Sunday 26 June 2016

शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास व्हर्च्युअल क्लासरुम तंत्रज्ञान उपयुक्त: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



'एनआयआरएफ' रँकिंगबद्दल शिवाजी विद्यापीठाचा केला गौरव; वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग इमारत, म्युझियम कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन उत्साहात
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या इमारतीचे कोनशीला अनावरण करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे डिजीटल कोनशीला अनावरण करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमातमार्गदर्शन करतानामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

शिवाजी विद्यापीठात व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन केल्यानंतर दिव्यचक्षू विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध सुविधेचीमाहिती घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री विनोद तावडे व मंत्री चंद्रकांतदादा पाटील.


कोल्हापूर, दि. २६ जून: व्हर्च्युअल क्लासरुम हे ज्ञानाचे आधुनिक भांडार आहे. शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास निश्चितपणे हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेली ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग इमारत व राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारत यांचे भूमीपूजन, राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियान (रुसा)अंतर्गत विकसित केलेल्या व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशात २८व्या तर राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान प्राप्त केल्याबद्दल गौरव अशा संयुक्त समारंभात संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, 'रुसा'च्या महाराष्ट्र प्रकल्प संचालक श्रीमती मनिषा वर्मा, खासदार संभाजीराजे छत्रपती व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पूर्वी शैक्षणिक अथवा आरोग्यविषयक सुविधा शहरापासून गावांपर्यंत नेण्यासाठी रस्ते महत्त्वाची भूमिका बजावत. पण, आजच्या युगात 'कम्युनिकेशन हायवे'च्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ व्हर्च्युअल मार्गांनी गावांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे. डिजीटल अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण-शहरी दरी कमी होण्यास मदत होते आहे. ज्ञानाची व्याप्तीही यामुळे वाढली. जगातील सर्व ज्ञान तंत्रज्ञानामुळे आपल्याला उपलब्ध झाले आहे. ते खुले करून त्याचे लाभ सर्वदूर पोहोचविणे गरजेचे आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या विविध आघाड्यांवरील कामगिरीचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे, ते विद्यापीठ शैक्षणिक बाबत आघाडीवर असायलाच हवे. त्याप्रमाणे आपण एनआयआरएफ क्रमवारीत राज्यात आघाडीवर आहात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. भविष्यात देशातल्या विद्यापीठांत आघाडीवर येण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करील.
वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागासाठी नवी इमारत उभी करत असताना या ठिकाणी आजच्या काळाची नवी आव्हाने पेलण्यास सुसज् असे पत्रकार घडवावेत. त्यासाठी नवीन, कालसुसंगत अभ्यासक्रम निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, 'रुसा'मुळे राज्यात खऱ्या अर्थाने विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याला गती मिळाली आहे. या अभियानातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठांनी करून घेणे आवश्यक आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या इमारतीचे कोनशीला अनावरण करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे डिजीटल कोनशीला अनावरण करण्यात आले.
तत्पूर्वी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयामध्ये 'रुसा'अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गत वर्षभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर केला. 
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, प्राचार्य, अधिविभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'एनआयआरएफ' रँकिंगमध्ये देशात २८वे, तर राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान प्राप्त केल्याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना विशेष पत्र प्रदान करून विद्यापीठाचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

'एनआयआरएफ' रँकिंगबद्दल मुख्यमंत्र्यांनी केला गौरव
शिवाजी विद्यापीठाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'एनआयआरएफ' रँकिंगमध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठात प्राप्त केलेले अग्रस्थान ही प्रशंसनीय बाब आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना या बाबतीत गौरव करणारे प्रशस्तीपत्र आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज प्रदान केले. राज्यातील शैक्षणिक क्षेत्राच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. राज्यात होऊ घातलेल्या आयआयटी, आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठ यांसारख्या संस्थांमुळे स्पर्धाक्षम शिक्षणाची कवाडे मोठ्या प्रमाणावर खुली होतील. विद्यापीठीय शिक्षणाचे स्वरुप अधिकाधिक उपयोजित आणि संशोधनात्मक करण्याबरोबरच कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ निश्चितच अग्रक्रमाने प्रयत्नशील राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment