Tuesday 16 June 2020

वृत्तपत्रविद्या विभागाच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिका ग्रंथाचे प्रकाशन

पत्रकारितेतील बदलांना पूरक अभ्यासक्रमांचा वेध घ्या: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिका ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह (डावीकडून) डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. शिवाजी जाधव, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. निशा मुडे-पवार आणि वसंत भोसले. 


कोल्हापूर, दि. १६ जून: कोविड-१९ साथीमुळे जीवनाचे संदर्भ बदलताहेत, त्याचप्रमाणे शिक्षणाचेही संदर्भ बदलताहेत. या बदलांना पत्रकारितेचे क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. पत्रकारितेतील या बदलांना पूरक अशा अभ्यासक्रमांचा शोध व वेध घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या पत्रकारिता विभागाची गौरवशाली वाटचाल या स्मरणिका ग्रंथाचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार-संपादक वसंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, पत्रकारिता विभागाच्या स्मरणिका प्रकाशनाचा कार्यक्रम हा माझा अखेरचा आहे. एखाद्या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमाने कारकीर्दीची सांगता व्हावी, यापेक्षा एखाद्या शिक्षकाचा अन्य मोठा सन्मान होणे शक्य नाही. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागाने गेल्या ५० वर्षांत अनेक दिग्गज पत्रकार दिलेले आहेत. यापुढील काळातही नवनवीन कालसुसंगत उपक्रम राबवून पत्रकारितेच्या क्षेत्राला दिशा देण्याचे कार्य या विभागाने करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार-संपादक व स्मरणिका ग्रंथाच्या संपादकीय मंडळाचे सदस्य वसंत भोसले यांनी वृत्तपत्रविद्या विभागाच्या सुरवातीपासूनच्या वाटचालीचा थोडक्यात वेध घेतला. ते म्हणाले, आपण अधिक सजगतेने व बारकाईने भोवतालाकडे पाह्यला हवे, इतिहासाकडेही तशाच चिकित्सक नजरेने पाह्यला हवे. आपण वर्तमानात नोंदी ठेवायला कमी पडतो, म्हणून आपला इतिहास अपूर्ण राहतो. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रविद्या विभागाने सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने स्मरणिका ग्रंथ निर्माण करून एक महत्त्वाचा दस्तावेज निर्माण केला आहे. येथून पुढेही इतिहासासंदर्भात अधिक तपशील प्राप्त करीत असताना वर्तमानातील नोंदी ठेवण्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. भोसले पुढे म्हणाले, संवाद तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठे बदल झालेले आहेत. त्या बदलांकडे, त्यातून निर्माण झालेल्या आव्हानांकडे आपण कसे पाहतो, हे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाने आपल्या हाती अत्याधुनिक साधने दिली आहेत, तथापि, त्या साधनांपलिकडे मानवी मेंदू, दर्जेदार कन्टेन्ट यांची गरज कायमच राहणार आहे. त्यामुळे आशय विश्लेषण आणि मांडणी यांच्यासाठी आग्रही राहात असतानाच आपण काळानुरुप अद्ययावत होत राहणेही खूप महत्त्वाचे आहे.
प्रारंभी अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे-घाटगे, सुधाकर बरगे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment