Thursday 7 March 2019

प्रादेशिक वाहिन्यांमुळे होणारे सांस्कृतिक एकारलेपण चिंताजनक: डॉ. उषाराणी नारायण यांचे प्रतिपादन

वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र  विभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह डॉ. सोनल पांड्या, डॉ. वीरबाला अग्रवाल, डॉ. संजीव भानावत, डॉ. उषाराणी नारायण, डॉ. निशा-मुडे पवार व डॉ. अरुलचेल्व्हम श्रीराम.


महात्मा गांधी एक पत्रकार आणि संपादक’ या डॉ. मृणाल चटर्जी लिखित पुस्तकाचे प्रकाशन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. मीरा के. देसाई, डॉ. सोनल पांड्या, डॉ. अरुलचेल्व्हम श्रीराम, डॉ. चटर्जी, डॉ. संजीव भानावत, डॉ. वीरबाला अग्रवाल, डॉ. निशा पवार-मुडे व डॉ. रविंद्र चिंचोलकर.



विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ


Dr. Usharani Narayan
कोल्हापूर, दि. ७ मार्च: प्रादेशिक वाहिन्यांमुळे दूरचित्रवाणीचा सर्वदूर प्रसार होण्यास मदत झाली असली तरी त्यांच्या माध्यमातून प्रादेशिक स्तरावर प्रसृत होणारे सांस्कृतिक एकारलेपण चिंताजनक आहे, असे प्रतिपादन म्हैसूर विद्यापीठाच्या माजी पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. उषाराणी नारायण यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रादेशिक वाहिन्यांमधील महिला या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात बीजभाषण करताना डॉ. नारायण बोलत होत्या. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
डॉ. नारायण यांनी आपल्या प्रदीर्घ बीजभाषणात सध्याच्या राष्ट्रीय व प्रादेशिक वाहिन्यांसमोरील आव्हाने आणि त्यांमधील महिलांचे चित्रीकरण व स्थान यांचा सविस्तर परामर्ष घेतला. त्या म्हणाल्या, सांस्कृतिक बहुविविधता हे आपल्या देशाचे अविभिन्न वैशिष्ट्य आहे. प्रादेशिक दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या बहुविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांची रचना करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र बळी तो कान पिळी या न्यायाने सांस्कृतिक एकारलेपणाचाच प्रचार त्यांच्याकडून सुरू आहे, हे धोकादायक आहे.
प्रादेशिक वाहिन्या महिलांची प्रतिमा निर्मिती कोणत्या व कशा प्रकारे करतात, हा सुद्धा चिंतेचा विषय असल्याचे सांगून डॉ. नारायण म्हणाल्या, प्रादेशिक वाहिन्यांमुळे बातम्या पाहणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे, ही सुवार्ता असली तरी, त्या माध्यमांद्वारे त्यांची जी सार्वत्रिक प्रतिमा निर्माण केली जाते, ती मात्र अद्यापही लिंगभेदसापेक्षच आहे. सन १९८७मध्ये हमलोग या दूरदर्शनवरील मालिकेद्वारे महिलांनी स्वातंत्र्य व समानतेचा संदेश घेतल्याचे सर्वेक्षण सांगते. मात्र, आजतागायत महिलांच्या सामाजिक स्थितीत तीळमात्रही फरक पडला नसल्याचेच दिसून येते. आहे त्या परिस्थितीत महिलांनी आपले जगणे सुरू ठेवले आहे, हेच त्यातून अधोरेखित होते. आरुषी हत्याकांड असो अगर पुलवामा हल्ला, त्यांच्या वार्तांकनातही ही लिंगभेदसापेक्षता प्रकर्षाने जाणवते. यातून दूरचित्रवाणीची असंवेदनशीलता दिसून येते. त्यासंदर्भात चिंतन होण्याची गरज आहे.
महिला या प्रसारमाध्यमांचा महत्त्वाचा आर्थिक कणा बनत असल्याचे सांगून डॉ. नारायण म्हणाल्या, प्रादेशिक आणि स्थानिक वाहिन्यांमुळे महिलांना दूरचित्रवाणीवर मोठी संधी प्राप्त झाली. त्यामुळे त्या या वाहिन्यांचा महत्त्वाचा आर्थिक कणा बनल्या आहेत. मात्र, त्यांचे येथील योगदान हे प्रागतिक स्वरुपाचे आहे की वस्तूकरणाच्या पातळीपर्यंतच मर्यादित आहे, याचा चिकित्सक अभ्यास करण्याची गरज आहे.  देशात जवळपास ८७७ हून अधिक वाहिन्या आहेत. त्यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. तथापि, त्यांचे वस्तूकरणीय पारंपरिक प्रदर्शन हे असमानतेचे व शोषणाचेच द्योतक आहे. आजही कौटुंबिक हिंसाचार, विषम स्त्री-पुरूष लिंगप्रमाण, कौटुंबिक निर्णयांमधले दुय्यम स्थान, सामाजिक-आर्थिक तसेच राजकीय निर्णय स्वातंत्र्याचा अभाव, साक्षरतेचा अभाव आणि महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण या बाबींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वा प्रादेशिक वाहिन्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणती भूमिका घेतात, हा ही अभ्यासाचा विषय आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या हाती गेलेले माध्यमांचे नियंत्रण हा सुद्धा त्यातील कळीचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजातील सर्व घटकांच्या हक्कांचे संरक्षण, देशातील भाषावैविध्य व बहुसांस्कृतिकतेचे संवर्धन, राष्ट्रीय एकात्मतेला व अखंडतेला पूरक व पोषक बाबींना प्रोत्साहन या बाबी प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रम पत्रिकेवर अग्रक्रमाने असायला हव्यात. माध्यमांच्या प्रादेशिक विखंडनामुळे हा अग्रक्रम अधिक सक्षम व्हायला हवा, त्याच्या कक्षा विस्तारायला हव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Dr. D.T. Shirke
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, माध्यमांतील महिलांचा सहभाग हा पत्रकार, कॅमेऱ्यासमोरील व मागील कलाकार आणि प्रेक्षक म्हणून असा त्रिस्तरीय स्वरुपाचा असतो. पहिल्या दोन वर्गांतील महिलांचे प्रमाणही लक्षणीय असले तरी तिसऱ्या वर्गात त्यांचा समावेश सर्वाधिक आहे. या वर्गाला माध्यमांच्या द्वारे राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित करण्यासाठी कृती आराखडा निर्माण करणे आवश्यक आहे. तो या परिषदेच्या निर्माण केला जावा आणि त्या आधारे पुढे जाण्याची गरज आहे.
यावेळी ओरिसा येथील आय.आय.एम.सी.चे विभागीय संचालक डॉ. मृणाल चटर्जी यांनी संपादित केलेल्या महात्मा गांधी एक पत्रकार आणि संपादकया पुस्तकाचे प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच, संतोष चव्हाण यांनी तयार केलेल्या विभागाच्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. स्मितील पाटील यांनी मान्यवर पाहुण्यांची काढलेली रेखाचित्रे भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनुराधा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी श्रीलंका येथील साबरगामुआ विद्यापीठाचे प्रा. ब्रेशील, हरियाणातील एस.जी.टी. विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. संजीव भानावत, मुंबई एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या डॉ. मीरा के. देसाई, अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाच्या डॉ. सोनल पांड्यासोलापूर विद्यापीठाचे डॉ. रवींद्र चिंचोलकर, हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या डॉ. वीरबाला अग्रवाल, चेन्‍नई येथील अण्णा विद्यापीठाचे डॉ. अरुलचेल्व्हम श्रीराम, पुण्यातील इएमआरसीचे माजी संचालक डॉ. समीरण वाळवेकर, वरिष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांच्यासह डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, चंद्रशेखर वानखेडे यांच्यासह संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment