Friday 9 October 2020

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन परीक्षा होतील: मंत्री उदय सामंत

"एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही"







कोल्हापूर, दि.९ :   अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन परीक्षा होतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील आढावा बैठकीत सांगितले.

यावेळी, खासदार संजय मंडलिक, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, सध्या जगावर कोरोनाचे संकट आल्यामुळे सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम झालेला आहे. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. या संकटावर मात करीत राज्यातील सर्वच विद्यापीठे आपल्या परीक्षा घेत आहेत. पोलीस, प्रशासन, आरोग्य आणि अशा सर्व यंत्रणा या परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षांच्या अनुषंगाने आज सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन सर्व नियोजन केले आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंचही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यापीठाच्या या परीक्षा दिनांक १७ ऑक्टोबर २०२० पासून सुरु होणार आहेत. असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. 

श्री. सामंत म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेऊन त्यांच्या परीक्षांचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना २० मिनिटे अधिक मिळणार आहेत. तसेच या विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि उत्तम अशी परीक्षापद्धती तयार केली आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाने हेल्पलाईन सुरु केली आहे. ज्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील. 

सीमावर्ती भागात जानेवारी २०२१ मध्ये शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार असून यासाठी लागणाऱ्या जागेची निश्चिती करण्यात आली आहे. या महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी शासनाकडून आवश्यक ते  सर्व सहकार्य केले जाईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment