहचण्यासाठी डाक घरांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल, अशी अशा आहे.

     यावेळी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील आणि वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.पुस्तकाचे लेखक डॉ.प्रताप खोत हे विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हल्पमेंट (एमबीए प्रोग्राम) येथे सहा.प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

    डॉ.प्रताप खोत यांचे मार्गदर्शक आणि पुस्तकाचे लेखक डॉ.केदार मारूलकर यांनी प्रस्तावना केली.डॉ.प्रताप खोत यांनी आभार मानले.

   ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ.पाटील हे डॉ.मारूलकरांचे मार्गदर्शक होते. डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच डॉ.मारूलकर यांनी पीएचडीचे शोध प्रबंध सादर करून त्याचे पुस्तक प्रकाशित केले होते. आज, (दि ०७ डिसेंबर) डॉ.पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण दिवशीच डॉ.प्रताप खोत यांनी डॉ.मारूलकरांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या पीएचडी शोध प्रबंधाचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.

     यावेळी बैंक ऑफ इंडिया चेअरचे समन्वयक डॉ.राजन पडवळ, डॉ.दिपा इंगवले, डॉ.कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. वैशाली भोसले, डॉ. अमोल कांबळे, डॉ. तेजपाल मोहारेकर, डॉ. तेजस्वीनी मोहारेकर, डॉ. शोभा चाळके, डॉ. पल्लवी कोडक यांचेसह विविध अधिविभागांचे शिक्षक उपस्थित होते.

-----

 

शिवाजी विद्यापीठात संत जगनाडे महाराजांची जयंती

 


कोल्हापूर, दि. ८ डिसेंबर: संत संताजी जगनाडे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.

संत तुकाराम महाराज यांचे शिष्य असलेले आणि त्यांचे टाळकरी व लेखनिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेस आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय येवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 6 December 2023

बाबासाहेबांकडून सर्व समाजघटकांच्या उन्नतीचे कार्य: डॉ. श्रीकृष्ण महाजन

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन. मंचावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे व डॉ. विवेक धुपदाळे.


कोल्हापूर, दि. डिसेंबर - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मानवी समाजाला दिशादर्शक आहे. ज्ञानाच्या आधारावर डॉ.आंबेडकरांनी केलेले कार्य संशोधनाच्या माध्यमातून पुढे येणे आवश्यक आहे. सर्वच समाजघटकांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांकडून झालेले कार्य नेत्रदीपक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात विधी अधिविभागामार्फत आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये डॉ.महाजन प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मराठी अधिविभागाचे विभागप्रमुख डॉ.नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

डॉ.महाजन म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वाचन आणि लेखन अव्याहतपणे चालू होते. त्यामधून प्राप्त झालेले ज्ञान हे त्यांनी संपूर्ण मानवी समाजाच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी वापरले. त्यासाठी त्यांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर भारतीय ब्रिटीश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. बाबासाहेबांमध्ये ज्ञानाच्या आस निर्माण करण्याचे काम वडील रामजी यांनी केले. अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही त्यांनी मुलांना शिकण्यासाठी पुस्तके खरेदी करून दिली आणि शिक्षणासाठी प्रोत्साहित केले, हे फार महत्त्वाचे आहे. अथक परिश्रमाने आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर अस्पृश्य समाजामधून दहावी उत्तीर्ण होणारे बाबासाहेब पहिले विद्यार्थी होते. मुंबईमध्ये त्यांच्या अभिनंदनाची सभा घेण्यात आली होती.  त्यावेळी गुरूवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी स्वत: लिहिले भगवान बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांना भेट दिले. त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढविण्याचे काम पुस्तकाने केले. 

डॉ. आंबेडकर यांनी लिहीलेले शोधप्रबंध आजही मार्गदर्शक असल्याचे सांगून डॉ. महाजन म्हणाले, प्राचीन भारतीय व्यापारावर आजपर्यंत कोणीही लिखाण केले नाही. ते डॉ. आंबेडकरांनी विद्यार्थीदशेत केले. ते आजही मार्गदर्शक ठरत आहे. भारतीय शेतीच्या संदर्भात त्यांचे लिखाण फार महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या वर्गात इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित असत. माणगांवच्या परिषदेमध्ये कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ.आंबेडकर हे देशाचे नेते होतील असे भाकीत केले होते. माणगाव आणि नागपूरच्या बहिष्कृतांच्या राष्ट्रीय परिषदेमुळे त्यांचे तिहासिक नेतृत्व ज्ञानाच्या आधारावर पुढे उदयास आले. शोषि आणि वंचित घटकांना त्यांचे सामाजिक न्यायाचे हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अस्पृश्यतेच्या विरूद्ध जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. परिणामी अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजातील लोकही त्यांच्याढ्यात सहभागी झाले, हे त्यांच्या आंदोलनाचे फार मोठे यश होते. आयुष्यभर शोषितांच्या अस्तित्वासाठीची लढाई डॉ.आंबेडकरांनी निकराने लढली.  शेतकऱ्यांचा सर्वात मोठा संप झाला, तो बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली. कोकणातील सर्व शेतकरी त्या सहभागी झाले.

संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जागतिक मानवी मुल्यांवर आधारित लोकशाहीची त्रिमिती या देशाला अर्पण केली. डॉ.आंबेडकर यांच्या कार्यतून मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला त्यांनी स्पर्श केल्याचे दिसून येते, असेही डॉ. महाजन म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे म्हणाले, डॉ.आंबेडकरांचे चरित्र वाचल्यावर आज समाजा शिकलेले लोक काय करतात, असा गंभीर प्रश्न आपणांस पडतो.  डॉ.आंबेडकरांचे चरीत्र विद्यार्थ्यांसह आपणा सर्वांसाठी खूप मार्गदर्शक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे डॉ.आंबेडकर पुढील हजारो वर्षे आपल्यामध्ये ज्ञानाच्या स्वरूपात अजरामर राहणार आहेत. 

विधी अधिविभागप्रमुख डॉ.विवेक धुपदाळे यांनी स्वागत व परिचय करून दिला. राकेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. माजी प्राचार्य डॉ.आर नारायणा यांनी आभार मानले. यावेळी डॉ.शोभा शेट्टी, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ.अनमोल कोठाडिया, डॉ.प्रकाश कांबळे, डॉ. अरूण शिंदे,  डॉ. बी.आर. इंगवले, डॉ. श्रीपा गायकवाड यांच्यासह विधी शाखेचे विद्यार्थी, प्रशासकीय सेवक, शिक्षक उपस्थित होते.